Thursday, 22 October 2015


मणी - १०

काही समारंभ, काही प्रसंग


सुखदुःखाचे धागे मानवी जीवनाच्या महावस्त्रात कसे एकमेकात गुरफटलेले असतात, त्याचा मला पुरेपूर अनुभव आलेला आहे. १९५८ साली प्रमोद मॅट्रिकला first class first आला. केवढा आनंदाचा प्रसंग! पण दुसऱ्याच वर्षी त्याची आई आजारी पडली. डाव्या पायाची शीर लागून तिला असह्य दुःख व वेदना सोसाव्या लागल्या. नीट चालता येत नसे. डॉ. दामले कडून लाईट घेणे वगैरे उपचार झाले पण आराम पडेना. मग डॉ. दामलेंनी मेयो हॉस्पीटल मधील रेडियोलाॅजिस्ट डॉ. कणिकदळे यांना पत्र देऊन Diathermic Treatment देण्यास सुचविले. १५ दिवस रोज मी तिला घेऊन मेयो हॉस्पीटलमध्ये जात असे व Diathermic Treatment देऊन परत आणत असे. तिच्या दुखण्याचे नाव सायटिका. काही उत्साही लोक भेटीला येत व म्हणत, 'ही आता अशीच अधू राहणार'. मी अत्यंत अस्वस्थ होतो. पण त्या दुखण्यातून ती पूर्णतया बरी झाली. त्यानंतर इतका प्रवास झाला. यात्रा झाल्या.

१४ मार्च १९८५ ला आमची धाकटी मुलगी चि. वृंदाला मुलगा झाला. केवढा आनंदाचा प्रसंग! पण त्यानंतर २-३ दिवसांनी बर्डी सुतिकागृहातून घरी येत असताना माझ्या पत्नीने दक्षिणामूर्ती मंदिराजवळ रिक्षा थांबवली व आईची भेट घेऊन येते म्हणून खाली उतरायला गेली व मटकन खाली बसली. तिला उठताच येईना. बबन मंगदे याने रिक्षा करून तिला आमच्या घरी पोहोचविले. तीन दिवस तिला उठताच येईना. घुसत पुढे सरकायची. चौथ्या दिवशी उठून उभी राहिली व घरात घासत घासत एक एक पाऊल पुढे टाकत चालू लागली. हा तिचा आजार Osteo Arthritis ठरला. अॅलोपॅथीत याच्यावर इलाज नाही. फक्त वेदनाशामक गोळ्या घेणे. तितक्यापुरते बरे वाटते. पुन्हा जैसे थे. अॅलोपॅथीक, आयुर्वेदिक, युनानी, होमियोपॅथिक सारे सारे उपचार झाले. मुंबईलाही वाऱ्या केल्या. एकदा जाऊन तेथील आर्थरायटिस स्पेशालिस्ट डॉ. बेंदरे यांचे महिनाभर औषध घेतले. काही गुण नाही. पुन्हा मुंबईच्या Tabe Clinic च्या जाहिराती वाचल्या, Arthritis मधून सुधारलेल्या रुग्णांच्या फोटोसहित. पुन्हा मुंबईला जाऊन दीड महिना तेथे राहून उपचार केले. मागच्या वर्षी मुंबईला गेलो तेव्हा डॉ. सामंत कडून गुडघ््याला Injection घेतले. पायावरील सूज उतरली, पण पुन्हा गाडी मूळपदावरच. Physio Therapist घरी येत असे. त्याच्या सल्यानुसार Physical Exercises केले, पण दुखणे हटले नाही. आता नुकतेच नागपुरच्या एका अस्थीरोग तज्ज्ञाकडून डाव्या गुडघ््याला चार आणि उजव्या गुडघ््याला चार Injections घेऊन झाली आहेत. गुण येण्याची वाट पाहणे सुरू आहे. मी Lumber Spondylisis आणि ही Osteo Arthritis ची कायम रुग्ण होऊन बसलो आहोत.

मागील वर्षी चि. अरुणची दुसरी कन्या चि. मंजिरीच्या बारश्याला मुंबईला गेलो. केवढा आनंदाचा प्रसंग! तेथे सव्वा महिना राहून नागपुरला परत आलो, तो दोन दिवसांनी माझी दुसरी मुलगी चि. विजया हिचे यजमान श्री. बळवंतराव पारखी दि. २७ फेब्रुवारीला वारले. काय म्हणावे या नशिबाला! माणूस अगदी सुन्न होऊन जातो. जीवनात अशा सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो. म्हणून ठरवले की दुःख आले की सोसायचे आणि आनंदाचे प्रसंग आले की ते पकडून ठेवून साजरे करायचे.

आमचे मामा कै. कृष्णराव कमाविसदार यांचा जन्म १८९८ सालचा. १९७३ साली त्यांना ७५ वर्षे पूर्ण झाली. आम्ही त्यांना सहकुटुंब सहपरिवार आपल्या घरी जेवायला बोलावून मामींना पातळ व ब्लाउजचे कापड आणि मामांना खादीचे धोतर, शर्ट व गांधी टोपी देऊन त्यांचा अमृत महोत्सव साजरा केला. मामांचे अल्पचरित्रही मी त्या निमित्ताने लिहिले होते. ते त्यांना सादर भेट दिले. मामा त्या प्रसंगी चार शब्द बोलले. मला धन्यता वाटली. मामा पुढे ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी, दि. २२-६-७५ ला वारले.

१९७७ साली माझी बहीण चि. दुर्गा हिच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली. तेव्हा तिलाही आम्ही आमच्या घरी जेवायला बोलावून तिला पातळ व ब्लाउजचे कापड आणि श्री. भाऊसाहेबांना धोतर देऊन, अक्षवान करून तिची षष्ट्यब्दी साजरी केली.

१४ जुलै १९८५ ला आपल्या आईची एकसष्टी साजरी करायचे मुलांनी ठरविले. मलाही ऑगस्ट मध्ये ७० वर्षे पूर्ण होणार होती. माझे वडील ती. नानाजींच्या मृत्यूला १३ मार्च १९८५ ला ५० वर्षे पूर्ण झाली होती. म्हणून हिची एकसष्टी, माझी ७०वी वर्षगाठ आणि स्व. नानाजींचा ५०वा स्मृतिदिन एकत्रच साजरा केला. सर्व निमंत्रित मंडळी आली होती. ती. नानाजींच्या फोटोला हार घालण्यात आला. माझे छोटेसे प्रास्ताविक झाले. ती. नानाजींची थोरवी वर्णन करणारे एक काव्य मी रचले होते. त्याचे मी वाचन केले. डॉ. मंदाताई पत्तरकिने यांचे सुश्राव्य गायन झाले. प्रा. भजनी व श्री इंदुरकर यांनी तबल्याची व पेटीची साथ केली. फराळपाणी झाले आणि हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम संपला. स्वरचित काव्य येथे देतो.

ती. श्री. नानाजींची अर्धशतसांवत्सरी

मातृपितृदेवोभव सांगतात संत हे
प्रिय अमुचे एकअसति पितृदेव धन्य हे ।।धृ।।

बालपणी हरपली मम मातृदेवता
संगोपन शिक्षणादि त्वत्कार्य तत्त्वता
सांगु किती उपकार महा गणवती न हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।१।।

साहिले कष्ट तुम्ही असंख्य जीवनी
आस एक धरिली मनी पुत्र सद्गुणी
सुविद्य आणि शीलवान बघत स्वप्न हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।२।।

जीवन शुद्ध सत्त्वयुक्त आणि निर्मम
आदर्श तुम्ही निर्मिलाच की महत्तम
कर्म उपासना नि भक्ति ज्ञान थोर हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।३।।

ब्राह्ममुहूर्ती उठून स्नानसंध्या विधी
देवपुजा तर्पणादि पोथि जाप्य जपविधी
सूर्यनमस्कार नैवेद्य वैश्वदेव हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।४।।

सद्गुणांचा जो असे ममठायी संगम
ती सारी तुमचीच कृपा दोष सर्व ते मम
कोणि काहि म्हणो परंतु जाणतो मीच हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।५।।

दिपस्तंभा परिस तुम्ही मार्ग दाविला अम्हा
संकटाच्या समयि जाण रक्षिले तुम्ही अम्हा
धैर्य शक्ति प्रेरणा उत्तेजनच मूर्त हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।६।।

वर्षे पन्नास पुरी उलटली मृत्यूला
स्मृती ताजी मनी वसे मूर्ती मनी मंगला
कृतज्ञतेचे भाव मनी दाटतात आज हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।७।।

तुम्ही कृतार्थ कृतज्ञ मी आर्त मने पाहतो
सत्तर संवत्सरे काळ स्मृतीपुढे ठाकतो
प्रसंग काही करिती उभे नयनात अश्रु हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।८।।

मातृपितृदेवोभव सांगतात संत हे
प्रिय अमुचे एक असति पितृदेव धन्य हे ।।धृ।।

माझे मावसभाऊ श्री. तात्याजी पुराणिक यांचा जन्म १९०७ सालच्या दिवाळीतला. १९८७ साली त्यांच्या वयाला ८० वर्षे पूर्ण झाली. त्या वर्षी काही अडचणीमुळे आमच्या घरच्या महालक्ष्म्यांचा सण भाद्रपदात झाला नाही. आम्ही तो दिवाळीनंतर साजरा केला. श्री. तात्याजी, सौ. राधावहिनी आणि तात्याजींची बहीण श्रीमती द्वारका गुपचुप यांना आम्ही आमच्या घरी बोलावले. त्यांना औक्षवान करून त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला.

माझे मावसभाऊ श्री. रघुनाथराव पत्तरकिने यांचा अमृत महोत्सव सोहळा सीताबर्डी टेकडीवरील फौजी गणपती जवळील पटांगणात त्यांच्या अनुग्रहित मंडळींनी व चाहत्यांनी साजरा केला. त्या सोहळ्यानिमित्त मी रचलेल्या काव्याचे त्या प्रसंगी वाचन केले व त्यांना सादर समर्पण केले. ज्येष्ठ शुद्ध षष्ठी शके १९१०, सोमवार दि. २०-६-८८ ला तिथीनुसार तीर्थरूप आईचा ६० वा स्मृतिदिन आम्ही मनोमन साजरा केला. त्या निमित्त तिच्या गुणवर्णनात्मक काही गौरवगीते मी रचली होती. त्यापैकी दोन मी येथे प्रस्तुत करतो.

मातृपूजन - १

आई माते राधामाई अारति ओवाळितो । स्मृतीला पुष्पांजलि अर्पितो ।।धृ।।

आठव होता तुझा अंतरी
चित्ती हुरहुर उरी शिरशिरी
गौरकाय तव मूर्ति गोजिरी
भक्ती प्रेमा मनी दाटतो ।।१।।

स्मृतिच्या नीरांजनि रुप्याच्या
वाति घातल्या सुविवेकाच्या
तूप घातले कृतज्ञतेचे
ज्योत प्राणांची पाजळतो ।।२।।

प्रसन्नतेची ही फुलवात
कारुण्याचा कर्पूर शीत
ओवाळित तुजवरुनी ज्योत
भक्तिभाव मम मनी दाटतो ।।।३।।

मुग्ध मोगरा मम प्रेमाचा
पारिजातक प्रसन्नतेचा
जाई जुई निशिगंधाचा
चरणी पुष्पगुच्छ अर्पितो ।।४।।

बकुळीची ही माळा बरवी
चातुर्याची चंपककळी
शेवंतीची वेणि आगळी
गुलाब गजरा शिरी माळितो ।।५।।

श्वेत नील रक्तवर्णी
कमळांच्या मृदु आभूषणी
गुलाब पुष्पाच्या मालांनी
तव स्मृतीची पुजा बांधितो ।।६।।


मातूपूजन - २

आई माते राधामाई आरति ओवाळितो ।
स्मृतीला पुष्पांजलि अर्पितो ।।धृ।।

हळदी कुंकुम सौभाग्याचे
भाळि विराजे प्रसन्नतेचे
कंठी मंगलसूत्र मण्यांचे
जयजयकार तुझा करितो ।।१।।

भावमूर्ति तव मनी भाविली
मानसपूजा अशी बांधली
आरति कर्पूर पुष्पांजली
काया वाचा मने अर्पितो ।।२।।

नमोऽस्तुते श्री महन्मंगले
मातृदेवते शुभाशीष दे
तव चरणी मम भक्ति जडू दे
मागणे अन्य न काहि मागतो ।।३।।

गुणगौरव सुगंध घुमला
अवघा आसमंत दरवळला
चंदन-धूप-सौरभ भिनला
उदबत्त्यांचा धूप अर्पितो ।।४।।

नैवेद्य भावादर भक्तीचा
मधुरातिशय पक्वान्नांचा
फलाशाविरहित मधुर फळांचा
स्वर्णताटि तव पुढे ठेवितो ।।५।।

तेल जळे परि ज्योत पाजळे
झिजे चंदन परि सुगंध दरवळे
नंदादीप मंद परि राउळ उजळे
सदाशिवा तव सान्निध्याचा प्रकाश नित लाभतो ।।६।।

११ एप्रिल १९८९ ला माझ्या पत्नीची बहीण श्रीमती वीणाताई हरदास हिची एकसष्टी आम्ही आमच्या घरी साजरी केली. प्रमोद, विश्राम सहकुटुंब आले होते. शांताच्या आईही आल्या होत्या. शांताच्या निकट मैत्रिणी व परिचित मंडळी जेवायला होती.

माझा ७५वा वाढदिवस श्रावण शुक्ल एकादशी, शके १९१२, दि. २-८-९० ला संपन्न झाला. संस्कृतचे विद्वान डॉ. के. रा. जोशी हे अध्यक्ष होते. चि. प्रमोद, चि. गीता व चि. विश्राम हे सहकुटुंब आले होते. चि. विश्राम नंदुरबार वरून येतांना शेगावला जाऊन, श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन माझ्या नावाने अभिषेकाची दक्षिणा देऊन आला होता. हिची आई व बहीण दोघीही आल्या होत्या. सर्व नातलग व परिचित मंडळी उपस्थित होती. 'या कुन्देन्दु' या सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. अध्यक्षांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माझ्या स्वरचित 'अमृत कलश' नामक भक्तीगीत संग्रहाच्या हस्तलिखिताचे अध्यक्षांच्या हस्ते विमोचन झाले. चि. विजयाने पुढाकार घेऊन मला एक मानपत्र अर्पण कण्याचा सोहळाही पार पाडला. अमृतकलशातील 'श्रीगणेश महिमा'नेच प्रस्तुत आत्मचरित्राची सुरुवात झाली आहे. चि. प्रमोद व चि. सौ. गीता यांची समयोचित भाषणे झाली. अध्यक्ष डॉ. के. रा. जोशी यांचे अत्यंत मार्मिक व सुश्राव्य भाषण झाले. त्यांनी अमृतकलशातील काही कवितांचे रसग्रहणही केले. श्रीमती वाीणाताई हरदास यांच्या पसायदानाने अमृत महोत्सवाची सांगता झाली. प्रास्ताविक मी केले व आभार प्रदर्शन चि. प्रमोदने केले. फराळपाणी होऊन हा गोड कार्यक्रम संपला. दुसरे दिवशी डॉ. के. रा. जोशी आणि श्री. रघुनाथराव पत्तरकिने आमच्या घरी जेवायला होते. कार्यक्रमाच्या दिवशी श्री. बोक्षे यांच्या भजनाचा सुरेख कार्यक्रम झाला.

C. P. & Berar Education Society चे संस्थापक आणि शाळेचे सुपरिंटेंडेंट श्री. अण्णासाहेब गोखले १९८१ साली खूप आजारी झाले. आम्ही उभयता त्यांच्या भेटीला गेलो होतो. तेव्हा ते म्हणाले 'प्रमोद मॅट्रिकला First Class First आला, आणि तुमची सर्व मुलेही मॅट्रिकला मेरिट मध्ये आली. तुम्ही व तुमच्या मुलांनी शाळेचा लौकिक वाढविला, व शाळेची भरभराट झाली'.

१९५५ साली C. P. & Berar Education Society चा रजत महोत्सव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपन्न होणार होता. त्याकरिता खास रजत महोत्सव पुस्तिका प्रकाशित करावयाची होती. गोपाल प्रिंटींग प्रेसमध्ये त्याचे मुद्रणकार्य चालू होते. पुस्तिका वेळेवर प्रकाशित व्हावी व मुद्रणकार्याला गती यावी म्हणून मुद्रणालयात सकाळपासून सायंकाळपर्यंत बसून तेथल्या तेथे proof reading करण्याची, मजकुराला शीर्षक देण्याची आणि उपयुक्त सूचना करण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. २ डिसेंबर १९५५ चा दिवस होता. माझ्या पत्नीचे गरोदरपणाचे दिवस भरत आले होते. डॉक्टरने तीच तारीख दिली होती. माझे घरी राहणे आवश्यक होते. पण मी माझे कर्तव्य पार पाडण्याकरिता मुद्रणालयात होतो. रात्री ७-५० ला साहित्याचार्य बाळशास्त्री हरदासांचा पुतण्या नाना हरदास मुद्रणालयात सांगायला आला की तुम्हाला मुलगी झाली. मग मी पुढच्या सूचना देऊन घरी आलो. हीच आमची धाकटी मुलगी वृंदा. ह्या रजत महोत्सवात प्रत्येक शिक्षकाला एक चांदीचा पेला भेट देण्यात आला. त्याप्रमाणे मलाही.

१९८१ साली C. P. & Berar Education Society चा सुवर्ण महोत्सव संपन्न झाला. त्यात माजी शिक्षकांचाही शाल देऊन सत्कार करण्यात आला. मलाही एक शाल मिळाली.

हे प्रसंग मी वर्णन केले त्यात आत्मश्लाघेचा मुळीच हेतू नाही. त्यावर मी भाष्यही करीत नाही. आता आत्मचरित्र लिहायला घेतलेच आहे, तर जीवनातील काही प्रमुख घटनांचा सत्याशी ईमान राखून उल्लेख करणे क्रमप्राप्तच आहे. त्यावरून माझा पिंड कसल्या प्रकारचा आहे ते ध्यानात येईल. अधिक सांगणे न लगे.

आता एक जरा वेगळ्या प्रकारचा प्रसंग सांगून हा दहावा मणी मज्जीवनमणिमालेत ओवतो.

माझ्याकडे नागपुर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मॅट्रिकच्या उत्तर पत्रिका तपासायला येऊ लागल्या. एके वर्षी एक जण माझ्याकडे आला. त्याला मी ओळखतही नव्हतो. त्याने मला वाकून नमस्कार केला व माझ्या हाती पेढ्यांचा कागदी डबा ठेवला. मी विचारले, 'हा काय प्रकार आहे? तुला मुलगा झाला काय?'. तो म्हणाला 'नाही सर. मी लुधियानाला लोकरीच्या कारखान्यात नोकरीला आहे. मी मूळचा नागपुरचा. मी यंदा नागपूर बोर्डाच्या १० वी मॅट्रिकच्या परीक्षेला बसलो आहे. माझा मराठीचा पेपर बिघडला सर. पेपर्स तपासायला कोणाकडे गेले याचा पुष्कळ शोध काढला. शेवटी पत्ता लागला की तुमच्याकडे ते आले आहेत. मी जर पास झालो तर मला प्रमोशन मिळेल. माझ्यावर मेहरबानी करा. तुमच्या घरी किती मंडळी आहेत? मी सर्वांसाठी स्वेटर्स पाठवून देईन. माझा रोल नंबर हा आहे सर.'. असे म्हणून तो माझ्या हाती चिठ्ठी देऊ लागला. मी ती चिठ्ठी घेतली नाही आणि पेढ्यांचा डबा परत घेऊन जा असे म्हणालो. 'तुझा मार्ग चुकला आहे. तुझे काम माझ्याच्याने होणार नाही. तू जसा पेपर सोडवला असशील तसाच तुझा निकाल लागेल.' असेही त्याला सांगितले. त्याने मला पुन्हा वाकून नमस्कार केला. मी त्याला पेढ्‌यांचा डबा परत देऊ लागलो. पण त्याने घेतला नाही. 'मी तो तुमच्यासाठीच आणला आहे सर. तो परत नेणे योग्य नाही सर. तुम्ही मला पास करा किंवा नका करू सर. माझे आता काही म्हणणे नाही. तुम्ही एवढ्‌या मोठया योग्यतेचे असाल अशी मला कल्पना नव्हती सर.' असे म्हणून पुन्हा एकवार वाकून नमस्कार करून तो निघून गेला.

_____________________


मणी - ११

नेत्र लागले पैलतीरी


आता माझ्या जीवनग्रंथाची ७७ पाने पूर्ण लिहून झाली आहेत. ७८ व्या पानाचे लेखन चालू आहे. येत्या ऑगस्टच्या २१ तारखेला ७९ व्या पानाचे लेखन सुरू होईल.

आता आमच्या जीवनाची सायंकाळ सुरू झाली आहे. मी थकलो आहे. माझी प्रिय पत्नीही थकली आहे. प्रकृतीच्या विविध तक्रारी सुरू होत आहेत. मला स्पाँडिलायटिस आणि हिला अॅर्थ्रिटिस चा त्रास आहे. गतकाळाची ओझरती ओळख आपणाला करून दिली आहे. भावी काळ आमच्या हाती किती आहे ते आम्हाला माहित नाही. पुढच्या क्षणाला काय होईल याचा भरवसा नाही. ह्या आत्मचरित्रात सगळ्याच घटना सांगितल्या आहेत असाही भाग नाही, आणि ते शक्यही नाही. तशी अपेक्षाही असू नये. ७८ वर्षे म्हणजे ७८ गुणिले ३६५ दिवस. प्रत्येक दिवसाचे घटित काही ना काही तरी असणारच. तेव्हा ते सारे कसे सांगणार? ज्या एका विशिष्ट पद्धतीने व धारणेने मी आयुष्य जगलो, जी मूल्ये उराशी बाळगली, आणि प्रसंगी त्याग करूनही जपली, त्यांना या आत्मचरित्रात सहजगत्याच उठाव मिळालेला असणार. ज्यांनी माझ्यावर संस्कार करून माझ्या जीवनाला आकार व डौल दिला, ज्यांनी मला प्रेम दिले, आदर दिला, ज्यांनी मला जीव लावला, जिव्हाळा दिला, ज्यांनी मला संकटसमयी धीर दिला, सांत्वना दिली, मार्गदर्शन केले, तोल जातांना ज्यांनी मला सावरले, त्यांचा उल्लेख येथे प्रामुख्याने आलेला आहे. त्यांच्या विषयी प्रेम, जिव्हाळा, आदर, कृतज्ञता, श्रद्धा, भक्ती इत्यादि भावही स्वाभाविकतःच प्रकट झाले आहेत.

काही लोकांनी माझे पाय ओढण्याचा प्रयत्न केला, मला निरुत्साह करण्यात धन्यता मानली. तुम्ही आजच्या जमान्याला लायक नाही, माणसाने काळाप्रमाणे वागले पाहिजे अशा प्रकारे मला हिणविण्यातच ज्यांना मोठेपणा वाटला, माझा साधेपणा व प्रामाणिकता यांचा फायदा घेऊन ज्यांनी मला बुद्धिपुरस्सर फसविले व अशा लबाडांचा कैवार घेऊन जे मला कुत्सितपणे हासले, त्या सर्वांचा अनुल्लेखाने परामर्श घेण्याचे मी ठरविले आहे. त्या अवांछित घटनांना व व्यक्तींना या आत्मचरित्रात स्थान देऊन कशाला मी आपल्या मनाला पुनरपी यातना करून घेऊ?

माझे परमपूज्य आई-वडील यांच्याबद्दल माझ्या मनात परम प्रेम, नितांत आदर, अपार कृतज्ञता, निस्सीम श्रद्धा व अकृत्रिम भक्ती वास करीत आहे. त्यांनीच मला पोसले, वाढविले, घडविले. त्यांचा सहवास मला अल्पकाळ लाभला याचे मला जरूर दुःख आहे, पण ज्याप्रमाणे तेजस्वी सौदामिनी क्षणभरी चमकते पण आपल्या तेजाने सारा दिक्प्रांत उजळून टाकते, त्याप्रमाणे माझ्या मातापित्यांनी आपल्या शील चारित्र्याने व सुसंस्कारांनी माझे सारे जीवनच उजळून टाकले यात मला साभिमान आनंद आहे. म्हणून प्रस्तुत आत्मचरित्रात त्यांचा उल्लेख जागोजाग येणे साहजिक आहे. त्यांच्या गुणगौरवपर जी गीते मी रचली त्यात माझ्या अंतःकरणाचा ओलावा मी ओतला आहे. त्यांना माझ्या या आत्मचरित्रात अग्रस्थान आहे, अग्रपूजेचा मान आहे. ती गीते मी येथे उद्धृत केली नसती तर ते माझे आत्मचरित्रच होऊ शकले नसते. माझे तनमनधन माझ्या मातापित्यांनी व्यापले आहे. आणखी कोणत्या शब्दात त्यांच्या विषयीच्या भक्तीभावना व्यक्त करू?

माझी एकुलती एक बहीण दुर्गा हिने माझ्यावर खूप प्रेम केले, लोभ केला, जिव्हाळा दिला. आमच्या घरचा असा एकही प्रसंग झाला नाही की ज्याला आम्ही तिला बोलाविले नाही. काही कारणवश जर ती एखाद्या प्रसंगी येऊ शकली नाही, तर आम्हाला रुखरुख लागायची. तिची तिन्ही मुले, चि. मदन, चि. मोहन, चि. श्याम ही सुशिक्षित, सद्वर्तनी व कर्तबगार निघाली. पहिला मुलगा चि. मदन भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये सिनिअर इंजिनिअर होता. तो मागच्याच वर्षी सेवानिवृत्त झाला. त्याने भोपाळलाच स्वतःचे घर बांधले आहे व तेथेच स्थायिक झाला आहे. दुसरा मुलगा चि. मोहन हा रसायन शास्त्रात M. Sc. असून मध्यप्रदेशातील सनावद येथे जवाहरलाल नेहरू पॉलिटेक्नीक मध्ये प्राध्यापक आहे. तिसरा मुलगा श्याम हा आर्किटेक्ट असून कामठीला स्वतंत्र उद्योग करतो. सौ. दुर्गाला तरुण वयातच दुखण्याने ग्रासले. वयाच्या ६९व्या वर्षी दि. २-१०-१९८६ ला चि. मोहनजवळ सनावद मुक्कामी तिचा दुःखद अंत झाला. तिच्या मृत्यूच्या वेळी आम्ही तेथे राहू शकलो नाही याचे आम्हाला अतिशय दु ख आहे.

माझ्या बहिणीचे यजमान श्री. लक्ष्मणराव माधवराव देशपांडे हे अतिशय प्रेमळ गृहस्थ. ते काही वर्षे नागपुरला व नंतर काही वर्षे कामठीला ट्रेझरीत अकौंटंट होते. ते मागच्याच वर्षी ७-१०-१९९२ ला वयाच्या ८२ व्या वर्षी कामठीला वारले. आम्हाला फार दुःख झाले. त्यांना आमच्या मुलांच्या बुद्धिमत्तेबाबत फार कौतुक वाटायचे. ते घरच्या घरीच पडून त्यांना फ्रॅक्चर झाले. ते कामठीच्या दवाखान्यात भरती असतांना आम्ही चारपाचदा त्यांच्या भेटीला गेलो. प्रमोदचा ग्रंथ इंग्लंड अमेरिकेत प्रसिद्ध झाला असे जेव्हा त्यांना सांगितले, तेव्हा तशाही आसन्नमरण स्थितीत 'त्रिलोकि झेंडा फडकविला.' असे प्रशंसोद्रार त्यांच्या मुखातून बाहेर पडले.

भाऊसाहेबांच्या मृत्यूच्या पंधराव्या दिवशी आम्ही त्यांच्या सर्व मुलांना, सुनांना व नातवंडाना आमच्या घरी जेवायला बोलावले. त्या प्रसंगी स्व. भाऊसाहेबांवर एक शोकगीत रचून व ते स्वतः अवरुद्ध कंठाने वाचून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. माझी एकुलती एक बहीण माझ्यापेक्षा वयाने लहान असताना माझ्या अगोदर काळाने ओढून नेली याचे तर मला दुःख होतेच, पण तिच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनी भाऊसाहेबही गेले आणि एक महत्त्वाचा दुवा निखळला.

आमच्या सर्व मुलींची लग्ने झाली. त्या आपापल्या घरी आहेत. मोठी मुलगी सौ. गीता अकोल्याला आहे. बाकीच्या दोघी नागपुरला आहेत. त्या आमच्या घरी येऊन जाऊन असतात. तीन मुले नोकरीनिमित्त परगावी आहेत. आता घरी आम्ही दोघेच आहोत. अडीअडचणीला मुले परगावी असली तरी धावून येतात.

दुसरा मुलगा चि. विश्राम हा आतापर्यंत नोकरीनिमित्त परगावीच होता. मागच्याच वर्षी तो बदलून नागपुरला आला. बँक आॅफ बडोदा च्या इतवारी शाखेत तो प्रबंधक आहे. तो आपल्या कर्तबगारीने व कर्तव्यपरायणतेने एकापाठी एक बढतीच्या पायऱ्या चढत आज नागपुर सारख्या मोठ्‌या शहरात इतवारी सारख्या मोठ्या शाखेत प्रबंधकाच्या पदावर आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तो अलग राहतो, पण आम्हाला लागणाऱ्या सर्व वस्तू बाजारातून आम्हाला घरपोच आणून देतो.

आमच्या सर्व मुलामुलींच्या मनात आमच्या विषयी प्रेमादराची भावना वसत आहे. आमची सर्व मुले-मुली अत्यंत हुशार व बुद्धिमान आहेत व आपापल्या क्षेत्रात कर्तबगार आहेत.

आम्हीही मुलांच्या प्रगतीच्या आड कधीही आलो नाही. आपल्या स्वार्थासाठी त्यांना नागपुरला अडवून ठेवले नाही. त्यांना प्रगतीचा मार्ग त्यांच्या मनाप्रमाणे चोखाळू दिला. म्हणूनच ती आज एकापेक्षा एक उंच प्रगतीची शिखरे गाठत आहेत. मी शिकवण्या केल्या नाहीत किंवा शिकवणीचे वर्ग काढले नाहीत. स्वत च्या मुलांच्याच शिक्षणाकडे व अभ्यासातील प्रगतीकडे जातीने लक्ष पुरविले. त्याची मधुर फळे आम्ही चाखत आहोत. आम्हालाही काही चिंता, काळज्या, विवंचना, टोचण्या आहेत. पण मुलांच्या प्रगतीच्या आलेखाकडे पाहून त्या विसरण्यास किंवा त्यांची तीव्रतेची धार कमी होण्यास बरीच मदत होते. 'आत्मा वै पुत्र नामासि'. आपण स्वतःच पुत्ररूपाने प्रकट होत असतो. तेव्हा माझ्या या आत्मचरित्राचा बराचसा भाग मुलांच्या प्रगतीच्या व कर्तृत्वाच्या आलेखाने व्यापला असल्यास नवल ते काय?

माझी प्रेमळ पत्नी माझ्या जीवनाचेच अविभाज्य अंग आहे. माझ्या सर्व कार्यात तिची पूर्ण साथ तर मला मिळतेच, पण मार्गदर्शनही लाभते. मी माझे हे आत्मचरित्र लिहिले हे जरी खरे असले तरी ते एक अर्थाने माझ्या पत्नीचेही चरित्र आहे. या चरित्रातला कोणता भाग माझा व कोणता भाग तिचा हे वेगळे करून सांगणे कठिण आहे. इतकी आमची जीवने परस्परात मिसळली आहेत. नदी सागराला मिळाल्यानंतर तिचे अस्तित्व वेगळे शिल्लक उरते काय? तसेच आमचे झाले आहे म्हणा ना! मुलांच्या प्रगतीच्या व उत्कर्षाच्या चढत्या आलेखात आईचाही सिंहाचा वाटा आहे. याची जाण ठेवूनच चि. प्रमोदने आपला इंग्लंड, अमेरिकेत व त्या माध्यमातून संपूर्ण जगात प्रसिद्ध झालेला Pattern Recognition Transforms हा वैज्ञानिक ग्रंथ 'To my parents, who offered me both existence and uniqueness' अशा काव्यपंक्तींनी आम्हा उभयतांना अर्पण केला आहे.

चि. अरुणने मला आत्मचरित्र लिहिण्याचा जो प्रेमळ आग्रह केला तोही याच जाणिवेच्या पोटी हे मी पुरेपूर जाणून आहे.

चि. विश्रामही आम्हाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तू आम्हाला घरपोच आणून देतो, तेही या प्रेमादरापोटीच. चि. सुधीर आमचा सर्वात लहान मुलगा. त्याला Ph. D. मिळाल्याचे घोषित झाले, तेव्हा तो स्वतः नागपुरला येऊन आम्हा दोघांनाही पदवीदान समारंभाला मुंबईला घेऊन गेला. Ph. D. ची पदवी घेतांना आम्ही त्याला डोळे भरून पाहिले. आम्हाला धन्यता वाटली.

माझा विवाह झाला तेव्हा माझे आई-वडील ह्‌यात नव्हते. पण मला सासू-सासरे अत्यंत प्रमळ लाभले. त्यांना मुलगा नव्हता. दोनच मुली. वडील मुलगी माझी पत्नी. दुसरी मुलगी शांता ही साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांची पत्नी. शांताचा विवाह माझ्या लग्नानंतर ९ वर्षांनी १९५० साली झाला. माझ्या अपत्यांपैकी चौघांचा जन्म नागपुरचा तर तिघांचा वणीचा. चार मुलांचा जन्म नागपुरला झाला असला तरी प्रत्येक बाळंतपणाच्या वेळी माझ्या सासूबाई श्रीमती सत्यभामाबाई सास्तीकर नागपुरला आल्या आणि अपत्यांच्या जन्मानंतर दीड महिना तरी नागपुरला राहिल्या. अशा रीतीने त्यांची आम्हाला बरीच मदत झाली. आमच्या घरी महालक्ष्म्यांसारखा मोठा सण असो की कोणता कार्यप्रसंग असो, त्यांची आम्हाला मोठी मोलाची मदत होत असे. आमच्या सर्वच मुलामुलींचे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि हुशारीचे आमच्या सासूबाईंना व आमचे श्वशुर श्री. अण्णाजी सास्तीकर यांना भारीच कौतुक असे. त्यांचे आपल्या नातवंडांवर मोठे प्रेम. साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांना १९६८ साली वयाच्या ५० व्या वर्षी अकाली मृत्यू आला. त्यानंतर माझे सासूसासरे शांताला आसरा असावा म्हणून नागपुरला शांताजवळच येऊन राहिले. ती. स्व. अण्णाजींचा मृत्यू त्यांच्या वयाच्या ९४ व्या वर्षी १९८४ साली झाला. ती. नानीबाईंना ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांची प्रकृती आता यथातथाच असते. चि. प्रमोदला शांतिस्वरूप भटनागर अवॉर्ड मिळाल्याबद्दल १९८८ च्या डिसेंबरात शाळेत व आमच्या घरी झालेल्या सत्कार समारंभाला आणि माझ्या अमृत महोत्सवाला त्या अगत्याने उपस्थित होत्या. तसेच चि. सुधीरच्या विवाह समारंभाला उपस्थित होत्या.

माझ्या पत्नीची लाडकी बहीण शांता हिने बाळशास्त्रींच्या मृत्यूनंतर त्यांचा ग्रंथलेखनाचा वसा अव्याहतपणे पुढे चालविला. तिने परिश्रमपूर्वक अनेक ग्रंथांचे लेखन केले व ते पुण्याचे मामाराव दाते यांनी प्रकाशित केले. साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांचे चरित्र, डॉ. मुंजे यांचे चरित्र, कथाभागवत, गर्गसंहिता, लोकनायक बापूजी अणे यांचे चरित्र, हे त्यापैकी काही ग्रंथ होत. तिचे आपल्या बहिणीवर आणि भाच्यांवर अकृत्रिम प्रेम आहे.

आम्ही दोघेही आता थकत चाललो आहोत. 'नेत्र लागले पैलतीरी' अशी सध्या आमची स्थिती आहे. द्रव्यार्जनाच्या बाबतीत साधनशुचितेला आम्ही महत्त्व दिल्याने आमची प्राप्ती बेताचीच असे. तेव्हा आम्हाला काटकसरीने वागावे लागे. माझ्या पत्नीची मला या बाबतीतही पूर्ण साथ असल्यानेच मी समाधानाने पण मानाने जगू शकलो.

_____________________


मणी - १२

विसावे शतक


माझा जन्म १९१५ सालचा. मला माझ्या जीवनातील पहिली घटना जर कोणती आठवत असेल तर ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या मृत्यूनंतर, दुसऱ्या दिवशी निघालेली प्रचंड मूक शोकयात्रा. १ ऑगस्ट १९२० ला लोकमान्य वारले. लोकमान्य टिळक हे तत्कालीन भारताचे स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी होते. 'तेल्यातांबोळ्यांचे पुढारी' असे त्यांना म्हटले जाई. पण यातच त्यांची थोरवी दडलेली आहे. आधीच्या पुढाऱ्यांप्रमाणे ते केवळ सुशिक्षितांचे व उच्चभ्रु लोकांचे अग्रणी न राहता सर्वसामान्य जनतेचे पुढारी बनले हाते. त्यांचे हितशत्रू त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणत. पण यातच त्यांचा खरा बहुमान आहे. इंग्रजी राज्याविरुद्ध त्यांनी भारतीयांच्या मनात असंतोषाचा वन्ही चेतविला, पेटविला. अशा या थोर पुढाऱ्याचा अंत झाला. सारा देश शोकसागरात बुडाला. नागपुरातही प्रचंड शोकयात्रा निघाली. साऱ्या स्तरातील लोक त्यात सहभागी झाले होते.

मी त्यावेळी पाच वर्षांचा होतो. केळीबाग मार्गावरून ती मिरवणूक गेली. आमच्या वाड्याच्या मागच्या दाराने बाहेर पडले की केळीबाग मार्ग जवळच होता. माझ्या वडिलांनी मला कडेवर घेऊन ती मिरवणूक मला दाखविली. साऱ्या शहरावर शोककळा पसरली होती. एका थोर देशभक्ताच्या मृत्यूने सारे राष्ट्र कसे शोकाकुल होते, हा पहिला खोल संस्कार त्या मिरवणुकीने माझ्या शिशुमनावर उमटविला.

लोकमान्यांच्या मृत्यूनंतर हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे महात्मा गांधींकडे गेली. १९२१ ची काँग्रेस नागपुरलाच भरली. त्या अधिवेशनातही माझे वडील मला घेऊन गेले होते. त्या अधिवेशनातील पांढऱ्या शुभ्र गांधी टोप्या घातलेले कँाग्रेस कार्यकर्त्े व स्वयंसेवक - ते दृश्य मला अजूनही आठवते. मी प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात असताना आम्हाला भाषेच्या क्रमिक पुस्तकात 'जॉर्ज नृपा गावे सद्‌भावे' ही इंग्लंडचे व हिंदुस्थानचे बादशहा पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीपर कविता होती. १९११ साली पंचम जॉर्जने भारतास भेट दिली. दिल्लीला मोठा दरबार भरला. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून १२ डिसेंबरला दरबार डे ची सुटी राहात असे. पण प्राथमिक शाळेतून प्रार्थनेच्या वेळी नागपुरचे प्रसिद्ध कवी श्री. आनंदराव टेकाडे यांचे 'हा हिंददेश माझा' हे देशभक्तीपर गीत म्हटले जात असे.

१९२१ ची असहकािरतेची चळवळ बरीच फोफावली. विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या. वकिलांनी वकिली सोडली. विधानसभेच्या आमदारांनी राजीनामे दिले. नागपुरला टिळक विद्यालयाची स्थापना झाली. श्री. आप्पाजी तिजारे, आचार्य दादा धर्माधिकारी, इत्यादि मंडळींनी टिळक विद्यालय बरेच नावारूपास आणले. आमचे मामा श्री. कृष्णराव कमाविसदार, मावसभाऊ श्री. हरिभाऊ पत्तरकिने आदि मंडळींनी भंडाऱ्यास राष्ट्रीय शाळा काढली. १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत आमचे मामा १२ व्या युद्धमंडळाचे सेक्रेटरी होते. ते त्यावेळी सध्या राजविलास टाॅकीज आहे, त्याच्या जवळच्या श्री. खोलकुटे वकिलांच्या घरी किरायाने राहत असत. त्यांचे चिटणीस पार्कात भाषण झाले. दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या घरून पकडून नेण्यात आले. बराच लोकसमुदाय जमला होता. मीही त्यावेळी तेथे होतो. मामांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली. १९३० च्या चळवळीत माझे मावसभाऊ श्री. हरिभाऊ पत्तरकिने यांनी आपल्या घरी खादीचा कारखाना काढला. मीही तेथून एक खादीची धोतरजोडी विकत घेतली. मी स्वतः खादीच वापरीत असे. माझे दुसरे मावसभाऊ श्री तात्याजी पुराणिक आणि थोरले मामा श्री. यादवराव कमाविसदार यांनाही जंगलचा कायदा तोडल्यामुळे पकडण्यात आले.

सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याचे काँग्रेसने ठरविले. नागपुरलाही सायमन कमिशन येणार होते. आदल्या रात्रभर लोकांची तयारी चालू होती. काळे झेंडे घेऊन सायमन भाग जाव, Simon, go back ह्या घोषणांनी त्यांचे नागपुर स्थानकावर स्वागत होणार होते. काळ्या पताका घेऊन 'सायमन भाग जाव' च्या घोषणा देत मोठी मिरवणूक निघाली. ती लोखंडी पुलाजवळ अडविण्यात आली. अशीच एक मिरवणूक लाहोरला पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निघाली. तिच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. यात लाला लजपतराय जखमी होऊन त्यातच त्यांचा अंत झाला

८ ऑगस्ट १९३० ला १४४ कलम लावले असतांनाही नागपुरला गढवाल दिनाची मिरवणूक निघाली. ती कोतवाली जवळ अडविण्यात आली. मिरवणुकीतील लोक तेथेच ठाण मांडून बसले. रात्री बारा वाजेपर्यंत ते तसेच तेथे बसून होते. नागपुर शहर पाहायला लोटले. आमच्या शाळेजवळच सशस्त्र सैनिकांचा तळ पडला होता. रात्री बारा वाजता १४४ कलमाची मुदत संपली म्हणून मिरवणुकीचा अडथळा काढून घेण्यात आला. नागपुरचे तत्कालीन डी. सी. श्री. त्रिवेदी यांच्या समजूतदारपणामुळे त्या दिवशीचा गोळीबाराचा प्रसंग टळला. परदेशी कापडांच्या दुकानांवर आणि दारूच्या गुत्त्यांवर पिकेटिंग चालू होते. रोज हजारो स्वयंसेवक पकडले जात होते. असा तो झपाटलेला काळ होता. टाउन हॉल, पटवर्धन ग्राउंड, चिटणीस पार्क येथे मोठमोठ्‌या जाहीर सभा होत. मी बहुतेक सभांना जात असे. माझे वडीलही माझ्या बरोबर येत असत. तेही खादी वापरू लागले होते. ह्या अशा वातावरणात मी परकीय सरकारची नोकरी न करण्याचा निश्चय केला.

विसावे शतक हे साऱ्या जगातच क्रांतिकारक ठरले. रशियातील झारशाही नष्ट होऊन कम्युनिस्ट राजवट अस्तित्वात आली. लेनिन, स्टॅलिन, खृश्चेव्ह, गोर्बचेव्ह, येल्तसिन ही स्थित्यंतरे रशियाने व साऱ्या जगाने पाहिली. आणि आता अध्यक्ष आणि रशियन संसद यांच्यातच संघर्ष सुरू झाला आहे.

भारत १९४७ साली स्वतंत्र झाल्यानंतर जगातीत अनेक लहानमोठे देश एकामागून एक स्वतंत्र होत गेले. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींनी लढ्‌याची सुरुवात केली. नंतर कित्येक वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर नेल्सन मंडेलाची सुटका झाली. आता दक्षिण आफ्रिकेतही लोकशाहीच्या स्थापनेची चिन्हे दिसत आहेत.

युनियन ऑफ सोव्हियेत सोशालिस्ट रिपब्लिक (USSR) दुभंगून छोटी छोटी स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली आहेत.

१९१४ च्या महायुद्धानंतर विलग झालेले पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी पुनश्च एक झालेले आहेत.

आतापर्यंत अमेरिका व रशिया ही दोन बलाढ्‌य व समृद्ध राष्ट्रे जगात अस्तित्वात होती. रशियाच्या विघटनानंतर आता अमेरिका हे एकच बलाढ्‌य व समृद्ध राष्ट्र उरले आहे.

सामाजिक क्षेत्रातही विसाव्या शतकात क्रांती घडून आली आहे. आफ्रिकेतील आणि अमेरिकेतील वर्णविद्वेषाची धार बरीच बोथट झाली आहे. भारतातील अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट झाली नसली तरी महात्मा गांधी, सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, इत्यादींच्या अथक प्रयत्नांमुळे व प्रचारामुळे तिचे पूर्वीचे भयानक स्वरूप आता शिल्लक राहिले नाही. सार्वजनिक क्षेत्रात तर ती नष्टप्रायच झाली आहे.

स्त्री शिक्षणाच्या बाबतीतही बराच बदल घडून आला आहे. मी सायन्स कॅालेज मध्ये असताना इंटरमिजिएटच्या वर्गात फक्त तीनच मुली होत्या. B. Sc. च्या वर्गात फक्त एकच मुलगी होती. आता विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या जवळजवळ समान असते. स्त्री शिक्षणाच्या एवढ्या प्रसाराचे श्रेय महर्षी कर्वे यांनाच आहे.

शिक्षणाच्या सर्व शाखात आता मुली आहेत. तसेच नोकरी आणि उद्योगाच्या सर्व क्षेत्रात स्त्रिया दिसून येतात.

आर्थिक क्षेत्रात तर भारतात विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात मोठी क्रांतीच घडून येत आहे. भारताचे नवे आर्थिक धोरण हा मोठा वादाचा विषय झालेला आहे. स्वदेशी मालाला उत्तेजन द्यायचे म्हणून परदेशी मालावर जबर जकात बसविली जात असे. पण आता लंबकाने उलट टोक गाठण्याची चिन्हे दिसत आहेत. परदेशी मालावरील कर कमी करण्यात येत आहेत. खुल्या व्यापाराचा पुरस्कार करण्यात येत आहे. इंग्रज हातात तराजू घेऊन व्यापाराच्या मिषाने भारतात घुसले आणि राज्य बळकावून बसले, ह्या साऱ्या इतिहासकडे डोळेझाक करून देशोदेशी दौरे काढून परकीयांना भारतात भांडवल गुंतविण्यास, कारखाने काढण्यास, व्यापार करण्यास आपले शासन आग्रहपूर्वक निमंत्रण देत आहे. जेथे परदेशी कापडाच्या होळ्या पेटल्या, परदेशी कापडाच्या दुकानासमोर स्त्रियांनी सुद्धा पिकेटिंग केले, कारावास भोगला, पोलीसांच्या दंडुक्यांचा मार सहन केला, परदेशी कापडाने भरलेल्या ट्रकसमोर आडवे पडून बाबू गेनूने आत्मबलिदान केले, तेथेच आता माझी साडी इंपोर्टेड आहे असे सांगण्यात भारतीय नारीला भूषण वाटत आहे. स्वदेशी चळवळ करू नका, केल्यास आमच्या खुल्या आर्थिक धोरणात बाधा निर्माण होईल, परदेशी तंत्रज्ञान आपल्याला मिळणार नाही, असे आपले तथाकथित पुढारी म्हणत आहेत. महात्मा गांधींनी दारुबंदीची केवढी प्रचंड चळवळ उभारली होती! दारूच्या गुत्त्यांवर पिकेटिंग केल्यामुळे हजारो कार्यकर्त्यांना कारावास भोगावा लागला. त्याच देशात आता तथाकथित राजकीय पुढाऱ्यांना दारूच्या दुकानाचे लायसंस देण्यात येत आहेत. रस्तोरस्ती शिक्षण संस्थांच्या शेजारी बीअर बार, डायरेक्टर्स स्पेशल अशी सोज्वळ नावे धारण करून दारूची दुकाने उजळ माथ्याने फिरत आहेत. ही प्रगती की अधोगती? दारू पिणे ही तर उच्चभ्रू लोकांची फॅशन झाली आहे. महात्मा गांधींची सारी चळवळ वाया गेली असे मोठ्‌या खेदाने म्हणावे लागते. परदेशी कर्जाचा डोंगर सारखा वाढतोच आहे. देश कर्जबाजारी झाला आहे. परदेशाकडे तो गहाण टाकण्याचे हे भिकेचे डोहाळे तर नव्हेत ना? एकविसाव्या शतकात प्रवेश करण्याची अशी जोरदार तयारी सुरू आहे.

मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असावे यासाठी जोरदार चळवळ देशात निर्माण झाली होती. पण आता पूर्व माध्यमिक स्तरापासून इंग्रजी माध्यम मुलांना देणे सुरू आहे.

वैज्ञानिक क्षेत्रात तर प्रचंड प्रगती दिसून येते. टेलीव्हीजन आणि मोटरकार आता चैनीच्या वस्तू राहिल्या नसून आवश्यक गरजा झाल्या आहेत. संगणक सर्व कारखान्यातून, कार्यालयातून, रेल्वेच्या आरक्षण कक्षातून जोरात मुसंडी मारत आहेत. चंद्रावर माणूस पोचला आहे. उपग्रह आकाशात सोडले जात आहेत. त्यावरून येणाऱ्या चित्रांवरून हवामानाचे भाकित वर्तविण्यात येत आहे. यंत्रमानवाची कामगिरी तर आश्वर्यकारक आहे. विनाशक शस्त्रांची आगेकूच सुरू आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या स्कूटर्स आणि मोटरगाड्‌यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांचे आयुर्मान घटत आहे, आणि अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

'यंत्र हे शाप की वरदान' ह्या प्रश्नाच्या कक्षा वाढून 'विज्ञान हे शाप की वरदान' असे विस्तृत स्वरूप त्याला प्राप्त होऊ पाहत आहे. पर्यावरणाचा प्रश्न अतिशय भेडसावू लागला आहे. पर्यावरणाचे प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल बिघडू पाहत आहे. हे प्रदूषण थांबले नाही तर जगाच्या नंदनवनाचे स्मशानात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. वैज्ञानिक शोध आणि निसर्ग यांचे अघोषित युद्ध सुरू आहे. विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. माणसाची मानसिकता बिघडल्यामुळे विज्ञानाचा उपयोग निसर्गाच्या रक्षणासाठी न होता भक्षणासाठी होत आहे आणि त्यामुळे या जगाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

मुंबईत शुक्रवार दि. १२ मार्च १९९३ रोजी १३ ठिकाणी झालेले बाँबस्फोट हे माणसाच्या विकृत मानसिकतेचे ज्वलंत उदाहरण आहे. विज्ञान हे शाप कसे ठरू शकते, याचेही ते गमक आहे.

समाजाची मानसिकताच विसाच्या शतकात बिघडत चालली आहे. महात्मा गांधींसारख्या अहिंसेच्या पुजाऱ्याने १२ मार्च १९३० रोजी ऐतिहासिक दांडी यात्रेला प्रस्थान केले. त्याच तारखेला ६३ वर्षांनंतर समाजविध्वंसक दुरात्म्यांनी मुंबईत जीवंत माणसांची होळी पेटविणारे बाँबस्फोट घडवून आणावे हा एक विचित्र योगायोगच म्हणावा लागेल.

पुण्य-पाप, स्वर्ग-नरक ह्या कल्पना लयाला गेल्या. नीतिन्याय उरला नाही. भोगवाद बोकाळला. 'मनःपूतं समाचरेत्' या वचनाचा विकृत अर्थ रूढ होऊ लागला. पूत म्हणजे पवित्र. मनाला जे पवित्र आणि श्रेयस वाटेल ते आचरावे असा या वचनाचा खरा अर्थ. पण मनास येईल तसे स्वैर वागावे, अनियंत्रित वागावे असा विपरीत अर्थ लावण्यात येऊ लागला. साधनशुचिता अव्यवहार्य ठरली. श्रमाची थोरवी ही कल्पना लयाला जाऊन अभ्यासावाचून परीक्षेत यश, गुणवत्तेवाचून महाविद्यालयात प्रवेश, परिश्रमावाचून पैसा, जनसेवेवाचून पुढारीपण, काही कार्य न करता मानसन्मान, त्यागाशिवाय कीर्ति, कशी मिळवता येईल यासाठी बुद्धी खर्च होऊ लागली. त्यातून मग परीक्षेत काॅपी, परीक्षकास लाच, कॅपिटेशन फी, काळा पैसा, काळा पैसा दडविण्यासाठी देवदर्शनास गर्दी व गुप्त पेटीत दान इत्यादि प्रकारास वारेमाप ऊत आला आहे. समाजाच्या सर्व क्षेत्रात भष्टाचार बोकाळत आहे. विद्येचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. अस्सल मागे पडून नक्कल वाढत चालली आहे. परीक्षेत अक्कल कामास न येता शक्कल लाभदायक ठरू लागली आहे. राजकारणात ठगांची व गुंडांची गर्दी वाढत आहे. अध्यात्मात भोंदुगिरी व फसवेगिरी बोकाळत आहे. विद्वत्ता, नीती, शील, चारित्र्य यांचे महत्त्व कमी होऊन पैसा हेच आराध्य दैवत झाले आहे. अर्थार्जनाच्या बाबतीत सारासार विचार बाजूला राहून येनकेन प्रकारेण प्रसंगी दुसऱ्याला लुबाडून, फसवून किंवा खड्ड्यात घालून सुद्धा पैसा मिळविणे यात काहीही गैर वाटेनासे झाले आहे. 'शीलं परं भूषणम्' हे सुभाषित कालबाह्य ठरू पाहत आहे. पैसा हेच मूल्य झाले आहे.

मूल्यात बदल म्हणजे क्रांती अशी साने गुरूजींनी क्रांतीची व्याख्या केली आहे. जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांती हे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. महात्मा गांधींचा साधनशुचितेच्या बाबतीत केवढा कटाक्ष होता! पण ते सारे लयाला जाऊन विसाव्या शतकाच्या या अखेरच्या दशकात विपरीत अर्थाने क्रांती घडून येण्याची चिन्हे दिसत आहेत.

ज्या विसाव्या शतकात स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, विनोबा भावे, पं. जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ ठाकूर, सरदार वल्लभभाई पटेल, बाबू राजेंद्र प्रसाद, यांच्या सारख्या थोर विभूती होऊन गेल्या, त्याच विसाव्या शतकाने जाता जाता अशा दुगाण्या का झाडाव्या तेच कळत नाही.

Every cloud has a silver lining ह्या उक्तीप्रमाणे सध्याच्या तमोमय ढगाळ वातावरणातूनच महापुरुषांनी आपल्या उराशी बाळगलेले चंदेरी स्वप्न साकार होईल, असा आशावाद आपण बाळगू या. 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' हे कविवचन खरे ठरून २१ व्या शतकाची तेजोमय पहाट नजीकच्या भविष्यात पाहायला मिळेल अशी सदिच्छा प्रकट करून ही द्वादश मण्यांची सूत्रबद्ध केलेली मज्जीवनमणिमाला हातावेगळी करतो. हे आत्मचरित्र लेखनाचे अघटित माझ्या हातून घडले. म्हणून अमृतकलश नामक माझ्या भक्तीगीतसंग्रहातील अघटित नामक गवळणीनेच अघटिताची सांगता करीत आहे.

।। अघटित ।।

असं कसं बाई अघटित घडलं । चित्त माझं हरिनं चोरलं ॥धृ॥

काही सुचेना कामधंदा
निशिदिन वाचे हरि गोविंदा
काय करावे असल्या छंदा
प्रेम असं हे विपरित जडलं ॥धृ॥

गोकुळिचा हा अजब कान्हा
मुरलीच्या अति मंजुळ ताना
वेळी अवेळी पडती श्रवणा
देहभान सखे मम हारपलं ॥धृ॥

मयुर पिसांचा शिरी मुकुट तो
वन पुष्पांचा वरि तुरा शोभतो
कदंब शाखेवरती बैसतो
रूप सावळं मम मनी बिंबलं ॥धृ॥

वृंदावनि गे यमुना तीरी
गायी चारी अधरि बासरी
पायी आढी मुरली धारी
ध्यान असं गे मम ह्रदयी ठसलं ॥धृ॥

कटी पितांबर, वरती शेला
कंठी शोभती बकुळी माळा
अलंकार हस्ती चरणि गळा
मोहरून मम मन सखि गेलं ॥धृ॥

पौर्णिमेची रात्र चांदणी
यमुनातीरी वृंदावनी
रास रची तो नटुनी थटुनी
वेडावुन मम मन मग गेलं ॥धृ॥

सोडुनि सारी लज्जा लाज
निमाला द्वैतभावचि आज
हाती हरिच्या हात गुंफुनी
मनसोक्त नाचले शरीर दमलं ॥धृ॥

श्रीकृष्णाचा अवखळ चाळा
लावि मनाला लळा आगळा
द्वैतभाव गळला सगळा
मम रूप कृष्ण स्वरूपि मिळालं ॥धृ॥

आलं आलं हाती आलं
परब्रह्म गे मला गवसलं
काय सांगू, कसं मी सांगू
मम जन्माचं सार्थक झालं ॥धृ॥

_____________________


मणी - १३

पुढचे पाऊल


ह्या तीन वर्षातील काही घटनांचा उल्लेख केल्याशिवाय ह्या जीवनवृत्ताला अद्ययावत स्वरूप प्राप्त होणार नाही.

माझ्या सासूबाईंनी नव्वदी ओलांडली होती. त्या दिवसेंदिवस थकत चालल्या होत्या. १२ ऑगस्ट १९९३ ला रात्री त्यांच्या अंगात ताप भरला. त्यांनी यावेळी जे अंथरूण धरले ते कायमचेच. प्रकृती उत्तरोत्तर क्षीण होत गेली. उठणे बसणे मुश्किल झाले. वैद्यकीय उपचार सुरूच होते. पण उत्तरोत्तर त्यांनाही त्या दाद देईनाश्या झाल्या. अशा स्थितीत ६ महिने त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेरीस १२ फेब्रुवारी १९९४ चा दिवस उजाडला. त्याच दिवशी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

माझ्यावर व माझ्या मुलामुलींवर, सुनांवर, जावयांवर आणि नातवंडांवर त्यांची अतिशय माया होती. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ पिढीतील एक अत्यंत मायाळू, प्रेमळ आणि सच्चरित व्यक्तिमत्व हरपले. आम्हा सर्वांनाच अतिशय शोक आणि दु ख झाले हे सांगणे न लगे. योगायोगाची गोष्ट अशी की माझे श्वशुर स्व. मुरलीधरपंत सास्तीकर हे १९८४ साली वयाच्या ९४ व्या वर्षी वारले आणि माझ्या सासुबाई देखील तदनंतर १० वर्षांनी १९९४ साली वयाच्या ९४ व्या वर्षीच वारल्या. दोघांनाही समान आयुष्य लाभले.

माझा ज्येष्ठ मुलगा चि. प्रमोद ह्याचा एक वैज्ञानिक ग्रंथ इंग्लंड व अमेरिकेत प्रसिद्ध झाला. त्यानिमित्त प्रमोदच्या ५० व्या वाढदिवसाचे निमित्त साधून आम्ही आमच्या घरी एक मोठा स्वागत समारंभ आयोजित केला होता. इंग्लंड मधील Research Studies Press ने हा ग्रंथ प्रकाशित केला होता. त्याच संस्थेच्या प्रमुखांनी ह्या वर्षी प्रमोदला 'पुन्हा आपण दुसरा ग्रंथ लिहा, आम्ही तो प्रसिद्ध करू' असे पत्र पाठविले. प्रमोदने त्यांना आपले Proposal पाठविले व त्यांनी ते मान्यही केले. ह्या दुसऱ्या ग्रंथाचे लेखनकार्य प्रमोदने सुरू केले आहे. त्याची थोरली मुलगी चि. वैशाली यंदा आंध्रप्रदेशच्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी मॅट्रिकच्या परीक्षेत ९०% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिने पुढील शिक्षणाकरिता सिकंदराबादच्या St. Francis' College मध्ये प्रवेश घेतला आहे.

कु. वैशालीचा धाकटा भाऊ चि. कौस्तुभ हा सहाव्या वर्गाच्या वार्षिक परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सातव्या वर्गात गेला आहे.

माझी ज्येष्ठ कन्या चि. सौ. गीता हिची मुलगी कु. मृदुला ही यंदा अमरावती माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वी मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत ६४. ८३% गुण मिळवून उत्तीर्ण झाली. तिचा मुलगा चि. अमोल हा १० वी मॅट्रिकच्या परीक्षेत ८२% गुण मिळवून प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला. तिचा धाकटा मुलगा चि. विशाल हा १० वी मॅट्रिकच्या परीक्षेत द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला.

माझा दुसरा मुलगा चि. विश्राम हा बँक ऑफ बडोदाच्या गोवा राज्यातील मडगाव शाखेत आहे. त्याचा मोठा मुलगा चि. अभिजीत हा Mechanical Engineering च्या Final Year ला आहे. दुसरा मुलगा चि. पराग हा बारावी मॅट्रिकच्या परीक्षेत ७८% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. त्याने आता रामदेवबाबा इंजिनीअरिंग कॅालेजमध्ये Mining Engineering ला प्रवेश घेतला आहे. चि. विश्रामची आता १९९६ च्या सुरुवातीला पुण्याला बदली झाली असून त्याच्याकडे शाखांच्या तपासणीचे काम आहे.

माझी दुसरी मुलगी चि. विजया हिचा पहिला मुलगा चि. आशुतोष हा यंदा १० वी मॅट्रिकच्या परीक्षेला ६५% गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला व दुसरा मुलगा चि. श्रीनिवास हा सातवीत गेला आहे.

माझा तिसरा मुलगा चि. अरुण हा मुंबई आय. आय. टी. त Chemical Engineering चा प्रोफेसर असून त्याची मोठी मुलगी चि. शरयू अतिशय बुद्धिमान असून तिने यंदा वार्षिक परीक्षेत १००% गुण मिळवून माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला आहे. त्याची दुसरी मुलगी चि. मंजिरी यंदापासूनच शाळेत जाऊ लागली आहे.

माझी कनिष्ठ कन्या चि. सौ. वृंदा हिची मुलगी चि. जयश्री व मुलगा चि. ऋषिकेश हे दाघेही बुद्धिमान असून अनुक्रमे अकरावीत व सातवीत गेले आहेत. चि. जयश्रीने १९९६ च्या दहावी मॅट्रिकच्या परीक्षेत ८०.५% गुण प्राप्त केले. तिला चार विषयात प्राविण्ये आहेत.

माझा धाकटा मुलगा चि. सुधीर हा मुंबई आय. आय. टी. तून Ph. D. प्राप्त करून तेथेच Senior Research Engineer आहे असे मागे सांगितले आहे. त्याने दिल्लीच्या SGS Thomson Micro Electronics ह्या कंपनीत अर्ज केला. तेथे त्याचा फेब्रुवारी १९९४ मध्ये साक्षात्कार होऊन त्याला घेण्यात आले. तो त्या कंपनीत १५ मार्च १९९४ ला रुजू झाला. त्यावेळी कंपनीचे कार्यालय नवी दिलीच्या नेहरू प्लेस मध्ये International Trade Tower मध्ये होते. म्हणून चि. सुधीरने नवी दिल्लीत किरायाने घर घेतले होते. मी सपत्नीक माझे जावई श्री. आमोदराव देव व कन्या सौ. वृंदा यांच्यासह चि. सुधीरकडे ५ जून १९९४ ला गेलो आणि तेथे २५ दिवस राहून विमानाने नागपुरला परत आलो. माझे जावई व मुलगी २-३ दिवस दिल्लीला राहून तेथून कुलू मनाली व सिमला पाहून नागपुरला परत आले होते. त्यावेळी सुधीरने आम्हा सर्वांना त्याच्या कंपनीचे कार्यालय दाखविले. ही कंपनी इटली व फ्रांस यांच्या सहकार्याने चालणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तेथे काँप्युटरच्या मेमरीत आवश्यक असलेले भाग तयार करण्यात येतात. सुधीर तेथे प्रोजेक्ट लीडर या पदावर कार्यरत आहे.

आम्ही दिल्लीला गेलो त्यावेळेस कंपनीची स्वतःच्या मालकीची तीन मजली नवीन इमारत तयार होत होती. आम्ही ती त्या अवस्थेत पाहून आलो होतो. बांधकाम संपूर्ण झाल्यावर कंपनीचे कार्यालय तेथे स्थलांतरित झाले. प्रस्तुत इमारतीचे एकंदर बांधकाम अतिशय सुरेख असून ती वातानुकूलित आहे. तेथून यमुनेचे पात्र दिसते. वरच्या गच्चीवरून सभोवतालचे दृश्य अति मनोरम दिसते. ही इमारत नवी दिल्लीहून जवळ असलेल्या 'नोइडा' ह्या नवीन वृद्धींगत होत असलेल्या शहरात बांधण्यात आली आहे. नोइडातील इमारती, घरे व रस्तेही छान आहेत. कंपनीचे कार्यालय नोइडात गेल्यामुळे सुधीरनेही नोइडातच घर घेतले होते.

आम्ही उभयता ८ एप्रिल १९९५ ला नागपुरहून निघून दि. ९ एप्रिल रामनवमीच्या दिवशी सकाळी नवी दिल्लीला पोचलो. सुधीर आम्हाला घ््यायला आला होता. आम्ही तेधून टॅक्सीने त्याच्या नोइडातील घरी गेलो. या मुक्कामात आम्ही महात्मा गांधींची राजघाट येथील समाधी, पं. नेहरू यांची शांतिवन येथील समाधी, इंदिरा गांधी, लालबहादुर शास्त्री यांच्या समाध्या इत्यादि थोर राजकीय स्मारकांचे दर्शन घेऊन आलो. आम्ही नोइडाहून दि. २ मे १९९५ ला निघून ३ मे १९९५ ला नागपुरला परतलो. सुधीरकडे सध्या कंपनीची प्रयोगशाळा सर्व आवश्यक उपकरणांनी व साधन सामग्रीने सुसज्ज करण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्याकरिता त्याला आवश्यक ती खरेदी करण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.

कंपनीचे मुख्य कार्यालय इटलीत आहे. कंपनीने सुधीरला इटलीला पाठविण्याचे ठरविले. तो दि. १०-६-९५ ला विमानाने दिल्लीहून स्वीत्झर्लंड मधील झुरिच या शहरी गेला व तेथून इटलीतील मिलॅन या सुप्रसिद्ध शहरी गेला. तेथून तो कंपनीच्या कारने Jolly Touring Hotel मध्ये गेला. तेथेच त्याची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कंपनीचे मुख्य कार्यालय Agrate या शहरात आहे. दोन दिवस हॉटेलात राहून तिसऱ्या दिवसापासून कंपनीच्या कारने त्याला रोज Agrate येथील कंपनीच्या कार्यालयात जावे लागले. कार्यालयात सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी विचारविनिमय, तेथील प्रयोगशाळेचे निरीक्षण, नोइडातील प्रयोगशाळेसाठी १९९५ या वर्षात काय काय साधनसामुग्री विकत घ््यायची या संबंधी बोलणी इत्यादि कामे झाली. सायंकाळी त्याला कंपनीची कार मिलॅन मधल्या हॉटेलात आणून सोडत असे. एक दिवस सुधीर आपल्या सहकाऱ्यांसोबत इटलीतील व्हेनिस हे बेटांचे सुंदर शहर पाहून आला. मिलॅनहून व्हेनिसला जाणे-येणे त्याने आगगाडीने केले. कंपनीने सोपविलेली सर्व कामे आटोपून दि. १९-६-९५ ला तो विमानाने दिल्लीला परत आला.

चि. सुधीरची पत्नी सौ. कविता तिच्या माहेरी मध्यप्रदेशातील भिलई या औद्योगिक शहरी दवाखान्यात शनिवार, आषाढ कृष्ण तृतीया दि. १५ जुलै १९९५ ला सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी प्रसूत होऊन तिला मुलगी झाली. आम्हाला नात झाली. एक आनंददायक घटना. आमच्या घरी तिचे दि. ७ सप्टेंबर ९५ ला बारसे होऊन 'अंजली' हे नाव ठेवण्यात आले. दि १५ जानेवारी १९९६ ला चि. सुधीर बंगलोरच्या Cypress Semiconductors [I] Pvt. Ltd. ह्या संगणकाच्या मेमरीतील साहित्य बनविणाऱ्या अमेरीकन कंपनीत Design Engineer च्या पदावर रुजू झाला. दि. १४ जुलै ९६ ला चि. अंजलीचा वाढदिवस बंगलोरला साजरा झाला. मी गेलो होतो.

Cypress या कंपनीने चि. सुधीरची बदली आपल्या अमेरिकेतील मिसिसिपी स्टेटमधील Stark Ville येथील शाखेत केली आहे. तो बहुधा जुलै १९९७ मध्ये अमेरिकेत जाऊन तेथे रूजू होईल.

अशा प्रकारे मी आणि माझ्या सर्व मुलामुलींनी विद्याध्ययन व अध्यापन क्षेत्रात नावलौकिक कमावला आहे. प्रमोदला त्याच्या संशोधनाप्रीत्यर्थ आंतराष्ट्रीय ख्यातीचा 'शांतिस्वरूप भटनागर' पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचा एक ग्रंथ इंग्लंड आणि अमेरिकेत प्रसिद्ध झाला आहे. दुसरा प्रकाशनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अरुणने हवेतून प्राणवायू वेगळा करण्याचे अत्यंत उपयुक्त यंत्र तयार केले आहे. तो प्रतिवर्षी ३-४ दा Piping Engineering Course चे आयोजन करतो. भारतातील व परदेशातील अनेक विद्यार्थी शिकायला येतात. प्रमोद आणि अरुण ह्या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली अनेकांनी Ph. D. पदवी प्राप्त केली आहे. ते दोघेही Ph. D. विद्यार्थ्यांचे परीक्षक असतात. प्रमोदने आपला पहिला वैज्ञानिक ग्रंथ आम्हाला अर्पण केला आहे. माझा एक विद्यार्थी डॉ. विजय पांढरीपांडे, प्राध्यापक, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद याने आपली स्वलिखित कादंबरी 'जो तो पथ चुकलेला' ही मला गुरुदक्षिणा म्हणून ऋणनिर्देशपूर्वक सादर अर्पण केली आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे आमची तिसरी पिढी - आमचे नातू व नाती देखील - बुद्धीमान व साक्षेपी असून कुलकीर्तीत मोलाची भर घालतील अशी पदचिन्हे दिसत आहेत.

आमच्या चारही सुना पदवीधर असून विद्याविनयसंपन्न आहेत. प्रत्येकीच्या अंगी काही ना काही तरी कला आहे. पहिली स्नुषा सौ. मंदा ही चित्रकला व रंगकाम यात प्रवीण आहे. ती विवाहापूर्वी शिक्षिका होती. तिच्या आई देखील शिक्षिका होत्या. तिचे वडील धारवाडच्या महाविद्यालयात प्राध्यापक होते. दुसरी स्नुषा सौ. वीणा ही सुद्धा मुलामुलींच्या शिकवण्या करते. ती शिवणकाम, विणकाम, भरतकाम यात प्रवीण आहे. तिच्या आई देखील सेवासदन हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. आता सेवानिवृत्त झाल्या आहेत. माझ्या तिसऱ्या सुनेने (सौ. सरिता) देखील विवाहापूर्वी काही मुलींना शिकविले आहे. विवाहाच्या वेळी ती रसायनशास्त्रात M. Sc. होतीच, पण विवाहानंतर 'काॅम्प्युटर सायंस' चा पदव्युत्तर डिप्लोमाही प्राप्त केला आणि मुंबई आय. आय. टी. त एका प्रोजेक्टवरही काम केले. चौथी स्नुषा कविता ही विवाहापूर्वी M. Sc. आणि B. Ed. होती. विवाहानंतर मुंबईच्या चेंबूरमधील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात प्राध्यापिका होती. चि. सुधीर दिल्लीला गेल्यावर तेथेही तिने एक कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिकेचे काम केले. सौ. सरिता व सौ. कविता ह्या दोघीही शिवणकाम, विणकाम, भरतकाम, चित्रकला यांत प्रवीण आहेत. सर्वच जणी गृहकार्यात दक्ष असून अंगात काही ना काही कला बाळगून आहेत, परिश्रमी आहेत, सुशील आहेत आणि निगर्वी आहेत. माझ्या धर्मपत्नीने आपल्या आचरणाने व कृतीने सर्व मुलामुलींवर व सुनांवर जे सुसंस्कार केले आणि आपल्या सर्व अपत्यांना विद्यार्जनाच्या कार्यात जे प्रोत्साहन व उत्तेजन दिले त्याचेच हे फलित होय. यापेक्षा जीवन साफल्याचे दुसरे समाधान ते काय असणार?

शील व चारित्र्यावर माझा सतत भर राहिला आहे. ते नसेल तर विद्वत्ता, पांडित्य, संपत्ती, बल, सत्ता, अधिकार सर्व कवडीमोल आहेत असे मी मानतो व त्याप्रमाणेच वागतो.

माझी पत्नी सौ. प्रमिला हिने तारखेनुसार १४ जुलै १९९५ ला व तिथीनुसार आषाढ वद्य नवमीला आपल्या वयाची ७० वर्षे पूर्ण करून ७१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. माझ्या ज्येष्ठ मुलाने व मुलीने वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मी तिथीनुसार श्रावण शुद्ध एकादशी व तारखेनुसार २१ ऑगस्ट १९९५ ला वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सहस्रचंद्रदर्शन सोहळा माझी प्रतीक्षा करीत आहे

माझा 'अमृतकलश' नामक भक्तीगीत संग्रह व 'मज्जीवनमणिमाला' नामक आत्मचरित्र ही दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. ती माझ्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या सुमुहूर्तावर प्रसिद्ध होतील.

१९९५ सालचे वैशिष्ट्य असे की ते माझे ८१ व्या वर्षात पदार्पण करण्याचे वर्ष आहे. तसेच ते माझ्या धर्मपत्नीचे ७१ व्या वर्षात पदार्पण करण्याचे वर्ष आहे. एवढेच नव्हे तर माझ्या दृष्टीने अधिक महत्वाचे म्हणजे माझ्या आईचे ते जन्मशताब्दी वर्ष आहे आणि वडीलांचे १२१ व्या जन्मसंवत्सरीचे वर्ष आहे. हे चारही समारंभ रविवारच्या सुटीच्या सोईने दि. २० ऑगस्ट, १९९५ ला एकसमयावच्छेदेकरुन संपन्न झाले. सकाळी धार्मिक विधी झाला. दुपारी ५० लोक भोजनाला व संध्याकळी ५० लोक फराळाला होते. दि. १० मार्च १९९६ ला ती. सौ. आईची जन्मशताब्दी स्वतंत्ररीत्या साजरी करण्यात आली.

C. P. & Berar High School च्या ७१-७२ च्या बॅचने त्यांच्या रजत महोत्सवाप्रीत्यर्थ दि. २५ नोव्हेंबर १९९५ ला एक समारंभ आयोजित केला. समारंभाचे अध्यक्ष संस्कृतचे गाढे विद्वान, ख्यातनाम वक्ते व साहित्यिक डॉ. मधुकर आष्टीकर यांच्या हस्ते माझा वस्त्र, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

दि. १४ ऑगस्ट १९९६ ला माझी द्वितीय कन्या चि. विजया हिची C. P. & Berar High School and Junior College, Ravi Nagar, Nagpur येथे मराठीची पूर्णकालीन कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापिका या पदावर नेमणूक करण्यात येऊन पदोन्नती देण्यात आली.

वयोमानापरत्वे आता माझे शरीर थकत चालले आहे. पण मनाची उभारी कायम आहे. शरीर थकत चालले यात विषाद मानण्यासारखे काही नाही. ती निसर्गाची प्रक्रिया आहे. तो आपले कार्य करील. त्यात भीती किंवा खेद वाटण्यासारखे काहीच नाही. जन्म, बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व ह्या नैसर्गिक अवस्थांच्या पुढचीच मृत्यू ही अवस्था आहे. काही नियत काळासाठी आपण या जगात आलो. परमेश्वराच्या मनात असेल तोपर्यंत सुखसमाधानाने जगावे एवढेच फक्त आपल्या हाती आहे. मरण म्हणजे स्वगृही परत जाणे, निजधामाला जाणे. 'याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा' ह्या संतवाणीप्रमाणे आपले आचरण असले म्हणजे मग मरणाची काय तमा?

माझ्या गतजीवनाचे मी जेव्हा सिंहावलोकन करतो तेव्हा माझ्या अंगी पूर्ण समाधान बाणते. मला कशाचाही पश्चात्ताप होत नाही. मी कोणाचा द्वेष केला नाही. कोणाचेही वाईट चिंतिले नाही. आपल्या स्वार्थासाठी कोणाचाही घात केला नाही. हे सात्विक समाधान मला आहे. मला परमेश्वराने माझी योग्यता नसतांना बरेच काही दिले. आयुष्यही वाजवीपेक्षा जास्त दिले. काही अडचणी आल्या, संकटे झाली. पण ती सर्व परमेश्वर कृपेने निवारण झाली. 'सदा सर्वदा देव सन्नीध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे' या श्री समर्थ रामदास स्वामींच्या वचनाचा मला पदोपदी प्रत्यय येतो.

तेव्हा आता मला असेच म्हणावे लागते की 'बा मृत्यो! तुला जेव्हा वाटेल तेव्हा ये. तुझ्या स्वागतासाठी मी सिद्ध आहे.'. आता माझे पुढचे पाऊल मृत्यूच्या दारीच. मज्जीवनमणिमालेचा जप येथेच संपवितो.

।। इति मज्जीवनमणिमाला समाप्ता ।।

_____________________


अनुक्रमणिकेकडे

मणी - ७

अन्य कन्या-पुत्रांची शैक्षणिक प्रगती


इकडे चि. गीता १० वी मॅट्रिकला १९६१ साली प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिने शेजारच्या बिंझाणी महिला महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिलाही भारत सरकारची दरमहा १०० रु. ची शिष्यवृत्ती मिळाली. ती प्रथम वर्षात असतांना स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी निमित्त 'असे होते स्वामी विवेकानंद' या विषयावर आंतरविश्वविद्यालयीन निबंधस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चि. गीताने स्वलिखित निबंध पाठविला होता. तिचा प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला. मुंबईला आझाद मैदानावर मोठा सभामंडप उभारून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली बक्षिस समारंभ आयोजित करण्यात आला होता. जन्मशताब्दी महोत्सव समिती कडून चि. गीताला उपस्थित राहण्याचे निमंत्रण आले होते. मी गीताला घेऊन मुंबईला गेलो. स्वामी विवेकानंदांचे अनेक ग्रंथ तिला पारितोषिकादाखल मिळाले. हाही आमच्या जीवनातील अत्यानंदाचा एक प्रसंग.

१९६२ साली गीता प्री-युनिव्हर्सिटी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. १९६५ साली ती बी. ए. झाली. तिने बी. ए. ला मराठी, तत्त्वज्ञान आणि
मानसशास्त्र हे विषय घेतले होते. गीताने नागपुर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर विभागातून मराठीत एम. ए. केले. तिला डॉ. शं. दा. पेंडसे, प्रा. भ. श्री. पंडित, डाॅ. प्रभूदेसाई, डॉ. द. भि. कुळकर्णी, डॉ. बाबगावकर यांच्यासारखे प्रथितयश प्राध्यापक लाभले होते. ती बी. ए. ला असतांना १९६५ साली बी. ए. समकक्ष विदर्भ साहित्य संघाच्या साहित्य स्नातक परीक्षेला बसली होती. तीत तिचा प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक आला. तन्निमित्त तिला श्रीमंत वेळेकर पारितोषिक मिळाले. १९६७ साली एम. ए. ला असतांना विदर्भ साहित्य संघाच्या एम. ए. समकक्ष साहित्य पारंगत परीक्षेला बसली व प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकावर आली. तत्प्रीत्यर्थ तिला विदर्भ साहित्य संघाकडून सुवर्णपदक प्राप्त झाले. एम. ए. ला असतांना दोन वर्षे तिला किंग एडवर्ड मेमोरियल स्कॉलरशिप मिळत होती. एम. ए. च्या परीक्षेत ती १९६७ साली नागपुर विद्यापीठातून गुणानुक्रमे दुसरी होती. तदनंतर ती एक वर्ष ब्रह्मपुरीच्या नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात आणि सात वर्षे तुमसरला गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजमध्ये मराठीची प्राध्यापिका होती.

शुक्रवार, वैशाख वद्य द्वादशी, शके १८९७, दि. ६ जून १९७५ ला तिचा विवाह गोंदियाच्या I. T. I. मध्ये Instructor असलेल्या श्री. मुकुंद गोपाळ पाटखेडकर यांच्याशी, सेवासदन, सीताबर्डी, नागपुर येथे संपन्न झाला. तिला मृदुला नामक मुलगी आणि अमोल आणि विशाल ही दोन मुले आहेत. ती सध्या अकोल्याला असते. तेथे त्यांचे स्वतःचे घर आहे.

इकडे विश्रामची आगेकूच सुरू होती. १९५८ साली तो प्राथमिक प्रमाणपत्र परीक्षेत नागपुर झोनमधून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण  C. P. & Berar Education Society च्या प्राथमिक शाळेतच झाले, आणि नंतर १० वी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षणही C. P. & Berar High School मध्ये झाले. शालेय जीवनात त्याने एके वर्षी शिरोळे वक्तृत्व स्पर्धेत इंग्रजी व मराठी दोन्ही स्पर्धात प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळवली. वक्तृत्व, वादविवाद, गीतापाठांतर, निबंधलेखन इत्यादि स्पर्धात अनेक पारितोषिके पटकाविली. १९६४ साली तो दहावी मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत सोळाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. नंतर त्याने शासकीय विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९६८ साली B. Sc. व १९७० साली भौतिकशास्त्रात M. Sc. झाला. नंतर तो एक वर्ष दादासाहेब धनवटे नगर महाविद्यालयात हायस्कूल शिक्षक होता. दुसऱ्या वर्षी त्याला बँक ऑफ बडोदात नोकरी लागली. नंतर अकोला, अमरावती, माजरी मसला, जळगाव, नंदूरबार ह्या ठिकाणी बदल्या झाल्या. त्याने बँकेच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. सध्या तो नागपुरच्या इतवारी शाखेत प्रबंधक आहे. त्याला मॅट्रिकनंतरची भारत सरकारची दरमहा १०० रु. ची शिष्यवृत्ती मिळत होती. अल्पावधीतच नागपुरसारख्या मोठया शहरातील इतवारीसारख्या मोठ्‌या शाखेत प्रबंधकाच्या उच्च पदापर्यंत पोहोचायला विश्रामची कर्तबगारी आणि कर्तव्यपरायणताच कारणीभूत आहे.

चि. विजया C. P. & Berar Education Society च्या प्राथमिक शाळेतून १९६१ मध्ये प्राथमिक चौथा वर्ग उत्तीर्ण झाली, आणि C. P. & Berar Education Society High School मध्ये तिने पाचव्या वर्गात प्रवेश घेतला. ती १९६७ साली प्रथम श्रेणीत दहावी मॅट्रिक झाली. तिला शासकीय गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली. १९७१ साली ती नागपुर महाविद्यालयातून B. A. ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. B. A. ला तिला आवश्यक मराठी विषयात नागपुर विद्यापीठातून सर्वाधिक गुण होते. तत्प्रीत्यर्थ तिला दीक्षांत समारंभात धोटे सुवर्णपदक बहाल करण्यात आले. १९७३ मध्ये ती नागपुर महाविद्यालयातूनच M. A. परीक्षा उत्तीर्ण झाली. नागपुरच्या शिक्षण महाविद्यालयातून ती B. Ed. ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिने आपल्या विद्यार्थी जीवनात वक्तृत्व, वादविवाद, पाठांतर, निबंधलेखन स्पर्धात अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. ती १९७७ साली C. P. & Berar High School, Mahal येथे शिक्षिका म्हणून रुजू झाली. सध्या ती C. P. & Berar Junior College मध्ये मराठीची प्राध्यापिका आहे.

चि. विजयाचा विवाह महाराष्ट्र शासनाच्या दूध योजनेत कार्यरत असलेले श्री. बळवंत कृष्णराव पारखी यांचेशी शुक्रवार, मार्गशीर्ष वद्य सप्तमी, दि. २२ डिसेंबर १९७८ रोजी गोपालकृष्ण मंगल कार्यालय, मा. ग. चिटणवीस वाडा, चिटणवीसपुरा, नागपुर येथे संपन्न झाला. तिला आशुतोष व श्रीनिवास नामक दोन मुले आहेत.

चि. अरुण श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींच्या शाळेतून चौथ्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाला. नंतर त्याने C. P. & Berar High School मध्ये पाचव्या वर्गात प्रवेश घेतला. १९६९ साली दहावी मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत बाराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला विभागीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे मराठीत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल १०० रु. चे पारितोषिक मिळाले. नंतर तो शासकीय विज्ञान महाविद्यालयातून १९७० साली Pre-University परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. नागपूरच्या Laxminarayana Institute of Technology मधून त्याने B. Tech. (Chemical Engineering)
ही पदवी प्रथम श्रेणीत चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. नंतर आय. आय. टी. कानपुर मधून त्याने M. Tech. व Ph. D. ह्या पदव्या प्राप्त केल्या. तो प्रथम रुडकी विश्वविद्यालयात केमिकल इंजिनियरिंगचा अधिव्याख्याता होता. नंतर आय. आय. टी. मुंबईत आता प्रोफेसर असून Computer Aided Design Centre चेही काम पाहतो. त्याचे अनेक शोधप्रबंध भारतातील व परदेशातील नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत. अनेक रसायन कारखान्यांचा तो सल्लागार आहे. अनेक ठिकाणी त्याची व्याख्याने झाली आहेत. त्याचे एक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

त्याने विद्यार्थी जीवनात वक्तृत्व, वादविवाद, निबंधलेखन, पाठांतर, अंत्याक्षरी स्पर्धात अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. नागपुरच्या काटोल रोडवरील तिडके विद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. कन्नमवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजिलेल्या वक्तृत्व स्पर्धेत लागोपाठ तीन वर्षे प्रथम क्रमांकाचे ५१ रु. चे पारितोषिक प्राप्त करून त्याने हॅटट्रिक साधली आहे. अरुणला मॅट्रिकनंतर B. Tech. होईपर्यत १०० रु. ची गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळत होती.

चि. वृंदाने १९६१ साली श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींच्या शाळेत प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथून ती १९६५ साली प्राथमिक चौथ्या वर्गाची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. श्री. दादासाहेब धनवटे नगर महाविद्यालयात तिने नवव्या वर्गात प्रवेश घेतला. अकराव्या वर्गापर्यंत तिला स्कॉलरशिप मिळाली. ती १९७२ साली इंग्रजी माध्यम घेऊन संयुक्त  मराठी-संस्कृत या विषयासहित अकरावी मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिला भारत सरकारची दरमहा १०० रु. ची मेरीट स्कॉलरशिप M. Sc. पर्यंत होती. श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींच्या शाळेत तिचे नाव आदर्श विद्यार्थिनी म्हणून लिहिले आहे. मॅट्रिक पास झाल्यावर वृंदाने शासकीय विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९७५ साली ती B. Sc. परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. भौतिक शास्त्र, गणित आणि सांख्यिकी हे तिचे B. Sc. चे विषय होते. १९७७ मध्ये ती नागपुर विद्यापीठाची M. Sc. (Statistics) परीक्षा प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. हा पुन्हा आमच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा प्रसंग. १९७७-७८ या वर्षात ती अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात सांख्यिकी या विषयाची प्राध्यापिका होती. त्यानंतर तिला Indian Bureau of Mines (IBM) मध्ये नोकरी मिळाली. आताही ती तेथेच कार्यरत आहे. IBM मध्ये असतांनाच १९८३ मध्ये तिने Statistics मध्ये M. Phil. ची परीक्षा प्रथम श्रेणीत मेरीट मध्ये उत्तीर्ण केली.

चि. वृंदानेही आपल्या शालेय जीवनात वक्तृत्व, निबंधलेखन, पाठांतर इत्यादि स्पर्धात पारितोषिके मिळविली आहेत. गीता मंदिरातर्फे गीता जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या गीता पाठांतर स्पर्धेत तिला नागपुरातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले होते. या स्पर्धेत १००० च्या वर विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता हे विशेष.

चि. वृंदाचा विवाह गुरुवार, आषाढ शुद्ध दशमी, दि. ५ जुलै १९७९ ला श्री. आमोद चिंतामणराव देव यांचेशी भगिनी मंडळ, सीताबर्डी, नागपुर येथे संपन्न झाला. ते सध्या नागपुरला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धरमपेठ शाखेत ऑफिसर आहेत. त्यांना जयश्री व ऋषिकेश ही दोन मुले आहेत. त्यांचे उत्तर अंबाझरी मार्गावर नागपुरला घर आहे.

चि. सुधीरने १९६७ साली C. P. & Berar प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. १९७१ मध्ये तो प्राथमिक चौथ्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाला. नंतर त्याने C. P. & Berar High School मध्ये पाचव्या वर्गात प्रवेश घेतला. दरवर्षी त्याचा वर्गातून प्रथम क्रमांक ठरलेला असे. त्याने वक्तृत्व, वादविवाद, निबंधलेखन व पाठांतर स्पर्धात अनेक पारितोषिके मिळविली. १९७७ साली तो दहावी मॅट्रिकची परीक्षा प्रथम श्रेणीत २८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. हिस्लाॅप काॅलेज मधून त्याने बारावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. त्याला इंजिनियरिंग कॉलेज मध्ये Electronics घ््यायचे होते. पण त्यावेळी नागपुरच्या V. R. C. E. मध्ये ती सोय नव्हती. म्हणून त्याने अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे पहिल्या वर्षी तो पहिल्या पाच क्रमांकात उत्तीर्ण झाला. म्हणून दुसऱ्या वर्षी त्याला पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. तेथे तो १९८३ साली B. E. (Electronics & Telecommunications) परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला दहावी मॅट्रिकनंतर B. E. होईपर्यंत भारत सरकारची दरमहा १०० रु. ची गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळत होती.

M. E. साठी त्याने रुडकी विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. तेथून तो १९८५ साली M. E. परीक्षा प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्या निमित्त त्याला रुडकी विश्वविद्यालयाचे सुवर्णपदक प्राप्त झाले.

नंतर सुधीरने आय. आय. टी. मुंबई येथे Ph. D. करिता प्रवेश घेतला. डॉ. जे. वासी आणि डॉ. ए. एन. चांदोरकर हे त्याचे मार्गदर्शक होते. मुंबई आय. आय. टी. च्या २९ मे १९९२ ला झालेल्या पदवीदान समारंभात चि. सुधीरला Ph. D. पदवी बहाल करण्यात आली. डॉ. गोविंद स्वरुप, Director, National Institute of Radio Astrophysics हे प्रमुख अतिथी होते. त्यांचे सुरेख भाषण झाले. ह्या समारंभाकरिता आम्ही दोघेही मुंबईला गेलो होतो व पदवीदान समारंभाला उपस्थित होतो. तो आमच्या जीवनातील आणखी एक संस्मरणीय प्रसंग.

दि. १२ जून, १९९२ ला आमच्या विवाहाला ५१ वर्षे पूर्ण झाली. चि. अरुणने तो दिवस मुंबईच्या आपल्या घरी साजरा केला. त्याच दिवशी सायंकाळी दीक्षांत समारंभाच्या वेळी ज्या भावभावनांचा कल्लोळ माझ्या मनात उसळला, त्याचा काव्यात्मक आविष्कार मी चि. सुधीरला सप्रेम भेट दिला. सध्या तो मुंबई आय. आय. टी. त Research Engineer आहे. तो काव्यात्मक आविष्कार येथे प्रस्तुत करणे अप्रस्तुत ठरणार नाही.

अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन त्रिवार तुझे राजू! असो आजी
पीएच. डी. तुज आज लाभली तू जिंकलीस बाजी
मानाचा तू तुरा खोविला स्वशिरी आज सुधीर
तुझ्या यशाने धन्य जाहले कुल अपुले मोहरीर ।।१।।

भावांमध्ये ही उच्च उपाधी प्राप्तकर्ता तू तिसरा
प्रथम हिरा, दुसरा माणिक, इंद्रनीळ मणि तू तिसरा
आई-बापच आम्ही ठरलो, हर्ष न मावे आज उरी
मात-पित्यांची अन् बंधू-भगिनींची इच्छा झाली आज पुरी ।।२।।

नागपूर अन् पुण्यनगरी, रुडकी आणिक मुंबापुरी
उज्वल यश तू मिळविलेस बा उपर्युक्त सर्व नगरी
नागपुरी गुणवत्ता यादी, सुवर्णपदक रुडकीला
आय. आय. टी. ने मुंबईच्या तुज पी. एच. डी. चा मान दिला ।।३।।

शिक्षण जरि तुझे पुरे जाहले रूढार्थाने आज तरी
खऱ्या अर्थी विचार करता माणुस छात्र जन्मभरी
एकाहून एक उंच शिखरे गाठावी प्रगतीची व्यासंगे
आशीर्वाद शुभ हाच आमुचा शुभेच्छा हीच मनि रंगे ।।४।।

मातृभूमी भारत अपुली अभ्युदयार्थ तिच्या झटावे
वैज्ञानिक अनुसंधाने अपुल्या उन्यत्यर्थ तिच्या झिजावे
विज्ञान हे शस्त्र दुधारी, विनाशकारी अन् सुखकारी
मानवतेचे कल्याण असावे सदासर्वदा दृष्टिसमोरी ।।५।।

आपण मागच्या प्रकरणात प्रमोदची M. Sc. पर्यंतची शैक्षणिक प्रगती पाहिली आणि त्यानंतर अन्य कन्या-पुत्रांच्या शैक्षणिक प्रगतीकडे वळलो. आता पुनश्च प्रमोदच्या पुढील शैक्षणिक प्रगतीचे सूत्र हाती घेऊन त्याच्या नेत्रदीपक प्रगतीचे अवलोकन करू.

_____________________


मणी - ८

पुनश्च प्रमोद आणि मुलांचे विवाह


आपण प्रमोदची शैक्षणिक प्रगती M. Sc. पर्यंत पाहिली. नंतर त्याला तेथेच सोडून त्याच्या धाकट्या भावंडांकडे वळलो आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख पाहिला. आमचा पहिलाच मुलगा मॅट्रिकला बोर्डातून प्रथम श्रेणीत सर्वप्रथम आल्यामुळे नंतरच्या मुलामुलींना तो एक आदर्शच ठरला व आपणही त्याच्या पावलावर पाऊल टाकून तसेच स्पृहणीय यश प्राप्त करावे अशी त्यांच्या मनात जिद्द उत्पन्न झाली. आपापल्या परीने त्यांनी कसोशीने प्रयत्न करून कसा उच्चांक गाठला ते आपण पाहिले. आता पुनश्च प्रमोदकडे वळू या.

प्रमोदने मुंबईच्या I. I. T. त M. Tech. करावयाचे ठरविले. त्याने तेथे अर्ज केला. लेखी चाचणी, साक्षात्कार (Interview) आदि सोपस्कार झाले. त्याला प्रवेशही मिळाला. Television हे Elective त्याला मिळाले. डॉ. सप्रिकिन हे रशियन गृहस्थ आणि डॉ. मुरगेसन हे मार्गदर्शक होते. त्या अवधीत त्याचे काही लेख भारतातील व परदेशातील वैज्ञानिक व तांत्रिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले.

M. Tech. करण्याकरिता प्रमोद मुंबईला जायला निघाला तेव्हा आम्ही दोघे त्याच्या सर्व धाकट्या भावंडांना घेऊन त्याला निरोप द्यायला नागपुर स्थानकावर गेलो. त्यावेळी सर्वात धाकटा चि. सुधीर तीन वर्षाचा होता.
अग्निरथाने शिटी दिली तेव्हा आमच्या दोघांच्याही नेत्रातून अश्रू टिपकू लागले. प्रमोदने ते पाहिले. तेव्हा तो मला म्हणाला, 'बाबा रडू नका. मी जन्मलो, तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला, म्हणून तुम्ही माझे नाव प्रमोद ठेवले असे तुम्हीच मला सांगत आलात. तुम्ही भगवद्गीतेचा अभ्यास करीत होता, म्हणून माझ्या धाकट्या बहिणीचे नाव तुम्ही गीता ठेवले. मग आता अश्रू आवरा. मला प्रेमाने व आनंदाने निरोप द्या'. मी त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. अग्निरथ चालू झाला. त्याने वेग घेतला. तो दिसेनासा होईपर्यंत आम्ही फलाटावरच हाताचा पंजा हालवीत उभे होतो. शेवटी जड अंतःकरणाने घराकडे वळलो.

१९६६ साली प्रमोद M. Tech. झाला. डॉ. सप्रिकिन प्रमोदला एक अतिशय बुद्धिमान व संशोधक प्रवृत्तीचा विद्यार्थी म्हणून फार चाहत असत. १९६६ ते १९७१ पर्यंत प्रमोद कानपुर आय. आय. टी. त Ph. D. चा विद्यार्थी होता. १९७१ मध्ये त्याने Electrical Engineering मध्ये Ph. D. प्राप्त केली. डॉ. बी. प्रसाद आणि डॉ. के. आर. शर्मा हे त्याचे मार्गदर्शक होते. १९७०-७१ या कालावधीत प्रमोद कानपुर आय. आय. टी. त Senior Research Assistant होता. १९७१-७२ साली तो पिलानी येथे Birla Institute of Technology and Science (BITS) मध्ये अधिव्याख्याता होता. १९७२ मध्ये रुडकी विश्वविद्यालयात Research Associate होता. १९७२ ते १९७६ बंगलोरच्या Institute of Science मध्ये अधिव्याख्याता, १९७६-७७ मध्ये मुंबई आय. आय. टी. त असिस्टंट प्रोफेसर, १९७७-१९८९ मध्ये रुडकी विश्वविद्यालयात रीडर आणि प्रोफेसर, १९८९-९१ मध्ये हैद्राबादच्या National Geophysical Research Institute मध्ये Visiting Scientist होता. मे १९९२ मध्ये त्याची Scientist-F म्हणून निवड झाली आणि तेव्हापासून तो NGRI चा Deputy Director आहे. प्रमोदला १९७४ साली सर जगदीशचंद्र बोस अवॉर्ड, १९८५ मध्ये एस. के. मित्रा अवॉर्ड आणि १९८७ पर्यंतच्या संशोधन कार्याप्रीत्यर्थ सोमवार दि. १७ ऑक्टोबर १९८८ ला दुपारी अकरा वाजता तत्कालीन पंतप्रधान माननीय श्री. राजीव गांधी यांच्या हस्ते दिल्लीच्या विज्ञान भवनात डॉ. शांतीस्वरूप भटनागर अवॉर्ड भूगर्भशास्त्रात बहाल करण्यात आला. आम्ही सर्वांनी हा समारंभ दूरदर्शनवर बघितला. तो आमच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण होता. पन्नास हजार रुपये रोख, CSIR चे विजयचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक असे पारितोषिकाचे स्वरूप होते. प्रमोद C. P. & Berar Education Society च्या  प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिक्षण घेऊन १९५८ च्या शालांत परीक्षेत सर्वप्रथम आला होता. तेव्हा त्याने हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा भटनागर अवॉर्ड प्राप्त करणे हे C. P. & Berar Education Society ला भूषणावह होते. म्हणून सोसायटीने ३० डिसेंबर १९८८ ला एक समारंभ आयोजित करून त्याचा सत्कार केला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी Institute of Science च्या Director श्रीमती सपकाळ होत्या. याचेच पूर्वीचे नाव शासकीय विज्ञान महाविद्यालय. येथूनच प्रमोद M. Sc. झाला होता. ह्या समारंभाला शाळेचे सर्व शिक्षक, प्रमोदला ज्यांनी शिकविले ते शाळेचे माजी अध्यापक, आमच्या शाळेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, निमंत्रित सज्जन आणि मॅट्रिकचे विद्यार्थी उपस्थित होते. सोसायटीचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब पाध्ये हेही व्यासपीठावर होते. आम्हा दोघांनाही आणि प्रमोदची पत्नी सौ. मंदा हिलाही व्यासपीठावर स्थान देण्यात आले. आम्हा सर्वांचाच पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमोदला संस्कृत भाषेतील गौरवाभिनंदन पत्रही अध्यक्षांच्या हस्ते देण्यात आले. श्रीमती सपकाळ, बाबासाहेब पाध्ये आणि मुख्याध्यापक यांची समयोचित भाषणे झाली. प्रमोदचेही भाषण झाले. डॉ. प्रबोध देशमुख यांनी विज्ञानाची प्रगती कशी होत गेली याच्या स्लाईड्‌स दाखविल्या. अल्पाहाराचा कार्यक्रम होऊन हा समारंभ संपला.

दुसऱ्या दिवशी ३१ डिसेंबर १९८८ ला आमच्या राहत्या घरी आमचे नातेवाईक, चि. प्रमोदची मित्रमंडळी आणि गुरुजन यांच्या उपस्थितीत आम्ही एक सत्कार समारंभ आयोजित केला. तत्प्रसंगी चि. प्रमोदच्या भटनागर पारितोषिक प्राप्तीप्रीत्यर्थ मी एक गौरवगीत मराठीत आणि एक इंग्रजीत स्वतः रचले होते. ही दोन्ही गीते मंडळींनी वाचली. नागपुर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर विभागाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे चि. प्रमोदचा एका स्वतंत्र समारंभात सत्कार करण्यात आला. आम्हालाही त्या विभागाचे प्रमुख डॉ. बी. टी. देशमुख यांनी आमंत्रित केले होते. त्यांनी आमचाही पुष्पहार घालून सत्कार केला.

प्रमोदला देण्यात आलेले गौरवाभिनंदन पत्र तसेच मी रचलेले गौरवगीत असे

।। श्री ।।
।। न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।।

सी. पी. अॅण्ड बेरार एज्युकेशन सोसायटी, नागपुर द्वारा
डॉ. प्रमोद सदाशिव मोहरीर, महोदयाय
प्रदीयमानम्
गौरवाभिनन्दनपत्रम्

अयि मेधाविन्,

अस्माकं शिक्षासंस्थायां शालान्त - परीक्षां यावत् अध्ययन कुर्वाणः भवान् तस्यां परीक्षायां विदर्भ विभागे सर्वप्रथम स्थानम् अधिगम्य अस्मान् सर्वान् एव महान्तं प्रमोदम् अन्वभावयत् । परं अद्य राष्ट्रे विज्ञानक्षेत्रे सेवां कुर्वाणः भवान् भुविज्ञाने अनितरसाधारणं वैदुष्यं प्रकट्य वर्षेऽस्मिन् भारत शासनस्य डॉ. शांतिस्वरूप भटनागर पारितोषिकं ससम्मानं प्राप्तवान् इति

अस्माकं कृते अतिशयं प्रमोदम् आवहति । विज्ञानक्षेत्रे सर्वोच्चं इमं सम्मानं उपलक्ष्य वयं भवतः सादरं गौरवाभिनन्दनम् कुर्मः। परमेशः उत्तरोत्तरं समधिक सम्मानावसरं भवते उपहरतु इतिच हृदयेन अभिलषामः ।

वयं स्मो भवदीयाः

सु. त्रि. वेरूळकर
मुख्याध्यापक
सी. पी. अॅण्ड बेरार हायस्कूल
महाल, नागपुरम्

शंकरराव पाध्ये
अध्यक्षः
सी. पी. अॅण्ड बेरार एज्युकेशन
सोसायटी, नागपुरम्

शुक्रवासरः दि. ३० डिसेंबर १९८८


गौरवगीत

शांतिस्वरूप भटनागर हा पुरस्कार तुजला
दिनांक सतरा ऑक्टोबरला प्राप्त असे झाला
पंतप्रधान राजिवजींनी अपुल्या हस्ते दिल्लीत
विज्ञानाच्या भवनी दिधला पुरस्कार जगविख्यात ।।१।।

जगदंबेच्या नवरात्रोत्सवि तिथी सप्तमीला
सरस्वतीचे पूजन होते मंगल त्या दिवसाला
सोमवासरी एकोत्तरदश वादन शुभ समयाला
सरस्वतीने प्रसन्न होऊनी वरदहस्त शिरी धरिला ।।२।।

विज्ञानाच्या क्षेत्रातील ह्या सबंध भारतामधल्या
परमोच्च पुरस्कार प्राप्तिचा प्रमोद मानकरी ठरला
धवलोज्ज्वल ह्या तुझ्या यशाने मुदित मने धाली
तपस्या तव ती अतीव खडतर लेणे साफल्याचे ल्याली ।।३।।

कीर्ती तुजला प्राप्त जाहली विज्ञानाच्या क्षेत्रात
शास्त्रज्ञांच्या माळेमधला झालास मणि दीप्तिमंत
उंचउंच प्रगतीची शिखरे एकाहून एक सरस
आक्रमिशील तू अपुल्या जीवनि नुरे संशय मनि शेष ।।४।।

सुयशोध्वज हा तुझा प्रमोदा उंच उंच फडके
विमल कीर्ती तव सुदूर भूवर दाही दिशा झळके
तुझ्या यशाने कृतार्थ झालो आज आम्ही दोघे
शास्त्रज्ञप्रसु आम्ही ठरलो भाव मनी जागे ।।५।।

प्रस्तुत यश हे ठरेल नांदी भावि यशाची उज्ज्वलशा
जागृत झाल्या आशा मनिच्या भाव भावना आकांक्षा
विज्ञानाच्या क्षितिजावरचा तेजोमय तू होशिल तारा
आम्ही राहू वा ना राहू होइल अमुचा बोल खरा ।।६।।

अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन प्रमोद त्रिवार तुझे
बोस, मित्रा अन् भटनागर पुरस्कार प्राप्त तुज जे
कुशाग्र बुद्धी अन् चिकाटी अप्रतिहत परिश्रम
त्रिवेणि संगम, वदे सदाशिव, प्रस्तुत यश तत्परिणाम ।।७।।

(शनिवार, दिनांक ३१-१०-१९८८)
स. मो. मोहरीर

१९८५- ८६ ह्या वर्षात विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रमोदची नॅशनल लेक्चरर म्हणून नियुक्ती केली. त्या वर्षात भारतातल्या अनेक विद्यापीठात, वैज्ञानिक व तांत्रिक संस्थांत आणि महाविद्यालयात त्याची व्याख्याने झाली.

प्रमोदचे दीडशेच्या वर शोधप्रबंध भारतातील आणि परदेशातील वैज्ञानिक आणि तांत्रिक नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.

भटनागर अवॉर्ड मिळाल्यानंतर हैदराबादच्या National Geophysical Research Institute ने प्रमोदला Visiting Scientist म्हणून बोलावून घेतले. आता मे १९९२ मध्ये त्याची Scientist-F म्हणून निवड झाली असून तेव्हापासून तो NGRI चा  Deputy Director आहे.

इंग्लंड मधील Research Studies Press आणि अमेरिकेतील John Wiley and Sons या ग्रंथप्रकाशन संस्थांनी प्रमोदचा Pattern Recognition Transforms हा ३०३ पृष्ठांचा ग्रंथ १९९२ मध्ये प्रकाशित केला. Bradford University चे डॉ. बावरान यानी प्रमोदला हा ग्रंथ लिहिण्याविषयी सुचविले. प्रमोदला ग्रंथ लेखनाविषयी बरेच परिश्रम करावे लागले. John Wiley and Sons च्या उत्तर व दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, न्यूझीलंड आणि युरोप, सिंगापूर इ. ठिकाणी जगभर शाखा आहेत. त्यांच्याद्वारे प्रमोदचा ग्रंथ संपूर्ण जगभर
प्रसिद्ध झाला आहे. ह्या घटनेने आम्हाला अतिशय आनंद झाला आहे हे काय सांगायला हवे?

'विज्ञानाच्या क्षितिजावरचा तेजोमय तू होशिल तारा
आम्ही राहू वा ना राहू होइल अमुचा बोल खरा '

हे मी चि. प्रमोदच्या भटनागर अवॉर्ड प्राप्तीप्रीत्यर्थ आमच्या घरी आयोजिलेल्या सत्कारप्रसंगी उत्स्फूर्तपणे काढलेले काव्योद्गार सार्थ ठरण्याची ही पदचिन्हेच होत असे म्हणावयास हरकत नाही.

चि. प्रमोदच्या ह्या ग्रंथाची सुरुवात ऋग्वेदातील ऋचेने झाली आहे. 'To my parents who offered me both existence and uniqueness' ह्या शब्दांनी त्याने तो आम्हाला समर्पण केला आहे.

चि. प्रमोदच्या वयाच्या पन्नासाव्या सुवर्णमहोत्सवी वर्षात त्याचा विज्ञानावरील ग्रंथ सर्व जगभर प्रसिद्ध झाला हे येथे विशेषत्वाने सांगावयास हवे. त्याच्या ह्या उज्वल यशानिमित्त आम्ही आपल्या घरी त्याच्या
मित्रांचा, चाहत्यांचा आणि नातेवाईकांचा मेळावा दि. १४ जानेवारी १९९३ रोजी सायंकाळी आयोजित केला होता. सर्व निमंत्रितांचे सहभोजनही आमच्या घरी झाले. त्या प्रसंगाच्या अनुषंगाने माझ्या मनात भावभावनांचे जे कल्लोळ उठले त्यांचा काव्यमय आविष्कार मी प्रमोदला सप्रेम भेट दिला. तो आविष्कार इंग्रजीत होता. तो जसाच्या तसा खाली उद्धृत करीत आहे.

Publication of your book 'Pattern Recognition Transforms'
By Research Studies Press and John Wiley and Sons
And through them in the Whole Universe
Made my mind overflow with joy immense

This joyful event in the year of 50th birth anniversary
Made me much more happy and merry
It exalted my life's meaningful glory
And helped minimise pinching worry

When I met you at our residence
My joy then knew no bounds
I embraced you with inner urge
Tears in eyes and satisfaction on face writ large

I could not help but celebrate your glorious success
To give vent to my powerful feelings
Heartiest thanks to you, Manda and your mother
And all others who helped enhance function's grandeur

May this new year bring you many more happy returns
May you come out victorious with flying colours
May you become a scientist of worldwide repute
We shall sing sweet songs on our mind's flute

Council for Scientific and Industrial Research (CSIR) च्या महानिदेशकांनी प्रमोदची बंगलोरच्या Centre for Mathematical Modelling and Computer Simulation या संस्थेत Senior Associate म्हणून नेमणूक केली आहे. त्यासाठी त्याला वर्षातून एकदा किमान एक महिना तरी बंगलोरला जावे लागते.

Who's Who in Electronics हा ग्रंथ सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला. त्यात प्रमोदची शैक्षणिक पात्रता, संशोधन कार्य, प्रसिद्ध झालेले शोधप्रबंध, इत्यादि माहिती छायाचित्रांसहित समाविष्ट आहे.

CSIR ने नुकताच एक ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. Bhatnagar Laureates हे त्या ग्रंथाचे नाव आहे. त्यात १९५८ ते १९९१ पर्यंत भटनागर अवॉर्ड प्राप्त झालेल्या २५९ पारितोषिक विजेत्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, शैक्षणिक योग्यता, भूषविलेली पदे, संशोधन कार्य, प्रसिद्ध झालेले शोधप्रबंध, इत्यादि माहिती छायाचित्रांसहित समाविष्ट आहे.

चि. प्रमोदचा विवाह धारवाडच्या महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक असलेले श्री. श्रीधरराव कोल्हटकर आणि सौ. उषाताई कोल्हटकर यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. मंदाकिनी हिचेशी बंगलोर मुक्कामी शुक्रवार, आषाढ शुक्ल द्वितीया दि. २१ जून १९७४ ला सकाळी ११ वाजता संपन्न झाला. ती B. Sc. असून त्यानंतर तिने कर्नाटक सरकारचा Government Diploma in Arts हा पाच वर्षांचा ड्रॉइंग आणि पेंटिंगचा कोर्स केला आहे. त्यांना वैशाली नामक कन्या आणि कौस्तुभ नामक पुत्र आहे.

सौ. मंदाचे वडील ती तीन वर्षांची असतांनाच आणि आई दि. ४ नोव्हेंबर १९९२ ला हैदराबादला चि. प्रमोदच्या घरी एक महिन्याच्या आजाराने वारल्या.

चि. विश्रामचा विवाह नागपुरला रेल्वेच्या ऑफिसमध्ये नोकरी असलेले श्री. मनोहरराव टिकेकर आणि सौ. शीलाताई टिकेकर यांची तृतीय कन्या चि. सौ. वीणा हिचेशी दि. २४ जानेवारी १९७६ ला जोशी मंगल कार्यालय, धरमपेठ, नागपुर येथे झाला. लग्नानंतर तिचे नाव परिमल ठेवण्यात आले. ती B. Sc. असून शिवणकाम, विणकाम, भरतकाम यात प्रवीण आहे. त्यांना अभिजित आणि पराग ही दोन मुले आहेत.

चि. अरुणचा विवाह भिलईच्या पोलाद कारखान्यात डेप्युटी मॅनेजर असलेले श्री. रत्नाकरराव केळकर आणि सौ. विजयाताई केळकर यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. सरिता हिचेशी जोशी मंगल कार्यालय, धरमपेठ, नागपुर येथे १६ नोव्हेंबर १९८४ ला संपन्न झाला. ती रसायनशास्त्रात M. Sc. (प्रथम श्रेणी) असून तिने कॉम्प्युटर सायन्स ची स्नातकोत्तर पदविकाही घेतली आहे. ती चित्रकला, रंगकाम, शिवणकाम, विणकाम आणि भरतकाम यात निपुण आहे. त्यांना शरयू आणि मंजिरी नामक दोन कन्या आहेत.

चि. सुधीरचा विवाह भिलईच्या पोलाद कारखान्यात डेप्युटी मॅनेजर असलेले व आता सेवानिवृत्त झालेले श्री. रत्नाकरराव केळकर आणि सौ. विजयाताई केळकर यांची द्वितीय कन्या चि. सौ. कविता हिचेशी दि. २० जून १९९१ ला केळकर मंगल कार्यालय, नागपुर येथे संपन्न झाला. ती  M. Sc. (रसायन शास्त्र) आणि B. Ed. (दोन्ही परीक्षा प्रथम श्रेणीत) असून शिवणकाम, विणकाम आणि भरतकाम यात निपुण आहे. ती चेंबूरच्या स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापिका  आहे.

त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस २० जून १९९२ ला मुंबईला संपन्न झाला. त्यावेळी आम्ही दोघेही तेथे उपस्थित होतो. त्यांना अंजली नामक मुलगी आहे.

अशा रीतीने आमची सर्व मुले व मुली सुविद्य, बुद्धिमान व सद्गुणी आहेत. सुनाही चांगल्या लाभल्या आहेत. त्यांच्या या उज्ज्वल यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

आमच्या जीवनात सर्व आनंदच आनंद आहे असा गैरसमज मात्र करून घेण्याचे कारण नाही.

आम्हालाही दुःखे आहेत, काळज्या आहेत, विवंचना आहेत, टोचण्या आहेत. पण मुलांच्या यशोदुंदुभीने त्यांची तीव्रता कमी होण्यास बरीच मदत होते.

_____________________


मणी - ९

प्रवास


प्रमोद  १९७२ ते १९७६ बंगलोरच्या Indian Institute of Science मध्ये अधिव्याख्याता होता. आम्ही दोघे चि. गीता व चि. विश्रामसह १९७३ च्या दिवाळीत चि. प्रमोदकडे बंगलोरला गेलो होतो. बंगलोरवरून बसने म्हैसूरचे वृंदावन गार्डन, आर्ट गॅलरी, राजवाडा पाहिला. नंदी हिल्स, च्यामुंडा हिल्स पाहिल्या. तेथील देवळांची समोरची गोपुरे फार सुरेख असून त्यावरील शिल्प चित्तवेधक आहे. बंगलोर हे सर्व दृष्टींनी फार मोठे शहर असून तेथील हवामान फार चांगले आहे. तेथील उद्याने सुरेख असून एकुण शहरच हिरवे आहे.

बंगलोरवरून आम्ही रामेश्वर व कन्याकुमारीला गेलो. रामेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तेथे आम्ही समुद्रस्नान केले. तेधून लंकेपर्यंत श्रीरामाने सेतू बांधला होता. म्हणून या तीर्थाला सेतूबंध रामेश्वर म्हणतात. नंतर १५ विहीरींच्या जलाने स्नान करून रामेश्वराला अभिषेक केला आणि प्रयागहून आणलेली गंगा अर्पण केली. तेथून बसने कन्याकुमारीला गेलो. कन्याकुमारीला तीन समुद्रांचे मीलन पाहिले. तेथे पवित्र स्नान करून कन्याकुमारी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. स्वामी विवेकानंदांनी शिकागोला जाण्यापूर्वी ज्या प्रचंड शिलाखंडावर बसून ध्यानधारणा केली त्या ठिकाणी स्वामीजींचे प्रचंड मंदिर बांधण्यात आले आहे. स्वामीजींचे दर्शन घेतले. तेथील शांत पवित्र वातावरणाने आम्ही अत्यंत प्रभावित झालो. कन्याकुमारीहून आगगाडीने सालेमला आलो व तेथून बसने बंगलोरला परतलो. हाच आमचा पहिला लांबचा प्रवास.

१९७४ मध्ये पुन्हा बंगलोरला प्रमोदच्या लग्नासाठी जाण्याचा योग आला. त्यावेळी सर्व मुलांना सोबत घेऊन गेलो होतो. प्रमोदच्या लग्नाची मेजवानी केळीबाग मंदिरात दिली. जेवायला बुंदीचा लाडू व जिलबी ही पक्वान्ने होती.

नंतर सर्व मुला-मुलींचे विवाह नागपुरला झाले. १९६७ साली चि. गीता M. A. झाली. तेव्हापासून तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले. तिचा M. A. ला नागपुर विद्यापीठातून द्वितीय क्रमांक होता. त्यात पुन्हा प्राध्यापिका. मनाजोगा वर मिळेना. एखादे स्थळ पसंत पडले तर तिकडून होकार येईना. आम्हाला तीन मुली. १९७९ मध्ये चि. वृंदाचा विवाह झाला. १९६७ ते १९७९ हे पूर्ण तप वरसंशोधन नावाच्या तपश्चर्येत व्यतीत झाले. ती तपश्वर्या नव्हे तर काय? मुलाकडून नकार आला की मनस्ताप व्हायचा, संताप व्हायचा. पण पुन्हा मुखावर हास्य आणून वरसंशोधनासाठी मोहिमेवर निघायचे. बापाला मुलीच्या लग्नाची काळजीच नाही. मुलगी प्रोफेसर आहे. तिचा पगार घरात येतो. मग कशाला बाप काळजी करील? अशी लोकांची खवचट बोलणी ऐकून घ््यायची. 'लोक तो ओक जाणावा' असे श्री. समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे ते खरेच अगदी तंतोतंत खरे आहे, याची साक्षात प्रचीती यायची. शमदमादी अष्टांग योगाच्या पायऱ्या क्रमाक्रमाने चढत मनोनिग्रह करून निर्विकार मनाने पुन्हा वरसंशोधनाकरिता प्रस्थान ठेवायचे. होकार मिळणार की नकार याची मुळीच पर्वा न करता. फलाशा विरहित कर्म करण्याची भगवान श्रीकृष्ण प्रणीत योगाची दीक्षाच होती ती.

२१ ऑगस्ट १९७५ ला माझ्या वयाला ६० वर्षे पूर्ण झाली. तेव्हाच मी सेवानिवृत्त व्हायचा. पण ते वर्ष पूर्ण करण्याची मला परवानगी मिळाली. मी ३१ मार्च १९७६ ला सेवानिवृत्त झालो. माझा शाळेतर्फे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तिथीनुसार श्रावण शुक्ल एकादशी दि. १७ ऑगस्ट १९७५ ला माझा षष्ट्यब्दिपूर्ती समारंभ मुलांनी साजरा केला. प्रमोद व मंदा बंगलोरहून आली. विश्राम अकोल्याहून आला. अरुण कानपुरहून आला आणि सौ. गीता आपल्या पतीसह गोंदियाहून आली. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण चारही दिशांहून मुले आली. यावेळी प्रमोद व गीता यांचे विवाह झाले होते. मी बराचसा काळजीतून मुक्त झालो होतो. श्री. हरिभाऊ महावादीवार यांनी पौरोहित्य करून आमच्याकडून षष्ट्यब्दीपूर्तीचा पुण्याहवाचनादि धार्मिक विधी करवून घेतला. सर्व नातेवाईक आणि निकटवर्ती परिचित उपस्थित होते.

२४ जानेवारी १९७६ ला विश्रामचा विवाह झाला. ३१ मार्च १९७६ ला मी नोकरीतून मुक्त झालो. प्रमोद व विश्रामचे विवाह आटोपून ते नोकरीला लागले होते. अरुण B. Tech. होऊन कानपुर आय. आय. टी. त M. Tech. करीत होता. विजयाचे शिक्षण आटोपले होते. वृंदा B. Sc. करून M. Sc. करीत होती. सर्वात धाकटा सुधीरही १० वी मॅट्रिकला गेला होता. एकूण जीवनाला बरेच स्थैर्य लाभले होते.

२२ डिसेंबर १९७८ ला विजयाचा आणि ५ जुलै १९७९ ला वृंदाचा विवाह झाला आणि आम्ही आपल्या जबाबदारीतून मुक्त झालो. बारा वर्षांची खडतर तपश्चर्या फळाला आली. चि. सुधीरही १२ वी मॅट्रिक झाला.

२६ मे १९७९ ला प्रमोदला बंगलोर मुक्कामी मुलगी झाली. तिचे नाव वैशाली ठेवण्यात आले. चि. वृंदाच्या लग्नाला सौ. मंदा सव्वा महिन्याची बाळंतीण आली होती. चि. प्रमोद रुडकीहून आला होता. नागपुरहून मग प्रमोद मंदाला व तान्ह्या मुलीला घेऊन रुडकीला गेला.

१९८० ला आम्ही दोघे प्रमोदकडे रुडकीला गेलो. रुडकी विश्वविद्यालयाचा परिसर फार मोठा आहे. रुडकीचे इंजिनीअरिंग कॉलेज हे इंग्रजी कारकिर्दीत सुरू झालेले भारतातील पहिले इंजिनीअरिंग कॉलेज. रुडकीहून हिमालयाच्या रांगा दिसतात. रुडकीला गंगेचा मोठा कालवा आहे. रुडकीच्या परिसरातील सृष्टीसौंदर्यही उत्तम आहे. प्रमोदसह आम्ही हरिद्वार, ऋषिकेश, लक्ष्मणझूला ही स्थळे पाहिली. हरिद्वारच्या गंगेच्या कालव्यात स्नान केले. पाण्याला ओढ खूप आहे. साखळदंड धरून स्नान करावे लागते. हरिद्वार म्हणजे सप्तपुऱ्यातील मायापुरी. मायादेवीचे दर्शन घेतले. हरिद्वारच्या दोन डोंगरांचे कडे समोरासमोर आहेत. त्यावरील एका डोंगरावर मी चढलो व माथ्यावरील देवीचे दर्शन घेतले. येथेच देवीने शुंब-निशुंब या राक्षसांचा वध केला असे सांगतात. तेथून सभोवारचे दृश्य हे अतिशय मनोहर व नयनरम्य आहे. गंगेच्या अलीकडच्या तीरावर ऋषिकेश आहे. तेथून लक्ष्मणझुल्यावरून पलीकडच्या तीरावर जाता येते. दोन्ही तीरांवर अनेक मंदिरे आहेत. काली कमलीवाले बाबांचा आश्रम, संतोषी मातेचे भव्य मंदिर पाहिले. एक दिवस कनखलला गेलो. तेथे दक्षेश्वर मंदिर आहे. येथेच दक्ष (पार्वतीचा पिता) याने महायज्ञ केला. पार्वतीने यज्ञकुंडात उडी घेतली ते स्थान हेच. येथील गंगेचे पात्र फार सुरेख आहे.

नंतर एक दिवस डेहराडून, मसुरी पाहून आलो. मसुरीचे रस्ते फार सुरेख आहेत. ते थंड हवेचे ठिकाण आहे. रोप-वे वरून डोंगरावर चढलो. एक दिवस 'मुनीकी रेती ' येथील गढवाल विकास निगमच्या कार्यालयातून बदरीनाथ - केदारनाथच्या यात्रेची तिकीटे काढून आलो. ही बस मिनी बस असते. फक्त २० प्रवासी बसतात.

ही सात दिवसांची यात्रा फारच आनंदात झाली. हिमालयातूनच सारा प्रवास आहे. अप्रतिम सृष्टीसौंदर्याचे दर्शन घडले. प्रथम देवप्रयाग लागले. येथे अलकनंदा व भागीरथी यांचा संगम आहे. नद्यांच्या संगमाला प्रयाग अशी संज्ञा आहे. बद्रीनाथचा मार्ग म्हणजे अलकनंदेच्या तीराने तिच्या उगमाकडे जाण्याचा मार्ग. डोंगरावरून बसचा मार्ग आहे आणि खाली अलकनंदा वेगाने वाहताना दिसते. रुद्रप्रयाग, जोशीमठ वरून बद्रीनाथला जायचे. ज्योतिर्मठात श्री. विष्णुदेवानंद सरस्वती ह्या शंकराचार्यांचे प्रवचन ऐकले. बद्रीनाथचे दर्शन घेण्याच्या अगोदर मंदिराबाहेरील गरम पाण्याच्या कुंडात स्नान केले. बद्रीनाथाची पद्मासनस्य मूर्ती पाहून अत्यंत समाधान झाले. भक्तिभावपूर्ण अंतःकरणाने दर्शन घेतले. परत रुद्रप्रयागला आलो व तेथून मंदाकिनीच्या तीराने तिच्या उगमाच्या दिशेने केदारनाथाचा प्रवास सुरू झाला. केदारनाथाचे मंदिर पांडवकालीन आहे. केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. बद्रीनाथ हे चार धामांपैकी एक. केदारनाथाचे दर्शन घेतले. बद्रीनाथाच्या व केदारनाथाच्या मंदिरात आम्ही बराच वेळ राहिलो व पुन्हा पुन्हा दर्शन घेतले. तेथून हालावेसेच वाटेना. आद्य शंकराचार्यांचे देऊळ जवळच आहे. येथूनच ते हिमालयात गेले व त्यांचे अवतारकार्य संपले. सूर्यप्रकाशात हिमालयाची शिखरे फारच विलोभनीय वाटतात. 'जय अलकनंदा जय मंदाकिनी । जय भागीरथी अघनाशिनी' हे पद आम्ही बद्रीकेदाराच्या यात्रेत बरेच वेळा आळवत होतो. केदारनाथला जायला आम्ही दोन डोल्या केल्या होत्या.

बद्रीनाथहून आम्ही मिनीबसने माना या ठिकाणी गेलो. तेथे अलकनंदा व सरस्वती या दोन नद्यांचा संगम आहे. सरस्वती प्रचंड वेगाने खळाळत वाहते. भीमाचा पूल पाहिला. येथूनच पाच पांडव व द्रौपदी हिमालयात निघून गेले. बटाट्‌याची शेते पाहिलीत. येथे भारताची हद्द संपून तिबेटची हद्द सुरू होते.

नंतरचे सर्व प्रवास प्रकाश टूर्स ने झाले. ९-१०-८१ ते २६-१०-८१ आम्ही दोघे प्रकाश टूर्स बरोबर पशुपतिनाथाच्या यात्रेला गेलो. जबलपुरला भेडाघाट पाहिला. खजूराहोची पाषाणावरील शिल्पाकृतीसाठी प्रसिद्ध असलेली लेणी पाहिली. नेपाळची राजधानी काठमांडू पाहिली. येथील श्री पशुपतीनाथाचे मंदिर पागोडा पद्धतीचे आहे. पशुपतिनाथाला अभिषेक केला. तेथे बसमध्ये बिघाड झाल्यामुळे वर्कशाॅपमध्ये दुरूस्तीला टाकावी लागली. पाच दिवस खोळंबा झाला. आता काय करावे? काही प्रेक्षणीय स्थळे आपण आपल्याच प्रयत्नाने पाहिली पाहिजेत असा विचार करून काठमांडूच्या बसस्टेशनवर गेलो. तेथे चौकशी केली असता धुलिखेल हे प्रेक्षणीय स्थळ आहे, तेथे बस जाते, असे कळले. आम्ही दोघे बसची तिकीटे काढून धुलिखेलला जाणाऱ्या बसमध्ये चढलो. भोवतालच्या पर्वतांच्या रांगांमधून आमची बस जात होती. सृष्टीसौंदर्य नयनमनोहर होते. त्या पहाडी प्रदेशात सूर्यास्ताचे दृश्य फारच रमणीय दिसले. धुलिखेलला आम्ही उतरलो. बस पुढे जाऊन परत येणार होती व त्या बसने आम्ही काठमांडूला परत येणार होतो. पण बस आलीच नाही. पहाडी मुलुख असल्यामुळे थंडी मी म्हणत होती. सायंकाळ झाल्यावर घरांची दारे पटापट बंद झाली. आम्ही मोकळ्या जागेत कुडकुडत होतो. परका मुलुख. अंधार वाढत चालला. थंडीही वाढत चालली. काय करावे काही कळेना. मोठा विचित्र प्रसंग आला. एक ट्रक काही अंतरावर उभी होती. आम्हाला काठमांडूला पाहोचविता काय असे ट्रक चालकाला विचारले. आम्ही रात्री जात नाही असे तो म्हणाला. तितक्यात दोघे पोलीस गस्त घालीत तेथे आले. आम्ही त्यांच्याशी बोललो. आपली हकीकत सांगितली. आता येथे बस येणार नाही. आमची येथील ड्‌युटी संपली आहे. आम्ही ठाण्यावर परत जात आहोत. पण ठाणे येथून दूर आहे. तुमच्याने तोपर्यंत पायी चालणे होईल का? आम्ही होकार दिला. आमच्या ठाण्यावर बस येईल. तिच्यात आम्ही तुम्हाला बसवून देऊ. ती काठमांडूला जाईल. तेथून तुम्ही रिक्षा करून आपल्या स्थानावर जा, असे तो म्हणाला. आम्ही त्यांच्या मागोमाग जाऊ लागलो. त्यांच्या बरोबर भराभर चालावे लागे. पोलीस ठाणे आले. काही वेळाने बस आली. त्या पोलीसांनी ती थांबविली व आम्हाला तिच्यात बसवून दिले. ते पोलीस त्यावेळी आम्हाला देवदूत वाटले. काठमांडू बसस्टेशनवर आम्ही उतरलो व रिक्षा करून आपल्या मुक्कामावर सुखरूप पोहोचलो. विचित्र प्रसंग आला होता पण अशा रीतीने तो निभावला.

काठमांडूहून दार्जीलिंगला गेलो. आमची बस ढगातून जात होती. घरे लाकडाची होती. मोठ्या पहाटे उठून सूर्योदय पाहायला गेलो. सूर्योदयाचे दृश्य अप्रतिम होते. अग्नीचा लंबगोलाकृती गोळाच वर येत आहे असे भासत होते. कन्याकुमारीला  सूर्यास्त पाहायला गेलो होतो पण ढगाळ वातावरणामुळे तो दिसला नाही.

काठमांडूला खोळंबा झाल्यामुळे कार्यक्रमात असलेली विंध्याचल व नालंदा ही स्थळे सोडून द्यावी लागली. काशी, प्रयाग, गया ही त्रिस्थळी यात्रा झाली. तिन्ही ठिकाणी श्राद्ध केले. रामेश्वरहून आणलेला सेतू काशीविश्वेश्वराला अर्पण केला. षोडषोपचार पूजा केली. अन्नपूर्णेची कुंकुमार्चन पूजा केली. प्रयागला त्रिवेणी संगमावर रामेश्वराचा सेतू अर्पण केला. वेणीदान केले. गयेला फल्गु नदीचे पात्र उपडे आहे. फल्गु नदीवर वटवृक्षाखाली आणि विष्णुपदावर पिंडदान केले. दिवाळीच्या आधी नागपुरला पोचणार होतो पण भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी पोचलो. तिसऱ्या दिवशी मावंदे केले. पांडव पंचमीला दादा मोहरीर वारले. दहा दिवस सुतकात गेले. अकराव्या दिवशी शुद्ध होऊन श्री. नानासाहेब कुळकर्णींच्या मुलीच्या लग्नाला गेलो. तिकडून घरी आलो आणि आजारी पडलो.

आजाराने भयंकर वळण घेतले. डाव्या पायाला असह्य दुःख होते. तापही होता. शौचावाटे सारखे रक्त पडत होते. सर्व मुले बाहेरगावी होती. सर्व मुलींची लग्ने होऊन त्या आपापल्या सासरी गेल्या होत्या. मी आणि माझी पत्नी दोघेच घरी होतो. माझी शुश्रुषा करतांना तिच्यावर फार ताण पडे. सर्वात धाकटा मुलगा पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिकत होता. त्याची टर्मिनल परीक्षा असल्यामुळे त्याला कळविले नाही. परीक्षा आटोपल्यावर त्याला कळविले. तो आला. तो येईपर्यंत डॉ. बी. जी. पांडे  यांचे औषध सुरू होते. पण काही आराम पडेना. सुधीर आल्यावर डॉ. टावरींना प्रकृती दाखविली. एक्स रे काढण्यात आला. Lumber Spondylitis असे निदान झाले. पाठीच्या कण्याच्या L5 आणि S1 या मणक्यांमधील अंतर कमी झाले होते. ही माझी केस नाही. मी Neurophysician आहे. तुम्ही अस्थिरोग तज्ज्ञाकडे जा, असे डॉ. टावरी म्हणाले. नंतर आम्ही डॉ. बाभुळकरांकडे गेलो. त्यांच्या दवाखान्यात रोज सकाळी जात होतो. Traction, Diathermy आणि Physiotherapic Treatment घेऊन घरी परत येत असे. १५ दिवस उपचार घेतल्यानंतर दुःख आटोक्यात आले, पण ताप हटेना. अशक्ती खूप आली होती. त्यासाठी डॉ. मुकुंद शास्त्री यांचे औषध घेतले. सहा महिने मी अंथरूणावरच होतो. ताप गेला. मग हळूहळू बरे वाटायला लागले. घरातल्या घरात चालू लागलो. पण अजूनही खाली बसतांना त्रास होतो. पाठ, कंबर दुखते. खुर्ची टेबलावर जेवण करावे लागते. शौचाला कमोड वापरावे लागते. समाधान एवढेच की अपंगता येऊन परावलंबित्व आले होते, ते जाऊन आता सर्व व्यवहार स्वतः करू शकतो.

१९८२ साल असेच गेले. १९८३ साली जगन्नाथपुरी, कोणार्कचे सूर्यमंदिर, कलकत्त्याचे कालीमाता मंदिर व त्याजवळच असलेली बारा शिवमंदिरे ही यात्रा प्रकाश टूर्सनेच केली. कलकत्त्याला देशगौरव सुभाषचंद्र बोस सर्वांच्या हातावर तुरी देऊन ज्या घरातून पसार झाले व पुढे जर्मनीत व नंतर जपानमध्ये गेले, ते त्यांचे घर व ते ज्या जिन्यावरून उतरले तो जिना पाहिला. आझाद हिंद फौजेची स्थापना, त्यांनी ब्रिटिश सत्तेशी दिलेला लढा, चलो दिल्ली, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा, ही त्यांची वीर गर्जना, इंग्रज सैन्याशी मुकाबला करीत त्यांना इंफालपर्यंत मागे रेटत आणणे, सिंगापूर रेडियोहून दि. २५ जून १९४५ ला त्यांनी केलेले भाषण  व त्यात महात्मा गांधींविषयी व्यक्त केलेला आदर व कृतज्ञता हा सारा रोमांचक व स्फूर्तिदायी इतिहास डोळ्यांसमोरून तरळून गेला. जगन्नाथपुरीला शंकराचार्यांचा मठ पाहिला. कोणार्कचे जगप्रसिद्ध सूर्यमंदिर पाहिले. कलकत्त्याला कालीमातेचे दर्शन घेतांना रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद ह्या महापुरुषांचे स्मरण होऊन आम्ही नतमस्तक झालो. जगन्नाथपुरी चार धामांपैकी एक. आता बद्रीनाथ, रामेश्वर आणि जगन्नाथपुरी या तीन धामांचे दर्शन झाले होते. द्वारका हा चौथा धाम राहिला होता. याच प्रवासात हिराकुंड हे महानदीवरचे अति विशाल धरण पाहिले.

जगन्नाथपुरीला श्री जगन्नाथ मंदिरात श्रीकृष्ण, बलराम व सुभद्रा यांच्या लाकडाच्या मूर्ती आहेत. दर्शन घेतले. समुद्र पाहिला.

१९८४ साली आम्ही दोघांनी प्रकाश टूर्स बरोबरच श्री ओंकारेश्वर, सोमनाथ, द्वारका, महाकालेश्वर ही यात्रा केली. ओंकारेश्वराची व सोमनाथाची साभिषेक पूजा सोमवारी, महाकालेश्वराची एकादशीला (स्मार्त) झाली. वासुदेवानंद सरस्वतींची समाधी आणि दत्तात्रेय यांचे गरुडेश्वरला दर्शन व अभिषेक गुरुवारी झाला. गिरनारची यात्रा संकष्टी चतुर्थीला झाली.

या प्रवासात २७ प्रवासी होते. एकंदरीत आमची ही यात्रा निर्विघ््नपणे पार पडली. चारही धामांची यात्रा पूर्ण झाली. परमेश्वराची अपार कृपा! प्रस्तुत यात्रेचे वर्णन पुढे देत आहे.

श्री ओंकारेश्वर, सोमनाथ, द्वारका, महाकालेश्वर यात्रा:

आम्ही उभयता प्रकाश टूर्सच्या बसने रविवारी ७-१०-८४ ला सकाळी सात वाजता द्वारका-सोमनाथ यात्रेसाठी नागपुरहून निघालो. बस सुमारे ११-३० वाजता अमरावतीच्या देवीच्या देवळाजवळ थांबली. देवीच्या दर्शनासाठी अर्ध्या तासाचा अवधी देण्यात आला होता. तितक्या वेळात आम्ही चि. विश्रामकडे जाऊन आलो. चि. सौ. परिमलला typhoid झाला होता आणि चि. परागलाही ताप होता. रात्रीचा मुक्काम खांडव्याला झाला. श्री दादाजी धुनीवाले यांच्या समाधीचे दर्शन घेतले. बडे दादाजी व छोटे दादाजी अशा दोन समाध्या आहेत. समाधिस्थानाचे वातावरण शांत व गंभीर वाटले. समाधीच्या प्राकाराचा दर्शनी भाग सुंदर आहे. भवानी मंदिर पाहिले. दि. ८ ला सकाळी पुढच्या प्रवासाला निघालो. ओंकार मांधात्याला आलो. येथे नर्मदेचे पात्र मोठे आहे. नदीवर पूल आहे. पूलावरून नदीच्या पैलतीरी असलेल्या ओंकारेश्वराच्या मंदिराला गेलो. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तेथे नर्मदेचे स्नान, श्री ओंकारेश्वराचे दर्शन, पंचमुखी गणपतीचे दर्शन, पूजा, अभिषेक आटोपून नावेने नर्मदेच्या ऐलतीरी आलो. तेथे ममलेश्वराचे मंदिर आहे. दर्शन घेऊन, जेवण करून रात्री महेश्वरला आलो. रात्रीचा मुक्काम महेश्वरला अहिल्याबाई होळकरांच्या वाड्यात झाला. दि. ९ ला सकाळी नर्मदेचे स्नान केले. येथील किल्ला आणि घाट फार प्रेक्षणीय आहे. तो अहिल्याबाईंच्या स्मारकार्थ त्यांच्या सुनेने बांधला. अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी आपली राजधानी महेश्वरला आणली. होळकर घराण्यातील दिवंगत स्त्री-पुरुषांच्या छत्र्या येथे स्मारक रूपाने उभारण्यात आल्या आहेत. अहिल्याबाईंची गादी येथे मोठ्‌या आदरपूर्वक राखली आहे. अहिल्याबाईंची अगदी जिवंत वाटणारी मोठी प्रतिमा सिंहासनावर विराजमान आहे. त्यांची दानशूरता, धर्मपरायणता, न्यायप्रियता सुविख्यात आहे. येथे ब्राह्मणांकडून लक्षलिंगार्चन अजूनही प्रतिदिन सुरू आहे. राणीचा नवरत्नहार आम्ही येथे पाहिला. आद्य शंकराचार्य आणि मंडनमिश्र या दोन प्रकांड पंडितांचा वाद येथे झाला. महेश्वराला जेवण करून पुढच्या प्रवासाला निघालो.

मार्गात मांडवगड लागले. तेथे पुरातन किल्ला, बाजबहादुर व राणी रूपमतीचा महाल आणि अनेक पुरातन वास्तू आहेत. शिल्पकला प्रेक्षणीय आहे. बाजबहादुराच्या महालात तानसेन व राणी रूपमतीचा रागदारीचा सामना झाला. तानसेन हारला. मांडवगडहून सायंकाळी धारला पोचलो. धार ही भोजराजाची नगरी. येथे सुप्रसिद्ध कलाकार श्री. रघुनाथ फडके यांचा स्टुडियो पाहिला. त्यात महात्मा गांधी, लो. टिळक, पं. जवाहरलाल नेहरू, सयाजीराव गायकवाड, साईबाबा, इंदिरा गांधी इत्यादींचे १०० हून अधिक पुतळे आहेत. रात्रीचा मुक्काम धारला झाला. त्या दिवशी कोजागिरी होती. रात्री सर्वांनी चंद्रप्रकाशात आटीव दूध प्राशन केले. दि. १० ला धारेश्वर महादेव व गडकालिकेचे दर्शन घेतले. रात्री गरुडेश्वरला पोहोचलो. येथे नर्मदेचे पात्र व घाट सुरेख आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आणि दत्तमंदिर पाहिले. दत्त मंदिरात भिंतींवर नृसिंह सरस्वतींच्या जीवनातील गुरूचरित्रात वर्णिलेले प्रसंग चित्ररूपाने रेखाटले आहेत. दत्त मंदिर व समाधीमंदिर सुरेख आहेत. तेथील वातावरण रम्य व पवित्र आहे. दि. ११ ला सकाळी नर्मदास्नान करून समाधीला व दत्तात्रेयाला अभिषेक केला. नारदेश्वराचे व गरुडेश्वराचे दर्शन घेतले. गरुडेश्वराहून बडोद्याला आलो. तेथे Museum, Health Museum, प्राणीसंग्रहालय पाहिले. गुरुवार असल्यामुळे Planetarium बंद होते. तरी Planetarium ची इमारत बाहेरून पाहिली. जिना चढून आतील रचनाही पाहिली. रात्रीचा मुक्काम बडोद्याला झाला.

दि. १२ ला बडोद्याहून गिरनारकडे निघालो. बडोद्याहून थोड्‌या अंतरावर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी विमानाच्या पत्र्याचे बांधलेले एक आगळे व वैशिष्ट्यपूर्ण असे दक्षिणामूर्ती मंदिर आहे. तेथे श्री शिवाची ज्ञान-मूर्ती आहे. वातावरण स्वच्छ, नीटनेटके व टापटीपीचे वाटले. एक वेगळी कलात्मकता जाणवली. दि. १३ ला सकाळी डोलीने गिरनार पर्वत चढलो. दोघांनी दोन डोल्या केल्या. एकूण ४५० रु. भाडे पडले. मी डोलीत खाली पाय सोडून बसलो. ही पालखट घालून बसली. ७५० पायऱ्या चढायच्या व तेवढ्याच उतरायच्या. ३००० पायऱ्या चढल्यावर श्रीरामाचे मंदिर आहे. ४५०० पायऱ्या चढल्यावर जैनांची प्रेक्षणीय मंदिरे आहेत. त्यानंतर गोमुख व देवीचे मंदिर आहे. आणखी बरेच पुढे चढल्यानंतर गोरखनाथांचे तपश्वर्या स्थान आहे. तेथून काही पायऱ्या उतरून व पुढे चढून दुसऱ्या शिखरावर दत्तपादुका आहेत. एक साधारण चौकोनी शिलेवर दोन पदचिन्हे उमटली आहेत. मागाहून स्थापलेल्या अशा वेगळ्या पादुका नाहीत. तेथील जागा संकुचित आहे. ह्या पर्वतारोहणात आसमंताचे सृष्टीसौंदर्य दृष्टीत भरते. पायी चढणाऱ्यांना काठ्या घ््याव्या लागतात. त्या भाड्‌याने मिळतात. एक रु. अमानत व पन्नास पैसे भाडे. परत आल्यावर काठी परत करायची की एक रु. परत मिळतो. गिरनारच्या पायथ्याशी उतरल्यानंतर गावाकडे येतांना एकादशमुखी मारुतीचे मंदिर आहे. गिरनार चढतांना मधून मधून खोडियार मारुती, खोडियार देवी, भर्तृहरी-गोपीचंद इ. लहान लहान मूर्ती मांडलेल्या आहेत. दत्त पादुकापासून थोडे खाली आल्यावर मुख्य पायऱ्यांच्या रस्त्याच्या डाव्या हाताला काही पायऱ्या खाली गेलेल्या दिसतात. तेथे दत्तात्रेयाची अखंड धुनी आहे. दर्शनार्थींकरिता तेथे अन्नछत्र आहे. तेथून जवळच कमंडलू तीर्थ आहे. तेथे श्री दत्तात्रेय स्नान करीत असत. झऱ्याचे पाणी स्वच्छ आहे. तेच पाणी लोक पिण्याकरिता वापरतात. गिरनारच्या यात्रेला अनेक लोक येतात. बहुतेक लोक पायी चढतात व उतरतात. शाळेची मुले तर आम्ही उड्‌या मारत चढताना व उतरताना पाहिली.

दि. १४ ला सकाळी गिरनारहून निघालो. गिरनार जवळच जुनागढ आहे. तेथील किल्ला व प्राणीसंग्रहालय पाहिले. प्राणीसंग्रहालयात अनेक सिंह पाहायला मिळाले. नरसी मेहतांची समाधी आणि त्यांचे जीवनदर्शन घडवणारी अनेक चित्रे तेथे आहेत. जवळच मुचकुंद गुहा आहे. दुपारी सोमनाथला पोचलो. सोमनाथचा समुद्र सुरेख आहे. समुद्रस्नान करून १९५१ साली वल्लभभाई पटेलांच्या पुढाकाराने बांधलेले भव्य आणि सुंदर असे श्री सोमनाथ मंदिर समुद्र किनाऱ्यावरच आहे, ते पाहिले. सभामंडप भव्य आहे. सोमनाथाची शाळुंका तर मोठी आहेच, पण पिंडीही मोठी व उंच आहे. दर्शन घेऊन जवळच असलेल्या अहिल्याबाई होळकरांनी २०० वर्षांपूर्वी बांधलेल्या सोमनाथ मंदिरात आलो. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे.
खाली पायऱ्या उतरून ज्योतिर्लिंग आहे. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. त्याची पंचामृत स्नानपूर्वक साभिषेक षोडषोपचार पूजा स्वहस्ते केली. १०८ बिल्वदले वाहिली. ही साभिषेक पूजा अर्थातच दुसरे दिवशी त्रिवेणी घाटावर स्नान करून आल्यावर झाली. त्रिवेणी घाटावर हिरण्या, कपिला व सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे.

घाटाच्या पायऱ्या चढून वर आल्यावर समोरच आद्य शंकराचार्यांचे शारदापीठ आहे. दर्शन घेऊन आल्यावर मग सोमनाथाची साभिषेक पूजा व बिल्वदल अर्पण केले. आरती झाली. जेवण झाल्यावर दुपारी चार वाजता भालुकातीर्थ, देहोत्सर्ग, प्रभास पाहून आलो. संध्याकाळी साडेसहा वाजता सोमनाथच्या समुद्रावरील सूर्यास्त पाहिला. सात वाजता वल्लभभाई पटेल निर्मित सोमनाथ मंदिरातील आरतीला उपस्थित राहिलो. ह्या मंदिराच्या प्रांगणात समुद्र किनाऱ्याच्या बाजूला एक स्तंभ आहे. त्यावर दक्षिण दिशेकडे बाणाचे टोक दर्शविले आहे. त्याखाली Path of light right upto south pole अशा अर्थाचे इंग्रजी वाक्य लिहिले आहे. अर्थ असा की बाणाच्या दिशेने सरळ दक्षिणेकडे गेल्यास कोठेही भूभागाचा अडथळा न येता प्रकाश किरण हिंदी महासागर व अंटार्क्टिक महासागरातून दक्षिण धृवावर पोचेल.

सोमवार दि. १५ ला दुपारी जेवण झाल्यावर आमचा मोर्चा द्वारकेकडे वळला. मार्गात वेरावळ लागले. हे मत्स्य व्यवसायाचे मोठे केंद्र आहे. वातावरणात मासळ्यांचा वास सतत भरलेला असतो. नाक मुठीत धरूनच जावे लागते. मार्गात पोरबंदर हे सुंदर शहर लागले. रस्ते आखीव रेखीव, इमारती भव्य, उंच आणि शहराची मांडणी व्यवस्थित दिसली. पोरबंदर ही जुनी सुदामनगरी. येथूनच सुदामा श्रीकृष्णाच्या भेटीला द्वारकेला गेला होता. सुदामा मंदिर व कीर्तीमंदिर पाहिले. पोरबंदरहून द्वारकेपर्यंतचा मार्ग समुद्र किनाऱ्यानेच आहे. डाव्या हाताला समुद्र आपले नयनरम्य दर्शन देतो. अधून मधून दृष्टीआड लपून लपंडाव खेळतो. रात्री द्वारकेला पोचलो. आमचा मुक्काम बांगड धर्मशाळेत होता. दि. १६ ला सकाळी सात वाजता श्री द्वारकाधीशाचे मंदिर उघडणार होते व सकाळी आरती होणार होती. दर्शनाची ओढ लागली होती. आम्ही सकाळी साडेसहालाच मंदिराकडे निघालो. दार उघडताच आत शिरलो. भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले. आरती झाली. फार दिवसांची उत्कंठा तृप्त झाली. सभामंडपाच्या मागच्या भिंतीला मोठा आरसा लावलेला आहे. त्यात द्वारकाधीशाचे प्रतिबिंब दिसते. नंतर समुद्रस्नान, गोमतीचे स्नान करून परत देवळात आलो. निवांतपणे दर्शन झाले. देवळातच राहिलो. साडेदहा वाजता आरती झाली. देवाला शृंगारसाज, पोशाख, अलंकार चढवतांना पाहायला मिळाले. आरती झाल्यावरही काही वेळ देवळातच भगवंताच्या मूर्तीकडे अनिमिष नेत्रांनी पाहात होतो. मुक्कामावर आल्यावर जिलबीचे जेवण झाले.

द्वारकाधीशाच्या मंदिरालगतच आद्य शंकराचार्यांचे शारदापीठ आहे. त्या पीठावर सध्या स्वरूपानंद सरस्वती महाराज अधिष्ठित आहेत. आम्ही गेलो त्यावेळी ते तेथे नव्हते. सध्या कलकत्त्याला आहेत असे आम्हाला सांगण्यात आले. तेथे आद्य शंकराचार्यांच्या जीवनातील कुमारिल भट्टाशी वाद, मंडनमिश्राशी वाद, परकाया प्रवेश इत्यादि अनेक प्रसंगांची चित्रे भिंतीवर रेखाटली आहेत. भारतात बारा ज्योतिर्लिंगे कोठे आहेत हे दाखविणारा मृण्मय आराखडा तेथे आचार्यांच्या गादीच्या एका बाजूस आहे. जेवणानंतर काही वेळाने बसमधून पुन्हा आमचा फेरफटका सुरू झाला. प्रथम रुक्मिणीचे मंदिर लागले. हिने रुक्मिणीची खणानारळाने ओटी भरली. मी श्रीसूक्त म्हंटले. फुलांची माळा अर्पण केली. रुक्मिणीची मूर्ती सुरेख आहे. नंतर दारुकावनात नागेश्वराचे दर्शन घेतले. तेथून गोपेश्वराला गेलो. गोपीतलाव पाहिला. गोकुळातील गोपींना श्रीकृष्ण निर्वाणाची वार्ता कळल्यावर त्यांनी येथे येऊन देहत्याग केला अशी कथा आहे. नंतर ओखा बंदरावर येऊन बोटीने द्वारका बेटावर गेलो. तेथे श्रीकृष्णाचा राजवाडा होता. राण्यांचे महाल होते. द्वारकेला राजधानी होती. द्वारका बेटावर बोटीतून उतरल्यावर एक मोठा उंच ध्वजस्तंभ भिंतीला लागून उभारलेला दिसला. वर ध्वज फडकत होता. भिंत व ध्वजस्तंभ यामधील जागेतून माणसाने अंग चोरून निसटायचे. द्वारका बेटावरील श्रीकृष्ण मंदिरात गेलो. येथील मूर्तीही द्वारकेतील द्वारकाधीशाच्या मूर्तीसारखीच काळी आहे. फक्त फरक हातातील शंखात आहे. दोन्ही ठिकाणच्या मूर्ती शंखचक्रगदापद्मधारी चतुर्भुज आहेत. जिना चढून आम्हाला वर नेण्यात आले आणि ही सोन्याची द्वारका म्हणून सांगण्यात आले. तेथे श्रीकृष्ण रुक्मिणीच्या पिवळ्या धातूच्या मूर्ती आहेत.

बोटीने पुन्हा ओखा बंदराच्या किनाऱ्यावर आलो व तेथून आपल्या मुक्कामावर आलो. रात्रीच्या शेजारतीची वेळ झाली होती. रात्री साडेआठ वाजता शेजारती होते. लगेच द्वारकाधीशाच्या मंदिरात गेलो. देवाला रात्रीचा पोशाख, साज, शृंगार, अलंकार घालणे सुरू होते. गादी, उशी इत्यादि शेजेची तयारी केली होती. मूर्ती उभीच असली तरी आता सिंहासनावर बसल्यासारखी भासत होती. साडेआठ वाजता शेजारती सुरू झाली. ती आटोपून नऊ वाजता पडदा ओढण्यात आला. सर्व आरत्यांच्या वेळी मंदिरात गर्दी असते. आम्ही मुक्कामावर परत आलो. रात्रीचा मुक्काम द्वारकेलाच झाला.

दि. १७ ला द्वारकेहून निघून रात्री अहमदाबादला आलो. येथे स्वामीनारायण मंदिराच्या धर्मशाळेत आमचा मुक्काम होता. दुसरे दिवशी दि. १८ ला स्वामीनारायण मंदिर, झुलता मनोरा, दाई हिरीराची सात मजली विहीर, साराभाईचा Textile Museum, प्राणीसंग्रहालय, गीता मंदिर, साबरमती आश्रम इत्यादि स्थळे पाहिलीत. अहमदाबाद ४६ लाख लोकवस्तीचे शहर आहे. येथे १३० कापड गिरण्या आहेत. अहमदाबाद या शहराला परकोट असून बारा दरवाजे होते. काहींची पडझड झाली आहे. झुलता मनोरा हे अर्वाचीन स्थापत्यकलेला एक आव्हान आहे. जोडीने दोन मनोरे उभे असून वर चढण्या करिता पायऱ्या आहेत. एका मनोऱ्यावर स्त्रिया चढल्या व दुसऱ्या मनोऱ्यावर पुरूष चढले. एक मनोरा हालविला तर दुसराही हालतो. दाई हिरीराची विहीर सात मजली आहे. आता दोन मजले कचऱ्याने बुजलेले आहेत. पाच मजले दिसतात. विहीरीचे बांधकाम आश्चर्यजनक आहे. येथील गीतामंदिर तीन मजली आहे. स्वामी विद्यानंदजींनी भारतात निरनिराळ्या ठिकाणी गीतामंदिरे बांधली. तिसऱ्या मजल्यावर गीतेची मूर्ती आहे. दुसऱ्या मजल्यावर भारतीय युद्धातील काही प्रसंगांची आठवण करून देणाऱ्या मातीच्या मूर्ती आहेत. तळमजल्यावर गीतेचे अठरा अध्याय भिंतीवर लिहिले आहेत. कॅलिको मिल्सचे निर्माते साराभाई यांनी textile museum मध्ये वस्त्रांचे नमुने आकर्षक पद्धतीने मांडले आहेत. त्यांचे निवासस्थानही तेथेच आहे. महात्मा गांधींचा साबरमती आश्रम पाहून मन भारावून जाते. त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांची छायाचित्रे तेथे निरनिराळ्या खोल्यातून प्रदर्शनार्थ ठेवली आहेत. दि. १८ लाही मुक्काम अहमदाबादलाच झाला.

दि. १९ ला सकाळी साडेसात वाजता अहमदाबादहून इंदोरकडे जायला निघालो. १० च्या सुमारास डाकोरला आलो. डाकोरजीचे दर्शन घेतले. ही श्रीकृष्णाची मूर्ती द्वारकेच्या मूर्तीसारखीच आहे. पेहेरावात थोडासा फरक जाणवला. इंदोरला रात्री पोचलो. दि. २० ला सकाळी इंदोरहून उज्जैनला आलो. ही विक्रमादित्याची प्राचीन अवंतिका नगरी. सप्तपुऱ्यांपैकी एक. येथील महाकालेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. क्षिप्रेचे स्नान करून महाकालेश्वर दर्शन झाले. महाकालेश्वर मंदिर पेशव्यांनी बांधले. विक्रमादित्याची सिंहासनारूढ मूर्ती, बडा गणपती, सांदीपनी ऋषीचे निवासस्थान पाहिले. प्रथम बड्या गणपतीची पूजा केली. नंतर महाकालेश्वराची साभिषेक पूजा केली. येथेही सोमनाथच्या अहिल्याबाईंनी बांधलेल्या मंदिराप्रमाणेच खाली पाताळात ज्योतिर्लिंग आणि वरही एक शिवलिंग आहे. जुन्या महाकालेश्वरालाही अभिषेक केला.

महाकालेश्वर मंदिराच्या आसमंतात अनेक मंदिरे आहेत. सप्तर्षी मंदिर, नवग्रह मंदिर, एकादश लिंगेश्वर, रामदास स्वामींनी स्थापन केलेले मारुती मंदिर इत्यादि पाहून इंदोरला परत आलो. इंदोरला जैनांचे दुमजली काच मंदिर व अन्नपूर्णा मंदिर पाहिले. अन्नपूर्णा मंदिरापुढे सिमेंट काँक्रिटचे चार विशाल हत्ती अंबारीसहित उभे आहेत. मंदिराचा अंतर्भागही सुरेख आहे. नंतर मुक्कामावर परत आलो.

श्री. नानामहाराज तराणेकर इंदोरला राहतात. माझे सायन्स कॉलेज मधील रसायनशास्त्राचे प्राध्यापक कै. डी. आर. चांदोरकर यांचे पुत्र इंदोरला Excise Department मध्ये आहेत. त्यांच्या बरोबर नानामहाराजांच्या दर्शनाला गेलो. त्यांच्या घराच्या हॉलमध्ये त्यांची शिष्यमंडळी बसली होती आणि महाराजांचे पुरुषसुक्त, अथर्वशीर्ष, गीतेचा पंधरावा अध्याय यांचे पठण चालू होते. तो कार्यक्रम आटोपल्यावर महाराजांचे दर्शन घेऊन अभिवादन केले व प्रसाद व अंगारा घेऊन परत आलो. नंतर श्री. चांदोरकर यांच्या घरी गेलो. त्यांनी मोडक्या तोडक्या वस्तूंपासून स्वहस्ते तयार केलेल्या काही कलाकृती दाखविल्या. रात्रीचा मुक्काम इंदोरला झाला. दि. २१ ला सकाळी साडेपाच वाजता इंदोरहून निघालो. दहाच्या सुमारास भोपाळला आलो. बिर्ला मंदिर पाहिले. रात्री साडेदहाच्या सुमारास नागपुरला घरी सुखरूप परत आलो.

१९८५ - ८६ ह्या वर्षात प्रमोद National Lecturer असतांना एकदा हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात व्याख्यानासाठी जाणार होता. त्याने आम्हाला तारखा कळविल्या होत्या. आम्ही त्या अवधीत हैदराबादला गेलो. प्रमोदने आम्हाला हैदराबादेतील सर्व प्रेक्षणीय स्थळे दाखविली. उस्मानिया विद्यापीठाचे विस्तीर्ण कँपस, त्यातील विविध विभाग, पोहण्याचे टाके, चारमिनार, सालारजंग म्युझियम, बिर्लांनी बांधलेले व्यंकटेश मंदिर, हैदराबाद व सिकंदराबाद मधील मोठा तलाव, इस्कॉनचे (International Shri Krishna Consciousness) राधाकृष्ण मंदिर इत्यादि.

हैदराबादहून आम्ही दोघे बसने श्री शैल मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ््यायला गेलो. जाताना मार्गात उत्तम सृष्टीसौंदर्य पाहायला मिळाले. बस सात डोंगर चढून व उतरून वळणे घेत मल्लिकार्जुनला पोचली. कृष्णा नदी वळणे घेत वाहत असलेली पाहिली. मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन पूजा करताना परमानंद झाला. पार्वती मातेचेही देऊळ आहे. तिथेही दर्शन घेतले. डोंगराच्या कड्यावरून खाली पाहिले असता खोल दरीतून वाहत असलेली कृष्णा नदी दिसते. तिलाच पाताळगंगा म्हणतात. ती पार करून श्री नृसिंह सरस्वती महाराज अदृश्य झाले. दत्त सांप्रदायिकांचा प्रासादिक ग्रंथ गुरुचरित्र यात ह्या प्रसंगाचे वर्णन आहे. गुरुचरित्र हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा चरित्रग्रंथच आहे.

१९८५ साली आम्ही दोघांनी प्रकाश टूर्सच्या बसने अष्टविनायक व महाराष्ट्रदर्शन हा प्रवास केला. या वेळी आमच्या बरोबर माझे मावसभाऊ स्व. हरिभाऊ पत्तरकिने यांची स्नुषा डाॅ. मंदाकिनी पत्तरकिने ही होती.

स्वरचित पुढील दोन श्लोकात अष्टविनायकांची नावे व स्थाने यांचा समावेश आहे.

बल्लाळेश्वर पालिचा गणपती चिंतामणी थेउरी
लेण्याद्री गिरिजात्मकास वसती विघ््नेश्वरा ओझरी
हा मोरेश्वर मोरगावि वसतो हा सिद्धी विनायक
देतो दर्शन सिद्धिटेकि बरवे भक्ता झणी पावतो ।।१।।

जाणा रांजणगाव क्षेत्र बरवे नांदे महागणपती
पाहा श्री वरदाविनायक प्रभू महाड ग्रामी वसे
आहे अष्टविनायका शरण मी ध्यातो महन्मंगला
संसारार्णव दुःखहारि सुखदा मोरेश्वरा पाहि माम् ।।२।।

ह्या प्रवासात गाणगापुर ह्या सुप्रसिद्ध दत्तक्षेत्राचेही दर्शन घडले. गाणगापुर कर्नाटकात आहे. गाणगापुरला आमच्या बसमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांच्या वतीने आम्ही श्री दत्तात्रेयाच्या मूर्तीची सोवळे नेसून पूजा केली. तीर्थप्रसाद घेतला व दिला. त्रंबकेश्वर, आवंढया नागनाथ, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि भीमाशंकर या पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शन या यात्रेत झाले. श्रीक्षेत्र नाशिक, साईबाबांची शिरडी, पंचवटी, गजानन महाराजांचे शेगाव, श्री नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान कारंजा, पुण्याची पर्वती व सारसबागेतला गणपती, अक्कलकोट, वाशिमचा बालाजी, कळंबचा चिंतामणी, पंढरपुरची
विठ्ठल रखुमाई, तुळजापुरची भवानी, जेजुरीचा खंडोबा, संत तुकारामांचे देहू, ज्ञानेश्वर माउलींची आळंदी, आंबेजोगाईची अंबा योगेश्वरी ह्या पवित्र स्थानांचे दर्शन झाले. वेरूळची सुप्रसिद्ध लेणी आणि दौलताबादचा किल्ला पाहिला. बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण झाली. त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांची समाधी आहे. दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वरहून स्पेशल टॅक्सीने आम्ही दोघे, सौ. मंदा पत्तरकिने, श्री. देशमुख सप्तशृंगीला जाऊन अष्टादशभुजा देवीचे दर्शन घेऊन आलो. तेथे डोंगराची सात शिखरे ओळीने दिसतात. म्हणून त्या ठिकाणाला सप्तशृंगी म्हणतात.

लेण्याद्रीला जाताना श्री छत्रपती महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला दुरून पाहिला. या प्रवासात अनेक देवस्थाने, संत सत्पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थलांचे दर्शन घडल्यामुळे अतीव आनंद व समाधान झाले.

१९८६ साली प्रकाश टूर्स बरोबरच श्रीक्षेत्र माहुरची यात्रा करून आलो. माहुरला मातृगया म्हणतात. माहूरच्या देवीचे, अनसूया मातेचे व दत्तात्रेयाचे दर्शन घेतले. माहुरची देवी म्हणजे परशुरामाची आई रेणुका माता होय. तिला पातळ नेसवून खणानारळाने ओटी भरली. तांबुल अर्पण केला. मातृतीर्थात स्नान केले. माहूरच्या महानुभाव पंथाच्या दत्त मंदिरातही गेलो.

चि. विश्राम जळगावला असताना आम्ही दोघे त्याच्याकडे गेलो होतो. त्याने स्पेशल टॅक्सी करून अजिंठ्याची सुप्रसिद्ध लेणी, ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाईचे मंदिर, चांगदेवाचे तापीच्या तीरावरील तपश्वर्येचे स्थान, शिवमहिम्नस्तोत्राच्या रचयित्याचे तपश्वर्या स्थान, कमळे फुललेल्या तलावानजीकचे दोन गणपतीच्या मूर्ती असलेले मंदिर, इ. अनेक स्थळे आम्हाला दाखविली.

आमचे व्याही श्री. रत्नाकरराव केळकर यांच्या आग्रहावरून भिलईला गेलो असता तेथील पोलादाचा कारखाना पाहिला.

एकदा चि. अरुणकडे मुंबईला गेलो असता त्याने टूरिस्ट बसने आम्हाला सर्व मुंबई दाखविली.

चि. सुधीरच्या लग्नानंतर त्याला Ph. D. मिळाली तेव्हा मुंबईला गेलो असता त्याच्याबरोबर मुंबईच्या महालक्ष्मीचे दर्शन करून आलो. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले व तिला पातळ घेतले व खणानारळाने ओटी भरली. अशा रितीने तुळजापुर, कोल्हापुर व माहुर ही तीन पूर्ण आणि सप्तशृंगी हे अर्धे अशा साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन पूर्ण झाले.

कोल्हापुरहून टॅक्सी करून कृष्णा नदीच्या तीरावरील नृसिंहवाडीला जाऊन श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घेतले. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना दत्तात्रेयाचे अवतार मानतात. हे फार रम्य स्थळ आहे. येथे कृष्णा नदी उत्तरवाहिनी आहे. नंतर टॅक्सीनेच ज्योतिबाच्या डोंगरावर गेलो. तेथून खाली उतरल्यावर कोकणात ज्योतिबाचे मंदिर आहे. पुष्कळशा कोकणस्थांचे ज्योतिबा हे कुलदैवत आहे. ज्योतिबाचे दर्शन घेऊन वर आलो आणि टॅक्सीने पन्हाळगडावर गेलो. तेथे बाजीप्रभूचा दोन्ही हातात तलवारी घेतलेला भव्य पुतळा आहे. गडाच्या पायऱ्या चढून सज्जावर गेलो. तेथून सभोवारचे दृश्य फार सुरेख दिसते. येथून शिवाजी महाराज सभोवारची टेहळणी करीत असत. बाजूच्या वास्तूत सैन्याची रसद साठविण्याची जागा आहे. या पन्हाळगडावरच शिवाजी महाराजांनी संभाजीला कैदेत ठेवले होते. येथून काही अंतरावर पावन खिंडीत शत्रुसैन्याशी लढतांना बाजीप्रभू देशपांडेला वीरमरण आले होते. बाजीप्रभूच्या पुतळ्याला पुनश्च एकवार वंदन करून आम्ही कोल्हापुर स्थानकावर आलो व तेथून मुंबईला परतलो.

प्रमोद Ph.D. साठी कानपुरला असताना लहानग्या सुधीरला घेऊन मी कानपुरला गेलो होतो. प्रमोदने कानपुर व लखनौ मधील प्रेक्षणीय स्थळे दाखविली. तेथेच सुधीरला ताप आला. कानपुर आय. आय. टी. च्या दवाखान्यात त्याच्यावर उपचार झाले. ताप उतरला. आय. आय. टी. होस्टेलच्या शेजारच्या बागेत मी व प्रमोद उभे होतो. बोलता बोलता अनवधानाने प्रमोदचा पाय एका खड्यात गेला. पावलाचे फ्रॅक्चर झाले. काही दिवस प्लास्टर होते. मी सुधीरला घेऊन नागपुरला परत आलो. नंतर प्रमोद काही दिवस नागपुरला आला होता.

अशा रितीने चारही धाम, सप्त पुऱ्या, बारा ज्योतिर्लिंगे, साडेतीन शक्तिपीठे, अष्ट विनायक, संत महात्म्यांची स्थाने, वेरूळ, अजिंठा, खजुराहो, कोणार्क येथील जगप्रसिद्ध शिल्प, दौलताबाद व पन्हाळगड येथील प्राचीन किल्ले, दिल्ली, कलकत्ता, मुंबई, मद्रास, बंगलोर, म्हैसूर, हैदराबाद ही महानगरे, कानपुर, भोपाळ, अहमदाबाद, भिलाई, लखनौ, आग्रा, झाशी इ. मोठी शहरे पाहिली. असा सारा भारतवर्ष हिंडून झाला. आपल्या नशिबात प्रवास नाही असे माझ्या पत्नीला वाटायला लागले होते. पण आम्ही इतका प्रवास केला की तो पुष्कळांच्या नशिबात नसेल. आणि विशेष म्हणजे L. T. C. वगैरे कोणतीही सवलत उपलब्ध नसताना. याचे आम्हाला नक्कीच समाधान आहे.

_____________________

अनुक्रमणिकेकडे