Thursday, 22 October 2015


मणी - ७

अन्य कन्या-पुत्रांची शैक्षणिक प्रगती


इकडे चि. गीता १० वी मॅट्रिकला १९६१ साली प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिने शेजारच्या बिंझाणी महिला महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिलाही भारत सरकारची दरमहा १०० रु. ची शिष्यवृत्ती मिळाली. ती प्रथम वर्षात असतांना स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी निमित्त 'असे होते स्वामी विवेकानंद' या विषयावर आंतरविश्वविद्यालयीन निबंधस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चि. गीताने स्वलिखित निबंध पाठविला होता. तिचा प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला. मुंबईला आझाद मैदानावर मोठा सभामंडप उभारून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली बक्षिस समारंभ आयोजित करण्यात आला होता. जन्मशताब्दी महोत्सव समिती कडून चि. गीताला उपस्थित राहण्याचे निमंत्रण आले होते. मी गीताला घेऊन मुंबईला गेलो. स्वामी विवेकानंदांचे अनेक ग्रंथ तिला पारितोषिकादाखल मिळाले. हाही आमच्या जीवनातील अत्यानंदाचा एक प्रसंग.

१९६२ साली गीता प्री-युनिव्हर्सिटी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. १९६५ साली ती बी. ए. झाली. तिने बी. ए. ला मराठी, तत्त्वज्ञान आणि
मानसशास्त्र हे विषय घेतले होते. गीताने नागपुर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर विभागातून मराठीत एम. ए. केले. तिला डॉ. शं. दा. पेंडसे, प्रा. भ. श्री. पंडित, डाॅ. प्रभूदेसाई, डॉ. द. भि. कुळकर्णी, डॉ. बाबगावकर यांच्यासारखे प्रथितयश प्राध्यापक लाभले होते. ती बी. ए. ला असतांना १९६५ साली बी. ए. समकक्ष विदर्भ साहित्य संघाच्या साहित्य स्नातक परीक्षेला बसली होती. तीत तिचा प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक आला. तन्निमित्त तिला श्रीमंत वेळेकर पारितोषिक मिळाले. १९६७ साली एम. ए. ला असतांना विदर्भ साहित्य संघाच्या एम. ए. समकक्ष साहित्य पारंगत परीक्षेला बसली व प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकावर आली. तत्प्रीत्यर्थ तिला विदर्भ साहित्य संघाकडून सुवर्णपदक प्राप्त झाले. एम. ए. ला असतांना दोन वर्षे तिला किंग एडवर्ड मेमोरियल स्कॉलरशिप मिळत होती. एम. ए. च्या परीक्षेत ती १९६७ साली नागपुर विद्यापीठातून गुणानुक्रमे दुसरी होती. तदनंतर ती एक वर्ष ब्रह्मपुरीच्या नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात आणि सात वर्षे तुमसरला गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजमध्ये मराठीची प्राध्यापिका होती.

शुक्रवार, वैशाख वद्य द्वादशी, शके १८९७, दि. ६ जून १९७५ ला तिचा विवाह गोंदियाच्या I. T. I. मध्ये Instructor असलेल्या श्री. मुकुंद गोपाळ पाटखेडकर यांच्याशी, सेवासदन, सीताबर्डी, नागपुर येथे संपन्न झाला. तिला मृदुला नामक मुलगी आणि अमोल आणि विशाल ही दोन मुले आहेत. ती सध्या अकोल्याला असते. तेथे त्यांचे स्वतःचे घर आहे.

इकडे विश्रामची आगेकूच सुरू होती. १९५८ साली तो प्राथमिक प्रमाणपत्र परीक्षेत नागपुर झोनमधून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण  C. P. & Berar Education Society च्या प्राथमिक शाळेतच झाले, आणि नंतर १० वी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षणही C. P. & Berar High School मध्ये झाले. शालेय जीवनात त्याने एके वर्षी शिरोळे वक्तृत्व स्पर्धेत इंग्रजी व मराठी दोन्ही स्पर्धात प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळवली. वक्तृत्व, वादविवाद, गीतापाठांतर, निबंधलेखन इत्यादि स्पर्धात अनेक पारितोषिके पटकाविली. १९६४ साली तो दहावी मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत सोळाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. नंतर त्याने शासकीय विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९६८ साली B. Sc. व १९७० साली भौतिकशास्त्रात M. Sc. झाला. नंतर तो एक वर्ष दादासाहेब धनवटे नगर महाविद्यालयात हायस्कूल शिक्षक होता. दुसऱ्या वर्षी त्याला बँक ऑफ बडोदात नोकरी लागली. नंतर अकोला, अमरावती, माजरी मसला, जळगाव, नंदूरबार ह्या ठिकाणी बदल्या झाल्या. त्याने बँकेच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. सध्या तो नागपुरच्या इतवारी शाखेत प्रबंधक आहे. त्याला मॅट्रिकनंतरची भारत सरकारची दरमहा १०० रु. ची शिष्यवृत्ती मिळत होती. अल्पावधीतच नागपुरसारख्या मोठया शहरातील इतवारीसारख्या मोठ्‌या शाखेत प्रबंधकाच्या उच्च पदापर्यंत पोहोचायला विश्रामची कर्तबगारी आणि कर्तव्यपरायणताच कारणीभूत आहे.

चि. विजया C. P. & Berar Education Society च्या प्राथमिक शाळेतून १९६१ मध्ये प्राथमिक चौथा वर्ग उत्तीर्ण झाली, आणि C. P. & Berar Education Society High School मध्ये तिने पाचव्या वर्गात प्रवेश घेतला. ती १९६७ साली प्रथम श्रेणीत दहावी मॅट्रिक झाली. तिला शासकीय गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली. १९७१ साली ती नागपुर महाविद्यालयातून B. A. ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. B. A. ला तिला आवश्यक मराठी विषयात नागपुर विद्यापीठातून सर्वाधिक गुण होते. तत्प्रीत्यर्थ तिला दीक्षांत समारंभात धोटे सुवर्णपदक बहाल करण्यात आले. १९७३ मध्ये ती नागपुर महाविद्यालयातूनच M. A. परीक्षा उत्तीर्ण झाली. नागपुरच्या शिक्षण महाविद्यालयातून ती B. Ed. ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिने आपल्या विद्यार्थी जीवनात वक्तृत्व, वादविवाद, पाठांतर, निबंधलेखन स्पर्धात अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. ती १९७७ साली C. P. & Berar High School, Mahal येथे शिक्षिका म्हणून रुजू झाली. सध्या ती C. P. & Berar Junior College मध्ये मराठीची प्राध्यापिका आहे.

चि. विजयाचा विवाह महाराष्ट्र शासनाच्या दूध योजनेत कार्यरत असलेले श्री. बळवंत कृष्णराव पारखी यांचेशी शुक्रवार, मार्गशीर्ष वद्य सप्तमी, दि. २२ डिसेंबर १९७८ रोजी गोपालकृष्ण मंगल कार्यालय, मा. ग. चिटणवीस वाडा, चिटणवीसपुरा, नागपुर येथे संपन्न झाला. तिला आशुतोष व श्रीनिवास नामक दोन मुले आहेत.

चि. अरुण श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींच्या शाळेतून चौथ्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाला. नंतर त्याने C. P. & Berar High School मध्ये पाचव्या वर्गात प्रवेश घेतला. १९६९ साली दहावी मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत बाराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला विभागीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे मराठीत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल १०० रु. चे पारितोषिक मिळाले. नंतर तो शासकीय विज्ञान महाविद्यालयातून १९७० साली Pre-University परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. नागपूरच्या Laxminarayana Institute of Technology मधून त्याने B. Tech. (Chemical Engineering)
ही पदवी प्रथम श्रेणीत चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. नंतर आय. आय. टी. कानपुर मधून त्याने M. Tech. व Ph. D. ह्या पदव्या प्राप्त केल्या. तो प्रथम रुडकी विश्वविद्यालयात केमिकल इंजिनियरिंगचा अधिव्याख्याता होता. नंतर आय. आय. टी. मुंबईत आता प्रोफेसर असून Computer Aided Design Centre चेही काम पाहतो. त्याचे अनेक शोधप्रबंध भारतातील व परदेशातील नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत. अनेक रसायन कारखान्यांचा तो सल्लागार आहे. अनेक ठिकाणी त्याची व्याख्याने झाली आहेत. त्याचे एक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

त्याने विद्यार्थी जीवनात वक्तृत्व, वादविवाद, निबंधलेखन, पाठांतर, अंत्याक्षरी स्पर्धात अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. नागपुरच्या काटोल रोडवरील तिडके विद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. कन्नमवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजिलेल्या वक्तृत्व स्पर्धेत लागोपाठ तीन वर्षे प्रथम क्रमांकाचे ५१ रु. चे पारितोषिक प्राप्त करून त्याने हॅटट्रिक साधली आहे. अरुणला मॅट्रिकनंतर B. Tech. होईपर्यत १०० रु. ची गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळत होती.

चि. वृंदाने १९६१ साली श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींच्या शाळेत प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथून ती १९६५ साली प्राथमिक चौथ्या वर्गाची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. श्री. दादासाहेब धनवटे नगर महाविद्यालयात तिने नवव्या वर्गात प्रवेश घेतला. अकराव्या वर्गापर्यंत तिला स्कॉलरशिप मिळाली. ती १९७२ साली इंग्रजी माध्यम घेऊन संयुक्त  मराठी-संस्कृत या विषयासहित अकरावी मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिला भारत सरकारची दरमहा १०० रु. ची मेरीट स्कॉलरशिप M. Sc. पर्यंत होती. श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींच्या शाळेत तिचे नाव आदर्श विद्यार्थिनी म्हणून लिहिले आहे. मॅट्रिक पास झाल्यावर वृंदाने शासकीय विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९७५ साली ती B. Sc. परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. भौतिक शास्त्र, गणित आणि सांख्यिकी हे तिचे B. Sc. चे विषय होते. १९७७ मध्ये ती नागपुर विद्यापीठाची M. Sc. (Statistics) परीक्षा प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. हा पुन्हा आमच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा प्रसंग. १९७७-७८ या वर्षात ती अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात सांख्यिकी या विषयाची प्राध्यापिका होती. त्यानंतर तिला Indian Bureau of Mines (IBM) मध्ये नोकरी मिळाली. आताही ती तेथेच कार्यरत आहे. IBM मध्ये असतांनाच १९८३ मध्ये तिने Statistics मध्ये M. Phil. ची परीक्षा प्रथम श्रेणीत मेरीट मध्ये उत्तीर्ण केली.

चि. वृंदानेही आपल्या शालेय जीवनात वक्तृत्व, निबंधलेखन, पाठांतर इत्यादि स्पर्धात पारितोषिके मिळविली आहेत. गीता मंदिरातर्फे गीता जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या गीता पाठांतर स्पर्धेत तिला नागपुरातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले होते. या स्पर्धेत १००० च्या वर विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता हे विशेष.

चि. वृंदाचा विवाह गुरुवार, आषाढ शुद्ध दशमी, दि. ५ जुलै १९७९ ला श्री. आमोद चिंतामणराव देव यांचेशी भगिनी मंडळ, सीताबर्डी, नागपुर येथे संपन्न झाला. ते सध्या नागपुरला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धरमपेठ शाखेत ऑफिसर आहेत. त्यांना जयश्री व ऋषिकेश ही दोन मुले आहेत. त्यांचे उत्तर अंबाझरी मार्गावर नागपुरला घर आहे.

चि. सुधीरने १९६७ साली C. P. & Berar प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. १९७१ मध्ये तो प्राथमिक चौथ्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाला. नंतर त्याने C. P. & Berar High School मध्ये पाचव्या वर्गात प्रवेश घेतला. दरवर्षी त्याचा वर्गातून प्रथम क्रमांक ठरलेला असे. त्याने वक्तृत्व, वादविवाद, निबंधलेखन व पाठांतर स्पर्धात अनेक पारितोषिके मिळविली. १९७७ साली तो दहावी मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत २८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. हिस्लाॅप काॅलेज मधून त्याने बारावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. त्याला इंजिनियरिंग कॉलेज मध्ये Electronics घ््यायचे होते. पण त्यावेळी नागपुरच्या V. R. C. E. मध्ये ती सोय नव्हती. म्हणून त्याने अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे पहिल्या वर्षी तो पहिल्या पाच क्रमांकात उत्तीर्ण झाला. म्हणून दुसऱ्या वर्षी त्याला पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. तेथे तो १९८३ साली B. E. (Electronics & Telecommunications) परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला दहावी मॅट्रिकनंतर B. E. होईपर्यंत भारत सरकारची दरमहा १०० रु. ची गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळत होती.

M. E. साठी त्याने रुडकी विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. तेथून तो १९८५ साली M. E. परीक्षा प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्या निमित्त त्याला रुडकी विश्वविद्यालयाचे सुवर्णपदक प्राप्त झाले.

नंतर सुधीरने आय. आय. टी. मुंबई येथे Ph. D. करिता प्रवेश घेतला. डॉ. जे. वासी आणि डॉ. ए. एन. चांदोरकर हे त्याचे मार्गदर्शक होते. मुंबई आय. आय. टी. च्या २९ मे १९९२ ला झालेल्या पदवीदान समारंभात चि. सुधीरला Ph. D. पदवी बहाल करण्यात आली. डॉ. गोविंद स्वरुप, Director, National Institute of Radio Astrophysics हे प्रमुख अतिथी होते. त्यांचे सुरेख भाषण झाले. ह्या समारंभाकरिता आम्ही दोघेही मुंबईला गेलो होतो व पदवीदान समारंभाला उपस्थित होतो. तो आमच्या जीवनातील आणखी एक संस्मरणीय प्रसंग.

दि. १२ जून, १९९२ ला आमच्या विवाहाला ५१ वर्षे पूर्ण झाली. चि. अरुणने तो दिवस मुंबईच्या आपल्या घरी साजरा केला. त्याच दिवशी सायंकाळी दीक्षांत समारंभाच्या वेळी ज्या भावभावनांचा कल्लोळ माझ्या मनात उसळला, त्याचा काव्यात्मक आविष्कार मी चि. सुधीरला सप्रेम भेट दिला. सध्या तो मुंबई आय. आय. टी. त Research Engineer आहे. तो काव्यात्मक आविष्कार येथे प्रस्तुत करणे अप्रस्तुत ठरणार नाही.

अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन त्रिवार तुझे राजू! असो आजी
पीएच. डी. तुज आज लाभली तू जिंकलीस बाजी
मानाचा तू तुरा खोविला स्वशिरी आज सुधीर
तुझ्या यशाने धन्य जाहले कुल अपुले मोहरीर ।।१।।

भावांमध्ये ही उच्च उपाधी प्राप्तकर्ता तू तिसरा
प्रथम हिरा, दुसरा माणिक, इंद्रनीळ मणि तू तिसरा
आई-बापच आम्ही ठरलो, हर्ष न मावे आज उरी
मात-पित्यांची अन् बंधू-भगिनींची इच्छा झाली आज पुरी ।।२।।

नागपूर अन् पुण्यनगरी, रुडकी आणिक मुंबापुरी
उज्वल यश तू मिळविलेस बा उपर्युक्त सर्व नगरी
नागपुरी गुणवत्ता यादी, सुवर्णपदक रुडकीला
आय. आय. टी. ने मुंबईच्या तुज पी. एच. डी. चा मान दिला ।।३।।

शिक्षण जरि तुझे पुरे जाहले रूढार्थाने आज तरी
खऱ्या अर्थी विचार करता माणुस छात्र जन्मभरी
एकाहून एक उंच शिखरे गाठावी प्रगतीची व्यासंगे
आशीर्वाद शुभ हाच आमुचा शुभेच्छा हीच मनि रंगे ।।४।।

मातृभूमी भारत अपुली अभ्युदयार्थ तिच्या झटावे
वैज्ञानिक अनुसंधाने अपुल्या उन्यत्यर्थ तिच्या झिजावे
विज्ञान हे शस्त्र दुधारी, विनाशकारी अन् सुखकारी
मानवतेचे कल्याण असावे सदासर्वदा दृष्टिसमोरी ।।५।।

आपण मागच्या प्रकरणात प्रमोदची M. Sc. पर्यंतची शैक्षणिक प्रगती पाहिली आणि त्यानंतर अन्य कन्या-पुत्रांच्या शैक्षणिक प्रगतीकडे वळलो. आता पुनश्च प्रमोदच्या पुढील शैक्षणिक प्रगतीचे सूत्र हाती घेऊन त्याच्या नेत्रदीपक प्रगतीचे अवलोकन करू.

_____________________


मणी - ८

पुनश्च प्रमोद आणि मुलांचे विवाह


आपण प्रमोदची शैक्षणिक प्रगती M. Sc. पर्यंत पाहिली. नंतर त्याला तेथेच सोडून त्याच्या धाकट्या भावंडांकडे वळलो आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख पाहिला. आमचा पहिलाच मुलगा मॅट्रिकला बोर्डातून प्रथम श्रेणीत सर्वप्रथम आल्यामुळे नंतरच्या मुलामुलींना तो एक आदर्शच ठरला व आपणही त्याच्या पावलावर पाऊल टाकून तसेच स्पृहणीय यश प्राप्त करावे अशी त्यांच्या मनात जिद्द उत्पन्न झाली. आपापल्या परीने त्यांनी कसोशीने प्रयत्न करून कसा उच्चांक गाठला ते आपण पाहिले. आता पुनश्च प्रमोदकडे वळू या.

प्रमोदने मुंबईच्या I. I. T. त M. Tech. करावयाचे ठरविले. त्याने तेथे अर्ज केला. लेखी चाचणी, साक्षात्कार (Interview) आदि सोपस्कार झाले. त्याला प्रवेशही मिळाला. Television हे Elective त्याला मिळाले. डॉ. सप्रिकिन हे रशियन गृहस्थ आणि डॉ. मुरगेसन हे मार्गदर्शक होते. त्या अवधीत त्याचे काही लेख भारतातील व परदेशातील वैज्ञानिक व तांत्रिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले.

M. Tech. करण्याकरिता प्रमोद मुंबईला जायला निघाला तेव्हा आम्ही दोघे त्याच्या सर्व धाकट्या भावंडांना घेऊन त्याला निरोप द्यायला नागपुर स्थानकावर गेलो. त्यावेळी सर्वात धाकटा चि. सुधीर तीन वर्षाचा होता.
अग्निरथाने शिटी दिली तेव्हा आमच्या दोघांच्याही नेत्रातून अश्रू टिपकू लागले. प्रमोदने ते पाहिले. तेव्हा तो मला म्हणाला, 'बाबा रडू नका. मी जन्मलो, तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला, म्हणून तुम्ही माझे नाव प्रमोद ठेवले असे तुम्हीच मला सांगत आलात. तुम्ही भगवद्गीतेचा अभ्यास करीत होता, म्हणून माझ्या धाकट्या बहिणीचे नाव तुम्ही गीता ठेवले. मग आता अश्रू आवरा. मला प्रेमाने व आनंदाने निरोप द्या'. मी त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. अग्निरथ चालू झाला. त्याने वेग घेतला. तो दिसेनासा होईपर्यंत आम्ही फलाटावरच हाताचा पंजा हालवीत उभे होतो. शेवटी जड अंतःकरणाने घराकडे वळलो.

१९६६ साली प्रमोद M. Tech. झाला. डॉ. सप्रिकिन प्रमोदला एक अतिशय बुद्धिमान व संशोधक प्रवृत्तीचा विद्यार्थी म्हणून फार चाहत असत. १९६६ ते १९७१ पर्यंत प्रमोद कानपुर आय. आय. टी. त Ph. D. चा विद्यार्थी होता. १९७१ मध्ये त्याने Electrical Engineering मध्ये Ph. D. प्राप्त केली. डॉ. बी. प्रसाद आणि डॉ. के. आर. शर्मा हे त्याचे मार्गदर्शक होते. १९७०-७१ या कालावधीत प्रमोद कानपुर आय. आय. टी. त Senior Research Assistant होता. १९७१-७२ साली तो पिलानी येथे Birla Institute of Technology and Science (BITS) मध्ये अधिव्याख्याता होता. १९७२ मध्ये रुडकी विश्वविद्यालयात Research Associate होता. १९७२ ते १९७६ बंगलोरच्या Institute of Science मध्ये अधिव्याख्याता, १९७६-७७ मध्ये मुंबई आय. आय. टी. त असिस्टंट प्रोफेसर, १९७७-१९८९ मध्ये रुडकी विश्वविद्यालयात रीडर आणि प्रोफेसर, १९८९-९१ मध्ये हैद्राबादच्या National Geophysical Research Institute मध्ये Visiting Scientist होता. मे १९९२ मध्ये त्याची Scientist-F म्हणून निवड झाली आणि तेव्हापासून तो NGRI चा Deputy Director आहे. प्रमोदला १९७४ साली सर जगदीशचंद्र बोस अवॉर्ड, १९८५ मध्ये एस. के. मित्रा अवॉर्ड आणि १९८७ पर्यंतच्या संशोधन कार्याप्रीत्यर्थ सोमवार दि. १७ ऑक्टोबर १९८८ ला दुपारी अकरा वाजता तत्कालीन पंतप्रधान माननीय श्री. राजीव गांधी यांच्या हस्ते दिल्लीच्या विज्ञान भवनात डॉ. शांतीस्वरूप भटनागर अवॉर्ड भूगर्भशास्त्रात बहाल करण्यात आला. आम्ही सर्वांनी हा समारंभ दूरदर्शनवर बघितला. तो आमच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण होता. पन्नास हजार रुपये रोख, CSIR चे विजयचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक असे पारितोषिकाचे स्वरूप होते. प्रमोद C. P. & Berar Education Society च्या  प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिक्षण घेऊन १९५८ च्या शालांत परीक्षेत सर्वप्रथम आला होता. तेव्हा त्याने हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा भटनागर अवॉर्ड प्राप्त करणे हे C. P. & Berar Education Society ला भूषणावह होते. म्हणून सोसायटीने ३० डिसेंबर १९८८ ला एक समारंभ आयोजित करून त्याचा सत्कार केला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी Institute of Science च्या Director श्रीमती सपकाळ होत्या. याचेच पूर्वीचे नाव शासकीय विज्ञान महाविद्यालय. येथूनच प्रमोद M. Sc. झाला होता. ह्या समारंभाला शाळेचे सर्व शिक्षक, प्रमोदला ज्यांनी शिकविले ते शाळेचे माजी अध्यापक, आमच्या शाळेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, निमंत्रित सज्जन आणि मॅट्रिकचे विद्यार्थी उपस्थित होते. सोसायटीचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब पाध्ये हेही व्यासपीठावर होते. आम्हा दोघांनाही आणि प्रमोदची पत्नी सौ. मंदा हिलाही व्यासपीठावर स्थान देण्यात आले. आम्हा सर्वांचाच पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमोदला संस्कृत भाषेतील गौरवाभिनंदन पत्रही अध्यक्षांच्या हस्ते देण्यात आले. श्रीमती सपकाळ, बाबासाहेब पाध्ये आणि मुख्याध्यापक यांची समयोचित भाषणे झाली. प्रमोदचेही भाषण झाले. डॉ. प्रबोध देशमुख यांनी विज्ञानाची प्रगती कशी होत गेली याच्या स्लाईड्‌स दाखविल्या. अल्पाहाराचा कार्यक्रम होऊन हा समारंभ संपला.

दुसऱ्या दिवशी ३१ डिसेंबर १९८८ ला आमच्या राहत्या घरी आमचे नातेवाईक, चि. प्रमोदची मित्रमंडळी आणि गुरुजन यांच्या उपस्थितीत आम्ही एक सत्कार समारंभ आयोजित केला. तत्प्रसंगी चि. प्रमोदच्या भटनागर पारितोषिक प्राप्तीप्रीत्यर्थ मी एक गौरवगीत मराठीत आणि एक इंग्रजीत स्वतः रचले होते. ही दोन्ही गीते मंडळींनी वाचली. नागपुर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर विभागाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे चि. प्रमोदचा एका स्वतंत्र समारंभात सत्कार करण्यात आला. आम्हालाही त्या विभागाचे प्रमुख डॉ. बी. टी. देशमुख यांनी आमंत्रित केले होते. त्यांनी आमचाही पुष्पहार घालून सत्कार केला.

प्रमोदला देण्यात आलेले गौरवाभिनंदन पत्र तसेच मी रचलेले गौरवगीत असे

।। श्री ।।
।। न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।।

सी. पी. अॅण्ड बेरार एज्युकेशन सोसायटी, नागपुर द्वारा
डॉ. प्रमोद सदाशिव मोहरीर, महोदयाय
प्रदीयमानम्
गौरवाभिनन्दनपत्रम्

अयि मेधाविन्,

अस्माकं शिक्षासंस्थायां शालान्त - परीक्षां यावत् अध्ययन कुर्वाणः भवान् तस्यां परीक्षायां विदर्भ विभागे सर्वप्रथम स्थानम् अधिगम्य अस्मान् सर्वान् एव महान्तं प्रमोदम् अन्वभावयत् । परं अद्य राष्ट्रे विज्ञानक्षेत्रे सेवां कुर्वाणः भवान् भुविज्ञाने अनितरसाधारणं वैदुष्यं प्रकट्य वर्षेऽस्मिन् भारत शासनस्य डॉ. शांतिस्वरूप भटनागर पारितोषिकं ससम्मानं प्राप्तवान् इति

अस्माकं कृते अतिशयं प्रमोदम् आवहति । विज्ञानक्षेत्रे सर्वोच्चं इमं सम्मानं उपलक्ष्य वयं भवतः सादरं गौरवाभिनन्दनम् कुर्मः। परमेशः उत्तरोत्तरं समधिक सम्मानावसरं भवते उपहरतु इतिच हृदयेन अभिलषामः ।

वयं स्मो भवदीयाः

सु. त्रि. वेरूळकर
मुख्याध्यापक
सी. पी. अॅण्ड बेरार हायस्कूल
महाल, नागपुरम्

शंकरराव पाध्ये
अध्यक्षः
सी. पी. अॅण्ड बेरार एज्युकेशन
सोसायटी, नागपुरम्

शुक्रवासरः दि. ३० डिसेंबर १९८८


गौरवगीत

शांतिस्वरूप भटनागर हा पुरस्कार तुजला
दिनांक सतरा ऑक्टोबरला प्राप्त असे झाला
पंतप्रधान राजिवजींनी अपुल्या हस्ते दिल्लीत
विज्ञानाच्या भवनी दिधला पुरस्कार जगविख्यात ।।१।।

जगदंबेच्या नवरात्रोत्सवि तिथी सप्तमीला
सरस्वतीचे पूजन होते मंगल त्या दिवसाला
सोमवासरी एकोत्तरदश वादन शुभ समयाला
सरस्वतीने प्रसन्न होऊनी वरदहस्त शिरी धरिला ।।२।।

विज्ञानाच्या क्षेत्रातील ह्या सबंध भारतामधल्या
परमोच्च पुरस्कार प्राप्तिचा प्रमोद मानकरी ठरला
धवलोज्ज्वल ह्या तुझ्या यशाने मुदित मने धाली
तपस्या तव ती अतीव खडतर लेणे साफल्याचे ल्याली ।।३।।

कीर्ती तुजला प्राप्त जाहली विज्ञानाच्या क्षेत्रात
शास्त्रज्ञांच्या माळेमधला झालास मणि दीप्तिमंत
उंचउंच प्रगतीची शिखरे एकाहून एक सरस
आक्रमिशील तू अपुल्या जीवनि नुरे संशय मनि शेष ।।४।।

सुयशोध्वज हा तुझा प्रमोदा उंच उंच फडके
विमल कीर्ती तव सुदूर भूवर दाही दिशा झळके
तुझ्या यशाने कृतार्थ झालो आज आम्ही दोघे
शास्त्रज्ञप्रसु आम्ही ठरलो भाव मनी जागे ।।५।।

प्रस्तुत यश हे ठरेल नांदी भावि यशाची उज्ज्वलशा
जागृत झाल्या आशा मनिच्या भाव भावना आकांक्षा
विज्ञानाच्या क्षितिजावरचा तेजोमय तू होशिल तारा
आम्ही राहू वा ना राहू होइल अमुचा बोल खरा ।।६।।

अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन प्रमोद त्रिवार तुझे
बोस, मित्रा अन् भटनागर पुरस्कार प्राप्त तुज जे
कुशाग्र बुद्धी अन् चिकाटी अप्रतिहत परिश्रम
त्रिवेणि संगम, वदे सदाशिव, प्रस्तुत यश तत्परिणाम ।।७।।

(शनिवार, दिनांक ३१-१०-१९८८)
स. मो. मोहरीर

१९८५- ८६ ह्या वर्षात विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रमोदची नॅशनल लेक्चरर म्हणून नियुक्ती केली. त्या वर्षात भारतातल्या अनेक विद्यापीठात, वैज्ञानिक व तांत्रिक संस्थांत आणि महाविद्यालयात त्याची व्याख्याने झाली.

प्रमोदचे दीडशेच्या वर शोधप्रबंध भारतातील आणि परदेशातील वैज्ञानिक आणि तांत्रिक नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.

भटनागर अवॉर्ड मिळाल्यानंतर हैदराबादच्या National Geophysical Research Institute ने प्रमोदला Visiting Scientist म्हणून बोलावून घेतले. आता मे १९९२ मध्ये त्याची Scientist-F म्हणून निवड झाली असून तेव्हापासून तो NGRI चा  Deputy Director आहे.

इंग्लंड मधील Research Studies Press आणि अमेरिकेतील John Wiley and Sons या ग्रंथप्रकाशन संस्थांनी प्रमोदचा Pattern Recognition Transforms हा ३०३ पृष्ठांचा ग्रंथ १९९२ मध्ये प्रकाशित केला. Bradford University चे डॉ. बावरान यानी प्रमोदला हा ग्रंथ लिहिण्याविषयी सुचविले. प्रमोदला ग्रंथ लेखनाविषयी बरेच परिश्रम करावे लागले. John Wiley and Sons च्या उत्तर व दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, न्यूझीलंड आणि युरोप, सिंगापूर इ. ठिकाणी जगभर शाखा आहेत. त्यांच्याद्वारे प्रमोदचा ग्रंथ संपूर्ण जगभर
प्रसिद्ध झाला आहे. ह्या घटनेने आम्हाला अतिशय आनंद झाला आहे हे काय सांगायला हवे?

'विज्ञानाच्या क्षितिजावरचा तेजोमय तू होशिल तारा
आम्ही राहू वा ना राहू होइल अमुचा बोल खरा '

हे मी चि. प्रमोदच्या भटनागर अवॉर्ड प्राप्तीप्रीत्यर्थ आमच्या घरी आयोजिलेल्या सत्कारप्रसंगी उत्स्फूर्तपणे काढलेले काव्योद्गार सार्थ ठरण्याची ही पदचिन्हेच होत असे म्हणावयास हरकत नाही.

चि. प्रमोदच्या ह्या ग्रंथाची सुरुवात ऋग्वेदातील ऋचेने झाली आहे. 'To my parents who offered me both existence and uniqueness' ह्या शब्दांनी त्याने तो आम्हाला समर्पण केला आहे.

चि. प्रमोदच्या वयाच्या पन्नासाव्या सुवर्णमहोत्सवी वर्षात त्याचा विज्ञानावरील ग्रंथ सर्व जगभर प्रसिद्ध झाला हे येथे विशेषत्वाने सांगावयास हवे. त्याच्या ह्या उज्वल यशानिमित्त आम्ही आपल्या घरी त्याच्या
मित्रांचा, चाहत्यांचा आणि नातेवाईकांचा मेळावा दि. १४ जानेवारी १९९३ रोजी सायंकाळी आयोजित केला होता. सर्व निमंत्रितांचे सहभोजनही आमच्या घरी झाले. त्या प्रसंगाच्या अनुषंगाने माझ्या मनात भावभावनांचे जे कल्लोळ उठले त्यांचा काव्यमय आविष्कार मी प्रमोदला सप्रेम भेट दिला. तो आविष्कार इंग्रजीत होता. तो जसाच्या तसा खाली उद्धृत करीत आहे.

Publication of your book 'Pattern Recognition Transforms'
By Research Studies Press and John Wiley and Sons
And through them in the Whole Universe
Made my mind overflow with joy immense

This joyful event in the year of 50th birth anniversary
Made me much more happy and merry
It exalted my life's meaningful glory
And helped minimise pinching worry

When I met you at our residence
My joy then knew no bounds
I embraced you with inner urge
Tears in eyes and satisfaction on face writ large

I could not help but celebrate your glorious success
To give vent to my powerful feelings
Heartiest thanks to you, Manda and your mother
And all others who helped enhance function's grandeur

May this new year bring you many more happy returns
May you come out victorious with flying colours
May you become a scientist of worldwide repute
We shall sing sweet songs on our mind's flute

Council for Scientific and Industrial Research (CSIR) च्या महानिदेशकांनी प्रमोदची बंगलोरच्या Centre for Mathematical Modelling and Computer Simulation या संस्थेत Senior Associate म्हणून नेमणूक केली आहे. त्यासाठी त्याला वर्षातून एकदा किमान एक महिना तरी बंगलोरला जावे लागते.

Who's Who in Electronics हा ग्रंथ सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला. त्यात प्रमोदची शैक्षणिक पात्रता, संशोधन कार्य, प्रसिद्ध झालेले शोधप्रबंध, इत्यादि माहिती छायाचित्रांसहित समाविष्ट आहे.

CSIR ने नुकताच एक ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. Bhatnagar Laureates हे त्या ग्रंथाचे नाव आहे. त्यात १९५८ ते १९९१ पर्यंत भटनागर अवॉर्ड प्राप्त झालेल्या २५९ पारितोषिक विजेत्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, शैक्षणिक योग्यता, भूषविलेली पदे, संशोधन कार्य, प्रसिद्ध झालेले शोधप्रबंध, इत्यादि माहिती छायाचित्रांसहित समाविष्ट आहे.

चि. प्रमोदचा विवाह धारवाडच्या महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक असलेले श्री. श्रीधरराव कोल्हटकर आणि सौ. उषाताई कोल्हटकर यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. मंदाकिनी हिचेशी बंगलोर मुक्कामी शुक्रवार, आषाढ शुक्ल द्वितीया दि. २१ जून १९७४ ला सकाळी ११ वाजता संपन्न झाला. ती B. Sc. असून त्यानंतर तिने कर्नाटक सरकारचा Government Diploma in Arts हा पाच वर्षांचा ड्रॉइंग आणि पेंटिंगचा कोर्स केला आहे. त्यांना वैशाली नामक कन्या आणि कौस्तुभ नामक पुत्र आहे.

सौ. मंदाचे वडील ती तीन वर्षांची असतांनाच आणि आई दि. ४ नोव्हेंबर १९९२ ला हैदराबादला चि. प्रमोदच्या घरी एक महिन्याच्या आजाराने वारल्या.

चि. विश्रामचा विवाह नागपुरला रेल्वेच्या ऑफिसमध्ये नोकरी असलेले श्री. मनोहरराव टिकेकर आणि सौ. शीलाताई टिकेकर यांची तृतीय कन्या चि. सौ. वीणा हिचेशी दि. २४ जानेवारी १९७६ ला जोशी मंगल कार्यालय, धरमपेठ, नागपुर येथे झाला. लग्नानंतर तिचे नाव परिमल ठेवण्यात आले. ती B. Sc. असून शिवणकाम, विणकाम, भरतकाम यात प्रवीण आहे. त्यांना अभिजित आणि पराग ही दोन मुले आहेत.

चि. अरुणचा विवाह भिलईच्या पोलाद कारखान्यात डेप्युटी मॅनेजर असलेले श्री. रत्नाकरराव केळकर आणि सौ. विजयाताई केळकर यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. सरिता हिचेशी जोशी मंगल कार्यालय, धरमपेठ, नागपुर येथे १६ नोव्हेंबर १९८४ ला संपन्न झाला. ती रसायनशास्त्रात M. Sc. (प्रथम श्रेणी) असून तिने कॉम्प्युटर सायन्स ची स्नातकोत्तर पदविकाही घेतली आहे. ती चित्रकला, रंगकाम, शिवणकाम, विणकाम आणि भरतकाम यात निपुण आहे. त्यांना शरयू आणि मंजिरी नामक दोन कन्या आहेत.

चि. सुधीरचा विवाह भिलईच्या पोलाद कारखान्यात डेप्युटी मॅनेजर असलेले व आता सेवानिवृत्त झालेले श्री. रत्नाकरराव केळकर आणि सौ. विजयाताई केळकर यांची द्वितीय कन्या चि. सौ. कविता हिचेशी दि. २० जून १९९१ ला केळकर मंगल कार्यालय, नागपुर येथे संपन्न झाला. ती  M. Sc. (रसायन शास्त्र) आणि B. Ed. (दोन्ही परीक्षा प्रथम श्रेणीत) असून शिवणकाम, विणकाम आणि भरतकाम यात निपुण आहे. ती चेंबूरच्या स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापिका  आहे.

त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस २० जून १९९२ ला मुंबईला संपन्न झाला. त्यावेळी आम्ही दोघेही तेथे उपस्थित होतो. त्यांना अंजली नामक मुलगी आहे.

अशा रीतीने आमची सर्व मुले व मुली सुविद्य, बुद्धिमान व सद्गुणी आहेत. सुनाही चांगल्या लाभल्या आहेत. त्यांच्या या उज्ज्वल यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

आमच्या जीवनात सर्व आनंदच आनंद आहे असा गैरसमज मात्र करून घेण्याचे कारण नाही.

आम्हालाही दुःखे आहेत, काळज्या आहेत, विवंचना आहेत, टोचण्या आहेत. पण मुलांच्या यशोदुंदुभीने त्यांची तीव्रता कमी होण्यास बरीच मदत होते.

_____________________


मणी - ९

प्रवास


प्रमोद  १९७२ ते १९७६ बंगलोरच्या Indian Institute of Science मध्ये अधिव्याख्याता होता. आम्ही दोघे चि. गीता व चि. विश्रामसह १९७३ च्या दिवाळीत चि. प्रमोदकडे बंगलोरला गेलो होतो. बंगलोरवरून बसने म्हैसूरचे वृंदावन गार्डन, आर्ट गॅलरी, राजवाडा पाहिला. नंदी हिल्स, च्यामुंडा हिल्स पाहिल्या. तेथील देवळांची समोरची गोपुरे फार सुरेख असून त्यावरील शिल्प चित्तवेधक आहे. बंगलोर हे सर्व दृष्टींनी फार मोठे शहर असून तेथील हवामान फार चांगले आहे. तेथील उद्याने सुरेख असून एकुण शहरच हिरवे आहे.

बंगलोरवरून आम्ही रामेश्वर व कन्याकुमारीला गेलो. रामेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तेथे आम्ही समुद्रस्नान केले. तेधून लंकेपर्यंत श्रीरामाने सेतू बांधला होता. म्हणून या तीर्थाला सेतूबंध रामेश्वर म्हणतात. नंतर १५ विहीरींच्या जलाने स्नान करून रामेश्वराला अभिषेक केला आणि प्रयागहून आणलेली गंगा अर्पण केली. तेथून बसने कन्याकुमारीला गेलो. कन्याकुमारीला तीन समुद्रांचे मीलन पाहिले. तेथे पवित्र स्नान करून कन्याकुमारी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. स्वामी विवेकानंदांनी शिकागोला जाण्यापूर्वी ज्या प्रचंड शिलाखंडावर बसून ध्यानधारणा केली त्या ठिकाणी स्वामीजींचे प्रचंड मंदिर बांधण्यात आले आहे. स्वामीजींचे दर्शन घेतले. तेथील शांत पवित्र वातावरणाने आम्ही अत्यंत प्रभावित झालो. कन्याकुमारीहून आगगाडीने सालेमला आलो व तेथून बसने बंगलोरला परतलो. हाच आमचा पहिला लांबचा प्रवास.

१९७४ मध्ये पुन्हा बंगलोरला प्रमोदच्या लग्नासाठी जाण्याचा योग आला. त्यावेळी सर्व मुलांना सोबत घेऊन गेलो होतो. प्रमोदच्या लग्नाची मेजवानी केळीबाग मंदिरात दिली. जेवायला बुंदीचा लाडू व जिलबी ही पक्वान्ने होती.

नंतर सर्व मुला-मुलींचे विवाह नागपुरला झाले. १९६७ साली चि. गीता M. A. झाली. तेव्हापासून तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले. तिचा M. A. ला नागपुर विद्यापीठातून द्वितीय क्रमांक होता. त्यात पुन्हा प्राध्यापिका. मनाजोगा वर मिळेना. एखादे स्थळ पसंत पडले तर तिकडून होकार येईना. आम्हाला तीन मुली. १९७९ मध्ये चि. वृंदाचा विवाह झाला. १९६७ ते १९७९ हे पूर्ण तप वरसंशोधन नावाच्या तपश्चर्येत व्यतीत झाले. ती तपश्वर्या नव्हे तर काय? मुलाकडून नकार आला की मनस्ताप व्हायचा, संताप व्हायचा. पण पुन्हा मुखावर हास्य आणून वरसंशोधनासाठी मोहिमेवर निघायचे. बापाला मुलीच्या लग्नाची काळजीच नाही. मुलगी प्रोफेसर आहे. तिचा पगार घरात येतो. मग कशाला बाप काळजी करील? अशी लोकांची खवचट बोलणी ऐकून घ््यायची. 'लोक तो ओक जाणावा' असे श्री. समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे ते खरेच अगदी तंतोतंत खरे आहे, याची साक्षात प्रचीती यायची. शमदमादी अष्टांग योगाच्या पायऱ्या क्रमाक्रमाने चढत मनोनिग्रह करून निर्विकार मनाने पुन्हा वरसंशोधनाकरिता प्रस्थान ठेवायचे. होकार मिळणार की नकार याची मुळीच पर्वा न करता. फलाशा विरहित कर्म करण्याची भगवान श्रीकृष्ण प्रणीत योगाची दीक्षाच होती ती.

२१ ऑगस्ट १९७५ ला माझ्या वयाला ६० वर्षे पूर्ण झाली. तेव्हाच मी सेवानिवृत्त व्हायचा. पण ते वर्ष पूर्ण करण्याची मला परवानगी मिळाली. मी ३१ मार्च १९७६ ला सेवानिवृत्त झालो. माझा शाळेतर्फे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तिथीनुसार श्रावण शुक्ल एकादशी दि. १७ ऑगस्ट १९७५ ला माझा षष्ट्यब्दिपूर्ती समारंभ मुलांनी साजरा केला. प्रमोद व मंदा बंगलोरहून आली. विश्राम अकोल्याहून आला. अरुण कानपुरहून आला आणि सौ. गीता आपल्या पतीसह गोंदियाहून आली. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण चारही दिशांहून मुले आली. यावेळी प्रमोद व गीता यांचे विवाह झाले होते. मी बराचसा काळजीतून मुक्त झालो होतो. श्री. हरिभाऊ महावादीवार यांनी पौरोहित्य करून आमच्याकडून षष्ट्यब्दीपूर्तीचा पुण्याहवाचनादि धार्मिक विधी करवून घेतला. सर्व नातेवाईक आणि निकटवर्ती परिचित उपस्थित होते.

२४ जानेवारी १९७६ ला विश्रामचा विवाह झाला. ३१ मार्च १९७६ ला मी नोकरीतून मुक्त झालो. प्रमोद व विश्रामचे विवाह आटोपून ते नोकरीला लागले होते. अरुण B. Tech. होऊन कानपुर आय. आय. टी. त M. Tech. करीत होता. विजयाचे शिक्षण आटोपले होते. वृंदा B. Sc. करून M. Sc. करीत होती. सर्वात धाकटा सुधीरही १० वी मॅट्रिकला गेला होता. एकूण जीवनाला बरेच स्थैर्य लाभले होते.

२२ डिसेंबर १९७८ ला विजयाचा आणि ५ जुलै १९७९ ला वृंदाचा विवाह झाला आणि आम्ही आपल्या जबाबदारीतून मुक्त झालो. बारा वर्षांची खडतर तपश्चर्या फळाला आली. चि. सुधीरही १२ वी मॅट्रिक झाला.

२६ मे १९७९ ला प्रमोदला बंगलोर मुक्कामी मुलगी झाली. तिचे नाव वैशाली ठेवण्यात आले. चि. वृंदाच्या लग्नाला सौ. मंदा सव्वा महिन्याची बाळंतीण आली होती. चि. प्रमोद रुडकीहून आला होता. नागपुरहून मग प्रमोद मंदाला व तान्ह्या मुलीला घेऊन रुडकीला गेला.

१९८० ला आम्ही दोघे प्रमोदकडे रुडकीला गेलो. रुडकी विश्वविद्यालयाचा परिसर फार मोठा आहे. रुडकीचे इंजिनीअरिंग कॉलेज हे इंग्रजी कारकिर्दीत सुरू झालेले भारतातील पहिले इंजिनीअरिंग कॉलेज. रुडकीहून हिमालयाच्या रांगा दिसतात. रुडकीला गंगेचा मोठा कालवा आहे. रुडकीच्या परिसरातील सृष्टीसौंदर्यही उत्तम आहे. प्रमोदसह आम्ही हरिद्वार, ऋषिकेश, लक्ष्मणझूला ही स्थळे पाहिली. हरिद्वारच्या गंगेच्या कालव्यात स्नान केले. पाण्याला ओढ खूप आहे. साखळदंड धरून स्नान करावे लागते. हरिद्वार म्हणजे सप्तपुऱ्यातील मायापुरी. मायादेवीचे दर्शन घेतले. हरिद्वारच्या दोन डोंगरांचे कडे समोरासमोर आहेत. त्यावरील एका डोंगरावर मी चढलो व माथ्यावरील देवीचे दर्शन घेतले. येथेच देवीने शुंब-निशुंब या राक्षसांचा वध केला असे सांगतात. तेथून सभोवारचे दृश्य हे अतिशय मनोहर व नयनरम्य आहे. गंगेच्या अलीकडच्या तीरावर ऋषिकेश आहे. तेथून लक्ष्मणझुल्यावरून पलीकडच्या तीरावर जाता येते. दोन्ही तीरांवर अनेक मंदिरे आहेत. काली कमलीवाले बाबांचा आश्रम, संतोषी मातेचे भव्य मंदिर पाहिले. एक दिवस कनखलला गेलो. तेथे दक्षेश्वर मंदिर आहे. येथेच दक्ष (पार्वतीचा पिता) याने महायज्ञ केला. पार्वतीने यज्ञकुंडात उडी घेतली ते स्थान हेच. येथील गंगेचे पात्र फार सुरेख आहे.

नंतर एक दिवस डेहराडून, मसुरी पाहून आलो. मसुरीचे रस्ते फार सुरेख आहेत. ते थंड हवेचे ठिकाण आहे. रोप-वे वरून डोंगरावर चढलो. एक दिवस 'मुनीकी रेती ' येथील गढवाल विकास निगमच्या कार्यालयातून बदरीनाथ - केदारनाथच्या यात्रेची तिकीटे काढून आलो. ही बस मिनी बस असते. फक्त २० प्रवासी बसतात.

ही सात दिवसांची यात्रा फारच आनंदात झाली. हिमालयातूनच सारा प्रवास आहे. अप्रतिम सृष्टीसौंदर्याचे दर्शन घडले. प्रथम देवप्रयाग लागले. येथे अलकनंदा व भागीरथी यांचा संगम आहे. नद्यांच्या संगमाला प्रयाग अशी संज्ञा आहे. बद्रीनाथचा मार्ग म्हणजे अलकनंदेच्या तीराने तिच्या उगमाकडे जाण्याचा मार्ग. डोंगरावरून बसचा मार्ग आहे आणि खाली अलकनंदा वेगाने वाहताना दिसते. रुद्रप्रयाग, जोशीमठ वरून बद्रीनाथला जायचे. ज्योतिर्मठात श्री. विष्णुदेवानंद सरस्वती ह्या शंकराचार्यांचे प्रवचन ऐकले. बद्रीनाथचे दर्शन घेण्याच्या अगोदर मंदिराबाहेरील गरम पाण्याच्या कुंडात स्नान केले. बद्रीनाथाची पद्मासनस्य मूर्ती पाहून अत्यंत समाधान झाले. भक्तिभावपूर्ण अंतःकरणाने दर्शन घेतले. परत रुद्रप्रयागला आलो व तेथून मंदाकिनीच्या तीराने तिच्या उगमाच्या दिशेने केदारनाथाचा प्रवास सुरू झाला. केदारनाथाचे मंदिर पांडवकालीन आहे. केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. बद्रीनाथ हे चार धामांपैकी एक. केदारनाथाचे दर्शन घेतले. बद्रीनाथाच्या व केदारनाथाच्या मंदिरात आम्ही बराच वेळ राहिलो व पुन्हा पुन्हा दर्शन घेतले. तेथून हालावेसेच वाटेना. आद्य शंकराचार्यांचे देऊळ जवळच आहे. येथूनच ते हिमालयात गेले व त्यांचे अवतारकार्य संपले. सूर्यप्रकाशात हिमालयाची शिखरे फारच विलोभनीय वाटतात. 'जय अलकनंदा जय मंदाकिनी । जय भागीरथी अघनाशिनी' हे पद आम्ही बद्रीकेदाराच्या यात्रेत बरेच वेळा आळवत होतो. केदारनाथला जायला आम्ही दोन डोल्या केल्या होत्या.

बद्रीनाथहून आम्ही मिनीबसने माना या ठिकाणी गेलो. तेथे अलकनंदा व सरस्वती या दोन नद्यांचा संगम आहे. सरस्वती प्रचंड वेगाने खळाळत वाहते. भीमाचा पूल पाहिला. येथूनच पाच पांडव व द्रौपदी हिमालयात निघून गेले. बटाट्‌याची शेते पाहिलीत. येथे भारताची हद्द संपून तिबेटची हद्द सुरू होते.

नंतरचे सर्व प्रवास प्रकाश टूर्स ने झाले. ९-१०-८१ ते २६-१०-८१ आम्ही दोघे प्रकाश टूर्स बरोबर पशुपतिनाथाच्या यात्रेला गेलो. जबलपुरला भेडाघाट पाहिला. खजूराहोची पाषाणावरील शिल्पाकृतीसाठी प्रसिद्ध असलेली लेणी पाहिली. नेपाळची राजधानी काठमांडू पाहिली. येथील श्री पशुपतीनाथाचे मंदिर पागोडा पद्धतीचे आहे. पशुपतिनाथाला अभिषेक केला. तेथे बसमध्ये बिघाड झाल्यामुळे वर्कशाॅपमध्ये दुरूस्तीला टाकावी लागली. पाच दिवस खोळंबा झाला. आता काय करावे? काही प्रेक्षणीय स्थळे आपण आपल्याच प्रयत्नाने पाहिली पाहिजेत असा विचार करून काठमांडूच्या बसस्टेशनवर गेलो. तेथे चौकशी केली असता धुलिखेल हे प्रेक्षणीय स्थळ आहे, तेथे बस जाते, असे कळले. आम्ही दोघे बसची तिकीटे काढून धुलिखेलला जाणाऱ्या बसमध्ये चढलो. भोवतालच्या पर्वतांच्या रांगांमधून आमची बस जात होती. सृष्टीसौंदर्य नयनमनोहर होते. त्या पहाडी प्रदेशात सूर्यास्ताचे दृश्य फारच रमणीय दिसले. धुलिखेलला आम्ही उतरलो. बस पुढे जाऊन परत येणार होती व त्या बसने आम्ही काठमांडूला परत येणार होतो. पण बस आलीच नाही. पहाडी मुलुख असल्यामुळे थंडी मी म्हणत होती. सायंकाळ झाल्यावर घरांची दारे पटापट बंद झाली. आम्ही मोकळ्या जागेत कुडकुडत होतो. परका मुलुख. अंधार वाढत चालला. थंडीही वाढत चालली. काय करावे काही कळेना. मोठा विचित्र प्रसंग आला. एक ट्रक काही अंतरावर उभी होती. आम्हाला काठमांडूला पाहोचविता काय असे ट्रक चालकाला विचारले. आम्ही रात्री जात नाही असे तो म्हणाला. तितक्यात दोघे पोलीस गस्त घालीत तेथे आले. आम्ही त्यांच्याशी बोललो. आपली हकीकत सांगितली. आता येथे बस येणार नाही. आमची येथील ड्‌युटी संपली आहे. आम्ही ठाण्यावर परत जात आहोत. पण ठाणे येथून दूर आहे. तुमच्याने तोपर्यंत पायी चालणे होईल का? आम्ही होकार दिला. आमच्या ठाण्यावर बस येईल. तिच्यात आम्ही तुम्हाला बसवून देऊ. ती काठमांडूला जाईल. तेथून तुम्ही रिक्षा करून आपल्या स्थानावर जा, असे तो म्हणाला. आम्ही त्यांच्या मागोमाग जाऊ लागलो. त्यांच्या बरोबर भराभर चालावे लागे. पोलीस ठाणे आले. काही वेळाने बस आली. त्या पोलीसांनी ती थांबविली व आम्हाला तिच्यात बसवून दिले. ते पोलीस त्यावेळी आम्हाला देवदूत वाटले. काठमांडू बसस्टेशनवर आम्ही उतरलो व रिक्षा करून आपल्या मुक्कामावर सुखरूप पोहोचलो. विचित्र प्रसंग आला होता पण अशा रीतीने तो निभावला.

काठमांडूहून दार्जीलिंगला गेलो. आमची बस ढगातून जात होती. घरे लाकडाची होती. मोठ्या पहाटे उठून सूर्योदय पाहायला गेलो. सूर्योदयाचे दृश्य अप्रतिम होते. अग्नीचा लंबगोलाकृती गोळाच वर येत आहे असे भासत होते. कन्याकुमारीला  सूर्यास्त पाहायला गेलो होतो पण ढगाळ वातावरणामुळे तो दिसला नाही.

काठमांडूला खोळंबा झाल्यामुळे कार्यक्रमात असलेली विंध्याचल व नालंदा ही स्थळे सोडून द्यावी लागली. काशी, प्रयाग, गया ही त्रिस्थळी यात्रा झाली. तिन्ही ठिकाणी श्राद्ध केले. रामेश्वरहून आणलेला सेतू काशीविश्वेश्वराला अर्पण केला. षोडषोपचार पूजा केली. अन्नपूर्णेची कुंकुमार्चन पूजा केली. प्रयागला त्रिवेणी संगमावर रामेश्वराचा सेतू अर्पण केला. वेणीदान केले. गयेला फल्गु नदीचे पात्र उपडे आहे. फल्गु नदीवर वटवृक्षाखाली आणि विष्णुपदावर पिंडदान केले. दिवाळीच्या आधी नागपुरला पोचणार होतो पण भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी पोचलो. तिसऱ्या दिवशी मावंदे केले. पांडव पंचमीला दादा मोहरीर वारले. दहा दिवस सुतकात गेले. अकराव्या दिवशी शुद्ध होऊन श्री. नानासाहेब कुळकर्णींच्या मुलीच्या लग्नाला गेलो. तिकडून घरी आलो आणि आजारी पडलो.

आजाराने भयंकर वळण घेतले. डाव्या पायाला असह्य दुःख होते. तापही होता. शौचावाटे सारखे रक्त पडत होते. सर्व मुले बाहेरगावी होती. सर्व मुलींची लग्ने होऊन त्या आपापल्या सासरी गेल्या होत्या. मी आणि माझी पत्नी दोघेच घरी होतो. माझी शुश्रुषा करतांना तिच्यावर फार ताण पडे. सर्वात धाकटा मुलगा पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिकत होता. त्याची टर्मिनल परीक्षा असल्यामुळे त्याला कळविले नाही. परीक्षा आटोपल्यावर त्याला कळविले. तो आला. तो येईपर्यंत डॉ. बी. जी. पांडे  यांचे औषध सुरू होते. पण काही आराम पडेना. सुधीर आल्यावर डॉ. टावरींना प्रकृती दाखविली. एक्स रे काढण्यात आला. Lumber Spondylitis असे निदान झाले. पाठीच्या कण्याच्या L5 आणि S1 या मणक्यांमधील अंतर कमी झाले होते. ही माझी केस नाही. मी Neurophysician आहे. तुम्ही अस्थिरोग तज्ज्ञाकडे जा, असे डॉ. टावरी म्हणाले. नंतर आम्ही डॉ. बाभुळकरांकडे गेलो. त्यांच्या दवाखान्यात रोज सकाळी जात होतो. Traction, Diathermy आणि Physiotherapic Treatment घेऊन घरी परत येत असे. १५ दिवस उपचार घेतल्यानंतर दुःख आटोक्यात आले, पण ताप हटेना. अशक्ती खूप आली होती. त्यासाठी डॉ. मुकुंद शास्त्री यांचे औषध घेतले. सहा महिने मी अंथरूणावरच होतो. ताप गेला. मग हळूहळू बरे वाटायला लागले. घरातल्या घरात चालू लागलो. पण अजूनही खाली बसतांना त्रास होतो. पाठ, कंबर दुखते. खुर्ची टेबलावर जेवण करावे लागते. शौचाला कमोड वापरावे लागते. समाधान एवढेच की अपंगता येऊन परावलंबित्व आले होते, ते जाऊन आता सर्व व्यवहार स्वतः करू शकतो.

१९८२ साल असेच गेले. १९८३ साली जगन्नाथपुरी, कोणार्कचे सूर्यमंदिर, कलकत्त्याचे कालीमाता मंदिर व त्याजवळच असलेली बारा शिवमंदिरे ही यात्रा प्रकाश टूर्सनेच केली. कलकत्त्याला देशगौरव सुभाषचंद्र बोस सर्वांच्या हातावर तुरी देऊन ज्या घरातून पसार झाले व पुढे जर्मनीत व नंतर जपानमध्ये गेले, ते त्यांचे घर व ते ज्या जिन्यावरून उतरले तो जिना पाहिला. आझाद हिंद फौजेची स्थापना, त्यांनी ब्रिटिश सत्तेशी दिलेला लढा, चलो दिल्ली, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा, ही त्यांची वीर गर्जना, इंग्रज सैन्याशी मुकाबला करीत त्यांना इंफालपर्यंत मागे रेटत आणणे, सिंगापूर रेडियोहून दि. २५ जून १९४५ ला त्यांनी केलेले भाषण  व त्यात महात्मा गांधींविषयी व्यक्त केलेला आदर व कृतज्ञता हा सारा रोमांचक व स्फूर्तिदायी इतिहास डोळ्यांसमोरून तरळून गेला. जगन्नाथपुरीला शंकराचार्यांचा मठ पाहिला. कोणार्कचे जगप्रसिद्ध सूर्यमंदिर पाहिले. कलकत्त्याला कालीमातेचे दर्शन घेतांना रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद ह्या महापुरुषांचे स्मरण होऊन आम्ही नतमस्तक झालो. जगन्नाथपुरी चार धामांपैकी एक. आता बद्रीनाथ, रामेश्वर आणि जगन्नाथपुरी या तीन धामांचे दर्शन झाले होते. द्वारका हा चौथा धाम राहिला होता. याच प्रवासात हिराकुंड हे महानदीवरचे अति विशाल धरण पाहिले.

जगन्नाथपुरीला श्री जगन्नाथ मंदिरात श्रीकृष्ण, बलराम व सुभद्रा यांच्या लाकडाच्या मूर्ती आहेत. दर्शन घेतले. समुद्र पाहिला.

१९८४ साली आम्ही दोघांनी प्रकाश टूर्स बरोबरच श्री ओंकारेश्वर, सोमनाथ, द्वारका, महाकालेश्वर ही यात्रा केली. ओंकारेश्वराची व सोमनाथाची साभिषेक पूजा सोमवारी, महाकालेश्वराची एकादशीला (स्मार्त) झाली. वासुदेवानंद सरस्वतींची समाधी आणि दत्तात्रेय यांचे गरुडेश्वरला दर्शन व अभिषेक गुरुवारी झाला. गिरनारची यात्रा संकष्टी चतुर्थीला झाली.

या प्रवासात २७ प्रवासी होते. एकंदरीत आमची ही यात्रा निर्विघ््नपणे पार पडली. चारही धामांची यात्रा पूर्ण झाली. परमेश्वराची अपार कृपा! प्रस्तुत यात्रेचे वर्णन पुढे देत आहे.

श्री ओंकारेश्वर, सोमनाथ, द्वारका, महाकालेश्वर यात्रा:

आम्ही उभयता प्रकाश टूर्सच्या बसने रविवारी ७-१०-८४ ला सकाळी सात वाजता द्वारका-सोमनाथ यात्रेसाठी नागपुरहून निघालो. बस सुमारे ११-३० वाजता अमरावतीच्या देवीच्या देवळाजवळ थांबली. देवीच्या दर्शनासाठी अर्ध्या तासाचा अवधी देण्यात आला होता. तितक्या वेळात आम्ही चि. विश्रामकडे जाऊन आलो. चि. सौ. परिमलला typhoid झाला होता आणि चि. परागलाही ताप होता. रात्रीचा मुक्काम खांडव्याला झाला. श्री दादाजी धुनीवाले यांच्या समाधीचे दर्शन घेतले. बडे दादाजी व छोटे दादाजी अशा दोन समाध्या आहेत. समाधिस्थानाचे वातावरण शांत व गंभीर वाटले. समाधीच्या प्राकाराचा दर्शनी भाग सुंदर आहे. भवानी मंदिर पाहिले. दि. ८ ला सकाळी पुढच्या प्रवासाला निघालो. ओंकार मांधात्याला आलो. येथे नर्मदेचे पात्र मोठे आहे. नदीवर पूल आहे. पूलावरून नदीच्या पैलतीरी असलेल्या ओंकारेश्वराच्या मंदिराला गेलो. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तेथे नर्मदेचे स्नान, श्री ओंकारेश्वराचे दर्शन, पंचमुखी गणपतीचे दर्शन, पूजा, अभिषेक आटोपून नावेने नर्मदेच्या ऐलतीरी आलो. तेथे ममलेश्वराचे मंदिर आहे. दर्शन घेऊन, जेवण करून रात्री महेश्वरला आलो. रात्रीचा मुक्काम महेश्वरला अहिल्याबाई होळकरांच्या वाड्यात झाला. दि. ९ ला सकाळी नर्मदेचे स्नान केले. येथील किल्ला आणि घाट फार प्रेक्षणीय आहे. तो अहिल्याबाईंच्या स्मारकार्थ त्यांच्या सुनेने बांधला. अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी आपली राजधानी महेश्वरला आणली. होळकर घराण्यातील दिवंगत स्त्री-पुरुषांच्या छत्र्या येथे स्मारक रूपाने उभारण्यात आल्या आहेत. अहिल्याबाईंची गादी येथे मोठ्‌या आदरपूर्वक राखली आहे. अहिल्याबाईंची अगदी जिवंत वाटणारी मोठी प्रतिमा सिंहासनावर विराजमान आहे. त्यांची दानशूरता, धर्मपरायणता, न्यायप्रियता सुविख्यात आहे. येथे ब्राह्मणांकडून लक्षलिंगार्चन अजूनही प्रतिदिन सुरू आहे. राणीचा नवरत्नहार आम्ही येथे पाहिला. आद्य शंकराचार्य आणि मंडनमिश्र या दोन प्रकांड पंडितांचा वाद येथे झाला. महेश्वराला जेवण करून पुढच्या प्रवासाला निघालो.

मार्गात मांडवगड लागले. तेथे पुरातन किल्ला, बाजबहादुर व राणी रूपमतीचा महाल आणि अनेक पुरातन वास्तू आहेत. शिल्पकला प्रेक्षणीय आहे. बाजबहादुराच्या महालात तानसेन व राणी रूपमतीचा रागदारीचा सामना झाला. तानसेन हारला. मांडवगडहून सायंकाळी धारला पोचलो. धार ही भोजराजाची नगरी. येथे सुप्रसिद्ध कलाकार श्री. रघुनाथ फडके यांचा स्टुडियो पाहिला. त्यात महात्मा गांधी, लो. टिळक, पं. जवाहरलाल नेहरू, सयाजीराव गायकवाड, साईबाबा, इंदिरा गांधी इत्यादींचे १०० हून अधिक पुतळे आहेत. रात्रीचा मुक्काम धारला झाला. त्या दिवशी कोजागिरी होती. रात्री सर्वांनी चंद्रप्रकाशात आटीव दूध प्राशन केले. दि. १० ला धारेश्वर महादेव व गडकालिकेचे दर्शन घेतले. रात्री गरुडेश्वरला पोहोचलो. येथे नर्मदेचे पात्र व घाट सुरेख आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आणि दत्तमंदिर पाहिले. दत्त मंदिरात भिंतींवर नृसिंह सरस्वतींच्या जीवनातील गुरूचरित्रात वर्णिलेले प्रसंग चित्ररूपाने रेखाटले आहेत. दत्त मंदिर व समाधीमंदिर सुरेख आहेत. तेथील वातावरण रम्य व पवित्र आहे. दि. ११ ला सकाळी नर्मदास्नान करून समाधीला व दत्तात्रेयाला अभिषेक केला. नारदेश्वराचे व गरुडेश्वराचे दर्शन घेतले. गरुडेश्वराहून बडोद्याला आलो. तेथे Museum, Health Museum, प्राणीसंग्रहालय पाहिले. गुरुवार असल्यामुळे Planetarium बंद होते. तरी Planetarium ची इमारत बाहेरून पाहिली. जिना चढून आतील रचनाही पाहिली. रात्रीचा मुक्काम बडोद्याला झाला.

दि. १२ ला बडोद्याहून गिरनारकडे निघालो. बडोद्याहून थोड्‌या अंतरावर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी विमानाच्या पत्र्याचे बांधलेले एक आगळे व वैशिष्ट्यपूर्ण असे दक्षिणामूर्ती मंदिर आहे. तेथे श्री शिवाची ज्ञान-मूर्ती आहे. वातावरण स्वच्छ, नीटनेटके व टापटीपीचे वाटले. एक वेगळी कलात्मकता जाणवली. दि. १३ ला सकाळी डोलीने गिरनार पर्वत चढलो. दोघांनी दोन डोल्या केल्या. एकूण ४५० रु. भाडे पडले. मी डोलीत खाली पाय सोडून बसलो. ही पालखट घालून बसली. ७५० पायऱ्या चढायच्या व तेवढ्याच उतरायच्या. ३००० पायऱ्या चढल्यावर श्रीरामाचे मंदिर आहे. ४५०० पायऱ्या चढल्यावर जैनांची प्रेक्षणीय मंदिरे आहेत. त्यानंतर गोमुख व देवीचे मंदिर आहे. आणखी बरेच पुढे चढल्यानंतर गोरखनाथांचे तपश्वर्या स्थान आहे. तेथून काही पायऱ्या उतरून व पुढे चढून दुसऱ्या शिखरावर दत्तपादुका आहेत. एक साधारण चौकोनी शिलेवर दोन पदचिन्हे उमटली आहेत. मागाहून स्थापलेल्या अशा वेगळ्या पादुका नाहीत. तेथील जागा संकुचित आहे. ह्या पर्वतारोहणात आसमंताचे सृष्टीसौंदर्य दृष्टीत भरते. पायी चढणाऱ्यांना काठ्या घ््याव्या लागतात. त्या भाड्‌याने मिळतात. एक रु. अमानत व पन्नास पैसे भाडे. परत आल्यावर काठी परत करायची की एक रु. परत मिळतो. गिरनारच्या पायथ्याशी उतरल्यानंतर गावाकडे येतांना एकादशमुखी मारुतीचे मंदिर आहे. गिरनार चढतांना मधून मधून खोडियार मारुती, खोडियार देवी, भर्तृहरी-गोपीचंद इ. लहान लहान मूर्ती मांडलेल्या आहेत. दत्त पादुकापासून थोडे खाली आल्यावर मुख्य पायऱ्यांच्या रस्त्याच्या डाव्या हाताला काही पायऱ्या खाली गेलेल्या दिसतात. तेथे दत्तात्रेयाची अखंड धुनी आहे. दर्शनार्थींकरिता तेथे अन्नछत्र आहे. तेथून जवळच कमंडलू तीर्थ आहे. तेथे श्री दत्तात्रेय स्नान करीत असत. झऱ्याचे पाणी स्वच्छ आहे. तेच पाणी लोक पिण्याकरिता वापरतात. गिरनारच्या यात्रेला अनेक लोक येतात. बहुतेक लोक पायी चढतात व उतरतात. शाळेची मुले तर आम्ही उड्‌या मारत चढताना व उतरताना पाहिली.

दि. १४ ला सकाळी गिरनारहून निघालो. गिरनार जवळच जुनागढ आहे. तेथील किल्ला व प्राणीसंग्रहालय पाहिले. प्राणीसंग्रहालयात अनेक सिंह पाहायला मिळाले. नरसी मेहतांची समाधी आणि त्यांचे जीवनदर्शन घडवणारी अनेक चित्रे तेथे आहेत. जवळच मुचकुंद गुहा आहे. दुपारी सोमनाथला पोचलो. सोमनाथचा समुद्र सुरेख आहे. समुद्रस्नान करून १९५१ साली वल्लभभाई पटेलांच्या पुढाकाराने बांधलेले भव्य आणि सुंदर असे श्री सोमनाथ मंदिर समुद्र किनाऱ्यावरच आहे, ते पाहिले. सभामंडप भव्य आहे. सोमनाथाची शाळुंका तर मोठी आहेच, पण पिंडीही मोठी व उंच आहे. दर्शन घेऊन जवळच असलेल्या अहिल्याबाई होळकरांनी २०० वर्षांपूर्वी बांधलेल्या सोमनाथ मंदिरात आलो. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे.
खाली पायऱ्या उतरून ज्योतिर्लिंग आहे. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. त्याची पंचामृत स्नानपूर्वक साभिषेक षोडषोपचार पूजा स्वहस्ते केली. १०८ बिल्वदले वाहिली. ही साभिषेक पूजा अर्थातच दुसरे दिवशी त्रिवेणी घाटावर स्नान करून आल्यावर झाली. त्रिवेणी घाटावर हिरण्या, कपिला व सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे.

घाटाच्या पायऱ्या चढून वर आल्यावर समोरच आद्य शंकराचार्यांचे शारदापीठ आहे. दर्शन घेऊन आल्यावर मग सोमनाथाची साभिषेक पूजा व बिल्वदल अर्पण केले. आरती झाली. जेवण झाल्यावर दुपारी चार वाजता भालुकातीर्थ, देहोत्सर्ग, प्रभास पाहून आलो. संध्याकाळी साडेसहा वाजता सोमनाथच्या समुद्रावरील सूर्यास्त पाहिला. सात वाजता वल्लभभाई पटेल निर्मित सोमनाथ मंदिरातील आरतीला उपस्थित राहिलो. ह्या मंदिराच्या प्रांगणात समुद्र किनाऱ्याच्या बाजूला एक स्तंभ आहे. त्यावर दक्षिण दिशेकडे बाणाचे टोक दर्शविले आहे. त्याखाली Path of light right upto south pole अशा अर्थाचे इंग्रजी वाक्य लिहिले आहे. अर्थ असा की बाणाच्या दिशेने सरळ दक्षिणेकडे गेल्यास कोठेही भूभागाचा अडथळा न येता प्रकाश किरण हिंदी महासागर व अंटार्क्टिक महासागरातून दक्षिण धृवावर पोचेल.

सोमवार दि. १५ ला दुपारी जेवण झाल्यावर आमचा मोर्चा द्वारकेकडे वळला. मार्गात वेरावळ लागले. हे मत्स्य व्यवसायाचे मोठे केंद्र आहे. वातावरणात मासळ्यांचा वास सतत भरलेला असतो. नाक मुठीत धरूनच जावे लागते. मार्गात पोरबंदर हे सुंदर शहर लागले. रस्ते आखीव रेखीव, इमारती भव्य, उंच आणि शहराची मांडणी व्यवस्थित दिसली. पोरबंदर ही जुनी सुदामनगरी. येथूनच सुदामा श्रीकृष्णाच्या भेटीला द्वारकेला गेला होता. सुदामा मंदिर व कीर्तीमंदिर पाहिले. पोरबंदरहून द्वारकेपर्यंतचा मार्ग समुद्र किनाऱ्यानेच आहे. डाव्या हाताला समुद्र आपले नयनरम्य दर्शन देतो. अधून मधून दृष्टीआड लपून लपंडाव खेळतो. रात्री द्वारकेला पोचलो. आमचा मुक्काम बांगड धर्मशाळेत होता. दि. १६ ला सकाळी सात वाजता श्री द्वारकाधीशाचे मंदिर उघडणार होते व सकाळी आरती होणार होती. दर्शनाची ओढ लागली होती. आम्ही सकाळी साडेसहालाच मंदिराकडे निघालो. दार उघडताच आत शिरलो. भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले. आरती झाली. फार दिवसांची उत्कंठा तृप्त झाली. सभामंडपाच्या मागच्या भिंतीला मोठा आरसा लावलेला आहे. त्यात द्वारकाधीशाचे प्रतिबिंब दिसते. नंतर समुद्रस्नान, गोमतीचे स्नान करून परत देवळात आलो. निवांतपणे दर्शन झाले. देवळातच राहिलो. साडेदहा वाजता आरती झाली. देवाला शृंगारसाज, पोशाख, अलंकार चढवतांना पाहायला मिळाले. आरती झाल्यावरही काही वेळ देवळातच भगवंताच्या मूर्तीकडे अनिमिष नेत्रांनी पाहात होतो. मुक्कामावर आल्यावर जिलबीचे जेवण झाले.

द्वारकाधीशाच्या मंदिरालगतच आद्य शंकराचार्यांचे शारदापीठ आहे. त्या पीठावर सध्या स्वरूपानंद सरस्वती महाराज अधिष्ठित आहेत. आम्ही गेलो त्यावेळी ते तेथे नव्हते. सध्या कलकत्त्याला आहेत असे आम्हाला सांगण्यात आले. तेथे आद्य शंकराचार्यांच्या जीवनातील कुमारिल भट्टाशी वाद, मंडनमिश्राशी वाद, परकाया प्रवेश इत्यादि अनेक प्रसंगांची चित्रे भिंतीवर रेखाटली आहेत. भारतात बारा ज्योतिर्लिंगे कोठे आहेत हे दाखविणारा मृण्मय आराखडा तेथे आचार्यांच्या गादीच्या एका बाजूस आहे. जेवणानंतर काही वेळाने बसमधून पुन्हा आमचा फेरफटका सुरू झाला. प्रथम रुक्मिणीचे मंदिर लागले. हिने रुक्मिणीची खणानारळाने ओटी भरली. मी श्रीसूक्त म्हंटले. फुलांची माळा अर्पण केली. रुक्मिणीची मूर्ती सुरेख आहे. नंतर दारुकावनात नागेश्वराचे दर्शन घेतले. तेथून गोपेश्वराला गेलो. गोपीतलाव पाहिला. गोकुळातील गोपींना श्रीकृष्ण निर्वाणाची वार्ता कळल्यावर त्यांनी येथे येऊन देहत्याग केला अशी कथा आहे. नंतर ओखा बंदरावर येऊन बोटीने द्वारका बेटावर गेलो. तेथे श्रीकृष्णाचा राजवाडा होता. राण्यांचे महाल होते. द्वारकेला राजधानी होती. द्वारका बेटावर बोटीतून उतरल्यावर एक मोठा उंच ध्वजस्तंभ भिंतीला लागून उभारलेला दिसला. वर ध्वज फडकत होता. भिंत व ध्वजस्तंभ यामधील जागेतून माणसाने अंग चोरून निसटायचे. द्वारका बेटावरील श्रीकृष्ण मंदिरात गेलो. येथील मूर्तीही द्वारकेतील द्वारकाधीशाच्या मूर्तीसारखीच काळी आहे. फक्त फरक हातातील शंखात आहे. दोन्ही ठिकाणच्या मूर्ती शंखचक्रगदापद्मधारी चतुर्भुज आहेत. जिना चढून आम्हाला वर नेण्यात आले आणि ही सोन्याची द्वारका म्हणून सांगण्यात आले. तेथे श्रीकृष्ण रुक्मिणीच्या पिवळ्या धातूच्या मूर्ती आहेत.

बोटीने पुन्हा ओखा बंदराच्या किनाऱ्यावर आलो व तेथून आपल्या मुक्कामावर आलो. रात्रीच्या शेजारतीची वेळ झाली होती. रात्री साडेआठ वाजता शेजारती होते. लगेच द्वारकाधीशाच्या मंदिरात गेलो. देवाला रात्रीचा पोशाख, साज, शृंगार, अलंकार घालणे सुरू होते. गादी, उशी इत्यादि शेजेची तयारी केली होती. मूर्ती उभीच असली तरी आता सिंहासनावर बसल्यासारखी भासत होती. साडेआठ वाजता शेजारती सुरू झाली. ती आटोपून नऊ वाजता पडदा ओढण्यात आला. सर्व आरत्यांच्या वेळी मंदिरात गर्दी असते. आम्ही मुक्कामावर परत आलो. रात्रीचा मुक्काम द्वारकेलाच झाला.

दि. १७ ला द्वारकेहून निघून रात्री अहमदाबादला आलो. येथे स्वामीनारायण मंदिराच्या धर्मशाळेत आमचा मुक्काम होता. दुसरे दिवशी दि. १८ ला स्वामीनारायण मंदिर, झुलता मनोरा, दाई हिरीराची सात मजली विहीर, साराभाईचा Textile Museum, प्राणीसंग्रहालय, गीता मंदिर, साबरमती आश्रम इत्यादि स्थळे पाहिलीत. अहमदाबाद ४६ लाख लोकवस्तीचे शहर आहे. येथे १३० कापड गिरण्या आहेत. अहमदाबाद या शहराला परकोट असून बारा दरवाजे होते. काहींची पडझड झाली आहे. झुलता मनोरा हे अर्वाचीन स्थापत्यकलेला एक आव्हान आहे. जोडीने दोन मनोरे उभे असून वर चढण्या करिता पायऱ्या आहेत. एका मनोऱ्यावर स्त्रिया चढल्या व दुसऱ्या मनोऱ्यावर पुरूष चढले. एक मनोरा हालविला तर दुसराही हालतो. दाई हिरीराची विहीर सात मजली आहे. आता दोन मजले कचऱ्याने बुजलेले आहेत. पाच मजले दिसतात. विहीरीचे बांधकाम आश्चर्यजनक आहे. येथील गीतामंदिर तीन मजली आहे. स्वामी विद्यानंदजींनी भारतात निरनिराळ्या ठिकाणी गीतामंदिरे बांधली. तिसऱ्या मजल्यावर गीतेची मूर्ती आहे. दुसऱ्या मजल्यावर भारतीय युद्धातील काही प्रसंगांची आठवण करून देणाऱ्या मातीच्या मूर्ती आहेत. तळमजल्यावर गीतेचे अठरा अध्याय भिंतीवर लिहिले आहेत. कॅलिको मिल्सचे निर्माते साराभाई यांनी textile museum मध्ये वस्त्रांचे नमुने आकर्षक पद्धतीने मांडले आहेत. त्यांचे निवासस्थानही तेथेच आहे. महात्मा गांधींचा साबरमती आश्रम पाहून मन भारावून जाते. त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांची छायाचित्रे तेथे निरनिराळ्या खोल्यातून प्रदर्शनार्थ ठेवली आहेत. दि. १८ लाही मुक्काम अहमदाबादलाच झाला.

दि. १९ ला सकाळी साडेसात वाजता अहमदाबादहून इंदोरकडे जायला निघालो. १० च्या सुमारास डाकोरला आलो. डाकोरजीचे दर्शन घेतले. ही श्रीकृष्णाची मूर्ती द्वारकेच्या मूर्तीसारखीच आहे. पेहेरावात थोडासा फरक जाणवला. इंदोरला रात्री पोचलो. दि. २० ला सकाळी इंदोरहून उज्जैनला आलो. ही विक्रमादित्याची प्राचीन अवंतिका नगरी. सप्तपुऱ्यांपैकी एक. येथील महाकालेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. क्षिप्रेचे स्नान करून महाकालेश्वर दर्शन झाले. महाकालेश्वर मंदिर पेशव्यांनी बांधले. विक्रमादित्याची सिंहासनारूढ मूर्ती, बडा गणपती, सांदीपनी ऋषीचे निवासस्थान पाहिले. प्रथम बड्या गणपतीची पूजा केली. नंतर महाकालेश्वराची साभिषेक पूजा केली. येथेही सोमनाथच्या अहिल्याबाईंनी बांधलेल्या मंदिराप्रमाणेच खाली पाताळात ज्योतिर्लिंग आणि वरही एक शिवलिंग आहे. जुन्या महाकालेश्वरालाही अभिषेक केला.

महाकालेश्वर मंदिराच्या आसमंतात अनेक मंदिरे आहेत. सप्तर्षी मंदिर, नवग्रह मंदिर, एकादश लिंगेश्वर, रामदास स्वामींनी स्थापन केलेले मारुती मंदिर इत्यादि पाहून इंदोरला परत आलो. इंदोरला जैनांचे दुमजली काच मंदिर व अन्नपूर्णा मंदिर पाहिले. अन्नपूर्णा मंदिरापुढे सिमेंट काँक्रिटचे चार विशाल हत्ती अंबारीसहित उभे आहेत. मंदिराचा अंतर्भागही सुरेख आहे. नंतर मुक्कामावर परत आलो.

श्री. नानामहाराज तराणेकर इंदोरला राहतात. माझे सायन्स कॉलेज मधील रसायनशास्त्राचे प्राध्यापक कै. डी. आर. चांदोरकर यांचे पुत्र इंदोरला Excise Department मध्ये आहेत. त्यांच्या बरोबर नानामहाराजांच्या दर्शनाला गेलो. त्यांच्या घराच्या हॉलमध्ये त्यांची शिष्यमंडळी बसली होती आणि महाराजांचे पुरुषसुक्त, अथर्वशीर्ष, गीतेचा पंधरावा अध्याय यांचे पठण चालू होते. तो कार्यक्रम आटोपल्यावर महाराजांचे दर्शन घेऊन अभिवादन केले व प्रसाद व अंगारा घेऊन परत आलो. नंतर श्री. चांदोरकर यांच्या घरी गेलो. त्यांनी मोडक्या तोडक्या वस्तूंपासून स्वहस्ते तयार केलेल्या काही कलाकृती दाखविल्या. रात्रीचा मुक्काम इंदोरला झाला. दि. २१ ला सकाळी साडेपाच वाजता इंदोरहून निघालो. दहाच्या सुमारास भोपाळला आलो. बिर्ला मंदिर पाहिले. रात्री साडेदहाच्या सुमारास नागपुरला घरी सुखरूप परत आलो.

१९८५ - ८६ ह्या वर्षात प्रमोद National Lecturer असतांना एकदा हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात व्याख्यानासाठी जाणार होता. त्याने आम्हाला तारखा कळविल्या होत्या. आम्ही त्या अवधीत हैदराबादला गेलो. प्रमोदने आम्हाला हैदराबादेतील सर्व प्रेक्षणीय स्थळे दाखविली. उस्मानिया विद्यापीठाचे विस्तीर्ण कँपस, त्यातील विविध विभाग, पोहण्याचे टाके, चारमिनार, सालारजंग म्युझियम, बिर्लांनी बांधलेले व्यंकटेश मंदिर, हैदराबाद व सिकंदराबाद मधील मोठा तलाव, इस्कॉनचे (International Shri Krishna Consciousness) राधाकृष्ण मंदिर इत्यादि.

हैदराबादहून आम्ही दोघे बसने श्री शैल मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ््यायला गेलो. जाताना मार्गात उत्तम सृष्टीसौंदर्य पाहायला मिळाले. बस सात डोंगर चढून व उतरून वळणे घेत मल्लिकार्जुनला पोचली. कृष्णा नदी वळणे घेत वाहत असलेली पाहिली. मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन पूजा करताना परमानंद झाला. पार्वती मातेचेही देऊळ आहे. तिथेही दर्शन घेतले. डोंगराच्या कड्यावरून खाली पाहिले असता खोल दरीतून वाहत असलेली कृष्णा नदी दिसते. तिलाच पाताळगंगा म्हणतात. ती पार करून श्री नृसिंह सरस्वती महाराज अदृश्य झाले. दत्त सांप्रदायिकांचा प्रासादिक ग्रंथ गुरुचरित्र यात ह्या प्रसंगाचे वर्णन आहे. गुरुचरित्र हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा चरित्रग्रंथच आहे.

१९८५ साली आम्ही दोघांनी प्रकाश टूर्सच्या बसने अष्टविनायक व महाराष्ट्रदर्शन हा प्रवास केला. या वेळी आमच्या बरोबर माझे मावसभाऊ स्व. हरिभाऊ पत्तरकिने यांची स्नुषा डाॅ. मंदाकिनी पत्तरकिने ही होती.

स्वरचित पुढील दोन श्लोकात अष्टविनायकांची नावे व स्थाने यांचा समावेश आहे.

बल्लाळेश्वर पालिचा गणपती चिंतामणी थेउरी
लेण्याद्री गिरिजात्मकास वसती विघ््नेश्वरा ओझरी
हा मोरेश्वर मोरगावि वसतो हा सिद्धी विनायक
देतो दर्शन सिद्धिटेकि बरवे भक्ता झणी पावतो ।।१।।

जाणा रांजणगाव क्षेत्र बरवे नांदे महागणपती
पाहा श्री वरदाविनायक प्रभू महाड ग्रामी वसे
आहे अष्टविनायका शरण मी ध्यातो महन्मंगला
संसारार्णव दुःखहारि सुखदा मोरेश्वरा पाहि माम् ।।२।।

ह्या प्रवासात गाणगापुर ह्या सुप्रसिद्ध दत्तक्षेत्राचेही दर्शन घडले. गाणगापुर कर्नाटकात आहे. गाणगापुरला आमच्या बसमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांच्या वतीने आम्ही श्री दत्तात्रेयाच्या मूर्तीची सोवळे नेसून पूजा केली. तीर्थप्रसाद घेतला व दिला. त्रंबकेश्वर, आवंढया नागनाथ, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि भीमाशंकर या पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शन या यात्रेत झाले. श्रीक्षेत्र नाशिक, साईबाबांची शिरडी, पंचवटी, गजानन महाराजांचे शेगाव, श्री नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान कारंजा, पुण्याची पर्वती व सारसबागेतला गणपती, अक्कलकोट, वाशिमचा बालाजी, कळंबचा चिंतामणी, पंढरपुरची
विठ्ठल रखुमाई, तुळजापुरची भवानी, जेजुरीचा खंडोबा, संत तुकारामांचे देहू, ज्ञानेश्वर माउलींची आळंदी, आंबेजोगाईची अंबा योगेश्वरी ह्या पवित्र स्थानांचे दर्शन झाले. वेरूळची सुप्रसिद्ध लेणी आणि दौलताबादचा किल्ला पाहिला. बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण झाली. त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांची समाधी आहे. दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वरहून स्पेशल टॅक्सीने आम्ही दोघे, सौ. मंदा पत्तरकिने, श्री. देशमुख सप्तशृंगीला जाऊन अष्टादशभुजा देवीचे दर्शन घेऊन आलो. तेथे डोंगराची सात शिखरे ओळीने दिसतात. म्हणून त्या ठिकाणाला सप्तशृंगी म्हणतात.

लेण्याद्रीला जाताना श्री छत्रपती महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला दुरून पाहिला. या प्रवासात अनेक देवस्थाने, संत सत्पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थलांचे दर्शन घडल्यामुळे अतीव आनंद व समाधान झाले.

१९८६ साली प्रकाश टूर्स बरोबरच श्रीक्षेत्र माहुरची यात्रा करून आलो. माहुरला मातृगया म्हणतात. माहूरच्या देवीचे, अनसूया मातेचे व दत्तात्रेयाचे दर्शन घेतले. माहुरची देवी म्हणजे परशुरामाची आई रेणुका माता होय. तिला पातळ नेसवून खणानारळाने ओटी भरली. तांबुल अर्पण केला. मातृतीर्थात स्नान केले. माहूरच्या महानुभाव पंथाच्या दत्त मंदिरातही गेलो.

चि. विश्राम जळगावला असताना आम्ही दोघे त्याच्याकडे गेलो होतो. त्याने स्पेशल टॅक्सी करून अजिंठ्याची सुप्रसिद्ध लेणी, ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाईचे मंदिर, चांगदेवाचे तापीच्या तीरावरील तपश्वर्येचे स्थान, शिवमहिम्नस्तोत्राच्या रचयित्याचे तपश्वर्या स्थान, कमळे फुललेल्या तलावानजीकचे दोन गणपतीच्या मूर्ती असलेले मंदिर, इ. अनेक स्थळे आम्हाला दाखविली.

आमचे व्याही श्री. रत्नाकरराव केळकर यांच्या आग्रहावरून भिलईला गेलो असता तेथील पोलादाचा कारखाना पाहिला.

एकदा चि. अरुणकडे मुंबईला गेलो असता त्याने टूरिस्ट बसने आम्हाला सर्व मुंबई दाखविली.

चि. सुधीरच्या लग्नानंतर त्याला Ph. D. मिळाली तेव्हा मुंबईला गेलो असता त्याच्याबरोबर मुंबईच्या महालक्ष्मीचे दर्शन करून आलो. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले व तिला पातळ घेतले व खणानारळाने ओटी भरली. अशा रितीने तुळजापुर, कोल्हापुर व माहुर ही तीन पूर्ण आणि सप्तशृंगी हे अर्धे अशा साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन पूर्ण झाले.

कोल्हापुरहून टॅक्सी करून कृष्णा नदीच्या तीरावरील नृसिंहवाडीला जाऊन श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घेतले. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना दत्तात्रेयाचे अवतार मानतात. हे फार रम्य स्थळ आहे. येथे कृष्णा नदी उत्तरवाहिनी आहे. नंतर टॅक्सीनेच ज्योतिबाच्या डोंगरावर गेलो. तेथून खाली उतरल्यावर कोकणात ज्योतिबाचे मंदिर आहे. पुष्कळशा कोकणस्थांचे ज्योतिबा हे कुलदैवत आहे. ज्योतिबाचे दर्शन घेऊन वर आलो आणि टॅक्सीने पन्हाळगडावर गेलो. तेथे बाजीप्रभूचा दोन्ही हातात तलवारी घेतलेला भव्य पुतळा आहे. गडाच्या पायऱ्या चढून सज्जावर गेलो. तेथून सभोवारचे दृश्य फार सुरेख दिसते. येथून शिवाजी महाराज सभोवारची टेहळणी करीत असत. बाजूच्या वास्तूत सैन्याची रसद साठविण्याची जागा आहे. या पन्हाळगडावरच शिवाजी महाराजांनी संभाजीला कैदेत ठेवले होते. येथून काही अंतरावर पावन खिंडीत शत्रुसैन्याशी लढतांना बाजीप्रभू देशपांडेला वीरमरण आले होते. बाजीप्रभूच्या पुतळ्याला पुनश्च एकवार वंदन करून आम्ही कोल्हापुर स्थानकावर आलो व तेथून मुंबईला परतलो.

प्रमोद Ph.D. साठी कानपुरला असताना लहानग्या सुधीरला घेऊन मी कानपुरला गेलो होतो. प्रमोदने कानपुर व लखनौ मधील प्रेक्षणीय स्थळे दाखविली. तेथेच सुधीरला ताप आला. कानपुर आय. आय. टी. च्या दवाखान्यात त्याच्यावर उपचार झाले. ताप उतरला. आय. आय. टी. होस्टेलच्या शेजारच्या बागेत मी व प्रमोद उभे होतो. बोलता बोलता अनवधानाने प्रमोदचा पाय एका खड्यात गेला. पावलाचे फ्रॅक्चर झाले. काही दिवस प्लास्टर होते. मी सुधीरला घेऊन नागपुरला परत आलो. नंतर प्रमोद काही दिवस नागपुरला आला होता.

अशा रितीने चारही धाम, सप्त पुऱ्या, बारा ज्योतिर्लिंगे, साडेतीन शक्तिपीठे, अष्ट विनायक, संत महात्म्यांची स्थाने, वेरूळ, अजिंठा, खजुराहो, कोणार्क येथील जगप्रसिद्ध शिल्प, दौलताबाद व पन्हाळगड येथील प्राचीन किल्ले, दिल्ली, कलकत्ता, मुंबई, मद्रास, बंगलोर, म्हैसूर, हैदराबाद ही महानगरे, कानपुर, भोपाळ, अहमदाबाद, भिलाई, लखनौ, आग्रा, झाशी इ. मोठी शहरे पाहिली. असा सारा भारतवर्ष हिंडून झाला. आपल्या नशिबात प्रवास नाही असे माझ्या पत्नीला वाटायला लागले होते. पण आम्ही इतका प्रवास केला की तो पुष्कळांच्या नशिबात नसेल. आणि विशेष म्हणजे L. T. C. वगैरे कोणतीही सवलत उपलब्ध नसताना. याचे आम्हाला नक्कीच समाधान आहे.

_____________________

अनुक्रमणिकेकडे

No comments:

Post a Comment