३
वादरण
निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांप्रमाणेच वादविवाद स्पर्धा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीजीवनाचा एक महत्त्वाचा भाग होता. काहीतरी वादजन्य विषय ठेवायचा, त्याच्या समर्थकांत व विरोधकांत जुंपवून द्यायची, आणि बाजूला उभे राहून गंमत लुटायची असे याचे स्वरूप नसायचे. विषय समयोचित व गंभीर असत. प्रत्येक संस्थेकडून एक विषयाचा समर्थक व एक विरोधक यांची भाषणे व्हायची. सर्व भाषणे झालीत की ठराव मताला टाकण्यात येत असे. समर्थक, विरोधक आणि श्रोते ठरावाच्या बाजूने वा विरोधात हात वर करीत. बहुमताने ठराव पास होत असे वा पडत असे. लोकशाहीला पोषक अशा या स्पर्धाप्रकारात बाबांनी आपले चेले उतरवले. अनेक व्यासपीठांवरून बाबांचे ७ अक्षौहिणी शब्दसैन्य व इतरांचे ११ अक्षौहिणी शब्दसैन्य यांचे वादरण पेटले. विजय कोणाचा झाला ते सांगायला नको.
जवळजवळ ६०-७० निरनिराळ्या वादविवादाच्या विषयांवर बाबांची भाषणे आहेत. काही विषय आता कालबाह्य झाले आहेत. काही विषयांवरची भाषणे छापली तर या वयात बाबांना कोर्टकचेऱ्या कराव्या लागतील. ही सर्व भाषणे गाळून सुद्धा बरीच उरलीत. त्यातली मला जी निरनिराळ्या कारणांनी आवडली ती येथे घेतली आहेत. माझे निवडीचे निकष योग्य की अयोग्य हा एक वादाचा विषय आहे.
ठराव: या सभेच्या मते स्त्रीचे अर्थार्जन कुटुंबव्यवस्थेला घातक आहे
अध्यक्ष महाराज, उपस्थित सज्जन आणि माझ्या बंधुभगिनींनो!
'या सभेच्या मते स्त्रीचे अर्थार्जन कुटुंबव्यवस्थेला घातक आहे' असा आजचा ठराव आहे. मी प्रथमच आपणाला सांगून टाकतो की मी ठरावाचे समर्थन करण्याकरिता आपणासमोर उभा आहे. विसाव्या शतकाची साठी उलटून गेल्यानंतर माझ्यासारख्या विशीत पदार्पण करू पाहणाऱ्या विद्यार्थ्याने या ठरावाचे समर्थन करण्यास धजणे म्हणजे तथाकथित सामाजिक सुधारणेच्या समर्थकांना सर्पदंशासमानच भासमान होणार आहे. आजचा जमानाच असा आहे की लग्नकर्त्तव्य असलेला तरुण अर्थार्जन करीत असलेली वधु मिळाली तर फार बरे असे म्हणतांना आढळतो. पण बिचाऱ्याच्या ध्यानात येत नाही की विवाह करून जो गृहस्थाश्रम तो थाटू इच्छितो त्यालाच या मिळवत्या बायकोमुळे सुरुंग लागणार आहे. आपल्या बायकोच्या अर्थार्जनावर कुटुंबाचे पालनपोषण करू इच्छिणाऱ्यांच्या कर्तृत्वाचा धिक्कार असो! पुरुषाने अर्थार्जन करावे, बाहेरील व्याप सांभाळावा, आणि स्त्रीने अंतर्गत व्यवस्था पाहावी हीच आमची कुटुंबव्यवस्थेची आदर्श कल्पना होय. पुरुषांबरोबर स्त्रीहि अर्थार्जनाला घराबाहेर पडली की घराचे घरपणच घराबाहेर पडले म्हणावयाचे. नवविवाहित स्त्रीने पतीच्या चेहऱ्यावरील स्मितरोषादि भावरेषांकडे लक्ष देण्याऐवजी कोणत्यातरी ऑफिसातील ऑफिसरापुढे अजीजीच्या स्वरात खुशामत करावयाची ही कल्पनाच मोठी घृणास्पद वाटते. पुरुषाच्या बरोबरीने कुटुंबात स्त्रीहि अर्थार्जन करीत असली म्हणजे त्या कुटुंबातील साऱ्या सुखसमाधानाचे खोबरेच झाले म्हणून समजावे. पतिपत्नी दोघेहि कमावणारे असले म्हणजे जमेची बाजू दुपटीने वाढेल ही गोष्ट खरी असली तरी त्या प्रमाणात सुख आणि समाधान वाढेल असे नाही. पुरुष दिवसभर काम करून घरी आल्यावर बायकोच्या हातचा चहा मिळाला तर त्याचा श्रमपरिहार होतो हा अनुभव ज्या भाग्यवंत पुरुषांच्या बायका कमावत्या नसतील त्यांचा खात्रीचा असेल. याच्या उलट ज्यांची बायको अर्थार्जन करीत असेल ते दोघेहि ऑफिसातून आल्यावर हाय हुश्श करीत बसणार, आणि प्रत्येकाला असे वाटणार की आपण कमावते आहोत तेव्हा आपली वरवर झाली पाहिजे आणि परिणामतः दोघांच्याहि मनात असंतोष धुमसत राहणार हे उघड आहे. पुष्कळदा लोकांच्या तोंडून आपण असे ऐकतो की 'त्यांना काय कमी आहे हो? नवरा बायको दोघेहि कमावते आहेत.'. पण या वरपांगी ऐश्वर्याच्या पोटी असंतोषाचा सुप्त ज्वालामुखी सदासर्वकाळ धुमसत असतो आणि त्याचा केव्हा भडका उडेल याचा नेम नसतो.
कुटुंबव्यवस्थेत मुख्यतः तीन गोष्टी येतात. पहिली गोष्ट म्हणजे पतिपत्नीचे समाधान. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबियांची भोजनव्यवस्था आणि तिसरी म्हणजे शिशुसंगोपन. कमावत्या स्त्रीपुरुषांच्या बाबतीत समाधान यथातथाच असते हे प्रत्यक्ष ते देखील प्रामाणिकपणे नाकबूल करू शकणार नाहीत, आणि जर नाकबूल करतील तर मी असे म्हणेन की सत्य वस्तुस्थिति उघड बोलून दाखविण्याची लाज वाटत असल्यामुळेच ते तसे करताहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबियांची भोजनव्यवस्था. ज्या कुटुंबातील स्त्री अर्थार्जन करायला घराबाहेर जाते तेथे बाहेरचे डबेच खाण्याचा दुर्धर प्रसंग कुटुंबियांवर ओढवतो हे मी कशाला सांगावयास पाहिजे? कमावत्या स्त्रीला स्वयंपाक करून पतिराजांना जेऊ घालणे हे तीन कारणांनी जमत नाही. एकतर तिला बहुधा स्वयंपाक येत नाही, आणि यदाकदाचित येत असला तर वेळ नसतो, आणि समजा वेळ मिळालाच तर तिला ते Below standard वाटते. आणि मी म्हणतो कां म्हणून वाटू नये? पुरुषाच्या बरोबरीने ती पगार मिळवीत असता नवऱ्याला आयते जेवू घालणे म्हणजे मानसिक गुलामगिरीचेच द्योतक नव्हे काय? अर्थार्जनाच्या बाबतीत समता प्रस्थापित झाल्यानंतर घरातील काबाडकष्ट उपसणे तिला कमीपणाचे वाटले तर त्यात नवल ते काय? आणि घरातील कामे करावयाचीच झाली तर दोघांनीहि त्याचा समान वाटा उचलावा असेच तिला वाटणार. मी झाडझूड केली तर पतिराजांनी सडासारवण करावे, मी धुणे धुतले तर नवऱ्याने भांडी घासावी, मी मुले सांभाळली तर त्यांनी स्वयंपाक करावा, मी पाटपाणी केले तर त्यांनी उष्टी खरकटी काढावी अशी तिची साहजिकच अपेक्षा असणार. जोपर्यंत घराबाहेरची कामे पुरुषांची व घरातील कामे स्त्रीची अशी वाटणी होती तोपर्यंत ठीक होते. पण घराबाहेर पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून स्त्री अर्थार्जन करू लागल्यावर घरातहि त्यांनी हातात हात घालून कामे केली पाहिजेत हे ओघानेच आले आणि येथेच परस्परातील कुरबुरीला सुरुवात होते, आणि त्याचे पर्यवसान अखेरीस गृहविच्छेदात होते.
तिसरी गोष्ट म्हणजे शिशुसंगोपन. कमावती स्त्री बहुधा कुटुंबनियोजन आणि संततिनियमन यांची पुरस्कर्ती असते, नव्हे नोकरी सांभाळण्यासाठी व टिकविण्यासाठी तिला तसे करणे भाग पडते. पण निसर्ग ह्या साऱ्या मानवी प्रयत्नावर मात करतो आणि कधी कधी तर दामदुपटीने भरपाई करतो. मग मुलांच्या संगोपनाची अतिशय आबाळ होते. कारण ती बिचारी नोकरी सांभाळणार की मुले सांभाळणार? चूल आणि मूल हे मर्यादित क्षेत्र सांभाळण्यापुरती तिची कूपमंडूक वृत्ति राहिली नसून 'हे विश्वचि माझे घर' असा तिचा व्यापक दृष्टिकोन बनलेला असतो. तेव्हा बिचारी मुले कोणातरी दाईच्या अंगाखांद्यावर खेळतात झाले. अशा परिस्थितीत त्या बिचाऱ्यांना वळण ते काय लागणार? 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' यासारख्या श्रुतिस्मृतिपुराणोक्त म्हणी तर आता Out of date झाल्याच पण 'जिचे हाती पाळण्याची दोरी, तीच जगाते उद्धारी' यासारख्या शिवाजी, जिजाबाईच्या काळात सार्थकी ठरलेल्या ऐतिहासिक म्हणी देखील अर्थशून्य ठरल्या.
स्त्री अर्थार्जन करू लागल्यापासून कुटुंबव्यवस्थेला फार मोठा धक्का बसला आहे. अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतशी कुटुंबव्यवस्था मोडकळीस आल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित. 'कुटुंब ही नागरिक जीवनाची पाठशाळा आहे', 'कुटुंब हाच राष्ट्रजीवनाचा पाया आहे' ही आता नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील अर्थशून्य सुभाषितेच राहिली. कारण आता मुलाच्या जन्मापासून तो मृत्यूपर्यंत एकहि व्यवहार कुटुंबात होत नाही. मुलाचा जन्म होतो सुतिकागृहात किंवा दवाखान्यात, बालपण जाते बालमंदिरात, त्याचा पिंड पोसला जातो खाणावळीच्या डब्यावर, शिक्षण होते विद्यालयात अगर महाविद्यालयात, लग्न होते विवाहमंडळात किंवा कोर्टात, संसार थाटला जातो कुठल्यातरी सरकारी क्वार्टरमधे, आजारी पडल्यास घरच्या बायकोकडून त्याची शुश्रूशा होणे दुरापास्त, कारण ती पडली कमावती. तेव्हा त्याची रवानगी होते हॉस्पिटलात, आणि दुर्दैवाने मेलाच तर पोरांच्या किंवा नातेवाईकांच्या खांद्यावर न जाता कार्पोरेशनच्या शववाहक मोटारीतून स्मशानात त्याची रवानगी होते, आणि तेथून पूर्वकर्मानुसार स्वर्गात किंवा नरकात, जेथे जावयाचा असेल तेथे, तो जातो, आणि 'पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननि जठरे शयनं' हे रहाटगाडगे सुरु राहते. अशा परिस्थितीत, अध्यक्ष महाराज!, आपणच सांगा की कौटुंबिक संस्कार काय आणि कसे होणार? स्त्रियांचा ओढा नोकरी करण्याकडे व अर्थार्जन करण्याकडे असाच वाढत गेला आणि पुरुषहि त्यात मोठे भूषण मानू लागले तर कुटुंबसंस्थेचा विनाशकाल काही फार दूर नाही हे सांगावयाला काही कोणी वसंत लाडोबा म्हापणकर नकोत.
तेव्हा ही भयानक परिस्थिति टाळावयाची असेल तर स्त्रियांनी अर्थार्जन करण्यापासून स्वखुषीने परावृत्त झाले पाहिजे. पित्यांनी आपल्या मुलींना आणि पतींनी आपल्या पत्नींना अर्थार्जन करू देता उपयोगी नाही. एवढेच नाही तर नवऱ्या मुलांनी कमावत्या मुलींशी लग्न करण्यास साफ नकार दिला पाहिजे. आपण सुबुद्ध आहात. जास्त विस्ताराची गरज नाही. तेव्हा आजच्या ठरावाच्या बाजूनेच मते देऊन भावी आपत्ति टाळा एवढीच आपणाला विनंती आहे. विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता ठराव एवढ्या प्रचंड बहुमताने पास करा की त्यांच्या छातीत धडकीच भरेल.
३०-४० वर्षांपूर्वीचे हे भाषण. खपून गेले. आज असे बोलू गेले तर घरावर स्त्रीमुक्तीच्या प्रतिपादकांचा प्रचंड मोर्चा यायचा. त्याकाळी नोकरी करणाऱ्या स्त्रिया एका हाताच्या बोटावर, फारच फार तर बोटाच्या पेरांवर मोजण्याइतक्या असतील. त्यांनी समाजातील वरील विचारांना न जुमानता घराबाहेर पडलेले पाऊल मागे घेतले नाही आणि आज हा वादविवादाचा विषय कालबाह्य झाला.
वादविवादाकरिता लिहिलेले हे व अशी अनेक भाषणे बाबांची मते प्रतिपादितात असे समजून घेण्याचे कारण नाही. अमुक एक मत मांडायचे आहे असे ठरविल्यावर शब्दाचा असा काही जादूचा खेळ करायचा की समोरचा भाषणापूर्वी कोणत्याही मताचा असो, भाषणानंतर आपल्या बाजूने झालाच पाहिजे. ही करामत करणे बाबांच्या हातचा मळ होता.
ठराव: या सभेच्या मते कर्तृत्ववान पुरुषांना प्रापंचिक व आर्थिक जबाबदारीतून सर्वस्वी मुक्त करून ती जबाबदारी संबधित स्त्रियांनी घ््यावी
कालाय तस्मै नमः। कालाचा महिमा मोठा अगाध आहे. आज खरोखरच स्त्रियांना अशी प्रार्थना करण्याची वेळ आली आहे की बायांनो तुमचा नवरा, दीर किंवा भाऊ कर्तबगार असेल, कर्तृत्ववान असेल तर त्याची वाट रोखू नका, त्याची सारी शक्ति बायकापोरांच्या उदरनिर्वाहाची काळजी वाहण्यातच खर्च होऊ देऊ नका. कोणात साहित्य निर्माण करण्याची क्षमता असेल, कोणी शास्त्रज्ञ असेल, कोणी तंत्रज्ञ असेल, कोणी तत्त्वज्ञ असेल, कोणी कलाकार असेल, कोणी चित्रकार असेल, त्याच्या बुद्धीचा, कलेचा, प्रतिभेचा, कल्पनाशक्तीचा, तत्त्वज्ञानाचा राष्ट्राला, समाजाला फायदा मिळू द्या. प्रापंचिक व आर्थिक बंधनांनी त्याला जखडून टाकून त्याची कार्यशक्ति खच्ची करू नका. आज देश स्वतंत्र झालेला आहे. राजकीय स्वातंत्र्य आपणाला प्राप्त झाले आहे. सामाजिक स्वातंत्र्याचा मोठा टप्पा आपण गाठला आहे आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गाने आपण वाटचाल करीत आहोत. अशा परिस्थितीत राष्ट्राची सर्वांगीण व सर्वंकष प्रगति होण्याची आवश्यकता आहे. साहित्य, काव्य, नाट्य, कला, तत्त्वज्ञान, विज्ञान, अशी कितीतरी जीवनाची क्षेत्रे आपल्या कर्तृत्वाची वाट बघत आहेत. तेव्हा स्त्रियांनी आपल्या संबंधित पुरुषांतील कर्तृत्वाची बीजे ओळखून त्यांना अंकुरित, पल्लवित, प्रफुल्लित व सुफलित करण्याकरिता झटले पाहिजे. सुदैवाने आज स्त्रिया सुशिक्षित झाल्या आहेत नी होत अहेत? गल्लीबोळातून आज पदवीधर कुमारिका बाहेर पडत आहेत. त्यांची नियतीने कोणातरी होतकरू तरुणाशी गाठ पडणार. त्यांच्या सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा, तो तरुण जर यथातथाच असेल, त्याच्यात काही चमक नसेल, Spark नसेल, कौटुंबिक जीवनाचा भार वाहण्यातच जीवनाची सार्थकता मानण्याइतका तो अल्पसंतोषी असेल तर माझं काही म्हणण नाही. वाहू द्या बिचाऱ्याला प्रपंचाचा भार, कुटुंबाचा भार. सुख लाभेल तुम्हाला. प्रापंचिक व आर्थिक जबाबदारीची धुरा सांभाळण्याची तुम्हाला गरज नाही. पण तुमचा पति कर्तबगार असेल, कर्तृत्ववान असेल, तर तुमच्यावरची जबाबदारी अनेक पटींनी वाढणार आहे. प्रापंचिक व आर्थिक जबाबदारीतून त्याला सर्वस्वी मुक्त करून ती तुम्हाला स्वीकारावी लागेल. यात मोठी देशसेवा तुमच्या हातून घडणार आहे हे लक्षात असू द्या. पुरुषातील कार्यशक्तीला अनिर्बंध व अप्रतिहत वाव देण्याची जर तुम्ही दक्षता बाळगली, तर त्याच्या हातून जे कार्य घडेल त्यामुळे देशाच्या व समाजाच्या प्रगतीला हातभार लागेल, आणि प्रगतीच्या पुण्याचे वाटेकरी तुम्ही व्हाल.
स्त्रीला अर्धांगी म्हटले आहे. पतीचे अर्धे पुण्य पत्नीला आपोआप लाभते अशी आपल्याकडे जुनी कल्पना चालत आली आहे. त्यातील अंगभूत कल्पना हीच की पतीच्या कोणत्याहि पुण्यकृत्यात पत्नीची साथ असते. तिच्या साहाय्याशिवाय तो लंगडा पडतो. यज्ञकर्माचे वेळी सुद्धा यजमानाने पत्नीसमवेत यज्ञाचे कंकण बांधावयाचे असते. प्रभु रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञाचे वेळी सीतेची प्रतिमा केली होती हे लक्षात असू द्या. पत्नीला पतीची सहधर्मचारिणी असे म्हटले आहे. पतीच्या प्रत्येक कार्यात त्याला यश मिळण्यासाठी पत्नीला जीवाच्या जपणुकीने जपावे लागते. जी जी मोठी माणसे होऊन गेली, ज्यांची नावे जगाच्या इतिहासात अजरामर झाली, ज्यांची कीर्तिपताका त्रिखंडात फडकली अशांच्या चरित्राचे आलोकन केल्यास असेच दिसून येईल की त्यांच्या संबंधित स्त्रियांनी साऱ्या जीवनभर देवघरातील नंदादीपाप्रमाणे आपल्या त्यागाची व स्नेहाची ज्योत अखंड तेवत ठेवली, त्रासाची तमा बाळगली नाही, प्रसिद्धीची पर्वा केली नाही की हौशीचा हव्यास धरला नाही. एकनाथांच्या पारमार्थिक जीवनाच्या यशाचे बरेचसे श्रेय त्यांच्या साध्वी सहधर्मचारिणीला आहे हे विसरून कसे चालेल? शिवाजीच्या यशाचे मूल्यमापन करतांना जिजाबाईचा विसर कोणाला पडेल? महात्माजींच्या धवल कीर्तीचे यशोगान गातांना बांची स्नेहार्द्र पण धीरगंभीर मूर्ति डोळ्यासमोर आल्याशिवाय कशी राहील? प्रभू रामचंद्रांचे सारे रामायणच सीतादेवीच्या त्यागावर उभारले आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. पांडवांच्या पराक्रमाला मानिनी द्रौपदीच्या अश्रूंनी धार चढली हे विसरू नका. तुम्ही म्हणाल की तुकारामाची जिजाऊ त्याला शिव्या देत होती. अहो नाही. ती तुकारामाच्या देवाला म्हणजे पांडुरंगाला शिव्या देत होती पण तुकारामाला देव मानत होती. तुकाराम शेजारच्या डोंगरावर अनेक दिवस तपश्वर्या करीत बसला असता तीच त्याला अन्नपाणी नेऊन देत होती. नवरा देवध्यानी लागला असताना तिला पोराबाळांचा व प्रपंचाचा भार सांभाळतांना किती यातना होत असतील, किती खस्ता खाव्या लागत असतील याची कल्पना करा म्हणजे तिच्या तोंडातून कोठे एखादा अधिकउणा शब्द निघाल्याबद्दल तुम्ही तिला दोष देणार नाही. तुकोबांनी शेतकऱ्याकडून मिळालेले ऊस वाटेत भेटलेल्या पोरांना वाटून दिले. घरी एकहि ऊस आणला नाही. त्या माऊलीच्या मायाळू जीवाला किती यातना झाल्या असतील याची कल्पना करा. तुकारामाच्या संतत्वाची थोरवी आपण सारे गातो आणि त्याची पत्नी जिजाबाईला कजाग ठरवितो. यात तिच्यावर अन्याय होतो आहे असे माझे म्हणणे आहे. तुकारामानी तिची योग्यता ओळखली होती. ते तिला आपल्याबरोबर सदेह वैकुंठाला न्यावयाला तयार होते. पण तिचे वैकुंठ पृथ्वितलावरच होते ही गोष्ट निराळी! तेव्हा पोरींनो! आपल्या जीवनाचा साथीदार निवडतांना खबरदारी घ््या, काळजी घ््या. आपल्या वडिलधाऱ्या मंडळींना तशी दक्षता घ््यायला सुचवा. तुमच्या जीवनातील साथीदार चारचौघांसारखा यथातथा कर्तृत्वाचा असेल तर तो बाजारहाट बरोबर करील, मुलाकरिता बाबागाडी आणील, चार दागिने तुमच्या अंगावर घालील, अधूनमधून तुम्हाला सिनेमा नाटकाला घेऊन जाईल. कधी एखादी लांबची सफर काढील. सुख लाभेल तुम्हाला, तुमच्या हौशी फिटतील. पण जर का तुमच्या भाग्याने म्हणा की दुर्भाग्याने म्हणा, तुम्हाला एखादा असामान्य कर्तृत्वाचा पति लाभला तर तुमची जबाबदारी कितीतरी पटींनी वाढेल. तुम्हाला त्याग करावा लागेल, हौस मारावी लागेल, संयम पाळावा लागेल, विवेक राखावा लागेल. असे तुम्ही करणार नाही तर संसारात कुरबुरीचे प्रसंग निर्माण होतील, चार कडू शब्दांची देवाणघेवाण होईल, अधूनमधून भांडणे होतील, खटके उडतील व तुम्ही परस्परापासून मनाने दूर दूर जाल. तेव्हा हे टाळावयाचे असेल, संसारात स्वारस्य आणि सौहार्द निर्माण करावयाचे असेल तर नवऱ्यातील कर्तृत्वाचे स्फुल्लिंग किती तेजस्वी आहे हे बरोबर हेरून त्या प्रमाणात त्याला प्रापंचिक व आर्थिक जबाबदारीतून मुक्त करण्यातच शहाणपणा आहे, औचित्य आहे, दूरदृष्टि आहे. आणि हे कार्य आजकालच्या सुशिक्षित मुली मनावर घेतल्यास फार उत्तम रीतीने करू शकतात. नाहीतरी त्यांना पूर्वीच्या स्त्रियांप्रमाणे घराच्या चार भिंताडांच्या आत कोंडून राहणे आवडत नाही; चूल आणि मूल एवढ्यापुरतेच त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित राहिले नाही; फॅशनकरिता का होईना समाजकार्य त्यांना करावेसे वाटते; हातात नाजूक पर्स घेऊन बाजार करण्यात त्यांना मौज वाटते; ऑफिसात नोकरी करण्यात त्यांना आर्थिक स्वातंत्र्याचा प्रत्यय येतो. असे जर आहे तर अलीकडे स्वाभाविक होऊ पाहणाऱ्या या प्रवृत्तीलाच थोडी कलाटणी देऊन व मुरड घालून मी असे म्हणेन की स्त्रियांनी कर्तृत्ववान पुरुषांना प्रापंचिक व आर्थिक जवाबदारीतून सर्वस्वी मुक्त करून ती जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली पाहिजे.
परंतु आज आपणाला काय दिसते? स्त्रिया नोकरी करताना दिसतात. नाही असे नाही. पण त्यांच्या पगाराचा बव्हंश भाग घरी बाई व दाई ठेवण्यात, मोलकरीण व पोऱ्या ठेवण्यात, साड्या व स्नो, पावडर, तेले व साबण याकरिताच खर्ची पडतो. आपण नोकरी करून द्रव्यार्जन करतो तेव्हा आपण चैन कां करू नये अशी सुखासीन वृत्ती त्यांच्यात बळावत आहे. आपण द्रव्यार्जन करतो हा अहंगंड त्यांच्यात निर्माण होतो व क्षुल्लक गोष्टीवरून कुरबुरी निर्माण होतात. आमच्या विरोधकांनी स्वतःच्या कौटुंबिक जीवनाचे थोडेसे जरी परीक्षण केले तरी त्यांना ते दिसून येईल. पण त्यांचा खाक्याच काही और दिसतो. केवळ विरोधाकरिता विरोध हाच त्यांचा बाणा दिसतो. मुद्दाम वेड पांघरून पेडगावला जाण्यातच त्यांचे वाक्पटुत्व खर्ची पडलेले दिसते. एरवी सूर्यप्रकाशाइतक्या स्वयंसिद्ध असणाऱ्या गोष्टीबद्दल त्यांनी इतके वादंग माजविले नसते आणि निव्वळ शाब्दिक कीस काढून इतका घोळ घातला नसता. आमच्या विरोधकांपैकी काही अपवाद सोडले तर बाकीचे बहुतेक जण कर्तृत्ववान आहेत हे मी कबूल करते. पण कोणत्याहि रास्त सूचनेला विनाकारणच विरोध करावयाचा असा त्यांचा हेकेखोर स्वभाव आहे. या आक्रस्ताळेपणामुळे खाजगी व सार्वजनिक जीवनात त्यांना किती त्रास होत असेल याच्या कल्पनेनेच मला त्यांची कीव करावीशी वाटते. आजचा ठराव जर त्यांनी मान्य केला तर त्यांच्या जीवनात कितीतरी सुलभता, सहजता, सुख आणि समाधान निर्माण होणार आहे. पण आयत्या चालून आलेल्या संधीचा फायदा न घेण्याचा नतद्रष्टपणा त्यांच्या इतक्या रोमारोमात भिनला आहे त्याला आम्ही तरी काय करणार? बाबांनो जरा विचार करा. देवाने तुम्हाला बुद्धि दिली आहे यात शंका नाही. ब्रह्मदेवाने जेव्हा अकलेचे वाटप केले तेव्हा तुम्ही खास गैरहजर नव्हता. तेव्हा आजचा ठराव पास करा व प्रापंचिक व आर्थिक जबाबदारीतून मोकळे व्हा कसे! देशकार्य व समाजकार्य तुम्हाला आतापेक्षा कितीतरी अधिक जोमाने करता येईल. घराची वीतभर कारा तुमच्या जीवनाचा सारा कोंडमारा करू शकणार नाही. प्रेस्टिजचा प्रश्न मनातून काढून टाका. खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नका आणि आपले मनपरिवर्तन झाल्याची या जनताजनार्दनासमोर चक्क कबुली देऊन सुखाचे धनी व्हा. मी तुम्हाला प्रेमभराने ही सूचना करीत आहे. स्वीकाराल तरी बरे, न स्वीकाराल तरी बरे. असो.
प्रापंचिक व आर्थिक जबावदाऱ्यांपायी अनेक कर्तृत्ववान पुरुषांच्या गुणांचे मातेरे व पोतेरे झालेले आपण पाहतो. एखादा गणितज्ञ बाजारच्या जमाखर्चाच्या बेरजा करतांना दिसतो. एखादा प्रख्यात वैज्ञानिक व्हायचा, रासायनिक प्रयोगशाळेत त्यानी प्रयोग करावयाचे, ते सारे बाजूला राहून प्रपंचाच्या प्रयोगशाळेत अपयशी प्रयोग करण्यात त्याला आपले आयुष्य खर्ची घालावे लागते. भावी नाटककाराच्या जीवनाचे नाटक होते. कवीच्या जीवनातील काव्य ओसरून जाते. कलाकाराची कला खुरटून जाते, आणि लेखकावर स्वतःच्याच जीवनाचा मृत्युलेख लिहिण्याची पाळी येते. प्रपंचाचा भार वाहून वाहून बिचाऱ्याचे पोट पाठीस लागते व कंबर खचते. कर्तृत्वाचे सारे अंकुर मुळातच खुरटून जातात. तेव्हा बायांनो, पोरांनो, मातांनो, भगिनींनो! आजचा ठराव तुम्हाला पदर पसरून मागणी करीत आहे. ती मान्य करा व राष्ट्राचा व समाजाचा दुवा घ््या.
ठराव (Resolution): Hearth and home is the place for the women and the growing tendency on their part to claim equality with men in public life should be curbed.
I am here to support the resolution. It would sound strange to many that a young college student like me and that too in 1960 expresses the so called orthodox views on the subject. Apostles of equality will frown on me and condemn me of holding rotten views of bygone ages when I say that the hearth and home is the proper place for women. But I must say what my conscience tells me. Hearth and home is the only place for the women, no doubt about it. If a family is to remain a family, woman must bear the responsibility of hearth and home. Nature itself has differentiated woman from man. Potentialities of man and woman necessarily differ. Physical and mental constitution of two sexes differ, and so our ancient sociologists entrusted the household duties to the woman and limited the outer activities to the man. Times have changed, pattern of society has changed, old ideas and notions are fast disappearing, but 'hearth and home is the place of woman' is the universal truth. It cannot be shattered by the tides of new reforms.
Today's children are the pillars of tomorrow's society and it is needless to say that they will turn out to be good citizens, only if they are properly nursed and cultured by their mothers. And how will this important task be well performed by them? President Sir, it is as clear as daylight that unless women's activities are mainly confined to hearth and home, this important task will be neglected. If women divert their energies and attention to public life and claim equality with men in outer fields, it will be detrimental, nay suicidal, to all that is good and healthy in Indian culture. There is a growing tendency on the part of women to claim equality with men in public life. Men also encourage it in the name of equality and freedom. Women seem to have entered all public fields. Ladies have become teachers, professors, doctors, pleaders, police officers, and what not? My head dwindles when I notice all this. I begin to think that our society is standing on a huge precipice facing towards to deep valley of destruction. If this detrimental tendency on the part of women is not checked in time, we will have to suffer its bitter consequences. The magnificent structure that Hindu civilization has built up through ages will smash to the ground if this tendency is allowed to grow. 'A hand that rocks the cradle, rules the world' - a very valuable truth is concealed in this proverb. But today's woman seeks to leave the cradle and trod in the saddle or in the peddle and is thereby creating a riddle before the whole society. If we have to keep up the social equilibrium, all these vicious tendencies should be ruthlessly curbed.
Western countries like America and England have now come to realise their folly in giving equality to women, and we Indians are now foolishly trodding over the same path of destruction. Instead of taking clue from their experience, we are blindly following their footsteps, which they themselves declare, led to social chaos.
When man and woman both go out for office work, home is totally neglected. Home is converted into hotel. All tender feelings in a couple's life are curbed, the whole sanctity is sacrificed and the husband and wife remain no more than bed-companions. Children in the family are naturally deprived of good impressions which are very valuable in character building in tender age. If one peeps into the inner atmosphere of such, so called, 'advanced families', one would notice utter dissatisfaction haunting everywhere. They gain more money, but sacrifice satisfaction at its cost. And, President Sir!, money is not everything. Money is only a means to an end. Money makes the mare go but, President Sir, wise man should see where the mare is going. Man doesn't live by bread alone. 'Eat, drink and be merry' is not the goal of Aryan civilization. Our whole civilization is based on sacrifice; sacrifice of minor things for the major ones, sacrifice of less important things for the more important ones. Money is a minor thing in the eyes of our culture. Sensual pleasure is worthless. Elevation of the soul is more valuable. Modern western civilization has turned its back towards the spiritual side. So it is my earnest request to my sisters and mothers to keep their eyes wide open and put their energies to keep up the sanctity and sacredness of hearth and home, and give up the mad craving for equality with men in public life. And if they turn a deaf ear to my request, I request my men colleagues to endevour their utmost to curb those tendencies which are likely to prove a great menace to our whole civilization which we have built up by sacrifice and protected by bloodshed. It is my humble and earnest request to all of you to pass the resolution unanimously. Mind well! Vote in favour of the resolution is a vote in favour of Aryan Civilization and culture. Jai Hind!
शालेय वा महाविद्यालयीन स्पर्धा असल्यामुळे विद्यार्थ्यांशी व विद्यार्थी जीवनाशी निगडित विषय ओघानेच आले. समाजाच्या ह्या महत्त्वाच्या वर्गावर बरेच आरोप, व या वर्गाद्वारे प्रत्यारोप चिरकालीन आहेत. काही अशी भाषणे नमुन्यादाखल घेतली आहेत. ही भाषणेही चिरकालीन आहेत.
ठराव : या सभेच्या मते आम्हाला सध्या देण्यात येणारे शिक्षण कुचकामाचे आहे. ते आमची काहीच उन्नति करू शकत नाही.
आजच्या सभेपुढील वादविवादाचा विषय 'आम्हाला सध्या देण्यात येणारे शिक्षण कुचकामाचे आहे. ते आमची काहीच उन्नति करू शकत नाही.' असा आहे. मी आपणाला प्रथमच सांगून टाकतो की मी या ठरावाला विरोध करणार आहे. कसून विरोध करणार आहे. म्हणे सध्याचे शिक्षण कुचकामाचे आहे! शिक्षण कुचकामाचे आहे की ज्यांना ते कुचकामाचे वाटते ते स्वतःच कुचकामाचे आहेत; हाच मुळी वादाचा प्रश्न आहे. समर्थकांच्या आपली बाजू मांडण्याच्या तऱ्हेवाईकपणावरून मला तर दुसराच पर्याय यथार्थ वाटतो. किती पोकळ, अर्थशून्य आणि भरमसाट विधाने केलीत त्यांनी! त्यांची त्यांनाच ती पटत होती की नाही ईश्वर जाणे! की जाणून बुजून वेड पांघरून पेडगावला जाण्याचा तो प्रकार होता ते न कळे.
'यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम्' असे एक संस्कृत सुभाषित आहे. कितीहि शास्त्रे पढविली किंवा कितीहि शिक्षण दिले तरी ज्याला स्वतःची प्रज्ञा किंवा शहाणपण नाही त्याला शिक्षण काय करणार? अशा लोकांना आधुनिक शिक्षण कुचकामाचेच वाटणार आणि त्यामुळे त्यांची उन्नतिहि होणे शक्य नाही. अशा प्रज्ञाशून्य लोकांशी सामना घेण्याचा प्रसंग माझ्यावर आला आहे. आल्या प्रसंगाला तोंड देणे भाग आहे.
ब्रिटिश आमदानीत देण्यात येणारे शिक्षण कुचकामाचे होते, त्यामुळे आमची काहीच उन्नति होऊ शकली नाही, असे मत प्रतिपादन केले असते तर ते समजण्याजोगे होते. पण सध्या देण्यात येणारे शिक्षण कुचकामाचे आहे व ते आमची काहीच उन्नति करू शकत नाही हे मत कोणाहि सूज्ञ माणसाला पटण्यासारखे नाही.
लॉर्ड मेकॉलेने ब्रिटिश राजवटीला लागणारे कारकून पैदा करण्याकरिता जी इंग्रजी शिक्षणपद्धति हिंदुस्थानात सुरू केली, तिच्यात आणि आजच्या शिक्षण पद्धतीत महदंतर आहे. पहिला महत्त्वाचा फरक म्हणजे पूर्वीचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून देण्यात येत होते. आता शाळेतीलच काय पण महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा मातृभाषेतून देण्यात येते. हा फार महत्त्वाचा आणि मूलगामी भेद आहे. इंग्रजीतून देण्यात येणाऱ्या शिक्षणाने हिंदी शरीरात इंग्रजी मते तयार होत होती. स्वदेशाभिमान आणि स्वभाषाभिमान नष्ट होत होता. हे घातुक परिणाम मातृभाषेतून देण्यात येणाऱ्या शिक्षणाने थांबले आहेत.
दुसरा महत्त्वाचा फरक जो सध्याच्या शिक्षणात आपल्या डोळ्यात प्रामुख्याने भरतो, तो हा की सध्या धंदेशिक्षणाला प्राधान्य मिळत आहे. हँडिक्राफ्ट, पॉलिटेक्निक, एंजिनिअरिंग, बायोकेमिस्ट्री, टेक्नाॅलॉजी, फार्मसी, खाणकाम, धातुकाम इत्यादि नाना तऱ्हेचे शिक्षणक्रम सध्या अस्तित्वात येत आहेत आणि त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. नवीन शालेय अभ्यासक्रमात हस्तकला हा आवश्यक विषय करण्यात आला आहे. यावरून हेच दिसून येते की स्वातंत्र्याच्या आगमनाबरोबर शिक्षणपद्धतीत मूलगामी फरक घडून येत आहेत, आणि तेहि फार शीघ्र गतीने. ब्रिटिश आमदानीतील शिक्षण घेतलेला विद्यार्थी कारकुनी पेशालाच काय तो लायक होता. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची कुवत त्याच्यात नव्हती. ही स्थिति आता बरीचशी पालटली आहे, आणि थोड्या कालावधीनंतर पूर्णपणे पालटेल असा विश्वास वाटतो.
सध्याच्या शिक्षणात तिसरा फरक म्हणजे शारीरिक शिक्षणाला प्राधान्य देण्यात येते. विद्यार्थी केवळ पुस्तकातला किडा न राहता त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, आणि या दृष्टीने शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर गोष्टींनाहि उत्तेजन देण्यात येते. वक्तृत्व, निबंध लेखन, पाठांतर, संगीत, नाट्य, सहल, एन. सी. सी., एअरविंग, वाड्मयमंडळे, संशोधन समित्या, शारीरिक खेळ, इत्यादि नाना कार्यक्रम पुस्तकी ज्ञानाबरोबरच शाळाकॉलेजांतून घेण्यात येतात. आणि यामुळे विद्यार्थ्यांची वाढ एकांगी न होता ती सर्वांगीण होते. अभ्यासक्रमात शेकडा २० गुण या अवांतर विषयांकरिता राखून ठेवण्यात आले आहेत, ही स्वागतार्ह व अभिनंदनीय गोष्ट आहे.
सध्याच्या शिक्षणपद्धतीतील इष्ट गोष्ट ही की विद्यार्थ्याला आपल्या कलाप्रमाणे व आवडीप्रमाणे विषयांची निवड करता येते. नाना तऱ्हेचे विषय आणि त्यांचे संच असल्यामुळे आपल्या आवडीनुसार, कलानुसार व योग्यतेनुसार विषय निवडता येतात. पूर्वीच्या शिक्षणपद्धतीत अशी बाब जवळजवळ मुळीच नव्हती म्हटले तरी चालेल. त्यामुळे तेव्हा गणितात अजिबात डोके न चालणाऱ्या विद्यार्थ्यालाहि गणिताच्या रूक्ष दगडावर आपले डोके फोडून घेतल्याखेरीज गत्यंतर नव्हते. विद्यार्थ्यांच्या स्वाभाविक कलाकडे तेव्हा पूर्ण दुर्लक्ष होत होते, आणि Square pegs in a round hole अशी चौकोनी खुंट्यासारखी स्थिति होत होती. ती स्थिति आता पालटली आहे हे आमचे सुदैवच म्हटले पाहिजे.
नव्याने सुरू झालेल्या अभ्यासक्रमात आणखी एक गोष्ट दिसून येते. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला विद्यार्थी हा भोवतालच्या घडामोडीशी, शास्त्रीय जगाशी आणि जीवनविषयक प्रश्नाशी सुपरिचित असला पाहिजे हा हेतू या शिक्षणपद्धतीच्या मुळाशी दिसून येतो, आणि याच दृष्टीने जनरल सायन्स आणि सोशल स्टडीज हे आवश्यक विषय करण्यात आले आहेत. सध्याच्या शिक्षण पद्धतीचा भर विद्यार्थ्याला एकाच विषयात विद्वान करण्यापेक्षा त्याला अनेक विषयांचे आवश्यक ज्ञान करून देण्यावर आहे, आणि ते सध्याच्या परिस्थितीत इष्टहि आहे.
सध्याच्या शिक्षणात इंग्रजीचे पूर्वीचे महत्त्व नाहीसे होऊन इंग्रजीचे आठवड्यातील ११ तास आता पाचावर आले आहेत. मराठी व हिंदी हे विषय आवश्यक करण्यात आले आहेत. हा तर अतिशयच स्तुत्य असा बदल आहे. असे आणखी कितीतरी इष्ट बदल सांगता येतील. पण वेळेच्या अभावी त्या सर्वांची मोजदाद करणे कठिण आहे.
अशा रीतीने सध्याच्या शिक्षण पद्धतीत झपाट्याने सुधारणा घडून आली असतांना देखील त्या शिक्षणाने आमची काहीच उन्नति होत नाही म्हणून ते कुचकामाचे आहे असे म्हणणे मोठे धार्ष्ट्याचे आहे.
आपणासारख्या सुज्ञ श्रोत्यांना जास्त सांगण्याची गरज नाही. ठरावाच्या विरोधकांनी कितीहि आकांडतांडव केले आणि कितीहि पोकळ शब्दावडंबर माजविले तरी अखेरीस ते अरण्यरुदनच ठरणार आहे यात मला तिळमात्र संदेह नाही. सध्याचे शिक्षण हे अतिशय हितावह आहे हे सगळ्यांना कळून चुकले आहे. मग कशाला जीवाचा आटापिटा करता? शिक्षणसुधारणेचा प्रवाह भरवेगाने वाहत आहे. त्यात तुमचा विरोध कोठल्या कोठे वाहून जाईल. धावत्या प्रवाहाला बांध घालण्याचा प्रयत्न कराल तर बांध मात्र वाहून जाईल व प्रवाह दुप्पट वेगाने मार्ग काढील. तेव्हा वेळीच सावध होऊन ठराव मागे घेण्यातच शहाणपणा आहे. पण बहुधा हे लोक ठराव मागे घेणार नाहीत. तेव्हा माझी सर्व श्रोत्यांना अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी ठराव इतक्या प्रचंड बहुमताने फेटाळून लावावा की समर्थकांच्या छातीत धडकीच भरेल.
ठराव : या सभेच्या मते आजचे विद्यार्थी बेजबाबदार आहेत
आजचे विद्यार्थी बेजबाबदार आहेत हा आजच्या सभेसमोरील ठराव आहे आणि त्याचे समर्थन मी करणार आहे. असे पुष्कळदा म्हणण्यात येते की विद्यार्थी वर्गात आज जो शिस्तीचा अभाव दिसून येतो त्याला विद्यार्थी कारणीभूत नसून भोवतालची परिस्थिति कारणीभूत आहे. अजब जावईशोध आहे बुवा! शिस्तीचा अभाव दिसून येतो विद्यार्थ्यांत आणि म्हणे त्याला विद्यार्थी जबाबदार नाहीत. टारगट कृत्य करावयाची विद्यार्थ्यांनी आणि त्याचे खापर फोडावयाचे भोवतालच्या परिस्थितीच्या माथ्यावर! आपल्या वात्रट चाळ्यावर आणि बेशिस्त वर्तनावर परिस्थितीचा बुरखा पांघरणारे हे विद्यार्थी पाहिले म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ही म्हण मराठी भाषेत कशी रूढ झाली असेल याचे संशोधन करण्याचे कारणच उरत नाही. परिस्थितीवर साऱ्या दोषांचे खापर फोडून आपण स्वतः नामानिराळे होऊ पाहणाऱ्या या विद्यार्थी वर्गाकडे पाहून हसावे की रडावे हेच समजत नाही. तरुण मुली खोखो खेळतांना पाहिल्या की ज्यांच्या मनावरचा ताबा सुटून त्यांच्या साडया पळविण्यापर्यंत ज्यांची मजल जाते, पंचांनी दिलेला निर्णय मान्य नसला म्हणून त्यांच्यावर हल्ला करावयालाहि जे मागे पुढे पाहत नाहीत, युवकमहोत्सवानिमित्त दहा दिवस कॉलेजे बंद केली नाहीत म्हणून जे स्वतःच्या हाती कायदा घेऊन दगडफेक करीत सुटतात, ते विद्यार्थी म्हणे ह्या राष्ट्राचे आधारस्तंभ होणार! विद्यार्थ्यांच्या ह्या प्रत्यहि वाढत चाललेल्या मर्कटचेष्टा पाहिल्या म्हणजे त्यांची पिढी जेव्हा कर्ती-सवरती होईल तेव्हाचे भीषण चित्र डोळ्यासमोर उभे राहून मन निराशेने विषण्ण होते. विद्यार्थ्यांच्या सार्वत्रिक बेशिस्तीचे जे नमुने मी आताच आपणासमोर वानगीदाखल मांडले त्यांना भोवतालची कोणती परिस्थिती कारणीभूत झाली बरे? विद्यार्थ्यांच्या या बेजबाबदार वर्तनाला विद्यार्थीच स्वतः जबाबदार आहेत असे मला म्हणावयाचे आहे. उपरणे झटकल्याने काही अंगी चिकटलेले दोष झटकल्या जात नसतात. अंगी असलेले दोष नाहीसे करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर ते दोष पदरात घेतले पाहिजेत. त्यांची जबाबदारी मोकळ्या मनाने स्वीकारली पाहिजे. हातून घडलेल्या चुकांबद्दल खराखुरा पश्चात्ताप होऊन त्या पुन्हा होऊ न देण्याचा दृढनिश्चय अंगी बाणला पाहिजे. हाच संभाविताचा खराखुरा मार्ग होय. वाटेल तसे बेशिस्त वर्तन करून बेडरपणाने, नव्हे बेरडपणाने, परिस्थितीच्या नावाने खडे फोडणाऱ्या आजच्या विद्यार्थ्यांकडे पाहिले म्हणजे संभावित या शब्दात जो अर्थ अभिप्रेत आहे त्याचा यांचे ठिकाणी मागमूसहि नाही असे म्हणावेसे वाटते. तोंडाने सिगारेटचा धूर सोडीत, पानाच्या ठेल्यासमोर घोळक्याघोळक्यांनी उभे राहत असलेले आणि चौरस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे पाहून अचकट विचकट प्रलाप बाहेर काढीत रहदारीला अडथळा उत्पन्न करणारे, किंवा चित्रपटगृहासमोर दंगल माजविणारे विद्यार्थ्यांचे थवे पाहिले म्हणजे हेच का आमच्या राष्ट्राचे आधारस्तंभ, हा विचार मनात येऊन चित्त चरकल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थी हा केवळ शाळेच्या किंवा कॉलेजच्या आवारातच विद्यार्थी असतो, आणि एकदा का त्या आवाराच्या बाहेर पाऊल टाकले म्हणजे त्याला वाटेल तसे वागण्यास सदर परवाना असतो असे थोडेच आहे? शाळेच्या किंवा कॉलेजच्या बाहेरील त्याचे वर्तनहि विद्यार्थ्याला साजेसेच असले पाहिजे. विद्यार्थी हा घरी, शाळेत, क्रीडांगणावर, रस्त्यावर, सभेत, सामाजिक उत्सवात, चित्रपटगृहात आणि प्रदर्शनात विद्यार्थीच असला पाहिजे. आणि त्याचे वर्तन कोठेहि विद्यार्थ्याला न शोभणारे असता कामा नये.
आणि शाळाकॉलेजात तरी कोठे विद्यार्थ्यांचे वर्तन शिस्तीला धरून असते? त्यांचे सगळेच ताळतंत्र सुटलेले दिसते. ते बंधनाच्या पलीकडे गेल्यासारखे दिसतात. गुरुजनांविषयी आदर नाही, आईवडिलांशी किंवा वडीलधाऱ्या लोकांशी नम्रतेचे वर्तन नाही, वर्गात अभ्यासाकडे लक्ष नाही, तासाची वह्यापुस्तके जवळ नाहीत, घरापेक्षा घराबाहेरच खाण्यापिण्याचे प्रमाण जास्त, सभासंमेलनाच्या प्रसंगी त्यांच्या बेशिस्त वर्तनाला आलेली उधान भरती, फक्त प्रौढांकरिता असलेल्या बोलपटाचे वेळी बोलपटगृहे विद्यार्थ्यांनीच चिकार भरलेली, हे सारे प्रकार विद्यार्थ्यांच्या बेजबाबदार, बेछूट आणि अनिर्बंध वर्तनाचेच द्योतक नव्हेत काय? याला भोवतालची परिस्थिति मुळीच जबाबदार नसून विद्यार्थ्यांची बेछूट व बेजबाबदार वागणूकच सर्वस्वी जबाबदार आहे. परिस्थितीचे गुलाम होण्यात माणसाची कर्तबगारी नसून परिस्थितीवर मात करण्यातच खरे भूषण आहे. राज्यसत्ता हाती आलेली आणि आबाजी सोनदेवाने कल्याणच्या सुभेदाराची लावण्यवती सून नजराणा म्हणून उभी केलेली, अशा परिस्थितीत 'आमच्या माँसाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही देखील इतके सुंदर निपजलो असतो' असे उद्गार काढणाऱ्या शिवाजीचे वंशज, मुली खोखो खेळल्या ही परिस्थितीच आम्हाला साड्या पळविण्यास कारणीभूत झाली असे प्रलाप मुखावाटे काढण्यास धजतात ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. मोहाचे क्षण जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत संयमाची परीक्षाच होत नाही. मोहाची परिस्थिति समोर उभी ठाकली असतांना ज्याची वृत्ति अविचल राहते तोच संयमी. ज्या घटना, जी दृष्ये, जे वाङ्मय, जे प्रकार विद्यार्थ्यांच्या उच्छृंखल वर्तनाला कारणीभूत आहेत असे ठरावाचे विरोधक म्हणतात, त्यापासून विद्यार्थी अलिप्त कां राहत नाहीत? कोण त्यांना रोज सिनेमा पाहण्याचा आग्रह करतो? कोण त्यांना पानाच्या ठेल्यावर किंवा हॉटेलात हात धरून नेतो? गुरुजनांचा अनादर करा असे त्यांना कोण शिकवितो? परिस्थितीचे बुजगावणे पुढे करणे व्यर्थ आहे. विद्यार्थ्यांच्या बेशिस्त वर्तनाला भोवतालची परिस्थिति कारणीभूत नसून विद्यार्थीच कारणीभूत आहेत हेच खरे. तेव्हा येथे जमलेल्या सूज्ञ सभाजनांना माझी नम्र विनंति आहे की प्रस्तुत ठराव प्रचंड बहुमताने हाणून पाडून विरोधकांच्या तोंडावरील हा बुरखा फाडून टाका व त्यांचे खोटे माप त्यांच्याच घशात घाला.
ठराव : या सभेच्या मते हल्लीच्या विद्यार्थ्यांत जी गैरशिस्त दिसून येते, त्याला मुख्यतः आदर्श शिक्षक आणि आदर्श पालक यांचा अभाव कारणीभूत आहे.
मी आज आपणासमोर एका अत्यंत महत्त्वाच्या ठरावाचे समर्थन करण्याकरिता उभा आहे. 'हल्लीच्या विद्यार्थ्यांत जी गैरशिस्त दिसून येते, त्याला मुख्यतः आदर्श शिक्षक आणि आदर्श पालक यांचा अभाव कारणीभूत आहे.' असा तो ठराव आहे. मोठा औचित्यपूर्ण योगायोग आहे आजचा! आम्हा विद्यार्थ्यांची आमचे परमपूजनीय पालक आणि आदरणीय गुरुजन यांच्या विरुद्धची ही तक्रार नोंदविण्याकरिता आणि जगाच्या वेशीवर टांगण्याकरिता आम्हाला गणरायासारखी गणांची देवता न्यायाधीश म्हणून लाभली, हे आमचे मोठेच भाग्य समजले पाहिजे. गणपति ही हिंदुस्थानात अति प्राचीन काळी अस्तित्वात असलेल्या स्वतंत्र गणराज्यांची अधिष्ठात्री देवता आहे हे आता सिद्ध आणि सर्वमान्य झाले आहे. सुसूत्र गणराज्यांची देवता ही शिस्तीची भोक्त्री असणार हे उघडच आहे. तसेच गणपति ही विद्येची व बुद्धीची देवता आहे. तो सुखकर्ता, दुखहर्ता आणि सकलसिद्धीदाता आहे. तेव्हा तोच आम्हा गरीब विद्यार्थ्यांचे दुःख निवारण करून आम्हाला आमच्या अंगीकृत कार्यात यश प्रदान करील यात तिळमात्र संदेह नाही. विद्यार्थ्यांत हल्ली गैरशिस्त दिसून येते, यात तर शंकाच नाही. पण जो तो या गैरशिस्तीचे खापर उठल्यासुटल्या आमच्या डोक्यावर फोडतो. आमचा याला तीव्र विरोध आहे. आमचे म्हणणे असे की या सर्वाला जबाबदार आमचे शिक्षक आणि पालक आपल्या आदर्शापासून, आपल्या कर्त्तव्यापासून ढळले हेच आहे. प्रह्लादानेहि आपल्या पित्याच्या विरुद्धची तक्रार भगवंताकडेच केली की नाही? सर्वसाक्षी परमेश्वरावाचून दुसऱ्या कोणाकडे करणार? 'बापाने मारले, राजाने झोडले, पावसाने झोडपले तर तक्रार कोणाजवळ नेणार?' अशी मराठीत म्हण आहे. असो.
'Example is better than percept' म्हणतात. आम्हाला मारे शिस्तीचे, सदाचरणाचे, सत्यवृत्तीचे घोट पाजण्यात येतात, पण त्याचा उपयोग काय? घरी आमच्या हातून बालस्वभावानुसार एखादी चूक झाली तर आमचे आईवडील 'तुझ्या मास्तराने हेच शिकविले का?' असा आमच्या गुरुजींचा उद्धार करतात. शाळेत एखादा अपराध घडला तर आमचे शिक्षक आमच्या पालकांचा उद्धार करतात. अशा रीतीने विद्यार्थ्यांच्या गैरशिस्तीचे खापर दुसऱ्यावर फोडून प्रत्येकजण आपल्या जबाबदारीतून मोकळा होऊ पाहतो. त्यामुळे घरीहि शिस्त राहत नाही व शाळेतहि शिस्त राहत नाही.
जिकडे तिकडे सार्वत्रिक ओरड अशी की आजकालच्या विद्यार्थ्यांत शिस्त मुळीच नाही. मला आपण सांगा की शिस्त राहील कशी? शिस्त काय आभाळातून टपकते की माळावर पिकते, की बाजारात विकते? शिस्त म्हणजे नियमबद्ध वर्तन. उभे राहायचे असेल तर रांगेत उभे राहा, रस्त्याने चालतांना डाव्या बाजूने चाला, पद्धतशीरपणे बोला, पद्धतशीरपणे वागा, काय करायचे असेल ते विशिष्ट नियमानुसार करा, याला म्हणतात शिस्त. वर्षानुवर्षे यमनियमांचे आदर्श डोळ्यासमोर राहावेत, तेव्हा कोठे जीवनात शिस्त उतरते व अंगी बाणते. पूर्वीच्या विद्यार्थ्यांत शिस्त होती, त्यांच्या मनात गुरुजनांविषयी आदर होता, मातापित्यांविषयी व वडीलधाऱ्या लोकांविषयी पूज्यभाव होता व आजच तो सारा यक्षिणीची कांडी फिरल्याप्रमाणे कसा सुप्तप्राय झाला? आजच्या विद्यार्थीजगातील सर्वदूर पसरलेल्या गैरशिस्त जीवनाला काय अल्पवयी विद्यार्थी जबाबदार आहेत? आपण जरा खोल विचार करा. आपल्या बुद्धीची कपाटे उघडी ठेवून आणि एकंदर परिस्थितीचे विश्लेषण करून मग निर्णय घ््या. वरवरच्या परीक्षेने हल्लीच्या विद्यार्थ्यांतील गैरशिस्तीच्या गूढ रोगाचे निदान बरोबर होणार नाही, आणि चोर सोडून संन्याशालाच सुळी देण्याचा घोर अपराध आपल्या हातून होण्याचा दाट संभव आहे.
विद्यार्थ्यांची मने अपरिपक्व असतात. ओल्या मडक्याचा काठ जसा वाकवावा तसा वाकतो. तद्वतच बालविद्यार्थ्यांच्या मनावर जसे बरेवाईट संस्कार घडतील तसे त्यांचे जीवन बनत असते. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरातून एकप्रकारचे शिस्तबद्ध, यमनियमांनी युक्त असे संयमित जीवन विद्यार्थ्यांच्या नजरेस सदैव पडत असे. तसेच शाळेत देखील गुरुजनांचे आदर्श, त्यागपूर्ण, ध्येयवादी जीवन विद्यार्थ्यांच्या मनावर इष्ट ते संस्कार घडविल्यावाचून राहत नसे. लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळराव आगरकर, महाजनी यांच्यासारखे थोर, त्यागी, शीलसंपन्न शिक्षक आज आम्हाला औषधाला तरी दिसतात काय? हे तर मोठे लोक झाले. पण गेल्या एक दोन पिढ्यातील अनेक शिक्षक असे दाखविता येतील की जे सर्व दृष्टींनी सामान्य असून देखील ज्यांच्या जीवनात एक प्रकारची निष्ठा असे, आणि अनेक यमनियमांनी ज्यांचे जीवन सूत्रबद्ध असे. घरी दारी, आत बाहेर सर्वत्र असे निष्ठामय, श्रद्धापूर्ण आणि संयमित जीवनच दृष्टीस पडल्यावर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर आपोआपच होत असे. पण आज सारीच परिस्थिति पालटली आहे. निष्ठा ढासळली, श्रद्धा भग्न झाली, संयमाचाच संयम झाला, शीलाची शिला बनली आणि यमनियमांकडे पाठ फिरली. आपल्या मुलामुलींच्या बाबतीत त्यांची नावे शाळेत दाखल करण्याखेरीज आणखी काही आपली कर्त्तव्ये आहेत याची पालकांना दखल नाही. शाळेत एकदाचा मुलाला घातला की पालक जबाबदारीतून मोकळे. त्यांच्या आॅफिसात किती कारकून आहेत हे ते सांगू शकतील, पण आपली कोणती मुले कोणत्या वर्गात शिकत आहेत हे ते हमखास सांगू शकतीलच असे नाही. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांची जीवने ज्यांच्या खांद्यावर सोपविली त्या शिक्षकांना तरी आपले ४० मिनिटांचे तास येन केन प्रकारेण संपविण्याखेरीज विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपली काही विशेष जबाबदारी आहे असे मुळीच वाटत नाही. सर्वत्र स्वैराचार बोकाळला, 'मनःपूत समाचरेत्' हा जीवनाचा महामंत्र झाला, आणि शील व चारित्र्य ही घरी, शाळेत सर्वत्र सर्वात जास्त दुर्लक्षिलेली बाब झाली. शाळाकॉलेजात भाराभर विषय झालेत. आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी, राष्ट्रभाषा म्हणून हिंदी, मातृभाषा म्हणून मराठी, जनरल सायन्स, सोशल स्टडीज, थिअरी, प्रॅक्टिकल, एक ना दोन! नाना तऱ्हेची नाना सोंगे! मुलगा ऑलराउण्ड झाला पाहिजे ना! आणि तो सर्वच विषयात भोपळा किंवा आवळा मिळविण्याइतपत ऑलराउण्ड होतो यात मुळीच शंका नाही. आपला मुलगा किंवा विद्यार्थी वाचतो काय, पाहतो काय, खेळतो काय, काय खातो, काय पितो, कोणाच्या संगतीत राहतो, कुठे भटकतो, कुठे रमतो याकडे ना पालकांचे लक्ष, ना शिक्षकांचे! सर्वत्र औदासीन्य, सर्वत्र कर्तव्यशून्यता! एकंदरीत हल्लीच्या विद्यार्थ्यांत जी गैरशिस्त दिसून येते, त्याला मुख्यतः आदर्श शिक्षक आणि आदर्श पालक यांचा अभावच कारणीभूत आहे, असेच विचारांती म्हणावे लागेल. तेव्हा विरोधकांच्या पोकळ नी भोंगळ युक्तिवादाला न भाळता सारासार विचार करा, आणि ठराव प्रचंड बहुमताने मंजूर करून आमच्यातील गैरशिस्तीबद्दल आमच्यावर आग पाखडण्यात जो अन्याय होत आहे, तो दूर करण्याला हातभार लावा अशी आपणा सर्वाना आग्रहाची विनंती करून मी आपली रजा घेतो.
ठराव : या सभेच्या मते आजची तरुण पिढी समाजाच्या अपेक्षा पुऱ्या करण्यास समर्थ आहे
'आजची तरुण पिढी समाजाच्या अपेक्षा पुऱ्या करण्यास समर्थ आहे' असा आजच्या सभेपुढील ठराव आहे. आजची तरुण पिढी बहकली, बाटली, बिघडली असा आक्रोश प्रत्येक काळातील वृद्ध आजपावेतो करीत आले आहेत. पण समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आणि उत्तरदायित्व त्या त्या काळातील तरुण पिढीनेच स्वीकारले आहे, हेहि तितकेच खरे आहे. हे सत्य कोणाहि डोळस आणि पूर्वग्रहनिरपेक्ष निरीक्षकाला नाकारता येणार नाही. कोणतीहि तरुण पिढी ही आपल्या पूर्वपिढीच्या खांद्यावर बसून येत असते आणि तिच्या अनुभवाचा फायदा घेऊन स्वतःच्या बाहुबलाच्या आणि बुद्धिबलाच्या भरवशावर समाजाला प्रगतिपथावर अग्रेसर करण्यास कारणीभूत होत असते. रामराज्याचा आदर्श समाजापुढे ठेवणाऱ्या प्रभु रामचंद्राच्या तरुण पिढीने हेच केले. कंस जरासंधादि दुष्ट राजांच्या पाशवी सत्तेच्या कचाट्यातून समाजाला मुक्त करून युधिष्ठिराच्या धर्मराज्याची प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या श्रीकृष्णाच्या तरुण पिढीने हेच केले. मेवाडचा राणा प्रतापसिंह, हिंदुपदपातशाहीचा संस्थापक छत्रपति शिवाजी आणि सत्तावनचा सेनानी तात्या टोपे यांच्याहि तरुण पिढीने आपापल्या काळातील समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. धनवटे रंगमंदिराच्या सभागृहात सम्मीलित झालेल्या सुज्ञ सभाजनांनो! मला आपणाला नम्रपणाने पण आत्मविश्वासाने हेच सुचवायचे आहे की आजची आमची तरुण पिढी देखील समाजाच्या अपेक्षा पुऱ्या करण्यास समर्थ आहे.
आजच्या तरुण पिढीवर उठल्यासुटल्या ताशेरे झाडण्यास कित्येक महाभागांची जीभ सवकलेली दिसते. आजची तरुण पिढी अधार्मिक आहे, नास्तिक आहे, हे आरोप तर जुने झाले, अन् ते आमच्या अंगवळणीहि पण पडले. पण आजची तरुण पिढी बेशिस्त आहे, अनीतिमान आहे, असे एक ना दोन, हजार आरोप आजच्या तरुण पिढीवर प्रत्यही करण्यात येत आहेत. आजची तरुण पिढी समाजाच्या अपेक्षा पुऱ्या करू शकत नाही, आजच्या तरुण पिढीच्या हाती समाजाचे नेतृत्व आल्यास समाजाचे नी राष्ट्राचे भवितव्य काळेकुट्ट आहे, इत्यादि निरर्गल आरोप जुन्या पिढीतील कर्त्यासवरत्या नामवंत धुरीणांच्या तोंडून ऐकले म्हणजे जीवाचा कसा संताप-संताप होतो.
आजच्या ठरावाचे तीन भाग पडतात. आजची तरुण पिढी हा पहिला भाग, समाजाच्या अपेक्षा हा दुसरा भाग आणि तरुण पिढीचे त्या अपेक्षा पुऱ्या करण्याचे सामर्थ्य हा तिसरा भाग. आजची तरुण पिढी या शब्दसंगतीत भारतातील आजची तरुण पिढी हा अर्थ अभिप्रेत आहे हे उघड आहे, आणि समाजाच्या अपेक्षा म्हणजे भारतातील समकालीन समाजाच्या अपेक्षा असाच अर्थ घेणे क्रमप्राप्त आहे. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि १९५० साली सार्वभौम गणराज्याचे स्वरूप त्याला प्राप्त झाले. राजकीय दृष्ट्या हा बदल घडून आला असला तरी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाजाच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत असे मोठे खेदाने म्हणावे लागते. पोटभर अन्न, अंगभर वस्त्र आणि रहायला घर इतक्या आवश्यक गरजा देखील प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत भागविण्याइतकी स्वातंत्र्याची फळे जनतेच्या निदर्शनास आली नाहीत. मग मोफत शिक्षण, वैद्यकीय मदत इत्यादि गोष्टी तर दूरच राहिल्या. ब्रिटिशांच्या आमदानीत 'स्वराज्याची तहान सुराज्याने भागत नाही' असे आपले पुढारी लोकांना व सरकारलाहि आवर्जून सांगत होते. पण आज स्वराज्यप्राप्तीनंतर जनता पुढाऱ्यांना व सरकारला सांगू इच्छिते की 'सुराज्याशिवाय स्वराज्याची प्रतीति लोकांना येत नाही'. परचक्राची टांगती तलवार सतत डोक्यावर आहे. चीनचा भस्मासुर आणि पाकिस्तानचा बकासुर परस्परांशी हातमिळवणी करून भारतावर आपली गृध्रदृष्टी वळवीत आहेत, आणि आमचे वयोवृद्ध पुढारी मात्र कृष्णा-गोदेच्या पाण्यावर भांडणे करीत आहेत. जातिवाद, धर्मवाद याच्या जोडीला भाषावाद, प्रांतवाद यांची भूते राष्ट्रधर्माच्या मानगुटीस बसू पाहत आहेत. परचक्राच्या संभाव्यतेमुळे ह्या साऱ्या वादांची तीव्रता कमी होऊन ते तात्पुरते भूमिगत झाल्यासारखे दिसत असले तरी त्यांची आग आतल्या आत धुमसत आहे आणि ती डोके वर काढून महत्प्रयासाने उभारलेली एकराष्ट्रीयत्वाची भव्य इमारत जमीनदोस्त तर करणार नाही ना या अभद्र शंकेने मनाचा थरकाप झाल्याशिवाय राहत नाही.
या सर्व परिस्थितीचे सिंहावलोकन केल्यास आपणास असे दिसून येईल की समाजाच्या अपेक्षा आज फार वेगळ्या आहेत. समाजाला सध्याची ही कळसास पोहोचलेली जीवघेऊ महागाई नको आहे. अन्न, वस्त्र आणि घर यांची सुबत्ता हवी आहे. कोणत्याहि परराष्ट्राची आमच्या या प्रिय भारतभूकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही इतकी भारताची लष्करी तयारी आज समाजाला हवी आहे, आणि तीहि इंग्लंड, अमेरिका किंवा रशिया यांच्यापुढे भिक्षेची झोळी पसरून नव्हे तर स्वतःच्या पायावर उभे राहून. पंचशील, अनाक्रमण, तटस्थ परराष्ट्रीय धोरण, हिंदी चिनी भाई भाई असली आत्मवंचक खुळे उराशी बाळगून आमच्या वयोवृद्ध पुढाऱ्यांनी समाजाला आत्मनाशाच्या खाईत लोटले आहे. प्रांतोप्रांतीच्या मुख्यमंत्र्यांपैकी शेकडा ८० पेक्षा जास्त मुख्यमंत्री सत्तरीच्या घरात आहेत. या लोकांनी आपल्या तारुण्याच्या उमेदीच्या काळात फार मोठे देशकार्य केले आहे. त्याबद्दल त्यांच्या विषयी माझ्या मनात अतिशय आदर वसत आहे. पण या वैयक्तिक आदराच्या भावनेला मी व्यापक राष्ट्रहिताच्या आड येऊ देणार नाही. या जुन्या पिढीनेच समाजाचे हित साधणार नाही अशी माझी मनोनन खात्री आहे.
भाववाढ रोखण्याच्या वृथा वल्गना प्रांतोप्रांतीची सरकारे करीत आहेत आणि गरीब जनतेला पोकळ आश्वासने देत आहेत. पण एकहि योजना कार्यान्वित होतांना दिसत नाही. कोणत्याहि वस्तूचे भाव सरकारने निर्धारित केले किंवा तिच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध लादले की ती वस्तू बाजारातून गायब होऊन काळ्या बाजारात विकली जाते हा नित्याचा अनुभव आहे. लाचलुचपत तर इतकी बोकाळली आहे की भ्रष्टाचारविरोधी खाते सरकारला सुरू करावे लागले. पण त्या भ्रष्टाचारविरोधी खात्यातहि भ्रष्टाचार माजल्याच्या गोष्टी अधून मधून ऐकू येतात. दारूबंदीचा इतका गाजावाजा झाला, त्यावर पाण्यासारखा पैसा खर्च झाला. पण बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे मदिराप्राशन काही बंद पडले नाही. करांच्या ओझ्याखाली जनता दडपून गेली आहे. आणि वरून भूदान, संपत्तिदान, सुवर्णदान, अनिवार्य बचत योजना इत्यादि गोष्टी आहेतच. पावसाने झोडले नी राजाने मारले तर गाऱ्हाणे कुणाकडे नेणार? अशी जनतेची सध्या स्थिती झाली आहे. सरकारकृत समाजाच्या ससेहोलपटीने सहनशीलतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. समाज अत्यंत त्रस्त परिस्थितीत आहे. समाजाच्या या तीव्र असंतोषाला वाचा फोडून समाजाच्या अपेक्षा पुऱ्या करण्याचे कार्य अाजची तरुण पिढीच करू शकेल. समाजाला स्वातंत्र्याची फळे चाखायला आजची तरुण पिढीच देऊ शकेल.
काँग्रेसच्या अध्यक्षांनी अधिकारपदावर असलेल्या काँग्रेसवाल्यांनी आपल्या संपत्तीचे हिशेब द्यावेत अशी केलेली सूचना काय दर्शविते? आणि त्यांच्या सूचनेनुसार फक्त तिघांनी हिशेब दिले ही घटना तरी काय दर्शविते? काँग्रेसचे सेक्रेटरी तर असे म्हणाले की 'अशी अनेक उदाहरणे दाखवून देता येतील की जे काँग्रेसवाले अधिकारपदावर आरूढ होण्यापूर्वी दरिद्री होते ते अधिकारग्रहणानंतर थोड्याच काळात लक्षाधीश झाले'. त्यांच्या या विधानाने काँग्रेसच्या बैठकीत वादळ निर्माण झाले आणि त्यांनी हे विधान परत घ््यावे अशी काही जणांकडून मागणीहि करण्यात आली. शेवटी या विधानाची नोंद कागदोपत्री करू नये असे ठरले. पण त्याने काय होणार? म्हातारीने कोंबडा झाकला तरी सूर्योदय व्हायचा थोडाच राहणार? मद्रासचे मुख्यमंत्री कामराज नादर यांची केंद्रीय व प्रांतीय ज्येष्ठ मंत्र्यांनी राजीनामे देऊन स्वतःला काँग्रेस संघटनेच्या कार्याला वाहून घ््यावे ही सूचनाहि वस्तुस्थितीवर विदारक प्रकाश टाकणारी आहे. ह्या सर्व घटना हेच सिद्ध करतात की गेल्या पिढीतील काँग्रेसवाल्यांची कृष्णकृत्ये काही बिचाऱ्या प्रामाणिक काँग्रेसवाल्यांना कळून चुकली आहेत. आपल्या पायाखाली काय जळते आहे याची त्यांना जाणीव झाली आहे. ही सर्व परिस्थिती पालटलीच पाहिजे, आणि ही क्रांती आजची तरुण पिढीच करू शकेल. भाषावाद, प्रांतवाद यांचे थैमान पुढे असेच चालू राहिले तर द्विराष्ट्रवाद काय, बहुराष्ट्रवाद भारतात निर्माण होऊन भारताची शकले शकले होतील. हे भेसूर भवितव्य भोगण्याचे दुर्भाग्य भविष्यकाळात भारताच्या भाळी येऊ नये अशी समाजाची अपेक्षा आहे; आणि हीहि अपेक्षा आजची तरुण पिढीच पूर्ण करू शकेल.
आजच्या तरुण पिढीची इतकी तरफदारी मी कां करते याला तशीच सबळ कारणे आहेत. मी तरुण आहे, तेव्हा आजच्या तरुण पिढीवर करण्यात येणारे विपरीत, अवास्तव आणि वृथा आरोप मला कां आणि कसे सहन व्हावेत हे तर आहेच. पण त्याच्याच जोडीला आजच्या तरुण पिढीच्या अंगी देशाचे भवितव्य उजळण्याची आणि समाजाच्या सर्व रास्त अपेक्षा पूर्ण करण्याची शक्ति व सामर्थ्य आहे याची साक्ष अनेक गोष्टीवरून पटते असे मला वाटते. आजची तरुण पिढी ही रूढि, परंपरा, चालीरीती यांच्या दास्यातून मुक्त झालेली आहे. जातिभेद, धर्मभेद, पंथभेद आदि भेदांची कुंपणे आजच्या तरुण पिढीच्या गळ्यात पडलेली नाहीत. पुराणप्रियता आणि कूपमंडूक वृत्ति यांचा आजच्या तरुण पिढीच्या ठिकाणी अभाव आहे. जुने तेच सोने मानून जुन्या मढ्याचीच गुढी उभारण्याची आजच्या तरुण पिढीला मनस्वी चीड आहे, किंबहुना हाती चूड घेऊन रूढ धर्माचे मढे चेतविण्यासही आजची तरुण पिढी मागेपुढे पाहणार नाही. आजच्या तरुणांच्या मनाची कपाटे कोणत्याहि चांगल्या नवीन कल्पनांचे स्वागत करण्यास सदैव उघडी आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जनमनावर गैरवाजवी पगडा बसविणाऱ्या सत्यासत्य, हिंसा-अहिंसा, शांति-क्रांति इत्यादि द्वंद्वाच्या विधिनिषेधात आजच्या तरुणांची बुद्धि गुरफटलेली नाही. ज्याने आपली, आपल्या समाजाची व आपल्या राष्ट्राची उन्नति, प्रगति व हित साधेल ते आचरिले पाहिजे अशी आजच्या तरुण पिढीची धारणा आहे. पूर्वजांच्या थोरवीची गाथा गाण्यात आजच्या तरुणांची वृत्ति रममाण होत नाही. जन्माच्या श्रेष्ठतेवर तिचा विश्वास नाही. कालवैशिष्ट्याकडे लक्ष देऊन प्राप्तकालरूपी विशाल पर्वतात आपल्या कर्तृत्वाची सुंदर लेणी खोदण्यात त्यांना धन्यता वाटते. आणि म्हणूनच मी म्हणते की आजची तरुण पिढी समाजाच्या अपेक्षा पुऱ्या करण्यास समर्थ आहे. अधार्मिकता, नास्तिकता, बेशिस्त, बेजबाबदारपणा, बेछूटपणा, सुखासीनता, आळशीपणा, कर्तृत्वपराङमुखता, अनीति इत्यादि आरोप आजच्या तरुण पिढीवर वृद्ध पिढीकडून करण्यात येतात त्याच्या बुडाशी आपल्याच हाती सत्ता व अधिकार राहावे ही हपाप व हव्यास आहे हे सहज समजण्यासारखे आहे. आणि मी तर असे म्हणते की वरील दोषदर्शनातच आजच्या तरुण पिढीच्या स्वतंत्र वृत्तीची साक्ष पटण्यासारखी आहे. येथे जमलेला तरुण वर्ग ठरावाला उचलून धरीलच, पण वृद्धांनाहि आता संन्यस्त वृत्ति स्वीकारून तरुण पिढीच्या हाती समाजाचे नेतृत्व देण्याची सुबुद्धि होऊ दे.
१५० वर्षांच्या गुलामगिरीतून सुटल्यावर अचानक स्वतःचे भवितव्य स्वतः ठरविण्याची जबाबदारी समाजावर येऊन पडली. हे फार कठिण काम असावे. जोपर्यंत दुसरा आपल्याकरिता निर्णय घेतो व ते जबरदस्तीने का होईना, आपल्यावर लादतो तोपर्यंत बरे असते. स्वतःच्या डोक्याला त्रास नाही. डोके असून नसून सारखेच. पण अचानक 'तुझा निर्णय तूच घे' अशी स्वातंत्र्याची शिक्षा झाल्यामुळे योग्य निर्णयाप्रत नेऊन पोचवणारा सारासार विचार करण्याची जबाबदारी येऊन पडल्यावर काही काळ तरी समाज गोंधळलाच असेल. अनेक प्रश्र, त्यांची अनेक उत्तरे. वादविवाद हे योग्य उत्तर शोधण्याचे योग्य साधन. असेच अनेक लुटुपुटीचे वाद शाळाकॉलेजातही माजविण्यात आले. अाणि ते गंभीरपणे रंगविण्यात आले.
ठराव : या सभेच्या मते सद्य परिस्थितीत संस्कृत साहित्याच्या परिशीलनाची आवश्यकता नाही
भोसला वेदशास्त्र महाविद्यालयात आपण जमलेला आहात. शारदोत्सवाप्रीत्यर्थ जमला आहात. संस्कृत साहित्याच्या परिशीलनाला वाहून घेतलेल्या संस्थेच्या इमारतीत आपण एकत्र झाल आहात. पण कशाकरिता? 'सद्य परिस्थितीत संस्कृत साहित्याच्या परिशीलनाची आवश्यकता नाही' या विषयावर चर्चा करण्याकरिता. केवढा हा विरोध! सकृद्दर्शनी जरी हा विरोध दिसत असला तरी तो विरोध नसून केवळ विरोधाभास आहे. या संस्थेच्या सभासदांपैकी किंवा या उत्सवाच्या चालकांपैकी मला नाही वाटत एकहि जण असा असेल की ज्याला हा ठराव मान्य आहे. मग त्यांनी हा ठराव चर्चेकरिता मांडण्याचा उद्देश मला एकच दिसतो. तो असा की, ठरावाच्या समर्थकांची बाजू किती पोकळ व लंगडी आहे, हे लोकांच्या निदर्शनास आणावे. असो! त्यांच्या जे मनात असेल ते असो. मी मात्र आपणाला प्रथमच सांगून टाकते की मी ठरावाला विरोध करणार आहे. म्हणे सद्य परिस्थितीत संस्कृत साहित्याच्या परिशीलनाची आवश्यकता नाही. मुलगा थोडा मोठा झाला की त्याने मला आता आईची गरज नाही म्हणण्यासारखेच कृतघ््नपणाचे हे विधान आहे. मराठी आमची मातृभाषा आहे, मायबोली आहे. मराठीच काय पण हिंदुस्थानातील कोणतीहि भाषा घ््या, तिचा उद्भव संस्कृत भाषेपासूनच झाला आहे. तेव्हा आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक सुपुत्राने संस्कृत भाषेचा अभ्यास करून तिच्यातील अमोल ग्रंथांचे वाचन करणे हे अत्यावश्यक आहे. संस्कृतच्या अभ्यासाशिवाय हिंदुस्थानातील कोणत्याहि भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही हे वादातीत सत्य आहे.
संस्कृत साहित्य हे आमचे स्फूर्तिस्थान आहे. ते आमचे अमोल रत्नभांडार आहे. तो विशाल ज्ञानसागर आहे. तो आमचा मानबिंदू आहे. या विशाल ज्ञानसागरात बुडी मारून हाताला लागतील ते मोती मिळविणे हे प्रत्येक साहित्यिकाचे व विचारवंताचे काम आहे. कालिदासाचे शाकुंतल व मेघदूत, भवभूतीचे उत्तररामचरित्र, भासाची कादंबरी ही जन्मास येऊन आज कितीतरी काळ लोटला. पण जगातील यच्चयावत साहित्याचा उच्चांक त्यांनी गाठला आहे, व ते बहुमानाचे अढळस्थान अजूनहि कायम आहे. परभाषेच्या दुरभिमानाने ज्यांच्या साहित्यिक दृष्टीला विकृति प्राप्त झाली आहे, अशा आमच्या काही स्वाभिमानशून्य लोकांना शेक्सपिअरची नाटके व होमरचे काव्य ही सर्वोकृष्ट वाटत असतील, तर गोष्ट निराळी. संस्कृतात काय नाही? काव्य आहे, नाट्य आहे, कादंबरी आहे, नीति आहे, कर्म आहे, राजकारण आहे, समाजकारण आहे, अर्थशास्त्र आहे, गणित व वैद्यक आहे, रसायन आहे, ज्योतिष आहे. आजच्या सुधारलेल्या जगात जी जी शास्त्रे व जे नवनवीन शोध आपणाला दिसतात, त्या सर्वांचा उल्लेख आपल्या प्राचीन संस्कृत साहित्यात आढळतो. म्हटलेच आहे की 'व्यासेनोच्छिष्टं जगत्सर्वम्'. वेद, श्रुति, स्मृति, पुराणे, रामायण, महाभारतासारखे ऐतिहासिक ग्रंथ, योगवाशिष्ठासारखा अध्यात्मावरील ग्रंथ, आयुर्वेद हा वैद्यकीय ग्रंथ, आणि ज्ञानाच्या विविध शाखांवरील विविध ग्रंथ संस्कृत साहित्यात आहेत. त्यांचे परिशीलन केल्याने आपली दृष्टी विशाल होईल, आपल्या ज्ञानाला उजळा चढेल.
ठरावाचे समर्थक म्हणतात 'संस्कृत ही मृत भाषा आहे. तिच्या अभ्यासाची आता काय आवश्यकता आहे? ती काही प्रचलित लोकभाषा नव्हे. प्रचलित लोकभाषांच्या अभ्यासाकडे आपली दृष्टी वळवा. संस्कृतच्या फाजील अभिमानाने प्रचलित लोकभाषांची हेळसांड करू नका.'. कोण म्हणतो प्रचलित लोकभाषांची हेळसांड करा म्हणून? कोण सांगतो आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगू नका म्हणून? आमचे म्हणणे एवढेच की, संस्कृत साहित्याच्या परिशीलनानेच तुमचा मातृभाषेविषयीचा अभिमान सार्थ व कर्तृत्वशाली होईल. तो कार्यप्रवण होईल.
दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, संस्कृत हा अखिल भारतील लोकभाषांना एकत्र आणणार दुवा आहे. त्यांना एका सूत्रात ओवणारा धागा आहे. आपल्या दुर्लक्षाने हा धागा आपण तुटू दिला, हा दुवा निखळू दिला तर साऱ्या अठरा पगड भाषा बोलणाऱ्या लोकात प्रसंगी वैमनस्य उत्पन्न झाल्याखेरीज राहणार नाही. आणि त्याची चुणूक आपणाला आज दिसतेच आहे. आमच्या राष्ट्रीयत्वाचे विरोधक आम्हाला हेच सांगतात ना की तुमची एक भाषा नाही, एक संस्कृति नाही? कोण म्हणतो आमच्या देशाची एक संस्कृति नाही? वेदांनी पुनीत केलेली, व्यास, वाल्मिकी, शुक, ज्ञानदेव इत्यादि ऋषि मुनींनी वाढविलेली, राणा प्रताप, शिवाजी, गुरुगोविंद, राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या रक्ताचे अर्घ््यदान दिलेली अमर भारतीय संस्कृति ही आमची संस्कृति आहे. व संस्कृत ही आमची राष्ट्रभाषा आहे. आजच्या सगळ्या प्रचलित भाषा ही तिचीच अपत्ये आहेत. तेव्हा संस्कृतची हेळसांड करून, तिच्याकडे दुर्लक्ष करून एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेला धक्का देऊ नका एवढीच आपणाला आग्रहाची विनंति आहे.
पाश्चात्य देशात सुद्धा संस्कृत ग्रंथांचा, वेदांचा व भगवद्गीतेचा मोठ्या आस्थेने अभ्यास केला जातो. आणि आपल्या देशात मात्र 'सद्य परिस्थितीत संस्कृत साहित्याच्या परिशीलनाची आवश्यकता नाही' असे प्रलाप आमच्या मुखातून बाहेर पडतात. आपण हा ठराव प्रचंड बहुमताने फेटाळून लावावा अशी विनंति करून मी आपली रजा घेते.
ठराव : या सभेच्या मते जीवनातून धार्मिक मूल्ये ऱ्हास पावल्यानेच मानवी जीवन दु खी झाले आहे
श्री साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या या उत्सवमंडळाने आंतरशालेय वादविवादस्पर्धा आयोजित केली आहे आणि त्याकरिता विषयहि मोठा समयोचित निवडला आहे.
'या सभेच्या मते जीवनातून धार्मिक मूल्ये ऱ्हास पावल्यानेच मानवी जीवन दुःखी झाले आहे' असा आजच्या सभेपुढील ठराव आहे. मी ठरावाचे समर्थन करणार आहे हे आपणाला आधीच सांगून टाकते. आजचा ठराव हा वस्तुस्थितिनिष्ठ सत्य प्रतिपादन करणारा आहे आणि म्हणूनच ठरावाचे प्रतिपादन करण्याकरिता मी आपणासमोर उभी आहे. समाजाच्या व्यवहाराकडे आणि हालचालीकडे दृष्टि वळविल्यास आपणाला असे दिसून येते की सर्वत्र नास्तिकता डोके वर काढीत आहे. धर्म, नीति, चारित्र्य, शील या कल्पना नेस्तनाबूत होऊ पाहत आहेत. विवेक, संयम, त्याग, औदार्य व निःस्वार्थीपणा हे गुण अस्तप्राय होत चालले असून स्वार्थपरायणताच सर्वत्र बोकाळलेली दिसते. धर्म, अधर्म, नीति, अनीति, सत्यासत्य हा विवेक करण्याचे प्रयोजनच कोणाला वाटत नाही. स्वर्ग, नरक, पाप, पुण्य या कल्पना लयाला गेल्या. पैसा हाच देव बनला. त्यामुळे सर्वत्र जीवघेऊ स्पर्धेचे दूषित वातावरण पसरले आहे. माणूस माणसाच्या नरडीचा घोट घ््यायला प्रवृत्त झाला आहे. भाऊ भावाच्या गळ्याला तात लावायला धजतो आहे. विश्वास ही चीज दुर्मिळ झाली आहे. सर्वत्र भ्रष्टाचार, लाचलुचपत, साठेबाजी, काळाबाजार व भेसळ यांचे थैमान सुरू आहे. विश्वासघात, फसवणूक, दगलबाजी या गोष्टी नित्याच्या होऊ पाहत आहेत. कोणतीही वस्तु शुद्ध निर्भेळ स्वरूपात मिळणे दुरापास्त झाले आहे. दूधात भेसळ, तूपात भेसळ, तेलात भेसळ, हळद, तिखट, मसाल्यात देखील भेसळ. गोड्या तेलातील भेसळीमुळे मृत्यूच्या घटना देखील घडलेल्या आहेत. हा सर्व भयंकर परिणाम जर कशाचा असेल तर जीवनातून धार्मिक मूल्ये ऱ्हास पावल्याचाच आहे.
पापाचरण केल्यास नरक प्राप्त होईल, नीच योनीत जन्म मिळेल, परलोकात देहदंडादि शासन मिळेल या धार्मिक कल्पनांना हास्यास्पद थोतांडाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. इहलोक, परलोक, पुनर्जन्म ही सर्व खुळे आहेत असे तथाकथित सुशिक्षित लोक मानू लागले आहेत. त्यामुळे मोठा अनवस्था प्रसंग ओढवला आहे. माणसाच्या स्वार्थी आचरणाला कशाचा अंकुशच उरला नाही. धार्मिक कल्पना, नैतिक मूल्ये यांचा माणसाच्या आचरणावर फार मोठा प्रभाव पूर्वीच्या काळी पडत असे, आणि त्यामुळे मानवामानवात सहानुभूति, सामंजस्य, सहकार्य यांचे प्राबल्य दिसून येई. पण आता सारेच विपरीत झाले आहे. राष्ट्राराष्ट्रात देखील अत्यंत वैमनस्य व तेढ निर्माण होऊ पाहत आहे, आणि परस्पर अविश्वास सर्वत्र दिसून येत आहे.
ही सर्व भयानक परिस्थिति पालटायची असेल तर धार्मिक मूल्यांची मानवी जीवनात पुनश्च प्रतिष्ठापना झाली पाहिजे हे माझ्यासारख्या शाळकरी मुलीने आपणासारख्या सुज्ञ श्रोत्यांना सांगण्याची गरज आहे असे मला तरी वाटत नाही. आजचा ठराव हा सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट आहे. मानवी जीवन दुःखी होण्याची अचूक कारणमीमांसा त्यात आहे आणि ते दुःख निवारण करण्याचा रामबाण उपायही त्यात सुचविला आहे. रोगाचे निदानही आहे आणि त्याच्या निर्मूलनाकरिता औषध योजनाही आहे. तेव्हा आजचा ठराव प्रचंड बहुमताने पास करून आपली सद्सद्विवेकबुद्धि जागत असल्याचा पडताळा आपण आणून द्यावा अशी माझी आपणाला आग्रहाची विनंती आहे.
ठरावाचे विरोधक आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, आपल्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांच्या या कारवायांना बळी पडू नका. सध्याच्या भयानक अनवस्थेचे खापर ते भलत्याच गोष्टींवर फोडण्याचा प्रयत्न करतील याची मला पूर्ण जाणीव आहे. पण आपल्या सुजाणतेवर माझा पूर्ण भरवसा आहे, आणि म्हणूनच माझी खात्री आहे की आपण आजचा ठराव प्रचंड बहुमताने पास केल्याशिवाय राहणार नाही. सध्या सर्वत्र जी धर्मग्लानी दिसून येत आहे ती नाहीशी करून धर्माची पुनश्च प्रतिष्ठापना करण्याकरिता संतमहात्मे या भूतलावर अवतीर्ण होत असतात व धर्मपताका फडकविण्याचे महान कार्य करीत असतात. श्री सद्गुरु साईबाबा हेही अशाच महान विभूतिंपैकी एक होत.
भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत अभिवचन दिले आहे की,
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।
परित्राणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।
आणि वेळोवेळी या भूतलावर अवतीर्ण होणाऱ्या संतसत्पुरुषांच्या रूपाने उपर्युक्त भगवद्वचनाची प्रतीती आपणाला पटत असते. असो. आपण ठरावाच्या बाजूनेच मते द्यावीत अशी सर्वांना आग्रहाची विनंती करून मी आपली रजा घेते.
ठराव : या सभेच्या मते आजच्या गणेशोत्सवासारख्या धार्मिक व सामाजिक उत्सवांद्वारेच आदर्श देशभक्त व सैनिक निर्माण व्हावेत
महाराष्ट्र शिक्षण संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजच्या वादविवादाचा विषय माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी आपणाला सांगितलाच आहे. हा ठराव वाचल्याबरोबर मला तर हसूच लोटले. आजच्या गणेशोत्सवाने धारण केलेले विपरीत आणि अनिष्ट स्वरूप ज्याने पाहिले आहे असा कोणीहि समंजस माणूस असल्या प्रकारच्या उत्सवातून आदर्श देशभक्त आणि सैनिक निर्माण होतील अशी आशा करणे संभवत नाही. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले त्यामागील त्यांचा हेतु उदात्त होता, उच्च होता, पवित्र होता, सारे काही मान्य! पण त्या गणेशोत्सवाचे आज आपण काय विडंबन मांडले आहे? गणेशाच्या नाना तऱ्हेच्या मूर्ति आज पाहण्यात येतात की ज्या पाहून त्यामागील देवत्वाची आणि धार्मिकतेची भावना अजिबात लुप्त होऊन जाते. तसेच गणपतिसमोर करण्यात येणारे कार्यक्रम पाहून सदभिरुचीच्या माणसाच्या मनात घृणा उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. त्या आचकट विचकट नकला, अश्लील सिनेसंगीताच्या रेकॉर्डस्, तमाशावजा नाटके, गाण्याच्या मैफली व कव्वाल्यांच्या फैरी हे सर्व कार्यक्रम पाहून असल्या गणेशोत्सवासारख्या धार्मिक व सामाजिक उत्सवाद्वारे आदर्श देशभक्त व सैनिक निर्माण व्हावेत अशी आशा प्रदर्शित करणे वडास वांगी लागतील असे म्हणण्यासारखेच वेडगळपणाचे आहे असे मला वाटते. ठरावाच्या समर्थकांप्रमाणे ज्यांना मुद्दामच वेड पांघरून पेडगावाला जावयाचे असेल त्यांची गोष्ट निराळी. ठरावाचे समर्थक एकतर बुद्धिहीन तरी असले पाहिजेत नाही तर अति शहाणे तरी असले पाहिजेत. एरवी अशी भलती आशा ते करते ना. आपण हिंदुलोक कोणत्याहि गोष्टीचे विडंबन करण्यात असे काही वस्ताद आहोत की कोणत्याहि चांगल्या गोष्टीतील प्राणतत्त्व काढून टाकून उरलेल्या निर्जीव मढ्याला आपण कवटाळीत बसतो, आणि त्या मढ्यातच काहीतरी गूढ साठविले आहे असा वरपांगी देखावा निर्माण करतो. अशीच काहीशी स्थिति आपण गणेशोत्सवाची आणि त्यासारख्या इतर धार्मिक व सामाजिक उत्सवांची केली आहे.
आज भारतरूपी सूर्याला परचकाचे ग्रहण ग्रासू पाहत आहे. चीनचा भस्मासुर आणि पाकिस्तानचा बकासुर एकमेकांच्या हातात हात घालून आपली गृध्रदृष्टि भारताकडे वळवीत आहेत, व त्यांनी भारताच्या सीमांचे लचके तोडण्यासहि सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत आपल्या सीमांचे अभेद्यत्व कायम राखणे व राष्ट्राचे स्वातंत्र्य अबाधित राखणे हे आपले परम पवित्र कर्त्तव्य आहे. परकीय आक्रमणाला प्रखर विरोध करावयाचा असेल तर आदर्श देशभक्त व सैनिक राष्ट्रात निर्माण झाले पाहिजेत यात शंका नाही. प्राणपणाने शत्रूशी मुकाबला करणारे आणि देशाकरता पडेल तो स्वार्थत्याग करावयास सदैव सज्ज असलेले सैनिक आज राष्ट्राला हवेत. मनात देशाभिमानाची प्रखर ज्योत तेवत असलेले कणखर व बाणेदार देशभक्तहि आज देशाला हवेत. पण असे देशभक्त आणि सैनिक आजच्या गणेशोत्सवासारख्या धार्मिक व सामाजिक उत्सवाद्वारे निर्माण होऊ शकतील हा वादाचा प्रश्न आहे. मी आपणाला सांगू शकतो की हे अशक्य आहे - त्रिवार अशक्य आहे. कोणताहि धार्मिक किंवा सामाजिक उत्सव आपण साजरा करतो म्हणजे काय करतो? कोण्यातरी देवदेवतेच्या किंवा पुढाऱ्याच्या फोटोला किंवा प्रतिमेला हार घालतो, गंधाक्षतपुष्पधूपदीपनैवेद्य इत्यादि उपचारांनी त्याची पूजा करतो, गोडधड खातो व नवीन वस्त्रे परिधान करून मिरवितो. अशा प्रकारे का आदर्श देशभक्त व सैनिक निर्माण होणार आहेत. ठरावाच्या समर्थकांनो! कशाला ही भलतीच आशा बाळगून आपली आत्मवंचना करून घेता?
अध्यक्ष महाराज! आदर्श देशभक्त आणि सैनिक निर्माण करण्याचे मार्ग वेगळे आहेत. योग्य मार्गाचा अवलंब केल्यासच ध्येयाचे शिखर गाठता येईल. नाहीतर कोण्यातरी खोल दरीत कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा माझ्या बहकलेल्या मित्रांनो! वेळीच सावध व्हा आणि योग्य मार्गावर या. आजच्या गणेशोत्सवासारख्या धार्मिक व सामाजिक उत्सवांचे कितीहि देव्हारे तुम्ही माजविले तरी त्यातून इष्ट कार्यसिद्धि होणार नाही. गणपति हा ऋद्धिसिद्धीचा नायक असला तरी 'उद्योगाचे घरी ऋद्धिसिद्धि पाणी भरी' असेच त्याचे सांगणे आहे. तेव्हा ही धार्मिक व सामाजिक उत्सवांची नसती खुळं न माजवता उद्योगाची कास धरा एवढेच माझे तुम्हाला सांगणे आहे. सैनिकी शिक्षणाची शाळाकॉलेजे स्थापन करा. लष्करी प्रशिक्षण सक्तीचे करा. एन्. सी. सी. व होमगार्डस् या संघटनांचा विस्तार करा. तरुण पिढीत सैनिकी शिस्त बाणेल असे उपाय योजा. त्याचप्रमाणे जातिभेद, धर्मभेद, पंथभेद, भाषाभेद, पक्षभेद किंवा प्रांतभेद यांना उत्तेजन किंवा प्रोत्साहन न देता एकराष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागेल या दृष्टीने आपल्या कार्याची दिशा आखा. असे केल्यानेच आदर्श देशभक्त व सैनिक निर्माण होतील. गणेशोत्सवासारख्या उत्सवांनी नाही. आजचा हा खोडसाळ ठराव बहुमताने फेटाळून लावा ही विनंती. जयहिंद!
ठराव : या सभेच्या मते सार्वजनिक गणेशोत्सव सध्या ज्या पद्धतीने साजरे करण्यात येतात ती पद्धति लक्षात घेता ते ताबडतोब बंद करणे हेच राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक व इष्ट आहे.
मी या ठरावाला कसून विरोध करणार आहे. ठराव आहेच त्या लायकीचा. काय तर म्हणे गणेशोत्सव बंद करणे हेच राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक व इष्ट आहे. राष्ट्राचे हित कशात आहे आणि कशात नाही हे कळायलाहि काही विवेक असावा लागतो म्हटल!
गणेश ही आम्हा हिंदूंची मुख्य देवता आहे. त्याच्या स्मरणमात्रे कामनापूर्ती होते असा आमचा विश्वास आहे. आम्ही गणपतीला विघ््नहर्ता मानले आहे. आणि लोकमान्यांनी राष्ट्रहितावर दृष्टी ठेवून गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले आहे. त्याच गणेशोत्सवाची आजच्या ठरावाच्या राष्ट्रप्रेमी समर्थकांना अडगळ झाली आहे. वाहवा! याला म्हणावे बुद्धि! एरवी जे गणेशोत्सवावरच घाव घालायला उठले त्यांच्यावर बुद्धिदात्या गणेशाची अवकृपा होणार आणि त्यांचे डोके उलटे चालणार हे साहजिकच आहे म्हणा!
अहो! पण गणेशोत्सव बंद कां म्हणून करायचे? तर म्हणे हल्ली ते ज्या पद्धतीने साजरे करण्यात येतात ती पद्धति राष्ट्रहिताला मारक आहे म्हणून! चार लोकांनी एकत्र यायचे, गणपति मांडायचा, काही विद्वान अधिकारी लोकांची भाषणे ठेवायची, त्यापासून घेता आला तर काही बोध घ््यायचा, भेदभाव विसरून ऐक्यभावाची जोपासना करायची यांत राष्ट्रहितास मारक अशी कोणतीहि गोष्ट मला तरी दिसत नाही बुवा! गणेशोत्सव हा अगदी निर्दोष आहे असे नाही माझे म्हणणे. त्यातहि नाचगाणे, तमाशे असले प्रकार प्रसंगी होतात. पण तीन चार वर्षांपूर्वी या किळसवाण्या गोष्टींनी जे निंद्य स्वरूप धारण केले होते ते दिवसेंदिवस नाहीसे होत आहे. गणेशोत्सव हळूहळू सात्त्विक व सोज्वळ स्वरूप धारण करू पाहत आहेत. मग ३-४ वर्षांपूर्वी जे गणेशोत्सव आमच्या विरोधकांना पसंत पडले ते एकाएकी त्यांना टाकाऊ कां वाटू लागले बरे? कावीळ झालेल्या माणसाला सारी सृष्टि पिवळसरच दिसते तशी आमच्या विराधकांची स्थिती नाही ना झाली?
आणि एकवेळ आमच्या विरोधकांच्या मताखातर धरून चालू या की गणेशोत्सवाचे हल्लीचे स्वरूप राष्ट्रहितास मारक आहे. पण हे स्वरूप गणेशोत्सवास कोणी दिले? हा कोणाचा अपराध? सर्वस्वी आमचाच. ही गोष्ट मान्य केल्यावाचून गत्यंतर नाही. आम्हीच लोकमान्यांच्या गणेशोत्सवामागील उदात्त हेतूचे बुद्धिपुरस्सर खोबरे केले. आम्हीच त्याला किळसवाणे रूप दिले. आणि आता आम्हीच गणेशोत्सव बंद करण्याची भाषा बोलावी हे आम्हाला शोभते काय? अशा परिस्थतीत गणेशोत्सवास मूळचे उदात्त व सात्विक स्वरूप प्राप्त करून देणे हे आमचेच कर्त्तव्य नाही काय? आज समाजाच्या घटकावयवात एकी निर्माण करावयास आमच्यासमोर गणेशोत्सवाशिवाय दुसरे कोणते साधन आहे? आणि असले तरी त्याचीही अल्पावकाशात आम्ही गणेशोत्सवासारखीच दुर्गति करून टाकणार नाही याची शाश्वति देण्यास कोण धजेल? मग गणेशोत्सव बंद करण्याच्या गोष्टी बंद करून गणेशोत्सवा़ची सर्वांगीण उन्नति करावयास झटणेच योग्य नाही काय?
लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशत्सवाची स्थापना केली त्यावेळी आम्हाला परकीय शत्रूशी झुंज घ््यावयाची होती. आज आम्हाला अंतर्गत शत्रूंशीच झुंजावयाचे आहे. समाजकंटकांचा व राष्ट्रद्रोह्यांचा नायनाट करावयाचा आहे. भारताची भक्कम पायावर उभारणी करावयाची आहे. आपले स्वातंत्र्य अभेद्य राखावयाचे आहे. या सर्व दृष्टींनी विचार करता गणेशोत्सवाची पूर्वीपेक्षा अधिक आवश्यकता आहे. वरील सर्व ध्येये साध्य करावयास एकीची आणि पराकाष्ठेच्या मनोधैर्याची गरज आहे. आणि ह्यांचा लाभ गणेशोत्सवातूनच होऊ शकेल. अशा निकडीच्या वेळीच गणेशोत्सव आम्हास अपायकारक दिसू लागला यापेक्षा दुसरे दुर्भाग्य ते कोणते असू शकेल? आज गणेशोत्सव बंद केल्यास आमची 'इतो नष्टस्ततो नष्टः' अशीच गत होणार आहे. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे होणार आहे.
आमच्या नादानपणासाठी आम्ही गणेशोत्सवाच्या नावाने बोटे मोडावी यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणती असेल? यंदा कितीतरी गणेशोत्सव मंडळांनी पावसामुळे कार्यक्रम करता आले नाही म्हणून वाचलेले पैसे पूरग्रस्त देशबांधवांच्या मदतीसाठी देऊन टाकलेत. देशहिताची अशी जागती जाणीव असल्यावर गणेशोत्सव बंद करण्याचे कारण नाही. गणेशोत्सवाचे आणि राष्ट्रीय दृष्टीचे वैर कधीच नव्हते. समाजाचे निरनिराळे घटक एकत्र यावेत, त्यांची स्नेहबंधने दृढ व्हावीत, त्यांच्यात्तील परस्पर भेद नाहीसे व्हावेत, आणि अखिल हिंदुसमाज एकराष्ट्रीयत्वाच्या सूत्रात ओवला जावा या दृष्टीने गणेशोत्सवाचा कितीतरी फायदा करून घेता येण्यासारखा आहे. गणपति हा गणांचा नायक आहे. विद्येचा अधिपति आहे. कलांचा भोक्ता आहे. कवींचा कवी आहे. 'गणांनां त्वां गणपतिम् कविं कवीनाम्' अशी ऋचा अाहे. गणांचा म्हणजे समुदायाचा नायक अर्थात गणपति ही सामुदायिक, सामाजिक एवंच राष्ट्रीय देवता आहे. गणेशोत्सवाचे विकृत किळसवाणे रूप बदलून तेथे देशप्रेमाची गंगा निर्मिणे, गणेशोत्सवाला अनेक विधायक चळवळींचे उगमस्थान बनविणे हे सहज शक्य असता तो नाहीसा करणे कितपत योग्य ठरेल याचा तुम्हीच आपल्या सदसद्विवेक बुद्धीस जागून निर्णय घ््या आणि मगच आपला निर्णय द्या अशी आपणास विनंती करून मी आपली रजा घेते.
ठराव : या सभेच्या मते विद्वान होण्यापेक्षा सदाचरणी होणे अधिक श्रेष्ठ आहे
सदाचरणाची चाड असणारा, नीतिमत्ता हा समाजपुरुषाच्या पाठीचा कणा आहे ह्याची मनोमन जाणीव असणारा, शील हे व्यक्तीचे बहुमुल्य भूषण होय ह्याचे ज्ञान असणारा, चारित्र्य आणि दानत यांच्या निकोप पायावरच समाजाची भव्य इमारत उभारलेली असते ह्या मूलभूत सिद्धांताशी थोडी बहुत तोंडओळख असणारा कोणीहि इसम ह्या ठरावाला विरोध करावयास धजणार नाही हे मी जाणून आहे. माझ्या या विधानाने प्रतिपक्षियांवर दुराचरणाचा किंवा चारित्र्यहीनतेचा आरोप करण्याचा माझा मानस आहे असा माझ्यावर कोणी हेत्वारोप करू नये अशी येथे जमलेल्या अखिल श्रोतृवृंदाला माझी नम्र प्रार्थना आहे. या व्यासपीठावर विरोधकाच्या नात्याने जे कोणी येतील ते आजच्या ठरावाला वादविवादाचे स्वरूप असल्यामुळे, कोणीतरी विरोध हा केलाच पाहिजे या भावनेने, मारून मुटकून वैद्यबोवा या न्यायाने मनाला पटत नसलेले मुद्दे, विचार आणि कल्पना आपणासमोर उसने चंद्रबळ आणून मांडतील हे उघड आहे. माझ्या ह्या म्हणण्याची मनोमन साक्ष आमच्या ह्या तथाकथित विरोधकांना देखील त्यांनी थोडेसे आत्मपरीक्षण करून प्रामाणिकपणे कौल दिल्यास त्यांची त्यांनाच सहज पटणार आहे. तेव्हा आपले मुद्दे पटवून देण्याचा त्यांनी कितीहि आव आणला तरी आणोत बापडे! वेड पांघरून पेडगावला जाण्यातलाच हा एक प्रकार आहे झाले! तेव्हा त्यांच्या अर्थशून्य, पोकळ आणि भ्रामक युक्तिवादाला आपण बळी पडू नये येवढी आपणाला नम्र विनंति करून मी ठरावाच्या प्रतिपादनाला हात घालणार आहे.
विद्वान होण्याला ठरावाचा विरोध नाही. तसे झाले तर ते उत्तमच आहे. पण अफाट ज्ञानसागरात अवगाहन करून देखील नीतिमत्तेच्या नावाने जे कोरडे पाषाणच राहिले आणि श्री एकनाथ महाराजांनी ज्यांना 'विशाल मणिगोटे' म्हटले अशा अहंमन्य पंडित शिरोमणीवर ठरावाचा रोख आहे. विद्वत्ता आणि सदाचरण, पांडित्य आणि शील, ज्ञान आणि चारित्र्य, व्युत्पन्नता आणि दानत ह्यांचा सुरेख संगम आढळून आल्यास तो कोणाला नको आहे? ज्ञान आणि शील ह्यांची ही युति म्हणजे दुधात साखर पडल्याप्रमाणे होणार आहे. पण अतिशय विद्वान असूनहि शीलाच्या नावाने आवळ्याएवढे पुज्य असण्यापेक्षा ज्ञानाच्या नावाने भोपळ्याएवढे पुज्य असले तरी चालेल पण आपल्या शीलसंपदेने जगाला पूज्य होणाऱ्या चारित्र्यसंपन्न नरश्रेष्ठांची योग्यता अधिक आहे.
पांडित्य आणि शील, ज्ञान आणि चारित्र्य, विद्वत्ता आणि ऋजुता ह्यांचा सुरेख संगम ज्यांच्या ठायी आढळतो असे श्री शंकराचार्य किंवा श्री ज्ञानेश्वर यांच्यासारखे युगपुरुष लाखात एक आढळतील. पण आपल्या पांडित्याचा व ज्ञानाचा पैशाच्या किंवा कीर्तीच्या आमिषासाठी विक्रय करणारे, आपल्या नीतिबाह्य दुराचरणाने विद्वत्तेला काळिमा आणणारे पंडितहि लाखो आढळतील. मग ग्रंथातील ज्ञान ज्यांच्या जाड कातडीतून अंतःकरणाच्या पालथ्या घागरीत प्रवेशूच शकले नाही अशा जगन्नाथ पंडितासारख्या कोरड्या पंडितांना आपण थोर लेखणार की ज्यांच्या पदरी पांडित्याची फारशी माया नव्हती पण ज्यांनी आपल्या सदाचरणाने, चारित्र्याने आणि परमेश्वर भक्तीने ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्यासारख्या विद्वान पंडितांच्या पंक्तिला बसण्याचा मान मिळविला अशा चोखा महार, गोरा कुंभार, सावता माळी, सजन कसाई यांच्यासारख्या सदाचरणी महात्म्यांना आपण थोर लेखणार?
जगन्नाथ पंडित केवढा थोरला विद्वान, पण शीलाचे पाठबळ नसल्यामुळे यवनीच्या जाळ्यात सापडला, व्यसनाच्या खोल खाईत लोटला गेला आणि त्याच्या विद्वत्तेची माती माती झाली! आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात पश्चात्तापदग्ध होऊन, गंगेची आराधना करून, गंगालहरी सारखे काव्य त्याने लिहिले नसते, तर त्याचे नावनिशाण आज उरले नसते. पण वर उल्लेखिलेल्या गोरा कुंभारादि महात्म्यांची कीर्ति आज शतकानुशतकातून आपल्या कर्णी दुमदुमत आहे.
जगन्नाथ पंडिताचे वारस आजच्या समाजात काय थोडेथोडके आढळतात? ते आपल्या विद्वत्तेने आणि शब्दांच्या कसरतीच्या डोंबाऱ्यासारख्या कोलांटउड्यांनी वाचकाला क्षणभर थक्क करतील! नाही असे नाही. पण जनमनाची कायमची पकड घेण्याची योग्यता त्यांच्यात नाही. ती योग्यता शीलाने आणि चारित्र्यानेच येते. 'कलेकरिता कला' असा कितीहि कंठशोष यांनी केला तरी ज्या कलेला जीवनाचे पाठबळ नाही अशी ही लोकांच्या कलाने कलणारी कला कृष्णपक्षातील चंद्राप्रमाणे कलाकलांनी क्षीण झाल्याशिवाय राहणार नाही.
'शीलं परं भूषणम्' हे सुभाषित आपणाला माहित आहे. प्रह्लादाची गोष्ट आपणाला माहित आहे. प्रह्लादाच्या चारित्र्याने आपले इंद्रपद जाईल की काय अशी इंद्राला भीति वाटली. साऱ्या शीलभ्रष्ट, उन्मत्त सत्ताधाऱ्यांना अशी भीति नेहमीच वाटत असते. मग त्याने काय केले? त्याने प्रह्लादाचे शील मागून घेतले. प्रह्लादाचे शील निघून गेल्यावर ज्ञान, शौर्य, न्याय इत्यादि अनेक गुणांच्या मुर्ती प्रह्लादाच्या शरीरातून बाहेर पडल्या. प्रह्लादाने आपले शील गमावले म्हणून सर्व गमावले. शील गमावणे म्हणजे सर्वस्व गमावणे. When character is lost, everything is lost. प्लेटो, अॅरिस्टाॅटल, सॉक्रेटिस यांच्यासारखे विचारवंत देखील Virtue is knowledge and knowledge is virtue असे म्हणतात तेहि ह्याच अर्थाने. जे ज्ञान सद्गुणांची वाढ करीत नसेल ते ज्ञानच नव्हे. शिक्षणाचा मूळ उद्देश जे जे सत्यम् शिवम् सुंदरम् असेल त्याची वाढ करणे व जोपासना करणे हा आहे. हा मूल उद्देश जर सफल होत नसेल तर शिक्षण घेऊन काय उपयोग?
पांडित्य आणि शील जर एकत्र नांदले तर योग्यच आहे. ते कोणाला नको आहे? ज्ञान आहे पण शील नाही, शील आहे पण ज्ञान नाही. अशा स्थितीत ज्ञान आणि सदाचरण यांचे वेगवेगळे मूल्यमापन करणे हा आजच्या ठरावाचा उद्देश असल्यामुळेच ठराव म्हणतो की 'विद्वान होण्यापेक्षा सदाचारी होणे अधिक श्रेष्ठ आहे.'.
प्रस्तुत विषयाची व्याप्ति इतकी मोठी अाहे की त्याच्या सर्व बाजूंचा विचार करणे मला देण्यात आलेल्या अल्पावधीत केवळ अशक्य आहे. विरोधकांची बाजू आतापर्यंत तुम्ही ऐकली आहे. तेव्हा त्यांच्या पोकळ, अर्थशून्य, तर्कदुष्ट व भ्रामक बडबडीकडे लक्ष न देता ठरावाच्या बाजूनेच आपली मते द्या अशी एकवार मी आपणास नम्र प्रार्थना करून आपली रजा घेते.
ठराव : या सभेच्या मते विज्ञानाच्या वाढत्या वर्चस्वाने मानव्याची हानि होत आहे.
या ठरावावर वादाचं मोठच रण माजणार असा रंग दिसतो आहे. विज्ञानाचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत आहे अाणि ते जसेजसे वाढत आहे तसतसा मानवतेचा ऱ्हास होत आहे हेहि अापण पाहात अाहोत. मानव चंद्रावर जाण्याच्या गोष्टी बोलत आहे. कृत्रिम ग्रह, उपग्रह तो आकाशात सोडीत आहे. मानवतेचा ध्वज अंतराळातील ग्रहांवर उभारण्याची मनीषा मुखाने बोलून दाखवीत असतानाच या पृथ्वीतलावर मानवता लोप पावणार काय अशी भीति त्याच्या हृदयाचा थरकाप उडवीत आहे. अशा या विचित्र परिस्थितीत मानवजात असताना अाजच्यासारख्या अत्यंत मूलभूत महत्त्वाच्या अशा ठरावावर धनवटे रंगमंदिरातील आपणासारख्या सूज्ञ सभाजनांसमोर चर्चा करण्याची संधी मला लाभली हे माझे भाग्यच म्हणायचे! या साऱ्या प्रस्तावनेवरून आपल्यासारख्या चाणाक्ष श्रोत्यांच्या हे सहजच लक्षात आले असेल की प्रस्तुत ठरावाचे समर्थन करण्याकरिता मी आपणासमोर उभी आहे.
ठरावातील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. ठरावाचे ४ भाग पडतात. विज्ञान, त्याचे वर्चस्व, मानव्य आणि त्याची हानी. विज्ञान म्हणजे काय याचा उहापोह करण्याची गरज नाही, आणि त्याचे वर्चस्व दिनप्रतिदिन वाढत आहे याबद्दल आपल्या कोणाचेहि दुमत नाही. सध्याचे युग हे विज्ञानाचे युग आहे. जे राष्ट्र विज्ञानात अग्रेसर असेल तेच जगात प्रभावी व बलवान ठरते. पण खरा वादाचा मुद्दा हा आहे की विज्ञानाच्या वाढत्या वर्चस्वाबरोबर मानव्याची हानि होत आहे की प्रगति होत आहे. माझे स्वतःचे असे निश्चित मत आहे की विज्ञानाच्या वाढीबरोबर मानव्याची हानि होत आहे. पण माझे मत आपल्या गळी उतरविण्याच्या अगोदर मानव्य किंवा मानवता म्हणजे काय याचा थोडासा विचार करू.
मानवता म्हणजे मानवामानवातील बंधुभाव, परस्पर सामंजस्य, परस्पर सहानुभूति, सहसंवेदना, सहिष्णुता, सहकार्य व सहजीवन. परसंतोषाने सुखी होणे व परपीडेने दुःखी होणे हे मानव्याचे व्यवच्छेदक लक्षण होय असे म्हणावयास हरकत नाही. मानव जिथे कुठे दुःखात असेल, जिथून कुठून मानवाचे आर्त स्वर कानी येत असतील, तेथे आपल्या सहानुभूतीचा व यथाशक्ति मदतीचा ओघ वळणे हे त्याबरोबरच क्रमप्राप्त आहे. विज्ञानाच्या वाढत्या वर्चस्वाने ही मानवतेची मूल्ये जोपासली जात आहेत की खणून काढली जात आहेत हा प्रश्न आहे.
विज्ञानाचे महत्त्व जसजसे वाढत आहे तसतसा या आताच सांगितलेल्या मानवी मुल्यांचा मानवाला कसा विसर पडत चालला आहे याचा आता सप्रमाण विचार करू. तत्पूर्वी, माझी आपणाला एवढीच विनंति आहे की प्रस्तुत ठरावाचे गांभीर्य लक्षात घ््या. प्रतिपक्षाच्या भूलथापांना व धूळफेकीला बळी पडू नका. भावनाविवशतेच्या आहारी न जाता, सद्सद्विवेक बुद्धि जागृत ठेवून व साधकबाधक मुद्यांचा समतोल मनाने विचार करून मगच आपला कौल द्या.
विज्ञानाची माया मोठी अजब आहे. विज्ञानाने मानवाच्या सुखसोयीत भर घातली आहे. अंतरावर मात केली आहे. काळावर मात केली आहे. सायकल, मोटार, आगगाडी, आगबोट, विमान, इत्यादि वाहतुकीच्या साधनांनी जमिनीवरील, पाण्यावरील व अंतराळातील प्रवास सुलभ झाला आहे. मोठमोठ्या कारखान्यांमुळे फार मोठ्या प्रमाणावर मालाची पैदास होत आहे. विज्ञानाने ध्वनिलहरींना ग्रामोफोनच्या तबकडीत बंद करून ठेवले व पडद्यावरील चित्रांना बोलायला लावले. साता समुद्रापलिकडील भाषणे व गाणी आपण घरबसल्या आरामखुर्चीवर रेडिओच्या साह्याने ऐकू शकतो. तसेच टेलिव्हिजनच्या साह्याने जगाच्या दूरच्या कोपऱ्यात घडत असलेल्या घटनांचा चित्रपट घरच्याघरी पाहता येतो. पूर्वी असाध्य समजल्या जाणाऱ्या रोगांवरील औषध शोधून काढून विज्ञानाने प्रत्यक्ष मृत्यूवरहि मात केली आहे. विज्ञानाच्या या घटोत्कची मायेचे बहिरंग मोठे आकर्षक वाटते. पण अंतरंग? 'विषकुंभं पयोमुखम्' अशीच शेवटी विज्ञानाची गत आहे.
निरनिराळी यंत्रे, कारखाने, गिरण्या यांच्या प्रादुर्भावामुळे सारे वातावरण दूषित, कोंदट व रोगट होत आहे. बेकारी वाढते आहे, आर्थिक जीवन अधिकाधिक बिकट होत आहे व कौटुंबिक जीवनाला तडे जात आहेत. मानवी अंतःकरणातील साऱ्या ऋजु व कोमल भावना लयाला जात असून मानवी व्यवहाराला यांत्रिकता येऊ पाहत आहे. बंदुका, तोफा, रणगाडे, पाणबुड्या, टॉर्पेडोज, फायटर्स, बाँबर्स, विषारी धूर, आर्मर्ड टँक्स, अणुबाँब, हैड्रोजन बाँब अशी एकापेक्षा एक संहारक शस्त्रास्त्रे ही विज्ञानाचीच उदार देणगी होय.
गेल्या महायुद्धात हिरोशिमा व नागासाकी ही जपानमधील शहरे अणुबाँबच्या स्फोटामुळे उध्वस्त झाली व जपानचा पराभव झाला. अशा रीतीने अणुशक्ति विजयाची निर्णायक ठरली. तेव्हापासूनच रशिया, अमेरिका ही राष्ट्रे अण्वस्त्रांच्या मागे लागली. अण्वस्त्र स्फोटामुळे सारे वातावरण दूषित होते, पुढच्या कित्येक पिढ्या अपंग होण्याची भीति असते, हजारो मैलांचा टापू बेचिराख होतो व कोणत्याहि प्रकारचे पीक उत्पन्न करण्यास अक्षम ठरतो. हे माहित असूनहि व भारतासारखी मानवतावादी राष्ट्रे मानव्याच्या हितासाठी अण्वस्त्र स्फोट बंद करावेत अशी आग्रहपूर्वक सूचना करीत असतांना देखील रशिया अमेरिकेचे अण्वस्त्र स्फोट सुरूच आहेत. विज्ञानाच्या वाढत्या वर्चस्वाने मानव्याची हानि होत आहे याचा हा प्रत्यक्ष पुरावाच नाही काय? पुन्हा जर युद्ध सुरू झाले तर सारे जग त्यात गोवले जाईल व सारी मानवजात व मानवसंस्कृति नष्ट होईल अशी भीति व्यक्त केली जात आहे. पण मानव जातीचे आणि मानवसंस्कृतीचे काहीहि काय होईना, आपली सत्ता अबाधित राहिली पाहिजे व त्यासाठी अण्वस्त्रस्फोट अखंड सुरू राहिले पाहिजेत अशी या सत्तापिपासू राष्ट्रांची धारणा आहे.
विज्ञानाच्या वाढत्या वर्चस्वाने मानव समाजाची हानि होत आहे. हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सूक्ष्म निरीक्षण केल्यास दृष्टोत्पत्तीस आल्याशिवाय राहात नाही. विज्ञान हे जसे विधायक कार्य करू शकते तसेच विनाशक कार्यहि करू शकते. पण विज्ञानाची विनाशक कामगिरी ही भडक स्वरूपाची व तत्काळ फल देणारी असल्यामुळे ती लगेच मनाची पकड घेते. पण विज्ञानाची विधायक कामगिरी सौम्य स्वरूपाची व दीर्घ प्रयत्नांती फल देणारी असल्यामुळे ती मनाची पकड घेऊ शकत नाही. अणुशक्तीचेच उदाहरण घेऊ या. अणुशक्तीचा मानवी जीवनात फार मोठा उपयोग करून घेता येण्यासारखा आहे. तिच्या साहाय्याने नद्यांचे प्रवाह वळविता येतील, वाळवंटाचे सुपीक जमिनीत रुपांतर करता येईल, निर्जल प्रदेशाचे सुजला, सुफला अशा सस्यश्यामल भूप्रदेशात परिवर्तन करता येईल व असाध्य रोग बरे करता येतील असे अणुशास्त्रज्ञ म्हणतात. पण आज इकडे कुणाचे लक्ष आहे? अण्वस्त्रस्फोट जास्त प्रभावी कसे होतील व त्यामुळे जास्तीत जास्त मानवजातीचा अत्यल्प वेळात संहार कसा करता येईल या बाबतीतच आज राष्ट्राराष्ट्रात स्पर्धा लागून राहिली आहे. रशिया तर अशा वल्गना करीत आहे की महायुद्ध सुरू झालेच तर आम्ही बसल्या ठिकाणूनच सारे जग बेचिराख करू शकू व शत्रू जर अंतरिक्षात अण्वस्त्र टाकण्यासाठी आला तर त्याला तेथल्या तेथेच गारद करू शकू. ख्रुश्वेव्ह काय किंवा केनेडी काय, मॅकमिलन काय किंवा जनरल द गॉल काय. तोंडाने विश्वशांतीच्या घोषणा करीत असले तरी कृतीने विश्वनाशाचाच उद्योग करीत आहेत.
अण्वस्त्रस्फोट जर अखंड सुरू राहिले तर त्यापासून निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्गी वातावरणाने पुढे येणाऱ्या हजारो वर्षात मानववंशाची हानी होतच राहील असा ब्रिटन, अमेरिका, सोव्हिएट रशिया व इतर बारा राष्ट्रातील शास्त्रज्ञांनी नुकताच एक निवेदन प्रसिद्ध करून आपला एकमताचा गंभीर इशारा दिला आहे. टेलिव्हिजन, विजेने प्रकाशमान होणारी घड्याळे, क्षकिरणयंत्रे यांतून होणारा किरणोत्सर्ग चालूच आहे. त्याचे प्रमाण अत्यल्प असले तरी पुढे त्याच्या होणाऱ्या साहाय्याने वातावरण क्रमाक्रमाने फार मोठ्या प्रमाणावर दूषित होत राहील असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. म्हणून अनावश्यक अशा यंत्राचा वापर कमीतकमी करावा व जेथे फार मोठी लोकवस्ती असेल तिथे तर त्यास मज्जाव करण्यात यावा असा सल्लाहि त्यांनी दिला आहे. युनोच्या या शास्त्रज्ञमंडळात अमेरिकेचे वीस व रशियाचे बारा शास्त्रज्ञ आहेत. या समस्येची तब्बल ४ वर्षे सर्व बाजूंनी पाहणी करून मगच त्यांनी आपला एकमताचा इषारा दिला आहे. पण हे सारे अरण्यरूदनच ठरणार असे सध्या तरी दिसते.
युनोच्या या शास्त्रज्ञमंडळाने दिलेल्या इषाऱ्याची शाई वाळते न वाळते तोच अमेरिकेने असे जाहीर करून टाकले आहे की अण्वस्त्रस्फोटाचे चाचणी प्रयोग आम्ही आता पुन्हा नेटाने सुरू करणार आहोत. रशिया तर अण्वस्त्रस्फोटाच्या बाबतीत आघाडीवरच आहे. फ्रांसने अण्वस्त्रप्रयोगाच्या बाबतीतली सारी बंधने झुगारून दिली आहेत. इंग्लंड बोलणार नाही पण कृतीस चुकणार नाही. चीनलाही अण्वस्त्रप्रयोगाच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची घाई झाली आहे. अशी सर्वत्र स्फोटक परिस्थिति आहे. विज्ञानाच्या वाढत्या वर्चस्वाची साक्ष पटल्यामुळे विज्ञानाला व वैज्ञानिकांना वेठीला धरून प्रत्येक राष्ट्र सत्तास्पर्धेच्या रिंगणात उतरू पहात आहे. या सत्तास्पर्धेच्या धुमश्चक्रीत दृष्टि मदांध झाल्यामुळे मानव्याची काय हानी होईल याची फिकीर कोणालाच दिसत नाही. या सर्व परिस्थितीकडे पाहता शेवटी दुःखाने असेच म्हणावे लागते 'What science has made of science!'.
आमचे विरोधक म्हणतात की विज्ञान हा मानवाच्या हाती गवसलेला अमृतकुंभ आहे. मानव्याच्या संहारासाठी त्याचा कुठे कुठे उपयोग झालेला दिसला तरी तो विज्ञानाचा दोष नसून योजकतेचा दोष आहे. अशा बुरसटलेल्या युक्तिवादाचा आश्रय प्रस्तुत ठरावाचे विरोधक नेहमीच घेत असतात. पण हा युक्तिवाद अत्यंत भ्रामक, फसवा व दिशाभूल करणारा आहे. वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून चालणार नाही. वस्तुस्थिती जशी आहे त्याच स्वरूपात तिचे मुल्यमापन केले पाहिजे. सत्य अप्रिय व कटु असले तरी त्याचा स्वीकार केला पाहिजे.
प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या, सत्तापिपासू, राक्षसी महत्त्वाकांक्षेच्या लोकांच्या कसाबकरणीने विज्ञान हे आता केवळ विष राहिले नसून साऱ्या मानवतेचा खात्मा करणारे अतिशय जालीम असे हलाहल बनले आहे. पण दैवदुर्विलास असा की हे हलाहल पचविणारे नीलकण्ठ भगवान शंकर मात्र कुठेच दिसत नाहीत. ही कामगिरी भारताच्या वाट्याला येणार असे ईश्वरी सूत्र दिसते. असो.
ह्या सर्व विवेचनावरून हे स्पष्ट आहे की विज्ञान ही मानवतेला लागलेली कीड आहे. विज्ञानाचा विकास हा मानवतेला अभिशाप आहे. विज्ञानाच्या वाढत्या वर्चस्वाने मानव्याची हानि होत आहे. आपण जर उदासीन व बेफिकीर राहिलो तर विज्ञानाच्या सर्वभक्षक ज्वालांनी मानव्याची होळी झाल्याशिवाय राहणार नाही, राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यकालाच्या भयानक नी भेसूर भवितव्यतेने भयभीत झालेल्या माझ्यातील शेक्सपिअर जागृत होऊन म्हणतो आहे 'Destruction, total destruction of humanity! Thy name is science.'.
विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेऊ नये हे मत बऱ्याच भाषणानिबंधातून बाबांनी मांडले. पण राजकारणात, देशाच्या नीतिनिर्धारणात रस घेऊ नये असे नाही तर या गोष्टींचा पद्धतशीर अभ्यास करावा असेही मत मांडले. अनेकदा वादविवादाचा विषयच सरकारच्या धोरणांचा सर्वांगीण विचार व्हावा व विद्यार्थ्यांत 'आपला याच्याशी काहीही संबंध नाही' अशी प्रवृत्ती बळावू नये या दृष्टीने ठेवण्यात येत असावा असे दिसते. या ठरावांच्या निमित्ताने तत्कालीन समस्यांवर सामान्य जनतेची मते भाषणात उमटली आहेत.
ठराव : या सभेच्या मते हिंदुस्थानच्या युद्धोत्तर पुनर्घटनेत औद्योगीकरणापेक्षा खेड्यांच्या स्वयंपूर्णतेवर भर दिला पाहिजे
मी प्रथमच आपणास सांगून टाकतो की या ठरावाला माझा विरोध आहे, जोरदार विरोध आहे. आणि कां असू नये? सारे जग उद्योगधंद्यांच्या आणि कारखान्यांच्या बाबतीत द्रुतगतीने एकापुढील एक टप्पे गाठीत असता आमच्या हिंदुस्थानात असल्या नादान गोष्टी कां पुढे मांडण्यात याव्यात याचेच मला नवल वाटते. रोज नवीन नवीन शोध लागत आहेत, नवे नवे उद्योगधंदे आणि कारखाने निघत आहेत, माणसाच्या मदतीकरिता नवनवीन यंत्रे सिद्ध आहेत, निरनिराळ्या राष्ट्रात शास्त्रीय शोधांच्या बाबतीत अहमहमिकेने स्पर्धा चालली आहे. आणि आम्हाला मात्र जुने ग्रामोद्योग आणि जुने हस्तव्यवसाय या यांत्रिक युगात सुरू करण्याचे अवलक्षण सुचते. काय म्हणावे याला! 'कर्मणो गहना गति:' हेच खरे! हे सुताने स्वर्ग गाठण्याचे खुळे तत्त्वज्ञान, चरख्याच्या गुंजारवाने तोफांची धडधड आणि विमानांची घरघर बंद पाडण्याची खुळचट तत्त्वप्रणाली हिंदुस्थानातील एकमेव सर्वश्रेष्ठ पुढाऱ्याकडून पुरस्कारली जात आहे हे दैवदुर्विलसितच नव्हे काय? या थोर व्यक्तिबद्दल आपणाप्रमाणेच माझ्याहि अंतःकरणात आदराच्या भावना वसत आहेत. पण व्यक्ति कितीहि थोर असली तरी ती जर चुकत असेल आणि त्या चुकीने राष्ट्राचे नुकसान होण्याचा संभव असेल तर ती चूक दाखवून देण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. हा लोकशाहीचा काळ आहे. इथे अंधश्रद्धेला व विभूतिपूजेला थारा नाही. असो!
साखर खाण्याऐवजी घाण्यात तयार झालेला गूळ खा, हातपिसाईचे पीठ व कणिक यांचाच अन्नात उपयोग करा, गिरणीत तयार झालेले कापड न वापरता चरख्याच्या वा टकळीच्या सुताने हातमागावर विणलेली जाडीभरडी खादीच वापरा हा प्रचार आपणाला काही नवा नाही. ही अवदसा आम्हाला कां सुचते हेच मला समजत नाही. सध्याच्या यांत्रिक युगात इतर राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान पटकाविण्याकरिता शक्य तितक्या लवकर हिंदुस्थानचे औद्यगीकिरण करण्याचा प्रयत्न करण्याचे सोडून जुन्या ग्रामीण धंद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या वेडगळ प्रयत्नाकडे पाहून हसावे की रडावे तेच समजत नाही. आणि भवितव्यतेच्या उदरात आपल्या मायदेशाकरता काय भविष्य दडलेले आहे, याच्या अशुभ कल्पनेने काळीज कंपित होते. आणि आम्ही कधीहि उत्थानाची आशा करू नये अशा नैराश्यपूर्ण विचारांचा पगडा मनावर बसून चित्त विषण्ण होते.
वास्तविक पाहता आपणाला लहान-लहानश्या वस्तूंकरता देखील परदेशांवर अवलंबून राहावे लागते. सुया, टाचण्यांकरिता सुद्धा आपणाला बर्मिंगहॅमच्या तोंडाकडे पहावे लागते. मग मोटारी, विमाने, जहाजे आणि इतर यंत्रसामुग्री यांची गोष्टच कशाला? सध्या कोणत्याहि हेतूने कां होईना सरकारकडून प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे अनेक नवीन उद्योगधंद्यांची व कारखान्यांची सुरुवात केली जात आहे. आणि पुष्कळसे नवीन कारखाने यापुढील काळात हिंदुस्थानात काढण्याच्या योजना आखण्यात येत आहेत. या संधीचा फायदा घेऊन आपण निरनिराळ्या उद्योगधंद्यांची माहिती करून घेतली पाहिजे आणि हिंदुस्थानचे युद्धोत्तर काळात उद्योगप्रधान राष्ट्रात रूपांतर करण्याचा विराट प्रयत्न केला पाहिजे. हिंदुस्थानातील धनिकांनी व राजेरजवाड्यांनी आपल्या लक्ष्मीचा ओघ या कार्याकडे वळविला पाहिजे. कलावंतांनी आपली कला, कवि-लेखकांनी आपली प्रतिभा, पुढाऱ्यांनी आपली लोकप्रियता, वक्त्यांनी आपली सरस्वती ह्या महान राष्ट्रकार्याकरता राबवून घ््यायला हवी. लुप्तप्राय झालेल्या जुन्या ग्रामोद्योगांची मढी उकरून काढण्यात आपल्या शक्तीचा अपव्यय न करता तीच शक्ति या कार्याकडे खर्च केल्यास नवीन पायावर राष्ट्राची उभारणी व पुनर्घटना होऊन आपले राष्ट्र जगातील प्रगत राष्ट्रांच्या पंक्तीस जाऊन बसेल.
सर्व प्रकारचे कारखाने हिंदुस्थानात निघाले पाहिजेत. साध्या सुई-टाचणीपासून तर मोठमोठाल्या यंत्रापर्यंत, साध्या बिजागिरीपासून जहाजा-विमानापर्यंत, लोखंडी पेट्यांपासून आगगाड्याचे डबे व इंजिनापर्यंत, हरतऱ्हेच्या लोखंडी व पोलादी सामानाचे कारखाने आपल्याच भूमीत निघाले पाहिजेत. हरतऱ्हेचे काचेचे सामान, घड्याळी, फाउंटनपेन्स, रबरी सामान, कातडी सामान, नानाविध औषधे व रासायनिक द्रव्ये, चित्रपटांना लागणारी सामुग्री, या साऱ्यांचे कारखाने हिंदुस्थानात निघून कोणत्याहि वस्तूकरिता परदेशाच्या तोंडाकडे पाहण्याची आवश्यकता आपणाला भासता कामा नये. हिंदुस्थानात कच्चा माल भरपूर आहे. संपत्तिहि भरपूर आहे, मग लागा उद्योगाला आणि जगाच्या पाठीवरील आदर्श औद्योगिक राष्ट्र असा लौकिक आपल्या प्रिय भारताला प्राप्त करून द्या, आणि त्याला सुसमृद्ध, सुसंपन्न, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवा. नुसत्या खेड्यांना स्वयंपूर्ण करून काय होणार? आणि जोपर्यंत आपणाला आपल्या दैनंदिन गरजांकरिता परदेशांवर अवलंबून रहावे लागते तोपर्यंत खेडी तरी कशी स्वयंपूर्ण बनणार?
कारखान्यांची वाढ झाली तर शहरांची वाढ होते असा मुद्दा आपणासमोर मांडता येतो. शहरांची वाढ झाली तर त्यात काय बिघडले? मी तर असे म्हणतो की शेतीच्या धंद्याची सुद्धा पुनर्घटना झाली पाहिजे. आणि बाबा आदमच्या वेळेपासून चालत आलेल्या शेतकीच्या पद्धतीचा त्याग करून यांत्रिक पद्धतीने शेती करण्यात आली पाहिजे. ज्या कामाला पूर्वी १०० माणसे लागत होती, ते काम आता यंत्राच्या मदतीने एका माणसाकडून होण्याची शक्यता असतांना यंत्राची मदत न घेता शंभरहि माणसांना कामात गुंतवून ठेवणे हा शक्तीचा आणि कालाचा अपव्यय नव्हे काय?
माझ्या मताच्या समर्थनार्थ मला आपणाला कितीतरी सांगता येईल. रात्र थोडी आणि सोंगे फार! अवघ््या ५ मिनिटात एवढ्या महत्त्वाच्या आणि विस्तृत विषयाचे विवरण करावयाचे! आपण सूज्ञ आहात. समंजस आहात. सूज्ञास अधिक सांगणे न लगे! ठरावाच्या विरोधात आपण आपली मते द्यावीत अशी आपणाला विनंति करून मी आपली रजा घेतो.
ठराव : या सभेच्या मते हिंदुस्थानचे प्रचलित राष्ट्रीय धोरण आणि नीति सर्व दृष्टीने योग्य आहे
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुरे एक तप लोटते न लोटते तोच त्या तपाची सांगता स्वातंत्र्यरक्षणार्थ भीषण रणयज्ञाने करावी लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. चाउ एन लाय आमचा मानदंड असलेल्या आणि अतिप्राचीन कालापासून आमच्या देशाची उत्तरेकडील निसर्गनिर्मित सीमा समजल्या जाणाऱ्या नगाधिराज हिमालयाच्या प्रदेशात धुडगूस घालीत आहे. ब्रिटीश आमदानीपासूनची परंपरा प्राप्त झालेली मॅकमोहन लाईन ओलांडून लडाख आणि नेफा या विभागात चीनचे अतिक्रमण आणि आक्रमण सुरू आहे. लडाखसंबधी चीन व भारत यांच्यात काही तडजोड झाल्यास ती आम्हाला बंधनकारक होणार नाही अशी पाकिस्तानची बिचमे मेरा चांदभाई छापाची पोकळ वल्गना सुरू आहे. मागच्याच महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहॉवर यांचे हिंदुस्थानात आगमन होऊन गेले आणि दिल्ली शहर १० लक्षांच्या मेळाव्यानिशी त्यांचे स्वागत करण्यात मग्न झाले. रशियाचे अध्यक्ष मार्शल व्होरोमिलॉव हे येत्या २० तारखेला येऊ घातले आहेत. पुढील महिन्यात रशियाचे पंतप्रधान निकिता ख्रुश्चेव येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर उपर्युक्त ठराव येत आहे ही मोठी समयोचित घटनाच समजली पाहिजे. चीन अणि भारत यांच्यामध्ये पत्रव्यवहाराची ये-जा सुरू आहे. जवाहरलाल आपल्या भूमिकेवर अचल उभे आहेत. शक्यतोवर युद्ध टाळावयाचे पण शरणागति पत्करावयाची नाही. 'चीनसारख्या मित्रराष्ट्राशी युद्ध करण्याचा प्रसंग आल्यास भारताला फार वाईट वाटेल पण आपली इंचभर जागा गमावण्यास तो तयार होणार नाही. आम्ही आपल्यावर युद्ध ओढवून घेणार नाही पण आमच्यावर कोणी तसा बाका प्रसंगच आणल्यास आम्ही आमच्या मायभूमीच्या रक्षणासाठी रक्त, घाम आणि अश्रू गाळू.' अशा पद्धतीची भाषा बोलण्यात येत आहे. भारताच्या दुबळ्या परराष्ट्रीय धोरणाचे हे लंगडे समर्थनच नव्हे काय? प्रजेची नाराजी टाळावी, लोकक्षोभाला मुरड घालावी म्हणून आमच्या आवडत्या पंतप्रधानांनी कडक भाषा वापरण्याचा प्रयत्न चालविलेला दिसतो. पण मउ दिसले की कोपराने खणा अशा वृत्तीला चटावलेली परकीय राष्ट्रे भारताची नांगी पुरी ओळखून आहेत. त्या नांगीत डंख करण्याचे सामर्थ्य नाही हे त्यांना माहीत आहे आणि म्हणूनच त्यांची ही लांडगेतोड आणि कुतरओढ चालू आहे.
ख्रुश्चेव, आयसेनहॉवर आदि महाभाग जागतिक शांततेसाठी वरकरणी कितीहि तळमळत असले तरी त्यांचा आंतरःकोऽपि हेतुः असल्याचा दाट संशय येतो. या साऱ्या बुभुक्षितांच्या खवखवलेल्या नजरा भारताकडे लागल्या आहेत. आणि भारताच्या राजकारणात आपले नाक खुपसण्याची ते संधि पाहात आहेत. अशा परिस्थितीत भारताचे अनाक्रमणाचे, युद्ध टाळण्याचे, तटस्थतेचे, कोणत्याहि राष्ट्राशी लष्करी करार न करण्याचे प्रचलित परराष्ट्रीय धोरण आणि नीति पाहिली म्हणजे मनःश्चक्षूपुढे जे भयानक चित्र उभे राहते त्याने अंतःकरणाला भीतीचा चरका बसल्याशिवाय राहात नाही. दाराशी दावेदार येऊन उभा ठाकला असतांना असले पडखाऊ लेचेपेचे शांततावादी धोरण आत्मघातकीपणाचे ठरणार आहे.
लडाखच्या सरहद्दीचे संरक्षण करीत असलेल्या भारतीय पोलिसांना चीनने पकडून नेले तरी भारत स्तब्धच, त्यातले काही झटापटीत मेले तरी भारतावर काही परिणाम नाही. हिंदुस्थानचा कित्येक मैलांचा टापू चिनी सैन्याने प्रत्यक्ष अाक्रमिला असता हिंदुस्थान सरकार मात्र मित्रत्वाच्या व सामोपचाराच्या वृथा वटवटीचे वळसे वळविण्यातच व्यग्र झालेले दिसते? हिंदुस्थानचा स्वाभिमान केव्हा डिवचला जाणार व त्याच्या कोणत्या मानबिंदूवर आघात झाला असता तो दंड थोपटून अाणि भुजा ठोकून प्रतिपक्षाशी टक्कर देण्यास सज्ज होणार हे त्या परमेश्वरालाच माहीत! काश्मीर प्रकरणात पाकिस्थानच्या बाबतीत जे घडले तेच आज भारत-चीन सीमा प्रकरणात चीनच्या बाबतीत घडत आहे. अर्धा काश्मीर पाकिस्थानने गिळंकृत केला तरी पाकिस्थानविषयीच्या प्रेमाचा लोंढा अजून उतरलेलाच दिसत नाही. अजूनही हिंदुस्थान व पाकिस्थानच्या सीमेवरील खेड्यांची, शहरांची व मुलखाची देवाणघेवाण सुरूच आहे. फील्डमार्शल अयूबखानच्या भेटीचा उमाळा अजूनही जवाहरलालजींना आवरत नाही. आणि चाउ एन लायच्या मुलाखतीचे डोहाळे अजूनही त्यांना होत आहेत. शांततावादाची आमच्या मनावरील मायामय मोहिनी आमचा एखाद्या वेळी केवढा घात करील हे सांगणे कठिण आहे. जागतिक शांततेच्या मोलासाठी आम्ही आपल्या नवजात स्वातंत्र्यावर उदक सोडणार की काय?
अध्यक्ष महाराज! मला तर असे स्पष्ट म्हणावयाचे आहे की हिंदुस्थानचे प्रचलित परराष्ट्रीय धोरण व नीति आत्मघातकी, घरबुडवेपणाची व आपल्या पायावर धोंडा पाडून घेणारी आहे. हे धोरण व ही नीति हिंदुस्थानने जर बदलली नाही आणि कणखर धोरणाचा अवलंब केला नाही तर भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा विचार करावयासहि मन धजत नाही. वेदकालापासून भारताची उत्तर सीमा असलेल्या आणि ज्यात भारताची अनेक तीर्थक्षेत्रे व पवित्र स्थाने वसली आहेत अशा हिमालयावर चीनने जाणूनबुजून आघात केला असताना तो आमच्या मानबिंदूवरील मर्माघात समजून आम्ही आपल्या सर्व शक्तीनिशी चीनशी झुंज द्यावयास पाहिजे व त्याला आपल्या अभेद्य सामर्थ्याची अशी काही चुणूक दाखवावयास पाहिजे की पुन्हा हिंदुस्थानच्या केसास धक्का लावण्यापूर्वी त्याला हजार वेळा विचार करावा लागेल. माझ्या मते तर चीनला भारत सरकारने एक अल्पावधीचा अल्टिमेटम द्यावयास पहिजे की आमच्या भारतीय हद्दीत घुसलेले तुमचे सैन्य ताबडतोब काढून घ््या नाही तर आम्ही तुम्हाला हुसकावून लावू. Obey our orders and get out of our borders असा निर्वाणीचा खलिता जवाहरलाजींनी चाउ एन लायला धाडावयास हवा. तरच भारताच्या स्वातंत्र्यरक्षणाची काही आशा आहे. सध्याचे कालहरणाचे व शाब्दिक बुडबुड्यांच्या आतषबाजीचे धोरण अगदी कुचकामाचे आहे यात तिळमात्र संदेह नाही. मित्र हो! आपण सारे सूज्ञ आहात. भारताच्या हिताची आपणाला कळकळ आहे. तेव्हा सध्याच्या देशाच्या आणीबाणीच्या परिस्थितीत मला आपणाला एवढेच सुचवावयाचे आहे की व्यक्ति कितीहि मोठी असली तरी देशहिताच्या पुढे तिचा मुलाहिजा करू नका. सध्याचा काळ लोकशाहीचा आहे, व्यक्तिपूजेचा नाही. प्रभावी व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन आपल्या कर्त्तव्यात चुकू नका. हिंदुस्थान सरकारला आपण स्पष्टपणे बजावले पाहिजे की तुझे प्रचलित परराष्ट्रीय धोरण व नीति ही सर्व दृष्टींनी अयोग्य आहे आणि असे करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आजचा ठराव प्रचंड बहुमताने फेटाळून लावणे हाच होय. तेव्हा आपण ते कराल अशी आशा प्रकट करून मी आपली रजा घेतो.
एवढया सगळ्या गदारोळात केवळ एक भाषण बाबांनी स्वतःकरिता किंवा स्वतःच्या शिक्षकबंधूकरिता लिहिलेले आढळले. वादविवाद नसून हा परिसंवाद असावा. त्याने हे वादरण संपवू या.
ठराव : भारतात चालू असलेला भ्रष्टाचार थांबविण्यास आम्हीच समर्थ आहोत.
शिक्षणसंस्थेचा प्रतिनिधि या नात्याने शिक्षणसंस्थांचा पुरस्कार करण्याकरिता मी उभा आहे. भारतात आज भ्रष्टाचार चालू आहे याबद्दल वाद नाही. कोणतेहि क्षेत्र घ््या, सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. रेल्वे असो, पोस्टऑफिस असो, P. W. D. असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो की साधे सिमेंटचे वितरण असो, भाकरा नानगल धरण असो की पुण्याचे खडकवासला धरण असो. सर्वत्र भ्रष्टाचारच भ्रष्टाचार! हा भ्रष्टाचार कसा थांबवता येईल ही आजची ज्वलंत समस्या आहे. हा महत्त्वाचा प्रश्र, ही आजची डोकेदुखी आहे. भावनियंत्रण झाले, रेशनिंग झाले की तो माल खुल्या बाजारातून नाहीसा होतो व काळ्याबाजारात मनमाने भावाने विकल्या जातो. गरजवंतांना धान्य मिळत नाही आणि साठेबाजांच्या येथे ते पेवात सडते. सामान्य लोकांना घरदुरुस्तीकरिता सिमेंट मिळत नाही तर लक्षाधीशांचे शेकडो नवे बंगले उठतांना आपण पाहतो. गरीब व मध्यम स्थितीतल्या लोकांना जीवनातून उठण्याची पाळी आली आहे. कोर्टकचेरीतील कागद पुरेसे वजन असल्याशिवाय पुढे सरकत नाहीत वशिल्याशिवाय साधी कारकुनाची नोकरी मिळणे कठीण झाले आहे. वशिलेबाजी, भ्रष्टाचार, लाचतुचपत यांचेच सर्वत्र साम्राज्य आहे. गुणी, विद्वान पण प्रामाणिक व स्वाभिमानी माणसाला नोकरीतून हात धुऊन मोकळे होण्याची पाळी येते, तर नालायक माणसे खुशामतीच्या बळावर वर वर चढत जातात.
अशी सर्वत्र मोठी भीषण परिस्थिति आहे. आपल्या पंतप्रधानांना व प्रांतोप्रांतीच्या सरकारांना या परिस्थितीची जाणीव नाही असे नाही. भ्रष्टाचार विरोधी खाते निर्माण करण्यात आले. Anti-corruption Department! पण त्या खात्यातहि Corruption आहे असा शोध लागला. तेव्हा त्याला आळा घालण्यासाठी पुन्हा Anti-anti-corruption Department निर्माण करावे काय असा विचार सुरू आहे. पण Two negatives make one affirmative या व्याकरणातील नियमानुसार दोन Antis म्हणजे एक फॉरच हे आपणासारख्या विचारवंतांना काय सांगावयास पाहिजे? तो माणूस हुशार नाही असे नाही म्हणजे तो हुशार आहे असाच याचा अर्थ. तो अप्रामाणिक नाही म्हणजे तो प्रामाणिक आहे. तद्वतच Anti-anti-corruption Department हे देखील Corruption Department होणार की काय अशी भीती वाटते. ज्या न्यायाधीशाच्या कोर्टात भ्रष्टाचाराची चौकशी होणार ते न्यायाधीशहि भ्रष्टाचारापासून मुक्त नाहीत असे काही ठिकाणी प्रत्ययास येत आहे. बड्या सरकारी नोकरांनी आपल्या इस्टेटीचे व मालमत्तेचे हिशेब सादर करावेत असे बोलण्यात येते. पण या मलमपट्टीने काय होणार? रोगाचे निदान झाले पाहिजे. Diagnosis झाले पाहिजे. आणि त्यानुसार त्यावर उपाययोजना झाली पाहिजे.
भष्टाचार होण्याचे कारण मानवी वृत्ति भ्रष्ट झाली. पैसा हा देव बनला. नीतिमूल्यांचे महत्त्व उरले नाही. पाप पुण्याच्या कल्पना नष्ट झाल्या. इहलोक, परलोक, स्वर्ग, नरक या तर पुराणातील भाकडकथा ठरल्या. कोणत्याहि गोष्टीचा विधिनिषेध उरला नाही. समाजाच्या पाठीचा नैतिक कणा, Moral Backboneच मोडल्यासारखा झाला आहे. येनकेन प्रकारेण सव्यापसव्य कोणत्याहि मार्गाचे वावडे न ठेवता पैसा मिळवावयाचा हा आमचा बाणा बनला. साधनानाम् अनेकता, यथा साध्यं च साधनम् ही स्वातंत्र्यवीरांची स्वातंत्र्यप्राप्तीच्या राजकारणातील वाक्ये आम्ही आमच्या स्वार्थी अर्थकारणाला लावली. ही ढासळलेली नीतिमूल्ये सावरली पाहिजेत. तरच भ्रष्टाचार थांबण्याची शक्यता आहे. जोपर्यंत देश पारतंत्र्यात होता तोपर्यंत तो स्वतंत्र करण्यासाठी अहमहमिका प्रत्येकात लागली होती. त्यागाची स्पर्धा लागली होती. आता देश स्वतंत्र झाला आहे. आता सत्तेसाठी स्पर्धा लागली आहे. आणि सत्ता हाती आल्यावर त्या सत्तेचा स्वार्थासाठी उपयोग करू नये हा विवेक उरला नाही. मनाचा तोल सांभाळता येत नाही आणि 'विवेकभ्रष्टानां भवति विनिषातः शतसुखः' या न्यायाने सर्वत्र घसरगुंडी सुरू होते.
ही घसरगुंडी कशी थांबविता येईल हा आपल्यासमोरील प्रश्न आहे. मला असे म्हणावयाचे आहे की ही घसरगुंडी फक्त शिक्षणसंस्थाच थांबवू शकतात. शासनसंस्था थांबवू शकत नाही, माता रोखू शकत नाहीत किंवा समाजनेतेहि त्याला प्रतिबंध घालू शकत नाहीत. शिक्षणसंस्था, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, आचार्य, प्राचार्य हेच हा सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार थांबविण्यास समर्थ आहेत. प्राचीन काळापासून नीतिमूल्यांचे शिक्षण गुरुसंस्था, आचार्यसंस्था, ऋषिसंस्थाच करीत अाली आहे. विश्वामित्र रामलक्ष्मणांची मागणी करण्याकरिता दशरथाकडे आले. असुरांच्या निर्दालनासाठी ती मागणी होती. पुत्रमोहामुळे दशरथ संमूढ झाला. तेव्हा 'रघुकुलरीत सदा चल आयी, प्राण जाय पर वचन न जाई' असा उपदेश करून गुरुवसिष्ठांनीच दशरथ राजाला कर्त्तव्यप्रवृत्त केले. युवराज, राजपुत्र हे देखील गुरूच्या आश्रमात शिक्षण घेत असत आणि त्यांच्या तालमीत तयार झाल्यानंतरच ते राज्यपदावर आरूढ होत असत. शिवाजी महाराज देखील दादोजी कोंडदेवांच्या तालमीत तयार झाले. रामचंद्रपंत अमात्यांनी आपल्या आज्ञापत्रात राजपुत्रांना कसे शिक्षण द्यावे याचे मोठे सुंदर व मार्मिक वर्णन केले आहे. पण आता असे शिक्षण कोठेच राहिले नाही. मातांचा लाड, त्यामुळे मुले बिघडण्याची शक्यता, शासनसंस्थांतील पदाधिकाऱ्यांना सत्तेचा हपाप, दंडाने कार्यसाधन नाही, समाजनेते आपले पद टिकविण्यात गर्क, अशी आजची परिस्थिति.
चिपळूणकर, आगरकर, टिळक यांनी शिक्षकी पेशा पत्करला. कोणालाही हा भ्रष्टाचार थांबवावयाचा असेल तर शिक्षकाच्याच भूमिकेवर यावे लागेल.
ही सर्व भाषणे ओघवति भाषेत नाहीत असे कोण म्हणेल. त्यांनी अनेक सभा गाजवल्या. अनेक वादरणे जिंकलीत. पण हे सर्व वाचून एक प्रश्न राहून राहून मनात येतो. बाबांचे या विषयांवर स्वतःचे ठाम मत काय? या सभेच्या मते बाबांना स्वतःचे मतच नाही.
_____________________
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment