५
संवाद
वाद, विवाद, वितंडवाद यांनी काहीच साध्य होत नसते असे एक मत आहे. हे मत सुद्धा वादाचा एक विषयच नाही का? हे मत दुसऱ्याच्या गळी उतरवावयाचे असेल तर अशा मताचे प्रतिपादक काय मार्ग अवलंबतील? वादच करतील ना? पण त्याने तर काहीच साध्य होणार नाही. मग ते वाद कशाला करतील? पण वाद करणार नाहीत तर आपले मत दुसऱ्याला कसे पटवून देतील? चक्क paradox ची स्थिती उत्पन्न झाली. थोडक्यात सांगायचे म्हणजे वादाला पर्याय नाही. त्याचे रूप फारच फार तर सौम्य करता येईल, त्याची धार प्रयत्नपूर्वक बोथट करता येईल, त्याची नांगी मोडता येईल, त्याचे विष काढून दंशाचा केवळ चावा करता येईल, वगैरे वगैरे. हे सर्व वगैरे वगैरे अमलात आणले की वादविवादाचा परिसंवाद होतो.
अनेक परिसंवादात बाबांची भाषणे उतरली. तत्कालीन व सर्वकालीन विषयांवर झालेल्या अशा स्पर्धांनी बाबांना आपली मते मांडण्याची संधी प्रदान केली. वादविवादाकरिता केलेल्या लिखाणात बाबांची मते उमटलीच असतील असे म्हणता येत नाही. ती भाषणे म्हणजे 'आलीया भोगासी असावे सादर' या सदरात मोडणाऱ्या कृति! 'ही बाजू मांडा' असे तेथे फर्मान असते. पण परिसंवादाची गोष्ट वेगळी. अमुक एका बाजूनेच मत मांडायचे असे येथे बंधन नसते. नाण्याला येथे दोनच बाजू असतील असेही नसते. तिसरी, चौथी पण असू शकते. दोनच बाजू असल्या तरी 'म्योबियस रिंग' करून त्यांचे अद्वैत साधता येते. सर्व विचारधारांच्या गुणदोषांचे येथे समालोचन करता येते. थोडे हे खरे, थोडे ते खरे, असा निर्वाळा देण्यात वावगे काही नसते. चर्चेच्या शेवटी मतदान नसते. कोणत्याच बाजूची हार नसते, कोणाची जीत नसते. संवादाच्या आशेने व दिशेने केलेला हा वाद असतो.
जवळजवळ ५० वर्षांपूर्वी शाळेच्या एका स्नेहसंमेलनात बाबांनी एका लुटुपुटूच्या परिषदेचे लेखन व मंचन केले. त्यातल्या सर्व भाषणांचे जीर्ण शीर्ण कागद गाठोडीत तळाशी सापडले. ही परिषद पुस्तक रूपाने त्याच काळी प्रसिद्ध होऊ शकली असती. तसे झाले असते तर नंतर अनेक मंचांवर ती अनेकांकडून पुनःपुन्हा सादर झाली असती. बाबा सहज प्रसिद्धीच्या झोतात आले असते. साहजिकच नंतरचे लिखाणही मग प्रसिद्ध झाले असते. आहे त्यापेक्षा कदाचित ज्यास्त लिखाणहि झाले असते. गाठोडी ऐवजी आज पुस्तके असती. पण असा 'मॅथ्यु' योग बाबांच्या कुंडलीत नव्हता.
१९५० ची ही सर्वपक्षीय महिला परिषद खूप गाजली. संमेलनाचे अध्यक्ष वीर वामनराव जोशी होते. त्यांनी मुक्तकंठाने स्तुति केली. परिषदेतील भाषणे वाचताना वाटले की बाबांनी काढलेली ही स्त्रीहक्काची दिंडी आजहि वणवण फिरतेच आहे. स्त्रियांना राखीव जागा मिळाव्या म्हणून गेले दोन वर्ष चालले प्रयत्न व त्यांना येत असलेले अपयश पाहिले म्हणजे वाटते की ती अनेक वर्षे अशीच फिरत राहणार.
सर्वपक्षीय हिंदु महिला परिषद, १९५०
स्वागताध्यक्षांचे भाषण
नियोजित अध्यक्ष, प्रांतोप्रांतीचे प्रतिनिधि, स्वागतकमिटीचे सभासद, कार्यकर्त्या, स्वयंसेविका आणि श्रोतृगण!
भगिनींनो! आपला हिंदुस्थान देश स्वतंत्र होऊन तीन वर्षे झालीत. पण आम्हा हिंदु स्त्रियांच्या कपाळीचं पारतंत्र्य आणि दास्य अजून फिटलं नाही. याला उपाययोजना काय करावी, याचा विचार करण्याकरिता ही अखिल भारतीय सर्वपक्षीय हिंदु महिला परिषद बोलावण्यात आली आहे. एवढा महत्त्वाचा प्रश्र धसास लावणारी परिषद नागपूरला भरते आहे, हे आम्हा नागपूरवासीयांचे महाभाग्य होय. ह्या परिषदेकरिता सर्व पक्षांचे प्रतिनिधि आलेले आहेत. सर्व पुढारी व हजारो कार्यकर्ते हजर आहेत. निरनिराळ्या ठिकाणाहून हजारो स्वयंसेविका आल्या आहेत. या सर्वांची व्यवस्था जशी व्हायला पाहिजे तशी आम्ही ठेवू शकत नाही. आमच्या व्यवस्थेत बरीच न्यूनता आहे, याची आम्हाला जाणीव आहे. याबद्दल आम्हाला क्षमा करा अशी मी आपणाला विनंति करते. आजच्या आपल्या अध्यक्षा श्रीमति कुसुमावतीबाई सोनक यांचा आपल्याला परिचय करून देण्याचे कारण नाही. त्या गुजराथेतील स्त्रियांच्या प्रमुख पुढारी आहेत. प्रख्यात कवयित्रि आणि लेखिका म्हणूनहि त्यांची ख्याती आहे. अशा सर्व दृष्टींनी योग्य अध्यक्षा आम्हाला लाभल्या त्याबद्दल आम्ही आपल्याला धन्य समजतो. त्यांच्या मागचा कार्याचा व्याप अतिशय मोठा आहे. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इतर बरीचशी कामे असतांना सुद्धा वेळात वेळ काढून आजच्या आमच्या परिषदेचे अध्यक्षस्थान मंडित करण्याचे कबूल केले याचा माझ्याप्रमाणेच आपणालाहि विशेष आनंद होत असेल यात मला संशय नाही. त्यांचे भाषण ऐकायला आपण उत्सुक झाला आहात हे मी जाणून आहे. तेव्हा श्रीमति कुसुमताई सोनक यांनी परिषदेच अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी त्यांना विनंति करून मी आपली रजा घेते.
श्रीमति कुसुमताई सोनक म्हणजे कुसुम सोनक ही शाळकरी मुलगी होती. परिषदेतील इतरहि सहभागी वक्त्र्यांना श्रीमति आणि ताई जोडून भारदस्तपणा देण्यात आला आहे. आज अर्थात ती सर्व मंडळी खरोखरच भारदस्त असतील.
अध्यक्षीय भाषण
परिषदेचे मान्यवर कार्यवाहक अध्यक्ष, प्रांतोप्रांतीचे प्रतिनिधी, स्वयंसेवक भगिनी, कार्यकर्ते आणि उपस्थित भगिनींनो!
आपला हिंदुस्थान देश स्वतंत्र झाला. मातृभूमीच्या बंधविमोचनाच्या कार्यात पुरुषांबरोबरीनेच आम्ही स्त्रीवर्गानेहि बहुमोल कामगिरी बजावली. अनेक स्त्रियांनी खडतर कारावास सोसला. कित्येक स्त्रियांची मुलं उघडी पडली. कितीतरी तरुण मुलींनी आपली जीवनकलिका ऐन उमलण्याच्या बेतात असतांना मातृभूमीच्या पायावर अर्पण केली. शेकडो स्त्रिया स्वातंत्र्यसंग्रामात कामाला आल्या. आम्हाला आपल्या प्राणाहूनहि प्रिय असलेल्या आमच्या भारतमातेकरिता आम्ही हे दिव्य केलं यांत काही विशेष केलं असं नव्हे. स्वातंत्र्यसंपादनाकरिता आम्ही जे कष्ट सोसले आणि जो त्याग केला त्यापेक्षाही शतपटीने त्याग करावयास आम्ही तयार आहोत. राणी लक्ष्मीबाईची पाठीला मूल बांधून घोड्यावर स्वार झालेली व कड्यावरून उडी घेणारी मूर्ति अाम्हाला अजूनही स्फूर्ति देण्यास तत्पर आहे. नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्ययुद्धात ज्यांच्या जिवाचं सोनं झालं आणि ज्यांनी प्रातःस्मरणीय देवतांच्या मालिकेत अापलं स्थान अढळ केलं अशा हजारो स्वर्गस्थ स्त्रियांच्या पुण्याईनं आणि आशिर्वादानं आमच्या देशाचं कसल्याहि भीषण आक्रमणापासून आम्ही संरक्षण करू यात आम्हाला तिळमात्र संदेह नाही. ज्यांनी जगातील बलाढ्य अशा साम्राज्यसत्तेच्या कचाट्यातून आपल्या देशाची मुक्तता केली, ते आपल्या देशाचं संरक्षणहि हमखास करू शकतात. कुणीहि अाम्हाला भेडसावण्याचं कारण नाही. वास्तविक आमचं कुणाशीहि शत्रुत्व नाही. ज्यांनी आजवर आमच्यावर सत्ता गाजविली, त्यांच्याशीहि आमचं शत्रुत्व नाही. तुम्ही आपल्या देशात सुखात नांदा, आम्हाला आमच्या देशात सुखात नांदू द्या. पण जर कोणी या आमच्या सस्यशामला मातेला आपल्या परकी हातांनी बाटविण्याचं मनात आणील, तर आमचा त्याच्याशी उभा दावा आहे. आम्ही स्वतंत्र झालो ते काही पुन्हा परतंत्र होण्याकरिता नव्हे. अामचा निश्चय ठरलेला आहे. आम्ही याऊपर कोणाचीहि गुलामगिरी क्षणभर सुद्धा सहन करणार नाही. इतःपर कुणापुढेहि मान वाकविणार नाही. जगातील स्वतंत्र राष्ट्रांच्या मालिकेत आमचं हे हिंदुराष्ट्र मेरुमण्याप्रमाणे सर्वांच्या अग्रस्थानी यावच्चंद्रदिवाकरौ अढळ राहील. असो.
आमचा देश स्वतंत्र झाला! गोष्ट खरी! पण आम्ही? आमचा स्त्रीसमाज तर अजूनहि पारतंत्र्याच्या गर्तेतच लोळत पडला आहे. आमची गुलामगिरी अजूनहि कायमच आहे. पुरुषांच्या दास्यातून अजून आमची सुटका होत नाही. समाजात आम्हाला स्वतंत्र अस्तित्व नाही. ही स्थिती कशी पालटेल? स्त्रीसमाज पुरुषांच्या सहाय्याची अपेक्षा न करता आपल्या पायावर कसा उभा राहील? आमचे गुलामगिरीचे पाश कसे नी केव्हा तुटतील? आमच्या कपाळीचे दास्य नी पारतंत्र्य कसे चुकेल? याचा विचार करण्याकरिता आजची परिषद बोलावण्यात आलेली आहे. सर्व पक्षांनी या परिषदेत भाग घेतलेला आहे ही आनंदाची गोष्ट आहे. सर्व पक्षांनी एकवटून कार्यास लागल्यास आपले उद्दिष्ट आपणाला हां हां म्हणता प्राप्त करून घेता येईल. मात्र एकीची आवश्यकता आहे. तेव्हा सर्व क्षुल्लक मतभेद विसरून जा. कार्याचे महत्त्व ओळखा आणि प्रयत्नास लागा. मग यश आपले आहे ही खात्री बाळगा.
आजच्या परिषदेची अध्यक्षा होण्याची माझ्या अंगी कितपत पात्रता आहे, याबद्दल मला जबर शंका आहे. माझ्यावरील प्रेमाने आंधळे होऊन आपण मला या परिषदेचे अध्यक्षस्थान दिलंत, याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते. आपण निरनिराळ्या पक्षांची विचारसरणी ऐकून घेण्याकरिता अत्यंत उत्सुक झाला आहात हे मी जाणते. आणि अधिक भाषण करून आपल्या औत्सुक्याचा भंग करण्याचं पाप माथी न घेता आपले भाषण संपविते. आणखी जे काही सांगावयाचे आहे ते मी समारोपाच्या भाषणात सांगेन.
परिषदेला त्याकाळचे सर्व प्रमुख पक्ष व काही बाबांनी निर्माण केलेले काल्पनिक पक्ष व संस्थांचे प्रतिनिधि उपस्थित होते. नुकतेच स्वातंत्र्य मिळवून दिल्यामुळे काँग्रेसला अर्थात वरचे स्थान होते. अध्यक्षांच्या पाठोपाठ काँग्रेस प्रतिनिधीचे भाषण व्हावे हे साहजिकच होते.
काँग्रेस प्रतिनिधि
मान्यवर अध्यक्ष, प्रेमळ सहकारी कार्यकर्त्या, स्वयंसेविका आणि देशभगिनींनो!
आजच्या या अधिवेशनाचा उद्देश काय, सर्व पक्षांचे प्रतिनिधि इथं कशाकरिता जमले आहेत, हे अध्यक्षांनी स्पष्ट केलंच आहे. आपला देश राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झाला, ही गोष्ट खरी! पण देशातील स्त्रीसमाज जोपर्यंत पुरुषांच्या गुलामगिरीतून मुक्त होत नाही, तोपर्यंत आपल्या स्वातंत्र्याला अर्थ उरत नाही. ते खरंखुरं स्वातंत्र्य होऊच शकत नाही. तेव्हा आपल्या देशाचं स्वातंत्र्य जर प्रभावी करावयाचं असेल, आणि अव्याहत टिकवायचं असेल तर स्त्रियांची शारीरिक, मानसिक नी बौद्धिक गुलामगिरी नष्ट करणं अगत्याचं आहे. पुरुषांनीहि आपल्या अंतिम हिताच्या दृष्टीने आम्हाला त्यांच्या बरोबरीचे हक्क बहाल करणं हेच इष्ट होय. पण आजवर मोठ्या मिजासीनं उपभोगलेली सत्ता आणि अरेरावी सोडावयाला पुरुष सहजासहजी तयार होतील असं वाटत नाही. देशातील पुरुषांत आणि स्त्रियांत यादवी उत्पन्न होऊ नये, त्या दोन समाजातील सिव्हिल वॉर शक्यतोवर टाळावी या सदिच्छेनं आम्ही आजवर जालिम उपायांचा अवलंब केला नाही. अर्ज, विनंत्या, मनधरणी या उपायांनी आपले न्याय्य हक्क मिळविण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण आमच्या सद्धेतूचा पुरुषांनी विपर्यास केलेला दिसतो. ते आपल्या हातातील सत्ता काडीभरहि सोडायला तयार नाहीत. आम्ही पुढं केलेला मैत्रीचा हात त्यांनी झिडकारलेला आहे. आणि आमची इच्छा नसतांनाहि आमच्यावर लढा लादलेला आहे. ठीक आहे म्हणावं! आम्ही आव्हान स्वीकारायला तयार आहोत. आमच्याहि सहनशीलतेला काही मर्यादा आहेच. आजवर झाली ती गुलामी पुरे झाली. घराबाहेरील व्यवहाराचा सारा मक्ता पुरुषांनी उचलला आहे. आणि घरातहि पुन्हा त्यांची लुडबुड! वा रे न्याय! अजूनहि आमचं त्यांना सांगणं आहे की, आपल्या बरोबरीचे सर्व हक्क आम्हाला द्या, सत्तेचं हस्तांतर करणं ताबडतोब शक्य नसेल तर तशी निःसंदिग्ध शब्दांत निदान घोषणा तरी करा. नाही पेक्षा आम्हाला लढा सुरू करण्याशिवाय गत्यंतर नाही. आमचा मार्ग अनत्याचाराचा आहे, हे मी फिरून एकवार स्पष्ट करू इच्छिते. सत्य व अहिंसा हे काँग्रेसचं ब्रीद आहे. शांतिपासून रेसभरहि ढळू नका. पुरुषांनी आपला हट्ट नच सोडला तर आमचा मार्ग आम्हाला मोकळा आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध उपयोगात आणण्याचं सत्याग्रह हे अमोघ शस्त्र आहे. त्याचाच आम्हाला अागामी कार्यात उपयोग करावा लागणार आहे. या सत्याग्रहाचं स्वरूप मात्र थोडं भिन्न राहील. सत्याग्रह प्रत्येक स्त्रीने आपल्या घरी पुकारावयाचा आहे. माझी कल्पना मी आपणाला सांगते. एक तारीख ठरविण्यात यावी. आणि त्या तारखेला अखिल हिंदुस्थानातील स्त्रियांनी बैठा संप पुकारावा. कोणत्याहि कामाला हात म्हणून लावू नये. काय मजा होईल त्या दिवशी! काही पुरुषांच्या पोटातील कावळे त्यांना बेजार करतील. स्वयंपाक करतांना काहींची बोटे भाजतील. जाळ फुंकता फुंकता काहींच्या नाकी नऊ येतील. धुरानी काहींचा जीव गुदमरेल. सर्व पुरुष ऑफिसातून रजा काढतील. काहींच्या हाती केरसुणी येईल, तर काहींच्या हाती लाटणं, तर काहींच्या हाती धुपाटणं. हरहर! कोण ही दुर्दशा. दुसऱ्या दिवशी सारा नूर पालटेल. स्त्रिया जे मागतील ते हक्क त्यांना मिळतील. महात्माजींनी सहा महिन्यात स्वराज्य मिळवून देतो असं तरी म्हटलं होतं. मी तर आपणाला आश्वासन देते की, माझा मार्ग आपणा सर्वानी अंमलात आणल्यास एका रात्रीतून तुमचं स्वराज्य हस्तगत होईल. पुरुषांनी वेळीच सावध व्हावं, आणि आपल्यावरील हा दुर्धर प्रसंग टाळावा, आणि स्त्रियांनी देखील आगामी लढ्याकरता तयार असावं अशी सूचना करून मी रजा घेते.
अहिंसेने स्वराज्य मिळवून दिलेल्या काँग्रेसचे हे भाषण समर्पक नाही असे कोण म्हणेल? अहिंसेची चटक लागलेल्या देशात काँग्रेसचे हे सत्याग्रहाचे आव्हान सर्वच पक्ष स्वीकारतील अशीच कोणीहि अपेक्षा करील. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकजूट होऊन 'बेलन चला चला के, लेंगे स्वराज्य लेंगे' अशा घोषणा देत दुसरा स्वातंत्र्यलढा सुरू होणार अशी श्रोत्यांची अपेक्षा असतांना दुसऱ्या पक्षाच्या प्रतिनिधि भाषणाकरिता उभ्या राहिल्या.
हिंदुमहासभा प्रतिनिधि
नियोजित अध्यक्ष आणि माझ्या बंधुभगिनीनो!
आपण लांबचा प्रवास करून दूरदूरच्या प्रांतातून आजच्या या सर्वपक्षीय महिला परिषदेला आला आहात. प्रवासाची दगदग सोसून आणि आपल्या पदरचे पैसे खर्च करून हिंदुराष्ट्रातील महिलांचं भवितव्य ठरविण्याकरिता आपण इथं एकत्र झाला आहात. आजच्या या प्रचंड सभेकडे पाहून आजपावेतो घोर निद्रेत असलेला स्त्रीसमाज खडबडून जागा झाला आहे याची प्रचीति येते. आपल्या अंतःकरणात वसत असलेली कार्याची कळकळ आणि पदोपदी दिसून येणारा दुर्दम्य उत्साह पाहून मला खरोखरीच आनंदाचं भरतं येतं आणि असं वाटतं की आपले वाईट दिवस आता संपणार आणि सोन्याचे दिवस येणार. परंतु सावधगिरीनं योग्य मार्गाचा अवलंब केल्यासच माझी ही आशा खरी ठरणार आहे. मार्ग बरोबर असेल तरच ध्येयपूर्ति होईल. मार्ग चुकीचा असेल तर ध्येयहानी ठरलेली. तेव्हा सुदैवानं स्त्रियांत उत्पन्न झालेल्या जागृतीचा फायदा घेऊन योग्य मार्गाची निवड करा हेच माझं आपणास सांगणं आहे.
आताच आपणासमोर जे भाषण झालं ते ऐकून तर मला हसूच आलं. त्यांच्यासारख्या सुविद्य स्त्रियांना देखील स्वतःची प्रज्ञा कशी राहू नये, याचंच मला आश्चर्य वाटतं. एका गालावर थापड बसली तर दुसरा गाल पुढं करणारं हे नेभळं तत्त्वज्ञान लोकांच्या गळी उतरवून राष्ट्राची खच्ची केली तरी अजूनहि या गंधकांची तृप्ति होत नाही. आधीच निर्बल आणि निःशस्त्र असणाऱ्या या राष्ट्राला अहिंसेचे धडे काय देता? जगातील आतताई आणि रक्तपिपासू राष्ट्रांना आपले हे शांतिपाठ द्या. आम्हाला त्याची आवश्यकता नाही. वाईले, वाताले, खांशीले, खोकल्याले, तापाले, समध्या रोगाले एकच औषध देणाऱ्या वैदूप्रमाणं जगातील साऱ्या अन्यायावर नी जुलमावर यांचा सत्याग्रह हा मार्ग ठरलेला! जगातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे आमचा हा देश सहजगत्या ईश्वरी योगायोगानं स्वतंत्र झाला यांत काँग्रेसवाल्यांनी आणि गांधीवाद्यांनी त्यांच्या शांतीचे नी अहिंसेचे, सत्याग्रहाचे नी अनत्याचाराचे स्तुतिपाठ गाण्याचे मुळीच कारण नाही. एका बाजूनं दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चाललेली आंतरराष्ट्रीय परिस्थिति आणि दुसऱ्या बाजूनं आम्हाला सैन्याची आवश्यकता नाही, आम्ही आमच्या देशाचं संरक्षण शांतीच्या नी अहिंसेच्या मार्गानीच करू, असा चाललेला अव्यवहार्य प्रचार पाहिला म्हणजे आम्ही ज्वालामुखीच्या शिखरावर उभे आहोत असं वाटतं आणि काळाच्या पोटात काय दडलेलं आहे याच्या अभद्र शंकेनं मन खिन्न होतं. तेव्हा माझ्या भगिनींना माझं एवढच सांगणं आहे की, आपल्या स्त्रियांच्या चळवळीत तरी निदान असल्या नेभळ्या तत्त्वज्ञानाला थारा देऊ नका. राजकारणातील व समाजकारणातील ही बुवाबाजी नष्ट झालीच पाहिजे. व्यक्ति कितीहि थोर असो, ती जर राष्ट्रहिताच्या आड येत असेल, तर तिची कदर बाळगू नका. आमचं ध्येय सुस्पष्ट आहे. त्याला साधनाच बंधन नाही. आमचं पुरुषांशीहि वैर नाही. आमच्या ध्येयाला पुरुष सहाय्य करायला तयार असतील, तर ते आम्हाला हवंच आहे. आणि विरोध करण्याची त्यांची इच्छा असेल, तर त्यालाहि आमची तयारी आहे. पुरुषांना मी बजावून ठेवते की, 'याल तर तुमच्यासह, विरोधाल तर तुमच्यावाचूनहि आम्ही हिंदु स्त्रिया स्वातंत्र्य, जमेल त्या साधनांनी, नी शक्य त्या मार्गानी प्रस्थापित करू.'.
आपणाला अबला म्हणून हिणविण्यात येतं. बलाची उपासना करून सबला बना. गुंडांपासून आणि समाजातील कावळ्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्याकरिता अंगांत धमक बाळगा. वेणीच्या केसापासून तो लाटण्या सराट्यापर्यंत, आणि साध्या काठीपासून तो आधुनिक युद्धसामुग्रीपर्यंत सर्व शस्त्रास्त्रे आम्हाला आमच्या शीलाचं आणि चारित्र्याचं संरक्षण करण्याच्या कामी चालू शकतात. राणी लक्ष्मीबाईचं नी राणी दुर्गावतीचं स्मरण करा. गळ्यात रुंडमाळा धारण करणाऱ्या बहुबलधारिणी रिपुदलवारिणी चंडिकेची पूजा करा. तिनं आम्हाला आमच्या अंगीकृत कार्यात यश द्यावं अशी त्या जगन्मातेची प्रार्थना करून मी आपली रजा घेते.
भोपळ्यानंतर विळ्याचं, मुंगसानंतर सापाचं भाषण ठेवण्यात बाबांचा उद्देश काय? काही का असेना! श्रोते मात्र खडबडून जागे झाले असतील. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळायला हवे यावर दुमत नाही. साध्याबद्दल वाद नाही. पण साधन काय असावे यावर परिषदेत एकमत होईल की नाही हा प्रश्र आता त्यांच्यासमोर उभा झाला. काँग्रेसचं आणि हिंदुमहासभेचे प्रेमळ संबंध जगजाहीर आहेत. त्यांची कोठेही जुंपणारच! पण आता बाकीचे पक्ष कोणाची बाजू घेतील?
वुईमेन्स सोशालिस्ट पार्टी
माननीय अध्यक्ष, सर्व पक्षांचे प्रतिनिधि आणि माझ्या भगिनींनो!
आतापर्यत झालेल्या दोन भाषणांचा विचार केला असता माझ्याप्रमाणेच आपलीहि खात्री होईल की हिंदुस्थानातील स्त्रियांच्या सर्व पक्षांचे ध्येयाच्या बाबतीत एकमत आहे. फक्त फरक काय तो मार्गाचा आहे. आज हिंदुस्थानात अशी एकहि स्त्री आढळणार नाही की, जिला स्वतःच्या दास्यमय जीवनाची चीड आली नाही, जी गुलामगिरीला विटली नाही. या गुलामगिरीचा नाश कसा करता येईल या विषयी प्रत्येक पक्षाची विचारसरणी अजमावून पाहण्याकरिता व जमल्यास त्यांचं एकीकरण करण्याकरिता ही सर्वपक्षीय परिषद बोलावण्यात आली आहे. ध्येयाविषयी कुणाचच दुमत नाही. तेव्हा ध्येयाच्या युक्तायुक्ततेबद्दल वाद घालून आज कुणीहि आपला वेळ घेणार नाही. सर्व पक्षांचे प्रतिनिधि आपणासमोर आपापल्या पक्षांची विचारसरणी मांडतील. त्याचा आपण विचार करा, आणि कोणती विचारसरणी सयुक्तिक नी योग्य आहे ते ठरवा.
स्त्रियांची आज घरात नी बाहेर सर्वत्र जी कुचंबणा होत आहे, तिला कारण स्त्रियांचं आर्थिक परावलंबन. स्त्रीला बांगड्यांकरिता दोन पैसे लागले, किंवा कुंकवाकरिता एक अधला लागला, तर त्यांना पुरुषांसमोर हात पसरावा लागतो. स्त्रियांना आपल्या उपजीविकेकरिता नी उदरनिर्वाहाकरिता सर्वस्वी पुरुषांवर अवलंबून रहावं लागतं, किंबहुना स्त्रीचं जगणं नी मरणं हे पुरुषांच्या मर्जीवर अवलंबून असतं. आणि ज्याच्या हाती पैसा, त्याच्या हाती सत्ता नी सामर्थ्य हा तर जगाचा नियम आहे. भीष्म द्रोणांसारख्या आचार्यांना जिथं 'ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी' असं म्हणण्याची पाळी आली, तिथं इतरांचा काय केवा? तेव्हा स्त्रियांचं दास्य नी गुलामगिरी यांच्या मुळाशी आर्थिक विषमता आहे. खरा प्रश्न जर कोणता असेल, तर तो आर्थिक आहे. तो सुटला की सारे प्रश्न आपोआप सुटतील. सर्व प्रकारचं शिक्षण घ््या. जिच्या तिच्या योग्यतेप्रमाणे तिनं शिक्षण घ््यावं. धंदेशिक्षण, कलेचं शिक्षण घ््या. व्यापार करा. नोकरी करा, वकीली करा, डॉक्टरी करा. काय वाटेल ते करा. पण स्वतःच्या पायावर उभ्या रहा. आपल्या भाकरीकरिता पुरुषांच्या तोंडाकडे पाहण्याची पाळी याऊपर येऊ देऊ नका. मग कुणाचीहि आपल्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची प्राज्ञा नाही.
माझा दुसरा मुद्दा धर्माविषयीचा आहे. हिंदुधर्मानं स्त्रियांचं दास्य चिरकाल टिकाव अशी सोय करून ठेवली आहे. स्त्रियांनी चूल आणि मूल सांभाळावी, घराच्या बाहेरील उद्योग त्यांनी करू नयेत, पतीच्या आज्ञा निमूटपणे पाळाव्या, पतीचं सुख तेच आपलं सुख आणि त्याचं दुःख तेच आपल दुःख मानावं, किंबहुना त्याच्याकरता मरणासहि तयार व्हावं, अशी शिकवण तुमच्या या सनातन धर्मानं दिली आहे. धार्मिक ग्रंथातून आणि पोथ्यापुराणातून जे आदर्श तुमच्यासमोर ठेवण्यात आले आहेत, तेहि असेच गुलामगिरीला प्रोत्साहन देणारे आहेत. रामाच्या मागे रानावनातून हिंडून आपल्यावर संकटांची परंपरा ओढवून घेणाऱ्या सीतेला शेवटी रामानं काय बक्षीस दिलं? तर तिचा वृथा लोकापवादावरून निर्दयतेने त्याग केला, आणि तिला शेवटी भूमातेनं आपल्या उदरात थारा दिला. द्रौपदीलाहि अशाच पातिव्रत्याच्या वेड्या नी खुळ्या कल्पनेनं वस्त्रहरणासारखा लाजिरवाणा प्रसंग आपल्यावर ओढवून घ््यावा लागला. असले गुलामगिरीचे आदर्श तुमच्या डोळ्यासमोर ठेवून ज्या धर्मानं तुमचं दास्य आजपावेतो टिकविण्यास मदत केली, तो धर्म पार झुगारून द्या. परलोकाच्या नी पापपुण्याच्या पोकळ कल्पनांचा त्याग करा, आणि वास्तववादाचा अंगिकार करा. मी सांगितलेल्या या दोन गोष्टी जर आपण अंमलात आणाल, तर हिंसा की अहिंसा, शांती की युद्ध, अत्याचार की अनत्याचार असले शाब्दिक वादविवाद करण्यात आपल्या शक्तीचा आणि कालाचा अपव्यय होणार नाही, आणि आपलं उद्दिष्ट लवकर साध्य होईल. इतके बोलून मी आपली रजा घेते.
सोशालिस्ट पार्टीचे हे भाषण 'सर्व प्रश्नांच्या मुळाशी आर्थिक विषमता आहे' हा सोशालिस्ट दृष्टिकोन खुबीने मांडते. काँग्रेसला जसे 'सर्व प्रश्नांवर एकच उत्तर, सत्याग्रह!' असे वाटते तशीच ह्या सोशालिस्टांची कथा. एक जण 'लाख दुखोंकी एक दवा है' म्हणतो तर दुसरा 'लाख दुखोंकी एक वजह है' असे प्रतिपादतो. निरनिराळ्या पक्षांच्या विचारधारांचे सार लक्षात ठेवून ही भाषणे लिहिण्यात आली. इतक्या कमी शब्दात आपल्या पक्षाचा दृष्टिकोण त्या त्या पक्षाचे दिग्गज पण मांडू शकले नसते.
प्रौढ कुमारिका संघ
सन्माननीय अध्यक्ष आणि हिंदमातेच्या बालिकांनो!
अर्धवट शिक्षणानं बुद्धिभ्रंश होतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही. जिला शिक्षणाचा गंध नाही ती पुरवली, पण अशा अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्यांना म्हणावे तरी काय? वर्षाचे चार आणे दिले, आणि खादीचे ब्लाऊझ घातले की झाल्या काँग्रेसच्या नेत्या. गांधीबाबांचं शांति अहिंसेचे कर्मपुराण चार दोन सभांतून वाचलं, की जमल्या स्त्रियांच्या झुंडी. यांनी आपली बुद्धि काँग्रेसजवळ गहाण ठेवली की काय न कळे! म्हणे सत्याग्रह करा. बैठा संप पुकारा. मग लग्न तरी कशाला मरायला केलंत? अाधी उखळात डोकं घालायचं, अन् वरून मुसळ बसते म्हणून ओरड कराययी. ही काय रीत झाली? दुसरी एक उठली न् लागली सांगायला चंडिकेची पूजा करा म्हणून! अाज युगानुयुगं चालली आहे चंडिकेची पूजा आमच्या या देशात. फिटलं का आमच्या कपाळीचं दास्य? म्हणे सबला बना, प्रसंग पडल्यास सर्व शस्त्रास्त्रांचा उपयोग करा! काय म्हणणं तरी काय अाहे यांचं? प्रत्येक घरात काय पानिपत निर्माण करायचं आहे? तिसरी उठते नी म्हणते अर्थिक विषमता नाहीशी करा. आपल्या पायावर उभ्या रहा. शिक्षण घ््या? काय करायचं आहे मेलं ते शिक्षण घेऊन? एकदा का लग्न केलं की जातं ते सारं शिक्षण मातीत. अन् सारी विद्वत्ता चुलीत, अन् मूल येतं पाठीशी. मूल सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. मग उद्योग करायला नी पैसा कमवायला वेळ कुठं उरतो? नुसतं तत्वज्ञान बरळणं सोपं असतं? पण जेव्हा समतोल बुद्धीनं त्यातील व्यावहारिक अडचणी पहाव्या, तेव्हा कुठं त्याचा फोलपणा कळून येतो. ते काही नाही. सारं मानसशास्त्र पालथं घालून अन् अवघ््या समाजशास्त्राचा कीस काढून मी एक निष्कर्ष काढला आहे. स्त्रियांवरील सर्व आपत्तींच्या मूळाशी लग्न आहे. मूळावरच घाव घातला पाहिजे. आजन्म कुमारी राहण्याचा निश्चय करा. मग असा पेचप्रसंग निर्माण होईल की ज्याचं निराकरण करतांना ब्रह्मदेवाची मती कुंठित होईल. मग पुरुष ते काय? दर्यामें खसखस! सारी पुरुषजात आम्हा स्त्रियांच्या पायावर लोटांगण घालत येईल? आजपर्यंतचा त्यांचा सारा तोरा नाहीसा होईल. मोठ्या दीन मुद्रेनं आणि लाचारीनं आम्ही जे म्हणू ते एका क्षणात कबूल करतील. काय, आहे की नाही गंमत? याच उद्देशांनं प्रेरीत होऊन आम्ही प्रौढ कुमारिका संघ ही संस्था काढलेली आहे. तिचे हजारोंनी सभासद व्हा. सभासद होण्याकरिता वर्गणी नको, की खादीची आणि सूत कातण्याची अट नको. एकच साधी अाणि सोपी अट! ती म्हणजे आजन्म अविवाहित राहण्याची. तेव्हा आमच्या या संस्थेच्या सभासद व्हा आणि देशात अभेद्य अशी संघटना निर्माण करा. इतकी आपणास विनंती करून मी आपली रजा घेते.
न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी! या प्रौढ कुमारिकेने पुढे मांडलेला मार्ग केवळ हसून टाळून देण्यासारखा आहे काय? तिने सुचविलेला मार्ग चोखाळला तर कितीतरी प्रश्न आपोआपच सुटतील. हुंडाप्रथा बंद पडेल. उलट लग्न करायला राजी होणाऱ्या मुलीलाच मागेल तेवढा हुंडा मिळेल. वधुपित्यांची पादत्राणांची झीज थांबेल. वरपिते त्यांच्या घरी खेटा घालतील. लोकसंख्येचा प्रश्न धसास लागेल. त्यामुळे निर्माण झालेले रोटी, कपडा, मकान हे तीन मूळ गरजांच्या आपूर्तीचे प्रश्र सुटतील, वगैरे, वगैरे. पण असा रामबाण उपाय कां आपण अमलात आणत नाही? प्रौढ कुमारिकेच्या या ब्रेनवेव्हचा कां आपण फायदा घेत नाही?
विवाहित स्त्री संघ
नियोजित अध्यक्ष, कुमारिकांनो आणि विवाहितांनो!
आत्ता आपणासमोर एका प्रौढ कुमारिकेचं भाषण झालं. काय ऐट होती बोलण्याची! अन् काय पण नामी मार्ग शोधून काढला बयानं! काय पटरा चालला होता जीभेचा! जिभेला हाड आहे की नाही ईश्वर जाणे. म्हणे कोणता कुमारिका की बिमारीका संघ यांनी काढला आहे! दिवेच लावणार आहेत आता असले संघ काढून! त्या कुमारिका संघात काय काय गोंधळ चालतो सारं काही मला माहिती आहे. (प्रौढ कुमारिका संघ प्रतिनिधि: काही वाटते की नाही असे शब्द मुखावाटे बाहेर काढायला? शब्द परत घ््या, शब्द परत घ््या. सभेतून आवाज: खाली बसा, खाली बसा, बोला, बोला. अध्यक्ष: ऑर्डर, ऑर्डर. व्याख्यात्रीचं म्हणणं काय आहे ते शांतपणे ऐकून घ््या. तुम्हाला ज्या पक्षाचं म्हणणं पटेल त्याप्रमाणे वागण्यास तुम्ही मोकळे आहात.)
मी सावळा गोंधळ हे शब्द उच्चारल्याबरोबर माझ्या मैत्रिणीनं इतकं रागावण्याचं काहीही कारण नव्हतं. त्यांनी सावळा गोंधळ ह्या शब्दाचा जो अर्थ केला त्या अर्थानं मी तो शब्द वापरला नाही. आजन्म अविवाहित राहण्याची त्यांच्या कुमारिका संघाची जी अट आहे, तिचा कसा दुरुपयोग होत आहे हेच सुचविण्याचा माझा हेतू होता. आजन्म अविवाहित राहण्याची शपथ खाऊन कुमारिका संघाच्या सभासद झालेल्यापैकी कितीतरी कुमारिका मला माहित आहेत, की ज्यांनी सभासद झाल्यापासून अवघ््या वर्षाच्या आतच आपली लग्नं थाटली. त्यांची नावं आज मी इथं सांगत नाही, नाहीतर पुन्हा मघासारखा गोंधळ व्हायचा! (सभेतून आवाज - नांवं सांगा, नांवं सांगा.) नाही, मी नांवं सांगणार नाही. माझ्या पूर्वीच ज्या कुमारिकेनं आपणासमोर भाषण केलं, तिनहि एकदोन वर्षाच्या आत आपला संसार थाटलेला आढळून येईल. आणि या अर्थानं मी सावळा गोंधळ हा शब्द वापरला होता. दुसरी गोष्ट अशी की ज्यांना त्यांच्या अगोदर बोलून गेलेल्या तिघी जणींवर आग पाखडतांना सुख वाटलं, त्यांच्यावर थोडी बाजू उलटतांच त्यांनी कां आकांडतांडव करावं? असो.
आजन्म अविवाहित राहण्याचा सल्ला किती पोरकट आणि अव्यवहार्य आहे हे आपणाला पटवून देण्याची आवश्यकता नाही. कुमारिका संघाच्या चाळ्यांना शह देण्याकरिता आम्ही विवाहित स्त्री संघ ही संस्था काढलेली आहे. पुरुषांच्या जाचाखाली बहुधा विवाहित स्त्रियाच भरडून निघतात. तेव्हा विवाहित स्त्रियांची अभेद्य अशी सर्वदेशव्यापि संघटना निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे. या आमच्या संघटनेची कोणतीहि विवाहित स्त्री सभासद होऊ शकते. मग ती कोणत्याहि पक्षाची, जातीची अगर मताची असो. अशा या विवाहित स्त्रियांची घटना समिति (constituent assembly) बोलावून तिच्यातर्फे आपल्या मागण्या पुरुषवर्गापुढे सादर केल्यास त्यांची छाती नाही त्या धुडकावून लावण्याची. तेव्हा सर्व विवाहित भगिनींनी आमच्या या संस्थेत सामिल व्हावे, अशी त्यांना विनंति करून मी आपली रजा घेते.
हळू हळू संवादाला तडे जाऊ लागले. पण परिषदेला रंग चढू लागला. आपले विरोधक अनेक असले तरी त्यांच्यात एकी नाही हे लक्षात येऊन, आपल्या एकछत्री साम्राज्याला तूर्त तरी धोका नाही हे कळून पुरुषवर्ग सुखावला.
वुइमेन्स फॉरवर्ड ब्लाॅक
नियोजित अध्यक्ष, माझ्या बालमैत्रिणींनो, भगिनींनो आणि मातांनो!
मी वुइमेन्स फॉरवर्ड ब्लाॅकतर्फे या परिषदेला आलेली आहे. माझी या परिषदेला कलकत्याहून येतांना वेगळीच कल्पना होती. मला वाटलं होतं की ही अखिल हिंदुस्थानची सर्वपक्षीय महिला परिषद आहे. इथं सर्व पक्षात काहीतरी एकवाक्यता होऊन आपले हक्क मिळविण्याकरिता प्रत्यक्ष लढा सुरू करण्याचे धोरण स्वीकारण्यात येईल. पण इथं येऊन पाहते तर सर्वच काही और दिसतं. हे महिला परिषदेचे व्यासपीठ म्हणजे जणू काही प्रतिपक्षांवर टीकास्त्रांचा भडिमार करण्याची युद्धभूमीच आहे असा भास होतो. आतापर्यंत ज्या ज्या थोर स्त्रियांची भाषणं झाली त्यांनी आपल्यापूर्वी बोलून गेलेल्या स्त्रियांवर ताशेरे झाडले, जे करू नयेत असे आरोप त्यांच्यावर केले. सारं शब्दजाल! वायफळ बडबड! एकीचीहि लढा सुरू करण्याची किंवा निदान लढण्याकरिता स्त्रियांना तयार करण्याची इच्छा दिसत नाही व नुसत्या शाब्दिक वादविवादात यापुढे असा किती काल दवडणार? आजवर झाली ती झोप पुरे झाली. आजवर पुरुषांकडून करण्यात आलेला छळ, जुलूम, जबरदस्ती बस्स् झाली. आतातरी आपल्या कालनिद्रेतून जाग्या व्हा. आपले हक्क मिळविण्यासाठी प्रचंड चळवळ करा. प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करा.
आम्हा स्त्रियांना संपूर्ण स्वातंत्र्य हवं आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक सर्व क्षेत्रात आम्हाला पुरुषांच्या बरोबरीचं स्थान हवं आहे. ह्यापेक्षा काहीहि कमी घ््यावयाला आम्ही तयार नाही. नुसत्या घोषणेने आमचं समाधान होऊ शकत नाही. आजवर अशा घोषणा अनेक झाल्या आणि अनेक गेल्या. पण आमच्या स्थितीत यत्किंचितहि बदल झालेला नाही. याऊपर आम्ही पुरुषांच्या शाब्दिक घोषणांवर विश्वास ठेवायला तयार नाही. आम्हाला वर उल्लेखिलेलं संपूर्ण स्वातंत्र्य हवं आहे. ज्या पुरुषांनी आमच्यावर आजवर सत्ता गाजविली, आम्हाला पिळून काढलं, आणि दुःखाचा सुस्कारा सोडण्याचहि स्वातंत्र्य ठेवलं नाही, त्यांच्याशी आज आम्ही कोणताहि समेट करावयास तयार नाही. समझौता एकाच अटीवर होऊ शकतो. आणि ती अट म्हणजे सर्व बाबतीत पुरुषांच्या बरोबरीचे हक्क! देशात आज जे समेटाचे अंतःप्रवाह सुरू आहेत त्यांना जोराचा विरोध करा. सर्व पक्षांची संघटना करा. कोणालाहि झिडकारू नका. आणि सर्व देशभर आपल्या हक्कांकरिता प्रचंड झगडा सुरू करा.
ही आणीबाणीची वेळ आहे. आंतरराष्ट्रीय बिकट परिस्थितीतून आणि परचक्रापासून देशाचं संरक्षण कसं करावं, याचा विचार करण्यात पुरुष गढलेले आहेत. याचवेळी तुम्ही आपली चळवळ सुरू करा. स्त्रियांची तयारी नाही ही सबब पोकळ आहे. प्रत्यक्ष लढा सुरू झाल्यास लाखो स्त्रिया त्यात उडी घ््यावयास तयार आहेत. अशी सुवर्णसंधी पुनः येणार नाही. यावेळी पुरुष कधी नव्हते इतके कमजोर झाले आहेत. आणि स्त्रियांची संघटना आजवर कधी नव्हती इतकी जोरदार झालेली आहे. तेव्हा ही अनायास चालून आलेली संधि गमावून पुढे पश्चात्ताप करण्याची पाळी आपणावर येऊ देऊ नका, अशी आपणाला आग्रहाची विनंति करून मी आपली रजा घेते.
स्त्री स्वयंसेविका संघ
नियोजित अध्यक्ष, देशभगिनींनो व राष्ट्रसेविकांनो!
आपण सर्वांनी श्रीमति वेणूताई जोशी यांचं भाषण ऐकलच आहे. हिंदुमहासभेच्या कार्याला आपलं सर्वस्व ज्यांनी अर्पण केलं, अशा स्त्रियांपैकी त्या एक आहेत. आज हिंदु स्त्रियांमध्ये जी जागृति दिसून येते तिचं बरचसं श्रेय त्यांना आहे. त्यांनी आपल्या स्फूर्तिदायक भाषणात देशाची दिशाभूल कशी करण्यात येत आहे, आणि त्यापासून स्त्रियांनी कसं सावध राहिलं पाहिजे हे आपणाला उत्तम रीतीनं पटवून दिलं आहे. त्यांनी स्त्रियांना सबला बनण्याचा जो उपदेश केला, तो किती समयोचित आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आणि त्या हेतूनं आमचा राष्ट्रीय स्वयंसेविका संघ स्थापन झाला आहे. हिंदु स्त्रियांची संघटना करणे आणि स्त्रीसमाज शक्तिमान करणे ही संघाच्या कार्याची दोन अंगे आहेत. शक्तिविहीन माणसाच्या शब्दाला किंमत नसते. पण शक्तिमान माणसाच्या नुसत्या डोळ्यांना जग भिते. जी गोष्ट व्यक्तीची, तीच गोष्ट राष्ट्राची. आज आम्ही इतक्या वर्षांपासून आपल्या हक्कासाठी पुरुषांच्या कानीकपाळी ओरडत आहोत. पण ते सारं अरण्यरूदन ठरतं. आणि याचं कारण काय? तर आमचा स्त्रीसमाज बलहीन आहे. त्याच्या अंगात स्वतःचं संरक्षण करण्याची ताकद नाही. आमच्या अंगात ताकद असती, धमक असती, तर कुणाची प्राज्ञा नव्हती आमच्या मागण्या नामंजूर करण्याची! तुम्ही मोठमोठाल्या सभा करा, घसा फोडफोडून व्याख्याने द्या, परिषदा भरवा किंवा लांबलचक ठराव पास करा. त्याचा काडीइतका उपयोग नाही, जोपर्यंत तुमच्या ठरावांच्या मागे स्त्रियांची शक्तिमान संघटना उभी नाही. आजपर्यंत पुरुषांनी स्त्रियांना घराच्या चार भिंताडांच्या आत डांबून ठेवून त्यांचा मानसिक, त्याचप्रमाणे शारीरिक ऱ्हास केलेला आहे. ही हानी तुम्ही भरून काढली पाहिजे. रोज नियमित व्यायाम घेतला पाहिजे. पोहणे, घोड्यावर बसणे, नेम मारणे याचंहि तुम्ही शिक्षण घ््यायला हवं. स्वसंरक्षणाकरिता ज्या ज्या गोष्टींचं आणि कलांचं ज्ञान आवश्यक असेल, ते ते सर्व तुम्ही हस्तगत केलं पाहिजे. इतकच नव्हे तर लष्करी शिक्षण देखील तुम्ही घेतलं पाहिजे. माझं हे भाषण काहींना माथेफिरूपणाच वाटेल याची मला जाणीव आहे. कित्येक माझी गणना वेड्यात करतील. मला त्याबद्दल मुळीच दिक्कत वाटत नाही. मी माथेफिरू आहे, पण स्त्रियांच्या कल्याणाकरिताच मी माझं माथं मुद्दाम फिरवून घेतलं आहे. मी वेडी आहे, पण माझ्या वेडाचा उगम स्त्रियांच्या उन्नतिविषयी वाटणाऱ्या आत्यंतिक कळकळीत आहे. माझ्याच प्रमाणं जेव्हा काही स्त्रिया वेड्या आणि माथेफिरू बनतील, तेव्हाच हिंदु स्त्रिया अवनतीच्या गर्तेतून डोकं वर काढतील. जोपर्यंत तुमचं संरक्षण तुम्हाला स्वतःला करता येत नाही, त्याकरिता तुम्ही पुरुषांवर अवलंबून अाहात, तोपर्यंत तुम्ही कोणत्या तोंडानं आपले हक्क मागणार? अाणि पुरुष तरी तुम्हाला कां म्हणून ते हक्क देतील? हक्क मागून मिळत नसून ते हिसकावून घ््यावे लागतात. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? तेव्हा स्त्रियांची अशी शक्तिमान संघटना निर्माण करा की पुरुषांच्या छातीत धडकीच भरेल. 'दंडस्यहि भयात् सर्वं जगत् भोगाय कल्पते.'
पुरुषविरोधी युद्ध मंडळ
नियोजित अध्यक्ष आणि पुरुषांच्या जुलुमात प्रत्यही भरडल्या जाणाऱ्या माझ्या भगिनींनो!
आपण सर्वांनी अखिल भारतीय पुरोगामी गटाच्या अध्वर्यू आणि बंगाली महिलांच्या मूर्धाभिषिक्त पुढारी श्रीमती विमलादेवी शास्त्री यांचे भाषण ऐकलेलेच आहे. त्यांच्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दात भारतीय महिलांच्या हिताची कळकळ ओतप्रोत भरली होती. त्यांच्या भाषणात दिसून येणारा आवेश कृत्रिम नव्हता तर तो अंतःकरणातील मानवी भावनांचा सहज उद्रेक होता. त्यांनी स्त्रियांना ताबडतोब लढा सुरू करण्याचा केलेला उपदेश किती मार्मिक आणि समयोचित आहे हे आपणासारख्या सूज्ञ स्त्रियांना सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. आजची ही सुवर्णसंधी गमावली, तर आपल्या भावी पिढ्या आपल्याला दोष दिल्याशिवाय राहणार नाहीत. जगात आपली छी-थू होईल. सर्वत्र आपलं हसं होईल. पुरुष जातीवरील संकट हा स्त्रीजातीच्या दृष्टीनं कपिला षष्ठीचा योग आहे. 'Men's difficulty is our opportunity!' पुरुष बाहेरील भीषण आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि अंतर्गत यादवी यांच्या दुहेरी कचाट्यात सापडले आहेत. अशा वेळीच आपलं युद्धाचं रणशिंग फुंका. क्षणाचा विलंब म्हणजे आत्मघात. संकटात सापडलेल्या शत्रूवर वार करू नका हा उपदेश म्हणजे प्रेमाच्या आणि अहिंसेच्या गोंडस पांघरूणाखाली दडलेली मनाची कमजोरी होय. खुद्द भगवान श्रीकृष्णांनी कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले असतांना त्यावर बाण मारण्याचा उपदेश केला आहे. प्रभू रामचंद्रानं झाडाच्या मागे दडून वालीवर बाण सोडला आहे. हे राजकारण आहे, मुत्सद्देगिरी आहे. येथे सत्यासत्याचा, धर्माधर्माचा विचार करून चालणार नाही. पुरुषांना ज्या ज्या रीतीनं पेचात धरता येईल, ज्या ज्या उपायांनी जेरीस आणता येईल, ते ते सर्व आम्हाला धर्म्य आहे. आणि म्हणून मी म्हणते की आपली दया जरा गुंडाळून ठेवा, सहिष्णुता सोडून द्या, प्रेम बाजूस सारा, आणि कठोर बना, कणखर बना.
लढा ताबडतोब सुरू झाला पाहिजे, आणि त्याकरिता आम्ही ही शहरोशहरी, खेडोपाडी पुरुषविरोधी युद्धमंडळं स्थापन केली आहेत. युद्धाचं वातावरण निर्माण करणं आणि ते समान हक्क मिळेपर्यंत कायम राखणं हे आमचं कार्य आहे. आम्हाला आमच्या लढ्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, आमच्यात येन केन प्रकारेण फूट पाडण्याचा डाव रचण्यात येईल, हे मी जाणून आहे. चार दोन हक्कांच्या तुकड्यांना भुलून आपला लढा थांबवू नका. आपल्या ठरलेल्या ध्येयाच्या यत्किंचितहि खाली येऊ नका. शत्रूच्या डोळ्यात शल्याप्रमाणे खुपणारी आपली ही एकी सदैव कायम ठेवा. आपलं ध्येय साध्य होईपर्यंत पुरुषांशी कोणचाहि समेट करू नका. लढ्यात यत्किंचितहि शिथिलता येऊ देऊ नका. अशी चिकाटी दाखवाल, तर यश आपल्या पायाशी लोळण घेत येईल.
प्रत्येक खेड्यातून आणि शहरातून आम्हाला प्रचार करून युद्धमंडळे स्थापन करावयाची आहेत. या युद्धमंडळात आपण सामील व्हा. हजारोंच्या संख्येनी स्वयंसेविका बना, पैशाची मदत करा, धान्याची मदत करा. तुम्हाला ज्या ज्या प्रकारे शक्य असेल त्या त्या सर्व प्रकारांनी आम्हाला मदत करा अशी आपणाला विनंति करून मी आपली रजा घेते.
तुटलेला संवाद पुन्हा साधलेला दिसतो. एका बाईला दुसरीचे मत पटायला लागले. भांडणे कमी झाली. शत्रु एक होणार हे पाहून पुरुष पुन्हा थोडेसे हादरले असतील. तेवढ्यात त्यांच्याविरुद्ध आणखी एक सेना सज्ज झाली.
मांजरसेना
माननीय अध्यक्ष आणि माझ्या पिल्यांनो!
आपण अखिल भारतीय विवाहित स्त्री संघाच्या प्रतिनिधि श्रीमती लीलाताई बोधनकर यांचं भाषण ऐकलं आहे. त्या म्हणाल्या की पुरुषांच्या जाचाखाली विवाहित स्त्रिया भरडून निघतात. परदुःख शीतळ असतं म्हणतात ते काही खोटं नाही. आमच्या दुःखाची या विवाहित स्त्रियांना काय कल्पना येणार? त्यांनी मारे विवाहित स्त्रियांची गाऱ्हाणी आपणासमोर मांडली. काही अर्थ नाही त्यात. उगाच राईचा पर्वत केला त्यांनी! आपल्या बायकोला छळणारे पतिराज विरळाच. माझी आई तर एक दिवशी म्हणाली की आजकालचे नवरे मेले बायकांचे गुलाम असतात म्हणून. मला काही त्याचा प्रत्यक्ष अनुभव नाही म्हणा! पण आमची आई काही खोटं सांगायची नाही. आमची ताई दिवाळीकरता पुण्याहून माहेरी आली आहे. कालचीच गोष्ट! मी, माझी आई, माझी ताई, माई साऱ्या जणी माजघरात बसलो होतो. ताईकडे तिच्या मैत्रिणी आल्या होत्या. स्टोव्हवर चहा मांडला होता. गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. ताई आपल्या मैत्रिणींना सांगत होती 'आमच्या घरी प्रत्येक गोष्ट मला विचारून करणं होतं. माझ्या संमतिशिवाय तर तिकडचं पान हालत नाही. मी जरा रागात दिसले की तिकडचा जीव कसा कावराबावरा होतो आणि काय झालं, काय पाहिजे इत्यादि प्रश्नांनी मला बेजार करतात.'. माझी ताई कशाला हो खोटं सांगेल? आणि असं असताना आपण कोणत्या तोंडानं म्हणू शकता की पुरुषांच्या जाचाखाली विवाहित स्त्रिया भरडून निघतात म्हणून?
आतापर्यत निरनिराळ्या पक्षांच्या प्रतिनिधींची भाषणं झाली. पण एकीनहि आम्हा लहान लहान चिमुकल्या जीवांना कसा त्रास सोसावा लागतो, याचा उल्लेख सुद्धा केला नाही. मीच आम्हा मुलींची गाऱ्हाणी वेशीवर टांगण्याकरता आज बोलावयास उभी राहिली आहे. पुरुषांचा ओढा केव्हाहि मुलांकडेच असणार. मुलींना कोण विचारतो. आमचे बाबा नेहमी सिनेमा पाहतात. दादाला घेऊन जातात आपल्याबरोबर. मी किती मागे लागले, हट्ट धरला, रडले. पण काही उपयोग नाही. ते म्हणाले की लहान मुलींनी सिनेमा पाहू नये म्हणून. पण ते लहानग्या दादाला कसे हो नेतात? मला तीन भाऊ आहेत. ते किती किती खेळतात. मी त्यांच्यात खेळायला गेले की म्हणतात, मुलींनी मुलात खेळू नये म्हणून, आणि मला 'पोरांमध्ये पोरगी लांबोडी, भाजून खाते कोंबडी' म्हणून खिजवतात. शेवटी मी आपली रडत बसते. असा दररोज आम्हाला या पुरुषांपासून त्रास होतो. आणि हा त्रास नाहीसा करण्याकरिता आम्ही मांजरसेना स्थापन केली आहे. मांजरसेनेत सर्व लहान मुलींनी सामील झाले पाहिजे. आपण मिरवणुकी काढू, सभा भरवू, आपली संघटना करू. संघटना झाली की सामर्थ्य आलेच. सामर्थ्य प्राप्त झाल्यावर हा पक्षपात आणि हा जुलूम आम्ही काय सहन करतो म्हणा! तेव्हा सर्व मुलींनी या मांजरसेनेत सामील व्हावे अशी त्यांना हात जोडून विनंति करते आणि मोठ्या स्त्रियांनी सुद्धा आमच्या चळवळीकडे सहानुभूतीच्या दृष्टीने पहावे आणि आम्हाला सर्व प्रकारे मदत करावी अशी त्यांनाहि विनंति करते. आणि आपली रजा घेते.
मांजरसेनेची आयडिया स्वातंत्र्यलढ्यातील मंकी ब्रिगेडवर आधारीत असावी. एकंदरीतच परिषदेत सहभागी होणाऱ्या संघटनांची नावे व त्यांची भाषणे यांची निवड अफलातून आहे. बाबांमधली ही विनोदबुद्धी कालांतराने कुठेतरी शिक्षकी पेशात लुप्त झाली.
हिंदु युवति संघ
नियोजित अध्यक्ष, इथे जमलेल्या लहान मुलींनो, तरुण भगिनींनो आणि मातांनो!
आपणासमोर मांजरसेनेतर्फे बोलून गेलेल्या लहानग्या मुलीचे भाषण ऐकून माझं अंतःकरण आनंद, प्रेम, कौतुक, अभिमान, आश्चर्य इत्यादि भावनांनी भरून आलेलं आहे. ह्या मुली जेव्हा मोठ्या होतील, आणि सामाजिक कार्यक्षेत्रात पदार्पण करतील तो काल खरोखरच धन्य होय! त्यावेळेस स्त्रियांचं पारतंत्र्य पूर्णपणे नष्ट झालेलं असेल. कोणत्याहि क्षेत्रात पुरुष आणि स्त्री असा भेद केला जाणार नाही. इतक्या लहान वयात या मुलीच्या अंगात स्वातंत्र्याचं वारं खेळत आहे हे पाहून मला अत्यानंद होतो. 'संघटना झाली की सामर्थ्य आलच' असं ती म्हणाली. किती अर्थपूर्ण वाक्य! आमच्या तरुण स्त्रियांनी त्या वाक्याचं मनन करावं आणि आचरणात आणावं अशी त्याची योग्यता आहे. बालादपि सुभाषितं ग्राह्यम्!
वृद्ध स्त्रियांवर मला काही बोलावयाच नाही. जाणून बुजूनच त्यांची शरीरं आणि मनं म्हातारी झाली आहेत. त्यांच्या आयुष्याचे फार थोडे दिवस उरले आहेत. पोपटाला पिंजराच गोड वाटावा अशी त्यांची स्थिती झाली आहे. दास्यमय जीवनालाच त्या धर्माचरण मानतात. गुलामगिरीच्या बेड्यांनाच संस्कृतीचे अलंकार समजतात. आयुष्याचा उरलेला काळ दान धर्म करण्यात, कथा पुराणं ऐकण्यात घालवावा हीच फार तर त्यांची महत्त्वाकांक्षा असणार! असो.
मला जे काही सांगावयाचं आहे ते माझ्यासारख्या तरुणीं़ंना. तुम्ही राष्ट्राच्या आधारस्तंभ आहात. भारतमाता तुमच्याकडे आशाळभूत नजरेने पाहते आहे. तुमच्या नसांतून नवीन रक्त खेळत आहे. नवा उत्साह, नवीन जोम तुमच्या अंतःकरणात वावरत आहे. कोणचाहि पक्षपात, कसलाहि अन्याय, कसाहि जुलूम तुम्हाला सहन होता कामा नये. तुम्ही त्याला सर्व शक्ति एकवटून विरोध केला पाहिजे. जिथं जिथं अन्याय दिसेल, पक्षपात दिसेल, तिथं तिथं त्याविरुद्ध बंडाचं निशाण उभारलं पाहिजे. मी तर असं म्हणते की, आपली ही सारी समाजरचना कुचकी आणि टाकाऊ आहे. तिचा समूळ नायनाट केल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण ज्याला हिंदुधर्म, हिंदु संस्कृति म्हणून म्हणतो, त्याची स्थिती मोडकळीस आलेल्या घराप्रमाणे झाली आहे. त्याची नुसती दुरुस्ती करून भागणार नाही. ते घर कोणत्या दिवशी कोसळून पडेल आणि त्याच्या आश्रयास राहणाऱ्या कोट्यवधि जीवांची हत्या होईल याचा नेम नाही. ही इमारत पायासकट खणून काढली पाहिजे, आणि समतेच्या नी स्वातंत्र्याच्या भरभक्कम पायावर नवीन इमारत उभारली पाहिजे. ह्या सतरा ठिकाणी फाटलेल्या वस्त्राला ठिगळं लावून काय होणार आहे? कोणी म्हणतील हा तुमचा विनाशक कार्यक्रम आहे, डिस्ट्रक्टिव्ह प्रोग्रॅम आहे. ह्या विधायक कार्यक्रमाच्या पक्षपाती आक्षेपकांना माझं एवढच सांगणं आहे, की, 'बाईसाहेब, नवीन इमारत बांधण्याच्या पूर्वी जुन्या गोष्टींचा नायनाटच करावा लागतो.'. तुमच्या विकासाला आड येणारी सर्व बंधने झुगारून द्या, मग ती सामाजिक असोत, धार्मिक असोत की राजकीय असोत. कुणाचीहि मुर्वत करू नका. बंडखोरीची वृत्ती अंगी बाणवा. आणखी काय सांगू? माझ्या अंतःकरणात या वेळेला भावनांची गर्दी झालेली आहे, आणि म्हणूनच माझे विचार असे तुटक तुटक बाहेर पडताहेत. आपण सूज्ञ आहात. कार्याला लागा. भाषणांची आवश्यकता नाही.
संघटनेचं महत्त्व काय आहे हे आपण जाणता. तेव्हा देशातील सर्व तरुण स्त्रियांना एकवटून त्यांची प्रभावी संघटना निर्माण करण्याकरिता आमच्या ह्या हिंदु युवती संघाचा अवतार आहे. राष्ट्रातील सर्व तरुणींनी युवती संघाचे सभासद होऊन त्याच्या कार्याला तनमनधनाने मदत करावी अशी आग्रहाची विनंति करून मी आपली रजा घेते.
आर्य संस्कृतिरक्षक भगिनी समाज
माननीय अध्यक्ष आणि आर्य महिलांनो!
'विनाश काले विपरीत बुद्धी' म्हणतात ते काही खोटं नाही. एकीचा मेळ एकीशी नाही. एकीचा पायपोस एकीच्या पायात नाही. परस्परांचा विश्वास नाही. स्वतःची ठाम मतं नाहीत. सारा गोंधळ, सारी अंदाधुंदी. सर्व पक्षीय महिला परिषद याचकरता का बोलावली? हा सारा प्रकार पाहून मला तर असं वाटतं की उगीचच मी परिषदेला आले. पण दुसऱ्या दृष्टीने विचार करता इतक्या प्रचंड स्त्रीसमुदायापुढं आपली मतं मांडण्याची मला संधी मिळाली ही काही लहान गोष्ट नव्हे, आणि या संधीचा मी पुरेपूर फायदा घेणार आहे.
काय ती एक एक भाषणं नी काय ते एकेकीचे विचार! मला तर बाई नवल वाटतं या बायकांचं! यांना काय बोलावं न् काय म्हणावं हे देखील कळत नाही. पाश्चात्य शिक्षणाच्या धुंदीत यांची नजर तारवटली आहे, दृष्टि विपरीत झाली आहे, माथं फिरलं आहे. आपलं ते सारं वाईट, आपला धर्म वाईट, आपली संस्कृति वाईट, आपली समाजरचना वाईट, आपला पोशाख वाईट, आणि परक्याच ते सारं चांगलं! आम्हाला अंधश्रद्ध म्हणता, आणि तुम्ही तर परक्यांचं नेमक अंधानुकरण करता! परक्यांचं खाणं, परक्यांचं पिणं, परक्यांचा पोशाख तुम्हाला प्रिय वाटतो. कशाला या आर्यावर्तात जन्म घेतला? कशाला आपल्या कपाळी हिंदुत्वाचा डाग लावून घेतला? ज्यांना स्वतःची चाड नाही, स्वसंस्कृतीची किंमत नाही, स्वधर्माचं प्रेम नाही, काय म्हणावं काय यांना? म्हणे आमची समाजरचना कुचकी आणि टाकाऊ आहे! हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृति मुळासकट खणून काढली पाहिजे! लाज नाही वाटत असे उद्गार बाहेर काढायला? हाच का तुमच्या शिक्षणाचा उपयोग? ज्या धर्माकरता नी ज्या संस्कृतीकरता तुमच्या पूर्वजांनी आपलं रक्त सांडलं, सर्वस्व बलिदान केलं, त्याच धर्माच्या नी संस्कृतीच्या मुळावर घाव घालायला तुम्ही सज्ज झालात? ज्या पातिव्रत्याकरिता हजारो रजपूत रमणींनी जोहार केले, स्वतःचे देह अग्निदेवाला समर्पण केले, त्या पातिव्रत्याची तुम्ही टिंगल उडविता? परलोकाच्या नी पापपुण्याच्या पोकळ कल्पना झुगारून द्या असा स्त्रियांना उपदेश करता? सीतामाईला आणि द्रौपदीलाहि नावं ठेवण्यापर्यंत तुमची मजल जाते? धार्मिक ग्रंथातून नी पोथ्यापुराणातून गुलामगिरीचे आदर्श ठेवण्यात आले आहेत असं आपण म्हणता. तुम्ही सुधारकांनी आमच्या डोळ्यासमोर कोणते आदर्श ठेवले आहेत हे काय आम्हाला माहिती नाही? कशाला उगीच लांबलांब बाता मारता आणि लोकांच्या डोळ्यात धूळ फेकता? आर्य महिलांनो! याऊपर तुम्ही यांची वाचाळपंचविशी चालू देऊ नका. सीतामाईचा आणि द्रौपदीमातेचा अपमान तुम्हाला सहन होतो काय? पतिव्रताधर्माची उडविलेली टिंगल तुम्हाला मानवते काय? तुमच्या रक्तात जर हिंदु रक्त खेळत असेल, तर यांची ही धर्मविरोधी चळवळ हाणून पाडा. स्वतःचा धर्म आणि स्वतःची संस्कृति ही यावेळी संकटात आहे. तिचं रक्षण करण्याकरता सज्ज व्हा.
स्वातंत्र्य आणि समता यांचा सर्व व्याख्यात्रींनी उदोउदो केलेला दिसतो. स्वातंत्र्य आणि समता मलाही हवे आहेत. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. सर्व क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे हक्क पाहिजेत अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचा अर्थच समजत नाही. अहो! पुरुषांची आणि स्त्रियांची क्षेत्रेच मुळी भिन्न आहेत. निसर्गतःच त्यात भेद आहेत. सुगृहिणी आणि सुमाता होणं हे स्त्रियांचं आद्य कर्तव्य आहे. गृहव्यवस्था आणि शिशुसंगोपन ही त्यांची प्रमुख कार्ये आहेत. पुरुषांचं मुख्य कार्यक्षेत्र घराच्या बाहेर आणि स्त्रीचं मुख्य कार्यक्षेत्र घराच्या आत अशी आमची आदर्श समाजव्यवस्था आहे. पण आम्हाला अंधश्रद्ध म्हणणाऱ्या पण परक्यांचं नेमक अंधानुकरण करणाऱ्या आमच्यातील सुधारकांना ही समाजव्यवस्था पटतहि नाही आणि रुचतहि नाही.
ज्या शिक्षणानं आपलं तेवढं सारं वाईट आणि परक्यांचं तेवढं सारं चांगलं असा विपरीत ग्रह होतो ते शिक्षण स्त्रियांना न मिळालं तरी चालेल. ज्या स्वातंत्र्याच्या आणि समतेच्या कल्पनेनं सीता आणि द्रौपदी यांच्यासारख्या प्रातःस्मरणीय देवतांना नावं ठेवण्यापर्यंत आमची मजल जाते ते स्वातंत्र्य आणि समता आम्हाला नको. मैत्रेयी आणि अरुंधति यासारख्या विदुषी स्त्रिया, सीता व द्रौपदी यासारख्या पतिव्रता, राणी लक्ष्मीबाई आणि राणी दुर्गावती सारख्या वीरांगना, सखूबाई आणि मीराबाई सारख्या भगवद्भक्त, जिजाऊ सारख्या वीरप्रसु माता ज्या संस्कृतीत निर्माण झाल्या, ज्या संस्कृतीच्या रक्षणाकरिता हजारो सतींनी आत्मबलिदान केलं, शेकडो रजपूत रमणींनी जोहार केले, ती आर्य संस्कृति आम्हाला प्राणाहूनहि प्रिय आहे. तिच्या रक्षणाकरिता आम्ही वाटेल त्याचं मोल द्यायला तयार आहोत. असो! वेळ बराच झालेला आहे. अजून विषयनियामक कमिटीची बैठक व्हावयाची आहे. तेव्हा आपला ज्यास्त वेळ न घेता मी आपली रजा घेते.
परिषदेतील भाषणे संपली. मान्यवरांचे संदेश वाचून दाखविण्यात आले. त्यात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू इत्यादींचा समावेश आहे. नंतर अध्यक्षांचे समारोपाचे भाषण, आभारप्रदर्शन इत्यादि सोपस्कार झाले. परिषदेतील उपस्थितांची जेवणाची सोय ज्याच्या त्याच्या घरीच करण्यात आली आहे, तेव्हा प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी जावे अशी घोषणा झाली आणि परिषदेचे सूप वाजले.
बाहुलीचे लग्न करण्याची आम्ही लहान असतांना एक पद्धत होती. त्यामागे जो निर्मळ उद्देश व त्याने मिळणारा जो निर्मळ आनंद तोच ह्या परिषदेच्या निमित्ताने बाबांनी निर्माण केला.
इतरही अनेक परिसंवादात बाबांची भाषणे सादर झाली. त्यातली निवडक येथे घेतली आहेत.
विद्या श्रेष्ठ की धन श्रेष्ठ
काही वाद असे असतात की त्यांचा निर्णय कधी लागतच नसतो. तो प्रत्येकाच्या मनोरचनेनुसार बदलत असतो. 'विद्या श्रेष्ठ की धन श्रेष्ठ' हा वादहि अशाच प्रकारचा आहे.
विद्या आणि धन ह्या या जगतातील दोन महाबलाढ्य शक्ति होत. प्रत्येकीचा प्रभाव हा भिन्न प्रकारचा असून एकाच मनुष्याजवळ ह्या दोन्ही शक्तींचे साहचर्य सहसा असत नाही. धन असले तर विद्या नाही आणि विद्या असली तर धन नाही अशा अवस्थेत अधिक श्रेष्ठ कोण हे ठरविणे जरी कठिण असले तरी या कूटप्रश्नाचे उत्तर अगदीच अगम्य नाही.
धनाचा या व्यावहारिक जगात किती विविध उपयोग होतो हे आपण प्रत्यक्ष अनुभवितोच. आजच्या जगात तर धनाच्या जोरावर मानमान्यताच नव्हे तर विद्वत्ता आणि उच्चकुलोत्पन्नता यांचाहि सर्रास लाभ होऊ शकतो. तिजोरीवरील हात सैल सोडल्यास विद्वत्तापूर्ण किंवा कलागुणांनी युक्त असे लिखाण लायक मनुष्याकरवी लिहवून घेऊन त्यावर नांव कमावता येते. केवळ पैशाच्या मोबदल्यात उच्चकुळात जन्म झाल्याचा शिक्का तुमच्या कपाळावर मारणारे college of heralds हि जगाच्या पाठीवर अस्तित्वात आहे. पैशाच्या जोरावर सर्व प्रकारच्या ऐहिक सुखोपभोगाचा मनसोक्त आस्वाद घेता येतो आणि पैशाच्या अभावी हवेतील मनोऱ्यावरच समाधान मानण्याची पाळी येते ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे.
परंतु जगाचे दृष्य स्वरूपच संपूर्ण सत्य नसून त्याहि पलिकडे कल्पनातीत अशी प्रचंड सृष्टि अस्तित्वात आहे आणि तीच दृष्य जगतापेक्षा अधिक सत्य आहे, हे नाकारता न येणारे एक सत्य आहें. आणि त्या सृष्टीतील आनंद, सौख्य हे धनाच्या जोरावर लुटता येत नाही. ते अनुभविण्यासाठी विद्या, शील ह्या शक्तींनाच शरण जावे लागते. म्हणूनच त्या शक्तींना धनापेक्षा श्रेष्ठ म्हणावयाचे.
विद्यावान् मनुष्य दरिद्री असला तरी तो कमी सुखी असतो असे समजणे योग्य नाही. विद्यावान मनुष्याला लक्ष्मीवंतांचा कधीच हिरस वाटत नसतो.
लक्ष्मीने जरि तुष्ट तू, बहु सुखी मी वल्कलांनी असे ।
दोघांचा परितोष तुल्य असता आधिक्य काही नसे ।।
असा रोखठोक जबाब तो लक्ष्मीवंतास बेधडक देऊ शकतो. याउलट धनवान मनुष्यास विद्यावन्ताचा मनापासून हेवा वाटत असतो. आणि संपत्तीच्या जोरावर विद्यावंताला मिंधे करून ठेवावयास तो हपापलेला असतो. परंतु खऱ्या विद्यावंतास धनाचा मोह कधीच शिवत नाही.
पुराणात एक गोष्ट आहे. एकदा भृगु मुनि भगवान विष्णूंच्या दर्शनास गेले. त्यावेळी विष्णू निद्राधीन झाले होते. भृगु मुनींनी ते पाहून त्यांच्या छातीवर लत्ताप्रहार केला. त्याच्या आघाताने विष्णूंना जाग येताच त्यांनी भृगुंना नमन केले आणि छातीवरील प्रहाराकडे दुर्लक्ष करून उलट भृगुंचा पाय चेपू लागले. असा विद्येचा अधिकार असतो. आपल्या पतीचा हा अपमान पाहून लक्ष्मीचे माथे भडकले. तिने उन्मत्तपणाने शाप दिला की विद्वान लोकांजवळ मी कधीहि राहणार नाही. भृगुनेहि आनंदाने त्या शापाचा स्वीकार केला. या गोष्टीत विद्येचे श्रेष्ठत्व आणि धनवानाच्या स्वभावात मुरलेला उन्मत्तपणा हे उत्तम रीतीने प्रतिबिंबित झाले आहेत.
पैशाने आजवर जगाचे अपरिमित नुकसान केले आहे. बहुतेक संग्रामांचे मूळ पैशाच्या पाशवी अभिलाषेत असते आणि युद्धांमुळे मानवजातीची हानि होते ही गोष्ट काही नव्याने सांगावयास नको. पैशाची अनिवार हाव ही एक पैशाची शक्ति होय. धन हे जगाला नरकाचे स्वरूप देण्यास कारणीभूत होते. याउलट विद्येची कास धरणे हाच मानवजातीच्या अंतिम हिताचा मार्ग होय. 'विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगामाजी' हे विष्णुशास्त्रींचे उद्गार काही वृथा नव्हेत. विद्येच्या जोरावरच मनुष्य पृथ्वीचे नंदनवन बनविण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. आज कृत्रिम ग्रह निर्माण करून मनुष्य परमेश्वराशी स्पर्धा करू पाहात आहे तो विद्येच्याच जोरावर. पैसाहि या कार्यासाठी आवश्यक ठरला खरा पण केवळ पैशाने यातील काहीहि साध्य होऊ शकणारे नव्हते.
पैसा हे खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्याचे प्रभावी साधन होय. पैसा असेल तर गर्विष्ट मनुष्य स्वाभिमानी ठरतो, नेभळट मनुष्य नम्र ठरतो. कर्तव्यशून्य मनुष्याला प्रसिद्धिपराडमुख असल्याची प्रसिद्धि मिळते. आणि प्रत्येक ठिकाणी लुडबुड करणाऱ्यास कर्तबगारीचा शिक्का मिळतो.
यस्यार्थास्तस्य मित्राणि, यस्यार्थास्तस्य बांधवः ।
यस्यार्थाः स पुमाङ्लोके यस्यार्थाः स च पंडितः ।।
असे प्रत्यक्ष रामायणकारानी सुद्धा म्हटले आहे. परंतु हा धनाचा श्रेष्ठपणा नसून दुरुपयोग होय.
मनुष्य आणि पशु यातील मुख्य फरक हा होय की मनुष्य भविष्याचा विचार करू शकतो आणि पशूला तसा विचार करण्याचे बुद्धिसामर्थ्य नसते. खऱ्या उत्क्रांत मनुष्याचे जिवंतपणीच वैभव उपभोगून आणि सुखाचा आस्वाद घेऊन समाधान होणे शक्य नाही. 'मरावे परी कीर्तिरूपे उरावे' हीच त्याची एकमेव इच्छा असते आणि केवळ पैशाच्या योगाने हे शक्य नाही. आजवर धनवान काही या जगात कमी झाले नाहीत पण त्यापैकी कितीची नावे काळाच्या ओघाबरोबर पुसून न जाता टिकून राहिली? पैशाचा योग्य उपयोग करून आपले नाव अजरामर करून ठेवावयासहि बुद्धि लागते. याउलट विद्यावंत हा जर खरा विद्यावंत असेल तर कालसागराच्या लाटा वरवरच्या वालुकाकणांबरोबर त्याचे नांव वाहून नेऊ शकत नाही, म्हणूनच धनापेक्षा विद्या श्रेष्ठ आहे असे म्हणावयाचे कारण क्षणिक सुखापेक्षा चिरंतन कीर्तिची किंमत केव्हाहि अधिक असते. म्हणूनच 'विद्याविहीन: पशुभि: समाना:' असे संस्कृत सुभाषितकाराने म्हटले आहे.
पैशाचा प्रभाव हा क्षणिक असतो. शेक्सपिअरने म्हटले आहे;
Everyone will be thy friend
While you have wherewithals to spend
But if score of crowns be scant
No man will supply thy want
अशा क्षणिक प्रभावापेक्षा, नाशिवंत प्रभावापेक्षा, अविनाशी असा विद्येचा प्रभावच श्रेष्ठ नाही काय? 'When money is lost, nothing is lost' असे जेव्हा एक इंग्रज लेखक म्हणतो तेव्हा त्याच्या त्या विधानातूनहि हाच आशय डोकावत नाही काय?
सोन्यारूप्याचे धन सहजगत्या चोराच्या हाती लागणे शक्य असते. पण ह्रदयस्थ विद्याधन हरून नेण्याची कोणाची हिंमत आहे? लौकिक धन कधी कल्याणकारक ठरत असेल, पण ते अकल्याणहि करू शकते. पण विद्याधन नेहमी कल्याणच करील. लौकिक धन याचकाला दिल्याने संपुष्टात येते तर विद्याधन दान केल्याने वाढते. नेहमीचे धन निसर्गनियमानुसार विनाश पावेल तर विद्याधन प्रलयकालीहि नष्ट होणार नाही. असे हे विद्याधन जवळ वाळगणाऱ्यांशी स्पर्धा करण्याचे धाडस कोण बरे करील? भर्तृहरि म्हणतो:
हर्तुर्यातिन गोचरं किमपि शं पुष्णाति यत्सर्वदा ।
अर्थिभ्यः प्रतिपाद्यमानमनिशं प्राप्नोति वृद्धिं पराम् ।
कल्पान्तेप्वपिन प्रयाति निधनं विद्याख्यमन्तर्धनम् ।
येषां तान् प्रति मानमुज्ज्ञतं नृपा कस्तैः सह स्पर्धते ।।
नांगर श्रेष्ठ की लेखणी श्रेष्ठ?
अध्यक्ष महाराज, उपस्थित सज्जन आणि बंधुभगिनींनो!
आजचा विषय नांगर श्रेष्ठ की लेखणी श्रेष्ठ हा आहे. विषय दिसतो तितका सोपा किंवा क्षुल्लक नाही. आजच्या भारताच्या परिस्थितीत तो अत्यंत मूलगामी आणि विचारार्ह असा प्रश्न आहे. नांगर आणि लेखणी ही प्रतीके आहेत. व्यक्तीपुरता विचार करावयाचा झाला तर, नांगर हे व्यक्तीच्या शारीरिक श्रमशक्तीचे आणि लेखणी हे बौद्धिक व मानसिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. समष्टीच्या हिताच्या दृष्टीने किंवा सामाजिक दृष्टीने विचार केल्यास नांगर हे शेतकरी वर्गाचे, श्रमजीवी वर्गाचे आणि लेखणी हे बुद्धिजीवी वर्गाचे प्रतीक ठरते. तेव्हा नांगर की लेखणी हा वाद संकुचित अर्थाने त्या त्या वस्तूपुरता मर्यादित नसून व्यापक अर्थाने दोन मनोवृत्तीमधील वाद आहे. किंबहुना समाजाची उभारणी ज्या आधारावर होते अशा दोन आधारशीलांमधील हा वाद आहे.
आज देशाची परिस्थिति पाहिली असता आपणाला काय दिसून येते? बुद्धिवादावर फाजील भर देण्यात आल्यामुळे देशात सर्वत्र बौद्धिक अराजक माजलेले दिसून येते. जो तो शाळाकॉलेजातून बौद्धिक शिक्षण घेण्यास धडपडतो. परिणामतः त्यांना शारीरिक श्रमाची लाज वाटू लागते. निरनिराळ्या दर्ज्याच्या नोकऱ्यांच्या शोधार्थ पदवीचा शिक्का कपाळावर मारून घेतलेला हा तरुण वर्ग वणवण भटकतांना दिसतो. काही जण आपल्या बुद्धीचा विक्रय करून उदरभरण कसे करता येईल या विवंचनेने ग्रासलेले दिसतात. बुद्धिजीवी वर्गाची प्रमाणाबाहेर वाढ झाली की समाजाचे संतुलन बिघडते. समाजाला अस्थैर्य प्राप्त होते. सरकारी अधिकारी, धर्माधिकारी, नीतिप्रसारक, शिक्षक, अडते, लेखक, वकील, राजकारणी यांच्यासारख्या अनुत्पादक बुद्धिजीवी लोकांची प्रमाणाबाहेर फाजील वाढ झाल्याने कष्टाळू रयतेचा फार तोटा होतो. हेच दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे लेखणीचे स्तोम नांगरापेक्षा अवास्तव वाढल्यास समाजाच्या हितापेक्षा हानीच जास्त होते.
मनुष्याच्या उद्योगाचे दोन भेद आहेत. एक नियामक व दुसरा उत्पादक. नियामक उद्योग म्हणजे ज्या उद्योगामुळे मनुष्यास आपल्या समाजात व्यवस्था ठेवता येते. राजे, मंत्री, लष्करी शिपाई, न्यायाधीश, पोलीस, नीतिशिक्षक वगैरे लोक या प्रकारात मोडतात. म्हणजे हे समाजयंत्राचे चालक किंवा व्यवस्थापक आहेत. शेतकरी, कोष्टी, सुतार, गवंडी, मजूर वगैरे सर्वप्रकारचे कारागीर व धंदेवाले लोक दुसऱ्या वर्गात मोडतात. म्हणजे त्यांचा उद्योग उत्पादक आहे. केवळ नियामक उद्योग करणाऱ्यांची संख्या अगदी स्वल्प असून उत्पादक उद्योग करणाऱ्यांची मोठी संख्या ज्या देशात असते, तो देश विशेष सुखी असतो. ज्या लोकांना उत्पादक उद्योगाचा कंटाळा व काही हौस असलीच तर नियामक उद्योगाची - असे लोक कधीहि उन्नतीचे शिखर गाठणार नाहीत. उत्पादक उद्योग करण्याची हौस सार्वजनिक होऊन संपत्ति व व्यापार वाढल्याशिवाय सर्वांस चैन तरी कशी करता येईल! नियामक उद्योग करणारे लोक मुळीच नको असा माझ्या म्हणण्याचा विपर्यास कृपा करून करू नका. पण शेरभर मसाला आणि मूठभर तांदूळ अशी स्थिति काय कामाची? अंमलदार वाजवीपेक्षा ज्यास्त झाल्याने उत्पादक रयतेचे दोन प्रकारांनी नुकसान होते. एक तर त्यांच्या पगारासाठी तिला आपल्या उत्पन्नाचा बराचसा वाटा द्यावा लागतो, आणि दुसरे त्यांच्या जुलुमामुळे निढळाच्या घामाने कमावलेले उत्पन्न आपल्या हाती लागेल किंवा नाही याविषयी तिला संशय वाटू लागतो. या दोन कारणांमुळे उत्पन्न करण्याची इच्छा मंदावते, आणि त्यामुळे देशाची उत्पादन क्षमता कमी होऊन आर्थिक स्थिती ढासळते. महात्मा गांधी, आगरकर, विनोबा इत्यादि साऱ्या विचारवंतांचे हेच मत आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषिजीवी वर्गाचे नांगर हे अविभाज्य प्रतीक आहे. नांगरापेक्षा लेखणीला फाजील प्राधान्य मिळाल्यामुळेच सध्याची विपन्नावस्था वाढली आहे. बेकारीचे थैमान देशात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी तरवार की लेखणी हा वाद देशात सार्वत्रिकपणे चर्चिला जात होता. आज काळ पालटला आहे. बदलत्या मनूबरोबर समाजापुढील प्रश्नहि बदलत असतात. आज नांगर की लेखणी हे प्रश्नार्थक चिन्ह राष्ट्रातील विचारवंतांना बेचैन करीत आहे, भेडसावीत आहे. या प्रश्नाच्या योग्य सोडवणुकीवरच राष्ट्राच्या उज्वल भवितव्याची उभारणी होणार आहे. माझे तर असे स्पष्ट मत आहे की नांगर व लेखणी यांच्या योग्य संतुलनावरच राष्ट्रहित आधारलेले आहे. नांगर श्रेष्ठ की लेखणी श्रेष्ठ हा वाद वाढविण्यापेक्षा त्यांच्या प्रमाणबद्धतेवरच देशातील सुज्ञांनी अधिक भर दिला पाहिजे. नांगर आणि लेखणी या दोन प्रचंड शक्तींचा समन्वय झाला पाहिजे. यांचा समन्वय झाल्यास त्यांतून निर्माण होणारी शक्ति साऱ्या जगाला भारी पडेल.
ब्राह्मवृत्ति आणि क्षात्रवृत्ति यांची युति उपकारक ठरते. 'इदं ब्राह्मं इदं क्षात्रं, शापादपि शरादपि' अशा योग्यतेचे लोक भारतात होते, तेव्हा भारत वैभवाच्या शिखरावर आरूढ होता. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे शब्द मी उच्चारलेले ऐकून कृपा करून बिचकू नका. आज या शब्दांना प्राप्त झालेल्या संकुचित व विकृत अर्थाने मी त्यांचा वापर केला नाही, तर 'चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः' या गीतेतील उच्च भूमिकेवरूनच मी बोलत आहे. आज काळ असा आला आहे की ब्राह्मवृत्ति व कृषिगोरक्षवाणिज्यं ही वैश्यवृत्ति यांचा समन्वय होणे आवश्यक आहे. म्हणजेच नांगर व लेखणी यांचा सुसंबद्ध समन्वय होण्याची आवश्यकता आहे. देशातील विचारवंतांनी एकत्र बसून देशाची शेती व उद्योगधंदे यांच्या प्रगतीच्या योजना आखल्या पाहिजेत. सध्या देशात सुरू असलेल्या व होऊ घातलेल्या पंचवार्षिक योजना ह्याहि नांगर व लेखणी यांच्या युतीचेच एक फळ म्हणावे लागेल. गीता प्रतिपादन करणारे भगवान श्रीकृष्ण व हाती नांगर घेतलेला बलराम यांची जेव्हा युति झाली तेव्हा कंस, शिशुपाल, जरासंध यांची जुलमी साम्राज्ये कोलमडून पडली व देशात सुव्यवस्था निर्माण झाली. आजहि देशाला नांगर व लेखणी यांच्या समन्वयाची, संतुलनाचीच गरज आहे. त्यानेच यंत्रप्रधान किंवा कारखानेप्रधान समाजरचनेचे वाईट परिणामहि टळू शकतील. असो. इतके बोलून मी आपली रजा घेतो.
शक्ति श्रेष्ठ की बुद्धि श्रेष्ठ?
आजचा आपल्यासमोरील चर्चेचा विषय शक्ति श्रेष्ठ की बुद्धि श्रेष्ठ हा आहे. मी शक्तीची बाजू मांडणार आहे. बुद्धीची बाजू मांडणारे माझ्यावर चरफडतील, आपले शब्दपांडित्य दाखवतील, तावातावाने भांडतील! करोत बिचारे. परंतु काहीहि झाले तरी बुद्धीपेक्षा शक्ति श्रेष्ठ आहे हे निर्विवाद आहे.
शक्ति आणि बुद्धी यांचा समन्वय झाला तर ते दुधात साखर पडल्यासारखेच आहे. पण बुद्धी आहे परंतु शक्ति नाही, शक्ति आहे पण बुद्धी नाही अशा परिस्थितीत त्यांचे एकएकटे मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने पाहिले तर शक्तीच श्रेष्ठ नाही काय? अहो, शक्ती नसेल तर विद्वानाला आपल्या डोक्यातील विद्वत्तेचे ओझेहि सहन करता न येऊन त्याचे कंबरडे मोडेल. झाड आपल्या जोरावर एकटे उभे राहू शकते. पण वेलीला मात्र आधारच लागतो. त्याचप्रमाणे शक्ती ही स्वतःच्या पायावर उभी राहण्यास समर्थ आहे. परंतु बुद्धीचे मात्र शक्तीचा आधार मिळाल्याशिवाय भागत नाही.
स्वामी विवेकानंद म्हणत 'आमच्या तरुणांनी अगोदर बलवान झाले पाहिजे. माझ्या तरुण बांधवांनो, अगोदर बलवान व्हा, मग बाकीच्या गोष्टींकडे पहा. 'नायं आत्मा बलहीनेन लभ्य:' असे उपनिषदेच सांगत आहेत. शरीरबळ नसेल, अंगात धमक नसेल तर धर्मसाधन कसे घडेल? आत्मज्ञानहि घडणार नाही आणि पारमार्थिक कल्याणहि नाही अशी स्थिति होईल. अंगात जिवंत रक्त असले पाहिजे.'. किती सुंदर उपदेश आहे हा! 'ख, फ, छ, ठ, इत्यादि सुत्रपाठांची उरस्फोड करा, घट:, पट: इत्यादि वाक्यात निपुण होऊन पांडित्य मिरवा. अगोदर बुद्धीवान बना, शक्तीकडे दुर्लक्ष केले तरी चालेल!' असे नाही त्यांनी सांगितले.
लो. टिळकांनी कॉलेजचे एक वर्ष बुडविले आणि शक्ति संपादन केली. ते काय कमी बुद्धीमान होते? पण बुद्धीपेक्षाहि शक्ति श्रेष्ठ आहे हे त्यांना माहित होते म्हणूनच ना त्यांनी कॉलेजचे वर्ष देखील बुडविले?
रशिया, अमेरिका वगैरे राष्ट्रे आजे इतरांपेक्षा वरचढ झाली आहेत ती शक्तीच्याच जोरावर! भारत कोणत्या राष्ट्रापेक्षा बुद्धिमत्तेने कमी आहे? बुद्धिमत्तेतील सर्वश्रेष्ठत्व भारताकडेच येते. पण भारतीय शक्तीला विसरले. म्हणूनच त्यांना पारतंत्र्यात खितपत पडावे लागले.
शरीराचे आरोग्य उत्तम प्रकारे ठेवणे हे माणसाचे कर्त्तव्य आहे. आरोग्य असेल तर बाकीच्या साऱ्या गोष्टी. नाहीतर सारे व्यर्थ होय. हे देहयंत्र नुसते घासून पुसून स्वच्छ ठेवून भागत नाही तर ते सुरळीतपणे चालेल व धक्काबुक्कीहि सहन करील असे असावयास हवे, या गोष्टीकडे लक्ष न दिल्यामुळे आपल्या या भारतमातेला किती थोर आणि कार्यकर्त्या सत्पुत्रांचा अवेळी वियोग सहन करावा लागला आहे. त्यांनी बालपणापासून आयुष्यभर विद्यादेवीची उपासना केली. त्याऐवजी शक्तिदेवीची केली असती तर त्यांच्या हातून मायदेशाची कितीतरी अधिक सेवा झाली असती असे सुरेंद्रनाथ बॅनर्जी म्हणतात ते उगाच नव्हे.
आजकालची स्थिति अशी आहे की मी मी म्हणणारे विद्वान पंडित गल्लोगल्ली धूळ खात पडले आहेत. परंतु हिंमतवान, शक्तिशाली माणसे आपल्या शौर्यावर नावारूपास चढली आहेत. अन्याय झाला तर विद्वान माणूस प्रतिकार करू शकत नाही. तो दीन बनतो. केवळ बुद्धीच्या जोरावर त्यास काहीहि करता येणार नाही. परंतु शक्तिशाली मनुष्य अन्यायाचा प्रतिकार करून जाब विचारू शकतो. 'बळी तो कान पिळी' या न्यायाने बुद्धीमानास मात्र स्वस्थच बसावे लागते. विशाल ज्ञानसागरात अवगाहन करूनहि मच्छर मारण्याची जर शक्ति नसेल तर ती विद्वत्ता कवडीमोल नव्हे का? केवळ बुद्धिवानाचे बोल गोडगोड वाटतील, पण त्याच्या हातून कार्य काहीहि घडू शकणार नाही.
म्हणे 'विद्वान सर्वत्र पूज्यते'! पण आता तो जमाना मागे राहिला आहे. एका काळची नाणी दुसऱ्या काळात चालत नाहीत, असे रामकृष्ण परमहंस म्हणत. धातूंची झीज होते व शिक्काहि बदलतो. नबाबी अमलातील नाणी कंपनी सरकारच्या वेळी चालली नाहीत आणि कंपनी सरकारची नाणी पुढील अमदानीत रद्द झाली. आता विद्वानांना मान मिळण्याचा काळ काळाच्या गर्तेत गडप झाला. आता मान आहे शक्तिशाली लोकांना. म्हणून म्हटले पाहिजे 'बलवान सर्वत्र पूज्यते'. आणि बुद्धि बुद्धि तरी काय घेऊन बसला? बुद्धि ही देखील शेवटी एक शक्तीच आहे ना? बुद्धीचा शक्तीप्रमाणे उपयोग केला तर काही घडण्याची आशा! नाहीतर बुद्धीने काय होणार आहे? असो. प्रस्तुत विषयाची व्याप्ति इतकी मोठी आहे की मला देण्यात आलेल्या अल्पावधीत त्याच्या सर्व बाजूंचा साधकबाधक विचार करणे केवळ अशक्य आहे. तेव्हा एवढे बोलून मी आपली रजा घेते.
शिक्षण आणि क्रीडांगण
माझ्या सध्याच्या विद्यार्थी दशेशी अत्यंत निगडित व जिव्हाळ्याचा संबंध असलेला हा विषय आहे. सध्या बऱ्याचश्या शिक्षण संस्थांना क्रीडांगण नाही ही अप्रिय सत्यस्थिती आहे. ती दृष्टीआड करून चालणार नाही. सत्यस्थितीकडे डोळेझाक करून व पाठ फिरवून खोटे समाधान मानून घेणे मला कधीच आवडत नाही. Face the facts as they are हेच माझे कोणत्याहि प्रश्नाकडे पाहण्याचे सूत्रवाक्य आहे.
संधिसाधूपणाने पावसाळी छत्र्याप्रमाणे अनेक शाळा, विद्यालये, महाविद्यालये इत्यादि शिक्षणसंस्थांचे अमाप पीक येतांना दिसत आहे. कशीबशी इमारत भाड्याने घेऊन तिच्यात पालकांनी मोठ्या विश्वासानी धाडलेली मुले कोंडवाड्याप्रमाणे कोंडण्यात येतात. वर्गाच्या बसकट व कोंदट खोल्यात वर्ग सुरू झाला म्हणजे अध्यापक प्राध्यापकाच्या बोजड विषयाच्या काथ्याकूटाने आधीच बेजार झालेला गरीब विद्यार्थ्यांचा जीव मोकळ्या हवेच्या अभावी अक्षरश: गुदमरायला लागतो. शाळेला क्रीडांगण असले आणि शाळा सुटल्यावर तेथे मोकळेपणाने खुल्या हवेत खेळण्याची संधि लाभणार असली तर वर्गातील हाहि त्रास सुसह्य होतो. पण तेहि नाही. निदान नागपुरातील तरी बऱ्याच शाळांची अशी शोचनीय अवस्था आहे. शिक्षणाचा दर्जा वाढावयाचा असेल आणि शिक्षणाच्या लांबीरुंदीप्रमाणे त्याची खोली वाढवावयाची असेल तर ही स्थिति पालटलीच पाहिजे.
शिक्षण व क्रीडांगण यांचा फार निकटचा व घनिष्ट असा संबध आहे. पुष्कळांची शिक्षणाविषयी अत्यंत विपरीत समजूत आहे. आमच्या दर्शनकारांनी विपरीत ज्ञान हे अज्ञानाहूनहि भयंकर मानले आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी विद्या नव्हे. विद्यार्थी म्हणजे केवळ पुस्तकातील कीडा नव्हे. शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी जे गुण सुप्त रूपाने असतात ते जागृत करून त्यांना उज्ज्वल बनविणे, त्यांच्या अंगी असलेल्या शक्ति जागृत करून त्यांचे उन्नयन करणे. विद्यार्थ्यांची बौद्धिक, मानसिक, शारीरिक, नैतिक व सांस्कृतिक अशी सर्वांगीण उन्नति करून त्यांना जीवनाच्या धकाधकीला तोंड देण्यास पात्र बनविणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय व उद्दिष्ट होय.
या दृष्टीने विचार करता केवळ बौद्धिक व पुस्तकी शिक्षणावरच भर देणे हे अगदी अनुचित होय. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकास झाला पाहिजे, आणि असा शारीरिक विकास होणे हे क्रीडांगणावरच शक्य आहे. क्रीडांगणावर मोकळ्या हवेत मैदानी खेळ खेळल्याने व व्यायाम केल्याने स्नायू मजबूत व बळकट होतात. एवढेच नव्हे तर वृत्ति उल्हसित होऊन दुसरे दिवशी विद्यार्जन करण्यास अधिक उत्साह प्राप्त होतो.
A sound mind in a sound body असे म्हणतात ते अगदी खरे आहे. विद्यार्थी अशक्त असेल तर त्याच्याने धड विद्याभ्यासहि होऊ शकणार नाही. तो विद्याभ्यासाचा ताण सहन करू शकणार नाही. आज आपणाला काय दृष्य दिसते? विश्वविद्यालयीन शिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी घाण्यातून बाहेर पडलेल्या उसाच्या चिपाडाप्रमाणे जीवनरसच गमावून बसलेला दिसतो. झुकलेले खांदे, पोक आलेली पाठ, पाठीशी मिळण्याकरिता उत्सुक झालेली छाती, चाळीशीच्या निम्या वयातच चाळीशी डोळ्याला लागलेली अशी आमच्या बव्हंश सुशिक्षित तरुण तरुणींची आज अवस्था दिसते. आणि हा सारा कशाचा परिणाम? तर शिक्षण व क्रीडांगण यांच्या झालेल्या फारकतीचा. शिक्षण व क्रीडांगण हे एकमेकांचे पूरक आहेत. एवढेच नव्हे, तर क्रीडांगण हे शिक्षणाचेच एक अंग आहे असे मला येथे जमलेल्या सुज्ञ श्रोत्यांना आग्रहपूर्वक सांगावेसे वाटते. आणि याच्याहि पुढे एक पायरी चढून मी असे म्हणू इच्छिते की क्रीडांगण हा शिक्षणाचा आत्मा आहे. क्रीडांगणावाचून विद्यालय म्हणजे प्राणावाचून मढे, चैतन्यावाचून देह. क्रीडांगणावरच विद्यार्थ्यांच्या देहात व मनात चैतन्याचा संचार होतो.
दुसरे असे की अभ्यासाच्या कटकटीने कंटाळलेल्या जीवांना क्रीडांगणावरच मोकळेपणा लाभतो. Change of work is rest या न्यायाने शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होत असतांनाच मनाला तेथे विश्रांती लाभते व ते ताजेतवाने होते. कार्य आणि विश्रांति यांचा मधुर संगम क्रीडांगणावर जसा होतो, तसा तो अन्यत्र कोठेहि होत नाही. क्रीडांगणावर खेळीमेळीचे वातावरण असल्यामुळे परस्परांमधील गैरसमज दूर करणारे ते महत्त्वाचे माध्यम आहे.
आजच्या विद्यार्थ्यांतूनच राष्ट्राची भावी पिढी उदयास येणार आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक होत. आजचे विद्यार्थी उद्याच्या राष्ट्राचे आधारस्तंभ होत. तेव्हा विद्यार्थी शरीराने व मनाने निकोप प्रकृतीचे, सुदृढ व निरामय असले पाहिजेत, आणि हे ध्येय साध्य करावयाचे असल्यास क्रीडांगणाची कास धरल्यावाचून गत्यंतर नाही. उत्तम नागरिकत्वाला आवश्यक असणारे सहकार्य, सेवाभाव, शिस्त, आज्ञाधारकपणा, खेळाडू वृत्ति, काटकपणा, कर्त्तव्यनिष्ठा, संघभावना, निर्भय वृत्ति, धाडस, कार्यकारणांचे सम्यकज्ञान, योग्य निर्णय घेण्याची पात्रता इत्यादि अनेक गुणांचे प्राथमिक पाठ क्रीडांगणावरच मिळू शकतात. म्हणून क्रीडांगण ही नागरिक जीवनाची पाठशाळा आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. तसेच प्रतिपक्षावर हल्ला चढविण्याकरिता करावी लागणारी चमूची रचना व आखणी आणि डावपेच, ज्याला इंग्रजीत Strategy आणि Tactics असे म्हणतात, ते लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गुण क्रीडांगणावरच विद्यार्थी आत्मसात करतो. क्रीडांगणावरील क्षेत्ररक्षण आणि रणांगणातील क्षेत्ररक्षण यांचे आंतरिक स्वरूप एकच आहे, असेच कोणीहि म्हणेल. तेव्हा या सर्व विवेचनावरून ही गोष्ट स्पष्ट आहे की शिक्षण हे खऱ्या अर्थाने शिक्षण व्हावयाचे असेल आणि ते राष्ट्रनिर्मितीचे एक साधन म्हणून कार्यशाली व्हावयाचे असेल तर शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाशी क्रीडांगणाची सांगड घालणे अत्यावश्यक आहे.
लहान तोंडी मोठा घास हा आरोप पत्करून देखील सर्व मुख्याध्यापकांना व प्राचार्यांना मला अशी नम्र व आग्रहाची विनंति करावीशी वाटते की तुमच्या विद्यालयाला किंवा महाविद्यालयाला क्रीडांगण नसेल तर ते शीघ्रातिशीघ्र मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न करा आणि प्रयत्न करूनहि ते साध्य होणार नसेल तर आपले विद्यालय वा महाविद्यालय बरखास्त करा. स्वतंत्र भारतात शिक्षण व क्रीडांगण या अविभाज्य गोष्टी समजण्यात आल्या पाहिजेत. नगरपालिकांनी, सरकारने व समाजातील धनिक वर्गाने या गोष्टीकडे तातडीने लक्ष पुरवून शाळाकॉलेजांना क्रीडांगण मिळवून देण्याची खटपट केली पाहिजे. क्रीडांगणासारखा व्यापक विषय सात मिनिटांच्या अल्पावधीत मर्यादित करण्याचे दुष्कर कार्य करून दाखविण्याची संधि आजच्या स्पर्धेच्या नियोजकांनी मला दिली याबद्दल त्यांचे आभार मानून मी आपली रजा घेते.
विद्यार्थी आणि राजकारण
विद्यार्थी आणि राजकारण हा सध्या सर्वत्र प्रामुख्याने चर्चिला जाणारा वादाचा विषय आहे. या प्रश्नावर उलटसुलट मते निरनिराळ्या लोकांकडून मांडली जातात व त्यांचे आग्रहपूर्वक समर्थनहि करण्यात येते. कोणी म्हणतात विद्यार्थ्यांनी राजकारणापासून पूर्णत: अलिप्त राहिले पाहिजे तर कोणी म्हणतात विद्यार्थ्यांनी राजकारणात सक्रीय भाग घेतला पाहिजे. प्रत्येक मताच्या बाजूने वजनदार प्रमाणे त्या त्या मताची प्रतिपादक मंडळी देतात, आणि विद्यार्थ्यांचा बुद्धिभेद करतात.
विद्यार्जन हे विद्यार्थ्यांचे प्रमुख कर्त्तव्य आहे. विद्यार्थ्यांनी आपला सर्व काळ व शक्ति व सर्व उत्साह विद्यार्जनातच खर्च केला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या या मुख्य कर्त्तव्यात जेणे करून बाधा निर्माण होईल असे त्याने काहीहि करता कामा नये. विद्यार्जनाच्या या कार्यात जर काही कारणाने व्यत्यय निर्माण झाला तर राष्ट्राची भावी पिढी सुशिक्षित व सुसंस्कारित निपजणार नाही आणि त्यायोगे राष्ट्राची मोठीच हानी होईल. सध्याच्या शिक्षणक्रमाप्रमाणे विद्यार्थी दरवर्षी उत्तीर्ण होत गेला तर २१ वर्षाच्या वयात तो एम्. ए. किंवा एम्. एस्. सी. होतो. २१ वर्षापर्यंतचे वय हे अपरिपक्व वय आहे. कायद्याप्रमाणे २१ वर्षाखालील व्यक्तीला मताधिकारहि नसतो. तेव्हा अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने प्रत्यक्ष राजकारणात पडणे किंवा कोणत्याहि राजकीय पक्षाच्या चळवळीत पडणे हे अत्यंत घातुक होय. राजकीय पक्षनेते आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी विद्यार्थ्यांना आपल्या चळवळीत ओढू पाहतात. पण त्यांचे हे कृत्य अदूरदर्शीपणाचे आहे. अप्रगल्भ वयात पक्षांधतेचे बाळकडू मिळाल्याने माणसाचा दृष्टिकोन विशाल राहत नाही व त्याची वृत्ती एकारलेली बनते. म्हणून विद्यार्थ्यांनी कोणत्याहि प्रत्यक्ष राजकारणात भाग न घेता विद्याभ्यासाकडेच आपली शक्ती खर्च करणे हेच इष्ट होय. असे केल्यानेच राष्ट्राला उत्तम शिक्षक, उत्तम प्राध्यापक, उत्तम वकील, उत्तम डॉक्टर, शिल्पकार, इंजिनियर्स, वैज्ञानिक, तंत्रज्ञ मिळतील व राष्ट्राच्या उत्कर्षाला हातभार लावतील.
याचा अर्थ असा नव्हे की विद्यार्थ्यांनी राजकारणाकडे पूर्णपणे पाठ फिरविली पाहिजे किंवा राजकारणाशी मुळीच संपर्क ठेऊ नये. त्यांनी राजकारणातील सर्व मतमतांतराचा व मतप्रवाहांचा अभ्यास केला पाहिजे. कोणत्याहि राजकीय पक्षाच्या प्रचाराला बळी न पडता निर्विकार व पूर्वग्रहविरहित बुद्धीने हा अभ्यास झाला पाहिजे. विद्याभ्यास संपल्यानंतर कोणता पक्ष स्वीकारावयाचा हे ठरविण्यास योग्य पार्श्वभूमी तयार होईल. राजकारणातील जे निरनिराळे प्रश्न आहेत त्यांच्याशीहि विद्यार्थ्यांनी परिचय करून घ््यावा, परंतु राजकारणात सक्रिय भाग मात्र घेऊ नये.
आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. उद्याच्या राष्ट्राची जबाबदारी त्यांच्याच शिरावर येऊन पडणार आहे. विद्यार्थ्यांतूनच नवीन पिढी आकाराला येत असते. तेव्हा विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा सर्व दृष्टींनी उन्नति होणे हेच राष्ट्रहिताकरिता आवश्यक आहे. शक्ति संपादन करून तिचा संचय करण्याचा हा काळ असतो हे ओळखून आपल्या शक्तीचा प्रत्यक्ष राजकीय चळवळीत भाग घेऊन अनाठायी व्यय करण्याचे विद्यार्थ्यांनी टाळले पाहिजे. तरच भावी जीवनात राष्ट्राच्या भवितव्याची धुरा सांभाळण्यास ते कार्यक्षम होतील.
पण काही झाले तरी विद्यार्थी हा राष्ट्राचा घटक आहे. देशावर परचक्र ओढवले, देशाचे अस्तित्वच धोक्यात आले किंवा देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर देशाच्या संरक्षणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणे प्रत्येकाचे परम कर्त्तव्य आहे. तसेच ते विद्यार्थ्यांचेहि आहे. देशावर संकट आले असतांना विद्यार्थी वर्गच पुस्तकात डोके खुपसून कसा बसू शकेल? घर पेटले असताना आग विझविण्यासाठी प्रत्येकाने धावलेच पाहिजे. त्याचप्रमाणे देशाला आग लागल्यास ती विझविण्यासाठी विद्यार्थ्यांनीहि पुढे सरसावले पाहिजे. राष्ट्ररक्षणाच्या कार्यात विद्यार्थ्यांनीहि आपला वाटा उचलला पाहिजे, हे कोणीहि कबूल करील. तसाच प्रसंग पडल्यास विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज सोडून राष्ट्ररक्षणाच्या कार्यात प्रत्यक्ष उडी घ््यावी लागेल. पण ही झाली अपवादात्मक आणीबाणीची परिस्थिती. नित्याच्या जीवनात विद्यार्जन हेच विद्यार्थ्यांचे प्रमुख कर्त्तव्य होय. त्यांनी राजकारणाच्या वाटेस न गेलेलेच बरे!
अलिकडे काही संस्था व संघटना विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या अविकसित मनावर आपल्या तत्त्वज्ञानाची पुटे चढविण्याचा प्रयत्न करतात. हे अत्यंत गैर आहे. त्यायोगे संकुचित दृष्टिकोनाचे तरुण निर्माण होऊन राष्ट्राची हानी होते. स्वतंत्र बुद्धीने विचार करून निर्णय घेण्याची पात्रता अंगी येण्याच्या अगोदरच त्यांच्या मनावर हा अत्याचार करण्यात येतो. हे व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत अनिष्ट होय.
जगातील थोर विचारवंतांचेहि मत असेच आहे की विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष राजकारणात भाग घेऊ नये. विद्यार्थी दशेत त्याची भूमिका अभ्यासकाची असावी. विद्यार्थी आपली जबाबदारी ओळखून आपला विद्याभ्यास मन लावून करतील तरच ते भावी जीवनात भारताला उन्नतीच्या पथावर अग्रेसर करण्यास समर्थ ठरतील. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत प्रत्यक्ष राजकारणात न पडण्याचे पथ्य पाळलेच पाहिजे. तरच निकोप राष्ट्रीय वृत्तीचे नागरीक निर्माण होतील व राष्ट्रजीवनाचा प्रवाह विशुद्ध राहील. भारत दैदिप्यमान तेजाने तळपू लागावा व प्रगत राष्ट्रांच्या मालिकेत तो मेरुमण्याप्रमाणे शोभावा अशी इच्छा असल्यास विद्यार्थ्यांनी संयम पाळून विद्यार्जनाचे व्रत कर्त्तव्यबुद्धीने पार पाडले पाहिजे. असे झाले तरच भारताला पुनश्च अखिल विश्वाचे गुरुस्थान लाभेल यात शंका नाही.
अनेक विषयांवर परिसंवादाच्या मिषाने बाबांनी मते मांडली. परिसंवादातहि विषय वादजन्यच असतो. पण येथे विषयाच्या बाजूनेच किंवा विरोधातच बोलले पाहिजे असे बंधन नसते. एक बाजू घेताना दुसऱ्या बाजूवर तुटून पडण्याची आवश्यकता नसते. परिसंवाद म्हणजे शाकाहारी वादविवाद. या सर्व भाषणांमधे बाबांची मते उमटली असतील असे समजावयास हरकत नाही.
_____________________
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment