Sunday, 8 November 2015


आमची संस्कृति


आपल्या देशाविषयीचा अभिमान व आपल्या संस्कृतीविषयीचा अभिमान या दोन मूल मानवी भावना आहेत. हे साम्य सोडले तर या दोन भावनांचे गुणधर्म बरेचसे भिन्न आहेत.

देश नकाशावर दाखविता येतो, त्याच्या सीमा आखलेल्या असतात, त्यातले नद्या, पर्वत नकाशात व प्रत्यक्षात अस्तित्वात असतात, त्याला ध्वज असतो, राष्ट्रगीत असते, त्याचा पोषाख असतो, त्याची भाषा असते, त्याचा इतिहास असतो, त्याला वर्तमान असते, त्याला भविष्य असते. तो परतंत्र होतो, स्वतंत्र होतो. या सर्व घडामोडी एका पिढीच्या आयुष्यात घडू शकतात. थोडक्यात म्हणजे देश ही सगुण, साकार गोष्ट आहे. देशाभिमान ही सगुण उपासनाच. सामान्यांच्या आटोक्यातली मानवी भावना.

पण संस्कृति? प्रत्येकाची तिची कल्पना वेगळी असते. कोणाला ती देवात दिसते, कोणाला देवळात. कोणाला दिवाळीत, कोणाला होळीत. कोणाला नर्तकीत, कोणाला कीर्तनात. कोणाला वास्तूत, कोणाला वास्तुशास्त्रात. कोणाला लोकनृत्यात, कोणाला लोकसंगीतात. कोणाला धर्मात, कोणाला विधीत. कोणाला कर्मात, कोणाला कर्मकांडात. कोणाला कशात, कोणाला कशात. तिचा ऱ्हास होत आहे यावर मात्र सर्वांचे एकमत असते.

'Entropy of the universe always increases' असा Thermodynamics चा एक मूल सिद्धांत आहे. साध्या सोप्या भाषेत त्याचा अर्थ विश्वातील शिस्तबद्धपणा सतत कमी होत असतो असा आहे. Entropy हे गैरशिस्तीचे एक परिमाण आहे. या सिद्धांताला अपवाद नाहीत. संस्कृति of the देश is always diminishing असाहि घोष सुरू असतो. म्हणजे संस्कृति हा शिस्तबद्धतेचाच एक प्रकार काय? कल्पना तर उत्तम वाटते. पण मग ही संस्कृति टिकविण्यासाठी देशात गैरशिस्त कशी माजते?

Thermodynamics च्या अभ्यासकाला जशी Entropy ची कल्पना केव्हाहि तोंडघशी पाडू शकते तसेच संस्कृतीचे आहे. मी मी म्हणणारा तिची परिभाषा करू शकणार नाही. 'सिर्फ अहसास है जो रूह से महसूस करो' असे तिचे स्वरूप. दाखवतो म्हणावे तर दाखविता येत नाही, व नाकारतो म्हणावे तर नाकारता येऊ नये असे. निर्गुण, निराकार. आणि म्हणूनच ती सहजासहजी नष्ट होऊ शकत नाही. पण असे म्हणणे म्हणजे 'संस्कृति धोक्यात आहे' असा बागुलबोवा निर्माण करून स्वतःच्या पोटापाण्याची सोय करणारा जो एक वर्ग देशात तयार झाला आहे त्यांच्या पोटावर पाय देणे होईल. आणि कोणाच्या पोटावर पाय देणे ही आपली संस्कृति नाही.

Entropy आडवी आल्यामुळे संस्कृति म्हणजे काय हा प्रश्न तसाच राहून गेला. हे विषयांतर मला फावलेच. इथे तरी कोणाला माहित संस्कृति म्हणजे नक्की काय ते? या प्रकरणात समाविष्ट केलेल्या बाबांच्या निबंध-भाषणांचा गोपालकाला खाऊन झाल्यानंतर जीभेवर जी चव रेंगाळत राहील ती म्हणजे आपली संस्कृती असे माझे एक मत.


पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावि काळ


पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावि काळ
बोध हाच इतिहासाचा सदा सर्व काळ
कासया वाहावी चिंता मग मनी जहाल
रात्र सरे तेव्हा उगवे दिनहि पूर्व वाटे

प्रस्तुत निबंधाचा विषय वरील कडव्यापैकी पहिली ओळ होय. आपल्या भूतकाळाचे आणि आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाचे व पराक्रमाचे गोडवे गाणाऱ्या आणि वर्तमानकाळाची दशा पाहून दुःखाचे अश्रू ढाळणाऱ्या व त्यापासून उज्ज्वल भविष्यकाळ निर्माण करणाऱ्या कवि विनायकाचे हे बोल आहेत. ज्यांचा भूतकाळ उज्ज्वल होता, ज्यांच्या पूर्वकाळात दिव्यत्वाचे दर्शन होते त्यांनाच उज्ज्वल भविष्यकाळाची अपेक्षा आहे. ज्यांच्या भूतकाळात दिव्यतेचे नावनिशाणहि नाही, त्यांनी उज्ज्वल भविष्यकाळाची स्वप्ने पाहणे व्यर्थ होय. 'We can make the future by the past.'. आपण भविष्यकाळाची निर्मिति करू शकतो, पण ती भूतकाळाच्या साह्यानेच. भूतकाळापासून घेतलेल्या स्फूर्तीच्या कारंज्यांनीच भविष्यकाळातील उज्ज्वलतेच्या जलाशयाची निर्मिति होत असते. विपन्नावस्थेत सापडलेले राष्ट्र जर आपल्या दिव्य भूतकाळाचे स्मरण करील तर त्यापासून त्याच्या मनात आशेचे अंकुर निर्माण होऊन ते पुन्हा उज्ज्वल भविष्यकाळ प्राप्त करण्यास समर्थ होऊ शकेल. इतिहास हा अनुभवाचा साठा आहे. प्रत्येक पिढी मागील पिढ्‌यांच्या अनुभवाचे गाठोडे पदरी बांधून जन्माला येत असते आणि स्वत: गारद होतांना जगाच्या इतिहासात नवीन भर घालून जात असते.

गतेतिहासातील पूर्वजांच्या चुका आठवून त्यांना शिव्या देणे, आणि आपल्या पूर्वजांचे वैभव आठवून अश्रु ढाळणे हे नादानपणाचे लक्षण आहे हे आम्हालाहि कबूल आहे. परंतु गतकाळातील वैभव आठवून तसे मायदेशाला पुन्हा प्राप्त करून देण्याची महत्वाकांक्षा बाळगणे हे प्रत्येकाचे कर्त्तव्य आहे. शुक, व्यास, वाल्मीकी वगैरे ऋषिमुनींचे तपोबल आमच्या पाठीशी आहे. राणा प्रताप, शिवाजी महाराज, झाशीची राणी वगैरे संग्रामदेवतांचे क्षात्रतेज आमच्या नसानसांतून नवचैतन्य निर्माण करीत आहे. एकनाथ, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, तुळसीदास, स्वामी विवेकानंद वगैरे संतमहात्म्यांचे पुण्यमय वरदहस्त आमच्या शिरावर आहेत. मग आमचा भविष्यकाळ कां उज्ज्वल राहणार नाही? आमचा पूर्वकाळ आम्हाला दिव्य भविष्यकाळ निर्मिण्यास स्फूर्ति देत आहे. मग आम्ही व्यर्थ चिंता कशास्तव वागवावी?

'History repeats itself.'. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. आणि म्हणूनच भूतकाळात एकदा घडून गेलेला इतिहास भविष्यकाळात पुन्हा घडत असतो. भूतकाळ हे राष्ट्राचे किंवा व्यक्तीचे आशास्थान व स्फूर्तिकेंद्र आहे. वर्तमानकाळाचा महासागर महान आपत्तींच्या झंझावाताने कितीहि खवळला असला तरी भूतकाळातील इतिहासाच्या दीपस्तंभाच्या प्रकाशात आम्ही आपल्या भवितव्याचे तारू इष्ट मुक्कामापर्यंत सहज हाकारू शकतो. वर्तमानकाळ ही भूतकाळाची कन्या असली तरी भविष्यकाळाची माता आहे. म्हणूनच भविष्यकाळाच्या घडणीत भूतकाळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल.'. भूतकाळापासून मिळालेल्या स्फूर्तीच्या जोरावर निराशांधःकारातहि आशेचा किरण निर्माण करता येतो.

अखिल जगाच्या साहित्यात अग्रगण्य व ललामभूत असे वेदवाङमय आमच्या ऋषिमुनींनी गंगासिंधूच्या पवित्र तीरावर निर्माण केले. रामकृष्णासारखे अवतारी पुरुष याच देशात जन्मले. कर्णासारखा उदार याच देशात झाला. श्रियाळासारखा आदरातिथ्यशील राजा याच देशात झाला. सत्त्वशील हरिश्चंद्र याच देशात जन्मला. आमची सारी परंपरा याप्रमाणे उज्ज्वल आहे. अनेक आपत्तींनी, परकीय आक्रमणांनी व पारतंत्र्याने आमची हिंदभू खचली असली तरी पुन्हा तिने डोके वर काढले. मोगल आमदानीत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास वगैरे संतजन जन्मास आले व त्यांनी जनतेची मनोभूमी तयार करून ठेवली. शिवाजीने आपल्या प्रयत्नांचे बीजारोपण करताच महाराष्ट्रीय स्वातंत्र्याचा विशाल वृक्ष फळाफुलांनी बहरून आला. सर्वभक्षक आंग्लसत्ता नष्ट करण्यासाठी याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. इंग्रजी सत्ता सर्व हिंदुस्थानवर कायम होताच आम्ही १८५७ चा बार उडवून दिला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, महर्षि अरविंद घोष, महात्मा गांधी, पं. मोतीलाल व जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस वगैरे पुढाऱ्यांनी इंग्रजी सत्तेला मूठमाती दिली.
आम्हाला भारताला वैभवाचे व मानाचे स्थान मिळवून द्यावयाचे आहे. स्वतंत्र भारत कुणाचीहि शागिर्दी करणार नाही, तो कुणापुढेहि मान वाकविणार नाही, त्याची जगाच्या गुरुस्थानी प्रतिष्ठापना होईल, त्याच्याकडे वाकडी नजर करून पाहण्याचीहि छाती होणार नाही, हे स्वप्न आपणाला प्रत्यक्षात उतरवायचे आहे, आणि त्याची स्फूर्ति आम्हाला भूतकाळापासून मिळण्यासारखी आहे. आमचा भूतकाळ आम्हाला सांगतो की आमचा भूतकाळ दिव्य होता आणि म्हणूनच आम्हाला खात्री आहे आमचा भविष्यकाळहि उज्वल राहिल.

पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावि काळ ।
बोध हाच इतिहासाचा सदा सर्व काळ ।।

तेल जळे परि ज्योत पाजळे


'घन तमी शुक्र बघ राज्य करी' या कविवर्य तांब्यांच्या प्रसिद्ध कवितेतील 'तेल जळे परि ज्योत पाजळे' हा एक सुभाषिताची योग्यता प्राप्त झालेला चरण आहे. तांबे हे आशावादी कवि आहेत, आणि वरील कविता म्हणजे त्यांच्या आशावादाचा उत्कृष्ट नमुनाच आहे. या कवितेतून ते खिन्न मनाला आशेचा दिलासा देत आहेत. अमावास्येच्या काळ्याकुट्ट अंधारातूनच अरुणाची सुवर्णप्रभा उदयाला येत असते. निशेच्या ओठातूनच उषेचे हास्य प्रकट होत असते. गुलाबाचे फुल काट्‌यातूनच आपले हसरे मुख जगाला दाखवीत असते आणि काळ्या ढगांच्या पोटातूनच सारा दिक्प्रांत उजळून टाकणारी चपला जन्म पावून लोकांचे डोळे दिपवीत असते. हिवाळ्याच्या हिमवर्षावानंतरच वसंताचे बहारदार हास्य जगाच्या प्रत्ययाला येत असते. बीज नाहिसे होते तेव्हाच अंकुर उदयाला येऊन वृक्ष फोफावतो. फूल गळते तेव्हाच झाडाला फळ धरते. तेल जळते म्हणूनच दिव्याची ज्योत प्रकाशमान होते. साध्या साध्या नैसर्गिक व व्यावहारिक दाखल्यातून एक  महान सत्य प्रतिपादन करण्याचा कवीचा प्रयत्न दिसतो, आणि ते सत्य म्हणजे मरणातच अमरता आहे. मरण हे सुखाचे दार आहे. ती प्रत्यक्ष भगवंताची करुणा आहे. तुमची जगन्माता बाहु उभारून तुम्हाला आपल्या उराशी कवटाळण्यासाठी तुमची वाट पाहात आहे. तेव्हा मरणाला व्यर्थ भिऊ नका, असा तेजस्वी संदेश कवि या काव्याच्या द्वारे वाचकांना देत आहेत.

साने गुरूजी देखील 'मृत्यूच्या काव्यां'त हेच सांगत आहेत. मृत्यू म्हणजे माहेरी जाऊन येणे, आईच्या कुशीत झोपणे. मृत्यु म्हणजे महन्मंगल, मृत्यु म्हणजे परमात्म्याशी ऐक्य - अशा एकापेक्षा एक भव्योदात्त कल्पना साने गुरुजींनी आपल्या 'भारतीय संस्कृती' या ग्रंथात मांडल्या आहेत. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी हेच सांगितले आहे.

वासांसि जीर्णानि यथा विहाय । नवानि गृह्णाति नरोपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।

जुनी वस्त्रे टाकून देऊन मनुष्य ज्याप्रमाणे नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा जुने शरीर टाकून देऊन नवीन शरीरात प्रवेश करतो. अशा रीतीने भारतीय संस्कृतीने मृत्यूची नांगीच काढून टाकली आहे. मरण हे जीवनवृक्षाला लागलेले एक फळ आहे; आणि मरणातूनच जीवन निर्माण होत असते हे सनातन सत्यच 'तेल जळे परि ज्योत पाजळे' या काव्यचरणातून कवि जगापुढे मांडतात.

'तेल जळे परि ज्योत पाजळे' या पाच शब्दांच्या लहानशा चरणात कितीतरी खोल अर्थ साठलेला आहे. तेल जळल्याशिवाय ज्योतीला तेज चढत नाही. तेलाला स्वतःला जळून नाहीसे व्हावे लागते तेव्हाच कोठे दिव्याच्या ज्योतीने आजूबाजूचा प्रदेश प्रकाशित होतो. कोणाला तरी त्याग करावा लागतो, स्वतःचे बलिदान करावे लागते, तेव्हाच दुसऱ्यांची जीवने उजळून निघतात. त्यागातूनच जीवन समृद्ध होत असते. जगाच्या कल्याणा । संतांच्या विभूति । देह कष्टविती । उपकारे ।। या अभंगात किंवा 'परोपकाराय सतां विभूतयः' या संस्कृत सुभाषितातही हेच सांगितले आहे.

साऱ्या थोर लोकांची चरित्रे तपासून पाहिल्यास आपणास हेच दिसून येईल की त्यांनी हाच त्यागाचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवला होता. साने गुरुजी म्हणतात की 'जेव्हा भारतीय संस्कृतीचे उपासक ध्येयासाठी आपल्या जीवनाची मडकी पटापट फोडावयास तयार होतील तेव्हाच भारत नवतेजाने फुलू लागेल.'.

राणा प्रतापाने मेवाड स्वतंत्र होईपर्यंत बिछान्यावर झोपावयाचे नाही, पत्रावळीवर जेवावयाचे असा नियम केला होता. शिवाजी महाराजांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाचे रान केले. रामदासांनी राष्ट्राचा संसार समृद्ध करण्यासाठी स्वतःच्या संसारावर पाणि सोडले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज दिली. लोकमान्य टिळकांनी, महात्मा गांधींनी आणि नेताजी सुभाषचंद्रांनी आपले सारे जीवन राष्ट्रकार्याला अर्पण केले तेव्हा कोठे स्वातंत्र्याची अरुण रक्तिमा भारताच्या क्षितिजावर उदयाला आली. अशी एक ना दोन, हजारो त्यागतपस्वी वीरांची उदाहरणे देता येतील. त्यांच्याच त्यागाने, त्यांच्याच बलिदानाने, त्यांच्याच आत्माहुतीने पारतंत्र्याच्या घोर अंधारातून डोके वर काढून भारताला आज स्वातंत्र्यसूर्याचे दर्शन घडले आहे. परचक्राचे काळे ढग भारतावर पुन्हा येऊ पाहत आहेत. देशातील तरुणांच्या त्यागाने, बलिदानाने व आत्मसमर्पणानेच या आपत्तीचे निराकरण होणार आहे.

'तेल जळे परि ज्योत पाजळे' या काव्यचरणातून अशा रीतीने निराश मनाला आशेचा व समाधानाचा दिलासा मिळतो, ध्येयवादी माणसाला त्यागाची प्रेरणा मिळते आणि स्वार्थत्यागात, सेवेत आणि बलिदानातच व्यक्तीच्या वा राष्ट्राच्या विकासाची बीजे साठवलेली आहेत या सत्याची प्रतीति येते.

फूल हसे काट्‌यात बघ कसे । काळ्या ढगि बघ तेज रसरसे
तीव्र हिमातुनि वसंतहि हसे । रे उघड नयन, कळ पळे दुरी
फूल गळे, फळ गोड जाहले । बीज मुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, परि ज्योत पाजळे । का मरणि अमरता ही न खरी? ।।

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी जसे दरवर्षी साजरे होतात तशीच गीताजयंती नागपुरात दरवर्षी साजरी होत असे. गीतामंदिर, भोसला वेदशाळा, समर्थ संस्कृत महाविद्यालय इत्यादि ठिकाणी गीतोपदेशावर आधारित विषयांवर निबंध, वक्तृत्व स्पर्धा आयोजित होत असत. त्या निमित्ताने गीतेवर बाबांचे अमाप लिखाण झाले. त्यातलेच काही येथे घेतले आहे.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन


भगवान श्रीकृष्णप्रणीत श्रीभगवद्गीतेचे सारसर्वस्व जर कशात साठवले असेल तर ते 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या दुसऱ्या अध्यायातील ४७ व्या श्लोकात साठवले आहे असे म्हटल्यास अयथार्थतेचा किंवा अतिशयोक्तीचा आरोप माझ्यावर कोणाला करता येईल असे मला वाटत नाही.

कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
मा कर्म फलहेतूर्भूर्माते संङगोस्त्व कर्मणि

हाच तो दुसऱ्या अध्यायातील ४७ वा श्लोक आहे. आमच्या साऱ्या धर्मग्रंथात गीतेची योग्यता अनन्यसाधारण अशी आहे. तेव्हा अशा ह्या असामान्य ग्रंथाचे सारसर्वस्वरूप असलेल्या वरील वचनाची श्रेष्ठता काय वर्णन करावी! आजपर्यंत अनेक लोकांनी गीतेवर भाष्ये व टीका लिहिलेल्या आहेत. जगातील प्रमुख भाषांतून गीतेची भाषांतरे झाली आहेत. तेव्हा अशा ह्या जगन्मान्य झालेल्या ग्रंथाची शिकवण काय आहे याकडे आपण वळू म्हणजे अनायासेच प्रस्तुत निबंधालाच हात घातल्यासारखे होईल.

कोणत्याही ग्रंथातील उपदेशाचे रहस्य किंवा तात्पर्य शोधून काढावयाचे असल्यास ते त्या ग्रंथाच्या उपक्रमोपसंहारास आणि फलास धरून असले पाहिजे. कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर 'सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽत्युत'  ह्या अर्जुनाच्या विनंतीवरून श्रीकृष्णांनी त्याचा रथ १८ अक्षौहिणी सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा केल्यावर त्याला आजे, मामे, सासरे, जावई, बंधु, गुरु इत्यादि नातेवाईक दिसले. 'चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः' या श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून चातुर्वर्ण्य अवस्थेत अर्जुन क्षत्रिय धर्माचा होता आणि युद्ध करणे हे त्याचे कर्त्तव्य होते. परंतु क्षत्रिय धर्मावर ममत्वाचा पगडा बसून मोहाने तो असे म्हणू लागला की पितृवध, गुरुवध, बंधुवध, सुह्रदवध किंबहुना सबंध कुलक्षय यांसारखी भयंकर पापे करून राज्य मिळविण्यापेक्षा मला नि:शस्त्र पाहून शत्रूंनी मला ठार मारले तरी बेहेतर आहे. लढाईत स्वकीयांचा वध करून त्यांच्या रक्ताने विटाळलेले आणि अभिशापाने ग्रस्त झालेले भोग मी उपभोगू इच्छित नाही. अशा रीतीने कार्याकार्यविवेकशून्य बनलेल्या अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगितली आणि त्याला युद्ध करावयाला लावले. ही किमया जर त्यांनी कशाने घडवून आणली असेल तर ती निष्काम कर्मयोगाच्या उपदेशाने. पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या मोहग्रस्त भूमिकेच्या वर्णनाने ग्रंथाचा उपक्रम केल्यावर लगेच दुसऱ्या अध्यायात त्याच्या रोगाचे अचूक निदान करून समत्वयोगाच्या, फलाशारहित कर्माचरणाच्या, सुखदुःखादि द्वंद्वनिरपेक्षतेच्या उपदेशरूपी औषधाच्या अशा काही रामबाण मात्रा अर्जुनाला पाजल्या आहेत की त्याचा मोहज्वर साफ उतरला आणि ग्रंथाच्या शेवटी त्याने

नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत 
स्थितोस्मि गतसंदेह: करिष्ये वचनं तव

अशी स्पष्ट कबुली दिली आहे.

निष्काम कर्मयोग ही भगवद्गीतेची प्रमुख शिकवण प्रस्तुत निबंधाच्या विषयाच्या एकाच ओळीवरून दिसून येते. हा उपदेश वस्तुतः जरी अर्जुनाला केलेला असला तरी अर्जुनाच्या मिषाने अखिल मानवजातीलाच त्यांनी हा उपदेश केलेला आहे. 'कर्म करणे हा तुझा अधिकार आहे. फलाशा तू धरू नकोस' असाच उपदेश ते आम्हाला करीत आहेत.

कर्त्तव्य करते समयी मनात फलाशा असू देऊ नये. कारण जीवनात असे कितीतरी प्रसंग येतात की त्यावेळेला मनुष्याला मोह अगदी अनिवार्य असतो. जो मनुष्य मनात काही आशाच ठेवणार नाही त्याला मानहानि, सुखदुःख, लाभालाभ, जयापजय, शीतोष्ण, जन्ममरण इत्यादि द्वंद्वापासून काहीहि त्रास होणार नाही.

आशा मनुष्याला स्वर्गाला पोचविते म्हणतात. पण मला तरी वाटते की आशा हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू होय. आशेला कोणी जीवनज्योत म्हणतो वा काहीहि म्हणतो. एकदा  कर्मफलाविषयीची आसक्ति मनात असली आणि कर्माचे योग्य फळ मनुष्याला मिळाले नाही म्हणजे तो निराशेच्या ठोकरांनी क्षीण होत जातो. तो समाजकार्य करू शकत नाही. सूर्य आपणाला प्रकाश देतो, वृक्ष फळेफुले देतात, नदी पाणी देते. पण यापैकी एकाला तरी फलाशा असते काय? सारे जणु काय मनुष्याला ओरडून सांगत आहेत की 'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'.

नारळातील गोटा नारळापासून अलग होऊन खुडबुड वाजतो त्याचप्रमाणे मनुष्याने कर्म करून पद्मपत्रामिवांभसा या न्यायाने अस्पृष्ट राहिले पाहिजे. नाव पाण्यावर तरंगते पण त्याच नावेत पाणी शिरले की ती बुडते हे लक्षात ठेवूनच मनुष्याने या फलासक्तीने भरलेल्या जगात राहावे पण त्या आसक्तीचा प्रवेश मात्र मनात होऊ देऊ नये.

फलाशारहित ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करण्याचाच गीतेत सर्वत्र उपदेश केलेला आहे. याप्रमाणे सुखदुःख, मानापमान इत्यादिंच्या ठिकाणी समत्वबुद्धि ठेवून निर्द्वंद्व, नित्यसत्वस्थ वृत्तीने कर्माचरण केले असता ती कर्मे कर्त्याला बाधक न ठरता कर्ता त्यांच्या पापपुण्याने, गुणदोषाने लिंपित होत नाही. निष्काम कर्मयोगाचाच गीतेच्या सर्व अध्यायात उपदेश केला असल्याचे चोखंदळ वाचकाला दिसून आल्याशिवाय राहणार नाही.

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन
निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान
कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
मा कर्म फलहेतूर्भूर्माते संङगोस्त्व कर्मणि
योगस्थः कुरुकर्माणि सङगत्यक्त्वा धनंजय 
सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते
तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम

या दुसऱ्या अध्यायातील सर्व श्लोकात निष्काम कर्मयोगाचेच स्वरूप भगवंतांनी विशद केले असून हा निष्काम कर्मयोगच कर्माचरणातील कुशलता कशी आहे हे स्पष्ट केले आहे. फलाशारहित ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे हा जो गीतेतील समत्वबुद्धियोग तोच भागवत् धर्माचे आणि नारायणीय धर्माचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्यात्मनावाऽनुसृतस्वभावात् ।
करोमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयेत्तत् ॥

हा भागवतातील उपदेश आणि

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासियत् ।
यत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम् ।।

हा गीतेतील उपदेश हे दोन्ही तत्त्वतः किती एकरूप आहेत बरे!

धर्मरक्षण म्हणजेच समाजरक्षण. धारणात् धर्ममित्याहुः हे वचन सुप्रसिद्धच आहे. समाजधारणा करील, समाजरक्षण करील तोच खरा धर्म. तेव्हा श्रीकृष्णांनी जी गीता सांगितली ती समाजाच्या उन्नति, प्रगति करताच सांगितली असेच म्हणावे लागेल. भगवंतांच्या निष्काम कर्मयोगाच्या या उपदेशाला समाजशास्त्रदृष्ट्याहि फार महत्त्व आहे. समाज हा व्यक्तींचा बनलेला असतो. तेव्हा प्रत्येक व्यक्ति जर योग्य रीतीने आपले कर्त्तव्य करील तरच समाजाची उन्नति होईल. जो मनुष्य कर्मफलाविषयी आसक्ति मनात ठेवीत नाही असा स्थितप्रज्ञ मनुष्य समवृत्ति, द्वंद्वातीत बनून जातो. भगवान बुद्ध, श्री शंकराचार्य वगैरे धर्मगुरु, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी इत्यादि लोकनेते, शिवाजी, राणाप्रताप यांच्यासारखे राजकारणपटु, रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ इत्यादि महान संत, श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांच्यासारखे महान संन्यासी हे सर्व उज्ज्वल दर्जाचे निष्काम कर्मयोगीच होते. निष्काम कर्मयोग्याच्या चारित्र्याचे सुवर्ण संकटाच्या प्रदीप्त अग्नीत अधिकच चमचम करते. साक्रेटीसाचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. प्रह्लादाचे उदाहरण आपल्याला हेच शिकविते. भगवान शंकरांनी विषप्राशन केले आणि त्यांचा कंठ निळा झाला, पण नीलकंठच त्यांचे भूषण ठरले. भगवान श्रीकृष्णांची ही शिकवण सदैव डोळ्यासमोर दीपस्तंभाप्रमाणे ठेवून आणि ध्येयावर आपली अविचल दृष्टी ठेवून ती तसूभरहि न हलू देता प्रत्येक व्यक्तीने कर्माचरण केले पाहिजे. तरच त्याच्या जीवनाचे तारू सुरक्षित राहील.

मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करणाऱ्या आणि भागवतधर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानदेवापासून तो भागवतधर्माचा कळस झालेल्या तुकारामापर्यंत सर्व संतश्रेष्ठांनी आपल्या वाङमयातून कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन याच तत्त्वाचा पुरस्कार केला असून या भगवद्भक्तांची जीवने म्हणजे याच गीताप्रणीत महान तत्त्वाचा आविष्कारच होता असेच म्हटले पाहिजे. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा अमर संदेश आहे. तो महान मंत्र आहे. हा गीतेचा अमोल ठेवा अनेक संत महात्म्यांच्या आणि साधुसत्पुरुषांच्या टीकाभाष्याच्या पुरवणीसहित आम्हाला सुदैवाने प्राप्त झाला आहे. त्याच्या भांडवलावर आमची जीवने उजळून निघतील. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ही आमच्या भारतीय संस्कृतीच्या भव्य इमारतीची आधारशिला आहे. आमच्या प्राचीनतम संस्कृतीच्या श्रेष्ठतेचे ते गमक आहे. इतकेच नव्हे तर अनेक संकटांना आणि परकीय आक्रमणांना तोंड देऊन ही संस्कृति जीवंत राहिली आणि आजहि साऱ्या जगाला मार्गदर्शन करण्याची महत्त्वाकांक्षा ती बाळगते याचेहि इंगित कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ह्या सूत्रवत वाक्यातच दडले आहे.

वरीलप्रमाणे विषयाच्या प्रस्तुतीकरणानंतर टाळ्या न पडल्या तर नवल. पण टाळ्या पडल्या नाहीत. कारण? कारण हा निबंध स्पर्धेचा विषय होता. लिहिण्यात आणि बोलण्यात हा एक मोठाच फरक आहे. निबंध फारच फार तर एक दोन परीक्षक वाचतील. पण भाषण स्वेच्छेने श्रोत्यांत बसलेले व अनिच्छेने बसविले गेलेले सर्वच ऐकतात. लक्ष देऊन ऐकणारे दादहि देतात. सर्वच जण लक्ष देऊन ऐकतात असेहि नाही. उदाहरणार्थ, कीर्तन (भाषणाचाच एक प्रकार) कानावरून गेले तरी पुण्य पदरात पडते असा एक सार्वत्रिक समज आहे. बरेच जण अक्षरशः तेवढ्‌याच करिता जातात. एवी-तेवी मनुष्य प्राण्याला डोळ्यांसारखे कान मिटता येत नाहीतच. त्यामुळे कीर्तन कानावरून जातेच, काहीहि कष्ट (कर्म म्हणा वाटल्यास) न करता. पुण्यहि मिळते. म्हणजे कर्म न करता फळाची गॅरंटी! त्यातल्या त्यात कीर्तनाचा विषय 'निष्काम कर्मयोग' असला म्हणजे गंमतच. बरेच जण (खरे म्हणजे बऱ्याच जणी) वाती वळतात. कीर्तनकाराने 'आणि नारदाने भगवंताला प्रणिपात केला आणि म्हणाले ...' असे उच्चारले की स्वतःहि नमस्कार करतात. काय ही एकरूपता! असो.

श्रद्धा असते भोळी
चेष्टा तिच्या भाळी
कां असे कठोर होता?
ती ना मागते टाळी

तर सांगायची गोष्ट अशी की बाबांचे वरील विवेचन कोणाच्याहि कानावरून गेले नाही. केवळ एका परीक्षकाच्या डोळ्याखालून गेले. 'निबंधातील भाषासौष्ठव उत्तम असून त्यातील विषयांचा उहापोह समाधानकारक वाटतो. विचारशक्ति उत्तम आहे.' असा त्याने शेरा लिहिला व २५ पैकी २१ गुण दिले. नंबर आला असेलच, बक्षिस समारंभ झाला असेल, कु. गीता सदाशिव मोहरीर व्यासपीठावर गेल्या असतील, अध्यक्षांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारले असेल, त्यांना वाकून नमस्कार केला असेल, वळून उपस्थितांना नमस्कार केला असेल, आणि मग, उशिरा कां होई ना,.... टाळ्या पडल्या असतील. कर्त्याला कर्माचे फळ मिळाले असेल.

अशी फळे मिळत गेली, बाबा लिहित गेले, आम्ही घोकत गेलो, भाषणे देत गेलो. हळूहळू आम्हीहि तरबेज नाही तरी बरेचसे तरबेज झालो. आणि आईबाबांच्या नातवांकरिता निबंध, भाषणे लिहू लागलो. काळ बदलला, विषय बदलले, पण मूळ भावना अबाधित राहिली. आपली मुले आपल्यापेक्षा वरचढ झाली पाहिजे अशी तळमळ आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.



योगः कर्मसु कौशलम्


भगवान श्रीकृष्णप्रणीत श्रीमद्भग्वद्गीतेचे सारसर्वस्व जर कशात साठवले असेल तर ते 'योग: कर्मसु कौशलम्' या दुसऱ्या अध्यायातील ५० व्या श्लोकाच्या चतुर्थ पादात साठवले आहे असे म्हटल्यास अयथार्थतेचा किंवा अतिशयोक्तीचा आरोप माझ्यावर कोणाला करता येईल असे मला वाटत नाही.

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते
तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम्

हाच तो श्लोक आहे. आमच्या साऱ्या धर्मग्रंथात भगवद्गीतेची योग्यता अनन्यसाधारण अशी आहे. तेव्हा अशा असामान्य ग्रंथाच्या उपदेशाचे सारसर्वस्वरूप असलेल्या वरील वचनाची श्रेष्ठता काय वर्णन करावी?

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आपल्या 'गीतारहस्य' या ग्रंथाच्या विषयप्रवेश नामक पहिल्या प्रकरणात गीतेची थोरवी वर्णन करतांना लिहितात, 'श्रीमद्भगवद्गीता हा आमच्या धर्मग्रंथांपैकी एक अत्यंत तेजस्वी व निर्मल हिरा आहे. केवळ काव्य या दृष्टीने जरी त्याचे परीक्षण केले तरी आत्मज्ञानाचे अनेक गहन सिद्धांत प्रासादिक भाषेने आबालवृद्धांस सुगम करणारा आणि ज्ञानयुक्त भक्तिरसाने भरलेला हा ग्रंथ उत्तम काव्यात गणला जाईल. मग सकल वैदिक धर्माचे सार श्री भगवंतांचे वाणीने ज्यांत साठविले गेले त्याची योग्यता काय वर्णावी?'

आद्य शंकराचार्यांपासून तो ज्ञानेश्वर, वामनपंडितापर्यंत तसेच लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधी व विनोबापर्यंत सर्वांनी भगवद्गीतेवर भाष्ये व टीका लिहिल्या आहेत. जगातील सर्व प्रमुख भाषांतून गीतेची भाषांतरे झाली आहेत. अशा ह्या जगन्मान्य झालेल्या ग्रंथाची मुख्य शिकवण काय आहे याचाच आपण आता विचार करू, म्हणजे अनायासेच प्रस्तुत विषयालाच हात घातल्यासारखे होणार आहे, कारण गीतेची मुख्य शिकवण 'योग: कर्मसु कौशलम्' या वचनातच ग्रथित झालेली आहे.

कोणत्याहि ग्रंथातील उपदेशाचे रहस्य किंवा तात्पर्य शोधून काढावयाचे असल्यास ते त्या ग्रंथाच्या उपक्रमोपसंहारास व फलास धरून असले पाहिजे. अर्जुन मोठा योद्धा खरा, पण क्षत्रिय धर्मावर ममत्वाचा पगडा बसून मोहाने तो असे म्हणू लागला की 'पितृवध, गुरुवध, बंधुवध, सुह्रदवध किंबहुना सबंध कुलक्षय यांसारखी भयंकर पापे करून राज्य मिळविण्यापेक्षा शत्रूंनी मला नि:शस्त्र पाहून ठार मारले तरी बेहेतर आहे. लढाईत स्वकीयांचा वध करून त्यांच्या रक्ताने विटाळलेले व अभिशापाने ग्रस्त झालेले भोग मी उपभोगू इच्छित नाही.'. अशा प्रकारे किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला भगवंतांनी गीता उपदेशून ताळ्यावर आणले आणि युद्धापासून पराङमुख होऊ पाहणाऱ्या अर्जुनाला तेच युद्ध स्वेच्छेने करावयास लावले. श्रीकृष्णांनी ही किमया जर कशाने घडवून आणली असेल, तर ती समत्व योगाच्या उपदेशाने. पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या मोहग्रस्त भूमिकेच्या वर्णनाने ग्रंथाचा उपक्रम केल्यावर लगेच दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या रोगाचे अचूक निदान करून समत्व बुद्धीच्या, फलाशारहित कर्माचरणाच्या, सुखदुःखादि द्वंद्वनिरपेक्षतेच्या उपदेशरूपी औषधाच्या अशा काही रामबाण मात्रा अर्जुनाला पाजल्या आहेत की त्याचा मोहज्चर साफ उतरला आणि ग्रंथाच्या शेवटी त्याने

नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्चत्त्प्रसादान्मयाच्युत 
स्थितोस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव

अशी स्पष्ट कबुली दिली आहे.

फलाशारहित ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करण्याचा गीतेत सर्वत्र उपदेश केलेला आहे. अशा रीतीने सुखदुःख, लाभालाभ, जयापजय यांच्या ठिकाणी समत्वबुद्धि ठेवून निर्द्वंद्व, नित्यसत्वस्थ वृत्तीने कर्माचरण केले असता ती कर्मे कर्त्याला बाधक न ठरता कर्ता त्यांच्या पापपुण्याने लिंपित होत नाही. कर्मे तर करावयाची, पण त्यापासून  'पद्मपत्रमिवांभसा' या न्यायाने अलिप्त राहावयाचे ही जी कर्म करण्याची हातोटी, शैली, युक्ति, कौशल्य त्यालाच भगवंतांनी निष्काम कर्मयोग अशी संज्ञा दिली आहे. 'योग: कर्मसु कौशलम्' या गीतावचनाचा हाच अर्थ होय. या कर्मकौशल्यरूप समत्वयोगाचेच गीतेच्या सर्व अध्यायात प्रामुख्याने विवेचन केल्याचे चोखंदळ वाचकाला दिसून आल्याशिवाय राहणार नाही.

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन
निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान
कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
मा कर्म फलहेतूर्भूर्माते संङगोस्त्व कर्मणि
योगस्थः कुरुकर्माणि सङगत्यक्त्वा धनंजय 
सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्

दुसऱ्या अध्यायातील या सर्व श्लोकात समत्वयोगाचेच स्वरूप भगवंतांनी विशद केले असून हा समत्वयोगच कर्माचरणातील कुशलता कशी आहे हे स्पष्ट केले आहे.

देहधारी मानवाला कर्मे केल्यावाचून गत्यंतर नाही. मनुष्याला कर्मे काही केल्या टळत नाहीत. तेव्हा 'निष्काम कर्मयोग' हे संसारज्वरग्रस्त मानवाला भगवंतांनी दिलेले अमोघ रसायन होय यात तिळमात्र संदेह नाही. निष्काम बुद्धीने कर्म करण्याची ही हातोटी ज्याला साधली, तो संसारात राहूनहि त्यातून तरेल, कर्मे करूनहि त्यांच्या पापपुण्यांनी, गुणदोषांनी लिंपित होणार नाही, जिवंत असतांनाच मोक्षाचा अधिकारी होईल.

दुसऱ्याच अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगतांना भगवंतांनी ती

दुःखेष्वनुद्विग्नमन: सुखेषु विगतस्पृहः ।
वीतराग भयक्रोधः स्थितधीर्मुनिरूच्यते ।।
य: सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुमम् ।
नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।।
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः। 
निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति ।।

अशा प्रकारची सांगितली आहेत.

वरील श्लोकांचा अर्थ नीट ध्यानी आणल्यास असेच दिसून येईल की निष्काम कर्मयोग्यालाच 'स्थितप्रज्ञ' ही दुसरी संज्ञा भगवंतांनी दिली आहे एवढेच!

तिसऱ्या अध्यायातहि

तदर्थं कर्म कौंतेय मुक्तसंगः समाचर ।

तसेच

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुष: ।।

असा आसक्ति किंवा फलाशाविरहित कर्माचरणाचाच अर्जुनाला उपदेश करण्यात आला आहे.

चवथ्या अध्यायातहि

त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः । 
कर्मण्यभिप्रवृत्तोऽमि नैव किंचित्करोति स: ।।
यदृच्छालाभसंतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर: ।
समःसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबद्धयेत ।।

ही कर्मकुशलतेची हातोटीच श्रीकृष्णांनी विशद केली आहे.

सहाव्या अध्यायात

अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति य: ।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ।।

तसेच

सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते ।

अशी संन्याश्याची व योग्याची लक्षणे सांगितली आहेत. यावरूनहि हेच स्पष्ट आहे की भगवंतांनी निष्काम कर्मयोगाची, फलाशारहित कर्माचरणाची, समत्वयोगाची अर्थात कर्मकौशल्याची हातोटी ज्याला साधली आहे त्यालाच संन्यासी व योगी ठरविले आहे.

श्रीमद्भग्वद्गीतारूपी मंदिराचा कळसच असा जो अठरावा अध्याय त्यातहि

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ।।

असाच उपदेश भगवान अर्जुनाला करतात. 'मला शरण येऊन सर्व कर्मे मला अर्पण केल्यास मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन' असे ते कंठरवाने सांगतात.

तात्पर्य गीतेत सर्वत्र निरनिराळ्या मिषाने, कधी स्थितप्रज्ञाची लक्षणे म्हणून, तर कधी ब्राह्मी स्थितीची लक्षणे म्हणून, तर कधी संन्याश्याची व योग्याची लक्षणे म्हणून, तर कधी भक्ताची लक्षणे म्हणून, तर कधी सिद्धांची लक्षणे म्हणून भगवंतांनी निष्काम कर्मयोगाचा उपदेश करून हा समत्व योगच कर्माचरणात सदैव आचरला पाहिजे व तेच कर्माचरणातील कौशल्य होय असे आग्रहपूर्वक प्रतिपादिले आहे.

फलाशारहित व कर्तृत्वाभिमान विरहित कर्मे करून ती सर्व ईश्वरार्पण करणे हा जो गीतेतील समत्वबुद्धियोग तोच भागवतधर्माचे किंवा नारायणीय धर्माचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । बुद्ध्यात्मनावाऽनुसृतस्वभावात ।
करोमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयेत्तत् ।।

हा भागवतातील उपदेश आणि

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासियत् । यत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम् ।।

हा गीतेतील उपदेश हे दोन्ही तत्त्वत: किती एकरूप आहेत बरे!

मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करणाऱ्या आणि भागवतधर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानदेवापासून तो भागवतधर्माचा कळस झालेल्या तुकारामापर्यंत सर्व संतश्रेष्ठांनी 'योगः कर्मसु कौशलम्' या गीतावचनात अभिप्रेत असलेल्या निष्काम कर्मयोगाचाच मुक्तकंठाने आपल्या वाङमयातून पुरस्कार केला असून या भगवद्भक्तांची जीवने म्हणजे याच गीताप्रणीत महान तत्त्वाचा आविष्कारच होता असेच म्हटले पाहिजे. 'योग: कर्मसु कौशलम्' हा गीतेचा दिव्य संदेश आहे. तो महान मंत्र आहे. हा गीतेचा अमोल ठेवा अनेक संत महात्म्यांच्या आणि साधुसत्पुरुषांच्या टीकाभाष्याच्या पुरवणीसहित आम्हाला सुदैवाने प्राप्त झाला आहे. त्याच्या भांडवलावर आमची जीवने उजळून निघतील.  'योग: कर्मसु कौशलम्' ही आमच्या भारतीय संस्कृतीच्या भव्य इमारतीची आधारशिला आहे. आमच्या प्राचीनतम संस्कृतीच्या श्रेष्ठतेचे ते गमक आहे. एवढेच नव्हे तर अनेकविध आपत्तींना व परकीय आक्रमणांना तोंड देऊनहि ही संस्कृति जीवंत राहिली आणि आजहि साऱ्या जगाला मार्गदर्शन करण्याची महत्त्वाकांक्षा ती बाळगते याचेहि इंगित 'योगः कर्मसु कौशलम्' ह्या सूत्रवत् वाक्यातच दडले आहे.

वरील निबंध आणि त्याआधील निबंध यातील साम्य लक्षात आले असेलच. विषयातील साम्य हे त्याचे एक कारण. निबंधांचा निर्माता एकच, विषय मिळतेजुळते, म्हणून विचार मिळतेजुळते, म्हणून निबंध मिळतेजुळते. दोन्ही निबंध एकाच वर्षी उपजले. सर्वच दृष्टींनी या निबंधाना 'जुळे' निबंध म्हणता येईल. खरे म्हणजे बाबांना 'तिळे' झाले. तिसऱ्याचे नांव  'निष्काम कर्मयोग्याची लक्षणे ' असे होते. 'योग: कर्मसु कौशलम्' च्या मूळ हस्तलिखितावरच काटछाट, जोडजाड करून तो घडला. तेवढयाच कारणासाठी त्याचा येथे अंतर्भाव केला नाही.

असे बरेच जुळे, तिळे,.., पंचपाळे त्या काळी जन्मले. त्यातील जो सरस त्याचा पुस्तकात अंतर्भाव झाला. 'पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ' या विषयावरहि बाबांनी दोन निबंध लिहिले. त्यातील जो सरस होता तो न सापडल्यामुळे माझा विरस झाला. पण जो सापडला तो काही अगदीच 'हा' नाही. म्हणून प्रकरणाच्या सुरुवातीला त्याचाच 'हा' केला आहे.

ऐन वेळी योग्य शब्द न सापडल्यामुळे 'हा, ही, हे' ने रिकाम्या जागा भरीत बोलणारे बरेच असतात. असे बोलण्याची त्यांना 'ही' च होऊन जाते. गंमत म्हणजे ऐकणारा 'हा, ही, हे' च्या जागी योग्य शब्द न कळत टाकतो व बोलणाऱ्याला काय म्हणायचे आहे हे समजून घेतो. मराठी भाषेची अशी मोठी 'ही' आहे. बाबांचे मराठी भाषेवर 'हे' असल्यामुळे त्यांना कधी शब्द अडले नाहीत. आम्ही पण पाठांतर करतांना, विशेषतः भाषणे पाठ करतांना, विशेष 'ही' घेत असू व त्यामुळे श्रोत्यांना ही-ही करण्याची संधी मिळत नसे, एखादा अपवाद वगळता. असो.

विनाकारण वाचकांचा 'हा' वाया न घालवता सरळ निबंधालाच 'ही' करू या.


न मे भक्तः प्रणश्यति


'न मे भक्त: प्रणश्यति' हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी आपल्या भक्ताला दिलेले आश्वासन आहे, अभयदान आहे. देवाला आपले अनन्य भक्त किती प्रिय असतात, आणि त्यांचा सर्व भार तो आपल्या शिरावर घेऊन त्यांच्या योगक्षेमाची चिंता स्वतःच कसा वाहतो, याचे सविस्तर विवरण भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या मुकुटमणि असलेल्या राजविद्याराजगुह्ययोग नामक नवव्या अध्यायात केले आहे.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।
येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता: ।
तेऽपि मामेव कौंतेय यजन्त्य विधिपूर्वकम् ।।
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपह्रतमश्नामि प्रयतात्मनः ।।
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासियत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्वं मदर्पणम् ।।
अपिचेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि स: ।।
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिंनिगच्छति ।
कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ।।

भगवान म्हणतात, 'अनन्यभावाने माझे चिंतन करून जे माझी उपासना करतात अशा लोकांचा योगक्षेम मी चालवितो, म्हणजे त्यांचे जे इप्सित परमेश्वरप्राप्ति त्यांना साध्य करून देतो आणि त्यांच्या साधनमार्गाचे रक्षण करतो. अन्य देवदेवतांची अज्ञानाने पण श्रद्धायुक्त अंतःकरणाने पूजा करणारे लोक देखील माझीच पूजा करतात. पत्र, पुष्प, फल, पाणी यापैकी आपापल्या शक्तीनुसार जो जे काही मला भक्तीने अर्पण करतो, त्याचा मी स्वीकार करून संतुष्ट होतो. तुम्ही जे काही कराल, खाल, हवन कराल, दान द्याल किंवा तप कराल ते सारे मला अर्पण करा. दुराचारी माणूस देखील जर मला अनन्य भावाने भजेल तर त्याचीहि साधूंतच गणना होईल. तोहि लवकरच धर्मात्मा होऊन शाश्वत सुखाची त्याला प्राप्ति होते. माझा भक्त कधीच नाश पावत नाही.'.

अशा रीतीने भक्ताची थोरवी भगवंतांनी गायिली आहे. माझा भक्त मज काय अर्पण करतो याची मला मातब्बरी नसून त्याच्या अंतःकरणातील भाव फक्त मी पाहतो, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. देव भावाचा भुकेला आहे. 'धरिला पंढरीचा चोर । पायी बांधोनिया दोर ।' असे भक्त म्हणतात ते काही उगाच नव्हे. भगवान विष्णु नारदाला सांगतात 'नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ।।'. माझा वास वैकुंठात नाही, योग्यांच्या हृदयांत नाही, तर माझे भक्त जेथे माझे गुणानुवाद गातात तेथेच, हे नारदा!, मी वास करतो. यावरून परमेश्वर किती भक्तवत्सल, भक्तकामकल्पद्रुम आहे याची साक्ष पटते. आपली सारी कर्मे कृष्णार्पण बुद्धीने करा हे जे भागवतधर्माचे महान तत्त्व तेच 'यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासियत् । यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ।।' या श्लोकात सांगितले आहे. आणि हेच खऱ्या भगवद्भक्ताचे लक्षण आहे.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा । 
बुद्ध्यात्मनावाऽनुसृतस्वभावात् ।
करोमि यद्यत् सकलं परस्मै।
नारायणायेति समर्पयेत्तत् ।।

या श्रीमद्भागवतातील श्लोकाचे तात्पर्य हेच आहे.

अशा प्रकारची परमेश्वराची निष्काम भक्ति जो करील तो पूर्वीचा दुराचारी असला तरी लवकरच साधूच्या व धर्मात्म्याच्या पदवीला प्राप्त होईल. परमेश्वर स्वरूपाशी तादात्म्य पावून शाश्वत शांतीचा धनी होईल. एवंच परमेश्वराचा अनन्य भक्त कधीही नाश पावत नाही. वैराने, भीतीने किंवा शत्रुत्वाने देखील परमेश्वराचा सारखा ध्यास लागलेले कंस, रावण किंवा शिशुपाल, इत्यादि परमेश्वरस्वरूपात मिसळून गेले अशी साक्ष आपली पुराणे देतात. अजामिळासारखे पापी आणि गणिकेसारखी पतिता यांचाहि भलत्या मिषाने जरी भगवन्नामस्मरण घडले तरी उध्दार झाला आहे. मग ख-याखु-या परमेश्वर भक्तांचा उद्धार होईल यात शंकाच नाही.

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परांगतिम् ।।
किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ।।

परमेश्वराने आजवर आपल्या भक्तांना अनेकवार महान संकटातून तारले आहे. ते त्याचे ब्रीदच आहे. त्याने प्रह्लादाचे रक्षण केले, गजेंद्राची मुक्तता केली, ध्रुवाला अढळपद दिले, उपमन्यूला क्षीरसागर दिला, मीराबाईची विषबाधेपासून मुक्तता केली, तुकारामाच्या अभंगाच्या वह्या पाण्यावर तारल्या, असे एक ना दोन, हजारो दाखले दाखविता येतील. परमेश्वराच्या या भक्तवत्सलतेचे अनेक संतमहात्म्यांनी मोठे सुंदर वर्णन केले आहे. समर्थ रामदास म्हणतात,

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।
उडी घालितो संकटी स्वामी तैसा ।।
सदा सर्वदा देव सन्नीध आहे।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।
अनन्यास रक्षीतसे च्यापपाणी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।।

तुकाराम महाराज म्हणतात,

तेणे तुझी काय नाही केली चिंता ।
राहे त्या अनंता आठवूनि ।।
तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर ।
करा निरंतर ध्यान त्याचे ।।

श्रीमद्भगवद्गीतेचा कळसच शोभणाऱ्या १८ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात,

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।

सर्व धर्मांचा म्हणजेच परमेश्वरप्राप्तीच्या सर्व साधनांचा त्याग करून मला एकट्‌याला शरण ये, म्हणजे मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. भिऊ नकोस. अनन्य भावाने व भक्तियुक्त अंतःकरणाने परमेश्वराला शरण जाणे हाच आत्मोद्धाराचा सुगम व सोपा उपाय होय. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मिषाने अखिल जगताला भक्तिमार्गाचा हा अमोल ठेवाच प्राप्त करून दिला आहे यात शंका नाही.

अशा रीतीने सर्वस्वी शरण आलेला भक्त कधीहि नाश पावत नाही, 'न मे भक्तः प्रणश्यति' असे निश्चित आश्वासन देऊन भक्तिमार्गाच्या पथिकांना फार मोठा धीर व दिलासा भगवंतांनी दिला आहे.

गीतेतील भक्तियोग


परमेश्वर प्राप्तीची अनेक साधने आहेत. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, उपासनामार्ग, यज्ञयाग, दान, तप, योगसाधन, इंद्रियदमन, संन्यास, इत्यादि अनेक मार्ग आहेत. अनेक वाटा जशा एकाच मुक्कामाला जाऊन मिळाव्या तसे हे सारे मार्ग यथायोग्यपणे आचरिले असता परमेश्वर प्राप्तीची इष्ट ध्येयसिद्धी प्राप्त करून देतात. प्रत्येक मताचे अभिमानी अमुकच एक मार्ग चांगला असे आग्रहाने प्रतिपादितात. मग हे सारे मार्ग व त्यांची विविधता पाहून सर्वसामान्य साधक भांबावून जाऊन कोणता मार्ग आचरावा हे त्यास सुचत नाही आणि हे होणे अगदी साहजिक आहे. तेव्हा सर्व वर्ण, जाति, व्यक्ति, स्त्री, पुरुष, सज्ञानी, अज्ञानी, आबालवृद्धांना सारखाच उपयोगी पडेल असा जो भक्तियोग भगवद्गीतेत सांगितला आहे तो परमेश्वर प्राप्तीचा सर्वात सोपा, सुगम मूलमार्ग होय. गीतेच्या भक्तियोग नामक १२ व्या अध्यायात भक्तियोगाचे स्वरुप सांगितले आहे.

अध्यायाच्या सुरुवातीसच अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो की तुझ्या सगुण रूपाची उपासना करणारे श्रेष्ठ की अक्षरब्रह्माची उपासना करणारे श्रेष्ठ? भगवान त्याला स्पष्ट उत्तर देतात की

मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धयापरयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ।।

श्रीकृष्ण म्हणतात 'माझे ठिकाणी मन ठेवून माझ्या सगुण स्वरूपाची अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने आराधना करणे हे श्रेष्ठ होय असे मी समजतो. अव्यक्त ब्रह्माची उपासना करणे अधिक कष्टदायक आहे कारण देहधारी मनुष्याचे लक्ष निर्गुण ब्रह्माचे ठिकाणी एकाग्र होणे फार कठिण असते. 'भगवंतांच्या या उत्तरातच भक्तियोगाची श्रेष्ठता सिद्ध होते. सर्व कर्मे ईश्वरार्पण करून अनन्य भक्तीने परमेश्वराचे ध्यान व उपासना करतात त्यांना परमेश्वर संसारसागरातून व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतो. ध्यान किंवा चित्ताची एकाग्रता शक्य नसल्यास केवळ ईश्वरार्पण बुद्धीने कर्मे केल्याने देखील सिद्धि प्राप्त होते, आणि हेहि शक्य नसल्यास निदान सर्व कर्मफलांचा त्याग करावा. अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा ध्यान, ध्यानापेक्षा कर्मफलत्याग आणि त्यापेक्षाहि शांति श्रेष्ठ आहे. अशा एकापेक्षा एक वरचढ पायऱ्या भगवंतांनी सांगितल्या आहेत. मला कसे भक्त आवडतात हे सांगतांना श्रीकृष्ण म्हणतात

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र: करुण एव च ।
निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ।।
संतुष्ट: सततं योगी यतात्मा दृढनिश्चय: ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रिय: ।।
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च य: ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो य: स च मे प्रिय: ।।
अनपेक्ष: शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारन्भपरित्यागो यो मद्भक्तः स मे प्रिय: ।।
यो न ह्रष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रिय: ।।
सम: शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो: ।
शीतोष्णसुखदुःखेषु सम: सङ्गविवर्जित: ।।
तुल्यनिंदास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् ।
अनिकेत: स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ।।
ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रिया: ।।

सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करणारे, मीपणाविरहित, निरहंकारी सुखदुःखसमान मानणारे, क्षमाशील, सदासंतुष्ट, योगी, संयमी, माझ्या ठिकाणी द्दढ भाव असणारे, मन व बुद्धि मज अर्पण केलेले, हर्ष, क्रोध, भय, उद्वेग, द्वेष, वासना, इत्यादि विकारांपासून मुक्त, शुभाशुभ फलांचा त्याग करणारे, शत्रुमित्र, मानापमान, शीतोष्ण, सुखदुःख, निंदास्तुति समान मानणारे, समाधानी वृत्तीचे, स्थिरबुद्धि, धर्माप्रमाणे आचरण करणारे असे जे श्रद्धायुक्त अंतःकरणाने, अनन्यभावाने माझी उपासना करणारे माझे भक्त असतात ते मला अतिशय प्रिय असतात. अशा रीतीने भक्त कसा असावा, तो कोणत्या गुणांनी युक्त असावा हे सांगून भगवंतांनी भक्तियोगाचे स्वरूप विशद केले आहे. माझ्या भक्ताचे मी सर्व प्रकारे रक्षण करतो. तो कधीहि नाश पावत नाही, 'न मे भक्त: प्रणश्यति' असे श्रीकृष्ण सांगतात.

'न मे भक्त: प्रणश्यति' हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी आपल्या भक्ताला दिलेले आश्वासन आहे, अभयदान आहे. देवाला आपले अनन्य भक्त किती प्रिय असतात, आणि त्यांचा सर्व भार तो आपल्या शिरावर घेऊन त्यांच्या योगक्षेमाची चिंता स्वतःच कसा वाहतो, याचे सविस्तर विवरण भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेचा मुकुटमणि  असलेल्या राजविद्याराजगुह्ययोग नामक नवव्या अध्यायात केले आहे.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। 
येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम् ।।
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपह्रतमश्नामि प्रयतात्मन: ।।
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासियत् । 
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्वं मदर्पणम् ।।
अपिचेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुदेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ।।
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिंनिगच्छति ।
कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ।।

भगवान म्हणतात, 'अनन्यभावाने माझे चिंतन करून जे माझी उपासना करतात अशा लोकांचा योगक्षेम मी चालवितो, म्हणजे त्यांचे जे इप्सित परमेश्वरप्राप्ति ते त्यांना साध्य करून देतो आणि त्यांच्या साधनमार्गाचे रक्षण करतो. अन्य देवदेवतांची अज्ञानाने पण श्रध्दायुक्त अंतःकरणाने पूजा करणारे लोक देखील माझीच पूजा करतात. पत्र, पुष्प, फल, पाणी यापैकी आपापल्या शक्तीनुसार जो जे काही मला भक्तीने अर्पण करतो, त्याचा मी स्वीकार करून संतुष्ट होतो. तुम्ही जे काही कराल, खाल, हवन कराल, दान द्याल किंवा तप कराल ते सारे मला अर्पण करा. दुराचारी माणूस देखील जर मला अनन्य भावाने भजेल तर त्याचीहि साधूंतच गणना होईल. तोहि लवकरच धर्मात्मा होऊन शाश्वत सुखाची त्याला प्राप्ति होते. माझा भक्त कधीच नाश पावत नाही.'.

अशा रीतीने भक्ताची थोरवी भगवंतांनी गायिली आहे. माझा भक्त मला काय अर्पण करतो याची मला मातब्बरी नसून त्याच्या अंतःकरणातील भाव फक्त मी पाहतो, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. देव भावाचा भुकेला आहे. 'धरिला पंढरीचा चोर । पायी बांधोनिया दोर ।' असे भक्त म्हणतात ते काही उगाच नव्हे. भगवान विष्णु नारदाला सांगतात 'नाहं वसामि वैकुंठे योगिनां ह्रदये रवौ । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ।।'. माझा वास वैकुंठात नाही, योग्यांच्या ह्रदयात नाही, तर माझे भक्त जेथे माझे गुणानुवाद गातात तेथेच, हे नारदा! मी वास करतो. यावरून  परमेश्वर किती भक्तवत्सल, भक्तकामकल्पद्रुम आहे याची साक्ष पटते. आपली सारी कर्मे कृष्णार्पण बुद्धीने करा हे जे भागवतधर्माचे महान तत्त्व तेच 'यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासियत् । यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्वं मदर्पणम् ।।' या श्लोकात सांगितले आहे. आणि हेच खऱ्या भगवद्भक्ताचे लक्षण आहे.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा। बुद्ध्यात्मनावाऽनुसृतस्वभावात् ।
करोमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेति समर्पयेत्तत् ।।

या श्रीमद्भागवतातील श्लोकाचेहि तात्पर्य हेच आहे.

अशा प्रकारची परमेश्वराची निष्काम भक्ति जो करील तो पूर्वीचा दुराचारी असला तरी लवकरच साधूच्या व धर्मात्म्याच्या पदवीला प्राप्त होईल. परमेश्वर स्वरूपाशी तादात्म्य पावून शाश्वत शांतीचा धनी होईल. एवंच परमेश्वराचा अनन्य भक्त कधीहि नाश पावत नाही. वैराने, भीतीने किंवा शत्रुत्वाने देखील परमेश्वराचा सारखा ध्यास लागलेले कंस, रावण किंवा शिशुपाल इत्यादि परमेश्वरस्वरूपात मिसळून गेले अशी साक्ष आपली पुराणे देतात. अजामिळासारखे पापी आणि गणिकेसारखी पतिता यांचाहि भलत्या मिषाने जरी भगवन्नामस्मरण घडले तरी उद्धार झाला आहे. मग खऱ्याखुऱ्या परमेश्वर भक्तांचा उद्धार होईल यात शंकाच नाही.

मां हि पार्थ व्यमाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनयः ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परांगतिम् ।।
किं पुनर्बाह्यणा: पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ।।

परमेश्वराने आजवर आपल्या भक्तांना अनेकवार महान संकटातून तारले आहे. ते त्याचे ब्रीदच आहे. त्याने प्रह्लादाचे रक्षण केले, गजेन्द्राची मुक्तता केली, ध्रुवाला अढळपद दिले, उपमन्यूला क्षीरसागर दिला, मीराबाईची विषबाधेपासून मुक्तता केली, तुकारामाच्या अभंगाच्या वह्या पाण्यावर तारल्या, असे एक ना दोन, हजारो दाखले दाखविता येतील. परमेश्वराच्या या भक्तवत्सलतेचे अनेक संतमहात्म्यांनी मोठे सुंदर वर्णन केले आहे. समर्थ रामदास म्हणतात,

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटी स्वामी तैसा ।।
सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।
अनन्यास रक्षीतसे च्यापपाणी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।।

तुकाराम महाराज म्हणतात,

तेणे तुझी काय नाही केली चिंता ।
राहे त्या अनंता आठवूनि ।।
तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर ।
करा निरंतर ध्यान त्याचे ।।

श्रीमद्भगवद्गीतेचा कळसच शोभणाऱ्या १८ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात,

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ।।

सर्व धर्माचा म्हणजेच परमेश्वरप्राप्तीच्या सर्व साधनांचा त्याग करून मला एकट्याला शरण ये, म्हणजे मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. भिऊ नकोस. अनन्य भावाने व भक्तियुक्त अंतःकरणाने परमेश्वराला शरण जाणे हाच आत्मोद्धाराचा सुगम व सोपा उपाय होय. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मिषाने अखिल जगताला भक्तिमार्गाचा हा अमोल ठेवाच प्राप्त करून दिला आहे यात शंका नाही.

अशा रीतीने सर्वस्वी शरण आलेला भक्त कधीहि नाश पावत नाही. 'न मे भक्तः प्रणश्यति' असे निश्चित आश्वासन देऊन भक्तिमार्गाच्या पथिकांना फार मोठा धीर व दिलासा भगवंतांनी दिला आहे.

असे हे गीतेतील भक्तियोगाचे स्वरूप आहे. यापेक्षा ज्यास्त मी काय सांगणार? माझे परमेश्वराला एवढेच मागणे आहे की तुझ्या भक्तीचा माझ्या अंतःकरणात उदय होऊ दे.

कर्मयोगावरील जुळे, भक्तियोगावरील जुळे. 'मामनुस्मर युद्ध्यच', 'ततो युद्धाय युज्यस्व' असेहि एक जुळे आहे. पण ते उपलब्ध नाही. चीनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जन्मलेले हे जुळे काळाआड गेले आहे. असो.

गीतेप्रमाणेच गीताकारावरहि बाबांचे सुंदर लिखाण आहे. श्रीकृष्ण हा आईबाबांचा एक जिव्हाळ्याचा विषय. हरिविजयाची पारायणे आमच्या घरी होत. श्रीकृष्णावरील लिखाणात ही आपुलकी ओतप्रोत भरली आहे. बरेचदा असे वाटते की बाबा 'ऑंखोदेखी' कथन करीत आहेत.


भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील एक ह्रद्य प्रसंग


उद्या भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिन, श्रावण वद्य अष्टमी.

परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।

या स्वतःच दिलेल्या आश्वासनानुसार सज्जनांचा प्रतिपाळ, दुर्जनांचा नायनाट आणि धर्माची प्रतिष्ठापना करण्याकरिता भगवान विष्णूने वसुदेव-देवकीच्या पोटी मथुरेच्या कारागृहात जन्म घेतला. या पूर्णावतार श्रीकृष्णाचे जीवन अनेक ह्रद्य आणि मनोज्ञ प्रसंगांनी खच्चून भरले आहे. असाच एक ह्रद्य प्रसंग आज मी आपणाला निवेदन करणार आहे.

कुरुक्षेत्राच्या रणांगणावर कौरव पांडवांच्या युद्धाची धुमश्चक्री सुरू होती. कौरवांचे अकरा अक्षौहिणी आणि पांडवांचे सात अक्षौहिणी सैन्य परस्परसंमुख उभे होते. भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाचे सारथ्य करीत होते. कौरवांचे सेनापतित्व पितामह भीष्मांच्याकडे होते.

'न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तिच्या चार' अशी श्रीकृष्णानी प्रतिज्ञा केली होती. 'श्रीकृष्णाला हाती शस्त्र धरायला लावीन तरच मी नावाचा भीष्म' अशी भीष्माने प्रतिज्ञा केली होती. बडे लोक जेव्हा अहमहमिकेने प्रतिज्ञा करतात तेव्हा सामान्यांच्या कुतुहलाचा तो विषय होत असतो. तसेच येथे झाले. भीष्मार्जुन युद्ध सुरू झाले. परस्परांवर बाणांची वृष्टि सुरू झाली.

पितामह वदे तया प्रबळ तू पृथानंदना
रमेश रथि सारथी चतुर वागवी स्यंदना
स्वये गतवयस्क मी सरस वीर तू रे नवा
भिडे रणधुरंधरा जय घडो सुखे वा न वा

असे भीष्माचार्यांनी अर्जुनाला म्हटले. मी जाणूनबुजून म्हातारा. तू तरुण धुरंधर वीर आहेस. एवढेच नाही तर साक्षात भगवान तुझ्या रथाचे सारथ्य करीत आहेत. तेव्हा मी हरलो काय किंवा जिंकलो काय, मला त्याची चिंता नाही. तेव्हा तू युध्दाला तयार हो असे भीष्माने अर्जुनाला आव्हान केले. पर्जन्याच्या धारांप्रमाणे सरसर बाणांचा वर्षाव होत होता. अर्जुनाला सर्वांगावर जखमा झाल्या होत्या. तो रक्तबंबाळ झाला होता. जखमांतून भळभळा  रक्त  वाहत होते. पळसाच्या रक्तवर्ण फुलांनी आच्छादिल्याप्रमाणे त्याचे सर्व शरीर दिसत होते. त्याला मूर्च्छा आली होती. त्याने खाली मान टाकली होती. श्रीकृष्णाने अर्जुनाची ही स्थिती पाहिली. भीष्मांची सरशी होत आहे, अर्जुनाचा पराभव होणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली. श्रीकृष्णाच्या मनात कालवाकालव सुरू झाली. अर्जुन आपला परम सखा. आपण त्याचे सारथ्य करीत असता त्याचा पराभव व्हावा ही कल्पनाच त्याला असह्य झाली. पण करावे कसे? हातात शस्त्र धारण करणार नाही अशी तर आपण प्रतिज्ञा केली आहे. जगताला कर्माचा उपदेश देणाऱ्या श्रीकृष्णापुढे महान धर्मसंकट उभे राहिले. प्रतिज्ञापालन करावे तर अर्जुन प्राणाला मुकणार. पांडवांचा पराजय होणार. कौरवांच्या अन्याय्य पक्षाची सरशी होणार. बरे पार्थाच्या मदतीसाठी हातात शस्त्र धारण करावे तर आपलीच प्रतिज्ञा आपणाला मोडावी लागणार. काय करावे? श्रीकृष्णाच्या मनात त्यावेळी किती काहूर माजले असेल? शेवटी त्यांनी जो घ््यायचा तोच निर्णय घेतला. आपली प्रतिज्ञा मोडावी लागली तरी हरकत नाही. हाती शस्त्र घ््यावे. म्हणजे अर्जुनाचे प्राण वाचतील. पांडवांच्या न्याय्य पक्षाचा विजय होईल. एवढेच नव्हे तर भीष्माची प्रतिज्ञा खरी केल्याचेही श्रेय आपणाला मिळेल. तो युद्धात जरी आपल्या विरुद्ध उभा ठाकला असला तरी तो आपला मनोमन भक्त आहे हे श्रीकृष्ण जाणून होते. तेव्हा आपल्या प्रतिज्ञाभंगाने एका भक्ताला विजयप्राप्ति होणार आणि दुसऱ्या भक्ताला प्रतिज्ञापूर्तीचा आनंद मिळणार, म्हणजेच त्याचाही विजय होणार. श्रीकृष्णाचा विचार ठरला. त्याने हातात सुदर्शन चक्र घेतले व भीष्माकडे दृष्टिक्षेप करून तो ते गरगर फिरवू लागला. भीष्माचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्याच्या चेहऱ्यावर स्मिताची रेषा झळकली. श्रीकृष्णाने हातातील चाबूक खाली ठेवला व तो रथाखाली उतरला. भीष्म एकसारखे श्रीकृष्णाच्या हालचालीकडे पाहत होते. त्याला आनंदाच्या गुदगुल्या होऊ लागल्या. कसला आनंद होता तो? भगवान श्रीकृष्णाला आपण प्रतिज्ञा मोडायला लावली आणि आपली प्रतिज्ञा खरी ठरणार याचा तो आनंद होता. सुदर्शन चक्र गरगर फिरवीत झपझप पावले टाकीत श्रीकृष्ण भीष्माच्या रथाच्या दिशेने चालू लागले. भीष्माच्या आनंदाची उत्कटता वाढू लागली. स्मिताची जागा हास्याने घेतली. श्रीकृष्ण भीष्माच्या रथाच्या नजीक येऊन ठेपले. भीष्माच्या मुखावर कृतार्थतेचे समाधान झळकले. भीष्म कृष्णाला सामोरे गेले. रथाच्या काठावर येऊन ते खाली वाकले आणि आपल्या हाताने श्रीकृष्णाचा हात धरून त्याला त्यांनी वर घेतले. भीष्म कृष्णाची ही भेट अपूर्व होती. भीष्माला अत्यानंद झाला होता. ते श्रीकृष्णाला म्हणाले,

ये रथावरि झणी यदुराया ।
खड्ग देईन विकोश कराया ।
तोडि मस्तक पडो चरणी या ।
धन्य होइन तदाच रणी या ।।

परस्पर विरुद्ध पक्षाचे असूनही एकमेकांविषयीचा केवढा हा प्रेमादर! आणि म्हणूनच कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटले आहे.

भीष्माने आपल्या हातातील तरवार पुढे करून श्रीकृष्णाला म्हटले, 'हे यदुकुलश्रेष्ठा, ही तरवार घे व माझे मस्तक धडापासून वेगळे कर. माझे शीर्षकुसुम तुझ्या चरणावर पडावे हीच माझी अंतिम इच्छा आहे. ही माझी इच्छा पूर्ण झाली तर मी धन्य होईन, कृतार्थ होईन, कृतकृत्य होईन.'. पितामह भीष्मांनी लवून श्रीकृष्णाला प्रणाम केला. श्रीकृष्णाने भीष्माला गाढ आलिंगन दिले. असा जिव्हाळा, असे प्रेम आजच्या या विसाव्या शतकातील युद्धात कोठे दिसेल काय? धन्य तो श्रीकृष्ण आणि धन्य तो भीष्म! भीष्मांनी श्रीकृष्णाच्या मनातील भाव ओळखला व ते म्हणाले,

मारावे मजला असेचि असले चित्ती तुझ्या केशवा ।
तै माते मग कोण रक्षिल पहा विश्वेश नाकेश वा ।
हा मुख्यार्थ जनार्दना मज गमे भक्तप्रतिज्ञा खरी ।
कीजे सर्व जनात होईल वृषा हे आपुली वैखरी ।।

'आपली वाणी खोटी ठरली तरी हरकत नाही, आपल्या भक्ताची प्रतिज्ञा खरी केली पाहिजे असा तुझ्या मनातील भाव मी ओळखला.' असे भीष्म श्रीकृष्णाला म्हणाले. श्रीकृष्ण मनमोकळेपणाने हसले. आपपर, शत्रुमित्र, रागद्वेष या द्वंद्वाच्या पलीकडे श्रीकृष्ण होते हेच यावरून दिसते. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील हा एक अतिशय ह्रद्य असा प्रसंग आहे.

गोभक्त श्रीकृष्ण


गोभक्त श्रीकृष्ण हा आजच्या भाषणाचा विषय आहे. विषय अगदी समयोचित ठेवण्यात आला आहे. आज देशात सर्वत्र गोहत्याबंदीची मागणी जोरात सुरू आहे. त्याकरिता भारतात सर्वत्र चळवळ सुरू आहे. जगद्गुरु शंकराचार्यांचे उपोषण सुरू आहे. अनेक साधुमहात्मेही उपोषण करीत आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या या देशात गोमातेला पवित्र स्थान प्राप्त झाले आहे. गाय हे केवळ जनावर नसून कोटि कोटि हिंदु जनता तिला आपली माता मानते, देवतास्वरूप मानते. भक्तिभावाने तिची पूजा करते. आणि कां करू नये? प्रत्यक्ष विष्णूचा अवतार भगवान श्रीकृष्णांनी गाई चारल्या, गोपालन केले, गोरक्षण केले. गाईची सेवा करण्यात भगवंताला आनंद वाटत होता, अभिमान वाटत होता, भूषण वाटत होते. भगवान श्रीकृष्ण हे अखिल ब्रह्मांडनायक असूनही परम गोभक्त होते हे आपणा सर्वांना माहीत आहे. गोपाल, गोविंद, गोवर्धनधारी, गोकुलवासी ही श्रीकृष्णांची नांवे तरी काय दर्शवितात? श्रीकृष्ण हे परम गोभक्त होते याचीच साक्ष ती नांवे देतात. वृंदावनात यमुनेच्या तीरावर गोपाळांच्या समवेत गाई चारण्यात ते दंग होऊन जात. त्यांच्या मुखातून मुरलीची मधुर तान निघाली की गाईही वेडावून जात, एवढेच नव्हे तर गोपीही आपले देहभान विसरून कामधंदा सोडून वेड्याप्रमाणे कुंजवनाकडे धावत सुटत.

कृष्णवर्ण अधरी धरि पावा ।
गोपवेष हरि तोचि जपावा ।
वाम बाहुवरि गालहि डावा ।
तो सदा ह्रदयात ठसावा ।।

असे कवीने श्रीकृष्णाच्या गोपवेषाचे अतिशय मनोहर वर्णन केले आहे. श्रीकृष्णाची गोभक्ति ही अनेक कवींच्या काव्याचा विषय झाली आहे, अनेक लेखकांच्या स्फूर्तीला ती कारण झाली आहे, तर कित्येकांच्या कौतुकाचा व प्रेमाचा ती विषय बनली आहे. श्रीकृष्णाला यशोदामाता जागे कसे करी, सारी गवळ्यांची पोरे त्याच्या दाराशी येऊन कशी जमत, यशोदा श्रीकृष्णाला न्याहारी कशी बांधून देई, गप्पा, गोष्टी, विनोद करीत ती सारी मंडळी वृंदावनाकडे किंवा गोवर्धन पर्वतावर गाई चरावयास कशी नेत असत, गाई चरत असता श्रीकृष्ण आपल्या मित्रांसमवेत नाना त-हेचे खेळ कसे खेळत असे, गाई यमुनेच्या पाण्यावर नेतानाचे दृश्य कसे मनोहर असे, श्रीकृष्ण जेव्हा गाईंच्या पाठीवरून किंवा मानेवरून प्रेमभराने हात फिरवी तेव्हा त्या आपली मान उंचावून व शेपटी उभारून श्रीकृष्णाचे मुखकमल कसे न्याहाळीत, मध्यान्हाच्या वेळी सगळे सवंगडी यमुनेच्या तीरावर एकत्र जमले असता प्रत्येक जण आपापली शिदोरी कसा सोडायचा, सगळ्यांच्या शिदो-या एकत्र करून त्यांचा बनविलेला गोपालकाला प्रत्येक जण मिटक्या मारीत कसा खाई, कोणाची भाकर, कोणाचे पिठले, कोणाची भाजी, कोणाचे लोणचे, कोणाची चटणी, कोणाची कोशिंबीर, कोणाचा शिरा, कोणाची पुरी याची लज्जत कशी और होती, ते बालगोपाळ ते सहभोजन आटोपल्यावर आपले हात धुवायला यमुनेच्या पाण्यावर येतील तेव्हा ती उच्छिष्ट शिते तरी आपल्याला खायला मिळावी म्हणून स्वर्गातील देव माश्यांचे रूप घेऊन यमुनाजलात येऊन कसे राहत, वासरे गाईचे दूध पीत असता मध्येच जर का कृष्णाने मुरलीची तान घेतली तर ते पिणे तसेच सोडून ती गाईवासरे चौखूर उधळून आपल्या लाडक्या कृष्णाभोवती कशी गर्दी करीत, उन्हे कलली, कासराभर दिवस उरला म्हणजे ते सारे गोप आपली पोवळी, ढवळी, पिवळी, शिंगरी अशा साऱ्या गाई एकत्र करून त्यांचे कळप गोकुळाकडे कसे वळवीत, त्या गाईंच्या चालण्याने जो धुरळा उडे त्या गोरजाने म्लान झालेल्या श्रीकृष्णाच्या मुखाचे चुंबन घेताना यशोदेला आणि नंदाला किती धन्यता वाटे याच्या बहारदार वर्णनाने कृष्णक्रीडेचे वाङमय ओथंबलेले आहे. आजही ते वाचतांना भाविकांच्या अंतःकरणात अपरंपार आनंदाच्या उर्मी उसळतात. आजही कोणत्याही सप्ताहाची, समारंभाची, उत्सवाची परिसमाप्ति गोपालकाल्याने करण्याची प्रथा आपल्यात रूढ आहे. श्रीकृष्णाच्या गोपालनाचे वर्णन जेव्हा कथाकार किंवा कीर्तनकार करतो तेव्हा श्रोत्यांची ब्रह्मानंदी टाळी लागते. 'हरीचा काला गोड झाला, ज्याच्या नशीबी त्याला मिळाला' असे म्हणत आजही भाविक भक्त प्रेमभराने फेर धरून नाचतात. द्वापारयुगातील श्रीकृष्णाची गोभक्ति आज कलियुगातही आमच्या भक्तीचा, श्रद्धेचा, निष्ठेचा व कौतुकाचा विषय बनली आहे. गोरज मुहूर्त हा अत्यंत शुभ मुहूर्त मानल्या जातो. धन्य तो श्रीकृष्ण, धन्य ते गोपगोपी, धन्य त्या गाई आणि धन्य ती वासरे! धन्य तो नंद आणि धन्य ती यशोदा! धन्य ती मुरली आणि धन्य तिचा तो मधुर नाद!  'मथुराधिपतेरखिलं मधुरम्' हेच खरे.

भगवान श्रीकृष्णांनी ज्या गोमातेची जोपासना केली तिचीच आज आपल्या भारतवर्षात अप्रतिहत हत्या होत आहे हे दैवदुर्विलसितच नव्हे काय? स्वतंत्र भारतात गोहत्याबंदीसारखी सात्त्विक व निरुपद्रवी मागणी मंजूर व्हायलाही इतका कालावधी लागावा आणि त्याकरिता जगद्गुरु शंकराचार्यांना आपले प्राण इरेस घालण्याचा प्रसंग यावा ही मोठी खेदाची तशीच विस्मयाची घटना आहे. आमच्या सरकारला केव्हा शहाणपण सुचेल हेच आता पाहावयाचे आहे. गोभक्त श्रीकृष्णाला श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने वंदन करून मी आपली ही शब्दांजली त्याचेच चरणी अर्पण करतो.

नमो ब्रह्मण्य देवाय । गोब्राह्मण हिताय च ।
जगद्धिताय कृष्णाय । गोविंदाय नमो नमः ।।

हरि ॐ तत्सत्
श्रीकृष्णार्पणमस्तु

गोवधबंदीच्या मागणीच्या काळात लिहिण्यात आलेला हा निबंध. दुसऱ्या कोणी तो जळजळीत लिहून कडकडून टाळ्या घेतल्या असत्या. पण बाबांनी त्याच विषयाला गोपालकाल्याची गोडी प्रदान केली.


न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते


वेदशास्त्राच्या अध्यापनाचे पवित्र कार्य करणाऱ्या श्री भोसला वेदशास्त्र महाविद्यालयाने सकल वेदशास्त्रांचे सारसर्वस्व असणाऱ्या श्रीमद्भगवद्गीतेचा जयंत्युत्सव साजरा करणे हे जसे उचित तसेच त्या श्रीमद्भगवद्गीताजयंत्युत्सवात गीतेतील स्वत: भगवंतांच्या मुखातून निघालेला 'न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते' हा श्लोकार्ध वक्तृत्वस्पर्धेकरिता विषय ठेवणे हेहि तेवढेच उचित होय! आणि या दोन औचित्यांच्या गंगायमुनासंगमात अवगाहन करण्याचा सुयोग मला लाभला हे मी आपले भाग्यच समजते.

सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनाः ।
पार्थोवत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ।।

या श्लोकावरून हे अगदीच स्पष्ट आहे की गोपालनन्दन भगवान श्रीकृष्णाने सर्व उपनिषदरूपी गाईंचे दोहलेले दूध म्हणजेच गीतामृत होय आणि हे महान दुग्ध भगवंतांनी अर्जुनाला पाजले आहे. असे जरी असले तरी अर्जुनाच्या मिषाने साऱ्या जगाला लाभलेला तो अमूल्य ठेवाच होय.

'न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते' हा भगवद्गीतेच्या चवथ्या अध्यायातील अडतिसाव्या श्लोकाचा पूर्वार्ध. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या जगात ज्ञानासारखे पवित्र असे काहीहि नाही. सारे यच्चयावत ज्ञान ज्याच्या पदी विसावा घेते ते सच्चिदानंदस्वरूप श्रीकृष्ण ज्या ज्ञानाची मुक्तकंठाने एवढी थोरवी गातात ते ज्ञान म्हणजे कोणते ज्ञान याचा उलगडा त्याच श्लोकाच्या उत्तरार्धावरून होतो.

'तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति' हाच तो उत्तरार्ध. ते ज्ञान, योग ज्याला पूर्णपणे साधला आहे, योगात ज्याला पूर्णपणे सिद्धि प्राप्त झाली आहे त्याला कालांतराने प्राप्त होते. अर्थात भगवंत ज्या ज्ञानाची थोरवी गातात, ज्याच्या पावित्र्याचा ते निर्वाळा देतात, ते ज्ञान म्हणजे लौकिक ज्ञान नव्हे, तर ते परमात्मस्वरूपाविषयीचे ज्ञानच होय हे उघड आहे.

खुद्द भगवंतांनीच दहाव्या अध्यायात 'अध्यात्म विद्या विद्यानाम्' असे म्हटले आहे. त्यावरूनहि अध्यात्म विद्या हीच खरी विद्या होय, तेच खरे ज्ञान होय, हे अगदी स्पष्ट आहे.

पण एवढ्या खोलात शिरण्याचे आपणाला काही कारण नाही. ज्ञानाचा साधा लौकिक अर्थ जरी घेतला तरी तेहि ज्ञान अतिशय पवित्र आहे, यात मुळीच संशय नाही. ज्ञानाची थोरवी अतिशय मोठी आहे. ज्ञान ही महान संपदा आहे, तो एक अमोल ठेवा आहे. दिल्याने ते वाढते, आणि साठवून ठेवल्याने नष्ट होते.

अपूर्वः कोपि कोशोयं विद्यते तव भारती ।
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात् ।।

ज्ञान हेच माणसाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अज्ञानी माणूस हा पशुसमान आहे. ज्ञानाच्या जोरावरच जग एवढे पुढे गेले आहे. अनेक शोध लागले आहेत. त्यायोगे माणसाच्या सुखसोयीत भर पडली आहे. त्याचे जीवनमान उंचावले आहे. विज्ञानाने अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. पडद्यावरील चित्रांना बोलायला लावले आहे आणि मानवी कंठातून निघालेल्या सुस्वर आलापांना एबोनाइटच्या तबकडीत कोंडून ठेवले आहे. टेलिफोन, तारायंत्र, रेडिओ आणि टेलिव्हिजन यांनी काळ व अंतर यांना जिंकले आहे, जगाची दोन टोके एकत्र आणली आहेत.

ज्ञानाचे स्वरूप परमेश्वराप्रमाणेच शाश्वत आहे.

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।

त्याला शस्त्रे तोडू शकत नाहीत, अग्नि जाळू शकत नाहीत, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा शोषू शकत नाही. शिवाजीचे राज्य गेले, पण रामदासांचा दासबोध कायम आहे. विजयानगरचे साम्राज्य गेले, पण त्या साम्राज्याच्या विजयकाली लिहिण्यात आलेली ज्ञानेश्वरी अजूनहि लोकांच्या हृदयावर साम्राज्य गाजवीत आहे. एवढेच काय पण ज्या पार्थाला भगवंतांनी गीता सांगितली, आणि ज्याचा सारा मोह गीताश्रवणाने नाहीसा होऊन ज्याने कौरवांशी अठरा दिवस पर्यंत घनघोर युद्ध केले तो पार्थ आज कोठे आहे? त्याचे राज्य त्याच्यासकट काळाच्या उदरात गडप झाले, पण भगवद्गीता मात्र युगायुगातून मानवजातीला अमर संदेश देत आपल्या दैदिप्यमान तेजाने अजूनहि तळपत आहे. अशी आहे ज्ञानाची थोरवी! ज्ञानी लोकांचे ग्रंथ अमर असतात आणि ते आपल्या लेखकालाहि कीर्तिरूपाने अमर करतात.

यच्चयावत ज्ञान हे त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचाच अंश आहे आणि म्हणूनच ते परमेश्वराइतकेच पवित्र आहे. परमेश्वर सच्चिदानंदस्वरूप आहे. त्याची चिच्छक्ति म्हणजेच ज्ञान होय. गीताजयंतीच्या पवित्र दिवशी भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेली ज्ञानगंगा जी भगवद्गीता तिला मनोभावाने वंदन करून आणि 'न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते' या गीतावचनावरील माझे हे अल्पसे भाषण आपण शांतचित्ताने ऐकून घेतले याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेते.

बाबांचे गीतोपदेशावरील हे सर्व निबंध मी हे प्रकरण जुळवतांना पध्दतशीर वाचून काढले. टाईप करतांना ते पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचण्यात आले. सर्वच विवेचन इतके काही सूत्रबद्ध आणि सुस्पष्ट आहे की मला बरीच गीता कळली. गाढवापुढे गीता वाचणे आणि त्याला ती वाचायला लावणे यातला हा फरक आहे असे म्हणा हवे तर. या ओघातच गीतेवर आपणही काही लिहावे असा विचार मनात आला. आणि आता मी तो प्रत्यक्षात आणणार आहे. विचारांची जुळवाजुळव व शब्दांची बेगमी होईपर्यंत बाबांचेच आणखी एक भाषण वाचू या.

श्रीमद्भगवद्गीता


गोकुळ अष्टमी सारखा पुण्यदिन! तेव्हा आज भगवंतांनी अर्जुनाला उपदेशिलेल्या श्रीमद्भगवद्गीतेवरच काहीतरी बोलावे असे मनात आले. पण त्याच मनाने उलट असा सवाल केला की, 'तुझी इच्छा सदिच्छा आहे, पण कोणीहि काहीतरी बोलावे या योग्यतेचा का गीता हा ग्रंथ आहे? तुझा अधिकार तरी आहे का या ग्रंथराजावर बोलण्याचा?'. लगेच अधिकारी पुरुषाचे बोल आठवले. 'अधिकार तैसा करू उपदेश', 'साहे ओझे त्यास तेचि द्यावे.'. श्री मनाचे श्लोक समोरच होते. समर्थांची खडी वाणी ऐकू आली. तोच तो श्लोकाचा चरण पुनः पुनः कर्णपटलावर आघात करू लागला. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.'. कशाला उगीच चेष्टा करतोस? तू लिहिण्याने का गीतेची थोरवी जगाला पटणार आणि तिची योग्यता वाढणार? आहे का तुझी क्रिया गीतेत सांगितल्याप्रमाणे? सोडलीस का तू फलाची आशा? घडले का आजवरच्या आयुष्यात तुझ्याकडून एखादे तरी फलाभिसंधिरहित कर्म? कर्मयोगाची पुसटशी ओळख तरी झाली का तुला? का तुला सांख्ययोग कळला? संपूर्ण सृष्टि स्वप्नसदृश एवं मायावी आहे अशी झाली का निश्विति? इंद्रियांच्या व शरीराच्या द्वारे होणाऱ्या सर्व कर्मांच्या ठिकाणचा कर्तेपणाचा अभिमान गळला का? सांग सांग तुला गीता किती कळली नि किती वळली? 'अभयं सत्वसंशुद्धिर्ज्ञानयोग व्यवस्थितिः।' हा श्लोक तू वाचलास का? मग झालास का तू निर्भय? स्वतःला पटलेल्या मतांप्रमाणेच आचरण करीन, कोणाच्याहि आणि कसल्याहि विरोधाला जुमानणार नाही, कळिकाळाचेहि नरडे फोडीन आणि वेळप्रसंग पडल्यास मृत्यूलाहि आनंदाने कवटाळीन, ध्येयापासून कदापि विचलित होणार नाही, परमेश्वराने नेमून दिलेले कर्म फलाची आशा सोडून अखंड करीत राहीन, फुटो हे मस्तक तुटो हे शरीर पण इश्वराचा ध्यास सोडणार नाही अशी निर्भय वीरवृत्ती तुझ्या अंगी बाणली का? का तुझी सत्त्वसंशुद्धि झाली? बनलास का तू सबाह्याभ्यंतर शुचिर्भूत? कधी केला आहेस का विषयांच्या कर्दमातून बाहेर निघण्याचा प्रयत्न? विषयकर्दमाने बरबटलेल्या अंगाने विलासी, रसिक, कलावान म्हणून जनात मिरवतांना कधी लाज वाटली का तुला? का त्यातच तुला भूषण वाटते? ज्ञानाची नि योगाची कधी सांगड घातलीस का? ज्ञानाला भक्तीचा, उपासनेचा, वैराग्याचा रंग चढला का? का पुस्तकांच्या ढिगाऱ्यातच यावज्जन्म गुदमरत राहणार व शुष्क वादविवाद नी काथ्याकूट करीत दुसऱ्याचे डोके उठविणार व स्वतःचे उठवून घेणार? भगवद्गीतेत सांगितलेल्या सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग, राजयोग, इत्यादींच्या नावापलिकडे तुझी त्यात काही गती आहे का?

स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव । स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ।

हा आणि ह्याच्या पुढचे श्लोक तू कितीदा तरी वाचतोस नी म्हणतोस. स्थितप्रज्ञाच्या वाटेवर तुझे पहिले पाऊल तरी पडले का? तू पाऊल उचलण्याचा कधी प्रयत्न तरी केलास का? स्थितप्रज्ञ होण्याची खरीखुरी तीव्र तळमळ तरी तुझ्या हृदयात कधी उत्पन्न झाली का? वासनांचा संयम तू कधी केला का? की मनाच्या चंचल वारूवर वासनांना स्वार होऊ देऊन स्वैर संचार करू देण्यातच तुला अनिर्बंध स्वातंत्र्याची प्रतीति येते? तू कधी आपल्या देशबांधवांकरिता, पीडित जनतेकरिता, मानवजातीकरिता, जडजीवांकरिता त्याग केलास का? श्रद्धात्रय विभाग तू गीतेत वाचलास. बसली का तुझी सत्तत्त्वावर, परमेश्वरावर, त्याच्या कार्यावर, संतांच्या बोलावर अविचल श्रद्धा?

'दैवी संपद्विमोक्षाय निबंधायासुरी मता ।'

हा गीतेतील श्लोकार्ध तू वाचला आहेस. दैवी संपदेने माणूस मोक्षाला प्राप्त होतो, आणि आसुरी संपत्तिमुळे तो बंधनात जखडविल्या जातो. मग आहे का तुजजवळ काही दैवी संपदा? बोल, बोल. आपले ह्रदयदौर्बल्य, आपल्या उणीवा, आपली निष्क्रियता, विषयलोलुपता, आपला भ्याडपणा, आपली आसक्ति दडविण्याकरिता एखादे तत्त्वज्ञान हुडकण्याच्या बेतात दिसतोस! की त्यांचे समर्थन शोधण्यास कारणे शोधीत आहेस? आपली उन्नति व्हावी असे वाटत असेल तर त्या फंदात पडू नकोस. सरळ सरळ आपले दोष पदरात घे. कमजोरी कबूल कर. आणि त्यावर मात करण्याकरिता गीतेचे तत्त्वज्ञान आचरणात उतरविण्याकरिता कंबर बांध.

संताचे बोल पुन्हा कर्णरंध्रात दुमदुमू लागले.

.. केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे
.. आधी केले मग सांगितले
.. करंटे मिळाले सर्वै । जो तो बुद्धिच सांगतो ।
.. सांगावे ते आपणाला । आपणु करिता बरे ।।
.. म्हणे दास लोकांस मी काय सांगो ।
   तराया जनी मी चि कासेसि लागो ।
   बरी साक्षपे औषधे वाढवावी ।
   जया लागला रोग तेणेचि घ््यावी ।।
.. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले

पुन्हा तोच श्लोकाचा चरण  'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे' ऐकू आला.

भगवान श्रीकृष्णांचे अवतार कार्य फार मोठे आणि सर्वव्यापी आहे. पण माझ्या मते श्रीकृष्णाने जगाला गीता सांगून बाकी कोणतेहि कार्य केले नसते, तरी त्यांना आम्ही देव मानले असते, इतकी गीतेची योग्यता मोठी आहे. आणि म्हणूनच मी श्रीकृष्णांच्या सबंध अवतार कार्याचे विवेचन न करता गीतेवरील आत्मसंशोधनपर विचार आपणापुढे मांडले आहेत. माझी बुद्धि अल्प आहे. मी आपणाला ज्यास्त काय सांगणार? आपण माझे भाषण लक्षपूर्वक ऐकून घेतले याबद्दल आपले मनःपूर्वक आभार मानून मी आपली रजा घेते.

नाही, नाही, सॉरी, नाही, नाही, नाही, नाही, नाही, नाही, नाही, नाही, फार थोडी, होय, नाही, नाही, नाही, नाही, नाही, नाही, होय, नाही, नाही, होय, नाही, नाही, नाही, नाही, नाही, होय, नाही, नाही, होय. ही झाली वरील प्रश्नांच्या भडिमाराची खरी उत्तरे, त्याच अनुक्रमाने. अशी धिंड निघाल्यावर आता कोण गीतेवर काहीतरी लिहायचे धाडस करणार? आपल्याला उमजेल असे काही वाचू या.

मला मनाचे श्लोक कां आवडतात?


श्री समर्थांची पुष्कळ ग्रंथरचना आहे. ग्रंथराज दासबोध हा तर प्रसिद्धच आहे. शिवाय त्यांची करुणाष्टके आहेत, स्फुट श्लोक आहेत, आणि इतरहि स्फुट रचना आहे. पण माझ्यासारख्या अल्पवयीन बालकाला ती कशी समजणार? मनाच्या श्लोकाकडे पाहून मात्र असे वाटते की समर्थांनी आम्हां बालकांचीहि फिकीर केली आहे. 'अधिकार तैसा करू उपदेश । साहे ओझे त्यास तेचि द्यावे ।।' या उक्तीला अनुसरून परमार्थाच्या वाटेवर रांगायला शिकणाऱ्या नवशिक्याला सोसवेल आणि झेपेल एवढेच ओझे देण्याचा मनाच्या श्लोकांत समर्थांनी बुद्धिपुरःसर प्रयत्न केलेला दिसतो . मनाच्या श्लोकांच्या सुगम रचनेमुळे आणि दर श्लोकागणिक होत जाणाऱ्या विषयाच्या पद्धतशीर विकासामुळे ते आमच्या मनाची विशेषच पकड घेतात.

श्री समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणजे संतवाङमयातील एक अमोल ठेवा आहे. ती प्रासादिक संतवाणी आहे, एवढेच नव्हे तर तो मनाला बोध असल्यामुळे त्याची योग्यता व महत्त्व अनन्यसाधारण आहे.

मन हा सर्व इंद्रियांचा राजा. ते पाऱ्याप्रमाणे अस्थिर, वाऱ्याप्रमाणे चंचल आणि ताऱ्याप्रमाणे अगम्य आहे. एका मनोव्यापाराचे पुरते ज्ञान होते न होते तोच ते आणखी हजार व्यापार करून मोकळे होते. अशा दुर्दम्य मनाला वठणीवर आणून त्याला हरिभजनी लावावयाला 'मनाचे श्लोक' फार उपकारक ठरतात.

'आधी केले मग सांगितले', 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे' या तत्त्वांवर समर्थांचा अतिशय भर असल्यामुळे लोकांना उपदेश करण्याच्या भानगडीत न पडता त्यांनी प्रथम आपल्या मनालाच बोध केला आहे व तोच 'मनाचे श्लोक' या नावाने प्रसिद्ध आहे. श्री रामदासांनी हा बोध जरी मनास केला असला तरी तोच बोध प्रत्येक मुमुक्षूने आपल्या मनास करून आपली उन्नति करून घेता येण्यासारखी आहे.

मनाचे श्लोक २०५ आहेत. त्यांत काय नाही? 'जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे । जनी वंद्य ते सर्व भावे करावे ।।' असा व्यवहार धर्म त्यांत आहे, 'प्रभाते मनी राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधी वदावा ।।' अशी दिनचर्या त्यांत सांगितली आहे, 'समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे? ।।' असा प्रबळ आत्मविश्वास आहे, 'सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटी स्वामि तैसा ।।' असे अभयदान त्यांत आहे, 'सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।' असा परमेश्वराविषयी दृढविश्वास आहे, 'अहिल्ये सतीलागि आरण्यपंथे । कुढावा पुढे देव बंदी तयाते ।।' असे भगवंताचे अवतारचरित्र त्यांत आहे, 'तुटेना, फुटेना, चळेना, ढळेना' असे परमेश्वराचे अविनाशित्व त्यांत सांगितले आहे, 'नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ।।' असा कामक्रोधादि षड्रिपूंपासून सावध राहण्याचा इशारा आहे, 'सदा सत्य ते सत्य वाचे वदावे' असा नीतीचा उपदेश आहे.

साऱ्या वेदशास्त्रांचे सारच समर्थांनी मनाच्या श्लोकांत प्राकृत मराठी भाषेत सांगितले आहे. 'वेदांचे जे गुह्य, शास्त्रांचे जे सार । प्राकृत शब्दामाजी केला विस्तार ।।' हे अगदी खरे आहे.

मनाच्या श्लोकातील उपदेशाप्रमाणे जो चालेल, त्याचे सर्व दोष झडून परमार्थाच्या मार्गावर त्याची पावले निश्चितपणे व शीघ्रगतीने पडतील असे खुद्द समर्थांनीच आश्वासन दिले आहे.

मनाची शते ऐकता दोष जाती ।
मतीमंद ते साधनायोग्य होती ।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।
म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ।।

संत रामदासांचे कार्य फार थोर आहे. त्यांनी प्रपंच आणि परमार्थ, धर्म आणि राजकारण, प्रवृत्ति आणि निवृत्ति यांची सांगड घातली, व शिवाला हाताशी धरून परकीयांच्या गुलामगिरीतून महाराष्ट्राची मुक्तता केली. महाराष्ट्रभूमी स्वतंत्र झाल्यावर 'उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया' असा समाधानाचा निःश्वास सोडला. त्यांना स्वतःसाठी काहीच नको होते. शिवाजी महाराजांनी झोळीत टाकलेले राज्य त्यांनी शिवाजीला परत केले यावरून त्यांची त्यागवृत्ति दिसून येते. ते खरेखुरे राष्ट्रगुरू होते. 'मनाचे श्लोक' हे अश्या थोर व्यक्तीचे अनुभवाचे बोल असल्यामुळे त्यांची योग्यता काही आगळी आणि वेगळीच आहे.

वरील सर्व कारणामुळे श्री समर्थ रामदास स्थामींचे 'मनाचे श्लोक' मला अतिशय आवडत असल्यास नवल ते काय? आणि या मनाच्या श्लोकातूनच मला समर्थांची शिकवण प्रतीत होते. त्यांचा संदेश मला मिळतो.

श्री समर्थांना जनसेवा हीच ईशसेवा वाटत होती. यावनी सत्तेच्या सर्वभक्षक ज्वाळात होरपळून निघणाऱ्या दीन दुबळ्यांच्या, अनाथ अबलांच्या करुण चित्कारांनी त्यांचे हृदय पिळवटून निघाले. मंदिरांचा विध्वंस, गोमातेचा वध, अबलांची अवहेलना, दीनदुबळ्यांची दुर्दशा, लोकांची अन्नान्नदशा त्यांनी प्रत्यक्ष पाहिली आणि त्यांचे हृदय विदीर्ण झाले. यावनी सत्तेचे उच्चाटन हाच या सर्व परिस्थितीवर तोडगा होता. त्याकरिता शिवबा हा त्यांना योग्य पुरुष वाटला आणि त्याला हाताशी धरून आपले ईप्सित त्यांनी साध्य केले, आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करविली. मठांच्या व महंतांच्या द्वारे एक सुदृढ संघटना त्यांनी उभारली. गावोगाव मारुतीची मंदिरे स्थापून बलोपासनेचा आदर्श लोकांसमोर ठेवला.

धटासी पाहिजे धट । उद्धटासी आणावा उद्धट ।
खटनटासी खटनट । साक्षेपे योजावा ।।

अशी त्यांची वास्तववादी शिकवण होती. भ्रामक तत्त्वज्ञानाच्या आहारी ते कधी गेले नाहीत. व्यवहाराच्या निकषाला घासूनच त्यांनी आपल्या सिद्धांताची मांडणी केली. त्यांचे डोके जरी ध्येयाच्या अनंतात विहार करीत असले तरी त्यांचे पाय मात्र वास्तवाच्या भूमीवरच आधारले होते. त्यांनी प्रपंचाची व परमार्थाची सांगड घातली. असा व्यवहारी संतच आम्हाला जवळचा वाटतो. प्रयत्नवादावर त्यांचा विशेष भर होता. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे प्रयत्नांची रासच.  'वन्ही तो चेतवावा रे । चेतविताचि चेततो । केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ।।' हाच  त्यांचा संदेश, हीच त्यांची शिकवण.

'श्री समर्थांची शिकवण' या शीर्षकानिशीहि हाच निबंध एका दुसऱ्या  स्पर्धेत उतरला. Nature has far too much diversity, but not so much originality असे म्हणतात. तसे ते खरेहि आहे. निसर्गात विविधता आहे. पण नाविन्य त्या मानाने कमीच. अनेक प्रकारचे जीव आहेत. गाई, म्हशी, शेळ्या, बकऱ्या वगैरे वगैरे. पण त्यांच्या घडणीत किती साम्य आहे? असेच कशाला? चिंपाझी, ओरांगउटांग, मानवप्राणी किती दिसायला सारखे? हे पचायला जरा कठिण जात असेल तर असे बघा की गाढव, कोल्हा, लांडगा, गोगलगाय, साप, कुत्रा यांचे गुणधर्म मानव प्राण्यांत पण आढळतात की नाही? हेहि नसेल पटत तर विषयच बदलू या. सांगायची गोष्ट एवढीच की जसे निसर्गाचे, तसेच निबंध, वक्तृत्व स्पर्धांच्या विषयांचे. थोड्याफार फरकाने बरेचदा विषय सारखे असत. कुठलीहि स्पर्धा असली की आधी आम्ही मिळत्या-जुळत्या विषयावर आधीचे एखादे भाषण, निबंध बाबांच्या गाठोडीत आहे का ते बघत असू. सापडले तर उत्तमच. नसले तर मग 'बब्बं शरणं
गच्छामि ।'.

कधीकधी शोधण्यात चूक झाली म्हणून किंवा एकाच स्पर्धेत बाबांचे दोन चेले उतरणार होते म्हणून की काय, बाबांनी एकाच विषयावर दुसरी निर्मिती केली.


श्री मनाच्या श्लोकांचे महत्त्व


श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक हा ग्रंथ आकाराने लहान असला तरी महत्तेने अत्यंत थोर आहे. मनाचे श्लोक हा रामदासांनी मनाला केलेला उपदेश होय आणि म्हणूनच मनाचे श्लोक एका आगळ्याच वैशिष्ट्याने संतवाङमयात आपले स्थान मंडित करतात. मन हे अतिशय चंचल असते. अणुपेक्षाहि सूक्ष्म, पाण्याहूनहि विरळ, पाऱ्यासारखे अस्थिर आणि वायुपेक्षाहि वेगवान असे मानवी मन आहे. ते एके ठिकाणी स्थिर करावयाला फार श्रम पडतात. आणि मन स्थिर झाल्याशिवाय तर परमेश्वर प्राप्ती होणे शक्यच नाही. संसाराच्या मोहपाशातून मन काढून घेऊन ते परमेश्वरचरणी लीन केल्याशिवाय ईशप्राप्ति अशक्यच. हे जाणूनच रामदास स्वामींनी मनाचे श्लोक रचले.

'आधी केले मग सांगितले' हा रामदास स्वामींचा बाणा होता. 'परोपदेशे पांडित्यम् सर्वदा निष्फलम् नृणाम्' हे संस्कृत सुभाषित सुप्रसिद्ध आहे. प्रत्येक भाषेत या अर्थाची सुभाषिते आहेत. 'Example is better than precept' ही इंग्रजी म्हणहि त्याच अर्थाची आहे. 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' असे रामदासस्वामी म्हणतात. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे' असे ते गर्जून सांगतात. 'क्रियेवीण शब्दबळ । ते अवघेचि निष्फळ ।' असे ते आवर्जून प्रतिपादितात. आणि म्हणूनच श्री समर्थांनी दुसऱ्याला उपदेश करण्याच्या भरीस न पडता स्वतःच्या मनालाच उपदेश केला आहे. मन हे मोठे अवखळ, महा चंचळ. म्हणून त्याला आंजारून गोंजारून सुमार्गी लावण्याचा रामदासांचा प्रयत्न दिसतो. 'मना सज्जना भक्ति पंथेचि जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे । जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे । जनी वंद्य ते सर्व भावे करावे ।।' हा श्लोक म्हणजे गणपति व सरस्वती यांच्या स्तवनाच्या पहिल्या श्लोकानंतरचाच दुसरा श्लोक होय. परमार्थ मार्गाच्या पथिकाला मनाचे श्लोक अत्यंत मार्गदर्शक आहेत.

मनाच्या श्लोकात काय नाही? 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ।।' या कटु सत्याने समर्थांनी मानवाला मरणाची जाणीव करून दिली आहे. 'समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।' असा खडा सवाल विचारून परमेश्वराच्या भक्ताकडे कोणी वाकड्‌या नजरेने पाहू शकत नाही असा दृढ विश्वास त्यांनी प्रगट केला आहे.  'प्रभाते मनी राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधी वदावा ।।' या श्लोकांत दिनचर्येला सुरुवात कशी करावी हे ते सांगतात. अत्यंत सोप्या सरळ भाषेत नीतितत्त्वे आणि धर्ममूल्ये मनाच्या श्लोकांत ग्रथित करण्यात आली आहेत. जनांत वागतांना स्वतःचे वर्तन कसे असावे याचेहि मोठे मार्मिक दिग्दर्शन स्वामींनी केले आहे.

'मना चंदनाचे परि त्वां झिजावे ।', 'स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।', 'अहंता मनी पापिणी ते नसो दे ।', 'तुटे वाद संवाद तो हीतकारी ।' असा अमोल उपदेश त्यांनी केला आहे.

'भवाच्या भये काय भीतोसि लंडी । धरी रे मना धीर धाकासि सांडी ।।' असा मोठा धीराचा दिलासा ते देतात. 'सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।' या श्लोकाद्वारे ते असे सुचवितात की परमेश्वर जरी तुमचा पाठीराखा असला तरी तुम्ही प्रयत्न मात्र केलाच पाहिजे.  'सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटी स्वामी तैसा ।।' असे अभयदान भक्तांना ते देतात.

भगवान विष्णूंनी घेतलेल्या दशावताराची कहाणी देखील मनाचे श्लोकांत आहे. अध्यात्मासारख्या जड आणि जाड विषयाचे अत्यंत सुलभ विवेचन मनाचे श्लोकांत आहे. 'नभासारिखे रूप या राघवाचे ।' या श्लोकात भक्ताला ते सगुणाकडून निर्गुणाकडे नेतात. 'द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो । तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो ।।' अशासारखे समर्पक दृष्टांत देऊन त्यांनी अध्यात्मविषय सुलभ केला आहे.

२०५ मनाचे श्लोक म्हणजे श्री समर्थांच्या महान उपदेशाचा अमृतकुंभच होय. या श्लोकांच्या पठनाने मनुष्याचे दोष झडतात, सद्गुण अंगी बाणतात, इंद्रियनिग्रह होतो, वैराग्य अंगी बाणते, ज्ञान प्राप्त होते, अंगी सामर्थ्य येते आणि शेवटी साधक मोक्षाचा धनी होतो. समारोपाच्या अखेरच्या श्लोकात रामदासस्वामी म्हणतात:

मनाची शते ऐकता दोष जाती ।
मतीमंद ते साधनायोग्य होती ।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।
म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ।।

मनाच्या श्लोकाच्या आरतीत श्री समर्थ म्हणतात की वेदांचे जे प्रतिपाद्य आहे आणि सकल शास्त्रांचे जे सार आहे त्याचाच मनाच्या श्लोकात प्राकृत भाषेत विस्तार केला आहे. या श्लोकांच्या वाचनाने कर्म, उपासना, ज्ञान ह्या परमार्थ मार्गावरील पायऱ्या साधक सुलभतेने चढत जाऊन शेवटी परमेश्वर स्वरूपी लीन होतो.

मनाच्या श्लोकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तो व्यवहारज्ञानाचा कोष आहे. त्यात आचारसंहितेचे पीयुष आहे. अध्यात्माचे अमृत आहे. ज्ञानगंगेने ओतप्रोत भरलेला तो कलश आहे. त्यात भक्तीचा अमोल ठेवा दडलेला आहे. ते सामर्थ्याचे आगर आहे. मोक्षाचे भांडार आहे. श्री समर्थ रामदासस्वामींना समाधिस्थ होऊन आज २८५ वर्षे झाली, पण त्यांचे मनाचे श्लोक साऱ्या विश्वाला अजूनहि दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत आहेत.

गीतेप्रमाणेच रामदास व रामदासी साहित्य हे बाबांचे आवडते विषय आहेत. एकूण संतवाङमयाचाच त्यांचा अभ्यास आहे. श्लोक, ओव्या, अभंग हवे तेव्हा आईबाबांच्या जिभेवर हजेरी लावतात. आणि साध्या बोलण्यातहि ते बाजी मारून नेतात. जीभेच्या वळवळीचे हे सामर्थ्य ऐकणाऱ्याच्या चुळबुळीचे कारण होते.

सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जे करील तयाचे ।

परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।


महाराष्ट्रात ज्ञानेश्वरादि संतश्रेष्ठांनी निर्मिलेल्या श्रद्धाजीवनात तेज व पुनरुत्थानाची आकांक्षा निर्मिणारे अवतारी पुरुष, नैराश्याने व्याप्त झालेल्या देशात जागृतीचे चैतन्य ओतणारे राष्ट्रगुरू व लोकशिक्षक, छत्रपति शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु, पारतंत्र्यग्रस्त महाराष्ट्राची सोडवणूक करणारी व खड्गाला धर्माचे अधिष्ठान निर्माण करणारी थोर विभूति व राष्ट्राची मने तयार करून त्यात आपल्या संजीवनीतुल्य वाणीने नवीन उत्साह भरणारे ध्येयवादी या सर्वच दृष्टींनी श्री समर्थ रामदास स्वामींची योग्यता जशी अनन्यसाधारण आहे तद्वतच त्यांच्या दासबोधाचे स्थानहि साऱ्या संतवाङमयात वैशिष्ट्यपूर्ण आणि अनुपम आहे. श्री समर्थांचा दासबोध अनेक रत्नांची खाण आहे. सद्यपरिस्थितीत तर दासबोधाचे वाचन, मनन, निदिध्यास व अनुसरण अत्यावश्यक आहे. दासबोधात कितितरी बोधवचने सर्वत्र विखुरली आहेत. अशाच अनेक बोधवचनांपैकी

सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जे करील तयाचे ।
परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।

हे एक होय.

श्री रामदासांचा प्रयत्नवादावर अतिशय भर आहे. दैववादावर हवाला ठेवून स्वस्थ बसणे किंवा निष्क्रिय राहणे हे त्यांच्या प्रकृतीस मानवत नाही. स्वतःचा संसार न करता त्यांनी सबंध राष्ट्राचा संसार केला. संघटनेचे नानाविध उद्योग केले. गावोगाव मारुतीची प्रतिष्ठापना, आखाडे व मठ यांची निर्मिती, मठाधिपति म्हणून महंतांची नेमणूक या त्यांच्या कार्याने संघटित बलाची जोपासना झाली व शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात ते संघटित बल कामी आले.

प्रयत्नवादाचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला असला, यत्न तो देव जाणावा असे मत आग्रहपूर्वक प्रतिपादन केले असले तरी प्रयत्नाला परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे असे ते आवर्जून सांगतात.

वन्हि तो चेतवावा रे । चेतविताचि चेततो ।
केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ।।

या स्फूर्तिदायक उद्गारांनी महाराष्ट्रात स्वराज्याच्या चळवळीचा जो प्रचंड वन्ही चेतविला गेला त्यात संपूर्ण यावनी सत्ता भस्मसात् झाली. चळवळीचे सामर्थ्य समर्थ मान्य करतात, कार्यकर्त्यांचे कर्तृत्व ते उंच लेखतात, पण या साऱ्या चळवळीचा व्याप भगवंताच्या अधिष्ठानावर उभारला गेला पाहिजे हे मात्र निक्षून सांगतात. यातील मर्म आपण ओळखले पाहिजे. जी चळवळ भगवंताच्या अधिष्ठानावर आधारली नसेल ती यशस्वी होणार नाही आणि काही काल यशस्वी झाल्यासारखी वाटली तरी तिला कडू फळे येतील, अशी धोक्याची सूचना श्री समर्थांच्या उपर्युक्त उद्गारात अभिप्रेत आहे. आणि ही त्यांची धोक्याची सूचना आजच्या राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी अवश्य ध्यानात बाळगली पाहिजे.

आज देशात नानाविध चळवळी आपण पाहतो पण त्यांच्या मूळाशी परमेश्वराचे अधिष्ठान मात्र आढळत नाही. आणि त्याचे भयानक परिणाम देखील चोखंदळ निरीक्षकांच्या नजरेस आल्याशिवाय राहत नाहीत. भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणजे तरी काय? कोणतीही चळवळ ही सत्कार्यासाठी पाहिजे, सद्धेतुमूलक पाहिजे. भगवान हा सत्यसंकल्पाचा दाता आहे. न्याय, नीति, धर्म यांच्या प्रतिष्ठापनेसाठी चळवळी अवश्य कराव्या. त्या यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत व त्यांना फळेही तशीच सुंदर व मधुर येतील यात शंका नाही. पण आज आपण काय पाहतो? सर्वत्र स्वार्थाची बजबजपुरी माजली आहे. पैसा हाच परमेश्वर बनला आहे. पैशासाठी वाटेल ती अनन्वित कृत्ये करतांना दिक्कत वाटेनाशी झाली आहे. परस्पर अविश्वास, मत्सर, फूट यांचे सर्वत्र थैमान दिसत आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. वाटेल त्या भल्याबुऱ्या कार्यासाठी चळवळी होत आहेत. आमरण उपोषणाच्या घोषणा करण्यात येत आहेत, मोर्चे निघत आहेत, निदर्शने होत आहेत, 'हमारी मांगे पुरी करो' असे नारे लावण्यात येत आहेत, 'हम से जो टकरायेगा । मिट्टी में मिल जायेगा ।' असे घूत्कार व फुत्कार ऐकू येत आहेत, विद्यार्थ्यांच्या उत्पाती कारवायांना ऊत आला आहे, सर्वत्र अनागोंदी, असमाधान, वैफल्य दृष्टोत्पत्तीस येत आहे, स्वार्थी स्पर्धेने सर्व वातावरण दूषित झाल्यासारखे भासत आहे, अशी मोठी भयानक व स्फोटक परिस्थिती आज सर्वत्र दिसते. हा सारा कशाचा परिणाम असेल तर आमच्या चळवळीच्या बुडाशी परमेश्वरी अधिष्ठान नसल्याचा होय. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय उभारलेल्या चळवळींची परिणति अशीच होणार, त्यांना अशीच कटु फळे येणार.

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश करण्याकरिता भगवद्गीता सांगितली. भगवद्गीतेच्या शेवटच्या अठराव्या अध्यायाचा शेवटचा श्लोक

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयोभूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।

हा आहे.

विजयप्राप्तीसाठी नुसता धनुर्धर पार्थ असून चालणार नाही, तर त्याला साहाय्य करणारा योगेश्वर कृष्ण हवा आहे. या गीतावचनातील मर्म तरी काय आहे? नुसत्या भौतिक जडवादी चळवळी नकोत तर त्यात आध्यात्मिकतेचे अधिष्ठान पाहिजे. परमेश्वरी अधिष्ठानाशिवाय चळवळीचा व्याप म्हणजे मूर्तिवाचून देऊळ, प्राणज्योतिविरहित मढे. ज्यातील आत्मज्योत निघून गेली अशा प्रेताला कवटाळून काय होणार? फार झाले तर भूतबाधा होईल. गीतारहस्यकार लोकमान्य टिळकांनी हे तत्त्व ओळखले होते. महात्मा गांधींना हे मर्म समजले होते. महर्षि अरविंदांना क्रांतिकारक राजकीय चळवळीत परमेश्वरी अधिष्ठानाचा अभाव जाणवला म्हणून ते आध्यात्मिक योगसाधनेच्या मागे लागले.

आज हे मर्म लोक विसरले आहेत. म्हणून महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचे हट्टाग्रहात रूपांतर झाले. उपोषणाच्या हास्यास्पद आवृत्या निघत आहेत. 'बंद',  'घेरा डालो' यासारख्या विघटनात्मक चळवळींना ऊत आला आहे. आपण वेळीच सावध होऊन भगवंताच्या अधिष्ठानावर आधारलेल्या चळवळीचे महत्त्व प्रतिपादणाऱ्या श्री समर्थ प्रणीत महाराष्ट्रधर्माची कास धरली नाही, तर भयानक विनाश अटळ आहे.

ज्या देशात सत्ता आणि संपत्ति यांकरिता पक्षोपक्षांची सुंदोपसुदी चालते, जेथे दीड बुटली त्यागाच्या भरवश्यावर हांडाभर अधिकारावर हक्क सांगण्याची तथाकथित लोकनेत्यांना दिक्कत वाटत नाही, त्याच देशात अवघ््या तीनशे वर्षांपूर्वी एक असा सत्पुरुष होऊन गेला की अनायासे झोळीत पडलेल्या राज्याचा तिळमात्र मोह न पडता त्याने ते परत शिष्याच्या हवाली केले. अश्या निस्पृह नेत्याच्या धुरीणत्वाखाली देश तयार झाला म्हणूनच त्या काळी राष्ट्राला उन्नत दशा प्राप्त झाली. म्हणूनच भारताच्या उन्नतीची स्वप्ने पाहणाऱ्यांनी समर्थचरित्राची कास धरली पाहिजे. त्यांच्या जीवनचरित्राचे व त्यांच्या ग्रंथाचे श्रवण, मनन, परिशीलन केले पाहिजे. त्यांचे जीवन म्हणजे चिरंतन स्फूर्तीचा एक अखंड झरा आहे. आजही भारताला आपल्या पवित्र जलाने समुन्नतीच्या फळाफुलांनी बहरून टाकण्यास तो समर्थ आहे.

श्री समर्थ रामदास स्वामींचा हा उपदेश ध्यानी घेऊन व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर भारतीयांनी आपल्या कार्याची दिशा आखली व चळवळींचे नियोजन केले तर भारत पुनश्च दैदीप्यमान तेजाने तळपू लागेल व अखिल विश्वाच्या गुरुस्थानी विराजमान होऊन प्रगत राष्ट्रांच्या मालिकेत मेरुमण्याप्रमाणे शोभेल यात संशय नाही.

जगाच्या कल्याणा । संतांच्या विभूती ।

देह कष्टवीती । उपकारे ।।


'अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची' असे ज्यांच्याविषयी मोठ्‌या आदराने म्हटले जाते, 'ज्याचे अभंग लागति खलहृदया जेवि बाण रामाचे' अशा संतशिरोमणि तुकाराम महाराजांचा अभंग हे ह्या निबंधाचे शीर्षक आहे. संतांचे कार्य अतिशय थोर आहे. त्यांचे कार्य त्रिकालाबाधित व सनातन असते. विनाश हा काळाचा कायदा असला तरी संतांचे कार्य अविनाशी असते. जगाचे कल्याण हेच संतांचे एकमेव कार्य. त्यासाठीच त्यांचा अवतार असतो. रघुवंशात सांगितलेच आहे, 'भवोहि लोकाभ्युदयाय तादृशाम्' अशा लोकांचा जन्म लोकांच्या अभ्युदयाकरिताच असतो. ह्या कार्यात कितीहि अडचणी आल्या, कितीहि विरोध सहन करावा लागला, कितीहि उपरोधाला तोंड द्यावे लागले तरी ते सारे ते सहन करतात. स्वतःचे अस्तित्वच त्यांच्या स्मरणात नसते. 'सर्वं खल्विदं ब्रह्म' म्हणून जनता जनार्दनाची सेवा करावयाची, त्यांचे कल्याण व्हावे यासाठी झटावयाचे येवढेच त्यांना माहित. आणि याचसाठी 'मना चंदनाचे परि त्वां झिजावे' असे रामदास स्वतःच्या मनास शिकवितात.

संतांच्या कर्तृत्वाचे, त्यांच्या कार्याचे चीज तत्कालीन परिस्थितीत क्वचितच होते. आज अर्ध्याअधिक जगाने स्वीकारलेल्या ख्रिस्त धर्माचा संस्थापक येशु ख्रिस्त सुळावर याचमुळे चढला. संताचे कार्य स्वयंस्फूर्त असते आणि त्यांचे तत्त्वज्ञान दुरभिमानी, दुराराध्य मानवजातीस कधीच लवकर मान्य होत नाही. सत्ताधारी लोकांना संताची विचार मुद्रा बघवत नाही. हा त्यांचा विद्वेष 'He thinks too much: such men are dangerous' या आपल्या उद्गारात शेक्सपीअरने भेदक शब्दांनी व्यक्त केला आहे. पण अनुकूल आणि प्रतिकूल काळाची कदर करण्यास संतांना वेळ नाही. 'निराशेचा गाव दिधला आम्हासी' हीच त्यांची यशापयशाविषयीची भावना. त्यांच्या मुखावाटे कुणाविषयीहि अभद्र बाहेर पडणार नाही. कितीहि मंबाजी मिळाले तरी तुकाराम त्यांचे कल्याणच वांछील. 'दुरितांचे तिमिर जावो' म्हणूनच सारे संत परमेश्वराची आळवणी करतील. 'प्रेमगुणाने देतो गंधहि विध्वंसकास पाटीर' हेच खरे.

त्यांना मानवजातीच्या उन्नतीची स्वप्ने सदैव पडत असतात, आणि ती स्वप्ने बोलून दाखविण्याचे धाडस ते करतात. पण या भविष्यकथनाबद्दल त्यांना किती घोर प्रायश्चित्त भोगावे लागते! साऱ्या समाजाकडून ते उपेक्षिले जातात. ज्ञानेश्वरांना समाजाचा बहिष्कार सहन करावा लागला. तुकारामांच्या अभंगांच्या वह्या लोकांनी इंद्रायणीत बुडवून टाकल्या. पण संत हे सारे सहन करतात आणि या मोबदल्यात जगाच्या कल्याणार्थ सतत झटतात. स्वतःचे हित किंवा देशाचे हित येवढीच त्यांच्या कल्पनेची धाव नसते. 'अवघे विश्वचि माझे घर' अशी त्यांची विराट भावना असते. 'अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक' अशी त्यांची दृढ प्रतिज्ञा असते. संत हे तर विश्वधर्माचे प्रवर्तक असतात. आपला गाव, आपला जिल्हा, आपला देश यांचाच जयजयकार न करता 'जय जगत'चा ते मुक्त कंठाने उद्‌घोष करतात.

जगाला कल्याणाचा मार्ग दाखविण्यासाठी, लोकांच्या मनावर श्रद्धा, सद्धर्म, शांति, दया यांचा उपदेश बिंबविण्यासाठी संताचे मार्गहि नाना असतात. लोकांचे लक्ष खेचण्यासाठी ते नाना चमत्कार दाखवतील, असाध्य रोगांतून मुक्तता देतील, पण शेवटी निरभिलाष मनाने जगाची सेवा करण्याचा पाठ तुम्हास देतील. प्रथम शांतीने सांगून पाहतील पण त्याने जनता बधली नाही तर कठोर मार्गहि स्विकारतील. ज्ञानेश्वरांनी सोज्वळ भाषेत जगास उपदेश केला. पण त्याचा परिणाम झाला नाही हे दिसताच तुकाराम, रामदासांनी कडक भाषा अवलंबिली. ज्यांनी त्यांचे मानले नाही अशांना 'तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनि माराव्या पैजारा' आणि 'ऐसे लौंद बेइमानी, कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मार जनी, राक्षेस जाणावे' अशासारख्या तीक्ष्ण बाणांनी त्यांनी ताडिले. खलह्रदयाला हे उद्गार रामबाणाप्रमाणे न लागले तरच नवल. पण भाषा, उपदेशाची पद्धत यांत कितीहि फरक असला तरी साऱ्या संतांचे कार्य एक, आणि जगाच्या कल्याणाचे त्यांचे ध्येयहि एक.

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवीती उपकारे हे कोण अमान्य करू शकेल?

बाबांनी आमच्यासाठी केलेल्या पार्श्वलेखनाचा व आमच्या पोपटपंचीचा आम्हा सर्वांना खूप फायदा झाला. बक्षिसे व टाळ्या तर मिळाल्याच पण ते तात्पुरते फळच म्हणावे लागेल. दीर्घकालीन फायदे पाहिले म्हणजे त्या क्षणभंगुर कौतुकाचे फारसे कौतुक वाटत नाही.

भाषण करतांना विषयाला धरून बोलले तर अर्धाअधिक गड सर होतो ही शिकवण मिळाली. केवळ टाळ्या घेण्यासाठी, हंशा पिकविण्यासाठी विषयांतर करणारा बरेचदा 'काय छान बोलला हो!' अशी श्रोत्यांची दाद मिळवून जातो. पण ती क्षणिक असते. चोखंदळ श्रोते लवकरच 'पण बोलला काय हो?' ह्या प्रश्नाचे उत्तर शोधू  लागतात. आपल्या भाषणांत फारश्या टाळ्या पडल्या नाहीत व हंशा पिकला नाही आणि त्या अमक्याला मात्र श्रोत्यांची दाद मिळाली हे पाहून बरेचदा मन खट्‌टू होत असे. पण परीक्षकांचा निर्णय आल्यावर त्या सर्वाचा विसर पडत असे. श्रोत्यांच्या प्रतिक्रियेच्या प्रवाहाबरोबर वाहणारे परीक्षक त्याकाळी अपवादानेच होते. त्यांची दाद दिली पाहिजे. बाबांची भाषणे मुद्देसूद असत, गुद्देसूद नसत. अहिंसक भाषणाची लागलेली ही सवय आज फार कामी येते.

पण अशी अहिंसा नेहमीच कामाची नाही. काही प्रसंगच असे असतात की मुद्याऐवजी गुद्दा नाही, मुद्यागणिक गुद्दा नाही तरी किमान चार दोन मुद्यांपाठी एखादा गुद्दा आवश्यक आणि क्षम्य असतो. वादालाच तोंड लागल्यावर शब्दांच्या फैरी झडणारच. शब्द हेच तेथे शस्त्र. ते मी वापरणार नाही असे जर कोणी अर्जुन म्हणेल तर पुनः काही कोणी कृष्ण गीता सांगणार नाही. उलट म्हणेल 'गाढवापुढे वाचली गीता....', आणि मग ते गाढव चवताळून उतरेल... वादरणांत.


_____________________

No comments:

Post a Comment