मणी - १
घराण्याची पूर्वपीठिका
आमचे मूळ घराणे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील वरुड ह्या गावचे. माझे प्रपितामह (पणजोबा) श्री. नागेशपंत हे वरुडला राहत असत. त्यांच्या पत्नीचे, म्हणजे माझ्या पणजीचे नाव राधा होते. ह्या दांपत्याचे चिरंजीव, म्हणजे माझे पितामह (आजोबा), श्री. मार्तंडराव वरुड सोडून नागपुरला आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांचे नागपुरातील तत्कालीन वंशज श्रीमंत व्यंकटराव गुजर यांच्या वाड्यात त्यांनी हिशेबनीसाची नोकरी पत्करली. त्यांच्या पत्नीचे, म्हणजे माझ्या आजीचे, नाव सौ. सरस्वती. ती भिसे कुलोत्पन्न कन्यका. माझे वडील तीर्थरूप श्री. मोरेश्वरराव (आम्ही त्यांना नानाजी म्हणत असू.) हे स्व. मार्तंडरावांचे चिरंजीव.
माझ्या आजोबांचा पोषाख म्हणजे धोतर, सदरा किंवा बाराकशी, पगडी किंवा फेटा असा असे. त्यांची राहणी अतिशय साधी पण स्वच्छ व टापटिपीची असे. त्यांचे धोतर इतके स्वच्छ असे, की ते सडकेने जातांना लोक त्यांच्याकडे कुतुहलाने व कौतुकाने पहात, असे आमचे वडील आम्हाला सांगत असत.
माझ्या वडिलांची आई ते तीन वर्षांचे असतांना वारली. त्यानंतर माझ्या वडिलांचा व माझे मोठे काका श्री. रामचंद्रराव यांचा सांभाळ माझ्या आजोबांनीच केला. आजोबांना मी पाहिले नाही. ते वयाच्या साठाव्या वर्षी वारले असे माझे वडील मला सांगत. माझे काका ती. स्व. रामचंद्रराव हे नागपुरकर भोसल्यांच्या इस्टेटीत कामदार होते. त्यांच्या पत्नीचे म्हणजे माझ्या काकीचे नाव जानकी होते. ती पुरोहित कुलोत्पन्न कन्यका. माझे काका स्व. रामचंद्रराव यांना पाहिल्याचे मला आठवत नाही. मी सहा महिन्यांचा असतांनाच ते वारले असे माझे वडील मला सांगत. माझी काकी अतिशय प्रेमळ होती. तिला मुलबाळ नव्हते. तिने माझ्यावर खूप प्रेम केले. मी नऊ वर्षांचा असतांनाच ती वारली.
माझ्या वडिलांचे शिक्षण नागपुरची सर्वात जुनी शाळा नील सिटी हायस्कूल, नागपुर येथे झाले. तेथूनच ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे मराठी व इंग्रजी हस्ताक्षर उत्तम होते. नंतर ते काॅलेजात एफ. ए. च्या वर्गात गेले. त्याकाळी एफ. ए., बी. ए., एम. ए. असे महाविद्यालयीन शिक्षणाचे टप्पे होते. आपण ज्याला आता इंटरमिजिएट म्हणतो, तेव्हा त्याला एफ. ए. म्हणत असत. माझे वडील म्हणजे मोहरीर घराण्यातील त्या काळचे पहिले आंग्लविद्याविभूषित विद्यार्थी. नंतर त्यांना नागपुरच्या पोस्ट मास्टर जनरल (P. M.G.) च्या ऑफिसात नोकरी मिळाली. त्यांना सुरुवातीचा पगार दरमहा पंधरा रुपये होता. त्या पंधरा रुपयातून पाच रुपये ते आपल्या वडिलांना देत असत. त्यांचे वडील कोणालाही माझा नाना मला पगारातून पाच रुपये देतो असे मोठ्या कौतुकाने सांगत. माझे वडील आपल्या वडिलांना 'भायजी' म्हणत. 'मी आपल्या पगारातून भायजींना पाच रुपये देत असे तर ते महिमहि जात' असे ते आम्हाला सांगत असत. बोलण्यात केव्हाही विषय निघाला तर ते आपल्या वडिलांविषयी अत्यंत आदराने बोलत.
माझ्या आईचे नाव राधा. तिच्या आजससासूचे नाव तिला ठेवण्यात आले. तिचे माहेरचे नाव सखू. ती आर्वीचे श्री. गोविंदराव कमाविसदार यांची कन्या. तिला तीन मोठ्या बहिणी, एक मोठा भाऊ व एक लहान भाऊ.
माझे मातामह श्री. गोविंदराव कमाविसदार हे आर्वीचे श्री. गोपालदास राठी यांच्याकडे मुनीम होते. माझ्या मातामहीचे नाव अन्नपूर्णा. या दांपत्याच्या सर्व मुलीत माझी आई लहान. सर्वात मोठ्या बहिणीचे नाव जानकीबाई पत्तरकिने. आमची ती मोठी मावशी. क्रमांक दोनच्या बहिणीचे नाव जानकी देशपांडे. तिसऱ्या बहिणीचे नाव सौ. चंद्रभागा पुराणिक. वडील भावाचे म्हणजे माझ्या मोठ्या मामांचे नाव श्री. यादवराव कमाविसदार आणि लहान मामांचे श्री. कृष्णराव कमाविसदार. ह्या मंडळींपैकी आता कोणीही हयात नाहीत. पुराणिक मावशीला मी पाहिले सुद्धा नाही. ती मी एक वर्षाचा असतांनाच १९१६ साली वारली. पण माझी आई मी बारा वर्षांचा असतांनाच वारल्यामुळे बाकीच्या मावश्यांचा व श्री. मामा कमाविसदारांचा माझा घनिष्ट संबंध आला. मामा तर म्हणायचे, अरे मी तुझ्या आईच्या पाठीवर पाय देऊन आलो आहे. माझा तुझ्यावर ज्यास्त लोभ आहे. मोठ्या मामांचा माझा फारसा संबंध आला नाही, कारण ते वणीला बापुजी पाटलांकडे दिवाणजी होते.
श्री. कृष्णराव कमाविसदार हे त्यांच्या चौदाव्या वर्षी त्यांचे वडील वारल्यानंतर आर्वी सोडून नागपुरला आले व नागपुरलाच त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झाले. १९२१ च्या असहकारितेच्या चळवळीत भंडाऱ्यालाही मित्रांनी मिळून काढलेल्या राष्ट्रीय शाळेत काम केले. नंतर ते नागपुरला जिल्हा सहकारी बँकेत मॅनेजर होते. मामांचा जन्म इ. स. १८९८ आणि मृत्यू दि. २२ जून १९७५ रोजी ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशीला झाला. आता माझ्या मावसभावांपैकी फक्त श्री. रघुनाथराव पत्तरकिने, श्री. लक्ष्मण गोविंद देशपांडे आणि श्री. कृष्ण विठ्ठल पुराणिक हेच हयात आहेत. त्यांच्याकडे माझे येणे जाणे चालू असते.
माझे वडील पी. एम. जी. ऑफिसात क्लार्क, हेडक्लार्क आणि नंतर सुपरिंटेंडेंट होऊन डोळ्यांच्या त्रासामुळे पन्नाशीतच सेवानिवृत्त झाले.
माझ्या वडिलांच्या व आईच्या जन्ममृत्यूची माहिती येथे एकत्र देणे वाचकांना संदर्भाच्या दृष्टीने सोयीचे होईल.
तीर्थरूप नानाजींचा जन्म: भावनाम संवत्सर, शके १७९६, गुरुवार, आषाढ शुक्ल नवमी, दि. १५ जुलै १८७४, इष्ट घटी सहा पळे अकरा, सकाळी आठ वाजून एकोणिस मिनिटांनी नागपुर येथे झाला. जन्मनाम - तुकाराम, व्यावहारिक नाम - मोरेश्वर मार्तंड मोहरीर. आईचे नाव सौ. सरस्वती.
तीर्थरूप नानाजींचा मृत्यू: फाल्गुन शुद्ध नवमी, शके १८५६, दि. १३ मार्च १९३५, सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटे, नागपुर मुक्कामी.
तीर्थरूप सौ. आईचा जन्म: मन्मथनाम संवत्सरे, शके १८१७, मंगळवार, फाल्गुन कृष्ण एकादशी, दि. १० मार्च १८९६, सूर्योदयात् इष्ट घटी बावीस पळे बारा, दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटे. जन्मनाम - रखुमाई, व्यावहारिक नाम - सखू, वडिलांचे नाव - श्री. गोविंदराव कमाविसदार, आईचे नाव - सौ. अन्नपूर्णा कमाविसदार
तीर्थरूप सौ. आईचा मृत्यू: विभवनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, शके १८५०, गुरुवार दि. २४ मे १९२८, सायंकाळी सात वाजून दहा मिनिटे.
माझे वडील माझ्यापेक्षा वर्णाने उजळ, निमगोरे होते. त्यांचा पोषाख धोतर, शर्ट, बंद काॅलरचा कोट, डोक्याला फेटा किंवा टोपी आणि खांद्यावरून घेतलेले उपरणे असा होता. त्यांचा बांधा ठेंगणा होता.
माझी आई वर्णाने गोरी, अंगाने बांधेसूद आणि ठेंगण्या बांध्याचीच होती. त्याकाळी सर्वच स्त्रिया नऊवारी लुगडे नेसत असत. बाहेर जातांना तिच्या डोक्यावर नेहमी पदर असे. तिची वाणी मधुर, बोलणे गोड, वागणे प्रेमळ व स्वागतशील असे.
माझे वडील ईश्वरनिष्ठ, धार्मिक प्रवृत्तीचे होते. प्रातःस्नान, संध्या, पूजा, जपजाप्य, सूर्यनमस्कार, अध्यात्मरामायण, दासबोध, मुकुंदराजांचे परमामृत इत्यादि ग्रंथांचे नियमित वाचन, देवऋषीपितृतर्पण, नैवेद्य, वैश्वदेव ही त्यांची रोजची सकाळची दिनचर्या कधीही चुकली नाही. हे सर्व आटोपून पुन्हा नऊ वाजता ऑफिसला जायला निघायचे. ते रोज ब्राह्ममुहुर्तावर निजून उठायचे. कचेरीत कधीही पाणी प्यायचे नाहीत. घरी आल्यावर हातपाय धुऊनच पाणी प्यायचे. बाराही महिन्यांच्या एकादश्या, रामनवमी, गोकुळ अष्टमी, वैकुंठ चतुर्दशी, महाशिवरात्री, श्रावण सोमवार इत्यादि उपवास ते कडक करीत असत. माझी आईही हे सर्व उपवास करायची. माझ्या आईवडिलांनी करवीर संकेश्वर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांचा मंत्र घेतला होता. वडिलांनी रामाचा व आईनी महादेवाचा. वडील रामाच्या नवरात्रात नऊही दिवस उपवास करीत. अर्थात् आईही करायची. आई माघ महिन्यात महादेवाचेही अकरा दिवसांचे नवरात्र करायची. ती शिवलीलामृताचा एक अध्याय रोज वाचायची. वडिलांचे सोवळे कडक असे. आईचेही काही कमी नसे.
भाद्रपद मासातला भागवत सप्ताह ऐकायला माझे वडील प्रथम साल्पेकरांच्या देवघरी आणि नंतर श्री. दक्षिणामूर्ती मंदिरात जात असत. आमच्या घराशेजारीच असलेल्या श्री. बाबाजी महाराज पंडितांकडे त्यांचे प्रवचन ऐकायला जात. ह. भ. प. भाऊसाहेब साल्पेकर, ह. भ. प. बाबुराव दक्षिणामूर्ती आणि बाबाजी महाराज पंडित मजजवळ असे बोलले आहेत की, 'तुझे वडील खरोखरच महान भक्त आहेत. श्रवण करतांना त्यांचे अष्टसात्त्विक भाव जागृत होतात. डोळ्यातून अश्रुधारा वाहतात, शरीर स्तंभित होते. इतर श्रोते आणि तुझे वडील यांच्यात हा फरक मला प्रकर्षाने जाणवतो.'.
माझी आई मात्र कधी कीर्तन, पुराण-प्रवचनांना गेल्याचे मला आठवत नाही. पतीच्या धर्माचरणातच मनोभावे पतिपरायण वृत्तीने साहाय्य करायचे हाच तिचा परमार्थ. ती खरी पतीची सहधर्मचारिणी होती. ती माउली माझ्या दुर्दैवाने माझ्या वयाच्या बाराव्या वर्षीच वारली. नंतर 'श्रीराम जय राम जय जय राम' हा त्रयोदशाक्षरी मंत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या तिच्या वह्या मला सापडल्या. माझे वडील दर शनिवारी सायंकाळी भजन करीत असत. माझ्या मातापित्यांच्या भक्तिभाव श्रद्धायुक्त धर्माचरणाने माझ्या बालमनावर अमीट असे संस्कार झाले.
ती. नानाजींना ग्रंथवाचनाची आवड होती, गोडी होती. कोणतीही व कशीही पुस्तके ते वाचीत नसत. सारासारविवेकबुध्दीला रुचतील, पटतील असेच ग्रंथ ते वाचीत असत, अभ्यासीत असत, त्यांचे परिशीलन करीत असत. धुळ्याचे समर्थभक्त श्री. शंकरराव देव यांच्या 'रामदास आणि रामदासी' या मासिकाचे ते वर्गणीदार होते. तसेच श्रीमत् शंकराचार्य डाॅ. कुर्तकोटी यांच्या 'स्वधर्म' साप्ताहिकाचेही ते वर्गणीदार होते. त्या काळची गाजलेली नियतकालिके 'मनोरंजन' आणि 'करमणूक' यांचेही ते वर्गणीदार होते. मराठी कादंबरीचे जनक म्हणून ज्यांचा गौरव होतो ते श्री. हरि नारायण आपटे ह्यांची 'चंद्रगुप्त' ही कादंबरी ह्याच नियतकालिकातून क्रमशः प्रसिद्ध झाली होती. धुळ्याचे श्री. शंकरराव देव यांनी प्रकाशित केलेले श्री. समर्थ रामदास स्वामींचे सर्व ग्रंथ त्यांच्या संग्रही होते. रामविजय, हरिविजय, अध्यात्म रामायण, भविष्य महापुराण, दासबोध, श्री. गणेश पुराण इत्यादि ग्रंथ त्यांनी विकत घेतले होते. इंग्रजी-मराठी असे दोन मोठे शब्दकोश, इमर्सनचे निबंध, नवनीत यांचाही त्यांच्या खाजगी ग्रंथसंग्रहालयात समावेश होता. यावरून माझ्या वडिलांच्या ज्ञानलालसेची सहज कल्पना यावी. डोळे बिघडल्यामुळे त्यांनी पन्नाशीतच सेवानिवृत्ती पत्करली. ते मला म्हणायचे, 'बाबा, तुझे सर्व शिक्षण झाल्यानंतर तूच मला हे मी आवडीने संग्रहित केलेले ज्ञानभांडार वाचून दाखवशील.'. पण तो योगच आला नाही. मी एकोणीस वर्षांचा असतांना निर्घृण काळाने त्यांना माझ्यापासून हिरावून नेले. एक ज्ञानपिपासू, अभ्यासू, बुध्दिमान, व्यासंगी, निग्रही, निर्व्यसनी, निगर्वी, परोपकारी, सदाचरणी व्यक्तिमत्व नाहीसे झाले. माझ्या जीवनावर कायमचा ठसा उमटवून.
_____________________
मणी - २
जन्म, बालपण व शिक्षण
माझा जन्म शालीवाहन शके १८३७, राक्षसनाम संवत्सरे, शनिवार, श्रावण शुद्ध एकादशी, दहा घटी बारा पळे, सह द्वादशी, सूर्योदयात् इष्ट घटी चौतीस पळे एकोणिस, दि. २१ ऑगस्ट १९१५, सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी नागपुरला म्यूर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये झाला.
जन्मानंतर तीन-चार तास रडलो नाही. चेतना जवळ-जवळ नव्हती. डॉक्टरांच्या उपचारानंतर हालचाल सुरू झाली. पाच तासांनंतर पहिले रूदन ऐकल्यानंतर आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. जन्मतःच एक मोठे गंडांतर टळले. तुझा पुनर्जन्मच झाला असे वडील सांगत असत.
इ. स. १९१५ सालच्या रोजनिशीत २१ ऑगस्टला फाक्याचा जन्म अशी नोंद आढळली. एकादशी असल्यामुळे आई-वडिलांना उपवास होता. फाका हा उपवासाचा समानार्थी प्रतिशब्द म्हणून वडिलांच्या त्या वर्षाच्या रोजनिशीत फाक्याचा जन्म या नोंदीची उपपत्ती लागते. श्रावणमास म्हणजे महादेवाचा महिना. त्यात शुक्ल पक्षातील एकादशी म्हणून बाराव्या दिवशी धडाक्यात बारसे करून 'सदाशिव' असे नाव ठेवण्यात आले.
मी आपल्या आई-वडिलांचा पहिला मुलगा होतो असे नाही. त्यांचा गोविंद नावाचा पहिला मुलगा वयाच्या तिसऱ्या वर्षी वारला. तिसऱ्या वर्षी मोठ्या समारंभपूर्वक त्याचे जावळ काढण्यात आले आणि त्यानंतर काही दिवसांनीच त्याला मृत्यू आला. तो वर्णाने आईसारखाच गोरा होता. आई-वडिलांना अतिशय दुःख झाले. माझ्यावर त्यांचा अतिशय लोभ.
माझी एकुलती एक बहिण दुर्गा हिचा जन्म नागपुर मुक्कामी, शालीवाहन शके पिंगलनाम संवत्सरे शके १८३९, शुक्रवार मार्गशीर्ष शुक्ल पोर्णिमा घटी वीस पळे अठ्ठावीस सह वद्य प्रतिपदा सूर्योदयात इष्ट घटी पन्नास पळे चौदा, दि. २८ डिसेंबर १९१७, रात्री दोन वाजून छप्पन्न मिनिटांनी झाला. नागपुर शहरात प्लेगची साथ उद्भवल्यामुळे आम्ही त्यावेळी झोपडीवर राहत होतो. तेथेच माझ्या बहिणीचा जन्म झाला. तिचे जन्मनाव - छमादेवी, माहेरचे नाव - कु. दुर्गा, सासरचे नाव - सौ. जान्हवी. माझी बहीण गौर वर्णाची होती.
१९२० साली नागपुर नगरपालिकेच्या महाल प्राथमिक शाळेत माझे नाव दाखल करण्यात आले. तेथे दरवर्षी वार्षिक परीक्षेत माझा प्रथम क्रमांक ठरलेलाच असे. १९२४ साली मी प्रायमरी सर्टिफिकेट परीक्षा उत्तीर्ण झालो. शिष्यवृत्ती परीक्षेला मी बसलो होतो. वर्ग पाच ते आठ मला शिष्यवृत्ती मिळत होती.
१९२३ च्या एप्रिलमध्ये चैत्रमासी माझी मौंज वयाच्या आठव्या वर्षी मोठ्या थाटात करण्यात आली. मौंजेला आलेल्या सगळ्यांना नारळ वाटण्यात आले. सडकेवर पायघड्या घालून समोर वाजंत्री वाजताहेत अशा थाटात भिक्षावळीची मिरवणूक निघाली.
१९२४ साली नागपुरच्या सर्वात जुन्या नील सिटी हायस्कूलमध्ये पाचव्या वर्गात प्रवेश घेतला. वर्ग पाच ते आठ मला मिड्लस्कूल स्कॉलरशिप मिळत होती. हायस्कूलमध्ये व्ही. जी. डाऊ स्कॉलरशिप मिळत होती. येथेही दरवर्षी वार्षिक परीक्षेमध्ये माझा प्रथम क्रमांक ठरलेलाच असे. प्रतिवर्षी स्नेहसंमेलनात मला श्री. हरि माधव पंडित स्मारक बक्षिसे पुस्तकरूपाने मिळत असत. पारितोषक विजेत्यांना बक्षिसादाखल कोणती पुस्तके हवीत याची विचारणा होत असे आणि यथाशक्य त्यांनी सांगितलेली पुस्तके त्यांना बक्षिस देण्यात येत. माझी जन्मठेप, निकोलाय लेनिन, गीर्वाण लघुकोश, मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी अशी अनेक पुस्तके मला बक्षिसादाखल मिळाली. शालेय जीवनात मला उत्तम शिक्षक लाभले. संस्कृतला श्री. शं. गो. सहस्रबुद्धे, गणिताला श्री. भाके व श्री. तात्याजी वझलवार, विज्ञानाला श्री. टामणे, इंग्रजीला श्री. सगदेव व श्री. पहाडे, मराठीला श्री. दादाजी बल्लाळ, इतिहासाला श्री. वासुदेवराव फडणवीस, भुगोलाला श्री. पहाडे व श्री. यादवराव देशमुख इत्यादि.
मला गंगाधर नावाचा एक धाकटा भाऊ होता. तो गोरा, गोमटा, दिसायला सुरेख, गुटगुटीत आणि लोभस होता. तोही वयाच्या तिसऱ्या वर्षी वारला. त्याच्या मरणाने आईला अतिशय दुःख झाले. आपला शोक कोणाला दिसू नये म्हणून ती घराच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन शोकावेग हलका करी.
१९२५ सालच्या उन्हाळ्यात माझी काकी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्रीच्या यात्रेला गेली. यात्रेहून परत आली व आजारी पडून त्यातच दगावली. भाद्रपद शुक्ल एकादशी शके १८४७ ला तिचे निधन झाले.
१९२८ साली मी आठव्या वर्गाची हायस्कूल एन्ट्रन्स परीक्षा उत्तीर्ण झालो. माझ्या आईने तिचे भाऊ श्री. मामा कमाविसदार आणि तिचे भाचे श्री. हरिभाऊ पत्तरकिने यांना मला हायस्कूलमध्ये कोणते माध्यम द्यावे असे विचारले. दोघांचेही मत मराठी माध्यम द्यावे असे पडले. नील सिटी हायस्कूलमध्ये त्यावेळी इंग्रजी माध्यम नव्हते. इंग्रजी माध्यम घ््यायचे ठरले असते तर शाळा बदलावी लागली असती. पण मराठी माध्यम घ््यायचे ठरल्यामुळे नील सिटी हायस्कूलमध्ये नववी ते अकरावी पर्यंतचे शिक्षण झाले.
१९२८ च्या एप्रिल महिन्याच्या मध्यापासूनच आईला हिवतापाच्या आजाराने पछाडले. थंडी वाजून १०५ पर्यंत ताप चढायचा. काही केल्या ताप हटेना. प्रकृती फारच क्षीण झाली. ती सव्वा महिना अंथरूणावरच होती. माझी बहीण दुर्गा ही देखील त्याच वेळी आजारी झाली. त्यावेळी आमच्या घरात माय-लेकींनी अंथरूण धरले होते. पुढे दुर्गाची प्रकृती सुधारली व ती बरी झाली. पण आईचे दुखणे वाढतच गेले. १९२८ सालचा उन्हाळाही खूप कडक होता. ११८ डिग्रीपर्यंत तापमान चढले होते.
चोवीस मेला आईचा ताप १०८ डिग्रीपर्यंत चढला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आईच्या सर्वांगावर ओल्या चादरी टाकून विहिरीच्या थंड पाण्याच्या बादल्या आणून ओतल्या. पण काहीही उपयोग झाला नाही. त्याच दिवशी संध्याकाळी तिची प्राणज्योत मावळली. माझ्यावर वज्राघात झाला. मी त्यावेळी बारा वर्षांचा होतो.
आईच्या अस्थी गंगेत प्रयागला शिरवायच्या होत्या. माझे वडील मला व माझी बहीण दुर्गा हिला आपल्याबरोबर घेऊन गेले. प्रयाग बरोबरच काशी, अयोध्या, मथुरा, वृंदावन, आग्रा, दिल्ली, कानपुर, हरिद्वार, ऋषिकेश इत्यादि स्थळे पाहून आलो. आई गेल्याच्या दुःखाचा उपशम होऊन आमच्या मनाला विरंगुळा वाटावा हा प्रमुख हेतूही यात्रा करण्यात माझ्या वडिलांचा होता. वडिलांनी मातेची आणि पित्याची अशा दोन्ही भूमिका समर्थपणे पार पाडल्या. आईच्या मृत्यूने तेही अतिशय व्यथित झाले होते.
१९३० साली चि. दुर्गाचे लग्न फाल्गुन महिन्यात श्री. माधवराव देशपांडे यांचे चिरंजीव श्री. लक्ष्मणराव देशपांडे यांचेशी संपन्न झाले. ते नागपुर ट्रेझरीत नोकरीला होते. विवाह समारंभ नागपुरलाच झाला.
आईच्या मरणाचे दुःख मला बरेच दिवस पुरले. तिची आठवण झाली की मी कासावीस होत असे. काही सुचत नसे. कोठे लक्ष लागत नसे. अश्रूंना
वाट मोकळी करून देत असे.
१९३०-३१ या वर्षात मी अकरावी मॅट्रिकला होतो. त्यावेळी आताप्रमाणे दहावी मॅट्रिक व बारावी मॅट्रिक हा प्रकार नव्हता. १९३० साली बारा मार्च रोजी महात्मा गांधी मिठाचा कायदा तोडण्यासाठी दांडी यात्रेला निघाले. सविनय कायदेभंगाच्या चळवळीला एकदम उधाण आले होते. देशभर स्वातंत्र्याच्या चळवळीचा डोंब उसळला होता. सत्याग्रहींची धरपकड सुरू होती. शाळेत वारंवार हरताळ होत असे. सभा, मिरवणुकी यांना ऊत आला होता. १९३१ साल उजाडले. मार्चमध्ये बोर्डाची परीक्षा होती. मनोनिग्रह करून जोमाने अभ्यास करू लागलो. महात्मा गांधी आणि लॉर्ड इर्विन यांच्यात करार होऊन राजबंदींची सुटका झाली. नरकेसरी बॅरिस्टर अभ्यंकर, पुनमचंद राका, आचार्य दादा धर्माधिकारी, आमचे मामा कमाविसदार इत्यादि नागपुरच्या पुढाऱ्यांचीही सुटका झाली. त्यांच्या स्वागतार्थ चिटणिस पार्कात विशाल सभेचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी आमचा मॅट्रिकचा गणिताचा पेपर होता. मला सभेला गेल्याशिवाय राहवले नाही. सभा रात्री बारा वाजेपर्यंत चालली.
मॅट्रिकचा निकाल लागला. मी आमच्या शाळेतून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागपुरच्या शासकीय विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. एम. ओवन हे प्राचार्य होते. १९३३ साली Intermediate Science ही परीक्षा उत्तीर्ण झालो. आता मी बी. एस. सी. च्या वर्गात गेलो होतो. फिजिक्सला डॉ. थत्ते, केमिस्ट्रीला डॉ. कृष्णमूर्ती व चांदोरकर, गणिताला डॉ. शास्त्री व श्री. बेलेकर हे प्राध्यापक होते. इंग्रजीला प्रो. वैद्य होते.
परमेश्वराने मला कुशाग्र बुद्धी दिली होती. मला शिक्षणाची आवडही होती. पण योग मात्र मोठे विचित्र होते. भवितव्याची पावले वेगळ्याच दिशेने पडत होती.
आमच्या वडिलांचे चुलत भाऊ श्री. गणेश खंडो मोहरीर यांना गोपाळ नावाचा एक मुलगा होता. दादांचा जन्म १९०४ सालचा. त्यांच्या तिसऱ्या वर्षीच त्यांची आई वारली. तेव्हापासून आमच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार अण्णाजी आपल्या मुलांसह आमच्या घरीच आमच्या जवळ राहू लागले. १९३४- ३५ सालात मी अंतिम बी. एस. सी. च्या वर्गाला होतो. १९३४ च्या ऑक्टोबरमध्ये नवरात्राच्या पहिल्या दिवशी अण्णाजींना ताप आला. तो नवज्वर होता. नवरात्राच्या पारण्याच्या दिवशी आश्विन शुद्ध नवमीला रात्री आठच्या सुमारास ती. स्व. अण्णाजींचे प्राणोत्क्रमण झाले. ते प्रेमळ गृहस्थ होते. ते ती. स्व. नानाजींपेक्षा पाच वर्षांनी मोठे होते. मृत्युसमयी ते पासष्ट वर्षांचे होते.
मी इंटर सायन्स झाल्यापासून ती. नानाजींची प्रकृती खालावतच चालली होती. १९३४ च्या दिवाळीनंतर ती ज्यास्तच बिघडली. त्यांनी अंथरूणच धरले. त्यांचे औषधपाणी, सेवाशुश्रुषा मी अत्यंत जिव्हाळ्याने केली. अभ्यासात लक्ष लागेना. काॅलेजात जात असे, पण सारे चित्त घरी वडिलांकडे असे. कॉलेजमधून घरी आलो की वडिलांच्या बिछान्याजवळ बसून राहत असे. दिवसेंदिवस ढासळत जाणाऱ्या त्यांच्या प्रकृतीकडे पाहून खिन्न, उदास होत असे. आईतर गेलीच पण वडीलही आपल्याला सोडून जाणार असे भीतीचे सावट मनाला हैराण करीत असे. १९३५ साल उजाडले. बी. एस. सी. ची प्रॅक्टीकल परीक्षा आटोपली. प्रॅक्टीकल्स चांगले झाले. नानाजी आपल्या दुखण्याने हैराण तर होतेच, पण आपला हा आजार आपल्या एकुलत्या एक हुशार मुलाच्या अभ्यासाच्या व शैक्षणिक प्रगतीच्या आड येणार या विचाराने ते अधिकच बेजार होत.
त्यांच्या चेहऱ्यावरील कारुण्य मला जाणवत होते. पण तोंड फिरवून अश्रू ढाळण्याखेरीज माझ्या हाती तरी काय उरले होते? अखेरीस तो दिवस उजाडला. सकाळ पासूनच त्यांना घरघरा लागला. नाड्या क्षीण होत चालल्या. फाल्गुन शुद्ध नवमी, शके १८५६, दि. १३ मार्च १९३५ सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी साराच ग्रंथ आटोपला. मृत्यूसमयी त्यांना साठ संपून एकसष्टावे चालू होते. त्यांच्या अस्थी प्रयागला शिरवण्यात आल्या.
१८ मार्च १९३५ पासून बी. एस.सी. ची लेखी परीक्षा सुरू होणार होती. परमपूजनीय, आदरणीय तीर्थरूपांच्या दुःखद निधनाच्या घोरतम आघाताने मी अक्षरशः हादरलो होतो. ह्या भयंकर धक्यातून चार-पाच वर्षे मी सावरलो नाही. उदास व उद्विग्न मनःस्थितीत दिवस जात होते. घर खायला उठत होते. मी बराच वेळ मोठ्या मावशीकडे घालवत असे.
माझे मामा श्री. यादवराव व श्री. कृष्णराव कमाविसदार, मावसभाऊ श्री. हरिभाऊ उपाख्य बापुराव पत्तरकिने व श्री. तात्याजी पुराणिक यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रीय भाग घेतला होता. मी ही काँग्रेसच्या सभांना व मिरवणुकींना जात असे. खादी वापरीत असे, सूत कातीत असे. परकीय सरकारची नोकरी करायची नाही असा मनोमन निश्चय मी करून टाकला होता.
ती. नानाजींच्या अंत्ययात्रेला बरीच मंडळी हजर होती. सारे नातलग व मित्रमंडळी तर होतीच, पण पी. एम. जी. च्या ऑफिसातले त्यांचे सहकारीही आले होते. त्या ऑफिसचे प्रमुख श्री. साले महंमद हेही आले होते. दहा दिवसांनी ते पुन्हा एकदा येऊन गेले. ते मला म्हणाले, तुम्ही पी एम.जी. ऑफिसमध्ये अर्ज करा, बाकी सर्व मी पाहून घेईन. तुम्हाला नोकरी मिळेल याची मी खात्री देतो. पण सरकारी नोकरी करायची नाही असे आधीच ठरवल्यामुळे मी अर्ज केला नाही व आपल्या दृढनिश्चयाला जागलो.
_____________________
मणी - ३
विवाह
१९४० सालापासूनच सांगून आलेल्या मुली पाहायला मी आरंभ केला. तीन-चार मुली पाहिल्या. पण या ना त्या कारणाने त्या पसंत पडल्या नाहीत. १९४१ च्या सुरुवातीला वणीचे रावबहादुर बापुजी पुराणिक हे ती. स्व. मामांकडे नागपुरला आले होते. त्यांनी माझी माहिती विचारली. मी त्यांना ती दिली. वणीचे रहिवाशी श्री. मुरलीधर सीताराम सास्तीकर आणि सौ. सत्यभामाबाई सास्तीकर यांची ज्येष्ठ कन्या सुशीला हिच्याकरिता ती माहिती बापुजींनी विचारली होती. त्यांनी ती माहिती मुलीच्या आईवडिलांना कळविली. नंतर त्यांनी मला मुलगी पाहायला वणीला बोलावले. मी माझे मावसभाऊ श्री. भैयाजी पत्तरकिने यांना घेऊन वणीला गेलो. मी पुराणिकांकडेच उतरलो. महाशिवरात्रीच्या दिवशी श्री. सास्तीकरांच्या घरी सुशीलाला पाहिले. त्या प्रसंगी मुलीच्या वडिलांनी वणीतील बरीच मंडळी बोलावली होती. मला तो प्रकार जरा चमत्कारिकच वाटला. मुलगी चांगली वाटली. गौर वर्णाची होती. नाकीडोळी नीटस, दिसायला सुंदर, मध्यम बांध्याची व उंचीची, होकार देण्यासारखी वाटली. सायंकाळी माझे मावसभाऊ श्री. तात्याजी पुराणिक मला बाहेर फिरायला घेऊन गेले. त्यांनी मुलीची शिफारस केली. नावाप्रमाणेच ती सुस्वभावी आहे असे सांगितले. 'चार दागिने अंगावर घातले की ती माझ्या बायकोपेक्षाही सुंदर दिसेल' या शब्दात त्यांनी सुशीलाचे वर्णन केले. श्री. नानाजी पुराणिकांनीही अनुकूल मत दर्शविले. सास्तीकरांना मी होकार कळविला. ते नागपुरला आले आणि आमच्या घरी येऊन साक्षगंध केले. साखरपुडा झाला
बुधवार, ज्येष्ठ कृष्ण तृतीया, शके १८६३, दि. १२ जून १९४१ ला नागपुर मुक्कामी भोसला वेदशाळेत सकाळी आमचा शुभविवाह संपन्न झाला. विवाहाच्या वेळी मला सव्वीसाचे तर सुशीलाला सोळावे वर्ष चालू होते. उत्तररात्री वरात निघून आम्ही पाताळेश्वर मार्गावरील आमच्या वास्तूत प्रवेश केला. मुलीचे नाव सौ. प्रमिला ठेवण्यात आले आणि आमचा गृहस्थाश्रम सुरू झाला.
१९४१ साली एका सुप्रभाती सी. पी. अॅण्ड बेरार एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मधील एक शिक्षक श्री. केशवराव लक्ष्मण जोशी आणि सेन्ट्रल हायस्कूलचे श्री. भैयाजी मोकाशी माझ्या घरी आले आणि मला म्हणाले, सी. पी. अॅण्ड बेरार हायस्कूलचे सुपरिंटेंडेंट श्री. अण्णासाहेब गोखले यांनी आम्हाला तुमच्याकडे पाठवले आहे. त्यांना एका चांगल्या शिक्षकाची गरज आहे. तुम्ही आज किंवा उद्या त्यांना त्यांच्या कार्यालयात भेटा. त्याप्रमाणे मी त्यांना भेटलो. थोडेसे बोलणे झाल्यावर त्यांनी तुमची नेमणूक मी केली आहे, उद्यापासून कामावर या, असे मला सांगितले. मी कामावर रूजू झालो. वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत मी तेथेच शिक्षक होतो. अशा रीतीने माझा परकीय सरकारची नोकरी न करण्याचा निश्चय परमेश्वराने पार पाडला.
विवाहानंतर दिवस मजेत व्यतीत होत होते. मला माझी सहधर्मचारिणी यथायोग्य लाभली होती. मी वर्णाने काळा तर ती गौरवर्णी होती. सुस्वरूप होती, नाकीडोळी नीटस, सुरेख चेहरेपट्टी, सुडौल शरीरयष्टी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व तिच्या ठायी होते. तिचे शिक्षण नवव्या वर्गापर्यंतच झाले होते, पण वाचनाची तिला भारी हौस. मला वाढत असतानाही तिच्या हाती कोणते तरी पुस्तक वा मासिक असायचे. ती बहुश्रुत होती. आपले विचार व मते ती ठामपणे मांडत असे. विशेष म्हणजे तिने मला चांगले समजून घेतले होते, व अत्यंत समजूतदारपणे ती माझ्याशी वागत होती. वडिलांच्या धार्मिक आचरणाचे, प्रामाणिक वर्तणुकीचे, निर्व्यसनी स्वभावाचे व सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पनांचे माझ्या मनावर बालपणापासूनच संस्कार झाले होते. मला कोणतेही व्यसन नव्हते. चहा, काॅफी यांचे सुद्धा व्यसन नव्हते व आताही नाही. चहाला तर मी उभ्या आयुष्यात स्पर्श केला नाही. आपली परिस्थिती पाहून खर्च करायचा, ऋण काढून कधीही सण साजरा करायचा नाही, कोणाला कोणतीही वस्तु कधीही मागायची नाही - उसनी सुद्धा - मग कर्ज काढणे तर दूरच, ह्या सर्व गोष्टी मी माझ्या वडिलांपासून शिकलो. हीच त्यांची मला अनमोल देणगी. त्यामुळे मला कोणत्याही परिस्थितीत आनंदाने व समाधानाने राहता आले. मी कधीच भांबावलो नाही, डगमगलो नाही, शरणागती पत्करली नाही. माझ्यात जे काही चांगले, उदात्त असेल ते माझ्या थोर आई-वडिलांचे आहे. जे काही वाईट असेल ते माझे स्वतःचे.
विशेष म्हणजे माझ्या या स्वभावविशेषाशी एकरूप होण्याचा ती आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करीत होती. माझी अस्मिता कोठेही दुखावणार नाही याबद्दल ती सदैव जागरूक असे. माझी स्नानसंध्या, देवपुजा, कुलधर्म, कुलाचार इत्यादि नित्य नैमित्तिक कर्मात ती सतर्कतेने साहायक होत असे. माझ्या आवडी-निवडी जपत असे. माझ्या आवडीची पक्वान्ने, खारे-गोडे स्वहस्ते तयार करून ती माझी इच्छा पुरवीत असे. परी-पाहुण्यांचे आदरातिथ्य उत्तम करीत असे. आल्या-गेल्यांचा मान राखीत असे, प्रसंगी पैशाची व कष्टाची झीज सोसून. शक्य तो कोणाचे मन दुखवीत नसे. एकंदरीत ती उत्तम सुगृहिणी होती. मी जेवायला बसलो असता काय हवे, काय नको याची ती मातेच्या ममतेने विचारणा करी. प्रसंगविशेषी ती उत्तम सल्लागाराची भूमिका स्वीकारी. माझे कोठे चुकत असेल तर त्यातून मला वेळीच सावरण्याचा प्रयत्न करी. तसाच बाका प्रसंग असेल तर उपदेश करून गुरुची भूमिका पार पाडी. यौवनसुलभ अल्लडपणा व उथळ वागणूक मला तिच्या ठायी कधीही दिसली नाही. उलट अनेकंाच्या ठायी अभावाने आढळणारे गांभीर्य तिच्या ठायी प्रकर्षाने जाणवत होते. किंबहुना ते तिचे व्यवच्छेदक लक्षण होते. असो. पत्नीची स्तुती करताना मी बराच वाहवत गेलो असे कदाचित तुम्हाला वाटेल. म्हणून अलं विस्तरेण.
आमच्या दोघांचाही स्वभाव तसा स्वाभिमानीच. कधीकधी भांड्याला भांडे लागायचे, वादंग व्हायचे. कधी ते विकोपालाही जायचे. शाब्दिक फैरी झडायच्या, दुरुत्तरे व्हायची. मग आमच्या पैकी कोणाला तरी मौन पाळायचा शहाणपणा सुचायचा. एक-दोन दिवस अबोलाही राहायचा. आकाशात विजातीय (घन आणि ऋण) विद्युतने भारलेले ढग जवळजवळ आले की तेजस्वी सौदामिनीचा कडकडाट होतो आणि मेघांचाही प्रचंड गडगडाट होतो. पण त्यानंतर पर्जन्यधारांचा वर्षाव होऊन धरणीमाता सुखावून जाते. तसे आमचे व्हायचे. घोंगावत आलेले वादळ अल्प काळातच शांत होऊन पुन्हा सुखाचा संसार सुरू व्हायचा. किंबहुना अशा अपवादात्मक कलहानंतर प्रेमाला अधिकच भरती यायची.
अण्णाजी मोहरीर यांची पत्नी वारल्यानंतर ते आपल्या मुलासह आमच्या घरी राहायला आले हा उल्लेख मागे आलाच आहे. दादांचे लग्न १९२४ साली अक्षय तृतीयेला नरखेडचे मालगुजार श्री. अंधारे यांची मुलगी कुमारी सुंदर हिचेशी झाले. त्यांना मुलेही झाली. माझे लग्न होईपर्यंत ते आमच्याजवळच राहिले. दि. १२ जून १९४१ ला माझा विवाह झाल्यावर सुमारे चार महिन्यांनी ते गोरेपेठमध्ये श्री. यावलकरांच्या घरी राहायला गेले. दादा १९८१ तर वहिनी १९८७ मध्ये वारल्या.
आता घरी आम्ही दोघेच होतो. नागपुरच्या महाल विभागात पाताळेश्वर मार्गावर आमचा स्वतःचा वडिलांच्या कमाईचा मोठा वाडा होता. शाळाही जवळच होती. मधल्या सुटीत सहज येता येत असे.
माझे श्वशुर श्री.अण्णाजी सास्तीकर यांचे दारव्हा येथे दुकान होते. माझ्या सासूबाई ह्या विदर्भाचे सुप्रसिद्ध पुढारी लोकनायक बापुजी अणे यांच्या घरातील सुकन्या. त्यांचे नाव सत्यभामा असले तरी त्या नानीबाई या नावानेच सुपरिचित होत्या. वणीचे वे. शा. सं. आप्पाजी अणे हे त्यांचे वडील. माझ्या पत्नीचा जन्म दारव्हा मुक्कामी शालीवाहन शके १८४७, क्रोधननाम संवत्सरे, आषाढ वद्य नवमी, दि. १४ जुलै १९२५, सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी झाला. श्री. अण्णाजी सास्तीकर यांना यवतमाळ येथे जंगल सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल १९३० साली कारावासाची शिक्षा झाली. सुटका झाल्यावर ते वणी येथे राहायला आले. वणीला ते श्री. राजन्ना सावकाराकडे दिवाणजी होते.
त्यांची दुसरी मुलगी शांता हिचा विवाह १९५० साली साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांचेशी झाला. बाळशास्त्री १९६८ साली वारल्यावर श्री. अण्णाजी व सौ. नानीबाई नागपुरला शांताजवळ राहायला आले. श्री. अण्णाजी सास्तीकर हे वयाच्या ९४ व्या वर्षी १९८४ साली वारले.
_____________________
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment