Sunday, 8 November 2015


द्वंद्व


प्रत्येकाला स्वतःचे मत असते हे मत लोकशाहीच्या मूळाशी आहे. स्वतःचे मत व्यक्त करणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे हे समजण्याइतपत शिक्षण मात्र स्वातंत्र्याला ५० वर्षे होऊनहि आपण बहुसंख्य लोकांना देऊ शकलो नाही. ज्यांना शिक्षण उपलब्ध आहे त्यातीलहि बऱ्याच जणांना खऱ्या अर्थाने सुशिक्षित म्हणणे योग्य होणार नाही. साम, दाम, दंड, भेद यातील साम बाजूला सारून उरलेल्या त्रयीने अशा लोकांची खरी मते व प्रत्यक्षात व्यक्त होणारी मते यात फारकत करता येते. आणि लोकशाही स्वार्थाकरिता राबवता येते. असो.

सांगायची गोष्ट अशी की प्रत्येक विषयावर प्रत्येकाला एक मत असणे हे स्वाभाविक आहे. पण त्याच विषयावर परस्पर भिन्न मते असणाऱ्या आणि ती ठामपणे मांडण्याचे धार्ष्ट्य करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल? बिनबुडाचा पेंद्या म्हणाल की दुतोंड्या म्हणून संबोधाल? तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा, आम्ही मात्र त्यांना 'बाबा' म्हणतो.

प्रत्येक वादविवाद स्पर्धेत शाळेकडून दोन प्रतिस्पर्धी जात. एक विषयाच्या बाजूने बोलणारा, तर दुसरा विरोधात. बरेचदा दोघांचीहि भाषणे बाबांनीच लिहिलीत. इकडूनहि मते मांडलीत, तिकडूनहि. मंडनहि केले, खंडनहि. ठरावाचे काहीहि होवो. पास होवो वा नापास. शेवटी बाबाच जिंकले. चित मैं जीता, पट तू हारा!

वादविवाद स्पर्धेत ठरावाचे समर्थन करणाऱ्यांत सर्वाधिक गुण ज्याला मिळतील त्याला व ठरावाचा विरोध करणाऱ्यांत सर्वाधिक गुण ज्याला मिळतील त्याला, अशा दोघांनाहि वैयक्तिक पारितोषिके तसेच प्रतिपादक व विरोधक दोघेहि मिळून ज्या शाळेला सर्वाधिक गुण मिळतील त्या शाळेला चषक देण्यात येत असे. बरेचदा ही सर्व लूट बाबांच्या शाळेलाच प्राप्त होत असे. अशी लुटालूट करणारी काही भाषणे येथे घेतली आहेत.



ठराव : ह्या सभेच्या मते आजवरचा जगाचा इतिहास योद्ध्यांनी घडविला नसून शास्त्रज्ञांनी घडविला आहे.


विरोधाचे भाषण


आजच्या सभेपुढील ठराव आपणा सर्वांना विदितच आहे. मी प्रथमच आपणास सांगून टाकतो, की मी ठरावाला विरोध करणार आहे, आणि कसून विरोध करणार आहे. ठरावच त्या लायकीचा आहे. म्हणे, शास्त्रज्ञांनी इतिहास घडविला! इतिहास म्हणजे काय हे तरी कळतं का यांना? ठराव तर मान्य नाही आणि समर्थन तर करायचं. मग काय? द्या मूळ ठरावाला बगल! टाका इतिहास शब्दाचा अर्थ बदलून आणि फेका लोकांच्या डोळयात धूळ! परंतु ही फसवेगिरी आहे, धूर्तपणा आहे, धूळफेक आहे. निदान गजाननाच्या पवित्र मूर्तिसमोर तरी असे करू नका. ठराव मान्य नसेल तर प्रामाणिकपणे तसे सांगा. कशाला उगीच ठरावाचे समर्थन करण्याच्या फंदात पडता? आणि आपले हसे करून घेता? आणि ठरावाला तुम्हाला विरोध करावयाचा असेल तर सरळ सरळ विरोध करा. असा लपंडाव कां? मित्र हो! यांच्या ह्या कारवाईला फसू नका.

काय ते आमच्या विरोधकांचे युक्तिवाद नी काय ती एक एक मतं! मला तर ऐकून हसूच आले आणि या बुद्धिवाद्यांच्या बुद्धिमांद्याची कीव करावीशी वाटली. ठरावाचे समर्थन करणाऱ्यांपैकी काही जण माझे मित्र आहेत आणि काहींचा माझा दाट परिचय आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेविषयी मला शंका नाही. पण काय चमत्कार पहा! जो ठराव आपणाला पसंत नाही त्याचे समर्थन करावयाचा अप्रामाणिकपणा करू जाताच त्या बुद्धिदात्या गणरायाचा त्यांच्यावर कोप झाला असे दिसते. त्याने त्यांची बुद्धि हरण केली. एरवी अशी परस्परविरोधी विधाने ते करते ना आणि आपणावरच उलटणारे मुद्दे लोकांसमोर मांडते ना. असो. ठरावाच्या विरोधकांचा समाचार पुरे झाला. आता मी आजच्या मुख्य विषयाकडे वळतो.

आजवरचा जगाचा इतिहास योद्ध्यांनीच घडविला ही गोष्ट निर्विवाद आहे. यावर फारसे विवेचन न करताहि ही गोष्ट सहज पटण्यासारखी आहे. योद्धे जगाचा इतिहास घडवितात इतकेच नव्हे तर ते जगाचा नकाशा बदलवू शकतात. मोठमोठाली साम्राज्ये अस्तित्वात आली आणि लयाला गेली. ग्रीक साम्राज्य, रोमन साम्राज्य, केवढी थोरली साम्राज्ये! त्यांचा कुठे मागमूस उरला नाही. हिंदुस्थानात केवढी स्थित्यंतरे झाली. हिंदु साम्राज्ये, पठाणांचे राज्य, मोगल साम्राज्य, मराठी साम्राज्य आणि नंतर इंग्रजी साम्राज्य. ही सारी उलथापालथ आणि घडामोड कोणी केली? योद्ध्यांनी आणि लढवय्यांनी. प्रयोगशाळेत बसून परीक्षण नलिकेत पदार्थांचे गुणधर्म पाहणाऱ्या रसायन शास्त्रज्ञांनी किंवा आकाशाकडे आपल्या दुर्बिणी रोखून ग्रहांची गति ठरवणाऱ्या खगोल शास्त्रवेत्त्यांनी नव्हे. पृथ्वी सपाट आहे असा पूर्वी ग्रह होता. गॅलिलिओने ती गोल आहे असे सांगितले. काय घडामोड झाली जगाच्या इतिहासात? गेले का एखादे साम्राज्य रसातळास आणि आले का एखादे नवीन उदयास? का पृथ्वी सपाट असताना लोक दुःखी होते, अवनतीच्या गर्तेत लोळत होते आणि गॅलिलिओने ती गोल आहे असे सांगताच ते सुखी झाले आणि उन्नत झाले. जगाच्या इतिहासात काडीचाहि आणि कवडीचाहि फरक झाला नाही. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, प्रिस्ले, कॅव्हेन्डिश, लॅव्हॉयझिअर यांनी रसायनशास्त्रात बरेच पुढे पाऊल टाकले. पण यांनी जगाचा इतिहास तो काय घडविला नी बदलविला? कशाला उगीच या शास्त्रज्ञांचे स्तोम माजविता? हे शास्त्रीय युग आहे असे म्हणतात. साफ खोटी गोष्ट. अजुनहि हे योद्ध्यांचे आणि लढवय्यांचेच युग आहे. क्षत्रियांनीच जगाचा इतिहास आजवर घडविला आहे. लक्ष्मणाला तत्त्वज्ञान सांगणाऱ्या रामाला रावणाशी युद्धच करावे लागले. गीतेचे थोर तत्त्वज्ञान सांगणाऱ्या श्रीकृष्णाला अर्जुनाला युद्ध कर म्हणूनच उपदेश करावा लागला. युद्धाच्या ज्वाला सभोवार भडकलेल्या असतांना, सभोवार अठरा अक्षौहिणी सैन्य सज्ज असतांना समरांगणावरच गीतेसारख्या अमर तत्त्वज्ञानाचा जन्म झाला. यातच युद्धाची आणि योद्ध्यांची थोरवी सिद्ध होते. जगज्जेता अलेक्झांडर! त्याने सारे जग पादाक्रांत केले. नेपोलियन! त्याने सारे युरोप हादरवून सोडले. तो नेल्सन! अजूनहि इंग्लिश लोक त्याचे गोडवे गातात. सव्यसाची धनंजय प्रख्यात योद्धा होता. भगवान श्रीकृष्ण त्याचा सारथि झाला. उगीचच नव्हे. श्रीकृष्णहि जाणून होता की योद्ध्यांच्या भ्रूभंगामुळे साम्राज्ये हादरतात, राजसिंहासने डळमळतात, राजमुकुट कोलमडतात. मित्रहो! योद्ध्यांनीच आजवरचा जगाचा इतिहास घडविला आहे. शास्त्रज्ञांनी नव्हे. देवांनाहि दानवांशी युद्धच करावे लागले. कितीहि बाता मारल्या, शांतीचे व अहिंसेचे गोडवे गाइले तरी युद्धसंस्था ही अमर आहे. युद्धे जगातून नाहीशी होणे अशक्य आहे. 'चातुर्वर्ण्यम् मया सृष्टम्' असे खुद्द भगवान श्रीकृष्ण सांगतात. क्षत्रियांचा वर्ण खुद्द परमेश्वराने निर्माण केला. मग तो जगाच्या अंतापर्यंत टिकणार यात संशय जे ते नाही.

मित्रहो! वस्तुस्थितीकडे डोळेझाक करू नका. नीट विचार करा. आजवरचा जगाचा इतिहास इतिहास म्हणजे तरी काय आहे? साम्राज्यांची उलथापालथ, राजसत्तेची स्थित्यंतरे, लढायांची व युद्धांची वर्णने, राजांच्या कारकिर्दी, योद्ध्यांची कर्तबगारी, सत्तेचे हस्तांतर व्हावे म्हणून झालेल्या निरनिराळ्या चळवळी, बंडे, स्वातंत्र्ययुद्धे हेच ना? सारा जगाचा आजवरचा इतिहास चाळा, आणि तुम्हाला याखेरीज त्यात काय आढळते ते सांगा.

अध्यक्ष महाराज! हे लोक ज्या शास्त्रज्ञांचे स्तोम माजवितात ते स्वतः आणि त्यांची सारी शास्त्रे ही तरी योद्ध्यांकरवी व मुत्सद्यांकरवी स्वतःच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तिकरिता राबविली जातातच की नाही? शास्त्रज्ञांचे सारे शोध मानवाच्या संहाराच्या कामी कसे उपयोजिले जातात, याचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर अगदी ताजा आहे. ज्या शास्त्रज्ञाने विमानाचा शोध प्रथम लावला त्याला ही कल्पनाहि नसेल की, आपल्या शोधाचा असा भयंकर परिणाम होईल म्हणून. निरनिराळे प्राणहारक वायू, तऱ्हेतऱ्हेचे  बाॅम्ब्ज् ज्यावर अॅटमबॉम्बने मात केली, मशीन गन्स, टॉर्पेडोज्, पॅरॅशूट्स्, पाणबुड्या आणि इतर प्राणघातक अस्त्रे या सर्वांचा नुकत्याच संपलेल्या युद्धात उपयोग केला गेला. शास्त्रज्ञ हे योद्ध्यांचे व मुत्सद्यांचे गुलामच होत हेच नाही का यावरून सिद्ध होत? नुकत्याच संपलेल्या महायुद्धाने तर जगाचा इतिहासच पुन्हा एकदा बदलून टाकला. जर्मनीचे खच्चीकरण झाले. तो यापुढे फक्त एक शेतकीप्रधान देश बनणार. जपानचे पूर्वदिशेचा सम्राट होण्याचे सारे मनोरथ ढासळले. ह्या घटना इतक्या ताज्या आहेत की, आतातरी योद्धेच जगाचा इतिहास घडवितात याविषयी कोणालाहि संशय राहू नये. मुद्दाम वेड पांघरून पेडगावास जाणाऱ्यांची गोष्ट निराळी किंवा 'मेरी मुर्गीकी एकहि टांग' अशा अट्टाहासाने आपल्या बाजूची वैय्यर्थता पटली तरी इभ्रतीच्या पोकळ कल्पनेला बळी पडून तिची कास न सोडणाऱ्यांची गोष्ट निराळी.

मित्रहो! आपल्याला मला एक विनंति करावयाची आहे. जरा बुद्धि वापरून ठरावावर विचार करा व मग आपली मते द्या. कोणाचीहि भीडमुर्वत धरू नका. मला खात्री आहे की आपण सर्वजण ठरावाच्या विरुद्ध मते द्याल. आपण ठराव इतक्या प्रचंड मताने फेटाळून लावा की समर्थकांच्या छातीत धडकीच भरेल. ठरावाच्या विरुद्ध कितीतरी मुद्दे मांडता येण्यासारखे आहेत. पण सर्व सांगत बसलो तर एक घंटा लागेल व अध्यक्षांना घंटा वाजवावी लागेल. तेंव्हा अध्यक्षांवर व स्वतःवरहि हा प्रसंग ओढवून घेण्याची माझी इच्छा नाही.

आपण माझे भाषण शांतचित्ताने ऐकून घेतले, याबद्दल आपले आभार मागून मी आपली रजा घेतो.

समर्थनाचे भाषण


आजच्या या सभेपुढील ठराव - ज्याचं मला समर्थन करावयाचं आहे - तो अत्यंत महत्त्वाचा आणि मूलस्पर्शी आहे. ठराव अत्यंत स्पष्ट आहे. 'आजवरचा जगाचा इतिहास योद्ध्यांनी घडविला नसून शास्त्रज्ञांनी घडविला आहे' असा तो ठराव आहे. ठराव सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट आणि सत्य आहे. फक्त मुद्दा इतकाच की काही लोकांची दृष्टी बिघडली असल्यामुळे, त्यांना कावीळ झाला असल्यामुळे, वस्तूंचे यथार्थ स्वरूप त्यांच्या नजरेत भरत नाही. मला आज इथे एकच गोष्ट करावयाची आहे. ती ही की या लोकांची दृष्टी साफ करावयाची आहे. त्यांचा विपरीत दृष्टिकोण बदलावयाचा आहे. आणि परिणामतः त्यांना हे पटवून द्यावयाचे आहे की, जगाचा आजतागायतचा इतिहास घडविण्याच्या कामी शास्त्रज्ञांनी फार मोठा वाटा उचलला आहे. कैक योद्धे आले आणि गेले. पृथ्वीवर रक्ताचे पाट वाहिले. अपरिमित मनुष्यसंहार झाला. राष्ट्रांचे तारुण्य खच्ची झाले. पिढ्याच्या पिढ्या गारद झाल्या. सर्वत्र कहर माजला. लोक त्रस्त झाले. प्रदेश उध्वस्त झाले, आणि साम्राज्यपिपासू उन्मत्त लोक मस्त झाले. हीच ना योद्ध्यांची नी लढवय्यांची कर्तबगारी? श्रुतिस्मृतिपुराणोक्त देवदानवांची युद्धे, राम रावणाचे भीषण युद्ध, कौरव पांडवांचा भारतीय संग्राम ही जगाने पाहिली. जगज्जेत्या अलेक्झांडरने केलेल्या लढाया तुम्ही वाचता. आणि तेव्हापासून नुकत्याच संपलेल्या महायुद्धापर्यंतच्या यच्चयावत लढायांची रसभरित वर्णनेहि तुम्हाला इतिहासात वाचावयाला मिळतात. पण योद्ध्यांच्या नामावली आणि लढायांच्या सनावली हा का इतिहास झाला? आपणाला शाळांमधून असाच मृत इतिहास शिकविण्यात येतो ही गोष्ट खरी. पण तो खरा इतिहास नव्हे हीहि गोष्ट तितकीच खरी. जिवंत इतिहास आपण शिकावयास पाहिजे. इतिहासात जिवंतपणा ओतावयास पाहिजे. युद्धात गतप्राण झालेल्या योद्ध्यांची मढी पुन्हा उकरणे म्हणजे इतिहास नव्हे, तर मानवी समाज कसकसा उत्क्रांत होत गेला, निरनिराळ्या तत्त्वज्ञान्यांनी आणि शास्त्रज्ञांनी प्रतिपादिलेले अमर तत्त्वज्ञान आणि उजेडात आणलेली सत्ये यांचे संकलन म्हणजेच खरा इतिहास होय. मनुष्यप्राण्यांइतकीच युद्धे प्राचीन आहेत हे मीहि मानतो. पण युद्धप्रवृत्ति हा मानवाच्या ठिकाणी शिल्लक राहिलेला पाशवी संस्कार होय. हा पाशवी संस्कार मनुष्याच्या वृत्तीतून नाहीसा होईल तेव्हा योद्ध्यांची जात आपोआप नष्ट होईल हे उघड आहे, आणि असे घडेल तो इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवला जाईल. 'युद्धस्य वार्ता रम्या' या न्यायाने तुम्हाला लढायांची वर्णने गोड वाटतात. काही तथाकथित लोकांचे पुढारी तर मागील लढायांपासून स्फूर्ति घेऊन नवीन लढाया लढण्यास लोकांना उद्युक्तहि करतात. करोत बिचारे.

पण जरा खोल विचार करा. केवळ भावनेच्या आहारी जाऊ नका. आपली बुद्धी गहाण नका ठेऊ. मेलेल्या मढ्याला प्राण नका समजू. योद्ध्यांनी प्रतिपक्षाचे मुडदे पाडले असतील. पण शास्त्रज्ञांनी मानवी जीवनात प्राण ओतला आहे. मनुष्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक सर्वांगीण प्रगति केली आहे. रानटी माणसाला आजच्या सुधारलेल्या युगात आणून सोडले आहे. ज्याला विस्तव कसा पेटवावा, शेती कशी करावी, वस्त्र कसे तयार करावे हे देखील माहीत नव्हते, जो अंगाला रंग फासून अगर वल्कले नेसून आपले लज्जारक्षण करीत होता, शिकार केलेल्या जनावरांचे कच्चे मांस खात होता आणि हिंस्त्र श्वापदांप्रमाणे आपल्याच भाईबंदांच्या दुसऱ्या टोळ्यांवर प्राणघातक हल्ले करीत होता, तो मानव आणि विसाव्या शतकातील आजच्या शास्त्रीय युगातील सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुधारलेला मनुष्य. काय जमीनअस्मानचे अंतर! केवढी तफावत? पण याला कारणीभूत कोण? कोणाचे हे उपकार? अलेक्झांडरचे की नेपोलियनचे? नेल्सनचे, चर्चिलचे की हिटलरचे? नाही. यापैकी कोणीहि तुम्हाला उन्नत केले नाही. प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरिता किंवा देशाच्या स्वार्थाकरिता, साम्राज्यतृष्णेकरिता अगर द्रव्यलालसेनिमित्त दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण केले. रक्ताचे पाट वाहविले. सर्वत्र हाहाःकार आणि कहर यांचे साम्राज्य पसरविले. पण वरपांगी मात्र जगाला भुलविण्याकरिता स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यांचा जयघोष केला. यांनी आपल्या रक्तलांच्छित यशाने जगाच्या दुःखातच भर घातली. एका युद्धातून दुसरे युद्ध निर्माण झाले. दुसऱ्यातून तिसरे. आणखी कैक युद्धे या काळाच्या उदरात साठविली आहेत ते एका विघ््नहर्त्या गजाननालाच ठाऊक. देवा गजानना! तू सुखकर्ता दुखहर्ता आहेस. टळू दे एकदाची कायमची ही मानवाच्या कपाळीची युद्धांची पीडा! आणि अखिल मानवजात सुखी, समृद्ध, स्वतंत्र आणि उन्नत होऊ दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

आता आपल्या सर्वांना कळून चुकले असेल की योद्ध्यांनी कोणतेहि चिरकालीन महत्त्वाचे कार्य केले नाही. त्यांनी एकच कार्य केले आणि ते म्हणजे शास्त्रज्ञांनी आणि तत्त्वज्ञांनी घडविलेल्या उज्वल इतिहासाला आपल्या कृष्णकारस्थानांनी आणि रक्तानी बरबटलेल्या हातांनी रक्ताचे गालबोट लावले. प्राचीन काळच्या रानटी अवस्थेतून सांप्रतच्या सुधारलेल्या स्थितीत जर तुम्हाला कोणी आणले असेल तर सृष्टीची सत्ये हुडकण्याकरिता अविश्रांत परिश्रम करणाऱ्या, स्वतःच्या प्रयोगशाळेत बाह्य जग विसरून, यशाची, द्रव्याची पर्वा न करता अधिकाधिक ज्ञान मिळविण्याकरिता आमरण धडपडणाऱ्या त्या थोर निःस्पृह शास्त्रज्ञांनी.

तो तत्त्ववेत्ता प्लेटो आणि अॅरिस्टाॅटल, डेमॉक्रिटस आणि थिओफ्रॅस्टस, ग्रहांच्या गतीचे नियम शोधून काढणारे केप्लर आणि कोपरनिकस, पृथ्वी गोल आहे असे प्रतिपादन केल्यामुळे देहांत शासन भोगावे लागलेला गॅलिलिओ, गुरुत्वाकर्षणाचे तत्त्व शोधून काढणारा सर आयझॅक न्यूटन, वायूच्या दाबातील व व्यापातील परस्परसंबंध शोधून काढणारा रॉबर्ट बॉइल, हेन्ऱी कॅव्हेन्डिश, जोसेफ प्रिस्ले व लॅव्हॉयझियर सारखे रसायनशास्त्रज्ञ, ब्रॅडले, हर्शेल, डाल्टन, विद्युत्संशोधन करणारे फॅरॅडे व लॉर्ड केल्व्हिन, उत्क्रांतिवाद जगासमोर मांडणारा डार्विन या शास्त्रज्ञांच्या उपकारामुळे तुम्ही आज या स्थितीत आहात. आणि आजकालच्या युद्धातील योद्धे तरी कोणाच्या बळावर नाचतात? शास्त्रज्ञांच्याच. शास्त्रज्ञांच्या अविश्रांत परिश्रमाच्या आयत्या पिठावरील नागोबा म्हणजे हे योद्धे व मुत्सद्दी. शास्त्रज्ञांच्या प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे हे राक्षस. असो. तेव्हा आता आपणाला हे कळून चुकले असेल की आजवरचा जगाचा इतिहास योद्ध्यांनी घडविला नसून शास्त्रज्ञांनी घडविला आहे. जरा आपली बुद्धि वापरून सखोल विचार करा म्हणजे याची सत्यता आपणाला पटल्यावाचून राहणार नाही. माझी आपणाला विनंति आहे की आपण सर्वांनी ठरावाच्याच बाजूने मते द्यावीत आणि ठराव एकमताने पास करावा.

आपण सर्वांनी माझे भाषण शांतपणाने ऐकून घेतले याबद्दल आपले आभार मानून मी आपली रजा घेतो.

साधारण १- २ वर्षाचे एक मूल घ््या. त्याला विचारा  'बाला, तुला आई आवडते की बाबा?' तो उत्तर देईल 'बाबा'. नंतर त्यालाच तुम्हीच त्याच सुरात विचारा, 'बाला, तुला बाबा आवडतात की आई?' तो उत्तर देईल 'आई'. आणखी असेच काही प्रश्न विचारून पाहा. लहान मूल नेहमी दुसरी ऑप्शन निवडेल. वरील दोन भाषणे वाचतांना आपलेहि असेच होते. पहिले भाषण वाचले की वाटते, योद्धेच इतिहास घडवितात. आणि दुसरे भाषण वाचले की आपण शास्त्रज्ञांच्या बाजूचे होतो. हीच बाबांच्या विचारांची व ते मांडण्याच्या शैलीची गंमत आहे. आपण भारावून जातो.

ह्या वादविवादात नेमकी कोणती बाजू जिंकली हे माहित नाही. गांधीच्या या देशांत कदाचित लाजेकाजेखातर योद्ध्यांची बाजू घेणे शक्य नसल्यामुळे शास्त्रज्ञांच्या बाजूची सरशी झाली असेल. पण या अहिंसक व निरुपद्रवी प्राण्यांची पुढची मॅच तितक्याच अहिंसक पण बऱ्याचशा उपद्रवी प्राण्यांशी, साहित्यिकांशी, झाली.




ठराव : ह्या सभेच्या मते वाङमय हे विज्ञानापेक्षा ज्यास्त प्रभावी आहे.


समर्थनाचे भाषण


आजच्या सभेपुढील वादाचा विषय हा आहे की 'वाङमय हे विज्ञानापेक्षा ज्यास्त प्रभावी आहे.'. मी आपणाला प्रथमच सांगूनच टाकते की, मी ठरावाच्या अनुकूल भाषण करणार आहे, आणि आपणाला पटवून देणार आहे की, खरोखरीच वाङमय हे विज्ञानापेक्षा ज्यास्त प्रभावी आहे. आणि हे सगळं साहस आजच्या या तथाकथित विज्ञानाच्या युगात मी करणार आहे.

या ठरावाला विरोध करणाऱ्या साऱ्या महाभागांची भाषणं आपण ऐकली आहेत, मीहि ऐकली आहेत. त्यांचे तीन वर्ग पडतात. काही बिचारे मंद बुद्धीचे पण प्रामाणिक. त्यांना ठरावाची व्याप्तिच कळली नाही. त्यामुळे अतिव्याप्तिचा किंवा अव्याप्तिचा दोष त्यांच्या भाषणात अजाणताच आला. विराधकांचा दुसरा वर्ग दांभिक लोकांचा. ठराव सूर्यप्रकाशाइतका सत्य व स्पष्ट असल्यामुळे त्याला सरळ सरळ विरोध करण्याची शक्यता नाही. तेव्हा बुद्ध्याच वेड पांघरून पेडगावला जाण्याचा त्यांनी नसता खटाटोप केला. आणि विरोधकांचा तिसरा वर्ग म्हणजे विज्ञानाच्या संहारक नी विनाशक वर्चस्वाने भेदरलेल्या लोकांचा. ते इतके घाबरून गेले की साप सोडून भुईच झोडपत बसले. कुणी विज्ञानाचा हा सर्वत्र हैदोस चालला दिसतो आहे त्याचं खापर राजकारणी मुत्सद्यांवर आणि धर्माधिकाऱ्यांवर फोडलं तर काहींनी मानवाच्या योजकतेवर. काही विद्वानांनी व विदुषींनी विदुषकी थाटाच्या कोलांटउड्‌या घेऊन श्रोतृवर्गाला थक्क करून सोडलं. त्यांच्या या गारुडी करामतीबद्दल त्यांना धन्यवाद! अग्नीच्या साहाय्याने पंचपक्वान्न शिजवता येतात तशी घरंहि पेटवता येतात. सुरीने भाजी चिरता येते तशी ती पोटात खुपसून प्राणहि घेता येतो. अशा ठरीव साच्याच्या भ्रामक आणि बुरसटलेल्या युक्तिवादाचा आश्रय तर इतकेदा घेण्यात आला की त्याची शिसारी आली. कामाचे बोलणे संपले की बोलण्याचे काम असा आमच्या विरोधकांचा थाट दिसला. विज्ञानाच्या सत्याचा प्रकाश आम्हाला सहन न झाल्यामुळे आम्ही डोळे मिटून घेतले व त्या मिटल्या डोळ्यांनी आम्ही विज्ञानाच्या कामगिरीकडे पाहत आहोत असे एक जण म्हणाले. मोठ्या विशाल दृष्टिकोणाचा आणि गतिमानतेचा आव आणून ते म्हणाले की आमच्या मानव्याविषयीच्या कल्पना व्यासवाल्मिकींच्या काळातल्या आहेत. आम्ही संस्कृतीच्या जुन्याच डबक्यात वावरत आहोत. डोळ्याला झडपा बांधलेल्या घोड्याप्रमाणे आमची दशा आहे वगैरे वगैरे. पण बिचाऱ्यांनी त्यांच्या मानवविषयक कल्पनांचं १९६२ चं मॉडेल कोणतं ते सांगितलं असतं तर आम्हा गरीबांवर फार उपकार झाले असते. सत्य, बंधुप्रेम, कर्तव्यनिष्ठा, मानवता अशा चिरंतन मूल्यांच्या कल्पनाहि बदलत असतात हा त्यांचा शोध बाकी वैज्ञानिकांनाहि लाजविणारा आहे हे खचित. आमच्या विरुद्ध बाजूच्या बहुतेक वक्त्यांनी ठरावाच्या मंडनावर भर न देता खंडनावरच आपल्या जिभेची हौस भागवून घेतली, आणि तीहि हलक्या पातळीवरून. मुद्यांचे पाठबळ नसल्यामुळे त्यांनी गुद्यांवरच वेळ मारून नेली. एकाला तर वादविवादात टीका करताना प्रतिस्पर्ध्याचा नामोल्लेख करणे हा शिष्टाचार नव्हे या शिष्टाचाराचेहि भान राहिले नाही. खंडन धेनूसी दुग्ध किंचित । परी लत्ताप्रहार करी बहुत ।।, किंवा, बिंदुमात्र विष वृश्विका । परी पुच्छाग्र वरुते देखा ।। असाच आमच्या बहुतेक विरोधकांचा खाक्या दिसला. असो. विरोधकांचा एवढा समाचार पुरे. आता विषयाच्या समर्थनाकडे वळू.

सध्याचं म्हणे विज्ञानाचं युग आहे. आणि एका अर्थानं ते खरंहि आहे. सकृद्दर्शनी पाहता विज्ञानाचा प्रभाव आपणाला दिसून येतो. मोटार, विमान, रेडिओ, टेलिव्हिजन आदि शोधांनी आपले डोळे दिपून जातात. अणूशक्तीचा उपयोग मानवाच्या संहाराकरिता ज्यास्तीत ज्यास्त कसा करून घेता येईल याविषयी राष्ट्राराष्ट्रात स्पर्धा चाललेली दिसून येते. क्ष किरण, रेडिअम, पेनिसिलिन आणि बी. सी. जी. आदि शोधांनी केवढी क्रांती घडवून आणली आहे, आणि असाध्य व महाभयंकर समजल्या जाणाऱ्या रोगांवर मात केली आहे. पण जरा खोल विचार करा म्हणजे आपणाला असे दिसून येईल की, विज्ञानाचा हा प्रभाव आभासमय व भ्रममूलक आहे. किंबहुना विज्ञानाचा हा जो प्रभाव दिसतो तो वास्तविक पाहता विज्ञानाचा नसून वाङमयाचा आहे. वाङमयावाचून विज्ञान लंगडे आहे. विज्ञानाला कार्यप्रवण करण्याची शक्ति वाङमयात आहे.

आता माझे म्हणणे काही उदाहरणांनी स्पष्ट करू. जगात आज एक बलाढ्‌य शक्ति म्हणून समजला जाणारा रशिया - एक नवीन समाजरचना व राज्ययंत्रणा अस्तित्वात आणणारा रशिया - जगातील सर्व मजूरांचे स्फूर्तिस्थान असणारा रशिया - हे स्थान रशियाला कसे प्राप्त झाले? काय ते विज्ञानाच्या जोरावर? नाही. कार्ल मार्क्सच्या स्फूर्तिदायी आणि तेजस्वी तत्त्वज्ञानाने आणि वाङमयाने. लेनिनच्या प्रभावी वाणीने. लेनिनने आपल्या वाङमयाने रशियाच्या पददलित मजूरांत व शेतकऱ्यांत नवचैतन्य निर्माण केले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. 'Workers of the world unite' या घोषणेने त्यांची हृदये भारून टाकली व त्यांच्या एकत्रित प्रयत्नाने अनियंत्रित झारशाही उलथून पाडली. रशियाची आज जी प्रगती झाली आहे, त्या कामी रशियनांनी विज्ञानाची मदत घेतली असेल, पण ते केवळ साधन म्हणून.

मुसोलिनीने आपल्या वाङमयाने काही वर्षांपूर्वी इटलीला इतके बलाढ्‌य केले होते. जोसेफ मॅझिनीने आपल्या तेजस्वी वाङमयानेच आयर्लंडला स्वतंत्र केले. पण ही दूरदूरच्या राष्ट्रांची उदाहरणे कशाला? आपल्याच देशात शिवाजी महाराजांनी मुसलमानांच्या बलाढ्‌य साम्राज्याशी टक्कर देऊन महाराष्ट्रात हिंदुपदपातशाहीची ध्वजा उभारली, ती कशाच्या जोरावर? श्री रामदासांच्या वाङमयाच्याच जोरावर ना? शिवकालीन व शिवपूर्वकालीन महाराष्ट्र संतांनी आपल्या अमर वाङमयातून लोकांच्या मनात स्वत्वाची भावना आणि परदास्याविषयी चीड उत्पन्न केली, जमीन नांगरून तयार केली, आणि म्हणूनच शिवरायांना तिच्यात स्वातंत्र्यवृक्षाचे बीजारोपण करता आले. शिवाजीने जो विजय मिळवला, तो काही विज्ञानाच्या जोरावर खास नव्हे.

आमचे विरोधक म्हणतील की त्या काळी विज्ञानाची इतकी प्रगति झालीच नव्हती. आजच्या सभेपुढील जो ठराव आहे तो सद्यस्थितीविषयी आहे. बरे तसे कां असेना. हिंदुस्थानने जे स्वातंत्र्य मिळविले ते तर अवघ््या चार वर्षांपूर्वीच ना? ती तर पुरातन काळची गोष्ट नव्हे. ते कशाच्या जोरावर? काय विज्ञानाच्या जोरावर? आपणा सर्वांना माहित आहे की, वैज्ञानिक प्रगतीत आपला हिंदुस्थान देश किती तरी मागासलेला आहे. त्याची विज्ञानाच्या बाबतीत इंग्लंड, अमेरिका किंवा रशिया यांच्याशी तुलना देखील करता येत नाही. असे असतांना सुद्धा हिंदुस्थानने इंग्लंडसारख्या बलाढ्‌य राष्ट्रापासून आपले स्वातंत्र्य परत मिळविले. हे कसे शक्य झाले? लोकमान्य टिळकांच्या स्फूर्तिदायी व्याख्यानांनी व लेखांनी, सावरकरांच्या प्रतिभाशाली लेखणीने, लाल, बाल, पाल या त्रयीच्या अमर संदेशांनी, देशाच्या स्वातंत्र्ययुद्धात आपल्या प्राणांचे हवन करून अमर झालेल्या क्रांतिवीरांच्या क्रांतिगीतांनी, एका हाती गीता घेऊन हसत हसत फासावर लटकणाऱ्या हुतात्म्यांच्या घोषणांनी, महात्मा गांधींच्या हृदयाला जाऊन भिडणाऱ्या वाणीने व अनेक ज्ञात, अज्ञात देशभक्तांच्या स्वार्थत्यागाने, भरतभूमी स्वतंत्र झाली. सुभाषबाबूंनी आपल्या हृदयस्पर्शी भाषणांनीच आझाद हिंद फौज उभारून बलाढ्‌य इंग्रज सेनेला इम्फालपर्यंत मागे रेटीत आणले होते. केवढा वाङमयाचा प्रभाव! तरीहि आमचे विरोधक विज्ञानाची टिमकी वाजविणारच.

विज्ञानाची जी आपणावर इतकी मोहिनी पडली आहे, वैज्ञानिक प्रगतीची भरमसाठ स्तुतिस्तोत्रे गायिलेली जी ऐकू येतात, त्यात तरी काही तथ्य आहे का? विज्ञानाने तसे पाहू गेले तर लाभापेक्षा हानीच अधिक झाली आहे. विज्ञानाच्या विधायक कार्यापेक्षा त्याचे विघातक कार्यच अधिक प्रचंड आहे. विज्ञान हे मानवाच्या हातातील एक अत्यंत प्रभावी विघातक अस्त्र आहे. निर्घृण संहाराचे ते साधन आहे. अणूबाँबने मागे केवढा कहर केला हे आपण जाणताच. बाॅम्बचा वर्षाव करणारी विमाने, पाणबुड्या, रणगाडे, विषारी वायु इत्यादि विज्ञानाच्या या कराल दाढांखाली मानवसृष्टि रगडली जात आहे, भरडली जात आहे. सारी मानवजात विज्ञानाच्या सर्वभक्षक ज्वाळांनी पोळली जात आहे. आणि तरीहि आश्चर्याची गोष्ट अशी की, एकीकडे विज्ञानाच्या दाहक ज्वाळांनी अंग भाजून निघत असता, मुखातून आक्रंदनाचा चित्कार किंवा सूडाचे फूत्कार बाहेर पडण्याऐवजी आमच्या काही बुद्धिभ्रष्ट विद्वानांच्या मुखातून विज्ञानाची अवास्तव स्तुति करणारे प्रलाप बाहेर पडताहेत. मला नाही वाटत की कोणीहि डोके शाबूत असलेला माणूस विज्ञानाचे हे विषमय स्वरूप उघड्या डोळ्यांनी बघून सुद्धा वाङमयापेक्षा विज्ञानच अधिक प्रभावी आहे असे म्हणेल म्हणून. असो. वेळ संपत आला आहे. जास्त विवेचनाची गरजहि नाही. तेव्हा आपण सर्व ठरावाच्या बाजूनेच मते द्याल अशी विनंती करून मी आपली रजा घेते.

विरोधाचे भाषण


आजच्या सभेपुढील वादाचा विषय हा आहे की 'वाङमय हे विज्ञानापेक्षा ज्यास्त प्रभावी आहे.' मी ठरावाला विरोध करण्याकरिता उभा आहे. अणि मी जाणून आहे की, माझे म्हणणे आपणाला पटवून देण्याकरिता ठरावाच्या समर्थकांना जेवढा आटापिटा करावा लागला, शब्दांची कसरत करावी लागली तसे काही करण्याची मला जरूर नाही. आपणा सर्वांना हे पूर्णपणे पटलेले आहे की सध्याचे युग हे विज्ञानाचे युग असून विज्ञान हेच वाङमयापेक्षा अधिक प्रभावी आहे. वास्तविक विज्ञानाचा सर्वंकष प्रभाव हा वादातीत आहे. ते सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट सत्य आहे. असे असताना सुद्धा वाङमय हेच विज्ञानापेक्षा ज्यास्त प्रभावी आहे असे म्हणणे म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यासारखे आहे. आमच्या मंडळाच्या व्यवस्थापकांना सुद्धा वादाची भारीच हौस दिसते. एरवी त्यांनी वस्तुस्थितीशी सर्वथैव विसंगत असणारा ठराव चर्चेकरिता मांडलाच नसता, व विनाकारणच वादाचे रण माजविले नसते. पण असो. व्यवस्थापकांनी ठराव ठेवला तेव्हा आम्हाला त्यावर बोलणे भाग आहे.

ठरावाच्या समर्थकांचे भाषण ऐकत असतांनाच आपणाला कळून चुकले असेल, की, त्यांचा युक्तिवाद किती पोकळ आहे, त्यांचे मुद्दे त्यांच्यावरच कसे उलटणारे आहेत. वस्तुतः ते जे काय बोलले ते त्यांचे त्यांनाच पटत नव्हते, हे त्यांच्या भाषणाच्या सुरावरूनच दिसून येत होते.

आमच्या एका भगिनीने तर विषयाला कलाटणी दिली, आणि विज्ञानाचे कार्य कसे विनाशक स्वरूपाचे आहे ते आपणाला पटवून देण्याचा फोल प्रयत्न केला. पण मूळ विषय 'ज्यास्त प्रभावी काय, वाङमय की विज्ञान?' हा आहे. कोणाचे कार्य विधायक व कोणाचे विनाशक हा नाही. घटकाभर असे गृहित धरू की विज्ञानाचे कार्य विनाशक आहे. कार्य कसेहि का असेना पण प्रभावी आहे हे तर आपणाला मान्य आहे ना? आणि ठरावाच्या समर्थकांनी विज्ञानाचे संहारक कार्य अत्यंत प्रभावी आहे अशी तर स्पष्ट शरणचिठ्ठीच दिली आहे. आता विज्ञानाने मानवी जीविताची केलेली राखरांगोळी ठरावाच्या समर्थकांनी जशी भडक स्वरूपात रंगविली तशी विज्ञानाचे आपणावर किती उपकार आहेत, तो मानवजातीला शाप नसून वर कसा आहे, हेहि आपणाला सहज पटवून देता येण्यासारखे आहे.

राइट ब्रदर्सनी विमानाचा शोध लावून आपणावर किती उपकार केले याची काय आपणाला कल्पना नाही. विमानाच्या योगाने अवघ््या तीन दिवसात पृथ्वीप्रदक्षिणा करणे शक्य झाले आहे. टपालाची नेआण तरी विमानाने किती जलद होते? मार्कोनीने बिनतारी संदेश व रेडिओ यांचा शोध लावून आपणावर काय कमी उपकार केले आहेत? जगाच्या एका टोकाला घडलेली घटना जगाच्या दुसऱ्या टोकाला अवघ््या पाच मिनिटांच्या आत कळू शकते. हजारो मैलावरील भाषणे किंवा गाणी आपल्या घरी आरामखुर्चीवर बसून जशीच्या तशी ऐकू येतात हे कशाने शक्य झाले. विज्ञानाने की वाङमयाने? रसायनशास्त्रातील निरनिराळ्या शोधांनी तर मानवी जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली आहे. औषधीशास्त्रातहि असेच शोध लागले आहेत. जेनरने शोधून काढलेला रोगप्रतिबंधक लस टोचून घेण्याचा उपाय, न्युमोनियावरील एम्. बी., क्षयावरील बी. सी. जी., कॅन्सरवरील रेडिअमचे उपचार, पेनिसिलिन इत्यादि शोधांनी असाध्य व महाभयंकर समजल्या जाणाऱ्या रोगावर मात केली आहे.

विज्ञानाचा संहारक साधन म्हणून जो उपयोग करण्यात येतो तो दोष नव्हे. तो योजकतेचा दोष आहे. तसे पाहिले तर वाङमय वाईट असेल तर त्याने समाजाचे कसे अधःपतन होते हे सिनेमांनी व पांचट कादंबऱ्यांनी आपणाला पुरेपूर पटवून दिले आहे. सध्या जे नवनवोदित लेखक उदयास येत आहेत व अत्यंत हीन दर्ज्याचे वाङमय प्रसिद्ध होत आहे, ते काय वाङमयाच्या प्रभावाचे लक्षण आहे? खास नाही.

हिंदुस्थानात वेदासारखे अमूल्य व थोर वाङमय आहे. पुराणे, रामायण, महाभारत यांसारखे महान ग्रंथ आहेत. संतवाङमयहि भरपूर आहे. पण या सर्वांचा परिणाम हिंदुस्थान इतकी वर्षे गुलामगिरीत खितपत पडण्यापलिकडे काय झाला? आणि आता राष्ट्र स्वतंत्र होऊन देखील त्याची कोणत्याच दिशेने प्रगती होत नाही.

अव्वल दर्जाचे लेखक नाहीत की कवींची कमतरता आहे? लेखक आहेत, कवी आहेत पण शास्त्रज्ञ नाहीत. वैज्ञानिक प्रगतीच्या बाबतीत हिंदुस्थान अत्यंत मागासलेला आहे. तेव्हा सध्या जर हिंदुस्थानात कशाची आवश्यकता असेल, जगातील एक नामवंत राष्ट्र म्हणून हिंदुस्थानला जर जगावयाचे असेल तर त्याला, कवींची, लेखकांची, तत्त्ववेत्त्यांची किंवा वाङमयाची आवश्यकता नसून शास्त्रज्ञांची आवश्यकता आहे. आज प्रत्येक राष्ट्रात वैज्ञानिक प्रगतीच्या बाबतीत अहमहमिका लागलेली दिसून येते, कारण त्यांना कळून चुकले आहे की जे राष्ट्र विज्ञानात अग्रेसर होईल तेच सामर्थ्यशाली राष्ट म्हणून, जगाच्या पाठीवर नांदू शकते. तेव्हा हिंदुस्थान ज्या गतीने शास्त्रीय ज्ञानात आपली प्रगति करील तितक्याच, जलद त्याची पावले उत्कर्षाच्या मार्गावर पडत जातील हे निश्चित. असो. आपण सर्व ठरावाच्या विरुद्ध मते द्याल याची मला पूर्ण खात्री आहे. माझे भाषण आपण शांतपणे ऐकून घेतले याबद्दल आपले आभार मानून मी आपली रजा घेतो.

१९५३ साली मांडण्यात आलेली ही मते! त्याच वर्षी जन्मलेल्या एका 'ट ला ट, री ला री । जन म्हणे काव्य करणारी ।।' जमातीच्या कवीने तब्बल ४४ वर्षांनी तशीच मते मांडावीत हा योगायोगच. अभिमन्यु आणि चक्रव्यूह या कथानकाचे ज्ञान असणारे हा योगायोग नव्हे असे म्हणतील ही गोष्ट वेगळी!

आविष्कार

जीव जगत में, सब जीवोंमें मनुष्य केवल बुद्धी पाया
इस बुद्धीके प्रयोगसे वह इस धरतीपर क्रांती लाया
वैसे देखा जाए तो इस प्राणी का कद कितना छोटा
हाथी, डायनोसार, शेरने वनमें इसका रस्ता काटा

कठिन समय था आदि काल में वनवासी यह घिरा हुआ था
विपदाओंसे, वन्य जीवोंसे, ज्ञानत्रुटीसे जूॅझ रहा था
बुद्धीका उपयोग न करता, भीगी बिल्ली बनकर रहता
इस धरती का राजा तो क्या, इस युग तक ना जीवित रहता

छोडो कल की बात आज यह स्वामी निःसंदेह पृथ्विका
इसको डर है आज तो केवल इसकी अपनीही करनी का
अद्भुत आविष्कार शृंखला की जननी थी आवश्यकता
अच्छा होता आवश्यकता की पूर्ततापर वह रुकता

अखंड ऊर्जास्रोत की मनिषा अणुशक्ति की खोज कराई
हिरोशिमा और नागासाकी को इसने ही नींद सुलाई
शिशु और जननी दोनोंके ही हित में सानोग्राफी आई
इसी दृष्टिसे इसी दुष्ट ने जननी पर तलवार चलाई

चट्टानों को ध्वंस कराने, नया नया निर्माण कराने
वास्तु बनाने, सुविधा लाने आविष्कार हुआ बारूद का
आज यही बारूद बैठी है बम में बंदुक की नलियोंमे
काँप रही है धरती सारी विनाश होगा मानवता का

सुबुद्धी बनने लगी कुबुद्धी, शाप बना वरदान बुद्धीका
आज इसे हम रोक न पाए, नाश अटल है इस सृष्टीका
आओ प्रण ले आज सभी हम, हम ऐसा ना होने देंगे
ऐसा आविष्कार करेंगे, नाश करे जो इन दुष्टोंका

विज्ञानाच्या दृष्टीने या कवितेत एक घोडचूक आहे हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात आलेच असेल. नसेल आले तर पुस्तक वाचून होईपर्यंत नक्कीच येईल.

या वादात वैज्ञानिक हारले व वाङ्‌मयकार जिंकले, तरी वाद संपलाच नाही. पुढे 'लेखणी श्रेष्ठ की नांगर श्रेष्ठ' या विषयावर वादविवाद झाला आणि पांढरपेशा वाङमयकाराला नांगरधारी शेतकऱ्याने आव्हान दिले. पण ती मॅच पुढे केव्हातरी. अशा अनेक एकमेकांशी बद्ध असलेल्या विषयांवर बाबांचे अमाप लेखन आहे. एकदा इकडे, एकदा तिकडे, एकदा इकडे, एकदा तिकडे, असे घुसळण केल्याशिवाय लोणी चोथ्यापासून वेगळे होत नाही. मंथनाशिवाय रत्नप्राप्ती नाही. वादविवाद हे विचारमंथनाचे उत्तम साधन. वादाशिवाय संवाद साधणे शक्य नाही. शालेयजीवनातील हा एक  स्पर्धाप्रकार तरी टिकायलाच हवा. वादविवादाचा विषय सुद्धा योग्य हवा. नाहीतर मंथनाचा काय फायदा? निःसत्व दुधाचे दही कितीहि घुसळले तरी लोणी कसे निघणार? असो.

प्रत्येक वादाचा विषय सखोल विचार व भरीव विषयमांडणीला वाव देतोच असे नाही. कधी कधी विषयच खोडसाळ आणि चावट असतो. असेना का! आपणही काही कमी मिस्किल नाही हे दाखवून द्यायचे झाले!




ठराव : या सभेच्या मते सहशिक्षण हे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांना सुध्दा अध्ययन व अध्यापन कार्यात उत्साह उत्पन्न करणारे आहे.


विरोधाचे भाषण


ठराव आपणासमोर मांडण्यात आलाच आहे. आणि त्याच्या समर्थकांनी त्याचे समर्थन करण्याचे सोंगहि कसेबसे पार पाडले आहे. पण या सोंगाने कोण फसणार आहे? ठरावाची भाषा मोठी चमत्कारिक आहे. म्हणे, सहशिक्षण हे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिक्षकांनाहि अध्ययन व अध्यापन कार्यात उत्साह उत्पन्न करणारे आहे. किती खोडसाळ, तर्कदुष्ट आणि विपर्यस्त विधान आहे हे!

वास्तविक परिस्थिति तर अशी आहे की मुलामुलींच्या एकत्र वर्गात मुलांचे अथवा मुलींचे कोणाचेच लक्ष अभ्यासात लागत नाही. त्यांचे लक्ष भलतीकडेच असते. ते कोणीकडे असते हे सांगायलाच कशाला हवं? पण सांगतोच. कोण मुलगी कोणत्या रंगाची साडी नेसली आहे, कोणत्या मुलीने वेणीत फूल खोवले आहे याकडेच विद्यार्थ्यांचे लक्ष असते. कोणती मुलगी गैरहजर आहे हे शिक्षकांना अथवा प्रोफेसरांना कळत नाही, पण विद्यार्थ्यांच्या ते चटदिशी ध्यानात येते. अशीच परिस्थिती मुलींचीहि असते. अशा परिस्थितीत मुलामुलींचे लक्ष त्यांच्या अध्ययनाकडे कितपत राहत असेल ते एक परमेश्वरच जाणे! ठरावाचे समर्थक बडबडून गेले की मुलामुलीत अभ्यासाच्या बाबतीत स्पर्धा लागते व तिचा इष्ट तो परिणाम होऊन दोघांचीहि अभ्यासात स्पृहणीय प्रगति होते. अहो महाराज! सहशिक्षणामुळे मुलामुलीत स्पर्धा लागते, चुरस निर्माण होते हे मलाहि मान्य आहे, पण ती स्पर्धा अभ्यासाच्या बाबतीत नव्हे तर वेषभूषा, केशभूषा, फॅशन व नटवेपणा या बाबतीत निर्माण होते. म्हणे मुले व मुली एकमेकांच्या डोळ्यात भरण्याचा प्रयत्न करतात व त्याकरिता प्रश्नांची उत्तरे बिनचूक देतात व तसे झाले म्हणजे शिक्षक त्यांची तारीफ करतात व मग त्यांना स्वर्ग दोन बोटे उरतो व अस्मान ठेंगणे होते. सुबुद्ध सभाजनहो! माझ्यावर आपण विश्वास ठेवा. असा काहीहि प्रकार होत नाही. मुलामुलींच्या संमिश्र वर्गात आपण यदाकदाचित चुकलो तर आपले हसे होईल, तेव्हा झाकली मूठ सव्वालाखाची म्हणून कोणीच प्रश्नाचे उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. 'सबसे चूप भली' हाच त्यांचा महामंत्र असतो. वर्ग चालू असतांना देखील विद्यार्थ्यांत व विद्यार्थिनींत सतत कुजबूज चाललेली असते, हास्याचे फवारे उडत असतात आणि एकमेकांकडे पाहात शिक्षकांच्या किंवा प्रोफेसरांच्या शिकवण्यावर टीकाटिपणी चालू असते. अशा या वातावरणात सहशिक्षण विद्यार्थ्यांना अध्ययनकार्यात उत्साह उत्पन्न करणारे आहे की त्यात अडथळा निर्माण करणारे आहे ते आपणच ठरवा आणि मग आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आपल्या मताचा कौल द्या. समर्थकांच्या भूलथापांना मुळीच बळी पडू नका.

सहशिक्षण चालू असलेल्या शाळेत किंवा मुलामुलींच्या संमिश्र वर्गात शिक्षकांना आपले अध्यापनकार्य करणे मोठे कठिण जाते. मुलामुलींची कुजबूज, गडबड, गोंगाट, हास्य सतत चालू असते, अध्यापक टेबलावर मधून मधून मुलामुलींनी शांत राहावे म्हणून हात आपटीत असतात. अशा थाटात अध्यापनाचा तमाशा चालू असतो. ठरावाचे समर्थक म्हणतात की सहशिक्षणामुळे शिक्षकांना अध्यापनकार्यात उत्साह उत्पन्न होतो. कीव करावीशी वाटते मला समर्थकांच्या बुद्धीची! ठरावाच्या बाजूच्या वक्त्याने तर ठरावाचे ओढून ताणून समर्थन करण्याच्या भरात शिक्षकांच्या नीतिमत्तेवरहि शिंतोडे उडविण्यास कमी केले नाही. त्यांची बरीच विधाने शिक्षकवर्गाचा अपमान करणारी होती. केवळ मुलेच किंवा केवळ मुलीच असा वर्ग रटाळ असतो, त्यात शिकवितांना शिक्षकांचे मन रमत नाही, तो तास त्यांना कंटाळवाणा वाटतो, आणि संमिश्र वर्गात त्यांची विनोदबुद्धि जागृत होते असे ठरावाचे समर्थक म्हणाले. अजब शोध लावला त्यांच्या सुपीक मेंदूने! बरे असो. आपणाला आता पुरतेपणी कळून चुकले असेल की सहशिक्षण हे केवळ विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर शिक्षकांच्या सुद्धा अध्ययन वा अध्यापन कार्यात अडथळा उत्पन्न करणारे आहे. तेव्हा आपण ठरावाच्या विरुद्ध मत देऊन तो प्रचंड बहुमताने फेटाळून लावा अशी विनंति करून मी आपली रजा घेतो.

महम्मद ऐसानुल्लाह नावाच्या विद्यार्थ्याकडून हे अस्खलित मराठीतले भाषण बाबांनी वदवून घेतले. ते असो. पण त्याच्या तोंडी '--- ते एक परमेश्वरच जाणे!' असे वाक्य घातले. आजच्या काळात अशी धार्मिक चूक बाबांना महाग पडली असती. असो.

समर्थनाचे भाषण


'सहशिक्षण हे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांना सुद्धा अध्ययन व अध्यापन कार्यात उत्साह उत्पन्न करणारे आहे' हा आजच्या सभेपुढील ठराव आहे. मी प्रथमच आपणास सांगून टाकतो की मी या ठरावाचे समर्थन करणार आहे, आणि तेहि जोरदार. सहशिक्षणाची म्हणजेच मुलामुलींनी एकत्र शिक्षण घेण्याची सर्वांगीण उपयुक्तता आता निर्विवादपणे सिद्ध झाली आहे. प्रस्तुत ठरावाला विरोध करणे म्हणजे आपल्या बुरसटलेल्या जुनाट मनोवृत्तीचे लोकांपुढे हास्यास्पद प्रदर्शन करणेच होय. आगरकरांनी सहशिक्षणाचे जोरदार समर्थन केले आहे. आणि त्यानंतरच्या सुमारे ५० वर्षांच्या अनुभवाने सहशिक्षणामुळे समाजाचा कसा आणि किती फायदा होतो हे आपणा सर्वांच्या चांगलेच प्रत्ययाला आले आहे.

आजच्या ठरावासारख्या स्वयंसिद्ध ठरावाला विरोध करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणणेच होय. पण आमच्या विरोधकांची बुद्धीच शिळी असल्यावर त्यांना दुसरे काय शक्य आहे बरे? काळ कितीहि पालटला, जमाना कसाहि बदलला, विसावे शतक अर्ध्यावर अधिक उलटून गेले तरी आमचे हे श्रुतिस्मृतिपुराणोक्त विरोधक अजूनहि अठराव्या शतकातच वावरत आहेत. या जीर्णमतवाद्यांना नवीन गोष्टींचे नेहमीच अजीर्ण होत आले आहे. काळाची पावले ओळखता न आल्यामुळे ते पावलोपावली ठेचाळून तोंडघशी पडत आहेत, तरी पण 'मेरी मुर्गी की एक ही टाँग' या न्यायाने कोणत्याहि गोष्टीला उंच नाकाने विरोध करीत असतात. पण आमच्या विरोधकांना मी हे बजावून ठेवतो की या ठरावाला विरोध करून तुम्ही आपलेच नाक कापून घेणार आहात. विरोधकांनी कितीहि आकांडतांडव केले, कितीहि जिवाचा आटापिटा केला तर आता का सहशिक्षण बंद पडणार आहे? अहो सध्याचा काळ असा आहे की तुम्ही ज्या शाळेत किंवा कॉलेजात सहशिक्षण बंद कराल ती शाळा किंवा ते कॉलेज बंद पडेल. ज्या शाळेत किंवा कॉलेजात मुली नसतील तेथे मुले जाण्यास कांकू करतात, आणि ज्या शाळेत किंवा कॉलेजात विद्यार्थी नसतील तेथे विद्यार्थिनी प्रवेश घेण्यास नाखूश असतात. हो! मी आपला सत्यवक्ता माणूस आहे. फटफटीत उजाडले असतांना बळेच तोंडावरून पांघरूण ओढून घेऊन अजून रात्रच आहे अशी बतावणी करणे मला जमत नाही. आमच्या विरोधकांना ते छान जमते. पण म्हातारीने कोंबडा झाकला म्हणून तांबडे फुटावयाचे थोडेच राहणार आहे? तेव्हा महाराज! कशाला उगीच हट्टाला पेटून खडकावर आपले डोके आपटून घेता? धावत्या प्रवाहाला बांध घालण्याचा प्रयत्न कराल तर बांध मात्र वाहून जाईल आणि प्रवाह दुप्पट वेगाने आपला मार्ग काढील. सहशिक्षण या देशात सुरू झाले ते बंद होण्याकरिता नव्हे. आणि मी म्हणतो ते बंद तरी कां व्हावे?

सहशिक्षण हे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दोघांनाहि हितावह आहे. विद्यार्थ्यांना वर्गात विद्यार्थिनी असल्या किंवा विद्यार्थिनींना वर्गात विद्यार्थी असले म्हणजे किती बरे चांगले वाटते? त्यांचे मन साहजिकच उत्साहाने भारल्या जाते, आणि त्यांचे अध्ययन हसतखेळत पार पडते. मुलींच्या वर आपण मात करावी असे मुलांना वाटते, आणि मुलांच्यासमोर आपणहि कमी पडू नये, याकरिता मुलीहि सदैव प्रयत्नशील असतात. अशा प्रकारची चुरस नेहमीच माणसाला कार्यप्रवण करीत असते. याचा परिणाम साहजिकच असा होतो की मुले आणि मुली दोघेहि कसोशीने अभ्यास करतात व दोघांचीहि विद्याभ्यासात स्पृहणीय प्रगति होते. दुसरे असे की मुलांच्या समोर आपणाला शिक्षकांनी रागावू नये, शिक्षा करू नये असे मुलींना साहजिकच वाटत असते, आणि मुलांनाहि पण मुलींच्या समोर शिक्षकांनी शिक्षा केल्यास ---. आणि तसा प्रसंग आपणाला कधीच येऊ नये म्हणून ते नेहमी वर्गात अभ्यास करून जातात. वर्गात मुलांच्या समोर एखाद्या मुलीची शिक्षकांनी वा प्राध्यापकांनी तारीफ केली तर तिला अस्मान ठेंगणे होते, आणि मुलींच्या देखत मुलाची स्तुती केली तर त्याला स्वर्ग दोन बोटे उरतो कारण मुलामुलींची परस्परांच्या डोळ्यात भरण्याची सदैव धडपड चालू असते, आणि याचा इष्ट तोच परिणाम होतो. दोघांचीहि अभ्यासात प्रगति होते. सहशिक्षण नसते तर असा परिणाम कधीहि दिसून आला नसता. तेव्हा या सर्व गोष्टींवरून आपणाला हेच दिसून येईल की सहशिक्षण हे विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन कार्यात उत्साह उत्पन्न करणारे आहे.

आता मी आपणाला हे दाखवून देणार आहे की सहशिक्षण हे शिक्षकांना सुद्धा त्यांच्या अध्यापन कार्यात उत्साह उत्पन्न करणारे आहे. केवळ मुलांच्या किंवा केवळ मुलींच्या वर्गापेक्षा मुलामुलींचा संमिश्र वर्ग हा नेहमीच शिक्षकांना उत्साहप्रद असा स्फूर्तीचा झरा वाटत असतो. अशा संमिश्र वर्गात शिकवीत असतांना त्यांची वाणी ओघवती बनते, भाषा प्रासादिक होते आणि  अध्यापनहि अर्थातच परिणामकारक होते. मुलांचा किंवा मुलींचा एकजिनसी वर्ग त्यांना नेहमीच नीरस व रटाळ वाटतो आणि अशा वर्गातील त्यांचे शिकविणे 'मोले घातले रडाया, तेथे कैची आसू माया' अशा थाटाचे होते. केवळ शिकविणे प्राप्त म्हणून शिकवायचे असा प्रकार असतो. मुलांना प्रश्र विचारला असता 'परदुःख शीतळ' या न्यायाने चाललेली मुलींची कुजबूज, आणि मुलींना प्रश्न विचारला असता 'कशी खोड जिरली' म्हणून मुलांचे खट्‌याळ आणि वात्रट हास्य शिक्षकांना मोठे मनोहर वाटत असते आणि त्यांची प्रश्नपरंपरा पल्लवित होत असते. मुलामुलींच्या संमिश्र वर्गात शिक्षकांची किंवा प्रोफेसरांची विनोदबुद्धि बरीच जागृत होते आणि अर्थातच विद्यार्थ्यांना हसत खेळत आपले पाठ घेता येतात.

वेळ फार थोडा आणि विषय व्यापक! तेव्हा आपण सर्वांनी ठरावाच्या बाजूनेच मते देऊन ठराव एकमताने पास करावा अशी आपणाला विनंती करून मी आपली रजा घेतो.

आणखी एका हलक्या फुलक्या विषयावर बाबांनी वादविवादात आपले चेले उतरविले. दोन्ही भाषणांचा येथे समावेश करण्याचे एक कारण असे की आजही हा विषय बऱ्याच जणांच्या जिव्हाळ्याचा आहे. एखाद्या सिनेमाचा समाजावर विपरीत परिणाम होतो म्हणून तो बंद पाडावा अशी मागणी करणाऱ्या मोर्च्यात घोषणा देत देत सामील होणारा एक फार मोठा वर्ग आहे. मोर्चा संपल्यावर यातली बरीच मंडळी घाईघाईने त्याच सिनेमाच्या तिकिटाच्या रांगेत लागतात. न जाणो, आपला विरोध यशस्वी झाला आणि उद्या सिनेमा बंद पडला तर आपला पाहायचा राहून जाईल अशी त्यांच्या मनात भीति असते.

दुसरे कारण असे की आईबाबा फारसे सिनेमाला गेल्याचे मला आठवत नाही. तरी पण मग सिनेमा विषयावर लिहायला बाबा धजावले हे केवळ शाळेच्या कपाटात आणखी एखाद्या चषकाचा किंवा ढालीचा समावेष व्हावा म्हणूनच. आणि तसे झालेहि असेल.


ठराव : ह्या सभेच्या मते सध्याच्या चित्रपटांनी भारतीय समाजाची हानी केली आहे.


विरोधाचे भाषण


ठरावाच्या समर्थकांनी समर्थन करतांना आपणाला ग्वाही दिली की ठराव सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट आहे. ठरावाची भाषा स्पष्ट आहे आणि पुढे असंहि सांगण्यात आलं की, त्यात कालमर्यादा व स्थलमर्यादा आहे, आणि त्यामुळे विरोधकांना म्हणे जड जाणार आहे. अहो अशी धूळफेक कशाला? हा मी तुमच्यापुढे उभा आहे आणि तो ठरावाला कसून विरोध करण्याकरिता उभा आहे, आणि ठरावाच्या सगळ्या स्थलमर्यादा व कालमर्यादा सांभाळून तो जशा स्थितीत आहे त्याच स्थितीत त्याला मी विरोध करणार आहे.

तुम्हाला काय वाटतं की सध्याच्या चित्रपटांनी खरोखरच भारतीय समाजाची हानी केली आहे? अहो असा कोण सखीचा लाल आहे की ज्यानं आजपावेतो आयुष्यात एकहि सिनेमा पाहिला नाही? ज्यानं चित्रपटगृहाच्या त्या अत्यंत मनोरंजक, चित्तवेधक आणि जिकीरीने भरलेल्या दैनंदिन जीवनाचा विसर पाडणाऱ्या आणि घटकाभर स्वर्गीय आनंदाची अनुभूति आणून देणाऱ्या दिव्य वातावरणाचा आस्वाद घेतला नाही? कोणीतरी छातीवर हात ठेवून व आपल्या सदसद्विवेक बुद्धीला साक्ष ठेवून असं सांगू शकेल काय की सिनेमा त्याला आवडत नाही म्हणून? अहो सिनेमा कोण पाहात नाही? आमचे शिक्षक पाहतात, प्रोफेसर्स पाहतात, वडीलधारी माणसं पाहतात. अहो चांगलं बॉक्सच तिकिट काढून पाहतात की हो! गरीब पाहतात, शेतकरी पाहतात, मजूर पाहतात, मध्यमवर्गीय पाहतात आणि लक्ष्मीपुत्रहि पाहतात. सुशिक्षित, अशिक्षित सगळे चित्रपट पाहतात. सिनेमा बघायला जाणाऱ्या लोकांमध्ये जातिभेद, धर्मभेद, पंथभेद, पक्षभेद, उच्चनीचभेद, गरीब श्रीमंत हा वर्गभेद काही काही नाही. मग हे काय सगळे अडाणी आहेत? यांना काय समजत नाही? आणि ठरावाच्या समर्थकांनाच काय ब्रह्मदेवाकडून अकलेचं जादा रेशन मिळालं आहे ते एक ब्रह्मदेवच जाणे! तुम्हाला काय वाटतं ठरावाचे समर्थन करायला उभे राहिलेले लोक सिनेमा पाहत नाहीत म्हणून? त्याशिवायच काय त्यांना इतक्या चित्रपटांची व त्यातील नटनटींची नावं पाठ आहेत? अहो त्यांचं येथील भाषण म्हणजे निव्वळ ढोंग आहे, दांभिकता आहे. मारे मिटक्या मारीत व जिभल्या चाटीत अतृप्त नेत्रांनी चित्रपट पहायचे आणि इथं येऊन म्हणायचं की चित्रपटांनी आमची हानी केली आहे म्हणून! वा खासा न्याय!

अहो! सध्याच्या चित्रपटांचे भारतीय समाजावर अगणित उपकार आहेत. सिनेमातील नवनवीन तारका आणि तारे उदयास आले नसते व त्यांचे मुखचंद्र भुकेल्या नजरेने आम्हाला न्याहाळता आले नसते तर मी म्हणतो भारत भूमीत अगदी अमावास्येची काळोखी रात्र पसरली असती. जीवघेऊ महागाईनं मध्यमवर्ग गांजलेला, कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी दडपलेला, कामाच्या असह्य दडपणाखाली मजूर मेटाकुटीस आलेला आणि श्रीमंत वर्ग चोरीच्या भीतीनं गर्भगळित झालेला, अशा अत्यंत असहाय परिस्थितीत या सगळ्या आम जनतेस बुडत्याला काडीचा आधार मिळावा तद्वत् या सिनेमाचा आधार मिळाला नसता, तर अर्धा भारतवर्ष तरी खलास झाला असता. इंग्रजांची हिंदुस्थानातील सत्ता हा दैवी वर आहे असे काही लोक म्हणत. पण मी तर असे म्हणतो की सिनेमा हा खरोखरच दैवी वर आहे, संजीवनी मंत्र आहे, म्हाताऱ्यालाहि तरुण बनविणारा कायाकल्प आहे.

सिनेमा करमणूकीचे उत्कृष्ट साधन आहे. आणि सध्याचे चित्रपट हे मनोरंजनाची मिठास मेजवानीच असतात. कचेरीत वरिष्ठाशी कुरकूर झाली - सिनेमा पहा ना, घरी बायको रागावली - सिनेमा पहा ना, परीक्षेत नापास झालो - सिनेमा पहा ना, कोणताहि मनस्ताप झाला - सिनेमा पहा ना. असे हे उत्कृष्ट रामबाण औषध आहे.

सध्याच्या चित्रपटांनी कितीतरी प्रगति केली आहे. पूर्वीचे चित्रपट अगदीच सोवळे होते. पुरुषाने स्त्रीच्या चार हात दूर राहून अभिनय करायचा ही कोठली तऱ्हा? त्या मानाने आजकालच्या चित्रपटातील नटनटींचा अभिनय किती मोकळा आणि नयनरम्य वाटतो. संगीताचे व नृत्याचे निरनिराळे प्रकार व नमुने इतक्या स्वल्प मोबदल्यात आपणाला एरवी कोठे पहायला मिळाले असते का? संगीत, नृत्य, नाट्‌य, कला, शिल्प या सगळ्या क्षेत्रांत सध्याच्या चित्रपटांनी बराच उच्चांक गाठलेला आहे. आणि काही चित्रपट इतके उत्कृष्ट आहेत की ते अनेकदा बघून देखील मनाचं समाधान होत नाही.

काही लोक उगीच बाऊ करतात. ते म्हणतात की सध्याच्या चित्रपटांनी समाजाची नीतिमत्ता बिघडवली व तरुणांना नादान नि निःसत्व बनवलं. चित्रपट पहायला काय आम्ही त्यापासून काही शिकायला जातो तर त्यानं आमची मनं बिघडतील? बव्हंश सिनेमाला जातात ते केवळ करमणुकीखातर. आणि या तीन तासात पडद्यावर चित्र पाहिल्याने म्हणे नीतिमत्ता बिघडते. ज्यांची नीतिमत्ता सिनेमा पाहिल्यानं बिघडते ते पूर्वीच नीतिच्या नावानं शून्य असले पाहिजेत. जे केवळ पडद्यावर चित्र पाहिल्यानं नादान, निःसत्त्व आणि नीतिशून्य बनतात त्यांचं पौरुष आणि नीतिमत्ता कोणत्या दर्ज्याची असली पाहिजे याची आपणच कल्पना करा. नसत्या गोष्टीचा उगीचच बागुलबोवा करून जनतेच्या हातातील हे करमणुकीचे एकमेव साधन हिरावून घेऊ पाहणाऱ्यांच्या बुद्धीची कीवच करावीशी वाटते. असो.

माझी आपणाला एवढीच विनंती आहे की आपण ठराव इतक्या प्रचंड बहुमताने हाणून पाडा की समर्थकांच्या छातीत धडकी भरेल. आणि समर्थकांनाहि मला प्रेमाची सूचना करावीशी वाटते की, बाबांनो, कशाला एवढा जीवाचा आटापिटा करता? तुमच्या या दिवाणखान्यातील भाषणांनी काय लोक सिनेमा पहायचं बंद करणार आहेत? दगडावर डोकं आपटून घेण्यात काय हांशील आहे? धावत्या प्रवाहाला बांध घालण्याचा प्रयत्न कराल, तर बांध मात्र वाहून जाईल, आणि प्रवाह दुप्पट वेगाने आपला मार्ग काढील. ठरावाची काय वासलात लागणार हे तर दिसतेच आहे. तेव्हा वेळीच सावध होऊन ठराव मागे घेण्यातच शहाणपणा आहे. याउपर तुमची इच्छा. जयहिंद!

समर्थनाचे भाषण


ठराव अगदी वस्तुस्थितीनिदर्शक आहे. सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट आहे. ठरावाची भाषाहि अगदी स्पष्ट आहे. 'सध्याच्या चित्रपटांनी' या शब्दप्रयोगाने ठरावाची व्याप्ति मर्यादित केली आहे व त्याला कालमर्यादा घातली आहे व 'भारतीय चित्रपटांनी' या शब्दप्रयोगाने ठरावाला स्थलमर्यादा घातली आहे. त्यामुळे माझे आणि ठरावाला समर्थन करणाऱ्या सगळ्याच वक्त्यांचे काम मोठे सुकर झाले आहे व विरोधकांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. त्यांना पळवाटा शोधायला व श्रोत्यांची दिशाभूल करायला वावच उरला नाही. विरोधकांच्या मेंदूतून उडालेली अकलेची कारंजी व मुखातून बाहेर पडलेले तर्कटाचे फवारे आणि बोलतांना उडणारी त्यांची गाळण ह्या साऱ्या गोष्टी त्यांची बाजू किती पोकळ व दिशाभूल करणारी आहे याची पुरेपूर साक्ष देतील. अपवादादाखल एकदोन चित्रपटांची उदाहरणे देऊन त्यावरून सर्व चित्रपट चांगले आहेत व त्यांनी समाजावर अनंत उपकार केले आहेत असे म्हणणे हे कोणत्या तर्कशास्त्राला धरून आहे हे काही कळत नाही.

काही बोटावर मोजण्याइतके चित्रपट सोडले तर बाकी सर्व चित्रपट हे अगदी निकृष्ट दर्ज्याचे व समाजाला अनिष्ट वळण लावणारे आहेत. या चित्रपटांनी समाजाच्या नीतिमत्तेच्या कल्पना पार पोखरून टाकल्या आहेत. वास्तविक शील, चारित्र्य, नीतिमत्ता ह्या गोष्टी समाजाचा कणा आहेत, पण नेमक्या ह्याच गोष्टींना सुरुंग लावण्याचे काम चित्रपटांनी योजिले आहे. ज्या बालमनावर पवित्र संस्कार व्हावयाचे तीच मने सिनेमाच्या मोहमय वातावरणाने दूषित होतात. सिनेमातील नटनटींचे छचोर पोषाख, त्यातील अचकट विचकट गाणी, अश्लील संवाद, पांचट विनोद, किळसवाणे हावभाव व अंगविक्षेप, उन्मादक नृत्ये व ह्या सर्व प्रकाराला साजेसे असे सिनेमागृहातील वातावरण यांनी प्रेक्षकांवर काय परिणाम होत असेल याची कल्पनाच केलेली बरी.

सिनेमातील नटीच्या अवयवांचे उघडे नागडे प्रदर्शन करणारी मोठमोठाली चित्रे भर रस्त्यावर सिनेमाची जाहिरात करण्याकरिता लावण्यात येतात. कोणाहि सभ्य माणसाला अथवा कुलीन स्त्रीला म्हणायला लाज वाटेल अशा प्रकारच्या किळसवाण्या गाण्याच्या रेकॉर्डस् रस्तोरस्ती हॉटेलात लावण्यात येतात. सिनेमाची जाहिरात करणारे लाऊडस्पीकर्स ज्यावेळी पूर्वी ईश्वराच्या गाण्याचे सूर ऐकू येत असत अशा अरुणोदयापासून तो मध्यरात्रीपर्यंत सारखे ओरडत असतात. हा सारा प्रकार बघितला म्हणजे क्षणभर मनाला असे वाटते की जगातील सारे व्यवहार बंद झाले आहेत आणि सिनेमा हे एकच आकर्षण लोकांना उरले आहे. ह्या सगळ्या वातावरणाचा परिणाम निश्चितपणे समाजाची नैतिक मूल्ये शिथिल होण्यात होतो आणि एकदा नैतिक कल्पना शिथिल झाल्या की गुंडगिरी, भामटेगिरी, चोऱ्या, दरवडे, बलात्कार हे प्रकार ओघाने आलेच. हे इथे जमलेल्या सुज्ञ सभाजनांना माझ्यासारख्या पोरीने सांगण्याची आवश्यकता आहे असे निदान मला तरी वाटत नाही.

पोशाखाच्या, वेशभूषेच्या नी केशभूषेच्या नवनवीन तऱ्हा तरुण आणि तरुणी सिनेमातून शिकतात. सिनेमातील नटी ही तरुणींना सौंदर्यदेवता वाटते, व तिच्यासारखे आपण लोकांच्या डोळ्यात कसे भरू, तिची आकर्षकता आपणात कशी येईल याची त्यांच्यात चढाओढ चालू असते. यातच त्या आपला दिवसाचा बराचसा वेळ व पैसा खर्च करतात. आपले प्रदर्शन करण्याची हौस व लालसा त्यांच्यात निर्माण होते. ती अत्यंत हीन मनोविकृति आहे. शाळाकॉलेजातील विद्यार्थीदेखील आपण अशोककुमार सारखे कसे दिसू याचा प्रयत्न करतात. काहीतर सिनेमातील नायक नायिकेचे ज्याप्रमाणे बसमध्ये किंवा सायकलच्या अपघातात प्रेम जमते त्याप्रमाणे प्रेम जमविण्याचा प्रयत्न करतात, आणि तोंडघशी पडतात. काहींना तर वेळीअवेळी गाणी म्हणण्याचाच चाळा लागतो. काही तर स्नो, पावडर, क्रीम, केसभांग यातच आपला दिवसाचा बराचसा वेळ खर्च करतात. बऱ्याचश्या विद्यार्थ्यांचे अभ्यासातील लक्ष उडून सिनेमात त्यांचे लक्ष गुरफटते व मन घोटाळते. विद्यार्थ्यांचे तांडेच्या तांडे सिनेमागृहाभोवती घोटाळत असलेले आपणाला दिसतात. शनिवारी रविवारी मॅटिनी पाहण्याचे तर त्यांना व्यसनच जडलेले असते. शिवाजी, राणाप्रताप, अकबर यांच्या वंशावली आमच्या विद्यार्थ्यांना माहित राहणार नाहीत, परंतु मधुबाला, नर्गिस, सुरैया, निम्मी, गीताबाली यांचा साद्यंत इतिहास, त्यांचा जन्म, त्यांचे शिक्षण, त्यांची सिनेमातील प्रवेशाची तारीख, त्यांचे प्रेम केव्हा कुठे कोणाशी कसे जमले, ते केव्हा व कां मोडले, पुन्हा कोणावर बसले इत्यादि साऱ्या बारीक सारीक गोष्टींची माहिती त्यांना असते. थोर पुढाऱ्यांच्या व रामकृष्णाच्या जयंत्या कधी होतात याचा त्यांना पत्ता नसतो परंतु नटीच्या जन्मतारखा त्यांना अगदी मुखोद्गत असतात. दिल्ली, मद्रास, कलकत्ता हिंदुस्थानच्या नकाशात कोठे आहेत हे सांगता येणार नाही, परंतु लता मंगेशकर नागपुरला आली असता ती ज्या घरात उतरली त्या घराचा घरनंबर, तिने ज्या हॉटेलात फराळ केला त्या हॉटेलचे नांव, ते कोणत्या रस्त्यावर आहे इत्यादि इत्थंभूत माहिती पुण्याच्याहि गुलहौशी विद्यार्थ्यांना असायला हवीच. महात्मा गांधी किंवा लोकमान्य टिळक यांचा फोटो त्यांच्या कधी खोलीत दिसणार नाही परंतु नसीम किंवा नर्गिसचा फोटो तेथे असायचाच. एखादी भूपाळी किंवा आरती यायची मारामार! आता नाही म्हणायला अमरभूपाळी अनेकदा पाहिल्यामुळे  'घनश्याम सुंदरा श्रीधरा' च्या लकेरी आळवताना दिसतात व कुंकू चित्रपट पहिल्यामुळे आमच्या तरुणींना मंगळागौरीची आरती पाठ येते ही गोष्ट वेगळी. वासुदेव बळवंत फडके हा कोणी क्रांतिवीर होता हे आमच्या विद्यार्थ्यांना सिनेमा पाहिल्यानंतर कळते. काय ही शोचनीय परिस्थिती! एवंच दुसऱ्या बाजीरावच्या आमदानीत लावण्या व तमाशे यांनी त्यावेळच्या लोकांना ज्याप्रमाणे नादान बनविले होते त्याप्रमाणे कितीतरी पटीनी सध्याचे चित्रपट भारतीय समाजाला नादान, निःसत्त्व, नीतिशून्य बनवीत आहेत. ही अधोगती टाळायची असेल, तिला वेळीच पायबंद घालायचा असेल तर चित्रपटाकडे लोकशिक्षणाचे साधन ह्या दृष्टीने बघायला पाहिजे व नंतरच त्याची निर्मिती करायला पाहिजे. केवळ द्रव्याकडे दृष्टी ठेवून समाजाच्या हीन प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे नीचकार्य निर्माते व दिग्दर्शक करीत आहेत ते अत्यंत निंदनीय होय. यात ज्या काळी सुधारणा व्हायची असेल तेव्हा होवो. एवढे मात्र खरे की सध्याच्या चित्रपटांनी भारतीय समाजाची हानी केली आहे. आपण हा ठराव एकमताने पास कराल अशी आशा व्यक्त करून मी आपली रजा घेते.

नागपुरची भाषा कोणती हे सांगणे फार कठिण. घरांत मराठी व व्यवहारात हिंदी सर्रास चालते. बाहेर हिंदीत बोलणे हा येथे फॅशनचा भाग आहे. त्यामुळे थोडीफार हिंदी येणे आवश्यक असते. आईबाबांची हिंदी हा आमच्या घरी थट्टेचा विषय आहे. त्यामुळे बाबांची काही हिंदी भाषणे सापडली तेव्हा मौज वाटली. अर्थात मुंबईला आल्यावर आणि मुंबईकरांचे हिंदीवरील 'प्रभुत्व' पाहिल्यावर आता दुसऱ्या कोणाची थट्टा करणे संभव नाही. डोलेमे धूल के कन जाते है (डोळ्यात धुळीचे कण जातात), मै सिर्फ घास खाऊँगा (मी फक्त एक घास खाईन), कंटाला आ गया (कंटाळा आला), वगैरे प्रकार ऐकले की वाटते मुंबईकरांनी आईबाबांची ट्‌युशन कां लावू नये!

खालील वादविवादात वक्त्यांना मराठीत, हिंदीत किंवा इंग्रजीत बोलण्याची मुभा होती. अर्थात विषयाचे या भाषांत भाषांतर करतांना आयोजकांनी घोटाळा केलाच. तो बाबांनी निदर्शनास आणून देऊन मग खऱ्या ठरावाचा समाचार घेतला.




ठराव : Where ignorance is bliss, it is folly to be wise.


समर्थनाचे भाषण


'अज्ञानी लोकांत ज्ञानी माणसाने राहाणे हा महान मूर्खपणा होय' असा आजचा ठराव आहे. ह्या मंडळाच्या सूचनापत्रकात मराठी विषय देतांना 'ज्ञानापेक्षा अज्ञानात अधिक सुख आहे' असा विषय दिला आहे. पण हे 'Where ignorance is bliss, it is folly to be wise' ह्या मूळ इंग्रजी ठरावाचे योग्य भाषांतर मला वाटत नाही. म्हणून मूळ इंग्रजी ठराव जसा आहे तसेच त्याचे मी समर्थन करणार आहे. आणि आपणाला पटवून देणार आहे की जेथे अज्ञानाचे साम्राज्य आहे तेथे शहाण्या माणसाने वास करणे हे मूर्खपणाचे आहे.

अज्ञानी लोकांच्या सभेत शहाण्याने काही शहाणपणा सांगितला तर त्याची काय शोभा होते हे आपणाला माहीत आहेच. ते त्याची सहज हुल्लड उडवितात. त्या शहाण्या माणसाने आपले म्हणणे कायमच ठेवले तर त्याबद्दल त्याला जबर दंड बसतो. कधी कधी त्याच्या जीवावर बेतते. अशा गोष्टी आपल्याला व्यवहारात नेहमी आढळतात. अडाणी खेडूतांना स्वतःची निगा कशी राखावी हे सांगू गेलो तर तेच आपणाला उलट शहाणपणा शिकवितात. आमच्या बापदाद्यांनी आजपर्यंत आपण सांगता तसं नाही केलं म्हणून आपणाला सांगतात. खेड्‌यात देवीची साथ उद्भवली असता त्यांना लस टोचून घ््यावयाला सांगितले किंवा इतर उपचार करावयाला सांगितले तर ते त्यांना पटत नाही. 'हा देवीचा कोप आहे' ह्या त्यांच्या अंधश्रद्धेला आपण छेडले तर ते आपणावर तुटून पडतील. एखाद्याने आपले म्हणणे कायम ठेवून त्यांच्या देवीच्या पूजेत विघ््न आणले तर त्याचा जीव घेण्यासहि ते कमी करणार नाहीत.

आणखीहि अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. गॅलिलिओपूर्वी पृथ्वी सपाट आहे असा लोकांचा समज होता. गॅलिलिओने पृथ्वी गोल आहे असे सांगितले, इतकाच त्याचा अपराध. त्याबद्दल त्याला देहदंड मिळाला. येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढविण्यात आले. सॉक्रेटिसला विष देण्यात आले. ज्ञानदेव, तुकाराम आदि संतांचा त्यावेळच्या लोकांनी कसा छळ केला, हे आपल्याला इतिहास सांगतोच. महात्मा गांधींचीहि तीच गत झाली. मग ह्या थोर थोर लोकांनी अज्ञानी लोकांना आपला शहाणपणा देण्यात चूक केली असे म्हटले, तर त्यात कोठे चुकले? बरे ह्यांचे प्राण खर्ची पडूनहि जग ताळ्यावर आले का? त्याच्यात काही सुधारणा झाली का? त्यांच्या मार्गाने जग गेले कां? उत्तर आपणाला नकारार्थीच द्यावे लागेल. भगवान बुद्धानंतर त्याच्या अनुयायांनी, भिक्षूंनी आणि भिक्षुणींनी कसे धिंडवडे उडविले ते आपण जाणताच. येशू ख्रिस्ताची शांति व सहनशीलता त्याच्या अनुयायांत कितपत उतरली? महात्मा गांधींची शांति व अहिंसा आता कोठे शिल्लक आहे? हे सारे पाहिले म्हणजे मोठ्‌या खेदाने म्हणावे लागते की ह्या क्रूर, स्वार्थी व अज्ञानी जगांत ज्ञानी माणसाने वास्तव्य करणे म्हणजे मोठा मूर्खपणाच होय. त्याचीच बिचाऱ्याची शेवटी हानी होते.

पुष्कळ जण म्हणतात अंधाराचा नाश करायला दिवाच पाहिजे. पण सर्वत्र जेथे अंधारच अंधार आहे तेथे दिवा काय करणार? तो काजव्याप्रमाणे चमकेल, पण त्याने अंधाराची भयाणताच प्रतीत होईल. जेथे सर्वच रोगी आणि व्याधिग्रस्त आहेत, तेथे डॉक्टर आणि वैद्य बिचारे काय करणार? तेच रोगाला बळी पडतील. तुफान वादळ सुटले असताना कुशल खलाशी काय करणार? तोच समुद्रास्तृप्यंतु व्हायचा! भोवतालची सारी परिस्थिति विरुद्ध असतांना, साऱ्या शक्ति प्रतिगामी असताना एकटा माणूस काय टिकाव धरणार? त्याचाच खात्मा होईल. तेव्हा अज्ञानाच्या साम्राज्यात विद्वानाने न जाणेच बरे. कावळ्यांच्या राज्यात कोकिळांनी पाऊल न ठेवणेच बरे. त्यांची तेथे मुळीच किंमत होऊ शकत नाही. ज्ञान्याची किंवा विद्वानाची किंमत ज्ञानी किंवा विद्वानच करू शकतात. मूर्ख माणसे त्याची काय किंमत करणार? असो. वेळ संपत आला आहे. आणि आपणहि सुज्ञ आहात. तेव्हा आपणाला विनंति एवढीच की आपण हा ठराव एवढ्या प्रचंड बहुमताने पास करा की विरोधकांच्या छातीत धडकीच भरेल.

आपण माझे भाषण शांत चित्ताने ऐकून घेतले. याबद्दल आपले हार्दिक आभार मागून मी आपली रजा घेतो.

विरोधाचे भाषण


'Where ignorance is bliss, it is folly to be wise.' अज्ञानी आदमीयोके बीच ज्ञानी आदमीने रहना यह बडी मूर्खता है यह आजका प्रस्ताव है. मै पहलेहि आपको बता देना चाहता हूँ मै इसका विरोध करनेवाला हूँ और बहोतहि कडवा विरोध करनेवाला हूँ. इस विषयके बारेमें जो अपने विचार प्रकट करते है उनका सारा कहना तो मुझे फोल ऐसा लगता है. क्या वे यह बताना चाहते है की भयाण अंधःकारमें दीप की आवश्यकता नही? क्या इनका यह कहना है रोगोंसे और व्याधियोंसे पीडित जनतामें डॉक्टर रहना उचित नही? विशाल नदीको पार करनेमें कुशल मल्लाह की गरज नही? मुझे तो इस विषयके समर्थकोंके बुद्धीके ऊपर दया आती है? मुझे यह कहनेमें बहोत खेद होता है की एक तो वे बुद्धिहीन है, और अगर बुद्धिमान है तो वे अप्रामाणिक है. कोई भी बुद्धिमान आदमी अगर वो प्रामाणिक है तो ऐसा नही कह सकता की हुशार आदमी मूर्ख आदमियोंके बीच रहना उचित नही. अस्तु.

सत्पुरुषके सत्संगसे पापी आदमीभी उद्धार पाते है. तद्वतहि ज्ञानी आदमी अपने ज्ञानके प्रभावसे अज्ञानी आदमियोंका अज्ञान नष्ट कर सकता है. वो उनको सुधार सकता है. उनको सच्चा जीवन दे सकता है. एक तेजस्वी दीप जैसा अंधःकारको नष्ट करता है वैसाहि हुशार आदमी, उसमे अगर सेवाबुद्धि जागृत हो तो, अडाणी जनताको सुख पहुचा सकता है. क्या हमारा विरोध करनेवाले इतनी धिटाई कर सकते है की सूर्य को महामूर्ख कहे?

एकेक ज्ञानी आदमीने सारा जीवन का नक्षा बदल दिया. सॉक्रेटिस, येशू ख्रिस्त, भगवान बुद्ध, महात्मा गांधी जैसे ज्ञानी पुरुषोंने अज्ञानी जनताको सच्चा रास्ता दिखाया. जीवनका असली रहस्य उनको समझा दिया. क्या ये सारे थोर पुरूष जिन्होंने अपना सारा जीवन अज्ञानी और दलित जनताके बीच रहकर उनकी दशा सुधारनेमें और उन्हे योग्य मार्ग दिखानेमें बिताया वे मूर्ख थे? अगर आप वे सारे थोर पुरुषोंको मानते हो तो आपको यह भी मानना होगा की अज्ञानी और गलत रास्तेपर चलनेवाले असंख्य लोगों के बीच एक तो भी ऐसा ज्ञानी और हुशार आदमी होना चाहिये जो सच्चा रास्ता जानता है. वही एक तमाम अज्ञानी लोगोंका सहारा है. उनकेहि भरोसे वे अपना कार्य निपटा सकते है. एक पुण्यवान पुरुष अपने पुण्यके प्रभावसे पतितोंका उद्धार कर सकता है. पावन प्रभूका नाम लेकर पतितभी पावन हो जाते है. तद्वतहि सच्चा ज्ञानी आदमी लोगोंका अज्ञान नष्ट कर सकता है, इसमें कोई संदेह नही. जो आदमी स्वतः ज्ञानी होकर भी अज्ञानी लोगोंका अज्ञान दूर करनेका प्रयत्न नही करता, वो स्वार्थी है और कायर भी. उसके ज्ञानका जनताको कोई फायदा नही. जैसे कोई सुवासिक फूल जंगलमे फुलते है और सूख जाते है, उसके सुवासका लोगोंको कुछ फायदा नही, उसी प्रकार आदमी कितनाभी ज्ञानी क्यों न हो, अगर वे अज्ञानी जनता की मदत नही करता, तो उसका संसारको कोई फायदा नही.

अब जादा विवेचन की गरज नही. आप समझदार है. और समय भी जादा नही. मै आपको इतनीहि विनंति करता हूँ की आप इस प्रस्तावको ठुकरा दो. आपने मेरा भाषण शांततासे सुन लिया इसलिये मैं आपको हार्दिक धन्यवाद देता हूँ और आपकी रजा लेता हूँ.

ठराव : या सभेच्या मते स्त्रिया प्राथमिक शिक्षण देण्याच्या बाबतीत ज्यास्त उपयोगी असतात.


विरोधाचे भाषण


आजच्या सभेसमोरील चर्चेचा विषय काय आहे ते आपणा सर्वांना माहीत आहेच. ठरावाचे समर्थनहि करण्यात आले आहे. किती लंगडे समर्थन? वरवर विचार न करता थोडासा खोल विचार केल्यास समर्थकांचे सारे मुद्दे पोकळ नी उथळ आहेत असे आपल्या ध्यानात आल्याविना राहणार नाही. म्हणे स्त्रियाच प्राथमिक शिक्षण देण्याच्या बाबतीत अधिक कार्यक्षम असतात. वारे धार्ष्ट्य! पाश्चात्यांच्या संसर्गाने आम्हाला स्त्रीदाक्षिण्याचा रोग जडला आहे. ह्या रोगाने सर्व ठिकाणी नुसता कहर उडवून दिला आहे. शाळाकॉलेजात प्रथम विद्यार्थिनींचे अर्ज मंजूर! विद्यार्थ्यांच्या अर्जाचा विचार मागाहून. कचेरीत कारकुनाची जागा खाली असल्यास किंवा शाळेत शिक्षकाची जागा खाली असल्यास स्त्री उमेदवारांच्या अर्जांना प्रथम प्राधान्य! असे होणे गैर आहे, अगदी गैर आहे, एकदम चुकीचे आहे. कुठेही लायकीचा विचार करण्यात आला पाहिजे. गुणांना प्राधान्य देण्यात आले पाहिजे. निवड करतांना ही स्त्री किंवा हा पुरुष असा भेदभाव करता कामा नये. ज्याच्या त्याच्या किंवा जिच्या तिच्या लायकीप्रमाणे त्याला किंवा तिला संधि मिळाली पाहिजे. वर्णभेद नाहीसे करा, जातिभेदाचे भूत गाडून टाका असे आपण म्हणता. मग हे नवीन जातिभेदाचे पिशाच्च का निर्माण करता?

स्त्रियाच प्राथमिक शिक्षण देण्याच्या बाबतीत अधिक उपयोगी असतात. ह्याचा अर्थ असाच ना की पुरुष कुचकामाचे असतात? खरी वस्तुस्थिती तर अशी आहे की आजचा ठरावच कुचकामाचा आहे. हा ठराव स्त्रीदाक्षिण्याच्या विकृत मनोवृत्तीचे अपत्य आहे. तुम्हाला स्त्रीदाक्षिण्य दाखवावयाचे आहे, स्त्रियांना जादा हक्क, अधिक सवलती, ज्यास्त अधिकार द्यायचे आहेत, तर सरळ सरळ तसे म्हणा. अशी दिशाभूल करणारी भाषा कशाला वापरता? स्त्रिया अधिक कार्यक्षम आहेत, ज्यास्त उपयोगी आहेत असे कशाला म्हणता? सरळ असे म्हणा की स्त्रियांची आम्हाला दया येते, त्यांना कोणता तरी एक स्वतंत्र व्यवसाय पाहिजे, आणि म्हणून त्यांना देऊन टाकाना प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात स्वैर संचार! ते आम्ही समजू तरी शकू. पण त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि उपयुक्ततेचा एवढा बडिवार कशाला? बालमानसशास्त्राच्या गप्पा कशाला मारता? लहान मुलाला मातेचे हृदय हवे असते, मातेची संवेदना हवी असते, आईचे प्रेम नी ममता हवी असते, जिव्हाळ्याची शुश्रुषा हवी असते. अरे बाबा कबूल! तुमचे म्हणणे एकदम कबूल! ६ ते १० वर्षांच्या कोवळ्या बालवयात मुलाचा ओढा विशेष आईकडे असतो. तो आईजवळ हट्ट करतो, आईजवळ रडतो, आणि आईजवळ हासतोहि पण. हेहि आम्हाला मान्य. पण मुलाचा ओढा आईकडे असतो म्हणजे शाळेतल्या शिक्षकिणीकडे नव्हे! त्याला शाळेत शिक्षक काय किंवा शिक्षिका काय सारख्याच भयंकर. परवाच मी एका पालकाची तक्रार ऐकली. त्यांची मुलगी प्राथमिक शाळेत आहे. ते म्हणत होते की त्यांच्या मुलीला ती शाळेतली बाई खूप झोडपते म्हणून. शिक्षक पुरवले पण ती बया नको! काय आहे की नाही गंमत? अहो शाळेतील शिक्षिका शाळेतील मुलांना आपल्या मुलांप्रमाणे वागवील तर ना? ती शाळेच्या आवारात पाऊल ठेवताच आपल्या साऱ्या कोमल भावना गुंडाळून ठेवते आणि पुरुष शिक्षकाएवढीच कठोर नी क्रूर बनते, असा अनुभव आहे. मग आपणच सांगा स्त्रियांची प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत अधिक कार्यक्षमता कोठे उरली?

स्त्रीशिक्षिकांच्याकडे प्राथमिक शिक्षणाचे कार्य सोपविल्यास दुसरीहि एक आपत्ति ओढवणार आहे. ती शिक्षिका कुमारिका किंवा विधवा असेल तरच कदाचित ह्या आपत्तीतून सुटका! परंतु कुमारिका असली तर तिचे लग्न होणारच आणि विधवा असली तर पुनर्विवाह होण्याला प्रत्यवाय नाही. तेव्हा ह्या स्त्रीशिक्षिकांना दोन वर्षातून निदान तीनचार महिन्यांची हक्काची सुट्टी लागणार! त्यांच्या जागी दुसऱ्या शिक्षिका नेमाव्या लागणार. शिक्षण खात्याचा खर्च वाढणार, आणि शिक्षिकांची अशी वारंवार अदलाबदल झाल्यामुळे बिचाऱ्या निरपराध मुलामुलींच्या शिक्षणाचा धुव्वा होणार ते निराळेच.

मी सत्यान्वेषणाच्या भरात ही जी विधाने केलीत, त्याबद्दल येथे जमलेल्या श्रोतृसमुदायातील भगिनीवर्ग रुष्ट होण्याचा संभव आहे. पण कृपा करून त्यांनी तसे करू नये. माझ्या विधानांचा विपर्यास त्यांनी करू नये. स्त्रिया प्राथमिक शिक्षणाचे कार्य करू शकत नाहीत, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही. माझे म्हणणे एवढेच की त्या पुरुषांपेक्षा अधिक उपयुक्त किंवा अधिक कार्यक्षम आहेत हे मात्र अगदी धादांत खोटे आहे. पुरुष आणि स्त्रिया ह्या सारख्याच कार्यक्षम आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. त्यांच्या कार्यशक्तीत भेद करता कामा नये, आणि म्हणूनच माझा ठरावाला कसून विरोध आहे. ज्यास्त चर्चा करण्याची गरज नाही. तेव्हा आपण सर्वांनी ह्या ठरावाच्या विरुद्ध मते द्यावीत, आणि ठराव फेटाळून लावावा अशी विनंति करून मी आपली रजा घेतो.

समर्थनाचे भाषण


गोष्ट खरी आहे, सोळा आणे खरी आहे, यात संशय नाही. शिक्षणविषयक अनेक प्रयोग केल्यानंतर ही गोष्ट सिद्ध झाली आहे. आणि कित्येक पाश्चात्य देशातून प्राथमिक शिक्षणाची सर्व धुरा स्त्रीशिक्षिकांनीच वाहिलेली दिसून येते. आणि ते कार्य त्यांच्या हातून अत्युत्कृष्ट रीतीने पार पडलेलेही दिसून येते.

मी काही मोठा शिक्षणशास्त्रज्ञ लागून गेलो नाही की डॉ. सर राधाकृष्णन प्रमाणे शेकडेवारीच्या आकड्‌यानिशी माझ्याकडून आपण ठरावाच्या समर्थनादाखल पुराव्याची अपेक्षा करावी. मी एक साधासुधा हायस्कूलचा विद्यार्थी आहे. आपल्या कॉलेजच्या नजीकच्याच शाळेत मी शिक्षण घेत असतो. आपल्या मगदुराप्रमाणे काही वाचीत असतो? शैक्षणिक वाङमयाची विशेष आवड असल्यामुळे अभ्यास सांभाळून सवडीनुसार तेहि वाचीत असतो. प्राथमिक शिक्षणासंबंधी काही विद्वानांचे लेखहि मी वाचले आहेत. नाही असे नाही. ह्या परिशीलनाचा माझ्या मनावर जो काही परिणाम झाला, त्यात माझ्या विचारांची भर घालून मी ठरावाच्या समर्थनार्थ काही मुद्दे आपणासमोर मांडणार आहे.

प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी मुले व मुली साधारणतः ६ ते १० वर्षे वयाची असतात. ह्या शिक्षणाच्या चार इयत्ता असतात. आणि ६ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक मुलाला अगर मुलीला प्राथमिक शाळेत घातलेच पाहिजे असा कायदा आहे. आणि म्हणून ६ ते १० ही वयोमर्यादा मी आपणाला सांगितली. हे वय म्हणजे किती लहान! किती कोवळे! त्यांची मने ह्या वयात किती लवचिक नी संस्कारसुलभ असतात. ही मुले म्हणजे ओली मडकी. ओल्या मडक्याचा काठ जसा लववावा तसा लवतो. तद्वतच ह्या लहान अर्भकांच्या मनावर आपण जसे संस्कार करू ते त्यांच्या मनावर कायमचे उमटून पुढील आयुष्यात ते बलवत्तर होतील. त्यांच्या आयुष्याला आकार देण्याची ही वेळ! पण नेमकी प्राथमिक शिक्षणाचीच अवहेलना चाललेली आपल्या देशात दिसून येते. प्राथमिक शिक्षणाचे काही विशेष महत्त्व नाही, असेच जणू मानण्यात येते. प्राथमिक शिक्षण देण्याकरिता काही विशिष्ट दर्जा व लायकी लागत नाही असेच जणू मानण्यात येते. प्राथमिक शिक्षकाचे जीवनवेतनहि अत्यंत कमी असते. परिणामतः निःसत्त्व, निरुत्साही आणि उदासीन असेच शिक्षक ह्या लहान लहान अर्भकांना शिक्षण देतांना दृष्टोत्पत्तीस पडतात. पालक आपली कोवळी कोवळी मुले शाळेत दाखल करतात. आपला बहुमोल ठेवा ह्या शिक्षकांच्या हवाली करतात. गुलाबाची फुले असतात ती! पण चार वर्षांनंतर जेव्हा त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होते, तेव्हा काय दिसते? ह्या नाजुक फुलांची पाकळी न पाकळी चोळामोळा झालेली असते. पालकांचा केवढा हा आशाभंग! ज्या बालकांचे पुढे उत्तम नागरिक बनावयाचे त्यांची ह्या शिक्षणाच्या चरकातून बाहेर पडल्यानंतर रस निघून जाऊन चिपाडे शिल्लक राहिलेल्या ऊसाप्रमाणे अवस्था होते. असे कां व्हावे? ह्याला अनेक कारणे आहेत. सध्याची शिक्षणपद्धतीहि त्याला कारणीभूत आहे. सध्याच्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल झाल्याशिवाय तिची सुधारणा होणार नाही. हे जरी खरे असले तरी प्राथमिक शिक्षण स्त्रीशिक्षिकांकडे सोपविल्यास बराचसा इष्ट बदल घडून येईल. आपणाला माझ्या म्हणण्याचे कदाचित हसू येईल. पण जरा विचार करा. खोल विचार करा. बारकाईने निरीक्षण करा. ६ ते १० वर्षांच्या बालवयात मुलाचा ओढा विशेष कोणाकडे असतो? पित्याकडे की मातेकडे. आपणापैकी कोणाचेहि या बाबतीत दुमत होणार नाही की त्याचा ओढा आईकडेच ज्यास्त असतो. त्याच्या मनाचे नाजूक धागेदोरे आईजवळ उकलत असतात. तो आईजवळ हट्ट करतो. आईजवळ रडतो आणि आईजवळ हासतोहि पण. आपण लहान मुलाची घरातील वागणूक पहा. आई त्याला रोज काही ना काही नवीन गोष्ट शिकवीत असते. आईने त्याला सांजवातीच्या वेळी शिकविलेले शुभंकरोति तो किती हसत खेळत शिकतो! आपण बालमानसशास्त्राच्या दृष्टीने विचार करा. ६ ते १० वर्षांच्या वयात मुलाला शिक्षण देणाऱ्या व्यक्तिजवळ मातेचे हृदय हवे असते. मातेची संवेदना हवी असते. आईचे प्रेम नी ममता हवी असते. जिव्हाळ्याची शुश्रुषा पाहिजे असते. आणि हे सारे कोण करू शकेल? स्त्रीशिक्षिका की पुरुष शिक्षक? उत्तर अगदी सरळ आहे. स्त्रीशिक्षिकाच प्राथमिक शिक्षणाचे कार्य उत्कृष्ट तऱ्हेने बजावू शकतात. त्याच आईच्या ममतेने विद्यार्थ्यांना हासत खेळत शिकवू शकतात. आपल्या प्रेमळ हृदयाने लहान लहान मुलांच्या हृदयात शिरू शकतात. त्यांची सुखदुःखे उमजून घेऊ शकतात आणि त्यांच्या भावनांशी समरस होऊ शकतात. पुरुषांचे हे काम नव्हे. कोमल भावना हा स्त्रियांचा विशेष गुण आहे. एवंच स्त्रियाच प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत अधिक कार्यक्षम ठरतात हेच खरे.

दुसरी गोष्ट अशी की आता मुलांबरोबर मुलीहि शिक्षण घेतात. आता पूर्वीचा काळ राहिला नाही. मुलांनीच केवळ शाळाकॉलेजात जावे आणि मुलींनी घरी बसावे. तो जमाना आता ऐतिहासिक सदरात लोटला आहे. मुलांप्रमाणेच अनेक मुलीहि विश्वविद्यालयाच्या पदवीधर झाल्या आहेत आणि होत आहेत. शिक्षण घेणाऱ्या मुलांचे आणि मुलींचे प्रमाण समान होऊ पाहत आहे. ह्या शिक्षण घेऊन शाळाकॉलेजातून बाहेर पडलेल्या मुलींपैकी पुष्कळांना व्यवसाय करण्याची आवड असते. आणि पुष्कळांना सध्याच्या महागाईच्या काळात कोणता ना कोणता व्यवसाय करण्याची आवश्यकता भासते. परिस्थितीमुळे त्यांना तसे केल्यावाचून गत्यंतर नसते असे म्हणा हवे तर. एरवी रेशनिंग ऑफिसातून आणि इतर कचेऱ्यातून खर्डेघाशीचे व कारकुनीचे काम करणाऱ्या प्रौद्ध कुमारिका आणि स्त्रिया आपणाला आढळल्या नसत्या. विचार करण्यासारखा प्रश्न आहे की असले खर्डेघाशीचे आणि कारकुनीचे काम स्त्रियांच्या स्वाभाविक मनोवृत्तीशी कितीसे सुसंगत आहे? आणि आपल्या पौर्वात्य संस्कृतीशी कितीसे जुळते आहे? पुरुष कारकुनांचा बाजार असलेल्या कचेरीत स्त्रियांनी काम करणे हे केव्हाहि योग्य नव्हे असे माझे स्पष्ट मत आहे. आणि त्याचे दुष्परिणामहि कित्येक वेळा दिसून येतात. परिस्थिति तर अशी आहे की बऱ्याचशा स्त्रियांना उपजीविकेसाठी एखादा व्यवसाय करण्यावाचून गत्यंतर नाही. आणि स्त्रियांनी कोणताहि व्यवसाय करणे हे तर धोक्याचे आहे. तेव्हा अशा परिस्थितीत ज्या क्षेत्रात स्त्रियाच अधिक प्रभावीपणे कार्यक्षम ठरू शकतात, असे प्राथमिक शिक्षणाचे क्षेत्र स्त्रियांसाठी मोकळे करून देणे हेच शहाणपणाचे ठरणार आहे. त्यायोगे स्त्रियांना उपजीविकेचा सन्माननीय धंदाहि सापडेल. त्यांच्या स्वाभाविक प्रवृत्तीला ते सुसंगत व पोषकहि होईल. शिशुशिक्षणाचे कार्यहि सुव्यवस्थित पार पडेल. आणि स्त्रियांना स्वतःची कर्तबगारी दाखविण्याकरिता स्वतंत्र कार्यक्षेत्रहि मिळेल. अशा रीतीने अनेक प्रश्न आपोआप सुटतील.

आपण सुज्ञ आहात. आपणाला हे सारे पूर्वीच माहीत असेल. आजच्या वादविवादाच्या व्यवस्थापकांनी वादविवादाकरिता तसा विषयच ठेवल्यामुळे आपणाला अगोदरच माहीत असलेले मला आपणाला पुन्हा सांगावे लागले एवढेच. असो. मला देण्यात आलेला मर्यादित वेळ संपत आलेला आहे. तेव्हा विषयाची ज्यास्त चर्चा करणे योग्य होणार नाही हे मी जाणून आहे. येथे श्रोतृसमुदायात बऱ्याच भगिनी मला दिसतात. त्या तर ठरावाच्या बाजूने मते देतीलच यात शंका नाही. येथे जमलेल्या पुरुषांपैकी बरेच जण लहान मुलांचे पालक असतील. नसले तर पुढे होतील. तरी त्यांनी निदान आपल्या लहान मुलामुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीने, त्यांची आयुष्ये मातीमोल होऊ नये म्हणून तरी ठरावाच्या बाजूनेच मते द्यावीत आणि ठराव प्रचंड बहुमताने पास करावा अशी विनंती आहे.

विषयाच्या बाजूने किंवा विषयाच्या विरोधात आपले मत मांडणे त्यातल्या त्यात सोपे. विषयाच्या बाजूनेहि एक व विरोधातहि एक मत तितक्याच आवेशाने व समर्थपणे मांडणे त्याहून कठिण. विषयाच्या बाजूनेहि अनेक व विरोधातहि अनेक मते मांडून बाबांनी मात्र इतिहास घडविला. शाळेच्या एका स्नेहसंमेलनांत एक वादविवाद घडवून आणला. संपूर्ण शब्दपूर्तीचा कॉन्ट्रॅक्ट बाबांनी स्वतःकडे घेतला. ठरावाच्या बाजूने व विरोधात ५-५ जणी उभ्या करून जुंपवून दिली. स्नेहसंमेलनातील हे एक तासाचे अस्नेह-संमेलन एक आगळावेगळा कार्यक्रम ठरला.


ठराव्र : या सभेच्या मते स्त्रियांना हल्ली देण्यात येणारे शिक्षण समाजविघातक आहे.


प्रतिपादक १


आज मी आपणासमोर जो ठराव मांडणार आहे, तो ऐकून येथे जमलेल्या स्त्रिया मला 'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' ठरवितील तर स्त्रीशिक्षणाचा अभिमानी पुरुषवर्ग माझ्यावर रुष्ट होईल. तो ठराव म्हणजे 'या सभेच्या मते स्त्रियांना हल्ली देण्यात येणारे शिक्षण समाजविघातक आहे' हा होय. पण माझ्यासारख्या समाजकार्य करावयास निघालेल्या मुलीला समाजाच्या रोषाची पर्वा करून कसे चालेल? आणि आपलेच हित कशात आहे हे स्पष्टपणे बोलून दाखविणाऱ्या माझ्यासारख्या निर्भीड मुलीवर रागावण्याइतके आपण असमंजस असाल, असे निदान मी तरी समजत नाही. माझी तर अशी खात्री आहे की आपला हा रोष क्षणभंगुर ठरेल, आणि माझे भाषण संपण्याच्या अगोदरच आपला राग शांत झालेला असेल.

मी प्रथमच आपणास सांगून टाकते की, स्त्रिया आणि पुरुष यांची कार्यक्षेत्रे भिन्न परंतु परस्परपूरक आहेत. पुरुषांचे कार्यक्षेत्र घराच्या बाहेर, तर स्त्रीचे कार्यक्षेत्र घराच्या आत. पुरुषांनी उद्योग करावा, पैसा मिळवावा, घराबाहेरची सर्व कामे करावी, आणि स्त्रीने घराची अंतर्गत व्यवस्था ठेवावी, ही हिंदूंची आदर्श समाजव्यवस्था आहे. परंतु आम्हाला अंधश्रद्ध म्हणणाऱ्या परंतु परक्यांचे नेमके अंधानुकरण करणाऱ्या आपणातील सुधारकांना ही समाजव्यवस्था पटत नाही, आणि रुचत नाही. सकाळचे दहा वाजले की घरातील मुलांबरोबर मुलीहि काखोटीस पुस्तके घालून घराबाहेर पडतात. नवऱ्याबरोबर वायकोहि आपल्या उद्योगास जाण्यास घराबाहेर पडते. सारे घराबाहेर! घरात तान्हे मूल असलेच तर ते नोकरांच्या किंवा दाईच्या भरवशावर! मुलाचा आणि आईचा कधी सबंधच येत नाही. अशा स्थितीत त्या मुलाला वळण ते काय लागणार आणि पुढे तो उत्तम नागरिक तरी काय तयार होणार? चुलीला तर कायमची विश्रांतीच असते. आणि हा सारा कशाचा परिणाम? तर स्त्रियांमध्ये वाढत असलेल्या शिक्षणाच्या वेडाचा. आणि हे वेड असेच वाढत गेले तर आमच्या समाजापुढे काय वाढून ठेवले आहे याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले म्हणजे अंधारी येते. अशा स्थितीत ज्यांना ज्यांना म्हणून समाजहिताची काळजी आहे त्यांनी आपल्या मुली, बहिणी, बायका कॉलेजात पाठविणे बंद करावे, अशी मी त्यांना कळकळीची विनंति करते. मुलींच्या सर्व शाळा आणि कॉलेजे केव्हा बंद पडतील त्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. हा ठराव जेव्हा मतास टाकण्यात येईल तेव्हा सर्वांनी तो एकमताने पास करावा अशी मी आपणाला आग्रहाची विनंति करते, आणि आपली रजा घेते.

विरोधक १


अध्यक्ष महाराज आणि माझ्या प्रिय बंधुभगिनीनो!

मी ठरावाला विरोध करण्याकरिता आपणासमोर उभी आहे. एखाद्या पुरुषाने हा ठराव आपणासमोर मांडला असता तर त्यात आम्हाला विशेष आश्चर्य वाटले नसते. एखाद्या वृद्ध बाईने या ठरावाचे समर्थन केले असते, तर तेहि मी समजू शकले असते. पण माझ्या पूर्वीच बोलून गेलेली वक्ती कोण आहे हे जेव्हा आपणास कळेल तेव्हा माझ्याप्रमाणेच आपणाला मोठा खेद आणि आश्चर्य वाटेल. त्या माझ्याच बरोबर या शाळेत इंग्रजी शिक्षण घेत आहेत. मी त्यांना सरळ असा प्रश्न विचारते की, 'काय हो, आपला स्त्रीशिक्षणाला एवढा विरोध आहे, तर आपण शाळेत शिक्षण घेण्याकरिता येता तरी कशाला? घरी स्वयंपाक करीत आणि मुले सांभाळीत कां बसत नाही? त्यांच्या एकंदर बोलण्याच्या तऱ्हेवरून आपणाला कळून चुकले असेल की त्यांनी समोर मांडलेली मते त्यांची त्यांनाच पटत नाहीत. त्या बोलण्याला भीतभीतच उभ्या राहिल्या. पहिले प्रथम त्यांनी अशी शंका प्रदर्शित केली की, येथे जमलेला स्त्रीसमाज त्यांना 'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' म्हणेल आणि स्त्रीशिक्षणाचा अभिमानी पुरुषवर्ग त्यांच्यावर रुष्ट होईल. त्यांनी प्रदर्शित केलेली शंका अक्षरशः खरी आहे. माझी अशी खात्री आहे की, येथील श्रोतृसमाज त्यांच्यावर इतका रुष्ट झाला असेल की ठरावाच्या बाजूने एकहि मत पडणार नाही. असो.

आज ह्या ३६ कोटी लोकसंख्येच्या देशातील १८ कोटी स्त्रिया घरात डांबल्या रहाव्या, आणि त्यांची सारी कर्तृत्वशक्ति यांपुरतीच मर्यादित असावी, ही केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे! अर्धी लोकसंख्या याप्रमाणे अज्ञानात वावरत असता, आणि तिचा घराबाहेरील जगाशी संबंधहि येत नसता देशाचा उद्धार व्हावा तरी कसा? खरे पाहिले तर समाजरूपी रथाची स्त्री आणि पुरुष ही दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके जेव्हा तुल्यबल राहतील, तेव्हाच समाजाचा रथ प्रगतीच्या मार्गावर पुढे जाईल. आज जगाच्या पाठीवरील कोणतेहि सुधारलेले राष्ट्र घ््या, तेथे तुम्हाला स्त्रिया शिक्षणाच्या बाबतीत पुरुषांच्याच बरोबरीने पुढे गेलेल्या आढळतील. असे असता, जग कुठे आहे याचा किंचितहि विचार न करता एका तरुण मुलीने मुलींची शाळा कॉलेजे बंद पडण्याची आतुरतेने वाट पहावी, यासारखी आम्हाला लांच्छनास्पद दुसरी गोष्ट नाही. (शेम, शेम). स्त्रिया सुशिक्षित झाल्याशिवाय आपल्या देशाची कधीहि भरभराट होऊ शकत नाही. ज्यांना ज्यांना देशाची उन्नति व्हावी असे वाटत असेल, त्यांनी स्त्रीशिक्षणाचा जोराने प्रसार करावयास पाहिजे. शेवटी आपण हा ठराव एकमताने फेटाळून लावावा अशी आपणास विनंति करून मी आपली रजा घेते.

प्रतिपादक २


अध्यक्ष महाराज, उपस्थित बंधुभगिनी आणि माझ्या बालमैत्रिणींनो! आपणासमोर अगदी प्रथम बोलून गेलेल्या माझ्या मैत्रिणीने ठराव मांडलेला आहे, आणि त्यानंतर माझ्या दुसऱ्या विद्वान मैत्रिणीने त्याला विरोध करण्याचाहि प्रयत्न केला. त्यांना म्हणे आमच्या पहिल्या मैत्रिणीने ठरावाचे प्रतिपादन केल्याचे मोठे आश्चर्य वाटले, आणि मोठा संतापहि आला. आणि त्या संतापाच्या भरात त्यांनी आम्हाला शापहि देऊन टाकला की तुमच्या ठरावाच्या बाजूने एकहि मत पडणार नाही म्हणून. परंतु त्यांना म्हणावं 'कावळ्याच्या शापानं गायी मरत नसतात!'. ठराव पास होणार की नापास होणार हे तुमच्या जळफळाटावर थोडेच अवलंबून आहे? आणि या सभेत हा ठराव फेटाळला गेला, तर आमची स्त्रीशिक्षणविरोधाची चळवळ थोडीच बंद पडणार आहे? आमच्या विरोधकांनी हे खूप ध्यानात ठेवावे की, त्यांनी आमच्या नावानं कितीहि बोटं मोडलीत, तरी आम्ही आपला प्रचार अव्याहत चालू ठेवणार! आम्ही आपल्या जीवाचे रान करू, पण हे स्त्रीशिक्षणाचे खूळ नष्ट करूच करू. (हिअर, हिअर). जोपर्यंत एकहि मुलगी किंवा एकहि स्त्री शिक्षण घेत आहे, तोपर्यत आमच्या जिवाला चैन नाही, आम्हाला विश्रांती नाही. ही स्त्रियांची शाळा आणि काॅलेजे पाहिली, म्हणजे माझ्या मस्तकात तिडीक उठते. मुली रस्त्याने शाळाकॉलेजात जाताना पाहिल्या म्हणजे तळपायाची आग मस्तकात जाते. माझ्या अगोदर बोलून गेलेल्या माझ्या मैत्रिणीने आम्हाला मोठ्‌या तोऱ्याने असा प्रश्र विचारला की, 'कायहो! तुमचा स्त्रीशिक्षणाला एवढा विरोध, तर तुम्ही शाळेत तरी कशाला येता?'. त्यांना प्रश्न विचारतांना असे वाटले असेल की, काय निरुत्तर करणारा प्रश्न आहे म्हणून! पण उत्तर मी देते. मी आणि माझ्या मताच्या इतर अनेक मुली ज्या आपणाला शाळेत दिसतात, त्या काही शिक्षण पसंत आहे म्हणून नव्हे, तर शाळा कॉलेजांच्या बाहेर राहून केलेल्या चळवळीपेक्षा शाळा कॉलेजांच्या आत शिरून केलेली चळवळ ज्यास्त परिणामकारक होईल, असे आम्हाला वाटते म्हणून. काँग्रेसच्या भूमिकेप्रमाणे आमची भूमिका आहे. काँग्रेसने ज्याप्रमाणे राज्यघटना मोडण्याकरिता घटनेचा स्वीकार केला, त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा शाळाकॉलेजांना मूठमाती देण्याकरिता शाळा कॉलेजांमधून प्रवेश मिळविला आहे. मी तर आपणाला शपथेवर सांगते की आमच्या बाई आणि मास्तर जेव्हा आम्हाला शिकवितात, तेव्हा माझे अभ्यासाकडे मुळीच लक्ष नसते. (हंशा). माझ्या डोळ्यासमोर ध्येय एकच आणि ते म्हणजे स्त्रीशिक्षणाचा विरोध. आमचे विरोधक आम्हाला 'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' म्हणतात. पण आम्ही आमच्या गोताचा काळ नाही, तर आमच्या चळवळीच्या विरोधकांना आणि स्त्रीशिक्षणाचे स्तोम माजविणाऱ्यांना मात्र आम्ही काळाप्रमाणे भासतो, त्याला आमचा काय इलाज?

ठरावाला विरोध करावयास उभ्या राहिलेल्या माझ्या अगोदरच्या वक्तीने आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीसच पुरुषवर्गावर आणि वृद्ध स्त्रियांवर शिंतोडे उडविले. मी तर असे म्हणते की पुरुषवर्गाचे आणि वृद्ध स्त्रियांचे आमच्यावर मोठे उपकार आहेत की, त्यांनी वेळी अवेळी स्त्रीशिक्षणाचा विरोध करून आमच्या चळवळीला बरेच साह्य केले आहे. आम्हाला मोठ्या शिताफीने आणि युक्तीने आजपर्यंत अज्ञानात ठेवल्याबद्दल आमचे पुरुष तर धन्यवादास पात्र आहेत. (हंशा). असो. उत्साहाच्या भरात मी फारच वाहवले, याबद्दल आपण उदार अंतःकरणाने मला क्षमा कराल अशी आशा आहे.

शेवटी पुरुषांनी आपल्या स्वार्थाकरिता, स्त्रियांनी त्यांच्याच हिताकरिता, आणि माझ्या बालमैत्रिणींनी निदान आपल्या मागील अभ्यासाची कटकट चुकविण्याकरिता आपल्यासमोर मांडण्यात आलेला ठराव एकमताने पास करावा अशी आपणास मी नम्रपणे विनंती करते आणि आपले भाषण संपविते.



विरोधक २


अध्यक्ष महाराज आणि बंधुभगिनींनो! मी ठरावाला विरोध करण्याकरिता आपणासमोर उभी आहे. नुकत्याच बोलून गेलेल्या वक्त्रीने आमच्या पक्षावर तोंडसुख घेण्यापलिकडे काय केले? स्त्रीशिक्षण कां नको, आणि ते समाजविघातक कसे हे त्यांनी मुळीच स्पष्ट केले नाही आणि ठरावाच्या समर्थनार्थ एकहि मुद्दा मांडला नाही. त्यांचा पक्षच मुळी लंगडा आहे. तेव्हा त्या समर्थन तरी काय करणार? आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला शिव्या देऊन आपली हौस फेडून घेतली. त्या म्हणाल्या की कावळ्याच्या शापानं ढोरं मरत नसतात म्हणून. मीहि पण त्यांना बजावून ठेवते की, त्यांच्यासारख्या बगळ्यांनी कितीहि बकनाद केला, आणि आपला घसा फोडफोडून व्याख्याने दिली, तरी आता काळ पालटलेला आहे. त्यांची सारी व्याख्याने, त्यांच्या साऱ्या सभा ह्या अरण्यरूदन ठरणार, आणि स्त्रीशिक्षणाचे पाऊल सारखे पुढेच पडत राहणार. मग कशाला आपल्या जीवाचा एवढा आटापिटा करता? तुम्हाला स्त्रीशिक्षण पसंत नाही, तर बसा घरी भाकरी बडवीत आणि पाळण्याच्या दोऱ्या हालवीत. पण समाजाच्या प्रगतीला व्यर्थ आळा घालून पापाच्या धनी कशाला होता?

माझ्या अगोदरच्या व्याख्यात्रींनी भेदनीतीचा अवलंब करून पुरुषांना व वृद्ध स्त्रियांना आपल्या बाजूस ओढण्याचा प्रयत्न केला आहे. पण पुरुषांनीच तर स्त्रीशिक्षणाला प्रथम चालना दिली. महर्षि अण्णासाहेब कर्व्यांनीच तर पहिली स्त्रीशिक्षणाची संस्था काढली. आणि वृद्ध स्त्रिया काही त्यांच्या जाळ्यात फसण्याइतक्या खुळ्या नाहीत. असो. आता मी आपल्या विषयाकडे वळते, आणि स्त्रीशिक्षणाची आवश्यकता काय ते आपणाला पटवून देते.

मला मान्य आहे की स्त्रियांचे मुख्य कार्यक्षेत्र घर आहे, आणि उत्तम नागरिक निर्माण करण्याची त्यांच्या शिरावर जबाबदारी आहे. पण ही जबाबदारी सुशिक्षित आईच ज्यास्त योग्यपणे पार पाडू शकते. जिचे अक्षरांशी शत्रुत्वच आहे, आणि घराच्या चार भिंताडांच्या पलीकडे जगात काय चालले आहे याचा जिला पत्ता नाही, अशी आई आपल्या मुलाला काय शिक्षण देणार? मुलाच्या बालपणाची वर्षे ही मुख्यत्वेकरून आईच्या सहवासात जात असतात, आणि बालपणातच त्यांचा स्वभाव बनत असतो. बऱ्यावाईट गोष्टींचा बरावाईट परिणाम बालपणातच त्यांच्या मनावर होतो. अर्थात आई जर सुशील आणि सुसंस्कृत असेल, तर मूलहि पुढे सुशिक्षित, सुशील आणि सुसंस्कृत निपजेल, हे उघड आहे. पत्नी ही पतीची सहचारिणी मानली तरी सुशिक्षित पत्नीच पतीची उत्तम मदतगार होऊ शकते, अशिक्षित पत्नी नव्हे. वादविवादाच्या अगदी सुरुवातीस माझ्या मैत्रिणीने ठराव मांडतांना 'हिंदूंची समाजव्यवस्था', 'हिंदूंची संस्कृति' वगैरे मोठमोठाले शब्द वापरले. त्या शब्दांचा अर्थ तिला स्वतःला तरी कळला की नाही ईश्वर जाणे. हिंदूंच्या संस्कृतीत स्त्रियांना फार महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळी सुद्धा मैत्रेयी, अरुंधती वगैरे सारख्या विद्वान स्त्रिया आमच्या समाजात होऊन गेल्या, आणि म्हणूनच त्याकाळी आमचा समाज वैभवाच्या शिखरावर आरूढ होता. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' या मंत्राचे त्यावेळी प्रत्यक्ष पालन होत होते. परंतु पुढे काळ पालटला. स्त्रिया पुरुषांच्या दासी बनल्या. त्यांची पुजा होण्याचे तर दूरच राहिले, पण 'न स्त्री स्वातंत्र्य मर्हति' असे त्यांना सांगण्यात येऊ लागले. आणि म्हणूनच आमच्या समाजाला ही अवनत दशा प्राप्त झाली. पूर्वीचे वैभव आणि स्वातंत्र्य पुन्हा प्राप्त करून घ््यावयाचे असेल तर स्त्री समान सुशिक्षित होणे अतिशय आवश्यक आहे. सध्या स्त्रीशिक्षणाचे कार्य वाढीस लागले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. स्त्रीशिक्षणाचा प्रसार करणे हे आपले कर्त्तव्य आहे. आणि ते आपण आपणापुढे मांडण्यात आलेला ठराव फेटाळून अंशतः तरी बजावाल, अशी आशा प्रगट करून मी आपली रजा घेते.

प्रतिपादक ३


अध्यक्ष महाराज आणि सन्मान्य सभासदहो! आतापर्यत आपणासमोर चार भाषणे झाली. पण एकाहि भाषणात ठरावातील महत्त्वाच्या भागावर मुळीच चर्चा झाली नाही. सभेसमोर असलेला ठराव 'स्त्रियांना हल्ली देण्यात येणारे शिक्षण समाजविघातक आहे' असा आहे. 'हल्ली देण्यात येणारे' हे ठरावातील महत्त्वाचे शब्द आहेत. स्त्रियांनी निरक्षर रहावे, त्यांना कोणत्याहि तऱ्हेचे शिक्षण देण्यात येऊ नये, त्यांनी घराच्या बाहेर पडू नये, हे माझे मुळीच मत नाही. उलट माझे असे प्रामाणिक मत आहे की स्त्रियांनी खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सुसंस्कृत झाले पाहिजे. परंतु त्यांना हल्ली देण्यात येणारे शिक्षण हे दोषपूर्ण आहे. ते त्यांच्या भूमिकेला पोषक नाही. स्त्रियांना देण्यात येणारे शिक्षण हे त्यांना सुगृहिणी आणि सुमाता बनविणारे हवे. परंतु हल्ली त्यांना जे शिक्षण देण्यात येते त्यामुळे त्या सुगृहिणी आणि सुमाता बनणे तर दूरच राहिले, पण सुगृहिणी आणि सुमातेच्या भूमिकेला मारक अशी प्रवृत्ति त्यांच्या मनात निर्माण होते. हल्लीच्या शिक्षणामुळे स्त्रियांच्या मनात नोकऱ्यांची आवड, स्वैरतेची आवड, त्याचबरोबर लग्न न करण्याची प्रवृत्ति दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात उत्पन्न होत आहे, आणि हीच प्रवृत्ति जर वाढत गेली, तर समाजरथाचा विचका झाल्याशिवाय राहणार नाही. स्त्रियांना हल्ली देण्यात येणारे पुरुषी थाटाचे शिक्षण हे त्यांना तर हानिकारक आहेच, पण एकंदर समाजालाहि विघातक आहे. ते शिक्षण स्त्रियांना आपल्या मुख्य कर्त्तव्याचा विसर पाडते, नव्हे कर्त्तव्यापासून च्युत करते. माझ्या अगोदरच्या व्याख्यात्रीने मैत्रेयी, अरुंधती वगैरे प्राचीन स्त्रियांचे आम्हाला दाखले दिले. पण त्या हे विसरल्या की मैत्रेयी, अरुंधती ह्या काही हल्लीच्या स्त्रियांप्रमाणे डॉक्टर आणि वकील होऊन दवाखाना उघडत नव्हत्या किंवा कोर्टात जाऊन दावे भांडत नव्हत्या. एखाद्या स्त्रीलंपट माणसाने भगवान श्रीकृष्णाचा दाखला देण्यातलाच हा प्रकार आहे. असो. स्त्रियांना जर शिक्षण द्यावयाचे असेल, तर हल्ली देण्यात येणाऱ्या शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणला पाहिजे. हल्ली आम्हाला जे शिक्षण देण्यात येते, तसल्या प्रकारचे शिक्षण आम्हाला मिळण्यापेक्षा आम्ही कायमच्या अशिक्षित राहिलो तरी आम्हाला पर्वा नाही. तेव्हा आपणापुढे जो ठराव मांडण्यात आला आहे, तो जसाच्या तसा आपण पास कराल असा विश्वास प्रगट करून मी आपली रजा घेते.

विरोधक ३


अध्यक्ष महाराज आणि मत्प्रिय बंधुभगिनींनो! मी आपणासमोर ठरावाला विरोध करण्याकरिता उभी आहे. माझ्या अगोदर आताच बोलून गेलेल्या माझ्या मैत्रिणीने ठरावातील मुख्य मुद्याकडे आपले लक्ष वेधल्याबद्दल मी त्यांची अतिशय आभारी आहे. आणि मी आता ठराव जशा स्वरूपात आहे तशाच स्वरूपात त्याला विरोध करणार आहे, आणि आपणाला हे पटवून देणार आहे की, स्त्रियांना हल्ली जे शिक्षण देण्यात येते, त्यात काही सुद्धा वावगे नाही. पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या बुद्धिमत्तेत किंवा कर्तृत्वशक्तीत निसर्गतःच फरक आहे हे मानायला मी मुळीच तयार नाही. असे शेकडो दाखले दाखवून देता येतील की मुलांना व मुलींना एकत्र शिक्षण देण्यात आले असता मुलींनीच मुलांच्यावर नंबर पटकावला आहे. गेल्या चार वर्षातील आमच्या प्रांतातील मॅट्रिकच्या आणि विश्वविद्यालयाच्या परीक्षांचे निकाल पाहिले असता माझ्या म्हणण्याची सत्यता आपणाला पडल्यावाचून राहणार नाही. डॉक्टराचे किंवा परिचारिकेचे काम स्त्रियाच योग्य रीतीने करू शकतात. शिक्षकाचे काम सुद्धा स्त्रियाच योग्य रीतीने बजावू शकतात. स्त्रियांचे कार्यक्षेत्र घर आहे आणि चूल व मूल हेच त्यांचे कर्त्तव्य आहे, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. हा तर स्त्रियांना आपल्या दास्यत्वात आणि गुलामगिरीत डांबून ठेवण्याचा कुटिल डाव आहे. कित्येक पुरुष तर असे दाखवून देता येतील की, जे स्वयंपाक आणि मुलांचे संगोपनच चांगल्या रीतीने करू शकतील. इतर कोणत्याहि कामास नालायक ठरतील. आणि याच्या उलट कित्येक स्त्रिया अशा दाखवून देता येतील की, ज्या धकाधकीची आणि मोठमोठाली जबाबदारीची कामे करण्यात पुरुषांनाहि हार जाणार नाहीत. अशी परिस्थिति असतांना शिक्षणाच्या बाबतीत हा पुरूष आणि ही स्त्री, हा मुलगा आणि ही मुलगी, असा भेद करण्याचे मुळीच कारण नाही. पुरुषांना देण्यात येणारे शिक्षण निराळे आणि स्त्रियांना देण्यात येणारे शिक्षण निराळे, मुलांकरिता शिक्षण निराळे आणि मुलींकरिता शिक्षण निराळे असा पंक्तिप्रपंच करण्याचे मुळीच कारण नाही. ज्या व्यक्तीला शिक्षण घ््यावेसे वाटेल - मग ती स्त्री असो की पुरुष असो - ती शिक्षण घेईल. ज्या व्यक्तीची मनोवृत्ती घरातील कामे करण्याची असेल - मग ती स्त्री असो की पुरुष असो - ती गृहकृत्यात दंग राहील. अर्थात मुलांना जे शिक्षण देण्यात येते, तेच शिक्षण मुलींनाहि देण्यात आले पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. आणि आपणहि आपणासमोर मांडण्यात आलेल्या ठरावाच्या विरुद्ध मत प्रदर्शित करून माझ्या मताला पाठिंबा द्याल, असा मला पूर्ण भरवसा आहे. आपण माझे भाषण शांतपणे ऐकून घेतले, याबद्दल आपले आभार मानून मी आपली रजा घेते.

प्रतिपादक ४


अध्यक्ष महाराज, उपस्थित सज्जन आणि माझ्या बंधुभगिनींनो! मी आपणासमोर ठरावाचे समर्थन करण्याकरिता उभी आहे. आतापर्यत आपल्यासमोर ठरावाच्या अनुकूल तीन आणि ठरावाच्या प्रतिकूल तीन अशी एकंदर सहा भाषणे झालीत. ती आपण ऐकलेलीच आहेत. त्यावरून आपल्या ध्यानात आलेच असेल की, आमची बाजू किती तर्कशुद्ध, किती बुद्धिवादी आणि किती सडेतोड आहे, आणि आमच्या विरोधकांची बाजू किती लंगडी आहे ती. आमच्या विरोधकांनी आपल्या व्याख्यानात मोठमोठाले बोजड शब्द वापरले असतील, आपण संस्कृतातहि फार विद्वान आहोत हे दाखविण्याकरिता संस्कृत म्हणींचा आधार घेतला असेल, पण त्याला फसू नका. जरा खोल आणि बारकाईने विचार करा, म्हणजे त्यांनी मांडलेले मुद्दे कसे पोकळ आणि त्यांच्यावरच उलटणारे आहेत, ते आपल्या ध्यानात येईल. ठरावाला विरोध करणाऱ्या दुसऱ्या वक्त्रीने 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' आणि 'न स्त्री स्वातंत्र्य मर्हति' या दोन संस्कृत उक्ति परस्पर विरोधी आहेत असे भासविण्याचा प्रयत्न केला. पण वस्तुस्थिती तशी नाही. स्त्रिया खरोखरीच स्वातंत्र्याला योग्य नाहीत. आणि ज्या स्त्रिया मर्यादेने वागून आपल्या क्षेत्रातील कर्त्तव्ये योग्य रीतीने बजावतील त्या खरोखरच पूजेला पात्र आहेत. आणि जिथे अशा स्त्रिया असतील तिथे देवता रममाण होतात, हेहि तितकेच खरे आहे. पण ज्यांचे ज्ञान मघाशी मी उल्लेखिलेल्या वक्त्रीइतके तुटपुंजे असेल, त्यांना कोठला हा गूढार्थ कळायला! ठरावास विरोध करणाऱ्या तिसऱ्या वक्त्रीने मॅट्रिकच्या आणि विश्वविद्यालयाच्या परीक्षेचा दाखला दिला. त्यांनी सांगितले की या परीक्षांत मुलींनीच मुलांच्यावर नंबर पटकाविला आहे. पण याचे श्रेय मुलींच्या बुद्धिमत्तेला नाही. हा परीक्षकांचा पक्षपात आहे, पक्षपात! असेच त्यांचे सारे मुद्दे पोकळ आहेत. शितावरून भाताची परीक्षा. आमच्या बाजूच्या वक्त्यांनी ठरावाचे समर्थन फार उत्तम रीतीने केले आहे. ठरावाच्या बाजूने पुन्हा लांबलचक भाषण करण्याची आवश्यकता नाही. आणि वेळहि बराच झालेला आहे. तेव्हा मी ज्यास्त काही एक न बोलता आपणा सर्वांनी ठरावाच्या बाजूने मते द्यावीत अशी आपणास विनंति करते, आणि आपली रजा घेते.

विरोधक ४


अध्यक्ष महाराज, बंधुभगिनींनो आणि माझ्या बालमैत्रिणींनो! अजून आमच्या देशाचं दुर्दैव संपलेलं दिसत नाही. या विसाव्या शतकात आमच्या देशात अजून अशा स्त्रिया, नव्हे तरुण मुली आढळतात की, ज्या स्त्रिया स्वातंत्र्याला योग्य नाहीत असे म्हणण्याचे धार्ष्ट्य करतात. हिंदूंची समाजव्यवस्था अशी आहे, आणि हिंदूंची संस्कृति तशी आहे, अन् स्त्रियांचे कार्यक्षेत्र घर आहे असे प्रतिपादणाऱ्या लोकांना माझं असं सांगणं आहे. की त्यांनी आमचा प्राचीन इतिहास पहावा. देवदानवांच्या युद्धात कैकेयी दशरथाबरोबर समरांगणात गेली, आणि दशरथाच्या रथाचे चाक मोडले असता तिने आपल्या दंडावर रथाचा सर्व भार घेतला. ह्या रामायणातील कथेपासून आपण काय बोध घ््याल? झाशीची राणी लक्ष्मीबाई ही तर प्रत्यक्ष रणदेवताच होती. तिने शूरवीर इंग्रज सेनापतींना सळो की पळो करून सोडले. जिजाबाईनं तर कित्येकदा शिवाजीला राज्यकारभाराच्या बाबतीत सल्ला दिली आहे. असल्या शूरवीर, राजकारण धुरंधर आणि मुत्सद्दी स्त्रिया ज्या भूमीत जन्माला आल्या, तेथेच माझ्या अगोदर नुकत्याच बोलून गेलेल्या वक्त्रीप्रमाणे स्त्रीजातीला कलंक असणाऱ्या मुली जन्मास याव्या हे आपले दुर्दैवच नव्हे काय? (शेम, शेम). असो.

स्त्रिया राष्ट्राच्या निर्मात्या आहेत. राष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल बनविण्याकरिता स्त्रियांना उत्तम शिक्षण मिळणं आवश्यक आहे. जगातील प्रत्यही होणाऱ्या घडामोडीपासून त्यांना अलिप्त ठेवणं हे सध्याच्या परिस्थितीत इष्ट नाही. हिंदुस्थानात असा एक काळ होता की, स्त्रियांना देवतेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. पण आज त्यांमधील ती दिव्य शक्ती, त्यांचे ते दिव्य तेज नष्ट झालं आहे. ते पुन्हा प्राप्त करून द्यावयाचं असेल तर स्त्रियांनी हिंमतीनं पुढं सरसावलं पाहिजे. प्रत्येक मुलीला शिक्षण मिळेल अशी व्यवस्था झाली पाहिजे. आपल्या देशात अजून कितीतरी मुलींना लिहिता वाचता येत नाही. त्यांना शाळा काढून शिक्षण देणं हे आपलं प्रमुख कर्त्तव्य आहे. आणि हे कर्त्तव्य पार पाडण्याकरिता सुशिक्षित स्त्रियांनीच पुढं सरलं पाहिजे. स्त्रिया जर सुशिक्षित होतील, तर समाजकार्याचा व राष्ट्रकार्याचा बराचसा वाटा त्या उचलू शकतील, आणि समाजाची व राष्ट्राची सर्व दृष्टींनी प्रगती होईल.

वेळ बराच झालेला आहे. जास्त उहापोहाची आता गरजहि नाही. तेव्हा आपण सर्वांनी ठरावाच्या विरुद्ध मते द्यावी, आणि ठराव इतक्या प्रचंड बहुमताने फेटाळून लावावा की समर्थकांच्या छातीत धडकीच भरेल. मला पूर्ण खात्री आहे की, ठराव प्रचंड बहुमताने फेटाळला जाईल. शेवटी माझे भाषण आपण शांतपणे ऐकून घेतले, त्याबद्दल आपले आभार मानून मी आपली रजा घेते.

प्रतिपादक ५


अध्यक्ष महाराज आणि मत्प्रिय बंधुभगिनींनो!

आतापर्यंत ठरावावर बरीच खडाजंगी झालेली आहे. प्रत्येक वक्त्रीनं आपल्या विरुद्ध बाजूचे वाभाडे काढण्यात बरेच कौशल्य खर्च केले आहे. पण आपली बाजू मांडतांना प्रतिपक्षाचे निव्वळ खंडन करून चालत नाही तर स्वपक्षाचे मंडनहि करावे लागते. आतापर्यंतच्या वक्त्यांनी निव्वळ खंडनावरच भर दिला आहे. मी मात्र आमच्या ठरावाला जे जे मुद्दे पोषक असतील तेच फक्त आपणासमोर मांडणार आहे.

स्त्रियांचे मुख्य कार्यक्षेत्र घर आहे, आणि गृहव्यवस्था आणि शिशुसंगोपन हेच त्यांचे मुख्य कर्त्तव्य आहे ह्या आमच्या विधानाला कोणीहि फारसा विरोध केला नाही. हे आमचं म्हणणं आमच्या विरोधकांनाहि बहुतेक मान्य असल्यासारखं दिसतं. आणि इतकं एकदा मान्य केल्यानंतर प्रश्न असा उरतो, की स्त्रियांना शाळाकॉलेजातून हल्ली जे पुरुषी थाटाचं शिक्षण देण्यात येतं त्याची आवश्यकताच काय? मुलांचं संगोपन करतांना सुवेझच्या कालव्यानं कोणते फायदे झाले आहेत आणि जिब्राल्टरची सामुद्रधुनी कोठे आहे, या ज्ञानाची काय गरज? घराची व्यवस्था ठेवतांना त्रिकोणाच्या अन् चौकोनाच्या गुणधर्माचे ज्ञान कशाला हवे? गृहव्यवस्था कशी राखावी आणि शिशुसंगोपन कसं करावं हे शिकविण्याकरिता तर शाळाकॉलेजे नकोच नको. या गोष्टींचं शिक्षण तर घरीच उत्तम मिळू शकते. स्त्रियांना शिक्षण दिल्यापासून समाजाचा फायदा होईल की समाजाची हानि होईल हा विचार जरा बाजूला सारला, तरी इतकी गोष्ट तर आपण बिनविरोध मान्य कराल की स्त्रियांचे शिक्षण ही काही आवश्यक बाब नाही. आणि अशा अनावश्यक गोष्टीच्या पायी पैशाचा चुराडा करणे हे सध्याच्या हलाखीच्या काळात खास शहाणपणाचे धोरण नव्हे. तेव्हा या दृष्टीनं तरी आपण ठरावाला पाठिंबा द्याल अशी मला आशा आहे. इतके बोलून मी आपली रजा घेते.

विरोधक ५


अध्यक्ष महाराज आणि येथे जमलेला श्रोतृगण!

माझं या ठरावावरील हे शेवटचं भाषण आहे. आताच आपणासमोर बोलून गेलेल्या वक्त्रीनं प्रथम जाहीर केलं की त्या ठरावाला पोषक असे मुद्दे आपणासमोर मांडणार आहेत म्हणून. पण त्यांच्या सबंध भाषणात ठरावाला पोषक असा एकहि मुद्दा मला आढळला नाही. त्यांनी तर मूळ ठरावाला बगलच दिली आणि आर्थिक हलाखीचा अप्रस्तुत मुद्दा आपणासमोर मांडला. आमच्या पक्षाचा जोर पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली, आणि ठरावाचं सरळ सरळ प्रतिपादन करण्याचं त्यांना धैर्य झालं नाही. आणि म्हणून त्यांनी ह्या आडमार्गाचा आश्रय केला. तुम्हाला जर ठरावाचं समर्थन करावयाचं आहे, तर स्त्रीशिक्षणामुळे समाजाची हानी कशी होते हे आम्हाला पटवून द्या. आणि पटवून देता येत नसेल तर हरलो असे कबूल करा. स्त्रियांचे शिक्षण ही जर आवश्यक बाब नाही तर पुरुषांच्या शिक्षणाची तरी काय आवश्यकता आहे? अशिक्षित माणसापेक्षा काय शिकलेला माणूस ज्यास्त जगतो? तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता त्या काय सर्व तुमच्या जीवनाला आवश्यक आहेत? तुम्हाला रहायला चांगले घर पाहिजे, नेसायला उंची उंची वस्त्र पाहिजे, खायला भारी भारी पक्वान्न पाहिजेत. त्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर आर्थिक हलाखीचा प्रश्न उभा राहात नाही. आणि स्त्रीशिक्षणाचा प्रश्न समोर आला असता तुम्हाला आर्थिक हलाखी आठवली होय? मी म्हणते परिस्थिती जर हलाखीची आहे, तर मुलांची शाळा कॉलेजे बंद करा, आणि मुलींची उघडा. पुरुषांनी इतके दिवस शिक्षण घेतलं. आता त्यांनी घरी बसावं. आम्ही शिक्षण घेऊ. माझ्या अगोदरच्या वक्त्रीनं सांगितलं की, स्त्रियांचं मुख्य कार्यक्षेत्र घर आहे, आणि गृहव्यवस्था व शिशुसंगोपन हेच त्यांचं कर्त्तव्य आहे, हे मत आम्हाला मान्य आहे म्हणून. साफ खोटी गोष्ट! अशी डोळ्यात धूळ फेकू नका. पण आता पुरे. आपण कितीतरी वेळ इथं बसला आहात. ज्यास्त वेळ आपणाला तिष्ठत ठेवणं योग्य नव्हे. ठरावाच्या विरुद्ध आपण मते द्याल यात तर मुळीच शंका नाही. बोलण्याच्या भरात माझ्या तोंडून कोणाचं मन दुखविण्यासारखा एखादा शब्द निघाला असेल, तर त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागते, आणि आपली रजा घेते.

एकूण ५ भाषणे ठरावाच्या बाजूने व तितकीच विरोधात झाली. ऐकतांना ऐकणाऱ्याचे मन दोलायमान झाले असल्यास नवल नाही. काही जणांना कशातच रस नसतो. भाषण सुरू झाले रे झाले की त्यांची तंद्री लागते आणि झोप अनावर होते. मान कधी डावीकडे बसलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर टेकते तर कधी उजवीकडच्या. त्यांचे मन दोलायमान होत नाही, तर मान दोलायमान होते. मन आणि मान, फक्त मात्रेचा फरक! थोडक्यात सांगायचे म्हणजे प्रत्येकाची 'स्थिति' कमी जास्त मात्रेत दोलायमान होते. असो.

वादविवादाच्या प्रथेप्रमाणे, प्रत्येकाचे बोलून झाले की पहिल्या विरोधकाला पुन्हा एक संधी मिळते, शेवटचा प्रहार करण्याची. शेवटी प्रथम प्रतिपादक समारोप करतो, व ठराव मताला टाकण्यात येतो. तोपर्यंत मुद्दे आणि गुद्दे यांची सरमिसळ झाली असते. नीरक्षीरविवेक वापरून श्रोत्यांनी ते वेगळे वेगळे करायचे असतात, मुद्यांना प्राधान्य देऊन स्वतःचे मत ठरवायचे असते आणि ठरावाच्या बाजूने वा विरोधात हात उंचावायचे असतात. ठराव पास वा नापास होतो.

तुम्हाला काय वाटते? वरील ठरावाचे काय झाले असेल? तुम्ही सभेत असता तर कोणत्या मताचा पुरस्कार केला असता? स्वतःचे मत एका कागदाच्या चिटोऱ्यावर लिहून पुढचा भाग वाचला तर शेवटी तुमचे मत आणि त्या सभेचे मत पडताळून पाहताना मौज वाटेल.


प्रथम विरोधक


अध्यक्ष महाराज आणि माझ्या बंधुभगिनीनो!

आपण सर्वांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकलेली आहे. आमच्या विरोधकांची एकेक गोष्ट ऐकावी ती कशी बाई नवलच! कोणाच्या डोळ्यांना म्हणे अंधारी येते, तर कोणाच्या मस्तकात म्हणे तिडीक उठते, अन् तळपायाची आग मस्तकात जाते! अशा सुकुमार डोळ्याच्या, नी नाजूक डोक्याच्या कोमल मुली म्हणे सर्व जग ज्या मार्गानं जात आहे, त्याला विरोध करणार! कशाला एवढया लांबलांब बाता मारता? तुमच्यासारख्या रडक्या पोरींकडून होणार आहे तरी काय? तुमची काय बिशाद आहे, स्त्रियांची शाळा कॉलेजं बंद पाडण्याची, आणि त्यांना मूठमाती देण्याची? दगडावर डोकं आपटाल तर डोकं मात्र फुटेल! धावत्या प्रवाहाला बांध घालण्याचा प्रयत्न कराल, तर बांध मात्र वाहून जाईल, आणि प्रवाह दुप्पट वेगाने आपला मार्ग काढील. तेव्हा तुम्हाला जर लोकांत आपलं हसं करून घ््यायचं नसेल, झाकली मूठ सव्वालाखाची ठेवायची असेल, तर ठराव परत घेण्यातच शहाणपणा आहे. उगीच इभ्रतीच्या भ्रामक कल्पनेला बळी पडून आपला दुराग्रह कायम ठेवाल, तर व्यर्थ तोंडघशी पडाल. तुमच्या ठरावाची काय वासलात लागणार आहे, हे सांगायला काही ज्योतिषी नको! माझी तर अशी पक्की खात्री आहे की, ठरावाच्या बाजूनं एकहि मत पडणार नाही. स्त्रीसमाज जागा झालेला आहे. त्याच्या स्वाभिमानाची ज्योत दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्वलित होत आहे. ती ज्योत तुम्ही खाली दाबण्याचा प्रयत्न कराल, तर तुमचा हात मात्र भाजेल, आणि ज्वाला आणखी जोरानं वर उफाळी घेईल.

केला जरी पोत बळेचि खाले ।
ज्वाला तरी ते वरती उफाळे ।।

प्रथम प्रतिपादक


अध्यक्ष महाराज, उपस्थित सज्जन आणि बंधुभगिनींनो!

आपण ठरावावरील अनुकूल व प्रतिकूल वक्त्यांची साधक बाधक भाषणं ऐकलीच आहेत. ठराव अत्यंत गंभीर व महत्त्वाचा आहे. त्यावर नीट विचार करा. समतोल बुद्धीने साधक बाधक मुद्दे पडताळून पहा. भावनेच्या आहारी न जाता किंवा कोणाचीहि भीडमुर्वत न ठेवता आपापली मते द्या. आमच्या विरोधकांनी आपणासमोर मांडलेली मतं वरवर दिसायला मोठी गोंडस दिसतात, पण त्यांनी सांगितलेल्या गोष्टींपैकी एकतरी गोष्ट खरी आहे कां? त्यांनी आपणाला कितीतरी भूलथापा दिल्या. काय काय खोट्‌या नाट्‌या गोष्टी सांगितल्या! पण जाऊ द्या. इतक्या गोष्टींशी आम्हाला करायचं तरी काय? स्त्रियांना हल्ली देण्यात येणारं शिक्षण निश्चित हीन दर्जाचं आणि टाकाऊ आहे. त्याच त्या गोष्टींचं पुन: पुनः चर्वितचर्वण करून मी आपला अमूल्य वेळ घेऊ इच्छित नाही. सरतेशेवटी मी आपणासमोर विचार करण्याकरिता एकच मुद्दा मांडते. आपण आजकालच्या शिकलेल्या मुली पहा, आणि त्यांची चालचालणूक आपणाला कितपत पसंत पडते ते आपणच ठरवा आणि मग आपली मते द्या.

(विरोधक नं. १ - शब्द परत घ््या, शब्द परत घ््या. विरोधक नं. २, ३ - शब्द परत घ््या, शब्द परत घ््या. प्रतिपादक नं. २, ३ - शब्द परत घेऊ नका, शब्द परत घेऊ नका. सभेतून शब्द परत घ््या, शब्द परत घ््या, तसेच नका, नका असे आवाज. सभेत गोंधळ. अध्यक्ष: शांत व्हा, शांत व्हा. वक्त्यांचे म्हणणे काय आहे ते नीट ऐकून घ््या, ऑर्डर, ऑर्डर.) मी केलेले विधान अक्षरश: खरे आहे. (विरोधक नं. १ - तुम्ही केलेलं विधान अश्लाघ््य आणि सभ्यतेला न शोभणारं आहे.) त्यात अश्लाघ््य आणि सभ्यतेला सोडून असणारं असं काहीच नाही. (सर्व विरोधक - शब्द परत घ््या, नाही तर खाली बसा. प्रतिपादक नं. २, ३ - विधान परत घेऊ नका, बोला, बोला.) मला आपले विधान परत घेण्याची मुळीच आवश्यकता वाटत नाही. मला खात्री आहे की, येथे जमलेल्यापैकी प्रत्येक विचारी माणूस ठरावाच्याच बाजूनं मत देईल. (विरोधक नं. १ - अध्यक्ष महाराज, मला बोलायला परवानगी पाहिजे. अध्यक्ष परवानगी देतात.)

विरोधक नं १


आताच आपणासमोर बोलून गेलेल्या वक्तीने आपल्या भाषणाच्या शेवटी आम्हा शिकलेल्या मुलींवर अश्लाघ््य आणि सभ्यतेला न शोभणारा आरोप केलेला आहे. त्याचा मी तीव्र निषेध करते. (सर्व प्रतिपादक: खाली बसा, खाली बसा, विरोधक नं. २, ३ - बोला, बोला.) ज्याअर्थी त्या आपले शब्द परत घ््यायला तयार नाहीत, त्याअर्थी मी माझ्या बाजूच्या सर्व सभासदांना त्यांच्या निषेधार्थ हे सभागृह सोडून चालते व्हावे, अशी विनंति करते. (सर्व विरोधक सभागृह सोडून जातात.)

आणि पडदा पडतो. बरेच झाले! नाहीतर मुडदा पडला असता. असो. १९४०-४१ मध्ये वठवलेला हा वादविवाद खूप गाजला. सभात्यागाची रीत अजूनहि अव्याहत सुरू आहे हे सांगायला नको. खरे म्हणजे walk-out करता यावा म्हणूनच आपले नेते walk-in करतात की काय असे बरेचदा वाटते. असो. या विषयावर ज्यास्त काही लिहिणे उचित नाही. मर्यादाभंगाचा खटला व्हायचा. तसा झालाच तर बाबांच्या पुस्तकाचा खप वाढेल हेहि खरे म्हणा!

राजकारणात नेहमीकरिता कोणी कोणाचा मित्र किंवा शत्रु नसतो असे म्हणतात. ते अक्षरशः खरे असल्याचे आपण पाहतोच. जडणघडण सतत सुरूच असते. हा वारसाहि स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आला आहे असे दिसते. १९४०-४१ च्या या खडाजंगीतील कु. द्वारका जोशी, कु. मैना पाठक, कु. शकुंतला मुजुमदार (प्रतिपादक मंडळी) व कु. कमल देशपांडे, कु. कुसुम पत्तरकिने, कु. वेणू जोशी  (विरोधक मंडळी) आणि त्यांच्या साळकाया-माळकाया दुसऱ्याच वर्षी एकीकडे झाल्या आणि एका परिसंवादात बाबांच्या शब्दांची वाघनखे धारण करून पुरुषांना ओरबाडत्या झाल्या.

कालांतराने त्यातीलच काही पुरुषांशी त्यांची लग्ने झाली असतील आणि वाघनखे घालणारी बोटे कणिक तिंबू लागली असतील. असो. आज ही सर्व मंडळी कोठे आहेत हे सांगणे कठिण आहे. जिथे कुठे असतील, वृद्धत्वाकडे झुकलेली असतील. त्यांच्या हाती हे पुस्तक पडेल, त्यांची थरथरती बोटे पुस्तकाची पाने पलटतील, तर कष्ट सार्थकी लागतील.


_____________________


अनुक्रमणिकेकडे

No comments:

Post a Comment