अध्यक्ष महाराज!
सदाशिव मोरेश्वर मोहरीर
_____________________
ॐ
अर्पण पत्रिका
प्रणम्य मातरं राधाम्
जनकं तु मोरेश्वरम्
स्वरचितं प्रस्तुतं ग्रंथम्
मातृपितृस्मृतिसमर्पितम् ।
सदाशिव मोरेश्वर मोहरीर
वर्षप्रतिपदा, दि. २८ मार्च १९९८
_____________________
प्रकाशकाचे मनोगत
'अध्यक्ष महाराज, उपस्थित सज्जन आणि बंधुभगिनींनो!', मोठ्या आवेशात शाळेच्या एका स्नेहसंमेलनात मी आपल्या भाषणाला सुरुवात केली. 'भाषणाचा विषय अमुक अमुक आहे.' असेही सांगून झाले. नंतर १ सेकंद, २ सेकंद, ३, ५, १०, २० सेकंद, किती सेकंद झाले माहित नाही, पण माझ्या तोंडून पुढे काही शब्दच बाहेर पडेना. माननीय अटलबिहारी वाजपेयी बोलतात तेंव्हा त्यांचेही असेच होते. बरेचदा वाटते की विसरले की काय? पण ते शब्द तोलत असतात. काही झाले तरी शब्द म्हणजे रामबाण. एकदा भात्यातून निघाला की परत घेता येत नाही. असो. पण माझी गोष्ट वेगळी होती. माझ्या भात्यात बाणच नव्हता. मी बाबांनी लिहून दिलेले भाषण पाठ करून आलो होतो आणि ते मला वेळेवर आठवत नव्हते. जितका प्रयत्न करावा तितकी स्मरणाची द्वारे अधिकच बंद होत होती. डोके जणू बधिर झाले होते. नशिबाने पाय शुद्धीवर होते. ते वळले, व्यासपीठावरून खाली आले आणि रस्त्यावरून भरधाव पळत मला घरी घेऊन आले. येतांना संपूर्ण भाषण जसेच्या तसे आठवायला लागले. पण काय उपयोग? वेळ निघून गेली होती.
पूर्वतयारीचे वक्तृत्व हा शाळाकाॅलेजातून स्पर्धांचा एक सर्वमान्य विषय होता. १९४१ ते १९७६ ह्या आपल्या सेवाकालात बाबांनी त्यांच्या शाळेतर्फे अशा अनेक स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना उतरविले, त्यांच्याकरिता भाषणे लिहून दिली, त्यांच्याकडून ती पाठ करवून घेतली व हावभावासह स्पर्धेत वदवून घेतली. या विद्यार्थ्यांत आम्ही बहीणभावंडे पण होतो. वरील प्रसंग अपवादात्मकच. किती बक्षिसे मिळाली याची गणती नाही. क्वचितच शाळेचे बक्षिस जात असे. मिळालेली बक्षिसे आमचे मुख्याध्यापक स्वहस्ते प्रार्थनेच्या वेळी पुन्हा आम्हाला देत. टाळ्यांचा कडकडाट होत असे. बाबा शाळेच्या गॅलरीतून हे दृश्य बघत असत. त्या टाळ्या, तसेच भाषणात पडलेल्या टाळ्या ही आमची एक पुंजी आहे.
पूर्वतयारीच्या वक्तृत्वाप्रमाणेच वादविवाद व निबंध स्पर्धाही होत असत. निरनिराळे विषय, विभिन्न वयोगट, वेगवेगळे नियम. येथेही आम्ही व शाळेतील काही विद्यार्थ्यांनी बक्षिसे लुटून आणलीत. अर्थात् ह्या स्पर्धांमध्येही बोलविता व लिहविता धनी बाबाच होते.
सर्वात कठिण स्पर्धा म्हणजे 'समयस्फूर्त वक्तृत्व स्पर्धा'. वेळेवर प्रत्येकाला वेगवेगळा विषय द्यायचे. त्यावर एका बंद खोलीत विचार करून दहा मिनिटांनी भाषण सुरू करावे लागायचे बापरे, महाकठिण काम! सुरुवाती सुरुवातीला जड जायचे. बाबांनी लिहिलेल्याच निबंध, भाषणातील विषयाला थोडीफार मिळतीजुळती वाक्ये व एखादे दुसरे आपले वाक्य यांची जमवाजमव करून वेळ मारून न्यायची झाले. हा स्पर्धेचा प्रकार एकंदरीतच अव्हाॅयडेबल वाटायचा.
बाबांना सर्व काही जपून ठेवायची सवय आहे. आजही आमच्याकडे गेल्या ८०-९० वर्षांची पंचांगे, भोसला वेदशाळेला १९५७ मध्ये दिलेल्या चार आणे मासिक वर्गणीच्या रसिदी शोधल्या तर सापडतील. पण याच सवयीमुळे १९४० नंतर बाबांनी लिहिलेले बहुतेक सर्व निबंध व भाषणे एका गाठोडीत नांदत होते. या लिखाणांमध्ये गेल्या ६० वर्षांच्या काळाची पाउले उमटली आहेत. हा खजिना पुस्तक रूपाने प्रकाशात आणायचा माझा बरेच वर्षांचा मानस होता. 'अध्यक्ष महाराज!' त्याचे प्रत्यक्ष स्वरूप.
पुस्तकात बाबांनी केलेले सर्वच 'ghost writing' समाविष्ट झाले आहे अश्यातला भाग नाही. काही लिखाण ज्या कागदावर लिहिले तो इतका जीर्ण झाला होता की त्याची घडी उघडतांना त्याचे तुकडे पडले. ते जोडण्याच्या प्रयत्नात तुकड्यांचे तुकडे पडले. सर्व कागद गाठोडीतून काढल्यावर तळाशी चुरा पडला होता. शब्दांचा कीस काढणाऱ्या व्यक्ति पाहिल्या, पण शब्दांचा अक्षरशः कीस डोळ्यांनी पाहण्याची व हाताने चाचपायची ही पहिलीच वेळ. काळ सर्वभक्षक असतो म्हणतात ते काही खोटे नाही.
काही लिखाण अगदी कालबाह्य झाले म्हणून गाळले. काही निबंध व भाषणे हरवली आहेत. 'वाचनाचे महत्त्व' व 'माझी आई' हे निबंध तर मी पाठ केले होते. दोन्हीही सुंदर होते. पण आज ते उपलब्ध नाहीत. पण उपलब्ध आहे ते लिखाण काही थोडेथोडके नाही. त्यांचेही काळाआड जाणे, काही काळाकरिता तरी मला टाळता आले, या पुस्तकाच्या माध्यमाने, याचे मला समाधान आहे. त्याहूनही मोठे समाधान बाबांचे लिखाण बाबांच्या नावाने प्रकाशात येत आहे याचे आहे.
गेले कित्येक महिने मी रोज एक पान या हिशोबाने हे पुस्तक पुढे रेटले. रोज एक पान वाचायचे, रोज एक पान काँप्युटरवर टाईप करायचे, व रोज एक 'तुकडा पान' त्यावर आपली मल्लीनाथी लिहायची. पानाचे व्यसन चांगले नाही असे म्हणतात. पण मला लागलेली ही 'पानाची सवय' मी जतन करणार आहे.
५०-६० वर्षांच्या कालखंडात सातत्याने एकाच व्यक्तीने, एकाच उद्देशाने लिहिलेले हे साहित्य वाचतांना काळाच्या ओघात सर्व गोष्टींची कशी झीज होते हे अनुभवले. बऱ्याच गोष्टी आजच्या मुलांना समजावून सांगाव्या लागतील. सडा-सारवण म्हणजे काय प्रकार होता हे समजावून सांगूनही समजेलच असे नाही. कासारीण म्हणजे कोण असा प्रश्न पडेल. बाबू गेनू कोण असाही प्रश्न पडेल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. व्याकरणाचे नियम सुद्धा बदलले. बाबांचेच जुने निबंध जसेच्या तसे छापून बाबांना दिले तर त्यात बाबांनी अनेक ऱ्हस्वदीर्घाच्या चुका काढल्या. बऱ्याच शब्दातील अनुस्वार घोड्यावरून घोडेस्वार पडावा तसे गळून पडले. शब्दाच्या शेवटची 'इ'ची मात्रा 'ई'ची झाली. बरेचदा अशा झालेल्या बदलांमुळे भाषण १९६० पूर्वीचे की नंतरचे असे कालानुमान करता आले. हे भाषेतील बदल ह्या पुस्तकात सर्वत्र सापडतील. सरसकट आजचे व्याकरणाचे नियम वापरण्याचे जाणूनबुजूनच टाळले. जसे लिहिल्या गेले तसे छापले. अनुस्वार फक्त शक्यतोवर गाळले.
पुस्तकाला शीर्षक काय द्यावे यावर बराच विचार केला. 'अध्यक्ष महाराज, उपस्थित सज्जन आणि बंधुभगिनींनो!' हे सुरुवातीला दिलेले लांबलचक शीर्षक बाबांनाही आवडले नाही. लिखाण इतके विविध विषयांवर आहे की ते एका साच्यात बसत नाही. पण बहुसंख्य लेखांचा मसावि 'अध्यक्ष महाराज!' हा आहे. तोच शीर्षक म्हणून वापरला. शेवटी नावात काय आहे!
बाबांचेच लिखाण आज गुढीपाडव्याच्या दिवशी बाबांना व सौ. आईला सादर समर्पण!
अरुण
गुढीपाडवा, १९९८
मुंबई
_____________________
लेखकाचे मनोगत
प्रकाशितांमध्ये माझे हे तिसरे पुस्तक. 'अमृतकलश' हे पहिले. तो स्वरचित भक्तिगीतांचा संग्रह आहे. तसे पाहिले तर कोणत्याही समाजाचे म्हणा, किंवा धर्माचे म्हणा, आद्य वाङमय हे काव्यरूपच असते. हिंदूंचे आद्य धर्मग्रंथ वेद, उपनिषदे, स्मृति, पुराणे, भगवद्गीता हे सारे ग्रंथ काव्यरूपच आहेत. मुस्लिमांचे कुराण, ख्रिस्तांचे बायबल, शीखांचे ग्रंथसाहेब हे ग्रंथही काव्यमयच. इतकेच काय, आद्य मराठी कवी मुकुंदराज यांचे परमामृत, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी व अमृतानुभव, एकनाथांचे एकनाथी भागवत, श्री समर्थ रामदासस्वामींचा दासबोध, संतश्रेष्ठ तुकारामांची गाथा, रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली, विनोबांची गीताई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सारे उत्स्फूर्त वाङमय पद्यात्मकच आहे. ह्रदयाचे आंतरिक उत्स्फूर्त उद्गार काव्यरूपानेच बाहेर पडत असतात.
याला कारणे दोन. एक म्हणजे, काव्यवाणी ही लघुसंदेशपदा असते. मोजक्या शब्दात पुष्कळ भावार्थ त्यातून व्यक्त करता येतो. गूढार्थ देखील व्यंजकतेने व्यक्त करण्याचे सामर्थ्य काव्योद्गारात असते. ह्रदयातील भावनावेग जोरदार झाला की, तो उत्स्फूर्तपणे काव्यरूपाने बाहेर प्रकट होत असतो. दुसरे कारण असे की पद्य हे गद्यापेक्षा ज्यास्त आकर्षक असते. गेय असल्यामुळे त्याची रंजकता अनेक पटींनी वाढते. ते ह्रदयाचे आंतरिक बोल असल्यामुळे वाचकांच्या किंवा श्रोत्यांच्या अंतःकरणाची पकड लगेच घेते, आणि ती पकड देखील बराच काळ टिकते. तेव्हा माझा पहिला प्रकाशित ग्रंथ 'अमृतकलश' हा गीतसंग्रह आहे हे सहजतेला धरूनच आहे.
'अमृतकलश' श्री दत्तजयंतीच्या सुमुहुर्तावर दि. २४ डिसेंबर १९९६ ला प्रकाशित झाला. त्याला माझी कन्या प्रा. सौ. संगीता पाटखेडकर (अकोला) यांची प्रस्तावना लाभली आहे.
माझा दुसरा ग्रंथ 'मज्जीवनमणिमाला'. याचे स्वरूप आत्मचरित्रात्मक आहे. याला माझे ज्येष्ठ चिरंजीव डाॅ. प्रमोद मोहरीर, शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेता, डेप्युटी डायरेक्टर, National Geophysical Research Institute, हैदराबाद यांची प्रस्तावना लाभली आहे. या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ दि. १५ आॅगस्ट १९९७ रोजी, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव दिनी, तिथीनुसार माझ्या ८२व्या जन्मदिनी संपन्न झाला. हा ग्रंथ प्राधान्येकरून गद्यात्मक असला, तरी प्रसंगवशात् त्यात स्वरचित पद्याचीही जागोजाग पखरण आहे. इतकेच नव्हे तर मी सपत्निक संपूर्ण भारतवर्षाचा जो प्रवास केला त्याचे वर्णनही त्यात अंतर्भूत आहे. मी विसाव्या शतकाचा ८२ वर्षांचा दीर्घकाळ अनुभवला असल्यामुळे या ग्रंथाचे 'विसावे शतक' हे बारावे प्रकरण या शतकातील प्रमुख घटनांचा परामर्श घेणारे आहे. पण याशिवाय स्वातंत्र्योत्तर काळात आपण काय कमावले व काय गमावले याचा तो आयव्ययात्मक व आटपशीर आराखडाही आहे.
माझा तिसरा ग्रंथ 'अध्यक्ष महाराज!' हा प्रकाशनाच्या प्रतिक्षेत आहे. मी आपल्या सी. पी. अँड बेरार माध्यमिक विद्यालय, महाल, नागपूर येथील अध्यापकीय जीवनात आपले कन्यापुत्र आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना वक्तृत्व, वादविवाद, निबंधलेखन, पाठांतर, संवाद, साभिनय भाषण, नाट्य इत्यादि विविध स्पर्धात उपयोगी पडावे म्हणून जो नानाविध लेखनप्रपंच केला त्याचा समावेश प्रस्तुत ग्रंथात करण्यात आला आहे. त्यात भाषणे आहेत, वादविवाद-संवाद आहेत, निबंध आहेत, काही थोर स्त्रीपुरुषांवरील लेख आहेत, भगवद्गीतेवरील काही स्फुट लेख आहेत, काव्य, नाट्य, लघुकथा आहेत. असा हा नानाजिनसी खजिना माझा सुपुत्र डाॅ. अरुण मोहरीर, प्राध्यापक, आय्. आय्. टी. मुंबई, हा माझ्याजवळून आग्रहपूर्वक मागून घेऊन गेला, आणि प्रयत्नपूर्वक निवड करून (१) माझा देश, (२) आमची संस्कृति, (३) वादरण, (४) द्वंद्व, (५) संवाद व (६) गोपालकाला ह्या प्रकरणात विभागणी करून ते सर्व साहित्य संगणकावर टंकलिखित करून पुस्तकरूपाने प्रकाशित करीत आहे. ग्रंथाचे व प्रकरणांचे नामकरण, प्रत्येक घटकाच्या आधीची परिचयात्मक प्रस्तावना व अंतीची मल्लीनाथी, ग्रंथाचा विस्तार, आकार व सौष्ठव यांचा कर्ता, करविता धनी तोच आहे. या महनीय कार्यात पितृप्रेमादरापोटी त्याने जे अथक परिश्रम घेतले, त्याचे मला अपार कौतुक आहे. त्याला जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच.
ह्या माझ्या ग्रंथत्रयीला साकार करून वाचकांना सादर करण्याच्या जिकिरीच्या कार्यात प्रस्तावना लेखन, संगणकावरील टंकलेखन व मुद्रण, मुद्रिके तयार करून शुद्धिपत्रक तयार करणे इत्यादि विविध कार्यरूपाने आमचे सर्वच कन्यापुत्र व त्यांचे परिवार यांचा मोलाचा हातभार लागला आहे. माझ्यावरील प्रेमादरापोटी त्यांनी केलेल्या या मौलिक मदतीप्रित्यर्थ त्यांना माझे शतशः धन्यवाद.
माझी धर्मपत्नी सौ. प्रमिला हिचे अव्याज प्रेम, प्रेमळ सहानुभूती, प्रेरक स्फूर्ती व पदोपदी उत्तेजन यांच्या भरवशावरच मी आयुष्याच्या सायंकाळी एवढा लेखनप्रपंच करू शकलो. एरवी ते अशक्यप्रायच होते. ती खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी आहे. तिच्या अनमोल सहकार्याप्रित्यर्थ माझे तिला शतशः हार्दिक धन्यवाद.
प्रस्तुत ग्रंथातील बहुतेक सर्व साहित्य हे माझ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखातर, त्यांना विविध स्पर्धात भाग घ््यायला व यशस्वी होऊन शाळेची शान व कुळाची कीर्ती वृद्धिंगत करायला मदत व्हावी, म्हणून लिहिण्यात आले आहे. हा माझा ह्रदगत हेतू पूर्णतः सफल झाला आहे असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. तेव्हा या ग्रंथाला प्रस्तावना लिहिणारी व्यक्ति देखील आपल्या विद्यार्थ्यांपैकीच एक, शालेय जीवनापासूनच लेखनाची व काव्यरचनेची आवड असणारी, प्रतिभेचे स्फुल्लिंग अंतःकरणात जागृत असणारी, आपले उत्तेजन, प्रेरणा व मार्गदर्शन लाभलेली, उच्च शिक्षण घेतलेली व सध्या साहित्यिक, कादंबरीकार, नाटककार वा ललित वाङमयाच्या कोणत्याही अन्य दालनात मोलाची भर घालणारी असावी अशी साहजिकच माझी इच्छा होती. या दृष्टीने शोध सुरू झाला, आणि अचानक एक नाव पुढे आले. प्रा. डाॅ. विजय पांढरीपांडे, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद यांचे. ते आय्. आय्. टी. खरगपूर मधून Ph. D. झाले आहेत. सध्या ते हैदराबादच्या सुप्रसिद्ध उस्मानिया विद्यापीठात प्रोफेसर आहेत. त्यांचे वैशिष्ट्य असे की वैज्ञानिक व प्रौद्योगिकी क्षेत्राचे असून सुद्धा त्यांनी आपला विद्यार्थी दशेतला साहित्यनिर्मितीचा छंद जोपासला असून त्यांच्या आतापावेतो डझनभर कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना मी स्वत: आणि माझे सुपुत्र डाॅ. अरुण मोहरीर, जे प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशक आहेत, त्यांनी विनंती केली. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी अल्पावकाशात अतिशय मार्मिक व समुचित प्रस्तावना लिहून आमच्या स्वाधीन केली. त्यांच्या प्रस्तावनेने माझ्या प्रस्तुत पुस्तकाला एक प्रकारचे वजन प्राप्त झाले असून त्याची शान वाढली आहे. तत्प्रीत्यर्थ मी त्यांना हार्दिक धन्यवाद देतो, आणि आपल्या अध्यापनाच्या व साहित्यनिर्मितीच्या कार्यात ते उत्तरोत्तर विस्तारणारी यशाची क्षितिजे गाठोत, अशी आंतरिक भावना प्रकट करतो. वाचकांनी प्रस्तुत ग्रंथाचे वाचन सुरू करण्यापूर्वी डाॅ. विजय पांढरीपांडे यांची प्रस्तावना अवश्य वाचावी अशी त्यांना आग्रहपूर्वक विनंती करतो.
ह्या ग्रंथातील सर्व साहित्य माझ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अनेक स्पर्धांतून, चढाओढीतून, प्रतियोगितांतून - सी. पी. अँड बेरार हायस्कूल, सी. पी. अँड बेरार काॅलेज, श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालय, सेठ बिंझाणी सिटी काॅलेज, महाराष्ट्र अध्ययन मंदिर, गीतामंदिर, हिस्लाॅप काॅलेज, जी. एस्. काॅमर्स काॅलेज, ट्रेनिंग काॅलेज, भोसला वेदशास्त्र महाविद्यालय, विदर्भ महाविद्यालय, विदर्भ साहित्य संघ, धनवटे रंगमंदिर, तिडके हायस्कूल, पारळकर भवन, नगर भवन (टाऊन हाॅल), सीताबर्डी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राजाराम वाचनालय, महाल प्रायमरी शाळा, कुर्वे माॅडेल हायस्कूल, न्यू इंग्लीश हायस्कूल इत्यादि अनेक ठिकाणी आचार्य दादा धर्माधिकारी, वीर वामनराव जोशी, प्राचार्य राम शेवाळकर, डाॅ. अ. ना. देशपांडे, प्राचार्य गो. मा. कुळकर्णी, प्राचार्य पांढरीपांडे, डाॅ. के. रा. जोशी, प्राचार्य भा. रा. देशपांडे, प्रा. माणिकराव बैतुले यांच्यासारखी शिक्षण क्षेत्रातील थोर मंडळी अध्यक्ष वा परीक्षक असतांना मोठ्या प्रेक्षकश्रोतृवृंदासमोर दृकश्राव्य स्वरूपात सादर करून प्रथम वा द्वितीय क्रमांक पटकावून अनेक ढाली, चषक आणि स्वतःकरिता अनेक वैयक्तिक पारितोषिके प्राप्त करून संस्थेच्या व कुलाच्या कीर्तीत मोलाची भर घातली आहे. अमृत कलश आणि मज्जीवनमणिमाला हे ग्रंथ मी आपल्या आदरणीय मातापित्यांच्या पुण्यपावन स्मृतीस सादर समर्पण केले आहेत. तद्वतच 'अध्यक्ष महाराज!' नामक हा तिसरा ग्रंथही मी आपल्या पूजनीय मातापित्यांच्या पुण्यपावन स्मृतीस प्रणामपूर्वक सादर समर्पण करतो.
प्रस्तुत ग्रंथ रसिक वाचकांना सादर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे. सुजाण वाचकांनो, आता तुम्हीच माझ्या ग्रंथाचे टीकाकार, भाष्यकार, समीक्षक रसज्ञ.
स. मो. मोहरीर
गुढीपाडवा
२८ मार्च, १९९८
१५ अ, सुफला अपार्टमेंट्स्
कॅनाल रोड, गोकुळपेठ,
नागपूर - ४४००१०
_____________________
गुरुदक्षिणा
माझे गुरुवर्य (हायस्कूलमधील शिक्षक) श्री. रा. रा. मोहरीर सर ह्यांच्या प्रस्तुत लेखसंग्रहाला प्रस्तावना लिहिण्याचा प्रस्ताव माझ्यापुढे आला तेव्हा गुरूची आज्ञा म्हणूनच मी त्याला मान्यता दिली. एरवी कोणाच्याही साहित्यिक कृतीला प्रस्तावना वगैरे लिहिण्याची (मोठमोठे व्यासंगी लेखक ज्या पद्धतीने प्रस्तावना लिहितात त्या अर्थाने) माझी योग्यता नाही. अन् ह्या पुस्तकाच्या बाबतीत तर अधिकारही नाही. खरे म्हणजे माझ्यासारख्याने त्यांची प्रस्तावना मागायची ... (ती मी मागितली देखील. शालेय जीवनातील माझ्या फुटकळ साहित्याचे मी स्वतःच तयार केलेले जे हस्तलिखित - त्याला त्यांच्याच हस्ताक्षरातील 'आशिर्वाद' लाभले होते. तीन दशकांपूर्वी!) ... त्याची परतफेड म्हणून नव्हे तर एक प्रकारची गुरुदक्षिणा म्हणून मी हे चार शब्द लिहिण्याचे धाडस करण्याचे ठरविले.
मोहरीर सरांचा माझा संबंध हा केवळ शाळेतील वर्गापुरताच मर्यादित नव्हता. त्यांचा मुलगा विश्राम हा माझा वर्गमित्र असल्याने शाळेत असतानाच नव्हे तर नंतरही त्यांच्या घरी येणे जाणे व्हायचे. आता तर त्यांचे ज्येष्ठ पुत्र डाॅ. प्रमोद मोहरीर अन् मी एकाच शहरात, एकाच पोस्टलकोड विभागात राहत असल्याने आमचे वैयक्तिक अन् व्यावसायिक संबंध आहेत. सर महालातल्या घरात होते तोपर्यंत मी नागपूरला गेलो की त्यांचे घरी जाणे येणे व्हायचेच. आता ते अपार्टमेंट्समध्ये गेले आहेत. त्या अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये मी अजून गेलेलो नाही.
हा घर आणि अपार्टमेंट मधला - दोन संस्कृतीतला - फरक असेल!
संस्कृति आणि संस्कार ह्यांचे माहेरघर म्हणजे मोहरीर सरांचे घर. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे कौटुंबिक अन् व्यावसायिक व्यापताप सांभाळून, वडिलांचे लिखाण शोधून, संगणकावर मुद्रित करून प्रसिद्ध करण्याचा हव्यास म्हणजे सोपे काम नव्हे. आजच्या पिढीत नात्यागोत्याविषयी पूर्वीचा जिव्हाळा राहिलेला नाही हे कटु सत्य आहे. आजचे सगळे व्यवहार मटेरियलिस्टिक असतात. दामाशी काम. कामापुरते काम. आजची पिढी ही वेगळ्या संस्कृतीत वाढलेली आहे. शिक्षणाचे स्वरूप आमूलाग्र बदललेले. प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा. त्या स्पर्धेत उतरण्यासाठी जीवाचा आटापिटा. त्या दृष्टीने प्रस्तुत संग्रहातील लेखन म्हणजे चार पाच दशकापूर्वीच्या शालेय जीवनातील सांस्कृतिक प्रतिबिंब दर्शविणारा आरसाच आहे. पूर्वी स्नेहसंमेलने व्हायची. वेगवेगळ्या सांस्कृतिक स्पर्धा व्हायच्या. त्यातून विद्यार्थ्यांच्या मनाची जडणघडण व्हायची. कुणी म्हणेल पाठांतर करून पोपटपंची केल्यासारख्या लिहिलेल्या, म्हटलेल्या ह्या भाषणांचे काय महत्त्व? परंतु पाठांतरात खोलवर जिरण्याचा जो गुण असतो त्याचे महत्त्व कॅलकुलेटर किंवा संगणक की बोर्डच्या पियानो संस्कृतीत वाढलेल्यांना पटवले तरी समजणार नाही. ह्यातील लेख मी वाचले तेव्हा आजही कुठेकुठे माझ्या अंगावर शहारे आलेत. वाटले - कॅसेट रिवाईंड करून मागचे ऐकतात किंवा पाहतात - तसे सगळे काही गुंडाळून साठ पासष्ट सालात जावे अन् नागपूरच्या महालातील सी. पी. अँड बेरार शाळेच्या गॅलरीतील कठड्याला टेकून - 'अध्यक्ष महाराज, बंधू अन् भगिनींनो!' म्हणायला सुरू करावे!
एका विशिष्ट वृत्ती प्रवृत्तीने भारून जाण्याचा तो काळ होता. अभ्यासाचे ओझे हे हमालासारखे (मला तरी) कधी जाणवले नाही. अर्थात दोष त्यांनाही देता येणार नाही. कारण त्यांच्या पुढ्यात जे काही आहे ते तुम्ही आम्हीच रांधलेले, वाढलेले आहे.
गेले पाव शतक सुदैवाने शिक्षणक्षेत्राशीच माझा संबंध आहे. नव्या पिढीच्या बॅचेस (तेही इंजिनियरिंग क्षेत्रातील कुशाग्र बुद्धीमत्तेच्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस) दरवर्षी हाताखालून जातात. संस्कृतीमधले हे स्थित्यंतर म्हणूनच मला जवळून बघता, अनुभवता आले.
स्पर्धेचे युग आजही आहे. पण आजच्या स्पर्धा वेगळ्या, त्यांचे नियम वेगळे. हे काँपिटिटिव्ह एक्झाम्सचे युग आहे. आजच्या मुलामुलींचे आयुष्य हे टी. व्ही. चॅनेल्स् मधून प्रवाहित होणाऱ्या, इनफर्मेशन टेक्नाॅलाॅजीची जरतारी किनार लाभलेल्या, कार्यक्रमांनी प्रभावित होणार. अर्थात् त्यावर टीका करण्याचे काही कारण नाही. कारण बोर्नव्हिटा क्विझ काँटेस्ट किंवा सिद्धार्थ बसूची इंडिया क्विझ काँटेस्ट टी. व्ही. वर बघतांना ओठावर मिसुरडे न फुटलेल्या अन् खांद्यावर (ओढणीचा) पदर न घेतलेल्या मुलामुलींच्या सामान्य ज्ञानाची गरुडझेप आमच्यासारख्या उच्चशिक्षाविभूषित युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकालाही तोंडात बोट (एक नव्हे, पाचही बोटं!) घालायला लावणारी असते. आता 'ते खरे की हे खरे' हा वादाचा विषय असून त्यावरची भाषणे डाॅ. अरुण, डाॅ. प्रमोद ह्यांना व त्यांच्या मुलामुलींनाच लिहावी लागतील. सर फार तर आजकालच्या चाणाक्ष राजकारणी पुढाऱ्यासारखे 'समान अंतरावर' (मुलांपासून अन् नातवांपासून!) राहून परीक्षकाचे काम करू शकतील!
ह्या सर्व पार्श्वभूमीवर प्रस्तुत पुस्तकातील निबंध, लेख हे वरवर बघता कालबाह्य वाटत असले तरी त्यांचे सांस्कृतिक मूल्य काही कमी नाही. आजही विद्यापीठाला किंवा रेल्वे स्थानकाला नाव द्यायचे झाले तर आपल्याला डाॅ. आंबेडकर, छत्रपती शिवाजीच आठवतात. अर्थात ह्या नावांचा आपण खूपश्या भोळ्या आशेअपेक्षेने निवडून दिलेले पुढारी दुरुपयोग करतात अन् आर्. के. लक्ष्मणच्या कार्टून्सचे पात्र होतात हा भाग वेगळा!
मी हे लेखन मुद्रणप्रतीच्या रूपात वाचले. ह्या वाचनाने मला शालेय जीवनाची, शब्दशः 'रम्य ते बालपण' म्हणवणारी सफर घडविली. आमच्या शाळेजवळील महालच्या पाताळेश्वराच्या देवळातील घंटानाद, त्या शंकराच्या पिंडीवरील थंडगार तीर्थस्पर्श, त्या गाभाऱ्यातील निर्माल्यांचा वास ... हे सारे मी भक्तीभावे अनुभवले. ह्या अनुभवासाठी तरी मला सरांचे अन् त्यांचे लेखन तळमळीने प्रसिद्ध करणाऱ्या सुपुत्रांचे ऋणी रहावेसे वाटते. काही ऋणांचे ओझे वाहण्यातच आनंद असतो.
आज माझ्यात साहित्यिक छंद जोपासण्याची, सातत्याने लिहित राहण्याची जी जिद्द आहे त्यामागे सरांचे मराठी शिकवितानाचे संस्कार आहेत. म्हणूनच माझ्या पहिल्या वहिल्या हस्तलिखिताचे शाळाकाॅलेजात लिहिलेले बाड मी त्यांना तीस वर्षांपूर्वी वाचावयास दिले तेव्हा त्यांनी उत्स्फूर्तपणे लिहिलेल्या आशिर्वादपर प्रस्तावनेत जे भविष्य वर्तविले ते प्रभुकृपेने खरे झाले. परदेशीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला संशोधनपर लेख अन् दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली कथा ... अमेरिकन रिव्ह्यूअरची पेपरवरील समीक्षा अन् कुठल्यातरी कानाकोपऱ्यातून आलेले माझ्या कथाकादंबरीवरील वाचकाचे पत्र ... मला सारखाच आनंद देतात. ही शालेय जीवनातील संस्कारांची देणगी आहे. ह्या संग्रहातल्यासारख्याच लेखांचा तो प्रभाव आहे. ह्या सुसंस्कृतीने मधाळलेल्या संस्कारांचे प्रतिबिंब आजही माझ्या लेखनात मांजरीच्या पावलाने डोकावतेच. म्हणूनच अलीकडे मी लिहीत असलेल्या महाकादंबरीच्या ताज्या प्रकरणात नागपूरच्या महालातील सिटी हायस्कूलच्या प्रांगणात त्यावेळी होत असलेल्या ललित कला विहारच्या भाषणमालांचा संदर्भ आलाय. आता ह्या आठवणींची धृवपदे गातांना 'गेले ते दिन गेले' एवढेच म्हणणे आपल्या नशिबी आहे.
सरांच्या ह्या पुस्तकाला माझी प्रस्तावना म्हणजे रेशमी शालीला गोधडीचे ठिगळ लावण्यासारखे आहे. पण काही जुन्या माणसांना शालीपेक्षा गोधडीचीच ऊब भावते त्याला आपण काय करायचे?
ह्या वर्षीच्या गुढीपाडव्याला ... नेमक्या माझ्या वाढदिवशी ... ही गुरुदक्षिणा मला अर्पण करता आली हे माझे सौभाग्य.
डाॅ. विजय पांढरीपांडे
प्राध्यापक,
इलेक्ट्राॅनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग
उस्मानिया विद्यापीठ
हैदराबाद - ५००००७
गुढीपाडवा
२८ मार्च, १९९८
_____________________
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment