१
माझा देश
देशाला स्वातंत्र्य मिळून एक नाही, दोन नाही, पन्नास वर्षे पूर्ण होतात ही घटना एकुणच आपल्या समारंभशूर राज्यकर्त्यांना, इतर नाकर्त्यांना आणि विशेष म्हणजे व्यासपीठशूर भाषणकर्त्यांना पर्वणीच. यानंतरचा जवळचा मोक्का म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची षष्ट्यब्दिपूर्ति, म्हणजे एकसष्टी. ती येणार इ. स. २००७ मध्ये. म्हणजे वऱ्हाडी भाषेत 'लांबची जांभई'. तोपर्यंत आपण टिकू की नाही, टिकलो तरी आपली खुर्ची टिकेल की नाही, टिकली तरी उद्योगाने भाषणाला जायची प्रथा टिकेल की नाही अशा अनेक शंकाकुशंका मनात असल्यामुळे की काय, जो तो ८ ऑगस्ट १९९७ ला सरकारी इतमामाने सुवर्णमहोत्सवाचे उद्घाटन झाल्याबरोबर अजिबात वेळ वाया न घालवता भाषणांवर उतरला आहे. हे भाषणांचे 'ऑलिंपिक' वर्षभर चालेल.
हे सुवर्णमहोत्सवी वर्ष! म्हणजे यापूर्वी एकोणपन्नासदा स्वातंत्र्यदिन साजरे झाले. १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख व्यक्तींच्या जयंत्या-पुण्यतिथ्या म्हणजे शाळा- कॉलेजांमधून हमखास निबंध, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांचे आयोजन. असे आयोजन म्हणजे आपल्या शाळेसाठी अधिकाधिक पारितोषिके खेचून आणण्याच्या एकमेव उद्देशाने आपल्या मुलामुलींसाठी व इतर विद्यार्थ्यांसाठी बाबांचे हमखास लेखन प्रयोजन. बाबांच्या अशाच अनेक कृतींपैकी काही निवडक येथे घेतल्या आहेत.
प्रत्येक कृति आपणच भाषण देतो आहोत असे समजून वाचायची. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेऊन मोठ्याने वाचली तर फारच उत्तम. सुरुवातीला 'अध्यक्ष महाराज, उपस्थित सज्जन आणि बंधुभगिनींनो' म्हणायचे व सुरू व्हायचे.
१५ ऑगस्ट
भारतात आज सर्वत्र स्वातंत्र्यदिनाचा महोत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा होत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. तत्पूर्वी दीडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत तो खितपत पडला होता. गुलामगिरीच्या जीवघेऊ जोखडाने जनता जखडली गेली होती. पण पारतंत्र्याच्या शृंखलेतून बंधमुक्त होण्याचे तिचे प्रयत्न अव्याहत सुरूच होते. १७५७ साली प्लासीच्या लढाईतील विजयाने इंग्रजांची सत्ता हिंदुस्थानात सुरू झाली. व्यापाराच्या मिषाने इंग्रज हिंदुस्थानात आले पण भारताच्या राजकारणात आपले नाक खुपसण्याचा अव्यापारेषु व्यापार त्यांनी केला. कधी विश्वासघाताने, कधी फसवेगिरीने तर कधी बळजबरीने भारताचा एक एक भाग गिळंकृत करण्यास त्यांनी सुरुवात केली, आणि अखेरीस आसेतु हिमाचल इंग्रजांचे साम्राज्य भारतात प्रस्थापित झाले.
१८५७ साली इंग्रजांच्या हुकुमतीखाली असलेल्या हिंदी सैन्याने उठाव केला आणि या स्वातंत्र्ययुद्धाच्या ज्वाला सर्वत्र पसरल्या. कानपूर, आग्रा, दिल्ली, काल्पी, झाशी, अशा अनेक ठिकाणी हा बंडाचा वणवा पेटला. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बहादुरशहा, झाशीची रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांशी मोठ्या शौर्याने टक्कर दिली आणि अनेक प्रसंगी इंग्रजांना अगदी सळो की पळो करून सोडले. पण अखेरीस दुर्दैवाने इंग्रजांचा विजय झाला, आणि इंग्रजी राज्याचे आयुर्मान वाढले. पण भारतीय जनतेने इंग्रजांना सुखाचा श्वास घेऊ दिला नाही. जनतेची पिळवणूक चालली होती. दारिद्रय़, बेकारी, निरक्षरता, रोगराई आणि आपसातील दुही व झगडे यांनी उच्चांक गाठला होता. इंग्रजांनी भेदनीतीचा अवलंब करून फोडा आणि झोडा या धोरणाचा वापर सर्वत्र सुरू केला होता. अशा परिस्थितीत अनेक क्रांतिकारकांनी आपल्या उज्ज्वल बलिदानाने स्वातंत्र्याचे होमकुंड सतत पेटत ठेवले. कित्येक तरुण हसत हसत फासावर लटकले. वीणा दास, कान्हेरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा, रासबिहारी बसू, चाफेकर बंधु, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, बी. के. दत्त, इत्यादि क्रांतिकारकांनी इंग्रजी साम्राज्याविरुद्ध जणू अघोषित युद्धच पुकारले होते. देशात इंग्रजी साम्राज्याविरुद्ध असंतोष भडकवण्याचे महान कार्य या क्रांतिकारकांनी केले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' या गर्जनेने सारा भारतवर्ष निनादून टाकला. त्यांनी चळवळीचे लोण सामान्य जनतेपर्यंत पोचविले. त्यांचे विरोधक त्यांना 'तेल्यातांबोळ्यांचे पुढारी' म्हणून हिणवू लागले. त्यांचे हितशत्रु त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून खोचटपणाने संबोधू लागले. साऱ्या देशात नवजागृतीची एकच लाट उसळली. सर्वत्र चैतन्याचे वारे वाहू लागले. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या लोकमान्यांच्या चतुःसूत्रीने जनमनाची पकड घेतली. इंग्रजांचे आसन डळमळायला लागले. केसरीची गर्जना सुरू होती. पण १ ऑगस्ट १९२० रोजी या महाराष्ट्र केसरीवर काळाने झडप घातली, आणि भारताच्या राजकीय क्षितिजावरील एक तेजःपुंज तारा निखळून पडला. भारताचे नेतृत्व महात्मा गांधींकडे आले आणि असहकार, सत्याग्रह, निःशस्त्र प्रतिकार, कायदेभंग यांचे अभूतपूर्व पर्व देशात सुरू झाले. १९२१ ची असहकारितेची चळवळ, १९३०-३२ ची कायदेभंगाची चळवळ, १९४२ ची 'चले जाव' ची चळवळ ह्या महात्मा गांधींच्या देशव्यापी चळवळींनी भारतातील इंग्रजांची सत्ता खिळखिळी करून सोडली. परदेशी कापडाच्या होळ्या पेटत होत्या. लहान लहान मुले व स्त्रिया देखील इंग्रजांचा कायदा तोडत असल्यामुळे इंग्रजांची इभ्रत चव्हाट्यावर उघडी पडली होती. सारा देश ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकत्र आला होता. सरदार वल्लभभाई पटेल, मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, बाबू राजेंद्रप्रसाद, लाला लजपतराय यांच्यासारखे वीराग्रणी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतातील इंग्रजी सत्तेची पाळेमुळे खणून काढायला बद्धपरिकर झाले होते.
अश्या परिस्थितीत १९४१ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. इंग्लंडचे जर्मनी-जपानशी युद्ध जुंपले. या संधीचा फायदा घेऊन देशगौरव सुभाषचंद्र बोसांनी हिंदुस्थान सोडून जर्मनीत प्रयाण केले व तेथून ते जपानमध्ये गेले. त्यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली. इंग्रजांच्या सैन्यातील अनेक भारतीय सैनिक सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेत दाखल झाले व त्यांनी 'चलो दिली' अशी रणगर्जना करीत इंग्रज सैन्याला इंफालपर्यंत मागे रेटीत आणले. इकडे ८ ऑगस्ट १९४२ ला महात्मा गांधींनी 'चले जाव' चळवळीचे रणशिंग फुंकले. सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांनी बाहेरून व आतून इंग्रजी सत्तेवर प्राणघातक प्रहार करून तिला कोंडीत पकडले. सर्व शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशा इंग्रज सरकारला भारतीय जनतेसमोर नमावे लागले. १५ ऑगस्ट १९४७ ला भारताच्या क्षितिजावर स्वातंत्र्यसूर्याचा उदय झाला. ज्या ज्ञातअज्ञात देशभक्तांचे प्रयत्न स्वातंत्र्यप्राप्तीला कारणीभूत झाले त्या सर्वांना आजच्या मंगल दिवशी सादर प्रणाम करून मी आपली रजा घेते.
'मी आपली रजा घेते' ऐवजी 'मी आपली रजा घेतो' असा बदल केला की मुळात बेबीसाठी लिहिलेले हे भाषण बंडू पण ठोकू शकतो. चार मुले व तीन मुली असणाऱ्या व शिक्षणाच्या बाबतीत मुलगा-मुलगी हा भेदभाव न करणाऱ्या बाबांना भाषण लिहितांना ही सोयीची बाब लक्षात ठेवणे भागच होते. असो.
१९५० किंवा त्याही पूर्वी लिहिलेले हे भाषण असावे. स्वतंत्र भारत अगदी तान्हा होता. त्याला नजर येणे, त्याचे पालथे पडणे, त्याचे पुढे सरकणे, त्याचे रांगणे यावर अर्थातच काही भाष्य नाही. हा केवळ जन्माचा अध्याय!
पाहता पाहता १० वर्षे लोटली. १९५७ उजाडले. स्वातंत्र्याला दहा वर्षे पूर्ण झालीत. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाला १०० वर्षे पूर्ण झालीत. दुहेरी योग. भाषणांसाठी नवे विषय. बाबांच्या लेखणीला नवीन खाद्य.
१८५७ चे क्रांतिसमर
१८५७ चे क्रांतिसमर होऊन आता एक शतक लोटले आणि आपणाला स्वातंत्र्य मिळून एक दशक पूर्ण झाले. या दोन्ही गोष्टींचे स्मरण करावयाला आपण येथे जमलो आहोत.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपणाला स्वातंत्र्य मिळाले ते काही आकाशातून पडले नाही किंवा इंग्रज लोकांनी आपणाला ते सहजासहजी दिले नाही. कोणत्याहि मोठ्या गोष्टीमागे एक महान इतिहास दडलेला असतो. अनेक वर्षे स्वातंत्र्याचा प्रयत्न अखंड चालू होता, आणि त्याचा मोबदला म्हणून आपणाला हे स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेल्या सर्व प्रयत्नांत १८५७ सालचे स्वातंत्र्ययुद्ध हा सर्वात मोठा प्रयत्न आहे.
क्रौर्य, वंचकता व अपहारक स्वार्थी प्रवृत्ती यांच्या जोरावरच इंग्रजांनी आपले राज्य टिकवून धरले. अन्यायाने, धर्मच्छलाने आतल्या आत खदखदणारा क्रांतीचा ज्वालामुखी १८५७ साली एकदम उफाळून वर आला. १८५७ सालचे युद्ध म्हणजे स्वार्थी शिपायांची उठावणी नव्हती. ते जनतेचे युद्ध होते, धर्मयुद्ध होते. केवळ शिपायांचे ते युद्ध असते, तर झाशीची राणी, बहादुरशहा, नानासाहेब पेशवे, वगैरे सुखात जीवन व्यतीत करू शकणारे लोक कशाला त्या युद्धात पडले असते? इंग्रजांच्या क्रौर्याने चिडून जाऊन, त्यांनी चालविलेल्या धर्माच्या छळाने क्रोधित होऊन सारी जनता सापडले ते हाती घेऊन इंग्रजांशी लढत होती. मरणाची त्यांना तमाच उरली नव्हती. इंग्रजाना या देशातून हाकलून देऊन आपले स्वतःचे राज्य स्थापण्यास ते उत्सुक होते.
परंतु काही देशद्रोही लोक इंग्रजांना मदत करण्यास सिद्ध झालेच. स्वार्थ काय घडवून आणत नाही? 'लोभ मूलानि पापानि' लोभ हे तर पापाचे मूळ. आणि ३ रु. ४ आणे पगाराच्या शिपायांना २० रु. हे काय कमी प्रलोभन होते? याच कुटिल नीतीच्या भरवशावर या युद्धात इंग्रजांनी जय मिळविला.
'अनंते ठेविले तैसेचि राहावे । चित्ती असू द्यावे समाधान ।' ह्या तुकारामाच्या उपदेशावर मनापासून विश्वास ठेवून काही लोक स्वस्थच बसले.
आपल्या असामान्य शौर्याच्या जोरावर 'अयशस्वी शिवाजी' अशी पदवी मिळविणारा तात्या टोपे, 'मला तोफेच्या तोंडी द्या, फासावर लटकवू नका' असे सांगणारा झोरापुरचा तरुण राजा, ८० वर्षांचा सर्वात वृद्ध सेनानी कुमारसिंह, ५७ च्या युद्धाचे सुत्रधार नानासाहेब पेशवे, वीरांनाही लाजविणारी झाशीची राणी! सत्तावनच्या युद्धातील या प्रत्येकाची थोरवी निराळी आहे. प्रत्यक्ष शत्रूने देखील यांची स्तुति गाईली आहे. इंग्रजांपेक्षा आमचे शौर्य कमी पडले म्हणून हे स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी ठरले नाही, तर संयम सुटल्याने घात झाला.
ठरलेल्या दिवशी ३१ मे ला उठाव झाला असता तर तोच आमचा स्वातंत्र्यदिन ठरला असता. पण १० मे लाच शत्रूला चेतावणी मिळाल्यामुळे सारे मनोरथ धुळीस मिळाले. कधी न घडलेली हिंदु मुसलमानांची एकीसुद्धा यावेळी झाली. परंतु फितुरी नष्ट झाली नाही. आणि त्या फितुरीनेच शेवटी देशाला आग लावली.
असो; चुका झाल्याशिवाय प्रयत्नांत दुरुस्ती करता येत नसते. १८५७ सालचा एक महान प्रयत्न अयशस्वी झाला. इंग्रजांची दडपशाही अधिकच वाढली. ह्या स्वातंत्र्यसमरात भाग घेणाऱ्यांची प्रेते झाडाझाडावरून लटकविण्यात आली. वृद्धांची, स्त्रियांची व निष्पाप अर्भकांची इंग्रजांनी कत्तल केली. पण स्वातंत्र्याची लालसा कमी झाली नाही. ती अधिकाधिक बळावतच गेली. ५७ पासून स्फूर्ति घेऊन अनेक देशभक्त कार्यास लागले. आणि शेवटी आपला देश स्वतंत्र झाला. आज त्याहि गोष्टीला दहा वर्षे होऊन गेली. ह्या शंभर वर्षांच्या इतिहासाचे पान न पान भारतीयांच्या रक्ताने न्हाऊन निघाले आहे. वासुदेव बळवंत फडके, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक, रँडचा खून करणारे शौर्यवंत चाफेकर बंधु, अरविंद घोष, नरेंद्रासारख्या फितुराला मारणारे कन्हैय्यालाल दत्त व सत्येंद्र, स्वातंत्र्यवीर सावरकर, देशासाठी अविचल मनाने फासावर लटकणारे खुदीराम बोस, कान्हेरे, भारतीय जनतेचा धुमसता असंतोष जगाच्या वेशीवर टांगणारे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, आपल्या प्राणसुमनांची हसत हसत कुरवंडी करणारे अनेक वृद्ध, तरुण व बालबालिका, सायमन कमिशनवरील बहिष्काराच्या वेळी इंग्रजांच्या खुनशी लाठीला बळी पडलेले लाला लजपतराय, भारतीय सीमेच्या बाहेरहि हिंदुस्थानचे स्वातंत्र्ययुद्ध पेटविणारे आझाद हिंद फौजेचे जनक आणि ब्रह्मदेशाच्या सीमेवर इंग्रजांच्या सुसज्ज सेनेशी सशस्त्र सामना देणारे देशगौरव सुभाषचंद्र बोस, सैतानी इंग्रज नोकरशाहीला आपल्या अनत्याचारी युद्धाच्या नवीन तंत्राने सळो की पळो करून सोडणारे महात्मा गांधी आणि पितापुत्र नेहरूंच्या सारखे त्यांचे देशभर पसरलेले अनुयायी हे सारेच्या सारे १८५७ च्या स्वातंत्र्य समराचे अपयश आपल्या भगीरथ प्रयत्नांनी पुसून काढण्याचे वीरकंकण हाती बांधलेले शूर सेनानी होते हे विसरून चालणार नाही. हे सारे शूरवीर आम्हाला जणू काय आजच्या मंगलदिवशी आपल्या ध्येयपथावर अग्रेसर होण्याकरिता तेजस्वी संदेशच देत आहेत. त्या सर्व वीरांचे स्मरण करणे आणि नमन करणे आपले कर्त्तव्य आहे. लाखो देशभक्तांनी आपल्या प्राणांचे मोल देऊन आपणास मिळवून दिलेले स्वराज्य टिकविणे हे आपले काम आहे. देशासाठी ज्या ज्ञात व अज्ञात वीरांनी बलिदाने दिलीत त्या सर्वांना प्रणाम करून मी आपले भाषण संपवितो.
माझा देश
माझा आजच्या भाषणाचा विषय 'माझा देश' असा आहे. 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी'. मातृभूमीची थोरवी स्वर्गाहूनही मोठी आहे. आणि म्हणूनच 'माझा देश' हे शब्द उच्चारताक्षणीच अत्यंत उच्च, उदात्त, पवित्र, मंगल अशा भावनोर्मींची गर्दी झाल्याशिवाय राहत नाही. सर वाल्टर स्कॉट या इंग्रज कवीने Breathes there the man, with soul so dead या आपल्या प्रसिद्ध कवितेत असेच विचार प्रकट केले आहेत. ज्याच्या हृदयात जन्मभूमीचे नाव उच्चारता क्षणीच वरील प्रमाणे भावना उद्भूत होत नाहीत, तो जिवंत असून देखील मेल्याप्रमाणेच होय, इतकेच नव्हे तर तो एक वेळच काय, पण अनेक वेळ मरतो. Doubly dying shall go down असेही तो देशाभिमानी कवी शेवटी म्हणतो. मग आमच्या देशाबद्दल तर बोलायलाच नको. हिमगिरीच्या धवल हिमाच्छादित शिखरांचा रजत किरीट जिच्या माथ्यावर विराजमान आहे, दक्षिणसिंधू जिचे चरणप्रक्षालन करीत आहे, अशी ही भारतमाता आमच्या हृदयाचे स्फूर्तिनिधान आहे. आमच्या देशाची कामगिरी महनीय आहे. धार्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, आदि सर्व बाबतीत आमचा देश सर्वश्रेष्ठ ठरला आहे.
धर्म हे तर माझ्या देशाचे जीवन. स्वामी विवेकानंद म्हणत, 'धर्म हे हिंदुस्थानचे जीवन आहे. धर्म बुडाला म्हणजे हिंदुस्थान मेला.'. सर्व जगास वंदनीय ठरलेला हिंदुधर्म आमच्याच भारत देशात निर्माण झाला. सर्व आशिया खंडात अल्पावधीत पसरणारा बौद्धधर्म येथेच जन्मला.
भारताने विचारांची अमोल देणगी साऱ्या जगास दिली. आमच्या थोर ऋषिमुनींनी ....
महाभारत, रामायण यासारखे विशाल ग्रंथ आमच्या देशात निर्माण झाले. त्याची सर कुणीहि करणार नाही. 'व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्' असे म्हणूनच आम्हास मोठ्या अभिमानाने म्हणावेसे वाटते.
माझ्या देशात पुरातन काळापासून राष्ट्रीय वृत्ती आढळून येते. ती आम्ही कुणापासून उसनी घेतली नाही. अत्यंत प्राचीन काळापासून तर अगदी परवा परवा पर्यंतचा कोणताही भारतीय लेखक घ््या. तो जरी एका भाषेतून लिहीत असला, तरी त्याने सर्व उपदेश अखिल भारतीयांना केला आहे, असे आपणास आढळून येईल. आजपर्यंत भारतावर ज्या अनेक स्वाऱ्या झाल्या, त्या सर्वांना भारतीयांनी एकमुखाने तोंड दिले, शकांची शकले उडविली, हुणांना हाणून काढले, आणि आपला देश, आपली संस्कृति कायम राखली. ग्रीससारखी एकेकाळी सुधारलेली राष्ट्रे आज रसातळाला गेली आहेत. आणि अनेक संस्कृति नामशेष झाल्या.
भारत अविचाराने कधीच वागला नाही. आमचे डोके कितीहि वर गेले तरी पाय मात्र जमीनीलाच चिकटले राहतील. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला आणि यंदाच त्याची दशाब्दि साजरी झाली. पूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत होता म्हणून भारताकडे साऱ्या जगाचे लक्ष केंद्रीत झाले होते, तर आज भारताचे परराष्ट्रीय धोरण, भारताची शांततेची दृष्टी म्हणून जगाचे डोळे त्याच्याकडे लागले आहेत. पं. जवाहरलाल नेहरू - माझ्या देशाचे पंतप्रधान - यांना सारे जग शांतिदूत म्हणून मान देते. आज तिसऱ्या महायुद्धाची भीती नष्ट करण्याचा, महायुद्ध दूर ढकलण्याचा प्रयत्न जर कोणी करीत असेल तर भारत - माझा देश. पारतंत्र्यामुळे मागे पडलेला भारत केवळ १० वर्षांच्या काळात प्रगति पथावर इतका पुढे आहे याला कारण भारताचा दुर्दम्य आशावाद, उज्ज्वल भविष्यकाळाविषयीचा अदम्य विश्वास. सिंद्रीचा खताचा कारखाना, भाकरा नानगल सारखी जगातील मोठी धरणे, भिलईचा लोखंडाचा कारखाना, इत्यादि मोठमोठ्या योजना भारतास पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आणि आज आम्हाला ही खात्री आहे की भारत - आमचा देश - जगाचे गुरुस्थान विभूषित केल्याशिवाय राहणार नाही.
जयहिंद!
'आमच्या थोर ऋषिमुनींनी....' मूळ हस्तलिखितातच तसे आहे. येथे बहुधा बाबांनी दुसऱ्या त्यांच्याच एखाद्या निबंधातला एखादा परिच्छेद जसाच्या तसा घेण्याची सूचना प्रत्यक्ष भाषणकर्त्याला दिली असावी व त्याने ती अंमलात आणली असावी. असे बरेचदा झाले आहे. मुळातले स्वलिखित मोठे भाषण मूळ हस्तलिखितावरच कधी काटछाट करून बाबांनी छोटे केले आहे, कधी छोटे भाषण जोडजाड करून जाडजूड केले आहे. 'आल्टर टेलर' सारखाच प्रकार!
काळ आणखी पुढे सरकला. 'दिनमपि रजनी सायंप्रातः । शिशिर वसंतौ पुनरायातः । कालः क्रीडति गच्छत्यायुः ।' प्रमाणे १ ऑगस्ट, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, पुन्हा १ ऑगस्ट हे राष्ट्रीय सणांचे चक्र अव्याहत सुरू होते. आणि त्याबरोबरच भाषणशृंखलेत एक एक कडी जुडत होती.
आम्ही स्वातंत्र्योत्तर काळात अधिक सुखी झालो काय?
आम्ही स्वातंत्र्योत्तर काळात अधिक सुखी झालो काय? हा आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय म्हणजे मोठाच कूट प्रश्न आहे. या प्रश्नाचा वरवर विचार करून त्याचे कामचलाऊ उत्तर देऊन भागणार नाही. तर त्याकरिता मूलगामी व सर्वंकष विचाराची आवश्यकता आहे. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला, दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचे जोखड मानेवरून झुगारून देऊन ताठ मानेने जगासमोर उभा राहिला हे आपणा सर्वांना माहीतच आहे. स्वातंत्र्यप्राप्तीला आज एक तपाहून अधिक काळ लोटून गेला आहे. या तेरा वर्षांतील घडलेल्या घटना व घडामोडींचा साकल्याने विचार करून आणि भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व औद्योगिक प्रगतीचे सिंहावलोकन करूनच आपणासमोरील प्रश्नाचा निर्णय आपणाला घ््यावा लागेल.
सुख म्हणजे काय? केवळ क्षणिक की शाश्वत, शारीरिक की मानसिक, आधिभौतिक की आध्यात्मिक, याचाहि प्रस्तुत प्रश्नाच्या अनुषंगाने विचार करणे आवश्यक आहे. आज सर्व वस्तूंचे भाव अतिशय कडाडले आहेत, महागाईचा भस्मासुर आम्हाला सारखा भेडसावीत आहे, अन्न, वस्त्र व आश्रयस्थान या माणसाच्या मूलभूत गरजा देखील मिळणे आम्हाला कठिण झाले आहे, मध्यम वर्गाची स्थिति अतिशय हलाखीची व शोचनीय झाली आहे, करांच्या ओझ्याखाली सर्वसाधारण जनता अगदी दडपून गेली आहे, आणि रावापासून तो रंकापर्यंत सारेच आर्थिक विवंचनेने ग्रस्त होऊन अगदी मेटाकुटीस आले आहेत, ही परिस्थिति कोणीहि दृष्टिआड करू शकत नाही. एवढाच एका बाजूचा, सकृद्दर्शनी एकदम नजरेत भरणाऱ्या वरपांगी बाह्य परिस्थितीचा विचार केला तर स्वातंत्र्योत्तर काळात आम्ही सुखी होण्याऐवजी दुःखीच झालो आहोत असेच कोणीही म्हणेल. पण असा वरवर विचार म्हणजे खरा विचार नव्हे. पोपटाला सोन्याच्या पिंजऱ्यात डाळिंबाचे लाल लाल दाणे खायला मिळण्यापेक्षा रानावनात स्वतंत्र व स्वैरपणे विहार करून झाडावरील कच्ची वा पक्की, गोड वा कडवट, जशी मिळतील तशी फळे चाखण्यातच सुख वाटते. सोनेरी पिंजऱ्याचे दार थोडेसे किलकिले होताच त्याची तेथून सुटण्याकरिता धडपड व फडफड सुरू होते आणि संधि सापडताच तो तेथून निसटतो. सर्कशीतल्या सिंहाला पिंजऱ्यात बंदिस्त राहणे आवडते काय? अरण्यातील त्याची डरकाळी ऐकताच सारे रान भयभीत होते, पण त्यालाच सर्कशीत मालकाच्या चाबकाच्या फटकाऱ्याच्या इशाऱ्याबरहुकुम नाचावे लागते. पशुपक्ष्यांना स्वातंत्र्याची जर एवढी मातब्बरी वाटते तर ती माणसाला वाटू नये काय? आम्हाला कितीहि हालअपेष्टा आज सोसाव्या लागत असल्या तरी आम्ही स्वतंत्र आहोत ही एकच गोष्ट आम्हाला सुखाचे समाधान किंवा समाधानाचे सुख देण्यास पुरेशी आहे. आणि ही महागाई, आर्थिक हलाखी व करांचे असह्य ओझे म्हणजे पंचवार्षिक योजनांच्या यशस्वीतेनंतर भारताची जी भरभराट होणार आहे तिच्याकरिता द्यावी लागणारी किंमत आहे. पुढच्या सुखाकरिता आज ही थोडीशी दुःखाची कळ सोसावीच लागणार आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर फार मोठे बदल घडून आले आहेत. संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण झाल्यामुळे त्या संस्थानातील प्रजा अत्यंत सुखी झाली आहे व भारतासमोरील एका मोठ्याच प्रश्नाची सोडवणूक झाली आहे. मालगुजारी व जमीनदारीचा नायनाट झाल्यामुळे भांडवलशाहीचे कंबरडेच मोडले आहे, व शेतकरी वर्गाच्या सुखात फार मोठी भर पडली आहे. बिगारीची पद्धत कायद्याने नष्ट झाल्यामुळे खेड्यापाड्यातील लोकांवर सरकारी अधिकाऱ्याकडून व मालगुजाराकडून होणारा असह्य जुलूम कायमचा नष्ट झाला आहे. अस्पृश्यता ही कायद्याने बेकायदेशीर ठरविण्यात आली आहे. त्यामुळे एका मोठ्या सामाजिक अन्यायाचे निराकरण झाले आहे.
भारताच्या सांस्कृतिक उन्नतीकडे भारत सरकार मोठ्या कसोशीने लक्ष पुरवीत आहे. विज्ञान, साहित्य आणि कला यांची गेल्या तेरा वर्षात अतिशय भरभराट झाली असल्याचे कोणाही डोळस निरीक्षकाला दिसून आल्याशिवाय राहणार नाही. सुप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक श्री. भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेले मुंबईचे अणूशक्तिकेंद्र, पेनिसिलीनचा कारखाना, देशात निरनिराळ्या ठिकाणी सुरू झालेली एंजिनियरिंग व तांत्रिक महाविद्यालये याची साक्ष देत आहेत. साहित्यिकांना आणि कलावंतांनाहि भारत सरकार फार मोठ्या प्रमाणावर उत्तेजन देत आहे. सर्व भाषांतील साहित्य, शास्त्रीय आणि ललित, प्रगतिपथावर आहे. नाट्य, नृत्य संगीत, चित्रकला, शिल्प इत्यादि सर्व कलांची क्षितिजे विस्तार पावत आहेत आणि मृतप्राय झालेल्या जुन्या कलांचा देखील कायाकल्प घडून येत आहे.
या तेरा वर्षात भारताची जी शैक्षणिक प्रगति झाली आहे ती डोळ्याआड करण्याजोगी नाही. इंग्रज सरकारने देशाच्या शैक्षणिक विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले होते व परिणामतः देशाची बहुसंख्य जनता निरक्षर राहिली. ही परिस्थिति झपाट्याने पालटत आहे. साक्षरतेचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि शाळा, कॉलेजे यांची संख्या सारखी वाढत असून देखील ती विद्यार्थ्यांना अपुरी पडत आहे.
भारताची या तेरा वर्षातील आर्थिक व औद्योगिक प्रगति तर विस्मयावह आहे. दोन पंचवार्षिक योजना पार पडून तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची तयारी सुरू आहे. आज जरी नाही तरी १५ वर्षांनतर या योजनांची मधुर फळे आपणास चाखावयास मिळतील असे तज्ज्ञांचे मत आहे. भिलई, रूरकेला, चित्तरंजन, सिंद्री, नेपानगर येथील कारखाने भारताच्या औद्योगीकरणाची साक्ष देत आहेत आणि नजीकच्या भविष्यात भारत केवळ शेतकीप्रधान राष्ट्र न राहता शेतकी आणि उद्योगधंदे हे परस्परांच्या हातात हात घालून एकमेकास पूरक ठरतील. हिंदुस्थानात कच्चा माल तयार व्हावा व तो सारा परदेशात पाठविल्या जाऊन तेथून पक्का माल तयार होऊन तो हिंदुस्थानात अवाच्या सव्वा किमतीने विकल्या जावा ही परिस्थिति अत्यंत भीषण होती. त्यामुळे भारताचे प्रचंड प्रमाणावर आर्थिक शोषण होत होते. पण यापुढे देशातच पक्का माल तयार होईल व देशातला पैसा देशातच राहील. पावसाच्या लहरीपणामुळे भारताच्या शेतीची काही शाश्वतीच नसे. पण आता भाकरा-नानगल सारख्या धरणांनी व कालव्यांनी शेती परावलंबी राहणार नाही, आणि भारत अन्नधान्याच्या बाबतीत लवकरच स्वयंपूर्ण बनेल. अशा रीतीने भारत सर्व क्षेत्रात प्रगतिपथावर चाल करीत आहे, आणि आम्ही स्वातंत्र्योत्तर काळात अधिक सुखी झालो आहोत असेच पूर्ण विचारांती म्हणणे भाग आहे.
तेराचा आकडा अशुभ मानतात. १३ व्या स्वातंत्र्यदिनासाठी लिहिलेल्या ह्या भाषणात स्वातंत्र्योत्तर भारतात जनतेला सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा उमटल्या आहेत. स्वातंत्र्याची गोडी हळूहळू फिकी पडतांना दिसते. ह्या समस्यांची धार बोथट करण्याचा बाबांचा प्रयत्न बराच यशस्वी झाला आहे. 'थोडी कळ सोसा, भविष्यकाळ उज्ज्वल आहे' हे सामान्य जनतेला पटवून देण्यात तत्कालीन राज्यकर्तेही यशस्वी झाले होते असाही मनात विचार येतो. बाबांनी नुकतेच लोकाग्रहास्तव आत्मचरित्र लिहिले, मज्जीवनमणिमाला त्याचे नांव. त्यात स्वतःचे नगण्यत्व स्पष्ट करतांना 'मी ना खासदार, ना आमदार, ना साधा तहसिलदार. मी केवळ एक मतदार' असे त्यांनी म्हटले आहे. हा साधाभोळा सामान्य मतदार व त्याला चांगलेच समजून घेतलेले भालदार-चोपदार दिमतीला असणारे आपले राजासमान खासदार- आमदार वरील भाषणात लपता लपत नाहीत.
समस्यांचा उल्लेख करूनहि भाषणाचा एकंदर सूर 'शाबास, बहोत अच्छे!' असा असण्याचे आणखी एक व मुख्य कारण लक्षात घेण्यासारखे आहे. हे व अशीच आणखी कितीतरी भाषणे एखादा संस्कारक्षम शालेय विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी तत्सम श्रोत्यांसमोर देणार. देशाविषयी अभिमानाचे बीज पेरण्याऐवजी कटुता रुजवून तेथे चालणार नाही, या गोष्टीचे भान ठेवून लिखाण करणे बाबांसारख्या शिक्षकाला सहज साध्य होते. नावाजलेले पार्श्वगायक एखादे गाणे पडद्यावर कोण वठवणार हे मनात ठेवून आवाजात आवश्यक फेरबदल करतात. हे ज्याला साधेल तो उत्तम पार्श्वगायक. पार्श्वगायनात व आम्हाला भाषणे लिहून देण्यात तसा फार थोडा फरक आहे. पार्श्वगायक पडद्यावरील पात्राला उच्चार पुरवतो व ते पात्र ओठ हलविते, आम्ही भाषणे स्वतः उच्चारली पण शब्द आणि विचार बाबांनी पुरविले. बाबा उत्तम पार्श्वलेखक होते.
काळ आणखी पुढे सरकला. आंतरिक समस्या वाढतच गेल्या. आणि त्यातच 'घरचं झालं थोडं, अन् व्याह्यानं धाडलं घोडं' असे म्हणायची वेळ आली.
भारतावर परचक्र आले तर?
भारतावर परचक्र आले तर? ही कल्पनाच मनाला किती उद्विग्न करणारी आहे! पण आता ही केवळ कल्पनाहि राहिली नाही. परचक्राची पावले द्रुतगतीने भारताच्या भूमीवर पुढे पुढे पडत आहेत असे ताज्या घडामोडींवरून दिसते. 'हिंदी चीनी भाई भाई' अशा मित्रत्वाच्या घोषणा करीत चिनी लोकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. पाकिस्तानलाही अधूनमधून गुरगुर करण्याची लहर येते. नेपाळ गंगेपर्यंतचा प्रदेश आमचाच होता असे नुकतेच बरळला आहे. चीनने भारताची नेफा सरहद्दीवरील तीन ठाणी नुकतीच काबीज केल्याची वार्ता येऊन थडकली आहे. भारत सरकार मात्र अजूनही चीनला स्वतःची चूक समजेल व तो आपले आक्रमक पाऊल मागे घेईल अशी भ्रामक आशा उराशी बाळगून आहे. भारताच्या सरहद्दीवरील सारी राष्ट्रे परस्परांशी संगनमत करून भारताविरूद्ध एक साखळी निर्माण करीत असल्याचा बनाव दिसून येत आहे. ही सारी परिस्थिति पाहिली म्हणजे हिंदुस्थानच्या भवितव्याविषयी मन शंकाकुल होऊन भीति वाटायला लागते. दीडशे वर्षांच्या दीर्घकालीन गुलामगिरीनंतर भारत स्वतंत्र होऊन अवघी १५ वर्षे झाली नाहीत तोच पारतंत्र्याच्या काळ्या सावल्या त्याला भेडसावित आहेत हा दैवदुर्विलासच नव्हे काय? पण यात नवल तरी कां म्हणून वाटावे? परचक्र हे भारताच्या पाचवीलाच पुजलेले आहे. भारताकडे परकीय राष्ट्रांची बुभुक्षित दृष्टि नेहमीच वळलेली असते. हिंदुस्थानवर आजवर काही थोड्याथोडक्या स्वाऱ्या झाल्या नाहीत. शक, हूण, सिकंदर, नादिरशहा, तैमूरलंग, अल्लाउद्दीन, बाबर, अब्दाली, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज या साऱ्यांनी भारतावर स्वाऱ्या करून त्याची राजकीय व आर्थिक लूट केली आहे. आजवर हिमालयाची उत्तर सरहद्द ही अभेद्य समजली जात असे. पण तिकडूनहि आता धोका उत्पन्न झाला आहे. भारताने केव्हाहि गाफिल राहता कामा नये. त्याने सदैव जागरूक राहिले पाहिजे. डोळ्यात तेल घालून आपल्या सीमांचे रक्षण केले पाहिजे.
भारत चीन यांत सध्या अघोषित लढाई सुरूच आहे. उभय सैन्यांत चकमकी झडत आहेत. या अघोषित लढाईचे घोषित युद्धात केव्हा रूपांतर होईल याचा नेम नाही.
भारतावर परचक्र आले तर प्रत्येक भारतीय तरुणाने प्राणपणाने आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी लढले पाहिजे. तसू तसू भूमीसाठी प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे. पंचशील, सत्य, अहिंसा यांचा वेळी अवेळी उदोउदो करण्यात येतो. ही सर्व तत्त्वे आपल्यापरी म्हणून श्रेष्ठ असली तरी ती सर्व काळी व सर्व परिस्थितीत व्यवहार्य ठरू शकत नाहीत. राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जेथे उपस्थित होतो तेथे स्वातंत्र्याचे रक्षण हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय. राष्ट्राच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी केलेली हिंसा ही हिंसाच नव्हे. किंबहुना राष्ट्र धोक्यात असताना त्यावेळी पाळलेली अहिंसा हीच हिंसा होय. कारण त्या अहिंसेचे पर्यवसान सारे राष्ट्र खच्ची होण्यात होईल. हा विवेक परचक्राच्या वेळी बाळगला पाहिजे. शत्रूच्या ठोश्याचे उत्तर ठोश्यानेच दिले पाहिजे. शत्रूने एका गालात थापड मारली तर दुसरा गाल पुढे करण्याचे तत्त्वज्ञान येथे उपयोगाचे नाही.
धटासी आणावा धट । उद्धटासी उद्धट ।
खटनटासी खटनट । अगत्य करी ।।
ही रामदासांची नीतीच परचक्राचे वेळी अवलंबिली पाहिजे. भुसभुशीत दिसले की कोपराने खणण्याचा मानवाचा स्वभाव आहे. तेव्हा आपण कणखर राहिले पाहिजे. शत्रूला आपला धाक वाटला पाहिजे. भारताकडे वाकड्या दृष्टीने पाहिल्यास आपला डोळा उडविला जाईल, भारतावर हात उगारल्यास तो छाटला जाईल अशी दहशत शत्रूच्या मनात निर्माण केली पाहिजे. तरच भारताची शेजारच्या राष्ट्रांकडून चाललेली लांडगेतोड थांबणार आहे, एरवी नाही. 'दंडस्यहि भयात्सर्वं जगत्भोगाय कल्पते' हेच खरे.
भारतावर परचक्र आले तर आपण आपसातील सारे मतभेद मिटविले पाहिजेत. भाषावाद, प्रांतवाद, जातिवाद, धर्मवाद, संप्रदायवाद, हे सारे क्षुल्लक वाद व्यापक राष्ट्रवादात विलीन झाले पाहिजेत. सारे भारतीय इथून तिथून एक आहोत अशी राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव प्रत्येकाच्या हृदयात दृढमूल झाली पाहिजे. एवढेच नव्हे तर शस्त्रास्त्रांच्या बाबतीतहि भारताने सुसज्ज राहिले पाहिजे. विज्ञानाच्या बाबतीत आपण अजून जगाच्या बरेच मागे आहोत. रशिया, अमेरिका चंद्रावर, मंगळावर आपले निशाण रोवण्याची भाषा बोलत आहेत तर भारताच्या पायाखालची भूमीच ढासळत आहे. सध्याचे युग हे अणुयुग आहे. अणुशक्तीच्या बाबतीत भारताने संशोधन केले पाहिजे. वेळ मोठी आणीबाणीची आहे. कोठून केव्हा परचक्र येईल याचा नेम नाही. मित्र केव्हा वैरी होतील हे सांगता येत नाही. भरवशाचे लोकही दगा देतील. तेव्हा हे भारता! कोणावरही विश्वासू नकोस. वैऱ्याची रात्र आहे. जागा राहा.
शेवटी चीनचे आक्रमण झाले. आधीच अपुऱ्या असलेल्या प्रगतीच्या गतीला खीळ बसली. देशाच्या प्राथमिकता बदलल्या. देशाचे डोळे उघडले. मूळ गरजांची पूर्ती करण्यालाच जेथे संपत्ति व साधने अपुरी पडत तेथे सैन्यावर व शस्त्रास्त्रांवर अफाट खर्च होऊ लागला. चीनने पाठीत खंजीर खुपसला आणि पुन्हा पाठीवर मार नको म्हणून भारतवासी पोटावर मार सोसू लागले. आणि तशातहि मिरवणूक, मोर्चे, जुलूस काढून 'अरे अरे रे, काय झालं रे, चाउ एन लाय मेला रे' म्हणत आक्रमणाचा धिक्कार करू लागले. दैनंदिन जीवनातील समस्यांमुळे कोंडीत सापडून विरोधाची भाषा बोलू पाहणारा सामान्य नागरिक पुन्हा एकदा (देश)भक्तिरस व वीररसात डुंबू लागला.
स्वातंत्र्यदिन
आज १५ ऑगस्ट, भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा दिवस. १८ वर्षांपूर्वी याच दिवशी भारत देश इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या चरकातून मुक्त झाला. आमची प्रिय भारतमाता याच सुमुहूर्तावर पारतंत्र्याच्या प्राणघातक मगरमिठीतून सुटली आणि स्वातंत्र्यसुखाचा आस्वाद घेऊ लागली. मुलगा १८ वर्षांचा झाला म्हणजे त्याचे शैशव संपून त्याला प्रौढत्व प्राप्त होते असा सार्वत्रिक समज आहे. एवढेच नव्हे तर कायद्याच्या परिभाषेत सुद्धा तो मायनर न राहता मेजर बनतो. या दृष्टीने विचार करता भारतीय स्वातंत्र्याला आजपासून परिणत दशा प्राप्त झाली असे म्हणावयास हरकत नाही.
बालदशेत बालकाला अनेक रोगराईंना तोंड द्यावे लागते. तद्वतच गेल्या अठरा वर्षांच्या काळात हिंदुस्थानला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागले. कित्येक प्रसंगी तर जीवन-मरणाच्या झगड्यातून त्याला पार व्हावे लागले. ह्या सगळ्या संकटपरंपरेला भारताच्या फाळणीने सुरुवात झाली. फाळणीनंतर सामूहिक दंगलींनी पेट घेतला. पिसाट धर्मांधतेने भडकवलेल्या या दंगलींचा प्रतिरोध करण्याच्या प्रयत्नातच महात्मा गांधींचा देहांत झाला व राष्ट्रपित्याच्या मृत्यूने राष्ट्र पोरके झाले. निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, संस्थानांचा प्रश्न, भाषावार प्रांतपुनर्रचनेचा प्रश्न, अन्नधान्याचा प्रश्न, राज्यसीमावाद, भाषिकवाद, काश्मीरचा प्रश्न, गोव्याचा प्रश्न, उत्तर व ईशान्य सीमेचा प्रश्न, लाल चीनची स्वारी, पाकिस्तानच्या आक्रमक कारवाया, कच्छ प्रकरण इत्यादि अनेक प्रश्न, वाद व समस्या आपापल्या परीने भारताला बेजार करत्या झाल्या. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि आपणा सर्वांचे आवडते दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली यांपैकी काही समस्या सोडविण्यात आल्या व काही अजूनही राष्ट्राची डोकेदुखी होऊन बसल्या आहेत.
गेल्या अठरा वर्षात भारताची यांत्रिक, तांत्रिक, वैज्ञानिक, धंदेविषयक, शेतकीविषयक, संरक्षणविषयक बरीच प्रगति झाली आहे. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या ग्रहणाने ग्रासलेल्या राष्ट्राचे उत्थान यक्षिणीची कांडी फिरल्याप्रमाणे थोडेच होणार आहे? 'दे दान, छुटे गिराण' असे आपण म्हटले म्हणूनच सूर्याचे ग्रहण सुटले असे कुणा बिचाऱ्यांना खुशाल वाटो, किंवा आपला कोंबडा आरवला म्हणूनच सूर्योदय झाला अशी त्या बापड्या म्हातारीने खुशाल आपली समजूत करून घ््यावी; पण खरी वस्तुस्थिति काही तशी नसते. पृथ्वीला आपल्या आसाभोवती पूर्ण एक प्रदक्षिणा करावी लागते तेव्हा कोठे पुन्हा सूर्योदय होतो. सूर्यचंद्रपृथ्वीच्या परस्पर सापेक्ष गतीमुळे सूर्यावर किंवा चंद्रावर पडलेल्या छायेचा निरास होतो तेव्हा ग्रहण सुटते हे सत्य आपल्यासारख्या भूगोलाच्या अभ्यासकांना ज्ञात नाही असे मी कसे म्हणू? माझ्या म्हणण्याचा मतलब एवढाच की हे प्रश्न सोडविण्याकरिता फार मोठी तयारी, परिश्रम, त्याग, धैर्य आणि ध्येयनिष्ठा यांची आवश्यकता आहे, आणि ही आवश्यकता ज्या प्रमाणात पुरविली जाईल त्या प्रमाणात या समस्या हळू हळू सुटतील. उपर्युक्त समस्यांपैकी काही समस्या तर अशा आहेत की त्यांची मुळे ब्रिटीश आमदानीतच रुजली गेली आहेत. त्यांचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय ते प्रश्न सुटणार नाहीत. या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काय काय घडामोडी घडल्या याचा हा धावता आढावा झाला. पण भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले, कोणाचे प्रयत्न त्याला कारणीभूत झाले हा आज विचार करण्यासारखा महत्त्वाचा प्रश्न आहे. हिंसा-अहिंसेच्या समर्थकांनी एकमेकांवर या बाबतीत खुशाल तोंडसुख घ््यावे, आपल्याच प्रयत्नाने स्वातंत्र्यप्राप्ति झाली असे खुशाल प्रतिपादन करावे. खरी वस्तुस्थिति अशी आहे की १७५७ च्या प्लासीच्या लढाईने इंग्रजांचे पांढरे पाय या देशात रोवले गेले आणि १८१८ त पेशवाई बुडाल्यानंतर आमच्या दुर्दैवाने ते पक्के झाले. त्यानंतर काही काळ आमच्या सुशिक्षित लोकांचा बुद्धिभ्रंश होऊन त्यांना इंग्रजी राज्य हे ईश्वरी वरदान वाटले. पण इंग्रजांना आपल्या राजवटीत सुखाची झोप कधीच घेता आली नाही. त्यांना भारतीयांचा सतत विरोध चालूच होता. १८५७ चे स्वातंत्र्य समर हा याच विरोधाचा एक भयंकर स्फोट होय. त्यात नानासाहेब पेशवे, सेनापति तात्या टोपे, रणरागिणी राणी लक्ष्मीबाई, बहादुरशहा यांनी या महान संगराचे नेतृत्व केले. दुर्दैवाने हा प्रयत्न अयशस्वी ठरला ही गोष्ट निराळी. कंपनीचे राज्य जाऊन व्हिक्टोरिया राणीचा अंमल देशावर सुरू झाला. त्यानंतर क्रांतिकारकांची उठावणी झाली. वासुदेव बळवंत फडके, चंद्रशेखर आझाद, लाला लजपतराय, स्वातंत्र्यवीर सावरकर, खुदीराम बोस, वीणा दास, चाफेकर बंधु, कान्हेरे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त इत्यादि क्रांतिकारकांची अविच्छिन्न मालिका आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. १८८५ त हिंदी राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यावर त्या संस्थेच्या द्वारेही एका निराळ्या दिशेने आंदोलन सुरू झाले. लो. टिळक, महात्मा गांधी, पं. मोतीलाल नेहरू, वल्लभभाई व विठ्ठलभाई पटेल, चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, इत्यादि महान पुढारी आपल्या अपार तेजाने चमकले व त्यांनी आपल्या कर्तृत्वाने इंग्रजी राज्यसत्ता खिळखिळी केली. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी इंग्रजी राज्याच्या वर्मी जोराचा घाव हाणला व परिणामतः ती कोलमडून पडली व १५ ऑगस्ट १९४७ ला भारताच्या क्षितिजावर स्वातंत्र्यसूर्याचा उदय झाला. या सर्व महान देशभक्तांना लाख लाख प्रणाम. या स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करणे हेच आपले कर्तव्य.
सूर्यावर चंद्राची छाया पडली म्हणजे सूर्यग्रहण लागते असा या भाषणात उल्लेख आहे. तो अर्थातच चुकीचा आहे. सूर्यावर सावली पाडायची कोणाची बिशाद? चंद्र केवळ पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये येतो व पृथ्वीवरून काही काळ सूर्याचा काही वा पूर्ण भाग आपणाला दिसेनासा होतो. ग्रहण सूर्याला नसून आपल्याला लागले असते. असो. अशा 'टेक्निकल' चुका बाबांच्या लेखनात अतिशय क्वचित आढळतात. तरीपण मला एक सापडली म्हणून 'युरेका, युरेका' च्या आवेशात नमूद केली. खरे म्हणजे विषयमांडणीच्या ओघात ती खपून गेली असती. असो.
१५ ऑगस्ट प्रमाणेच १ ऑगस्ट ला टिळक जयंतीहि शाळा-शाळांतून उद्योगाने साजरी होत असे. अर्थातच सुटीहि राहत असे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या सूर्याला बाबांचे सूर्यनमस्कार स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झाले. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेले एक भाषण सापडले. कागद जीर्ण झाला आहे. हलक्या हाताने त्याची घडी उलगडून, त्यातील शब्द अन् शब्द येथे टिपला आहे. कागद आणि शब्द यांचे शरीर आणि आत्मा यांच्यासारखेच नाते आहे असा विचार मनात तरळून गेला.
लोकमान्य टिळक (१)
१ ऑगस्ट १९२० चा दिवस. लोकमान्य टिळक इहलोकातील कार्य संपवून स्वर्गस्थ झाले. भारतमातेच्या मुकुटातील दैदिप्यमान हिरा निखळून पडला. भारतवासियांचा हदयसम्राट अखिल देशबांधवांना दुःखसागरात लोटून निर्घृण काळाने ओढून नेला. स्वराज्यमंत्राचा आद्यप्रणेता, लोकशाहीचा निस्सीम उपासक आणि स्वातंत्र्याकरिता अहर्निश तळमळणारा आणि ध्येयसिद्ध्यर्थ प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता आमरण झटणारा लोकाग्रणी आमच्यातून नाहीसा झाला. स्वकीयांच्या हृदयांवर अनभिषिक्त सम्राटपद गाजविणारा पण परकीयांच्या हृदयाचा भीतीने थरकाप उडविणारा, स्वजनांची मने आपल्या दर्शनाने उल्लसित व प्रफुल्लित करणारा पण शत्रूजनांच्या मनात शल्याप्रमाणे अखंड बोचणारा, देशबांधवांच्या आशा, आकांक्षा व महत्त्वाकांक्षा उद्दीपित करणारा, परंतु आमच्या हितशत्रूंचे सारे बेत आणि कावे धुळीस मिळविणारा, संकटसमयी आम्हाला धीर देणारा आणि मार्ग दाखविणारा पण परसत्तेच्या मार्गात संकटे उत्पन्न करणारा आमचा लोकमान्य पुढारी - त्याच्या पुढारीपणाला आम्ही मुकलो, त्याच्या मार्गदर्शनाला आम्ही आंचवलो.
आज १ ऑगस्ट १९४०. वर उल्लेखिलेली घटना घडून २० वर्षे लोटली. तरी तिची स्मृति अजून ताजी आहे. आज हिंदुस्थानात शहरोशहरी, खेडोपाडी, सभा भरतील, मिरवणुकी निघतील आणि लोकमान्यांबद्दल आदरभाव व कृतज्ञता व्यक्त केली जाईल. वीस वर्षे झाली, लोकमान्यांचा नश्वर देह भस्मसात झाला. पण त्यांची आठवण यत्किंचितही कमी झाली नाही. किंबहुना आजच्यासारख्या परिस्थितीत त्यांची विशेषच आठवण होते व त्यांची उणीव अधिकच तीव्रतेने भासते. आणि कां भासू नये? ज्या स्वराज्याकरिता त्यांनी आपल्या हाडाची काडं केली, जिवाचं रान केले, खेड्यापाड्यातून पायपीट केली, खडतर कारावास भोगला, भयंकर हालअपेष्टा सहन केल्या, ते स्वराज्य आज आमच्या दृष्टिपथात आलं असतांना त्यांची आठवण झाल्याशिवाय कशी राहील? लोकमान्यांनी ज्या स्वराज्याचं बीजारोपण केलं तो वृक्ष आज बहरलेला असून त्याची फळं चाखण्याची आजची वेळ. अशा वेळी लोकमान्यांची उणीव आम्हाला जाणवू नये तर कोणत्या वेळी?
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच' हा महामंत्र त्यांनी आम्हाला दिला. आणि तोहि कोणत्या काळात? तर जेव्हा स्वराज्याची अभिलाषा बाळगणं हा राजद्रोह अतएव अक्षम्य गुन्हा समजण्यात येत होता; वंदेमातरम् उच्चाराला फटक्यांचे प्रायश्चित्त मिळत होते. आज काळ पालटलेला आहे. आज रस्त्यावरच शेंबडं पोरहि स्वराज्याच्या व स्वातंत्र्याच्या गप्पा मारतं. आमच्या सारख्या लहान लहान मुलीहि राजकारणाच्या गोष्टी बोलतात. ह्या विचारपरिवर्तनाचं आणि स्थित्यंतराचं श्रेय मात्र ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनतेच्या मनात पारतंत्र्याविषयी चीड उत्पन्न करून तिला स्वराज्याभिमुख बनविलं, त्या लोकमान्यांनाच द्यावं लागेल. आणि म्हणूनच आज आम्ही त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याकरिता इथं जमलो आहोत.
ज्या हिंदुस्थानात इंग्रजी सत्ता हा ईश्वरी वर आहे, असा समज दृढ झाला होता, नोकरशाहीविरुद्ध ब्रहि काढण्याची कुणाची छाती नव्हती, परकीयांचं दास्य पत्करून त्यांचा मानमरातब आणि गौरव वाढविण्यातच साऱ्यांचं कर्तृत्व खर्ची पडत होतं, सरकारी अधिकाऱ्यांना खूष करून त्यांच्याकडून बहाल करण्यात आलेल्या पदव्यांतच भूषण मानून आयुष्याची इतिकर्त्तव्यता समजण्यात येत होती, त्याच हिंदुस्थानात परवशता ही एक आपत्ती असून तिचे शक्य तितक्या लवकर निराकरण केलं पाहिजे व स्वराज्याची प्रस्थापना केली पाहिजे असा प्रचार लोकमान्य टिळकांनी केला, आणि स्वावलंबन, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ही चतु:सुत्री लोकांना सांगून त्यांच्यात आत्मविश्वास व नवचैतन्य निर्माण केलं व परसत्तेला शह दिला.
आजपर्यंत वेळोवेळी ज्या महात्म्यांनी जनतेवर होत असलेल्या जुलुमाविरुद्ध बंड उभारलं आणि लोकांची गांजणूक थांबविली, त्यांना ईश्वरी अवतार मानून त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याचा हिंदी लोकांचा प्रघात आहे. रामानं रावणाच्या जुलुमापासून देशाची मुक्तता केली, कृष्णानं कंसाचा नायनाट करून प्रजेला सुखी केलं. राणा प्रतापानं अकबराच्या काळात प्राणाचंही मोल देऊन स्वत्वाचं आणि स्वाभिमानाचं रक्षण केलं. शिवाजी महाराजांनी मोंगलांच्या मगरमिठीतून महाराष्ट्राची मुक्तता केली. राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब आणि तात्या टोपे यांनी कंपनी सरकारविरुद्ध बंडाचं निशाण उभारलं. लोकमान्यांनीहि आपल्या हयातीत तेच काम केलं. नोकरशाहीविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण करून जनतेच्या मनात स्वराज्याची लालसा निर्माण केली, व राजकीय चळवळीचं बीजारोपण केलं. आणि म्हणूनच आज २० वर्षे झाली, त्यांचा दृश्य देह आमच्यातून नाहीसा झाला असला तरी कीर्तिरूपानं अजूनहि ते आमच्यात वावरत आहेत. त्यांची स्मृति अजूनहि आमच्या हृदयांत ताजी आहे. त्यांची ओजस्वी वाणी अजूनही आम्हाला स्फूर्ति देत आहे व त्यांची मूर्ति प्रत्येक हिंदवासियाच्या हृदयांत कोरलेली असून ती त्याला कार्यप्रवण करीत आहे. दरवर्षाला लोकमान्य टिळकांसारख्या थोर पुरुषाचं चरित्र आठवून त्यांच्या अंगी वसत असलेल्या अनेक थोर गुणांपैकी एखादा तरी गुण अंशतः का होईना, आपल्या अंगी बाणविण्याचा प्रयत्न करावा, तसंच सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांचं चरित्र आम्हाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक व स्फूर्तिदायी व्हावं, आणि त्यांच्या पुण्यस्मृतीवर श्रद्धेची चार सुमनं उधळून त्यांच्याविषयी आमच्या मनांत वसत असलेला नितांत आदर आणि प्रेम प्रगट करावं, या तिहेरी हेतूनं आम्ही दरवर्षी विद्यालयात टिळक पुण्यतिथी साजरी करीत असतो. आमच्या छोट्याशा शाळेत आम्हा लहान लहान मुलींकडून साजरा करण्यात येणाऱ्या आजच्या समारंभाला आपण उपस्थित राहून लोकमान्यांवरील, त्याचप्रमाणे आमच्या संस्थेवरील प्रेम व्यक्त केलंत, याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते आणि आपली रजा घेते
१९४० मधे हे भाषण लिहिणारे बाबा २५ वर्षांचे होते आणि 'एलिजिबल बॅचलर' होते ही कल्पना केली की उगाचच गंमत वाटते. जिच्यासाठी भाषण लिहिले ती लहानगी कोण हे बाबाच सांगू शकतील. पण ती पहिली दुसरीत जाणारी असेल तर भाषण जरा जडच गेले असणार. आजची पहिली दुसरीतली मुलेमुली जितकी स्मार्ट असतात तितकी तेव्हा खचितच नव्हती. १९४० चे सोडा, नंतर तब्बल २० वर्षांनी पहिलीत असतांना मला फक्त शर्टाच्या बाहीने नाक पुसता येत असे. तसे करणे त्या काळात एटिकेट्सबाह्य पण नव्हते.
१९४० म्हणजे स्वातंत्र्य मिळायला अजून ७ वर्षे अवकाश होता. अर्थात हे तेव्हा माहित नव्हते. पण भारत आपल्या हातातून गेला याची जाणीव इंग्रजांना झालेली दिसते. स्वराज्य व स्वातंत्र्य ह्या शेंबड्या पोरांच्या गप्पांचा विषय झालेला पाहून आता काढता पाय घेण्यातच शहाणपणा आहे हे समजण्याइतपत इंग्रजांच्या ठायी शहाणपणा नव्हता असे म्हणणे शहाणपणा होणार नाही. स्वातंत्र्याची चळवळ दडपून टाकण्याचा त्यांचा प्रयत्नहि कमी झाला असावा. आणि म्हणूनच एक लहान मुलगी असे भाषण देण्याचे धाडस करू शकली असावी, किंबहुना आपल्या मुलीला मोहरीर मास्तरांनी लिहून दिलेले असे भाषण देण्यास परवानगी देण्याचे धाडस तिचे आईबाप करू शकले असावेत. देशावर कुर्बान होणारे शहीद देशात जन्माला यावे असे प्रत्येकालाच वाटते. फक्त ते आपल्या घरी जन्माला येण्याऐवजी शेजाऱ्याकडे जन्माला यावे असा त्यात मातृ-पितृसुलभ विचार असतो. असो.
लोकमान्य टिळक (२)
आज १ ऑगस्ट. ४८ वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला लोकमान्य टिळक स्वर्गवासी झाले. लोकमान्य हे आमच्या देशाचे फार मोठे पुढारी होते. त्यावेळेला भारतावर इंग्रजांचे राज्य होते. आपल्यातले मोठमोठे विद्वान इंग्रजी राज्य हे ईश्वरी वरदान आहे असे म्हणत होते. अशा त्या काळात लोकमान्य टिळकांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच' अशी गर्जना केली आणि सर्व देशभर दौरा करून लोकांच्या मनात स्वराज्याची तळमळ निर्माण केली.
१९०८ साली त्यांना सहा वर्षांची शिक्षा इंग्रज सरकारने दिली. ते मंडालेच्या तुरुंगात असतांना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक हे थोर देशभक्त तर होतेच, पण ते जिज्ञासू गणिती होते, विख्यात लेखक होते, इतिहास संशोधक होते, ज्योतिर्विद्याविशारद होते. आर्यांचे मूळ वसतिस्थान उत्तर धुवाजवळ होते असे संशोधन करून ते त्यांनी आपल्या एका ग्रंथात मांडले. त्यामुळे त्यांना जागतिक कीर्ति मिळाली. इंग्रजी राज्याविरुद्ध त्यांनी लोकांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण केला. इंग्रजांनी त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे नाव दिले. पण त्यातच त्यांची थोरवी आहे. स्वावलंबन, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही त्यांची चतुःसूत्री होती. आणि यांच्या जोरावर आपण स्वराज्य मिळवू हा त्यांचा आत्मविश्वास होता. त्यांना देशकार्यासाठी अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. पण तुरुंगवासातही लेखन, वाचन, अध्ययनाचा त्यांचा सतत उद्योग सुरू होता. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी अतिशय आदर होता. आज देखील कोणत्याही पार्टीचा पुढारी असो, लोकमान्यांना आपला राजकीय गुरू मानतो. त्यांच्या मृत्यूला आज जवळजवळ अर्धे शतक लोटले तरी त्यांची पुण्यतिथी सर्व देशभर मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
लोकमान्यांच्या मृत्यूनंतर भारताच्या राजकारणाची सूत्रे महात्मा गांधींच्या हाती आली. त्यांनी अनेक चळवळी करून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले व लोकमान्यांची इच्छा पूर्ण केली.
आजच्या या पवित्र दिवशी लोकमान्यांच्या चरित्रापासून स्फूर्ती घेऊन भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची आपण प्रतिज्ञा करू या.
जयहिंद!
लोकमान्य टिळक (३)
आज लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या पुण्यस्मृतीला नमन करण्याकरिता आम्ही येथे जमलो आहोत. आमच्या या चिमुकल्या शाळेत आम्ही चिमुकल्या मुली लोकमान्य टिळकांसारख्या महान विभूतीचा उत्सव साजरा करण्याकरिता जमलो आहोत हे पाहून कोणी आमचे कौतुक करतील, तर कोणी आमचा उपहासहि करतील. पण लोक काय म्हणतील, याच्याशी आम्हाला कर्त्तव्य नसून आमच्या मनात लोकमान्यांविषयी कोणत्या भावना वसत आहेत त्याच मी आपणांसमोर मांडणार आहे. आज आमच्या या देशात सर्वत्र लोकमान्यांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर साजरी होईल, आणि मोठमोठ्या प्रसिद्ध वक्त्यांची प्रचंड जनसमूहासमोर भाषणेही होतील. आमच्या शाळेतील या लहानश्या समारंभाला श्रोतेहि थोडेसेच असतील, आणि आपणासमोर सध्या उभी असलेली वक्त्रीहि चिमुकलीच असेल. पण देव भक्ताच्या हृदयातील भाव पाहतो. तद्वतच आपणहि आमच्या हृदयातील भाव पहा, अशी मी आपणाला नम्र विनंती करते.
लोकमान्य टिळक प्रख्यात गणिती होते, विद्वान कायदेपंडित होते, विख्यात लेखक होते आणि स्फूर्तिदायक वक्ते होते. त्यांनी गीतारहस्यासारखा कर्मयोगावरील अद्वितीय ग्रंथ लिहिला. तसेच 'आर्क्टिक होम इन् द वेदाज्' हा ऐतिहासिक संशोधनात्मक इंग्रजी ग्रंथहि त्यांनी लिहिला. या सर्व गोष्टी त्यांच्या विभूतिमत्त्वाला खास भूषणीभूत आहेत. परंतु आज आम्ही येथे जमले आहोत ते काही त्यांच्या विद्वत्तेचा, कायदेपांडित्याचा किंवा लेखनशैलीचा अगर वक्तृत्वाचा गौरव करण्याकरिता नव्हे; तर ते अव्वल दर्जाचे देशभक्त होते, त्यांनी हिंदवासियांच्या मनात स्वराज्याची लालसा निर्माण करून राजकीय चळवळीचे बीजारोपण केले, म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता.
आमच्या हितशत्रूंनी लोकमान्यांना 'फादर ऑफ इंडियाज् डिसकंटेट' किंवा 'भारतीय असंतोषाचे जनक' हे नामाभिधान कितीहि खोचटपणाने दिलेले असो, आम्हाला मात्र ती एक बहुमोल पदवी वाटते. कारण प्रचलित स्थितीबद्दल असंतोष निर्माण झाल्याशिवाय राष्ट्रोद्धाराची चळवळ उत्पन्नच होऊ शकत नाही. आमच्या मायदेशाला सध्या जर कशाची आवश्यकता असेल तर ती कवींची नाही, ग्रंथकर्त्यांची नाही, कायदेपंडितांची नाही, तर आपल्या जन्मभूमीकरिता सर्वस्वाचे बलिदान करणाऱ्या कट्टर देशभक्तांची आहे. आणि ही स्फूर्ति आम्हाला लोकमान्यांच्या चरित्रापासून मिळते. म्हणूनच आज आम्ही त्यांची पुण्यतिथी इतक्या आदराने आणि प्रेमाने साजरी करीत आहोत.
आज हिंदुस्थानात अनेक पक्षोपपक्ष अस्तित्वात आहेत. पण प्रत्येकजण लोकमान्यांनाच आपला
राजकीय गुरु मानतो. असे कां? स्वातंत्र्य संपादनाचा मार्ग कसा असावा याबद्दल निरनिराळ्या पक्षात मतभेद होते. परंतु भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची लालसा जर कोणी निर्माण केली असेल तर ती लोकमान्यांनीच. आणि म्हणूनच प्रत्येकजण, तो कोणत्याही पक्षाचा अगर मताचा असो, लोकमान्यांच्या तसबिरीपुढे आदराने मस्तक नमवितो.
लोकमान्यांनी आमच्या या आवडत्या हिंदभूमीत स्वातंत्र्याचा जो दीप लावला, तो त्यांच्या पश्चात त्यांचे देशबंधू आणि भगिनी यांच्या स्वार्थत्यागाचे तेल मिळून अधिक प्रज्वलित होईल, आणि या भरतभूमीत अप्रतिहतपणे व अखंडपणे तेवत राहील असा आम्हाला विश्वास आहे. भारतमातेची सर्वांगीण सेवा व तिचे परचक्रापासून संरक्षण करण्याकरिता कराव्या लागणाऱ्या स्वार्थत्यागाची स्फूर्ती आम्हाला लोकमान्यांपासून मिळो, अशी त्या परमेश्वराची प्रार्थना करून पुन्हा एकवार मी लोकमान्यांच्या तसबिरीपुढे आपले मस्तक आदराने नमविते, आणि आपण माझे बोबडे बोल शांतपणाने व कौतुकाने ऐकून घेतले याबद्दल आभार मानून आपली रजा घेते.
लोकमान्य टिळकांचे राष्ट्रजागृतीचे कार्य
भिक्षांदेहीचे व अर्जविनंत्यांचे धोरण सोडून राजकारणाला धडाडीची दिशा देणारे पहिले लोकाग्रणी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होत.
लोकमान्य टिळक प्रख्यात गणिती होते, विख्यात लेखक होते आणि स्फूर्तिदायक वक्ते होते. त्यांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्यासारखा कर्मयोगावरील अद्वितीय ग्रंथ लिहिला. तसेच 'ओरायन' आणि 'आर्क्टिक होम इन् द वेदाज्' हे ऐतिहासिक संशोधनात्मक इंग्रजी ग्रंथही त्यांनी लिहिले. या सर्व गोष्टी त्यांच्या विभूतिमत्वाला खास भूषणीभूत आहेत. पण आज अखिल भारतवासीयांच्या मनात लोकमान्यांविषयी जी नितांत आदराची भावना वसत आहे ती ते अव्वल दर्जाचे देशभक्त होते आणि त्यांनी हिंदवासियांच्या मनात स्वराज्याची लालसा निर्माण करून राजकीय चळवळीचे बीजारोपण केले म्हणून.
आमच्या हितशत्रूंनी लोकमान्यांना 'Father of India's Discontent' किंवा 'भारतीय असंतोषाचे जनक' हे नामाभिधान कितीही खोचटपणाने दिलेले असले तरी त्यातच त्यांचा यथार्थ गौरव आहे, कारण प्रचलित स्थितीबद्दल असंतोष निर्माण झाल्याशिवाय राष्ट्रोद्धाराची चळवळ उत्पन्नच होऊ शकत नाही. त्यांचे विरोधक त्यांना 'तेल्यातांबोळ्यांचे पुढारी' म्हणून हिणवीत. पण गाद्यागिरद्यावरील राजकारणाचा धिक्कार करून स्वातंत्र्यप्राप्तीकरिता सामान्य जनतेत असंतोषाचा वणवा भडकविण्याचे महान कार्य लोकमान्यांनी केले यांतच त्यांचा थोरपणा आहे.
वन्ही तो चेतवावा रे चेतविताचि चेततो ।
केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे ।।
हा श्री समर्थांचा उपदेश त्यांनी प्रत्यक्षात उतरविला. जागृत झालेल्या जनशक्तीत सम्राटांची सिंहासने गदगदा हालविण्याची व उलथून टाकण्याची विराट शक्ति असते याची पक्की जाणीव लोकमान्यांना होती व त्या जाणिवेला साक्षी ठेवूनच त्यांनी आपल्या कार्याची दिशा आखली. आपल्या केसरीतील लेखांच्या द्वारे आणि प्रभावी भाषणांच्या साहाय्याने इंग्रजी राजवटीवरील गोंडस आवरणे त्यांनी टरटरा फाडली व तिचे लोकभक्षक स्वरूप जगाच्या वेषीवर टांगले. त्यांचे केसरीतील अग्रलेख म्हणजे इंग्रजांच्या वर्मी झोंबणारे मर्माघात होते.
आज हिंदुस्थानात अनेक पक्षोपपक्ष अस्तित्वात आहेत. पण प्रत्येकजण लोकमान्यांनाच आपला राजकीय गुरु मानतो. असे कां? साधने कशी असावी, कार्याची दिशा कशी असावी या बाबतीत निरनिराळ्या पक्षात मतभेद आहेत. परंतु भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची लालसा जर कोणी निर्माण केली असेल तर ती लोकमान्यांनीच. आणि म्हणूनच प्रत्येकजण, मग तो कोणत्याही पक्षाचा अगर मताचा असो, लोकमान्यांच्या तसबिरीपुढे आदराने नतमस्तक होतो. सुरत काँग्रेसच्या वेळी लो. टिळकांवर कठिण प्रसंग गुदरला असतांना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांचे विरोधक ना. गोखले यांनी घेतली. ते गंभीर स्वरात म्हणाले 'टिळकांच्या एका केसाला जरी धक्का लागेल तरी येथे रक्तपात होईल.'. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक आगळाच प्रभाव त्यांच्या विरोधकांवर देखील पडत होता आणि त्या प्रभावाखाली ते भारून जात असत. लढाऊ धोरणाने ते तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांनी राष्ट्राचा आत्मा जिंकला. गणेशोत्सव व शिवजयंति उत्सव त्यांनी सुरू करून त्यांच्या द्वारे प्रचंड जनजागृति केली.
पहिल्या प्रतीची हुशारी, निष्कलंक शील, उज्ज्वल चारित्र्य, उत्कट ध्येयवाद, निस्सीम स्वार्थत्याग, अपार संघटनाचातुर्य, निर्भय धडाडी, कणखर आशावाद, अमोघ वक्तृत्व, प्रभावशाली लेखनचातुर्य, दुर्दम्य कष्ट आणि देशहिताविषयीची आत्यंतिक तळमळ, इत्यादि सर्व गुणांची ते जणू मूसच. लोकमान्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. असाधारण देशभक्त, प्रगाढ पंडित, महान तत्त्वज्ञ, विख्यात गणिती व ज्योतिर्विद, कसलेले राजकारणी मुत्सद्दी, पट्टीचे लेखक, निर्भीड संपादक, प्रखर टीकाकार, धडाडीचे कार्यकर्ते, असामान्य लोकाग्रणी आणि निस्सीम कर्मयोगी अशा त्यांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाच्या अनेक बाजू होत्या.
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच' हा महामंत्र त्यांनी जनतेला दिला. ज्या हिंदुस्थानात इंग्रजी सत्ता हा ईश्वरी वर आहे, असा समज दृढ झाला होता, नोकरशाहीविरुद्ध ब्रहि काढण्याची कुणाची छाती नव्हती, परकीयांचे दास्य पत्करून त्यांचा मानमरातब आणि गौरव वाढविण्यातच साऱ्यांचे कर्तृत्व खर्ची पडत होते, सरकारी अधिकाऱ्यांना खूष करून त्यांच्याकडून बहाल करण्यात आलेल्या पदव्यांतच भूषण मानून आयुष्याची इतिकर्त्तव्यता समजण्यात येत होती, त्याच हिंदुस्थानात परवशता ही एक आपत्ती आहे व तिचे शक्य तितक्या लवकर निराकरण केले पाहिजे व स्वराज्याची प्रस्थापना केली पाहिजे असा प्रचार लोकमान्य टिळकांनी साऱ्या देशभर केला, आणि स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ही चतुःसूत्री लोकांना सांगून त्यांच्यात आत्मविश्वास व नवचैतन्य निर्माण केले आणि परसत्तेला शह दिला, आणि याच कारणामुळे ते भारताचे अनभिषिक्त सम्राट बनले. महर्षी अरविंद घोष म्हणतात 'टिळकांचे जीवन म्हणजे लखलखती समशेर. जोपर्यंत आपल्या राष्ट्राला भूतकाळाचा अभिमान आहे व भविष्यकाळाची आशा आहे तोपर्यंत लोकमान्यांचे स्मरण होत राहील.'.
लोकमान्यांवर बाबांनी अनेक भाषणे लिहिलीत. अनेक वयोगटांच्या पोपटांकरिता. स्वातंत्र्यापूर्वी लिहिलीत, स्वातंत्र्यानंतर लिहिलीत. काही विचारांची पुनरावृत्ती झाली असली तरी प्रत्येक भाषण नव्याने व वेगळ्या शैलीने लिहिले हे लक्षात घेण्यासारखे आहे. या सर्व भाषणात श्रेष्ठ कोणते असा जर भाषणाचा विषय असला तर मी 'अध्यक्ष महाराज, उपस्थित सज्जन आणि बंधुमगिनींनो!' अशी ठसक्यात सुरुवात करीन आणि नंतर म्हणेन 'माझ्या मते, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की, म्हणजे मला असं वाटतं की,...'. नंतर इतिहासाची पुनरावृत्ती होईल. अमुक श्रेष्ठ की तमुक श्रेष्ठ हा विषयच तसा कठिण. भाषणकर्त्याला येथे काहीतरी भूमिका घेणे व तिचे समर्थन करणे क्रमप्राप्त आहे. आणि त्यातल्यात्यात अमुक आणि तमुक तुल्यबळ असले तर विचारायलाच नको.
टिळक श्रेष्ठ की आगरकर श्रेष्ठ
आजच्या माझ्या भाषणाचा विषय 'टिळक श्रेष्ठ की आगरकर श्रेष्ठ' हा आहे. ज्या व्यक्तीचे ध्येय उच्च असून जी मार्गातील अडथळ्यांना न जुमानता त्या ध्येयाशी एकनिष्ठ राहते त्या व्यक्तीला श्रेष्ठ म्हणतात. या दृष्टीने पाहता जनतेवरील अन्यायाचा प्रतिकार करतांना, श्रम, पैसा याकडे दुर्लक्ष करून हिरीरीने झगडणारे टिळक श्रेष्ठ की समाजोद्धाराचे कार्य करीत असता कशाचीही अपेक्षा न करणारे, प्रेतयात्रेसाठी १० रु. अलग काढून ठेवणारे आगरकर श्रेष्ठ, 'तेलातांबोळ्यांचे पुढारी' म्हणून प्रतिपक्षाने हिणविले तरी देशसेवेच्या कार्यात खंड पडू न देणारे टिळक श्रेष्ठ की जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहण्याचा प्रसंग आला तरी ती प्रेतयात्रा काढणाऱ्या समाजाच्या उद्धाराचीच चिंता वाहणारे आगरकर श्रेष्ठ, 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी सिंहगर्जना करून आंग्लांचे सिंहासन हादरून सोडणारे टिळक श्रेष्ठ की 'सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय स्वराज्य पेलण्याची हिंमत आमच्यात येणे अशक्य आहे म्हणून आधी समाजसुधारणा केली पहिजे' असे आवर्जून सांगणारे आगरकर श्रेष्ठ हा खरोखरच कूटप्रश्न नव्हे काय?
परंतु वास्तविक दोन भिन्नभिन्न क्षेत्रातील श्रेष्ठ पुरुषांची तुलना करण्याचे काहीच प्रयोजन नाही. दोन महापुरुषांची तुलना करणे म्हणजे त्यांच्या श्रेष्ठतेला अकारण मर्यादा घालणे होय. टिळक व आगरकर हे परस्परांचे सहाध्यायी. त्यांचे मतभेद कितीही तीव्र असले, तरीहि ही स्पर्धेची भावना त्यांच्या अंतःकरणात कधीतरी प्रवेशली असेल काय? टिळक आणि आगरकर! हात आणि हृदय! दोघेहि आपापल्या क्षेत्रात असामान्यच होते. स्वराज्य हे दोघांचेही ध्येय. परंतु आपली समाजरचना निर्दोष केल्याशिवाय स्वराज्याचा भार पेलण्याची क्षमता येणे अशक्य म्हणून आधी सामाजिक सुधारणा झाली पाहिजे, म्हणजे स्वातंत्र्य आपोआप मिळेल, हे आगरकरांचे मत होते. जर समाजाचे मतपरिवर्तन करून हे कार्य साधत नसेल तर कायदे करून ते करण्यास हरकत नाही असे आगरकरांचे म्हणणे. आमच्या समाजात सुधारण्यायोग्य अनेक गोष्टी आहेत हे टिळकांनाहि मान्य होते पण ते ती हृदयाची जखम हलक्या हातांनी धुण्याचा प्रयत्न करीत होते. गोड शब्दांनी किंबहुना अजिबात न बोलता नुसत्या आपल्या आचारानेच लोकांना समाजसुधारणेचा मार्ग दाखविणे हा त्यांचा मार्ग होता. पण सरकारशी करावयाचा विरोध हा बाहेरचा असल्यामुळे आपण त्यासाठी जीवात जीव आहेतो निकराने लढावयास हवे असे टिळक प्रतिपादीत. आगरकरांची दृष्टी अनंत कालाचा विचार करणाऱ्या तत्त्वज्ञाची होती तर टिळकांची नजर तीन शतकावरच खिळलेली राजकारणी मुत्सद्याची होती. आगरकरांची दृष्टी सूर्यमंडळ भेदून विश्वामित्राच्या सृष्टिपलिकडे जाण्यास उत्सुक होती तर टिळकांना तितका दूरचा पल्ला नको होता. सगळे लोक नुसते कवि करणे हे त्यांचे ध्येय नव्हते.
अशा स्थितीत तुलनाच करावयाची झाल्यास मला वाटते टिळकच आगरकरांपेक्षा श्रेष्ठ ठरतील. ज्याच्या 'विद्वत्तेच्या अंकावरती देशभक्ति खेळते' असा हा अनन्यसामान्य युगपुरुष होता. त्यांच्या मस्तकातून सूर्यप्रकाशाइतके तेजस्वी विचार प्रगट होत होते, त्यांच्या श्वासोच्छवासातून निष्काम कर्मयोगाच्या वायुलहरी बाहेर पडत होत्या, आणि त्यांच्या मुखातून स्वराज्याची गर्जना सागराच्या गंभीरतेने सदैव होत होती. त्यांच्या ह्रदयांत प्रखर आग पेटली होती आणि डोके बर्फासारखे थंड होते. आणि म्हणूनच ते श्रेष्ठ पुढारी होऊ शकले.
असाधारण देशभक्त, प्रगाढ पंडित, महान तत्त्वज्ञ, विख्यात गणिती व ज्योतिर्विद, कसलेले राजकारणी मुत्सद्दी, पट्टीचे लेखक, निर्भीड संपादक, प्रखर टीकाकार, धडाडीचे कार्यकर्ते, असामान्य लोकाग्रणी आणि निस्सीम कर्मयोगी अशा त्यांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाच्या अनेक बाजू होत्या. मॅक्समुल्लर सारख्या पंडितालाहि चकित करणारे संशोधन कौशल्य, गीतारहस्यांतून जागोजागी प्रतीत होणारे पांडित्य, वेळोवेळी कसास लागलेली त्यांची उज्ज्वल देशभक्ति, राष्ट्राच्या उत्कर्षाची व समाजाच्या उद्धाराची त्यांची तळमळ, केसरीच्या लेखातून प्रगट होणारी अन्यायाची चीड, प्रत्येक कृतीतून, प्रत्येक खटल्यात दिसून येणारा दृढ आत्मनिश्चय, या साऱ्यांना त्यांच्या धवल चारित्र्याचे अधिष्ठान होते.
राजकारणात टिळकांनी जितके मोलाचे काम केले तितकेच समाजोद्धारासाठीहि केले. 'ईश्वराला अस्पृश्यता मान्य असेल तर मी ईश्वर मानत नाही' असे ते म्हणत. त्यांनी आपल्या मुलींना त्या काळात शिक्षण दिले आणि त्यांची उशिरा लग्ने केली. परकीय सरकारने आमच्या रूढीत ढवळाढवळ करावी हे मात्र त्यांना मान्य नव्हते.
आमच्या समाजाच्या नसानसात भिनलेल्या दुफळीच्या रोगाचेहि लोकमान्यांनी निदान केले आणि गणेशोत्सव व शिवाजीउत्सव निर्माण करून त्या रोगाचा समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न केला.
आणि म्हणूनच मला लोकमान्य टिळक आगरकरांपेक्षाहि श्रेष्ठ वाटतात. केवळ मलाच वाटतात असे नव्हे तर निसर्गालाहि त्यांची महत्ता पटली होती. १ ऑगस्ट रोजी टिळकांच्या मृत देहाला अग्नि देण्यात आला तेव्हा मुसळधार पाउस पडत होता. जणू तो सांगत होता, 'या अनन्यसामान्य योग्यतेच्या पुरुषाच्या देहाला अग्नीच्या स्वाधीन करू नका.'.
इतिहासाच्या कालखंडात असे अनेक महापुरुष होतात की ज्यांचे महत्त्व त्या विवक्षित कालखंडापुरतेच मर्यादित असते. पण असेहि अलौकिक विभूतिमत्व कधीकधी प्रगट होते की ज्याचे मूल्यमापन कालाच्या सीमारेषेंत होऊच शकत नाही. ह्या दुसऱ्या श्रेणीतील असामान्य पुरुषाला त्याच्या पुण्यतिथीच्या दिनी सादर प्रणाम करून मी माझे भाषण संपवितो.
देशाची स्मरणशक्ती तोटकी असते असे म्हणतात. इंग्रजांचे भारतातले वास्तव्य जवळजवळ २०० वर्षे पुरले. २०० वर्षे म्हणजे ५-६ पिढ्या. पारतंत्र्याचा प्रतिकारहि या सर्व पिढ्यांनी केला असेल. इंग्रजांचे येणे ही जर अॅक्शन मानली तर त्यांचा प्रतिकार ही रिअॅक्शन. या दोन क्रिया हातात हात घालून सुरू असल्याच पाहिजेत असे विज्ञान सांगते. पण आपण जो इतिहास ऐकतो किंवा वाचतो त्यात तीच ती नावे, घटना पुन्हा पुन्हा येतात. इतिहास म्हणजे गत घटनांचा संक्षिप्त सारांश. कशाची आणि कोणाची नोंद घ््यायची आणि कशाची आणि कोणाची नाही हे ठरवण्याचे इतिहासाचे निकष त्यालाच माहित. पण खरे म्हणजे इतिहास घडत असतो तो त्याच्याच नजरेतून सुटलेल्या अशा अनेक घटनांनी. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात असेच झाले असणार. इतके काही घडत होते की नोंदकर्ता फारच बिझी होता.
This is the story of a valiant man
Who fought for the freedom struggle as best as one can
This is the story of a valiant lady
To jump in the freedom struggle, who was ever ready
A turbulent period in the history of our nation
Gandhi and Nehru had caught nation's imagination
Men and women would follow these two blindly
Without worrying what would happen to them and their family
English Babu was angry and decided to fight
Those who say Vande Mataram, shoot them all at sight
Those who use salt and don't pay tax, put them in the jail
If we do this day in, day out, Gandhiji would fail
Gandhiji said let us fight this unlawful oppression
Vande Mataram we must say when we see an Englishman
Let us go to Dandi and pick as much salt as we can
The sea is ours, the salt is ours, who is this Englishman?
Vande Mataram sang our hero with an upright chest
English bullets pierced his chest, and alas!, he was dead
Our Lady went to Dandi and faced English wrath
She then died, but we got freedom without a bloodbath
Who was this man and this lady, friends don't ask me please!
History had no time to pause and take note of their deeds
Thousands of such unknown soldiers gave us our freedom
Let us pay our tributes to them by holding it firm
इतिहासाने घेतलेली स्वातंत्र्ययुद्धातील पहिली नोंद म्हणजे १८५७ च्या उठावाची. तीहि घ््यायला तो चुकला असता तर त्याची गांठ पडणार होती खुद्द झाशीच्या राणीशी. आणि मग काही त्याची धडगत नव्हती.
झाशीची राणी लक्ष्मीबाई
झाशीच्या राणीच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे असे होते. झाशीच्या राणीचे लहानपणचे नाव मनुताई असे होते. जेव्हा नानासाहेब व बाळासाहेब पेशवे हत्तीवर बसत तेव्हा ही देखील हट्ट करी. त्यांच्याबरोबरच ती लिहिणे, वाचणे, दांडपट्टा खेळणे, घोड्यावर बसणे, वगैरे शिकली. पुढे झाशीचे संस्थानिक गंगाधरराव यांच्याबरोबर तिचे लग्न झाले. मनुबाईची झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली. काही वर्षांनी हिचा मुलगा वारला व त्या दुःखाने गंगाधररावहि वारले. इंग्रज गव्हर्नर जनरलने तिला दत्तक घेण्यासहि परवानगी दिली नाही. तिने आपले राज्य अतिशय सुरळीत रीतीने चालविले होते. ती अतिशय न्यायी होती. ज्या वेळी १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले तेव्हा तिने अनेक इंग्रज लोकांना आश्रय दिला. पण इंग्रज हे सर्व उपकार विसरले आणि त्यांनी लढाई करून झाशी ताब्यात घेण्याचे ठरविले. लक्ष्मीबाईने मोठ्या धैर्याने लढ्यास तोंड दिले. बारा दिवस भोवताल पसरलेल्या अफाट इंग्रज सैन्यास तिने दाद दिली नाही. सर ह्यू रोज सारखा प्रसिद्ध सेनापती शत्रु असताना देखील तिने इंग्रजांना आपल्या शौर्याची चमक दाखविली. परंतु शेवटी किल्ला राखणे अशक्य झाल्यावर आपल्या दत्तक मुलाला पाठीशी घेऊन तिने तटावरून आपला घोडा फेकला व इंग्रजांची फळी फोडून ती बाहेर पडली. नंतर पेशव्यांना मिळाल्यावर मोठ्या शौर्याने लढून ग्वाल्हेरचा किल्लाहि त्यांनी काबीज केला. पण इंग्रजांनी तेथेहि स्वारी केली. सर्व सैन्य सोडून गेल्यावर तिला किल्ला सोडणे भागच होते. ती घोड्यावर बसून जात असता वाटेत एका ओढ्याला तिचा घोडा अडल्यामुळे तिला थांबावे लागले. तरी ती इंग्रजांशी शौर्याने लढली. तिचा उजवा हात कापला गेला तेव्हा ती डाव्या हाताने देखील लढली. आणि शेवटी तिला शत्रूच्या तरवारीला बळी पडावे लागले. इंग्रज लोक सुद्धा तिच्या शौर्याची तारीफ करीत. ते म्हणत की : 'ही राणी म्हणजे बंडखोरांच्या बाजूने सर्वात शूर व फार श्रेष्ठ दर्जाची व्यक्ति होती.'.
झाशीच्या राणीसारखी शूर स्त्री आजपर्यंत आपल्या किंवा परकीयांच्या इतिहासात झाली नाही व पुढे होणार नाही. सर्व गुण तिच्या ठिकाणी एकवटले होते. ती शुद्ध चारित्र्यसंपन्न असून थोर पुढाऱ्यांच्या अंगीहि क्वचितच आढळणारे संघटनाकौशल्य तिच्या ठायी भरपूर होते. देशप्रेमाची ज्योत तिच्या हृदयात अखंड तेवत होती. युद्धकलेत देखील तिने प्राविण्य प्रकट केले. अशी स्त्री आपल्या राष्ट्राला लाभली हे आपल्या राष्ट्राचे फार मोठे भाग्य आहे.
झाशीच्या राणीच्या चरित्रापासून आपणास अनेक गोष्टी घेता येण्यासारख्या आहेत. संकटाचा पर्वत अंगावर कोसळला तरी खचून न जाणे, प्राणावर बेतली तरी आपल्या ध्येयापासून विचलित न होणे, अन्यायाची चीड, देशप्रेम, धर्मप्रेम, दुसऱ्याने आपणावर कितीहि अन्याय केले तरी आपण त्याच्याशी वागतांना चांगले वागणे, शौर्य, वगैरे. तेव्हा आपण जर झाशीच्या राणीचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वागलो तर आपले व आपल्या देशाचे पुष्कळच कल्याण होईल.
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या धगधगत्या होमकुंडात आपल्या प्राणांची आहुती हसतमुखाने देणाऱ्या अनेक ज्ञात-अज्ञात वीरांच्या त्यागाची व शौर्याची मूर्तिमंत प्रतिमा म्हणूनच आज आमच्या डोळ्यासमोर झाशीची संग्रामदेवता उभी आहे. तिच्या स्मृतीचित्रासमोर आमचा माथा आदराने लवल्याशिवाय कसा राहील? 'मैं अपनी झाँसी नहीं दूँगी' या तिच्या मुखातून बाहेर पडलेल्या स्फुलिंगांनी आमच्या उरातील आवेश उसळत्या लाटांनी उफाळून आल्याशिवाय कसा राहील? सर ह्यू रोजच्या व बौकरच्या छातीत धडकी भरविणारी ही झाशीची संग्रामदेवता आज अखिल भारतीयांचे स्फूर्तिस्थान होऊन बसली आहे.
कंसांनो आपटा शिळेवर सात शिरे कोवळी ।
सुटुनी तुमच्या मुठीतुनी परि शक्ती जगि मोकळी ।।
कंसाने कृष्णाचा नाश करण्याकरिता वसुदेवाची सात बाळे शिलेवर आपटून मारली. पण अखेरीस त्याचा सत्यानाश करणारी शक्ति त्याच्या मुठीतून निसटून अस्मानात गेली व तिने कंसाला बजावून सांगितले की तुझा वैरी गोकुळात वाढत आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ति १८५७ साली झाली. झाशीची राणी ही अस्मानची बिजली आभाळात निघून गेली व तिच्या शापाने तिचा प्राणबळी घेणाऱ्या इंग्रजी सत्तेचीच अखेर राखरांगोळी झाली. ह्या आमच्या संग्रामदेवतेवर आम्ही अशी कितीहि स्तुतिसुमने उधळली तरी ते पोकळ बुडबुडेच ना?
मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे ।
तुझे पवाडे गातिल पुढती तोफांचे चौघडे ।।
सरकारी शालेय पुस्तकांतील धड्यांसारखी या भाषणाची सुरुवात पाहून जरा नवल वाटते. सरकारी धडे इतके काही रूक्ष असतात की ते वाचायला मोठे मन करावे लागते. परीक्षा तोंडावर आली की मला नेहमी आपल्या मुलीला 'धडे वाच ग धडे' असे विनवावे लागते. ते नेमके तिला 'धडे वाच गधडे' असे ऐकू जाते आणि कठिण प्रसंग येतो. असो. तर अशी सुरुवात करून हे भाषण शेवटी शेवटी मात्र खास बाबांच्या शैलीत येते आणि दाद मिळवून जाते.
पारतंत्र्य-स्वातंत्र्य-पारतंत्र्य-स्वातंत्र्य यांच्या लपंडावात सापडलेला हा देश. आपण अनेकदा परतंत्र झालो हा विचार मन उद्विग्न करणारा असला तरी तितकेच वेळा पुन्हा स्वतंत्र झालो असा विचार केला तर ते सावट दूर होते. प्रत्येक पारतंत्र्याने अनेक नायक नायिकांना जन्म दिला. त्या सर्वांचा नायक, महानायक, कोण ते सांगायला नको.
छत्रपति शिवाजी महाराज
तीनशे वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राचे पुण्यस्मरण करण्याकरिता आज आपण या विद्यालयाच्या इमारतीत एकत्र झालो आहोत. तीन शतकांच्या पूर्वी या आमच्या भरतभूमीत ज्या नरवीराने महाराष्ट्राचा - नव्हे साऱ्या भरतभूचा - इतिहास घडविला, आपल्या जन्मभूमीची परदास्यातून मुक्तता केली - त्या शिवछत्रपतींच्या चरित्रापासून आम्हाला काय बोध आणि कोणती स्फूर्ति मिळण्यासारखी आहे, याचा विचार आपणाला करावयाचा आहे. आज शिवरायांची जयंति आहे. या मंगल दिवशी शिवरायांचा आदर्श आमच्या मनःचक्षूसमोर ठेवून आम्हाला आमच्या मनातील मालिन्य, औदासिन्य, नैराश्य, प्रवाहपतितता, भित्रेपणा, दौर्बल्य, इत्यादि कितीतरी दुर्गुणांना हद्दपार करावयाचे आहे. दरवर्षाला शिवाजी महाराजांसारख्या थोर पुरुषाचे चरित्र आठवून त्यांच्या अंगी वसत असलेल्या अनेक थोर गुणांपैकी एखादा तरी गुण अंशतः कां होईना, आपल्या अंगी बाणविण्याचा प्रयत्न करावा, तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांचे चरित्र आम्हाला स्फूर्तिदायी व मार्गदर्शक व्हावे, आणि त्यांच्या पुण्यस्मृतीवर आपली श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्याविषयी आमच्या मनात वसत असलेला नितांत आदर आणि प्रेम प्रगट करावे, या तिहेरी हेतूने आम्ही गेल्या वर्षांपासून, अर्थातच आमच्या शाळेच्या स्थापनेपासून, शिवरायांचा उत्सव साजरा करण्याची प्रथा पाडलेली आहे. गेल्या वर्षी आम्ही हा उत्सव साजरा केला होता याची माहिती त्यावेळी शाळेत असणाऱ्या बारा मुली - ज्यापैकी मीहि एक आहे - अणि आमचा शिक्षक वर्ग - याव्यतिरिक्त इतर कोणालाहि नसेल. परंतु मागील वर्षी विद्यालयाची नुकतीच कुठे स्थापना झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत विद्यालयाच्या परिस्थितीत कितीतरी स्थित्यंतर घडून आले आहे. विद्यार्थिनींच्या संख्येत दामदुपटीने वाढ झाली असून शिक्षकांची संख्याहि सवाईने फुगली आहे. तीन वर्गांचे चार वर्ग झाले असून आमचा उत्साहहि चक्रवाढीने वाढला आहे. आणि म्हणूनच आजचा हा उत्सव या प्रमाणावर साजरा होतांना आपणाला दिसतो आहे. असो.
शिवरायांचा जन्म कोणत्या साली झाला, त्यांचे शिक्षण कोठपर्यंत झाले होते, त्यांची आणि रामदासस्वामींची गांठ स्वराज्यस्थापनेपूर्वी पडली होती किंवा नाही, या ऐतिहासिक वादग्रस्त मुद्याशी आम्हाला आज काहीही कर्तव्य नाही. या प्रश्नांचा निर्णय इतिहासकारांनी कसाहि लावला, तरी त्यामुळे शिवरायांची थोरवी यत्किंचितहि कमी होत नाही. शिवाजी महाराजांची थोरवी कशात असेल तर ती त्यांच्या कणखर देशाभिमानांत आहे, जाज्वल्य धर्मनिष्ठेत आहे, निस्सीम स्वार्थत्यागात आहे, आणि निरुपम मुत्सद्देगिरीत आहे. ज्या महाराष्ट्रात सर्वत्र नैराश्य पसरले होते, परकीयांचा जुलूम असह्य होत असून देखील त्याविरुद्ध ब्रहि काढण्याची कोणाची छाती नव्हती, परकीयांचे दास्य पत्करून त्यांचा मानमरातब आणि गौरव वाढविण्यातच महाराष्ट्रातल्या मी मी म्हणविणाऱ्या मराठे सरदारांचे आणि राजस्थानातल्या शूरवीर रजपूतांचे सारे कर्तृत्व खर्ची पडत होते, बादशहाला खूश करून त्याच्याकडून मिळालेले चार जहागिरीचे तुकडे किंवा बहाल करण्यात आलेल्या पदव्या ह्यांतच भूषण मानून आयुष्याची इतिकर्त्तव्यता समजण्यात येत होती, त्याच महाराष्टात शिवाजींनी आठ-दहा वर्षांच्या पोरवयात अदिलशहाच्या दरबारात जाऊन तेथे शहाला कुर्निसात न करण्याचे धैर्य दाखविले आणि भररस्त्यावर गाईंचा वध करण्यास उद्युक्त झालेल्या खाटकाचा हात सुऱ्यासकट आपल्या समशेरीने वेगळा करण्याचे शौर्य दाखवून साऱ्या विजापूराला थक्क केले. मावळे सवंगडी जमवून देशातील तरुणांत नवचैतन्य निर्माण केले, आणि स्वराज्याची लालसा निर्माण केली. १८ वर्षांच्या वयात तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. शिवचरित्रातील एक एक प्रसंग बहारीचा आहे. सिंहगडाचे युद्ध, अफजुलखानाचा वध, आग्र्याहून सुटका, चंद्रराव मोऱ्यांचा वध हे निरनिराळे प्रसंग शिवाजींच्या अंगी वसत असलेल्या गुणांवर प्रकाश पाडतात. विजापूरच्या शहाला त्यांनी खडे चारले. औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाला त्यांनी दे माय धरणी ठाय केले. फिरंग्याना पळता पळता भुई थोडी झाली. या नरवीराने स्वतःच कार्याला सुरुवात करून आपल्या हयातीतच महाराष्ट्र देश स्वतंत्र केला आणि स्वराज्याची स्थापना केली. अशा या विजयी वीराचे चरित्र आमच्या हदयाकाशात सूर्याप्रमाणे अखंड प्रकाशत राहील, आणि अडीअडचणीतून, दुर्घट प्रसंगातून आम्हाला मार्ग दाखवील, यात नवल ते काय?
शिवाजीचा एकएक सवंगडी शिवाजीवर प्राणांपेक्षाहि अधिक प्रेम करीत होता. तानाजी मालुसरे, सूर्याजी, येसाजी कंक, नेताजी पालकर, बाजी फसलकर, बाजीप्रभू, मुरारबाजी यांची स्वामिनिष्ठा अवर्णनीय होती. आणि असल्या शूर स्वामिभक्तांची मदत असल्यामुळे शिवाजीचे स्वराज्यस्थापनेचे कार्य जरी सुकर झालेले असले, तरी अशा लोकांची अभेद्य संघटना निर्माण करून तिचा उपयोग परकी सत्तेची पोलादी चौकट खिळखिळी करण्याकडे ज्यांनी आपल्या संघटनाचातुर्याने आणि कुशलतेने करून घेतला, त्या शिवाजीची योग्यता अधिकच उठावदार दिसते.
स्वत: राजे असताना, अलोट संपत्ति पायाखाली लोळण घेत असताना, आणि कर्तुमकर्तुम् अन्यथा कर्तुम् सत्ता हाती असताना सुद्धा नम्रपणा, निस्पृहता, मातृभक्ति, प्रजाजनांविषयी कळकळ, परधर्मीयांविषयी सहिष्णुता, स्त्रिया व ब्राह्मण यांविषयी आदरभाव, धर्मप्रेम, नीतिमत्ता आणि शील इत्यादि संपत्ति आणि सत्ता यांनी युक्त असलेल्या माणसाच्या अंगी क्वचितच आढळून येणारे गुण शिवाजी महाराजांच्या अंगी प्रकर्षाने वास करीत होते हे पाहून त्यांच्यासारखे राजे तेच असेच म्हणणे प्राप्त आहे.
थोडीशी संपत्ति आणि सत्ता हाती येताच दुर्बलांवर व अबलांवर जुलुम जबरदस्ती करणाऱ्यांची उदाहरणे काही थोडीथोडकी नाहीत. राजसत्ता प्राप्त झाल्यावर सत्तामदाने धुंद होऊन प्रजेवर अनन्वित जुलुम करणाऱ्या राजांचीहि इतिहासात वाण नाही. स्वतःच्या स्वार्थाकरिता आणि सुखाकरिता दुसऱ्यांच्या हितावर निखारे ठेवून नीतिनियमांना धाब्यावर बसविणारे व देवधर्म सब झूट मानणारे लोकहि हवे तितके आढळून येतील. अशी परिस्थिती असताना, कल्याणच्या सुभेदाराची लावण्यवती सून समोर उभी करण्यात आली असता ह्या महापुरुषाच्या तोंडून उद्गार बाहेर पडतात की 'आमच्या माँसाहेब इतक्या सुंदर असत्या, तर आम्हीही असेच सुंदर निपजलो असतो.'. काय ही उज्ज्वल नीतिमत्ता! समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागावयास आले असता शिवाजी राजांनी आपले राज्य त्यांना अर्पण केले, आणि तेव्हांपासून समर्थांच्या स्वामित्वाची खूण म्हणून भगवा झेंडा त्यांच्या सैन्याच्या अग्रभागी मोठ्या डौलाने मिरवू लागला ही गोष्ट तर इतिहासप्रसिद्धच आहे. ही घटना त्यांच्या निस्पृहतेची आणि गुरुभक्तीची साक्ष देते.
असे एक ना दोन, शेकडो गुण त्यांच्या अंगी वास करीत होते. या गुणांपैकी एखादा जरी गुण आम्हाला आत्मसात करता आला, तरी शिवरायांचा जन्मोत्सव साजरा केल्याचे सार्थक झाले, असे आम्ही समजू.
भारतमातेच्या पायातील परदास्यशृंखला तोडून तिच्या गळ्यात स्वातंत्र्याचा मौक्तिकहार घालण्याच्या कामी शिवरायांचे चरित्र आम्हाला मार्गदर्शक आणि स्फूर्तिदायी होवो अशी त्या परमेश्वराची प्रार्थना करून पुन्हा एकवार मी शिवरायांच्या तसबिरीपुढे आपले मस्तक नमविते आणि आपण माझे बोबडे बोल शांतपणे व कौतुकाने ऐकून घेतले याबद्दल आभार मानून आपली रजा घेते.
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।
गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय ।।
१९७६ मधे बाबा सेवानिवृत्त झाले. त्यांची सर्व मुले-मुली तोपर्यंत शाळेच्या चाकोरीतून बाहेर पडली होती. त्या आधीच काही वर्षांपासून आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन बऱ्याच प्रमाणावर कमी व्हायला सुरुवात झाली होती. शिरोळे वक्तृत्व स्पर्धा व इतरही अनेक स्पर्धा इतिहासजमा झाल्या होत्या. गणेशोत्सव, शारदोत्सव यासारख्या सार्वजनिक उत्सवांमधून होणाऱ्या अशा स्पर्धा कालबाह्य होऊन त्यांची जागा आर्केस्ट्रा, सिनेमा व तत्सम कार्यक्रमांनी घेतली होती. राज्यकर्त्यांची असहनशिलता वाढीला लागली होती. विचारस्वातंत्र्याचे चिपोरे पडत होते. या सर्वांची परिणति बाबांच्या पार्श्वलेखनातून निवृत्त होण्यात झाली. आमच्या व आमच्या शाळेच्या जीवनातील एक सुवर्णयुग संपले.
पार्श्वलेखन खंडले तरी बाबांचे लेखन सुरूच होते. नुकताच त्यांचा अमृतकलश हा काव्यसंग्रह व आमच्या आग्रहास्तव लिहिलेले 'मज्जीवनमणिमाला' हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. प्रथमच बाबांचे लेखन बाबांच्या नावानिशी उजेडात आले. मज्जीवनमणिमालेचे प्रकाशन स्वातंत्र्याच्या सुवर्णजयंतीच्या दिवशीच झाले हा योगायोग. स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्षात देशाच्या ह्या सामान्य नागरिकाला काय वाटते?
विसावे शतक
माझा जन्म १९१५ सालचा. मला माझ्या जीवनातील पहिली घटना जर कोणती आठवत असेल तर ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या मृत्यूनंतर, दुसऱ्या दिवशी निघालेली प्रचंड मूक शोकयात्रा. १ ऑगस्ट १९२० ला लोकमान्य वारले. लोकमान्य टिळक हे तत्कालीन भारताचे स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी होते. 'तेल्यातांबोळ्यांचे पुढारी' असे त्यांना म्हटले जाई. पण यातच त्यांची थोरवी दडलेली आहे. आधीच्या पुढाऱ्यांप्रमाणे ते केवळ सुशिक्षितांचे व उच्चभ्रु लोकांचे अग्रणी न राहता सर्वसामान्य जनतेचे पुढारी बनले हाते. त्यांचे हितशत्रू त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणत. पण यातच त्यांचा खरा बहुमान आहे. इंग्रजी राज्याविरुद्ध त्यांनी भारतीयांच्या मनात असंतोषाचा वन्ही चेतविला, पेटविला. अशा या थोर पुढाऱ्याचा अंत झाला. सारा देश शोकसागरात बुडाला. नागपुरातही प्रचंड शोकयात्रा निघाली. साऱ्या स्तरातील लोक त्यात सहभागी झाले होते.
मी त्यावेळी पाच वर्षांचा होतो. केळीबाग मार्गावरून ती मिरवणूक गेली. आमच्या वाड्याच्या मागच्या दाराने बाहेर पडले की केळीबाग मार्ग जवळच होता. माझ्या वडिलांनी मला कडेवर घेऊन ती मिरवणूक मला दाखविली. साऱ्या शहरावर शोककळा पसरली होती. एका थोर देशभक्ताच्या मृत्यूने सारे राष्ट्र कसे शोकाकुल होते, हा पहिला खोल संस्कार त्या मिरवणुकीने माझ्या शिशुमनावर उमटविला.
लोकमान्यांच्या मृत्यूनंतर हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे महात्मा गांधींकडे गेली. १९२१ ची काँग्रेस नागपुरलाच भरली. त्या अधिवेशनातही माझे वडील मला घेऊन गेले होते. त्या अधिवेशनातील पांढऱ्या शुभ्र गांधी टोप्या घातलेले कँाग्रेस कार्यकर्त्े व स्वयंसेवक - ते दृश्य मला अजूनही आठवते. मी प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात असताना आम्हाला भाषेच्या क्रमिक पुस्तकात 'जॉर्ज नृपा गावे सद्भावे' ही इंग्लंडचे व हिंदुस्थानचे बादशहा पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीपर कविता होती. १९११ साली पंचम जॉर्जने भारतास भेट दिली. दिल्लीला मोठा दरबार भरला. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून १२ डिसेंबरला दरबार डे ची सुटी राहात असे. पण प्राथमिक शाळेतून प्रार्थनेच्या वेळी नागपुरचे प्रसिद्ध कवी श्री. आनंदराव टेकाडे यांचे 'हा हिंददेश माझा' हे देशभक्तीपर गीत म्हटले जात असे.
१९२१ ची असहकािरतेची चळवळ बरीच फोफावली. विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या. वकिलांनी वकिली सोडली. विधानसभेच्या आमदारांनी राजीनामे दिले. नागपुरला टिळक विद्यालयाची स्थापना झाली. श्री. आप्पाजी तिजारे, आचार्य दादा धर्माधिकारी, इत्यादि मंडळींनी टिळक विद्यालय बरेच नावारूपास आणले. आमचे मामा श्री. कृष्णराव कमाविसदार, मावसभाऊ श्री. हरिभाऊ पत्तरकिने आदि मंडळींनी भंडाऱ्यास राष्ट्रीय शाळा काढली. १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत आमचे मामा १२ व्या युद्धमंडळाचे सेक्रेटरी होते. ते त्यावेळी सध्या राजविलास टाॅकीज आहे, त्याच्या जवळच्या श्री. खोलकुटे वकिलांच्या घरी किरायाने राहत असत. त्यांचे चिटणीस पार्कात भाषण झाले. दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या घरून पकडून नेण्यात आले. बराच लोकसमुदाय जमला होता. मीही त्यावेळी तेथे होतो. मामांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली. १९३० च्या चळवळीत माझे मावसभाऊ श्री. हरिभाऊ पत्तरकिने यांनी आपल्या घरी खादीचा कारखाना काढला. मीही तेथून एक खादीची धोतरजोडी विकत घेतली. मी स्वतः खादीच वापरीत असे. माझे दुसरे मावसभाऊ श्री तात्याजी पुराणिक आणि थोरले मामा श्री. यादवराव कमाविसदार यांनाही जंगलचा कायदा तोडल्यामुळे पकडण्यात आले.
सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याचे काँग्रेसने ठरविले. नागपुरलाही सायमन कमिशन येणार होते. आदल्या रात्रभर लोकांची तयारी चालू होती. काळे झेंडे घेऊन सायमन भाग जाव, Simon, go back ह्या घोषणांनी त्यांचे नागपुर स्थानकावर स्वागत होणार होते. काळ्या पताका घेऊन 'सायमन भाग जाव' च्या घोषणा देत मोठी मिरवणूक निघाली. ती लोखंडी पुलाजवळ अडविण्यात आली. अशीच एक मिरवणूक लाहोरला पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निघाली. तिच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. यात लाला लजपतराय जखमी होऊन त्यातच त्यांचा अंत झाला
८ ऑगस्ट १९३० ला १४४ कलम लावले असतांनाही नागपुरला गढवाल दिनाची मिरवणूक निघाली. ती कोतवाली जवळ अडविण्यात आली. मिरवणुकीतील लोक तेथेच ठाण मांडून बसले. रात्री बारा वाजेपर्यंत ते तसेच तेथे बसून होते. नागपुर शहर पाहायला लोटले. आमच्या शाळेजवळच सशस्त्र सैनिकांचा तळ पडला होता. रात्री बारा वाजता १४४ कलमाची मुदत संपली म्हणून मिरवणुकीचा अडथळा काढून घेण्यात आला. नागपुरचे तत्कालीन डी. सी. श्री. त्रिवेदी यांच्या समजूतदारपणामुळे त्या दिवशीचा गोळीबाराचा प्रसंग टळला. परदेशी कापडांच्या दुकानांवर आणि दारूच्या गुत्त्यांवर पिकेटिंग चालू होते. रोज हजारो स्वयंसेवक पकडले जात होते. असा तो झपाटलेला काळ होता. टाउन हॉल, पटवर्धन ग्राउंड, चिटणीस पार्क येथे मोठमोठ्या जाहीर सभा होत. मी बहुतेक सभांना जात असे. माझे वडीलही माझ्या बरोबर येत असत. तेही खादी वापरू लागले होते. ह्या अशा वातावरणात मी परकीय सरकारची नोकरी न करण्याचा निश्चय केला.
विसावे शतक हे साऱ्या जगातच क्रांतिकारक ठरले. रशियातील झारशाही नष्ट होऊन कम्युनिस्ट राजवट अस्तित्वात आली. लेनिन, स्टॅलिन, खृश्चेव्ह, गोर्बचेव्ह, येल्तसिन ही स्थित्यंतरे रशियाने व साऱ्या जगाने पाहिली. आणि आता अध्यक्ष आणि रशियन संसद यांच्यातच संघर्ष सुरू झाला आहे.
भारत १९४७ साली स्वतंत्र झाल्यानंतर जगातीत अनेक लहानमोठे देश एकामागून एक स्वतंत्र होत गेले. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींनी लढ्याची सुरुवात केली. नंतर कित्येक वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर नेल्सन मंडेलाची सुटका झाली. आता दक्षिण आफ्रिकेतही लोकशाहीच्या स्थापनेची चिन्हे दिसत आहेत.
युनियन ऑफ सोव्हियेत सोशालिस्ट रिपब्लिक (USSR) दुभंगून छोटी छोटी स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली आहेत.
१९१४ च्या महायुद्धानंतर विलग झालेले पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी पुनश्च एक झालेले आहेत.
आतापर्यंत अमेरिका व रशिया ही दोन बलाढ्य व समृद्ध राष्ट्रे जगात अस्तित्वात होती. रशियाच्या विघटनानंतर आता अमेरिका हे एकच बलाढ्य व समृद्ध राष्ट्र उरले आहे.
सामाजिक क्षेत्रातही विसाव्या शतकात क्रांती घडून आली आहे. आफ्रिकेतील आणि अमेरिकेतील वर्णविद्वेषाची धार बरीच बोथट झाली आहे. भारतातील अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट झाली नसली तरी महात्मा गांधी, सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, इत्यादींच्या अथक प्रयत्नांमुळे व प्रचारामुळे तिचे पूर्वीचे भयानक स्वरूप आता शिल्लक राहिले नाही. सार्वजनिक क्षेत्रात तर ती नष्टप्रायच झाली आहे.
स्त्री शिक्षणाच्या बाबतीतही बराच बदल घडून आला आहे. मी सायन्स कॅालेज मध्ये असताना इंटरमिजिएटच्या वर्गात फक्त तीनच मुली होत्या. B. Sc. च्या वर्गात फक्त एकच मुलगी होती. आता विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या जवळजवळ समान असते. स्त्री शिक्षणाच्या एवढ्या प्रसाराचे श्रेय महर्षी कर्वे यांनाच आहे.
शिक्षणाच्या सर्व शाखात आता मुली आहेत. तसेच नोकरी आणि उद्योगाच्या सर्व क्षेत्रात स्त्रिया दिसून येतात.
आर्थिक क्षेत्रात तर भारतात विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात मोठी क्रांतीच घडून येत आहे. भारताचे नवे आर्थिक धोरण हा मोठा वादाचा विषय झालेला आहे. स्वदेशी मालाला उत्तेजन द्यायचे म्हणून परदेशी मालावर जबर जकात बसविली जात असे. पण आता लंबकाने उलट टोक गाठण्याची चिन्हे दिसत आहेत. परदेशी मालावरील कर कमी करण्यात येत आहेत. खुल्या व्यापाराचा पुरस्कार करण्यात येत आहे. इंग्रज हातात तराजू घेऊन व्यापाराच्या मिषाने भारतात घुसले आणि राज्य बळकावून बसले, ह्या साऱ्या इतिहासकडे डोळेझाक करून देशोदेशी दौरे काढून परकीयांना भारतात भांडवल गुंतविण्यास, कारखाने काढण्यास, व्यापार करण्यास आपले शासन आग्रहपूर्वक निमंत्रण देत आहे. जेथे परदेशी कापडाच्या होळ्या पेटल्या, परदेशी कापडाच्या दुकानासमोर स्त्रियांनी सुद्धा पिकेटिंग केले, कारावास भोगला, पोलीसांच्या दंडुक्यांचा मार सहन केला, परदेशी कापडाने भरलेल्या ट्रकसमोर आडवे पडून बाबू गेनूने आत्मबलिदान केले, तेथेच आता माझी साडी इंपोर्टेड आहे असे सांगण्यात भारतीय नारीला भूषण वाटत आहे. स्वदेशी चळवळ करू नका, केल्यास आमच्या खुल्या आर्थिक धोरणात बाधा निर्माण होईल, परदेशी तंत्रज्ञान आपल्याला मिळणार नाही, असे आपले तथाकथित पुढारी म्हणत आहेत. महात्मा गांधींनी दारुबंदीची केवढी प्रचंड चळवळ उभारली होती! दारूच्या गुत्त्यांवर पिकेटिंग केल्यामुळे हजारो कार्यकर्त्यांना कारावास भोगावा लागला. त्याच देशात आता तथाकथित राजकीय पुढाऱ्यांना दारूच्या दुकानाचे लायसंस देण्यात येत आहेत. रस्तोरस्ती शिक्षण संस्थांच्या शेजारी बीअर बार, डायरेक्टर्स स्पेशल अशी सोज्वळ नावे धारण करून दारूची दुकाने उजळ माथ्याने फिरत आहेत. ही प्रगती की अधोगती? दारू पिणे ही तर उच्चभ्रू लोकांची फॅशन झाली आहे. महात्मा गांधींची सारी चळवळ वाया गेली असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. परदेशी कर्जाचा डोंगर सारखा वाढतोच आहे. देश कर्जबाजारी झाला आहे. परदेशाकडे तो गहाण टाकण्याचे हे भिकेचे डोहाळे तर नव्हेत ना? एकविसाव्या शतकात प्रवेश करण्याची अशी जोरदार तयारी सुरू आहे.
मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असावे यासाठी जोरदार चळवळ देशात निर्माण झाली होती. पण आता पूर्व माध्यमिक स्तरापासून इंग्रजी माध्यम मुलांना देणे सुरू आहे.
वैज्ञानिक क्षेत्रात तर प्रचंड प्रगती दिसून येते. टेलीव्हीजन आणि मोटरकार आता चैनीच्या वस्तू राहिल्या नसून आवश्यक गरजा झाल्या आहेत. संगणक सर्व कारखान्यातून, कार्यालयातून, रेल्वेच्या आरक्षण कक्षातून जोरात मुसंडी मारत आहेत. चंद्रावर माणूस पोचला आहे. उपग्रह आकाशात सोडले जात आहेत. त्यावरून येणाऱ्या चित्रांवरून हवामानाचे भाकित वर्तविण्यात येत आहे. यंत्रमानवाची कामगिरी तर आश्वर्यकारक आहे. विनाशक शस्त्रांची आगेकूच सुरू आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या स्कूटर्स आणि मोटरगाड्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांचे आयुर्मान घटत आहे, आणि अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
'यंत्र हे शाप की वरदान' ह्या प्रश्नाच्या कक्षा वाढून 'विज्ञान हे शाप की वरदान' असे विस्तृत स्वरूप त्याला प्राप्त होऊ पाहत आहे. पर्यावरणाचा प्रश्न अतिशय भेडसावू लागला आहे. पर्यावरणाचे प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल बिघडू पाहत आहे. हे प्रदूषण थांबले नाही तर जगाच्या नंदनवनाचे स्मशानात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. वैज्ञानिक शोध आणि निसर्ग यांचे अघोषित युद्ध सुरू आहे. विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. माणसाची मानसिकता बिघडल्यामुळे विज्ञानाचा उपयोग निसर्गाच्या रक्षणासाठी न होता भक्षणासाठी होत आहे आणि त्यामुळे या जगाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मुंबईत शुक्रवार दि. १२ मार्च १९९३ रोजी १३ ठिकाणी झालेले बाँबस्फोट हे माणसाच्या विकृत मानसिकतेचे ज्वलंत उदाहरण आहे. विज्ञान हे शाप कसे ठरू शकते, याचेही ते गमक आहे.
समाजाची मानसिकताच विसाच्या शतकात बिघडत चालली आहे. महात्मा गांधींसारख्या अहिंसेच्या पुजाऱ्याने १२ मार्च १९३० रोजी ऐतिहासिक दांडी यात्रेला प्रस्थान केले. त्याच तारखेला ६३ वर्षांनंतर समाजविध्वंसक दुरात्म्यांनी मुंबईत जीवंत माणसांची होळी पेटविणारे बाँबस्फोट घडवून आणावे हा एक विचित्र योगायोगच म्हणावा लागेल.
पुण्य-पाप, स्वर्ग-नरक ह्या कल्पना लयाला गेल्या. नीतिन्याय उरला नाही. भोगवाद बोकाळला. 'मनःपूतं समाचरेत्' या वचनाचा विकृत अर्थ रूढ होऊ लागला. पूत म्हणजे पवित्र. मनाला जे पवित्र आणि श्रेयस वाटेल ते आचरावे असा या वचनाचा खरा अर्थ. पण मनास येईल तसे स्वैर वागावे, अनियंत्रित वागावे असा विपरीत अर्थ लावण्यात येऊ लागला. साधनशुचिता अव्यवहार्य ठरली. श्रमाची थोरवी ही कल्पना लयाला जाऊन अभ्यासावाचून परीक्षेत यश, गुणवत्तेवाचून महाविद्यालयात प्रवेश, परिश्रमावाचून पैसा, जनसेवेवाचून पुढारीपण, काही कार्य न करता मानसन्मान, त्यागाशिवाय कीर्ति, कशी मिळवता येईल यासाठी बुद्धी खर्च होऊ लागली. त्यातून मग परीक्षेत काॅपी, परीक्षकास लाच, कॅपिटेशन फी, काळा पैसा, काळा पैसा दडविण्यासाठी देवदर्शनास गर्दी व गुप्त पेटीत दान इत्यादि प्रकारास वारेमाप ऊत आला आहे. समाजाच्या सर्व क्षेत्रात भष्टाचार बोकाळत आहे. विद्येचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. अस्सल मागे पडून नक्कल वाढत चालली आहे. परीक्षेत अक्कल कामास न येता शक्कल लाभदायक ठरू लागली आहे. राजकारणात ठगांची व गुंडांची गर्दी वाढत आहे. अध्यात्मात भोंदुगिरी व फसवेगिरी बोकाळत आहे. विद्वत्ता, नीती, शील, चारित्र्य यांचे महत्त्व कमी होऊन पैसा हेच आराध्य दैवत झाले आहे. अर्थार्जनाच्या बाबतीत सारासार विचार बाजूला राहून येनकेन प्रकारेण प्रसंगी दुसऱ्याला लुबाडून, फसवून किंवा खड्ड्यात घालून सुद्धा पैसा मिळविणे यात काहीही गैर वाटेनासे झाले आहे. 'शीलं परं भूषणम्' हे सुभाषित कालबाह्य ठरू पाहत आहे. पैसा हेच मूल्य झाले आहे.
मूल्यात बदल म्हणजे क्रांती अशी साने गुरूजींनी क्रांतीची व्याख्या केली आहे. जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांती हे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. महात्मा गांधींचा साधनशुचितेच्या बाबतीत केवढा कटाक्ष होता! पण ते सारे लयाला जाऊन विसाव्या शतकाच्या या अखेरच्या दशकात विपरीत अर्थाने क्रांती घडून येण्याची चिन्हे दिसत आहेत.
ज्या विसाव्या शतकात स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, विनोबा भावे, पं. जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ ठाकूर, सरदार वल्लभभाई पटेल, बाबू राजेंद्र प्रसाद, यांच्या सारख्या थोर विभूती होऊन गेल्या, त्याच विसाव्या शतकाने जाता जाता अशा दुगाण्या का झाडाव्या तेच कळत नाही.
Every cloud has a silver lining ह्या उक्तीप्रमाणे सध्याच्या तमोमय ढगाळ वातावरणातूनच महापुरुषांनी आपल्या उराशी बाळगलेले चंदेरी स्वप्न साकार होईल, असा आशावाद आपण बाळगू या. 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' हे कविवचन खरे ठरून २१ व्या शतकाची तेजोमय पहाट नजीकच्या भविष्यात पाहायला मिळेल अशी सदिच्छा प्रकट करून ही द्वादश मण्यांची सूत्रबद्ध केलेली मज्जीवनमणिमाला हातावेगळी करतो.
१९४० ते १९९७, ५७ वर्षांचा काळ. आशा, अभिलाषा, आकांक्षा, निराशा, हताशा यांचे मिश्रण. गोळाबेरीज काय हे ज्याचे त्याने ठरवायचे.
एक नही, दो नही, हो गए साल पचास
१५ अगस्त इस सालका दिन ही है कुछ खास
स्वतंत्रता के अर्धशतक में कुछ पाया, कुछ खोया
ऐसी भी घटनाएं घटी, देख कबीरा रोया
आओ चंद घटनाओंका हम आज करे अवलोकन
क्या सही, क्या गलत, आप करो मूल्यांकन
छह महिनेभी हुए नही थे स्वतंत्रता प्राप्तीको
'हे राम' की गूँज कलंकित कर गई सारी राष्ट्रभक्ती को
आजादी जिसने दिलवाई उसकी रुक गई साँस
एक नही, दो नही, हो गए साल पचास
दूरदृष्टिसे देशने पहना घटना का यह साज
जनता का, जनता के खातिर, जनता द्वारा राज
ना राजा, ना तानाशाही, जनता खुदकी बॉस
एक नही, दो नही, हो गए साल पचास
खाली करके देश हमारा चला गया अंग्रेज
सदा अखंडित देश को तोडा, किया नही परहेज
उससे उभरकर, खुदको सम्हलकर, शक्ति बने हम खास
एक नही, दो नही, हो गए साल पचास
प्रगती की हर क्षेत्र में हमने, वृद्धि हुई धनमें
फिर भी कमी क्यों आज भी दोस्तों, सोचो जरा मनमें
पचास थे हम करोड पहले, आ गए और पचास
एक नही, दो नही, हो गए साल पचास
नीति अनीति भेद नही था जब था परकी राज
चलो ठीक है वह तो गैर थे, क्या हो रहा है आज?
जो देखो वह लूट मचाए, बढती जा रही प्यास
एक नही, दो नही, हो गए साल पचास
कितनीही बाते दोहराऊँ, स्थिती है आज बिकट
आदर्शोंको, मूल्योंको क्यों कर दिया स्क्वेअर कट?
आओ मिलकर बैठे, सोचे, प्रगति हुई या ऱ्हास
एक नही, दो नही, हो गए साल पचास
एक नही, दो नही, हो गए साल पचास
१५ अगस्त इस साल का दिन ही है कुछ खास
_____________________
No comments:
Post a Comment