Friday, 16 October 2015


अर्पण




 ।। श्री परमात्मने नम: ।।
।। मज्जीवनमणिमाला ।।



(आत्मचरित्र)


_____________________



अर्पण पत्रिका



माझे परम पूजनीय माता - पिता
तीर्थरूप स्व. सौ. राधाबाई मोहरीर (आई)
आणि
तीर्थरूप स्व. मोरेश्वर मार्तंड मोहरीर (नानाजी)



ज्यांनी मला घडविले, मढविले, वाढविले, पढविले
त्यांच्या प्रेमळ पावन स्मृतीस
सादर समर्पण


आपला
सदाशिव मोरेश्वर मोहरीर

नागपुर

सोमवार, दि. २१ - १० - १९९६
विजया दशमी

_____________________


अनुक्रमणिका


(अ)  प्रकाशकाचे मनोगत
(आ) लेखकाचे मनोगत
(इ)   प्रस्तावना
(ई)   प्राक्कथन
(उ)  श्रीगणेश महिमा

मणी १ घराण्याची पूर्वपीठिका
मणी २ जन्म, बालपण व शिक्षण
मणी ३ विवाह
मणी ४ वैवाहिक जीवन व सेवाकाल
मणी ५ यशोदुंदुभी
मणी ६ प्रमोद मॅट्रिकच्या परीक्षेत सर्वप्रथम
मणी ७ अन्य कन्या पुत्रांची शैक्षणिक प्रगती
मणी ८ पुनश्च प्रमोद आणि मुलांचे विवाह
मणी ९ प्रवास
मणी १० काही समारंभ - काही प्रसंग
मणी ११ नेत्र लागले पैलतीरी
मणी १२ विसावे शतक
मणी १३ पुढचे पाऊल
(परिशिष्ट)

_____________________


प्रकाशकाचे मनोगत


मज्जीवनमणिमाला बाबांनी हातावेगळी करून आता ४ वर्षे लोटली. प्रकाशनाला इतका उशीर झाला की बाबांनी आणखी एक मणी गुंफला. त्यानंतरही आता बऱ्याच उशीराने प्रकाशन होत आहे.

'मी तुझ्या बारश्याला जेवलो आहे बच्चमजी' असे मोठी माणसे लहानांना सांगतात. अर्थ हाच की मी तुला पूर्णपणे ओळखून आहे कारण तू माझ्या डोळ्यांसमोर लहानाचा मोठा झाला आहेस. आता मलाही 'मी तुमचे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे बाबाजी' असे म्हणता येईल. एका अर्थाने आत्मचरित्र टाईप करताना बाबाही माझ्या डोळ्यांसमोर लहानाचे वृद्ध झाले.
बाबांना आत्मचरित्र लिहायला सुचविण्यामागे माझा मुख्य उद्देश त्यांना १-२ वर्षे काही तरी विरंगुळा असावा हा होता. पण ते त्यांनी १-२ महिन्यातच लिहून संपविले व गेली काही वर्षे प्रकाशन प्रतीक्षा हाच विरंगुळा ठरला. प्रकाशनात उशीर मनाजोगा Word Processor  न मिळाल्यामुळे झाला. शेवटी तो गवसला. बाबांनी आत्मचरित्र इंग्रजीत लिहिले असते तर मी ते केव्हाच प्रकाशित केले असते.

आत्मचरित्र काॅम्प्युटरवर आधी चि. आशुतोषने टाईप केले. पण तो Word Processor त्रुटीपूर्ण होता. म्हणून मी ते पुन्हा नव्या Word Processor वर टाईप केले. या रूपात ते आता प्रकाशित होत आहे. घाई केली असती तर मज्जीवनमणिमालेला न्याय मिळाला नसता. मराठीवर तर अन्यायच झाला असता.

आत्मचरित्र edit करण्याचा मोह टाळला. बाबांना विस्ताराने मुद्दा मांडण्याची सवय आहे. शिक्षकांचा तो आवश्यक गुणच आहे. पुनरोक्ति हा चांगल्या शिक्षकाचा दुसरा आवश्यक गुण. मी आता त्याच पेशात असल्यामुळे या गुणांचे महत्त्व जाणून आहे. मज्जीवनमणिमालेत ते टाळता आले असते. काही नाही तर आशुतोषचे व माझे टायपिंगचे काम तेवढेच कमी झाले असते. थोड्याफार editing ने अर्थाचा अनर्थही झाला नसता. पण आत्मचरित्रात पदोपदी जे बाबा 'उमटले' आहेत ते पुसल्या गेले असते. उदाहरणच द्यायचे झाले तर चि. मृदुलाला ६४.८३% गुण मिळाल्याचा जो उल्लेख आहे त्या ऐवजी round off करून  ६५% म्हणता आले असते. पण ६४.८३% मध्ये बाबा आहेत, ६५% मध्ये नाहीत. तसेच आमच्या नावांमागे आमच्या पदव्यांना जोडण्याचे झाले आहे. बऱ्याच विचारांती सर्वत्र उमटलेले बाबा जसेच्या तसेच राहू देण्याचे मी ठरविले. आत्मचरित्रच म्हटल्यावर त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणालाच नाही.

आत्मचरित्र वाचताना व टाईप करताना बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, उल्लेखित आणि अनुल्लेखित पण. माझी पहिली आठवण म्हणजे प्रमोद मॅट्रिकला पहिला आल्यानंतर आमच्या घरी लागलेली रीघ. अंगणातल्या असंख्य चपला व श्रीखंड कमी पडले म्हणून त्यात शेवटी मिसळलेले दूध यांची धूसर आठवण आहे. प्रमोदचे प्रथम येणे ही घटना घराण्याचा खरोखरच Turning Point. त्याकरिता बाबांनी एक वेगळा मणी गुंफला हे योग्यच झाले. आजही दरवर्षी मॅट्रिकचा निकाल पाहतांना आमची सर्वांचीच मने त्या घटनेच्या जाणीवेने व काहीशा अभिमानाने सुखावतात.

'आत्मा वै पुत्र नामासि' असे बाबांनी उद्धृत केले आहे. त्याचा मराठीत अर्थ वाचल्यावर तो मनाला पटला (मला संस्कृत येत नाही). पुष्टीकरिता अनेक उदाहरणे देता येतील. आम्हा सर्व बहीणभावंडांची सही बाबांच्या सहीसारखीच (आणि बाबांसारखी) सरळसोट. नाव लिहिले की सही केली ते कळणार नाही अशी. लोकांच्या झुपकेदार सह्या पाहिल्या की वाटते की आपल्याला अशी बुद्धी कां झाली नाही. पद्यरचना ही बाबांची सवय बऱ्याच अंशी आमच्यात उतरली आहे. मी लहान असताना त्याहून दोन वर्षे लहान असणाऱ्या वृंदाने माझी सतत तिला प्रश्न विचारायची सवय 'टाकित अपुल्या फताड टांगा, प्रश्न विचारी उत्तर सांगा' अशी काव्यबद्ध केली होती. योगायोग शोधण्यात बाबांचा हातखंडा. प्रमोदच्या प्रस्तावनेतही त्याचा उल्लेख आहे. चरित्र टाईप करतानाही असे काही जुळून आलेत, काही लक्षात आले. तिसरा मणी टाईप झाला १२ जून १९९७ ला. आईबाबांच्या लग्नाची तारीख १२-६-१९४१ टाईप करतांना योगायोग लक्षात आला आणि मौज वाटली. प्राक्कथनात बाबांनी १३ मण्यांची 'मज्जीवनमणिमाला' त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करणाऱ्या आपल्या आई-वडिलांना अर्पण केली आहे. तो मंत्र टाईप करताना मुद्दाम मोजले असता लक्षात आले की त्याकरिता मला ८२ keys दाबाव्या लागल्या. बाबा लवकरच ८२ वर्षांचे होतील. आणि बाबांच्याही लक्षात न आलेला योगायोग म्हणजे आत्मचरित्राच्या शीर्षकातील मुळाक्षरे व मात्रा मोजल्या तर १३ भरतात. आता पुरे.

स्वतः टाईप केल्यामुळे मराठी भाषेशी थोडा अधिक परिचय झाला. बरेचदा शब्दात 'व' असला की 'र' ही येतो हे लक्षात आले. फक्त एकच व्यंजन चारदा वापरणारा चार अक्षरी शब्द तंतोतंत टाईप करताना मौज वाटली. इत्यादि.

बाइंडिंग सोडून सर्व कामे घरीच करता आली. बरेच दिवसांपासून त्याकरिता आमचा प्रयत्न होता. मुखपृष्ठ सुद्धा शरयूने काॅम्प्युटर वर सजवले. प्रकाशन ही आता घरगुती गोष्ट झाली.
विरंगुळा म्हणून बाबांना आत्मचरित्र लिहायला सांगितले हे खरे, पण आज सौ. आईच्या जन्मदिनी त्याची सांगता होतांना असे वाटते की प्रत्येकानेच कां लिहू नये. ती केवळ असामान्यांची मक्तेदारी नसावी. आणि असली तरी आमचे आईबाबा लिहूच शकतात. दोघेही असामान्य आहेत. खऱ्या अर्थाने!

अरुण
मुंबई
१४ जुलै १९९७

____________________


लेखकाचे मनोगत


मज्जीवनमणिमालेला माझे ज्येष्ठ पुत्र प्राध्यापक डॉ. प्रमोद सदाशिव मोहरीर, M.Sc. (Nagpur University), M.Tech. (I.I.T. Mumbai), Ph.D. (I.I.T. Kanpur),  शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेता, उपनिदेशक, नॅशनल जिऑफिजिकल रिसर्च इंस्टिट्यूट, हैदराबाद यांची प्रस्तावना लाभली आहे. हा मणिकांचन योगच होय. मज्जीवनमणिमालेला चि. प्रमोदच्या प्रस्तावनारूप कांचनाचे कोंदण लाभल्यामुळे ती अधिकच उजळून निघाली आहे. तिचे तेज द्विगुणित झाले आहे यात शंका नाही.

मी केवळ आत्मचरित्रच लिहिले. प्रमोदने त्यावर भाष्य केले. भाष्यकारच मूळ ग्रंथाची व ग्रंथकाराची योग्यता प्रकर्षाने वाढवीत असतात, हा आजवरचा अनुभव आहे. ह्या अनुभवसिद्ध नियमाला मी, माझे चरित्र आणि प्रमोद अपवाद कसे ठरतील बरे?

मी स्वतः आपल्यातील अंगभूत गुणदोषांचे यथावत् आकलन करू शकलो नाही. मी स्वतःला स्वत्वापासून वेगळे करू न शकल्यामुळेही कदाचित तसे झाले असेल. स्वतःकडे त्रयस्थाच्या दृष्टीने पाहता आले पाहिजे. मला ते कितपत जमले ते मला माहित नाही. माझ्या स्वभावाचे व वर्तनाचे जे अनेक पैलू, छटा, कंगोरे अति परिचयामुळे मला उलगडले नाहीत, ते प्रमोदने अत्यंत मार्मिकपणे विश्लेषण करून वाचकांसमोर मांडले आहेत. आत्मचरित्रात स्वाभाविकतःच जी आत्मनिष्ठता आली असेल, तिला प्रमोदच्या वस्तुनिष्ठ प्रस्तावनेची मात्रा चांगलीच लागू पडून उपचारक ठरेल.

'साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे, नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे' असे आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. माझ्यासारख्या साध्या माणसाच्या जीवनात प्रमोदला केवढी आशयघनता दिसली, याचा प्रत्यय येण्याकरिता वाचकांनी प्रस्तावना अवश्य वाचावी ही विनंती.

माझ्यासारख्या प्रसिद्धिपराङमुख व्यक्तीला आत्मचरित्र लेखनास प्रवृत्त करणारी व्यक्ती म्हणजे माझा मुलगा डॉ. अरुण सदाशिव मोहरीर, B.Tech. (L.I.T. Nagpur), M.Tech. (I.I.T. Kanpur), Ph.D. (I.I.T. Kanpur), प्राध्यापक, आय. आय. टी मुंबई हा होय. तोच मज्जीवनमणिमालेचा आद्य प्रवर्तक आहे. तोच प्रकाशकही आहे.

मज्जीवनमणिमालेला सद्यस्वरूप प्राप्त होण्यास  अनेकांचे परिश्रम कारणीभूत झाले आहेत. माझा नातू (माझी कन्या विजया, एम. ए. (मराठी), बी. एड. हिचा मुलगा) चि. आशुतोष पारखी याने प्रस्तुत आत्मचरित्र संगणकावर टंकलिखित केले. त्यासाठी त्याने अगदी मान मोडून काम केले. माझ्या सूचनानुसार त्यात दुरुस्त्या करण्याचे कामही त्यानेच केले. याचे संपूर्ण श्रेय त्यालाच आहे.

माझी कनिष्ठ कन्या सौ. वृंदा आमोदराव देव, M.Sc. (Statistics), M.Phil. हिने संगणकावर टंकलिखित केलेले लिखाण 'Floppy'त बद्ध केले.

माझी ज्येष्ठ कन्या प्रा. सौ. संगीता मुकुंदराव पाटखेडकर, एम. ए. (मराठी), साहित्य पारंगत हिला मी मज्जीवनमणिमालेचे हस्तलिखित वाचायला दिले. वाचन आटोपल्यावर 'फारच सुंदर झाले आहे' असा अभिप्राय व्यक्त करून अरुणजवळ ते पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा आग्रह तिने धरला. तिनेच माझ्या  'अमृतकलश' नामक भक्तिगीत संग्रहाला प्रस्तावनाही लिहिली आहे.

तिची 'अमृतकलश'ची प्रस्तावना आणि प्रमोदची मज्जीवनमणिमालेची प्रस्तावना ह्या मला लाभलेल्या महान उपलब्धीच होत. प्रमोदने संगणकावर टंकलिखित झालेल्या मजकुराचे संशोधन करून आढळलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याचे, तसेच शब्दातील व वाक्यातील अंतर (Spacing) यथायोग्य करण्याचे काम केले. अश्या रीतीने 'मज्जीवनमणिमाले' च्या प्रकाशनरूपी रथयात्रेला अनेकांचे हात लागले. त्यांनी आपुलकीच्या भावनेने केलेल्या अनमोल साहाय्यानेच प्रस्तुत आत्मचरित्र ग्रंथरूपाने वाचकांसमोर येत आहे. चि. विश्राम, M.Sc. (Physics) हा सतत बँकेच्या कामानिमित्त दौऱ्यावर असल्यामुळे आणि डाॅ. सुधीर,  M.E., Ph.D. हा नोकरीनिमित्त दिल्ली व बंगलोरला असल्याने त्यांना प्रत्यक्ष हातभार लावता आला नाही.

ही सर्व मंडळी प्रेमाची व जिव्हाळ्याची असल्यामुळे त्यांचे औपचारिक आभार मानणे हे त्यांच्या आपुलकीच्या भावनेचा अनादर करण्यासारखेच होईल.

मज्जीवनमणिमाला हे माझे एकट्याचेच चरित्र नसून त्यात माझी पत्नी सौ. प्रमिला मोहरीर हिचेही चरित्र बेमालूमपणे मिसळले आहे, एकजीव झाले आहे, याचा प्रत्यय सुजाण वाचकांना पदोपदी आल्यावाचून राहणार नाही. तिचे प्रेम, सहानुभूती, स्फूर्ती व उत्तेजन यामुळेच आयुष्याच्या सायंकाळी मी चरित्रलेखनाचा प्रपंच करू शकलो. एरवी ते अशक्यप्रायच होते.

ही 'मज्जीवनमणिमाला' मी आपल्या स्वर्गीय मातापित्यांच्या पावन स्मृतीला अत्यादरपूर्वक विनम्र भावाने समर्पण करीत आहो.

महाशिवरात्री
दि. ७ मार्च १९९७

सदाशिव मोरेश्वर मोहरीर
१५ अ, सुफला अपार्टमेंट्स, कॅनाल रोड, गोकुळपेठ, नागपुर - ४४००१०

_____________________


प्रस्तावना



आत्मचरित्र कुणी लिहावे याचे काही नियम नाहीत. बहुतेक प्रसिद्ध आत्मचरित्रे महापुरुषांनी लिहिली आहेत. आत्मचरित्रे ही इतिहासाच्या अभ्यासाचे एक साधन आहे, आणि इतिहास हा केवळ सामाजिक नेतृत्वाचा आलेख नसून सामाजिक परिवर्तनांचा आलेख असावयाला पाहिजे हे लक्षात घेतले तर इतरांच्या आत्मचरित्रांचे व चरित्रांचे महत्त्व स्वयंसिद्ध आहे. ह्या दृष्टीने तीर्थरूप बाबांच्या व अश्या अनेक आत्मचरित्रांची गरज आहे. तीर्थरूप बाबांनी आत्मचरित्र लिहिलेच नसते, तो त्यांचा स्वभाव नव्हे. अरुणला यशस्वी आग्रह करता आला हेच खरे. ते चांगलेच झाले.

आत्मचरित्रकाराचे काम स्वतःच्या गुणदोषांची, वैशिष्ट्यांची, आवडीनिवडींची व तरतमभावाची ओळख वाचकांना करून देण्याचे. ते काम लेखकाने आत्मचरित्राच्या शीर्षकापासूनच सुरू केले. 'माझी जीवनगाथा' सारखे मराठमोळे शीर्षक न देता 'मज्जीवनमणिमाला' सारखे संस्कृतनिष्ठ बहुजड शीर्षक पाहूनच लेखकाची संस्कृतची ओढ प्रतीत होते. ती आत्मचरित्रात बरेचदा जाणवेलच. उल्लेख आणि अनुल्लेख ह्यात लेखकाने बुद्धिपुरस्सर केलेला भेदही फार महत्त्वाचा आहे. उल्लेख परिणामतः सार्वजनिक आणि स्थायी स्वरूपाचा असतो. अनुल्लेखाचा परिणाम त्यापेक्षा मर्यादित आणि कालभंगुर असतो. दुसरा प्रश्न उल्लेखित काय गेले आणि अनुल्लेखितच काय ठेवले गेले हा आहे. काही चांगले व काही वाईट उल्लेखिले गेले आणि काही चांगले व काही वाईट अनुल्लेखित राहिले, तर त्यामागे लेखकाचे काही स्वार्थी गणित असेल. वाईट तेवढे उल्लेखिले गेले, किंवा आवर्जून सांगितले गेले आणि चांगले तेवढे अनुल्लेखित राहिले, किंवा मोघम सांगितले गेले तर कटुता वाढविण्याकडे लेखकाचा कल आहे, असा अर्थ होईल. चांगल्याचा तेवढा उल्लेख झाला आणि वाईट अनुल्लेखाने टाळून दिले गेले तर आल्हादाचा भाव वर्धिष्णु असावा आणि कटुतेत शक्य तेवढी कटौती व्हावी, असा लेखकाचा दृष्टिकोण असावा असे मानता येईल. लेखकाने हा तिसरा मार्ग विचारपूर्वक निवडला आहे.

आत्मचरित्र हा कठिण वाङमयप्रकार आहे. व्यक्तीचे जीवन ही कल्पनाच सहज व्याख्येय नाही. व्यक्तीचे जीवन हे अनेक संदर्भांनी व नात्यांनी इतरांच्या जीवनाशी जोडलेले असते. आत्मचरित्र लिहिणे हा व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे हे मानले तरीही त्यात तिने इतरांच्या जीवनाचा केवढा भाग समाविष्ट करणे इष्ट, उचित व क्षम्य आहे हा वेगळा प्रश्न उरतोच. तो प्रश्न उल्लेख आणि अनुल्लेख ह्यातील सुंदर विवेकाने बाबांनी सोडविला आहे. जेथे एखाद्या प्रसंगावर दुस-या कुणा व्यक्तीचा अधिकार अधिक आहे किंवा त्या प्रसंगाच्या चित्रणाने दुस-या कुणाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचे हनन होते असे त्यांना वाटले, तेथे त्यांनी अनुल्लेखाचा आधार घेतला. अशा वेळी शब्द आणि अर्थ ह्या दोघांनाही त्यांनी लगाम लावला आहे.

आपल्याला हवे तेच आणि तेवढेच शब्दात मांडता येणे ही दुराराध्य कला आहे. काहींच्या लिखाणात शब्दांमागे अर्थ धावतात (व अनेकदा तेथवर पोहोचू शकत नाहीत), तर कधी शब्द अर्थापासून अधिकाधिक मागेच पडत जातात. बाबांना शब्द आणि अर्थ ह्या दोघांनाही समान गतीने धाववता येते. असे न झाले तर अनेकदा वाचक शब्द आणि अर्थ ह्यांच्या कचाट्यात सापडतो.

लेखकाला नैसर्गिक घटनाक्रमात अनेक योगायोग सहज शोधता येतात. अशी पुष्कळ उदाहरणे आत्मचरित्रात विखुरलेली वाचकाला दिसतील. पण बाबांनी अनेकदा असे योगायोग जुळवूनही आणले. माझा जन्म २१ तारखेचा. सौ. मंदाकिनीचा जन्मही २१ तारखेचा. आमचे लग्न १८ तारखेला व्हावयाचे होते. ते तीन दिवस लांबणीवर टाकले तर दोघांच्याही जन्माप्रमाणे तेही २१ तारखेला होऊ शकेल, असे त्यांनी सुचविले, आणि आम्ही ऐकले. आता आमच्या वार्तालापात त्या योगायोगाचा अनेकदा उल्लेख होतो. ऐकणा-याला तेवढीच गंमत वाटते. योजकः अत्र न दुर्लभः. आत्मचरित्राची तेरा प्रकरणात विभागणी करून त्याचा संबंध नित्याच्या जपातील त्रयोदशाक्षरी मंत्राशी जोडणे  हाही योगायोग घडवून आणण्याचाच एक प्रकार.

बाबांचा पिंड शिक्षकाचा. 'आधीच शिकोन जो शिकवी, तोचि पावे श्रेष्ठ पदवी' असे समर्थांनी सार्थ सांगितले आहे. बाबांनी कधीही दुस-या दिवशी शिकवावयाच्या पाठाची तयारी आधल्या दिवशी केली नाही. ते झाले असते वेळेवर 'शिकोन' शिकविणे. त्यांची तयारी आधीच झालेली असे. 'आधी'ची व्युत्पत्ति 'आदि' आहे, हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे उत्तम शिक्षक म्हणून 'श्रेष्ठ पदवी' बाबांना लाभली. ही विद्यार्थ्यांनीच द्यावयाची असते. सरकारचे निकष वेगळे. मला अजूनही कधीकधी कोणीतरी अपरिचित व्यक्ति थांबविते आणि 'तू मोहरीर मास्तरांचा मुलगा ना?' अशी पृच्छा करते. नंतर त्या व्यक्तीने 'मोहरीर मास्तर' कसे शिकवत ह्याच्या आठवणी सांगावयास सुरुवात केली की मला धन्य वाटते. धन्यतेचा संबंध धनाशी असण्याची काहीच गरज नसते. ती मानवी जीवनाची दोन संपूर्णतः असंबद्ध क्षेत्रे आहेत.

बाबांनी एका ठिकाणी गांधी, आगरकर, सावरकर व आंबेडकर ह्यांचा उल्लेख एकत्र केला आहे. गांधी कसे दांभिक होते हे उगाळून कोणी आज प्रसिद्धी मिळवितो, तर आंबेडकरांच्या पुतळ्याला(ही) अपमानित करण्यात कोणी धन्यता मानतो. सावरकरांना अभिप्रेत हिंदुत्व हे मनुस्मृतीतील हिंदुत्व नसून सुधारक राष्ट्रीय हिंदुत्व होते, हे आजच्या सावरकरवाद्यांना उमगतही नाही, आणि महाराष्ट्रात तर टिळकांचा इतका बोलबाला आहे की आगरकरांची आठवणही कोणी काढत नाही. महापुरुषांबद्दलचे व विचारधारांबद्दलचे बाबांचे विचार वेगळे आहेत. कुणातलेही उत्कट भव्य तेचि घ््यावे, आणि ते अनेकांपासून घ््यावे, प्रसंगानुरूप आणि संदर्भानुरूप घ््यावे असे ते मानतात. हीच सर्वसमावेशकता. महापुरुष (किंवा महास्त्री) एक विशिष्ट परिस्थितीत जगतात आणि तो संदर्भ बदलला की त्यांचे विचार तितकेच यथार्थ किंवा ग्राह्य राहत नाहीत, असे मानण्यात त्या व्यक्तीचे महत्त्व कमी होत नाही. विचारांची प्रासंगिकता किंवा ग्राह्यता कालसापेक्ष असूनही व्यक्तीचे महत्त्व कालनिरपेक्ष असू शकते हे बाबा जाणतात. महापुरुषांविषयी विषमावेश बाळगणा-या त्यांच्या अनुयायांची बौद्धिक संकुचितताच हे न जाणण्यात दिसून येते.

ह्या आत्मचरित्राची दोन वैशिष्ट्ये आहेत. हे अंशतः प्रवासवर्णनही आहे. नागपूर, कामठी, वणी ह्या त्रिस्थळीबाहेर फारसा प्रवास न केलेले आईबाबा अचानक यात्रेकरू झाले, व त्यांनी सर्व भारत क्रमशः पालथा घातला. तशी संधी न मिळालेल्या वाचकांना अनायास संक्षिप्त भारतदर्शन होईल. यथावकाश त्या स्थळांपैकी रूचीनुसार काय बघावयाचे तेही ठरविता येईल. भारतात यात्रा साधारणतः उतारवयातच केल्या जातात. कारण तोवर सांसारिक जबाबदा-यातून आईबाप मुक्त होतच नाहीत. त्यामुळे यात्रा केवळ एक धार्मिक कर्त्तव्य म्हणूनच पार पाडली जाते. सर्वसाधारण यात्रेकरू ती मिटल्या डोळ्यांनीच करतात. आईबाबांनी यात्रा उतारवयातच, पण डोळसपणे केल्या. दुसरे वैशिष्ट्य हे की आत्मचरित्र अधूनमधून काव्यात्म होते. भावना ज्यास्त उत्कट झाल्या की व्यक्तीला त्यांच्या अभिव्यक्तीला गद्य पुरत नाही. गद्याला व्याकरणाचे नियमच फार. भावनांचा आवेश ते नियम केंव्हाच मोडून टाकतो. पद्यालाही वृत्तमात्रांचे वेगळे नियम असतात. पण बाबा रामदासी वहिवाटीप्रमाणे काव्यातही फारशी बंधने मानीत नाहीत. तीर्थस्वरूप नानाजींकडे रामदास आणि रामदासी संप्रदायाचे वाङमय नित्य येत असे. ते त्याचा अभ्यास करीत. बाबांनीही त्यातले काही वाचले असेल, काही नानाजींना वाचून दाखविले असेल. रामदास हे प्रवृत्तीवादी कार्यशील संत होते. वृत्तांच्या आणि छंदांच्या मर्यादांचे अतिक्रमण करण्यापलीकडेही इतर अधिक महत्त्वाचे संस्कार त्या वाचनाचे झाले. बाबा क्षणाक्षणाचा उपयोग करतात असे मला म्हणावयाचे नाही. पण स्वतःची सर्व कामे त्यांनी नित्य स्वतः केलीत. बागेतील मोडलेले मांडव स्वतः बांधले, पाणी घालून झाडे स्वतः जगवलीत, बाजारहाट नेहमी स्वतः केला. आत्मनिर्भर व्यक्तीने समयाची गुलामगिरी तरी कशाला स्वीकारावी? तशाने आत्मनिर्भरतेची क्षतीच होते. इतरांकडून कामे घेणा-याला वक्तशीरपणा ज्यास्त अपेक्षित असतो.

बाबांमी आत्मचरित्र लिहावे, हे त्यांना पटवून देण्यासाठी अरुणने त्यांचे दीर्घायुष्य युक्तिवाद म्हणून वापरले. त्या दीर्घायुष्याचे एक कारण स्वतःची सर्व कामे सोयीनुसार का होईना, पण पूर्णतः स्वतःच करण्याची सवय हे नक्कीच आहे. ज्यांना कामे इतरांकडूनच करवून घ््यायची आहेत, त्यांना दीर्घायुष्याची गरज तरी काय? इतरांकडून कामे करून घेणा-यांचा काय कधी दुष्काळ असतो? पण त्याचे दुसरे कारण पायी चालण्याची त्यांची सवय. ते नातलगांकडे सतत विविध कारणांनी जातात, पण नेहमी पायी. कधी कधी मी सोबत असलो की मी रिक्षा शोधतो. 'अरे आपण सहज पायी जाऊ ना. मी अजूनही तेवढे चालू शकतो' असे ते म्हणतात. 'पण मीच चालू शकत नाही' असे मला म्हणावे लागते. चालणा-याचे भाग्यही त्याच्याबरोबर चालते, असे म्हणतात. ह्या दोन सवयींमुळे वेगळा व्यायाम करावयाची गरज राहात नाही. मानवेतर प्राण्यांना आपण कधी व्यायाम करतांना पाहतो का? व्यायाम ही मानवनिर्मित गरज आहे. बालपणी बाबा नागपूर व्यायामशाळेत जात असत असे मी ऐकले, पण त्यांना व्यायाम करतांना आम्ही कधीच पाहिले नाही.

आईबाबांच्या दीर्घायुष्याचा आम्हा सर्व भावंडांना पुरेपूर फायदा झाला. आईबाप अल्पायुषी असले तर भावंडांना त्यांच्या गरजेच्या व्यस्त प्रमाणात आईबापांचे सान्निध्य लाभते. त्यामुळे 'मोठा भाऊ पित्यासमानच' अश्या म्हणींचा आधार घ््यावा लागतो. आम्हा भावंडांच्या बाबतीत तसे झाले नाही. दुसरे म्हणजे आईबापांच्या आचारविचारात अनुकरणीय काय व दुर्लक्षणीय काय, हे सविवेक कळावयासही वेळ लागतो. पुरेसा वेळ मिळाल्यास अनुकरणीय गुणांची यादीही वाढत जाते. दीर्घायुषी आईबाप असणे ही महत्त्वाची आंतरिक संपदा आहे.

बाबांना ती लाभली नाही. त्याचे काय दुष्परिणाम झालेत ते त्यांना माहित आहे. त्यांचे शिक्षण मध्येच संपले. शोकाकुल अवस्थेतून प्रयत्नपूर्वक बाहेर पडून शिक्षण पूर्ण करावयास हवे, असे प्रभावी व यशस्वी रीतीने सांगणारे कोणी नव्हते, किंवा जे होते त्यांचे शोकात बुडलेल्या हळव्या विद्यार्थ्याने ऐकले नाही. शिक्षणाच्या सुप्त इच्छा अपूर्ण राहण्याच्या अवांछनीय प्रकाराची पुढच्या पीढीत पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून बाबांनी संपूर्ण काळजी घेतली. आम्ही सर्व भावंडे मनसोक्त शिकलो. ते पहावयास, आणि आता नातवंडेही शिक्षणाच्या प्रशस्त पथावर वाटचाल करीत असलेली पहावयास आईबाबा दोघेही आहेत, ह्याचे त्यांना निश्चितच पूर्ण मानसिक समाधान असेल.

आईबापांच्या आयुष्याच्या पूर्णापूर्णतेचा त्यांच्या मुलांच्या मनस्थितीवर होणारा परिणाम आम्हाला आमच्या घरीच तौलनिक दृष्ट्या बघावयास मिळाला. आईचे आईबाप दीर्घायुषी होते. त्यांचे प्रेम आम्ही सर्व भावंडांनी व आमच्या मुलामुलींनीही अनुभवले. बाबांचे आईबाप अल्पायुषी ठरले. आम्ही त्यांना पाहण्याचा प्रश्नही नव्हता. कठिण प्रसंगाच्या वेळी आई ज्यास्त खंबीरपणे सहज उभी झाली, आणि बाबांना तसे करण्यापूर्वी स्वतःच्या हळवे पणावर त्याविरुद्ध मानसिक लढा देऊन विजय मिळवावा लागला, आणि त्यासाठी आईची मदत घ््यावी लागली हे आम्ही भावंडांनी अनुभवले आहे. अल्पायुषी आईबाप आपल्या अंताची चाहूल लागली की, मुलांचे पुढे काय होईल ह्या काळजीने हळवे होतात, व त्याच मनोवृत्तीचा वारसा मुलांनाही देऊन जातात. त्यातूनच आई व बाबा ह्यांच्या स्वभावातील फरक उद्भवला असणार.

बाबांना एकच बहीण, आणि आईलाही तेवढीच. त्यामुळे नातलग बरेचसे दूरचेच. पण त्या सर्वांशी बाबांनी ज्याप्रमाणे संबंध टिकवून ठेवले, त्याप्रमाणे त्यांच्याच अनेक समकालीनांनीही ठेवले नसतील. नंतरच्या पीढीत तर ते आणखी दुष्प्राप्य झाले. कुणीही विपदावस्थेत आहे असे कळले की बाबा ताबडतोब भेटावयास जातात. ब-याच दिवसात भेट झाली नाही म्हणूनही जातात. कुठले तरी निमित्त काढून अनेक नातलगांना अनेकदा जेवावयास बोलावतात. त्यातील काही नातलगांच्या आमच्या घरी जितक्या भेटी झाल्या तितक्या कदाचित परस्पर झाल्या नसतील. सर्व नातलगांचे संबंध टिकवून ठेवून जोपासणा-या साखळीचे काम बाबांनी केले. नारदाचा व्यत्यासच म्हणा ना! ह्या कामात आमच्या घरी साज-या होणा-या विविध सणांचा बाबांनी पुरेपूर उपयोग केला. आमच्या घरी जितक्या प्रकारची (३, ५, ६, ८, ९ व १० रात्रींची) नवरात्रे पाळली जात, तितकी नावेही माझ्या अनेक मित्रांनी ऐकली नसतील. वाढत्या वयानुसार आता नातलगांत इतर परिचितांचाही समावेश होऊ लागला आहे.

बाबा फारसे बोलके नाहीत. पण शिक्षकाचे कामच बोलण्याचे. 'अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची' अश्या त्रस्त भावनेने ते कधी वर्गात शिरले नाहीत. शिरताच वाक्प्रवाह अस्खलितपणे सुरू होत असे. बाबांचे भाषेवर प्रभुत्व होते. ते वयानुसार काहीसे कमी झाले आहे. विद्यार्थी संपूर्ण एकाग्रतेने ऐकीत व टिपणे ठेवीत. बाबांची काही वाक्ये आम्ही अधूनमधून आमच्या उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धात वापरीत असू. तसे केले की आमचा क्रमांक लागत नसे. असे वाक्य उत्स्फूर्त असूच शकत नाही, असे परीक्षक म्हणत. "'कलेकरिता कला' असा कितीही कलकलाट त्यांनी केला, तरी ज्या कलेला जीवनाचे पाठबळ नाही, अशी लोकांच्या कलाने कलणारी कला कृष्णपक्षातील चंद्राप्रमाणे कलाकलांनी क्षीण झाल्याशिवाय राहणार नाही." हे असेच एक मला आठवणारे व आवडणारे वाक्य.

गरीबीचे ग्रहण हा कलंक नव्हे, असे बाबा मानतात. पैसा कमावण्याचे अनेक समाजसंमत मार्ग शिक्षकाला उपलब्ध आहेत. बाबांनी अगदीच अल्पकाळ मोजक्याच विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेतल्या. नंतर त्या सोडल्या, त्या पुन्हा कधीच केल्या नाहीत. धनार्जनापेक्षा मितव्यय, अल्पसंतुष्टता (कर्मधारय नव्हे, तृतीयातत्पुरुष) आणि गरजांतील तरतमभाव, हेच अधिक महत्त्वाचे मार्ग आहेत हे त्यांना ज्ञात होते. 'एखादे पुस्तक घेतल्याशिवाय होणारच नसेल, तर तसे मोकळेपणाने सांग, आपण घेऊ, पण शक्य असेल तर ग्रंथालयातून वाच.' असे ते मला सांगत. टिपणे ठेवण्याच्या त्यावेळी लागलेल्या सवयीचा मला आज भरपूर लाभ होतो. कारण ती सवय वयाबरोबर वाढत गेली. खरे तर वयाबरोबर वाढते तीच खरी स-वय. बाकी सर्व कालभंगुर मोह व आकर्षणे.

आता माझी प्रस्तावना पुरे. वाचकांनी आत्मचरित्राचा आस्वाद स्वतःच घेणे ज्यास्त उचित.

प्रमोद सदाशिव मोहरीर
२८-२-१९९७

_____________________


प्राक्कथन


हे आत्मचरित्र मी लिहिले हे सत्य आहे. पण आत्मचरित्र लिहिण्याइतपत माझ्या ठायी कोणतीच योग्यता नाही, हे ही तितकेच खरे. ना मी सामाजिक पुढारी, ना कार्यकर्ता. मी एक मतदार आहे, या खेरीज राजकारणाच्या क्षेत्राशी माझा दूरान्वयानेही कोणताच संबंध नाही. मी विद्वान नाही किंवा कोणत्याही विषयाचा तज्ज्ञ नाही हे आपण सारे जाणताच. कोणतीही कला मला अवगत नाही. माझा लोकसंग्रह दांडगा नाही. एखाद्यातरी संस्थेचा मी मालक, चालक निदान सभासद तरी आहे, अशातलाही काही भाग नाही. मजजवळ ना सत्ता, मत्ता वा विद्वत्ता. आचार्य दादा धर्माधिकारी यांच्या शब्दात सांगायचे झाले तर मजजवळ ना तख्त, ना तरवार, ना तिजोरी. आयुष्यभरात मी कोणतेही पद भुषविले नाही किंवा कोणत्याही पदाने मला गौरविले नाही. मी ना नामदार, ना आमदार, ना खासदार, ना साधा तहसिलदार. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण किंवा तत्सम कोणतेही बिरूद माझ्यामागे लागले नाही. मग मी आत्मचरित्र लिहिले हा चमत्कार घडला तरी कसा?

मी एक साधासुधा शिक्षक. एखादा वधूपिता देखील वरसंशोधनाला निघतो, तेव्हा आपल्याला जावई डॉक्टर, इंजिनीअर, निदान एखाद्या बँकेतला कारकून तरी हवा या आशेने निघतो. शिक्षक म्हणजे एक निम्नस्तरीय व्यक्ती मानली जाते. एकूण अशा सामाजिक पर्यावरणात मी आत्मचरित्र लिहिण्यास प्रवृत्त झालो तरी कसा?

आज मला ८२ वे वर्ष चालू आहे. आपण आत्मचरित्र लिहावे असा पुसटसा विचार देखील माझ्या मनाला कधी शिवला नाही. प्रसिद्धिपराङमुखतेची मला भारी आवड. प्रसिद्धीच्या झोतात कधी येऊ नये अशीच मनाची ठेवण. कसल्याही प्रकारचे भांडवल पाठीशी नसताना आपला यशोडिंडीम हस्ते परहस्ते पिटवून घेणारे महाभाग जगात थोडेथोडके नाहीत. पण मला तशी कधी इच्छाच झाली नाही. हे आत्मचरित्र ज्या कोणाच्या हाती पडेल तो ते वाचताना उपहासाने हसेल किंवा टिंगलही उडवेल, अशी शक्यता नाकारता येत नाही.

मग मी आत्मचरित्र लिहिण्यास उद्युक्त झालोच कसा? माझा मुलगा चि. अरुण, M.Tech., Ph.D., जो भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबईमध्ये रासायनिक अभियांत्रिकीचा प्रोफेसर आहे, तो तीन आठवड्‌यापूर्वी आय. आय. टी. च्या कामाकरिता नागपुरला आला असता मला म्हणाला, 'बाबा, तुम्ही विसाव्या शतकाचा बराच मोठा भाग पाहिला आहे, अनुभवला आहे. तेव्हा तुम्ही आत्मचरित्र लिहा. त्यात तुमचे विसाव्या शतकात झालेल्या प्रगती/अधोगती संबंधी विचार कळत नकळत उमटतील'. त्याने ही सूचना माझ्याविषयी त्याच्या मनात वसत असलेल्या नितांत प्रेमादरापोटी केली होती यात मला मुळीच संदेह नाही. मी त्याला म्हणालो 'अरे, माझ्या ठायी असे काय आहे की मी आत्मचरित्र लिहिण्याचे धाडस करावे आणि आपले हसे करून घ््यावे?'.

नाही बाबा, तुम्ही लिहाच, अशी त्याने मला पुन्हा गळ घातली. तीन दिवसांनी मुंबईला परत गेल्यावर त्याने मला सुखरूप पोहोचल्याचे पत्र टाकले. त्यात पुन्हा तीच प्रेमळ विनंती. मला त्याच्या प्रेमळ विनंतीला नकार देववला नाही. मी त्याला रुकार दिला. पण त्याच बरोबर 'ह्या उतारवयात माझ्याच्याने इतकी बैठक होणार नाही. तेव्हा लेखनाला वाजवीपेक्षा ज्यास्त काळ लागणार. आत्मचरित्र लिहिताना मी सत्याशी इमान राखण्याचा प्रयत्न करीन.' अशीही पुस्ती जोडली.

शुक्रवार, फाल्गुन शुक्ल पंचमी, दि. २६ फेब्रुवारी १९९३ च्या शुभ मुहूर्तावर आत्मचरित्र लेखनाला प्रारंभ केला. स्वरचित श्रीगणेश महिमा या पद्यानेच प्रस्तुत आत्मचरित्राचा श्रीगणेशा केला. शनिवार दि. २४ एप्रिल १९९३ ला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर १२ मण्यांचे लेखन संपले. 'पुढचे पाऊल' हा शेवटचा तेरावा मणी १९९६ साली हे आत्मचरित्र अद्ययावत व्हावे म्हणून जोडला.

घराण्याच्या पूर्वपीठिकेपासून आत्मचरित्राला सुरुवात झाली आहे. जन्म, बालपण, शिक्षण, विवाह या चाकोरीतून लिखाण पुढे सरकत आहे. निव्वळ कालक्रमानुसारच लेखन प्रपंच झाला आहे असे नाही. मुलांच्या शिक्षणाच्या टप्प्यापर्यंत लिखाणाचा रथ येऊन ठेपल्यावर व्यक्तींच्या अनुक्रमाने लिखाणाचा प्रवास सुरू झाला. उदाहरणार्थ, प्रमोदच्या शिक्षणाला प्रारंभ झाल्यावर काही एका मर्यादेपर्यंत तोच धागा पुढे चालू राहिला. पण एक विवक्षित टप्पा पूर्ण झाल्यावर कालानुक्रमाचे भान ठेवून नंतरच्या मुलांच्या शिक्षणाचा धागा पकडला. त्यांचे शिक्षण एका विवक्षित टप्प्यावर येऊन पोचल्यावर पुन्हा चि. प्रमोदचा धागा जेथे सोडला तेथूनच तो पकडून त्याचा वसा पुढे चालू केला. तुटक-तुटक घटनांची जंत्री असे पुस्तकाचे स्वरूप न राहता त्यात एक प्रकारची सुसूत्रता व सुसंगतता राहावी या हेतूनेच असे केले गेले.

२१ ऑगस्ट १९१५ चा माझा जन्म. म्हणजे विसाव्या शतकाची फक्त चौदा वर्षे मी पाहिली नाहीत. आता १९९६ साल सुरू आहे. विसाव्या शतकाची अखेरची फक्त चार वर्षे पाहावयाची राहिली आहेत. ती कदाचित पाहीन, कदाचित पाहणारही नाही. काही सांगता येत नाही. पण एवढे मात्र खरे की विसाव्या शतकाचा फार मोठा भाग मी पाहिला. स्वतंत्रतेपूर्वीचा काळही पाहिला व नंतरचाही पाहिला. विसाव्या शतकात फार मोठी स्थित्यंतरे घडून आली. त्यांचा थोडक्यात आढावा मी बाराव्या प्रकरणात घेतला आहे. अर्थात तोही माझ्या आत्मचरित्राचा एक भागच आहे. मी अत्यंत साधेपणाने जीवन जगलो. द्रव्यार्जनात वाममार्गाचा कधीही अवलंब केला नाही. साधनशुचिता कटाक्षाने पाळली. काटकसरीने खर्च करावा लागे. प्राप्तीपेक्षा खर्चाचे प्रमाण कधीही वाढू दिले नाही. त्यात पुन्हा कोणालाही काही मागायचे नाही हे व्रत. ही सारी तारेवरची कसरत करताना कधीही तोल जाऊ दिला नाही. या साऱ्या गोष्टीत माझ्या पत्नीची मला अतिशय मदत झाली. किंबहुना तिच्या मदतीमुळे मी आपले जीवन स्वाभिमानाने व तत्त्वनिष्ठेने जगू शकलो. बिकट परिस्थितीतही मनाचा तोल जाऊ न देता यदृच्छालाभसंतुष्ट वृत्तीने व सुखासमाधानाने जीवनाचा मार्ग आक्रमू शकलो.

आपल्या सुखासाठी कोणालाही दुःख दिले नाही. आपल्या लाभासाठी कोणालाही हानी पोचवली नाही. कोणाचेही वाईट चिंतिले नाही. मी आपल्या गतजीवनाकडे जेव्हा पाहतो, तेव्हा सात्त्विक समाधानच माझ्या पदरात पडते.

ह्या आत्मचरित्राच्या रुपाने मी आपला जीवनपट तुमच्या समोर शब्दचित्रांकित केला आहे. त्याचे यथायोग्य मूल्यमापन करणे आपणा रसिकांच्या हाती आहे.

जीवनविषयक माझ्या ज्या कल्पना आहेत त्यांच्या अनुषंगाने हे आत्मचरित्र लेखन झाले असल्यामुळे ते व्यक्तीनिष्ठ झाले आहे. घटनांची निवडही त्या धोरणानेच झाली आहे. आत्मचरित्र म्हटले म्हणजे ते वस्तुनिष्ठ (Objective) न राहता व्यक्तीनिष्ठ (Subjective) व आत्मनिष्ठ राहणेच अपरिहार्य आहे. या १३ मण्यांच्या मज्जीवनमणिमालेचे लेखन आज सोमवार दि. २१ ऑक्टोबर १९९६ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर संपले. ही त्रयोदश मण्यांची गुंफलेली मज्जीवनमणिमाला ज्यांनी आपल्या जीवनभर श्रीराम जय राम जय जय राम या श्री समर्थ रामदास स्वामी प्रणीत त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप केला त्या माझ्या स्वर्गीय मातापित्यांच्या पुण्यपावन स्मृतीस सादर समर्पण करीत आहो.

जय-जय रघुवीर समर्थ ।

सदाशिव मोरेश्वर मोहरीर
नागपुर
२१-१०-१९९६
विजया दशमी

_____________________


श्रीगणेश महिमा


अपार महिमा तव गणराया तुजला मी ध्यातो
तुझ्या यशाचे पवाड गाउनि तुजसी मी नमितो

आले अनन्य शरण तुला जे त्यांचा वाहसि योगक्षेम
शरणागत त्राता तूची भक्तकामकल्पदृम

विद्याधिपती तू गणराया अष्टसिध्दी विनायक
मनोवांच्छीत तू फलदाता भक्तसंकटहारक

कार्यारंभी नमन तुला जे करिति मनोमन सद्भावे
इष्टकार्यसिध्दी होई, यशही लाभतसे बरवे

वेदपुराणे महिमा गाती, सकलही देव स्तुती करिती
संत सज्जन ऋषि मुनि ध्याती, वर्णिति सारे तव ख्याती

अज अविनाशी अरूप निर्गुण निराकार परब्रह्म तू
सगुण साकार नाम रूपही धारिसि भक्तालागी तू

तूच ब्रह्मा, तूच विष्णु, तूच महेश्वर देवा
कर्ता धर्ता भर्ता हर्ता, घ््यावी गोड करुिन सेवा

गणाधीश तू, गुणाधीश तू, विघ््नहारक सुखकर्ता
चौदा विद्या चौसष्ट कलांचा एकमेव अधिष्ठाता

मंगलमूर्ती मंगलकारक, भक्त जनांचा लडिवाळ
संकटकाळी धावुनि येसी, करिसी भक्तांचा प्रतिपाळ

सकळ कळानिधि, सकळ विश्वमुळ, सकळ विश्वप्रतिपाळ
सकळ खळांसी निर्दाळुनि तू करिसी सज्जन सांभाळ

मंगळमूर्ति दीनदयाळू करुणानिधी कृपाळ
भक्तवत्सला श्री गणराया दुष्टांचा तू कर्दनकाळ

कायावाचामने शरण जे येती तुजला गणराया
काही न्यून पडू न देसी हेरंब गजानन मोरया

सिंदुरचर्चित तुंदिल तनुवर शोभे शमि दुर्वांकुर मंदार
रक्तचंदन तिलक भाळी, माथा रक्तपुष्प संभार

रत्नजडित मुकुट शिरावर, कमल केतकी पत्र तयावर
पायी नूपुर वाळे तोडर, शोभे ऐसा हा परशूधर

भाळी चंद्र, पितांबर कटी, हाती मोदकाची वाटी
रत्नमणिमय माळा कंठी, पंचपक्वान्न सुवर्णताटी

विनायकाचा विशेष महिमा माघमासी भाद्रपदी
मोरेश्वरतनय सदाशिव तल्लीन सदा गणराजपदी

____________________

अनुक्रमणिकेकडे

No comments:

Post a Comment